https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

ॲड. प्रदीप डी. ठक्कर यांचे दुःखद निधन!

कल्याण न्यायालयाचे माजी न्यायाधीश, वरिष्ठ वकील व आंतरराष्ट्रीय मानव हक्क संघटनेचे ठाणे जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष ॲड. श्री. प्रदीप ठक्कर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन!

आजच सकाळी आंतरराष्ट्रीय मानव हक्क संघटनेचे महासंचालक श्री. उमेद विसारिया यांचेकडून फेसबुक इनबॉक्स मध्ये व कल्याण वकील संघटना (दिवाणी) चे पदाधिकारी श्री. नरेंद्र बोंद्रे यांचेकडून फेसबुकवर वाईट बातमी मिळाली की कल्याणचे सिनियर वकील व कल्याण न्यायालयाचे माजी न्यायाधीश व
तसेच आंतरराष्ट्रीय मानव हक्क संघटनेच्या ठाणे जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष ॲड. श्री. प्रदीप ठक्कर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. ही माझ्यासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे. कारण कल्याण कोर्टात प्रॕक्टिस करीत असताना ॲड. प्रदीप ठक्कर यांच्याच चेंबर मध्ये मी काही काळ त्यांचा ज्यूनियर वकील म्हणून काम केले आहे. कल्याणच्या त्यांच्या अॉफीसमध्ये ज्यूनियर वकिलांचा खूप राबता होता. त्यांची कायद्याच्या पुस्तकांची खूप मोठी लायब्ररी आहे. कोर्टाचे अर्ज, प्रोसिडिंग्ज ते जुन्या पद्धतीने सफाईदारपणे लिहायचे व मग ज्यूनियर वकिलांकडून त्याचे टायपिंग होऊन ते कोर्टात सादर व्हायचे. कोर्टातही ते थोडक्यात पण मुद्देसूद युक्तिवाद करायचे. त्यांच्या विषयी माझ्या मनात आदरयुक्त दबदबा होता. पण ते आता या जगात नाहीत. माणसे सोडून चालली हो! खूप दुःख झाले! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबास हे दुःख सहन करण्याचे बळ देवो! अत्यंत दुःखी मनाने त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली!

-ॲड.बी.एस.मोरे, ८.९.२०२०

ओम फट स्वाहा (झपाटलेला)!

उलट संबंध (क्रॉस कनेक्शन) व विजोड संबंध (मिस मॕचिंग/इल मॕचिंग)!

(१) तुमच्या मनाची अंतःप्रेरणा (तुमचा आतला आवाज) व तुमच्या मनावर प्रभाव टाकणारे पर्यावरणातील बाह्य घटक (जसे सभोवतालची नैसर्गिक व सामाजिक परिस्थिती, तुमच्या आजूबाजूला घुटमळणारी व तुमच्यावर प्रभाव टाकणारी माणसे) यांची सुसंगती लागली नाही की तुमच्या मनात गोंधळ निर्माण होतो. इतकेच नव्हे तर या असंगतीमुळे तुम्हाला काही वेळा वेड लागण्याची पाळी येते. यातूनच मराठीत  "असंगाशी संग प्राण कंठी" अशी एक म्हण निर्माण झालीय.

(२) तसे प्रत्येकाला काहीना काहीतरी वेड असतेच (पूर्ण शहाणे असलेल्या लोकांनी मला कृपया या वाक्याबद्दल माफ करावे). मला तर मंत्रचळ हा मानसिक आजार खूप दिवसांपासून आहे. मंत्रचळाला इंग्रजीत ओसीडी म्हणजे अॉब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसअॉर्डर म्हणतात. परिपूर्णतेच्या (परफेक्शनच्या) हट्टातून मला हा आजार लागला. यात केलेली गोष्ट नीट झालीय की नाही हे पुन्हा पुन्हा तपासून घेण्याची मनाला सवय लागते. अती व्यवस्थितपणाची माझी ही सवयच ओसीडीमध्ये रूपांतरीत झालीय हा माझा स्वतःचा कयास! कारण मी कोणत्याही मानसतज्ज्ञाकडे याची चौकशी करायला गेलो नाही. माझे मन मानसिकदृष्ट्या ९५% तंदुरूस्त आहे. त्याच्या जोरावर मला त्रास देणाऱ्या या ५% ओसीडीवर मी स्वतःच मात केलीय. मला भीती आहे की या ५% ओसीडीवर मोठा विजय मिळविण्यासाठी मानसतज्ज्ञाने लिहून दिलेल्या गोळ्या घ्यायचो व माझ्या मनाची ९५% ताकद घालवून बसायचो.

(३) मनाला त्रास देणारी दुसरी गोष्ट म्हणजे काम करता करता मन मध्येच रिकामे (ब्लॕन्क) होणे किंवा शून्यात जाणे. हायकोर्टात वकिली करताना सिनियर वकिलांकडून मी एखादी केस नीट समजावून घेताना मध्येच ब्लॕन्क व्हायचो. सिनियर वकील बोलत रहायचे आणि मी मात्र काही क्षण शून्यात गेलेलो असायचो. सिनियर वकिलांच्या लक्षात ही गोष्ट आली की ते बाजूला बसलेल्या इतर वकिलांना म्हणायचे "गेला, हा आता स्वर्गात गेला"! मग काही वेळाने मी पुन्हा भानावर यायचो व सिनियर वकिलांची माफी मागून म्हणायचो "सर सॉरी, लिंक तुटली". मग वैतागून ते सिनियर वकील मला म्हणायचे की, "माझ्या ओळखीचे एक चांगले मानसतज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून एक गोळी चालू करू व मग तुझा हा त्रास दूर होईल". तेंव्हा त्या तरूण वयातही मी पटकन बोलायचो "सर, फक्त तेवढे सोडून बोला, मी मध्येच ब्लॕन्क झाल्यावर तुम्ही सुद्धा प्लिज थोडा पॉज घ्या व मग पुढे आपण आपली केसची गाडी सुरू करू"! ते ऐकून माझे ते सिनियर हसायचे व गंमतीने म्हणायचे की "घेतो बाबा तुझ्यासाठी पॉज, कारण तू स्वतःचेच खरे करणार, हटयोगी आहेस तू"!

(४) हल्ली या कोरोना लॉकडाऊनच्या काळात अधूनमधून मला वेडाचे सौम्य झटके येतात. मी कधीही झोपतो, कधीही ऊठतो, कधीही खातो. माझ्या दिनचर्येला काहीच ताळमेळ राहिला नाही. कधीकधी झोप लागल्यावर चित्रविचित्र स्वप्ने पडतात. असेच एक स्वप्न मला हल्लीच पडले. एके दिवशी माझी कोरोना टेस्ट केली जाते व मग माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येतो. मग एका रूग्णालयात मला ॲडमिट केले जाते. तिथे माझ्यावर काहीतरी उपचार केले जातात. मी तिथे कसल्या तरी गोळ्या खातो. दोन दिवसांनी मी धाप टाकू लागतो. मला श्वास घ्यायला फार त्रास होऊ लागतो. मग मी श्वास अडकून मरतो. त्यानंतर माझ्या मृतदेहाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून पांढऱ्या कपड्यातील काहीजण ॲम्ब्युलन्समधून एका स्मशानभूमीत घेऊन जातात. पण माझा मृतदेह ॲम्ब्युलन्स मध्ये चढवण्यापूर्वी माझी बायको व मुलगी रूग्णालयाच्या डॉक्टर्स व नर्सेसला गयावया करून रडत रडत सांगतात की एकदा तरी माझे तोंड त्यांना बघू द्या. पण त्या दोघींना सरळ बाजूला करून माझा मृतदेह अॕम्ब्युलन्स मधून त्या भयाण स्मशानभूमीत नेला जातो. माझा तो मृतदेह दोन माणसे स्ट्रेचर वरून विद्युतदाहिनीत ढकलतात. मी आत गेल्यावर अगोदरच विद्युत दाहिनीत पेटलेल्या आगीच्या ज्वाळांनी माझा मृतदेह लपेटला जाऊन तो जळू लागतो. अशी भयानक स्वप्ने मला अधूनमधून हल्ली पडतात. याचे कारण म्हणजे टी.व्ही. व वृत्तपत्रातील कोरोना संदर्भातील सातत्याने चालू असलेल्या भीतीदायक बातम्यांचा भडीमार!

(५) काल मी दुपारी २ ला झोपलो तो रात्री ९ लाच उठलो. म्हणजे सलग ७ तास निवांत झोप. पण झोपेची वेळ विचित्र. मग अंघोळ वगैरे करून रात्री ११ वाजता चहा नाष्टा केला. मग रात्री ११ ते पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जागणे. सगळे विचित्र चाललेय. त्यातच काल पुन्हा झोपेतच आणखी एक विचित्र स्वप्न मला पडले. मागे मी महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट पाहिला होता. त्यात भुताचा आत्मा घेऊन फिरणारे एक बाहुले दाखवलंय. ते काही लोकांच्या छातीवर बसून हृदयाला गुदगुल्या करायचे. काल झोपेत पडलेल्या माझ्या स्वप्नात तेच तात्या विंचू भुताचे बाहुले आले व माझ्या छातीवर बसून मला गुदगुल्या करू लागले. मी जाम घाबरलो. छातीच्या खालीच माझे हृदय असल्याने ते हृदय जोरात धडधडू लागले. मी घामाने ओलाचिंब झालो. त्या स्वप्नाने मी इतका घाबरलो की जागाच झालो. त्यानंतर नीट उठून बसल्यावर नीट विचार केला की हे स्वप्न खरे असायला हवे होते. म्हणजे मी हृदयाला झटका बसून पटकन मेलो असतो. त्या कोरोनाच्या संसर्गाने मरून प्लास्टिकमध्ये जळण्यापेक्षा हे सहज मरण किती उत्तम! खरंच मला काही माणसे झोपेतच मरतात त्यांचा हेवा वाटतो. असेच मरण मला दे म्हणून मी परमात्म्याला हल्ली प्रार्थना करीत असतो.

(६) या लेखाचा सार काय की, आयुष्यात कधी कोणाशी क्रॉस कनेक्शन किंवा मिस मॕचिंग संबंध निर्माण झाले की अशा कुसंगतीतून प्राण कंठाशी येतात. मग "नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे" हे मराठी गीत गुणगुणत रहावे असे वाटू लागते. या २०२० साली आपल्या सगळ्यांचेच कोरोनाशी असे क्रॉस कनेक्शन लागून प्राण कंठाशी आणणारे मिस मॕचिंग संबंध निर्माण झाले आहेत असे मला वाटते!

-ॲड.बी.एस.मोरे©८.९.२०२०

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

परप्रांतीय मजूर व मराठी माणूस!

कोरोनामुळे महाराष्ट्रात मराठी माणूस आणखी बेकार होतोय का?

कोरोनाला घाबरून परप्रांतीय कामगारांनी मुंबई  सोडली, महाराष्ट्र सोडला तेंव्हा किती ओरड केली काही लोकांनी! परप्रांतीय कामगारांची कामगार कायद्याप्रमाणे स्थलांतरीत कामगार म्हणून कामगार आयुक्तांकडे नोंदणी होतेय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाला घाबरून आपआपल्या राज्यांत परत जाणारे परप्रांतीय जर महाराष्ट्रात रितसर नोंदले असतील तर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी कायद्याने आडकाठी नाही. पण ज्यांची महाराष्ट्रात अशी नोंदच नाही त्यांचे पुन्हा कायदेशीर नोंदणी न करताच स्वागत करणे चालू असेल तर ते फार चुकीचे आहे. मागे मा. राजसाहेब ठाकरे हे या मुद्यावर बोलले आहेत. मला तर यामागे वेगळेच अर्थकारण असल्याचे दिसून येते. इथे मराठी माणसांना डावलून या परप्रांतीयांचे कोरोना लॉकडाऊन काळातच स्वागत होताना दिसत आहे कारण हे मजूर स्वस्तात राबतात. ते स्वस्तात मिळतात कारण त्यांच्या राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्याप्रमाणे उद्योगधंद्याचा विकास झाला नाही. म्हणून तिकडे खूप बेकारी आहे. ते मजूर स्वस्तात काम करतात म्हणून इथल्या व्यापारी, उद्योगपतींना हे परप्रांतीय मजूर फायदेशीर वाटतात. पिळवणूकीवर आधारित असलेल्या या आर्थिक फायद्यासाठी या परप्रांतीयांचे पुन्हा स्वागत करून मराठी माणूस या महाराष्ट्रात बेकार केला जातोय का? परप्रांतीय मजूर पुरवठा करणारे ठेकेदार या परप्रांतीय मजूरांकडून मधल्या मध्ये त्यांच्या स्वस्त पगारातूनही कमिशन खात या परप्रांतीय मजूरांची आणखी पिळवणूक करीत नसतील कशावरून? शिवाय महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भूमीपुत्र या मराठी मातीतच या परप्रांतीय मजूरांच्या स्वागतामुळे बेकार होतोय त्याचे काय करायचे?

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२०

कोरोना लॉकडाऊन व माझी घसरलेली वकिली!

कोरोना लॉकडाऊन व अर्थप्राप्तीचे कायदेशीर काम हे दोनच विषय सद्या मला महत्त्वाचे!

सद्या कोरोना लॉकडाऊन व पैशाची भ्रांत एवढे दोनच विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत व मुंबईच्या लोकल ट्रेन्स सुरू होत नाहीत तोपर्यंत तरी मला काम मिळणे कठीण आहे. सद्या या लोकल ट्रेन्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी चालू आहेत. वकील अत्यावश्यक सेवेत मोडत नाही असे हायकोर्टाने जाहीर केलेय. मी कोर्टाच्या बाहेरही कायदा सल्ला व दस्तऐवज बनविणे ही पार्ट टाईम प्रॕक्टिस करू शकतो. इथे डोंबिवली मुक्कामी स्थानिक पातळीवर ते काम मिळत नाही. त्यासाठी मला मुंबईलाच जायला हवे. मला तिकडेच अशाप्रकारचे थोडेफार काम मिळू शकते. म्हणून मी मुंबई लोकल ट्रेन सुरू व्हायची आतुरतेने वाट बघतोय. बाकी आता मला इतर गोष्टींत रस वाटत नाही. माणूस असा बिझी हवा की त्याला त्या कामातून थोडे तरी पैसे मिळाले पाहिजेत. गेली पाच ते सहा महिने मी निर्लज्जासारखा विवाहित मुलीच्या पैशावर जगत घरी बसून आहे. स्वाभिमानी माणसाला हे असे जगणे महाकठीण! आयुष्यात मी कधीही कोणाची मदत घेतली नाही. मी जे कमावले ते स्वतःच्या कर्तुत्वावर! बालपणी आईवडील व म्हातारपणी मुलगी असा मात्र माझ्या मदतीचा भाग झालाय. आईवडिलांचे ठीक आहे कारण आपण त्यावेळी लहान असतो. पण मी ज्ञानाने व अनुभवाने ६४ वर्षे वयाचा टप्पा गाठल्यावर मुलीच्या मदतीवर जगणे हे माझ्या स्वाभिमानी मनाला पटत नाही. वकील मंडळी व वकील संघटनांचीही मदतही मी सविनय नाकारली. ती इतर गरजूंना द्या असे मी त्यांना सांगितले. माझे ज्ञान कमकुवत झालेले मी सहन करू शकत नाही. सद्या एकदम बेकार अवस्था झालीय! मला अॉनलाईन कामे जमत नाहीत. कायद्याचे मोठमोठे दस्तऐवज असतात. फेसबुकवर लेख लिहिणे मला सोपे आहे. पण या उतार वयात ते अॉनलाईन वकिलीचे काम मला अवघड आहे. माझी वकिलीची स्टाईल जुनी आहे. हल्लीचे तरूण वकील या अॉनलाईन वकिलीत हुशार आहेत. तीच तर माझी गोची आहे! मी क्लायंटसोबत प्रत्यक्ष समोरासमोर बसून केस ऐकून क्लायंटला पटकन कायदेशीर सल्ला देऊ शकतो. पण त्यासाठी समोरासमोर बसून केस चर्चा महत्त्वाची असते. मग त्या चर्चेत (कॉन्फरन्स) मी दिलेल्या सल्ल्यानुसार कंपनीचाच टायपिस्ट तिथे हजर असतो. मग मी सांगेन त्याप्रमाणे तिथे कोर्टाचे प्रोसिंडिंग्ज, दस्तऐवज बनतात. मी मुख्यतः कायदेशीर दस्तऐवज व कोर्टाचे सिव्हिल प्रोसिडिंग्ज ड्राफ्ट करतो व चर्चेतून कायदेशीर सल्ला देतो. हाच तर माझा अनेक वर्षांचा मोठा अनुभव आहे. मुंबईत सॉलिसिटर फर्म्स असे काम करतात. मी सॉलिसिटर नसलो तरी माझे काम त्याच स्वरूपाचे आहे. लिगल ड्राफ्टिंग व कोर्ट ब्रिफिंग कामात मी तज्ञ आहे. असे उच्च कायदेशीर काम फक्त मुंबईतच मी मिळवलेय व यापुढेही ते मी मिळविणारच! कृपया ही माझ्या कामाची जाहिरात आहे असे कोणीही समजू नये. मन मोकळे करावे वाटले म्हणून थोडे सविस्तर लिहिले आहे. एवढे मात्र खरे की हा सद्याचा काळ मलाच नाही तर सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे. मिडियात मात्र दुसरेच विषय घोळून घोळून चवीने चघळले जात आहेत. मला तर तो टी.व्ही. बघू वाटत नाही की वर्तमानपत्र उघडून वाचू वाटत नाही. मला वाटतेय की, अॉक्टोबर महिन्यापासून हळूहळू गाडी रूळावर येईल. तोपर्यंत आशेने वाट बघतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२०

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

मैं तो चला जिधर चले रस्ता!

मैं तो चला जिधर चले रस्ता!

कोरोनाला किती घाबरून राहू? मरण तर आज नाहीतर उद्या कधीही येऊ शकते. मग आहे तो दिवस, आहे तो क्षण आनंदात का घालवू नये? कोरोनामुळे व त्याच्या लॉकडाऊनमुळे मला आता पुढे कोणतेच ध्येय दिसत नाही. मी आता कोणत्याच मैफिलीत सामील होऊ शकत नाही. मग माझे मन काय म्हणणार? जिथे रस्ता नेईल तिकडे मी चाललो! म्हणून तर आज दिनांक ६ सप्टेंबर २०२० च्या सकाळी सूर्याची किरणे अंगावर घेत घरात बसूनच धडकन या जुन्या हिंदी चित्रपटातील हेच गाणे गुणगुणलो "मै तो चला जिधर चले रस्ता"!

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

https://youtu.be/GTj1Ki5MMMM

मैं तो चला जिधर चले रस्ता!

जेंव्हा सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे होतात!

मानवी मनाच्या लोखंडासारख्या जड भौतिक वासना व हवेसारख्या हलक्या आध्यात्मिक भावना यांच्या भरकटण्यावर नियंत्रण ठेवणारी व त्या दोघांत समन्वय व संतुलन साधणारी स्वतंत्र बुद्धी हीच सदसद्विवेकबुद्धी होय. ही स्वतंत्र बुद्धी जेंव्हा कोमात जाते किंवा काही काळापुरती रिकामी होते तेंव्हा तिचे दोन तुकडे होतात. सदसद्विवेकबुद्धीचा एक तुकडा जड वासनांबरोबर वाहत जातो व दुसरा तुकडा हलक्या भावनांबरोबर वाहत जातो व हे दोन्ही तुकडे मनाबरोबर भरकटले जातात. वासनिक व भावनिक मनावरील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा सुटणे यालाच बुद्धीचे भरकटणे म्हणतात. अशा अवस्थेत वासनांध व भावना वेडे मन हे बुद्धीचा ताबा घेते व बुद्धीच्या दोन तुकड्यांना मनाप्रमाणे नाचवते. स्वतंत्र कार्य करणाऱ्या सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे झाले की काय होते तर माणूस एकतर इहवादी बनतो किंवा देवभोळा किंवा अती नैतिक होतो. खरं म्हणजे इहवाद (मटेरियलिजम) हे निसर्गाचे पूर्ण विज्ञान नसून ते बुद्धीचे जड वासनेबरोबर भरकटणे होय. तसेच देवभोळेपणा किंवा अती नैतिकता (स्पिरिच्युअलिजम) ही आध्यात्मिकता नसून ते बुद्धीचे हलक्या भावनेबरोबर भरकटणे होय.

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

टीपः

माझ्या या लघु लेखाला १९७२ साली प्रदर्शित झालेल्या धडकन या चित्रपटातील संजय खान या नटावर चित्रित केलेले "मैं तो चला जिधर चले रस्ता" हे गाणे प्रातिनिधीक म्हणून घेतले आहे. आपल्या मनाला निश्चित ध्येय नसेल तर आपले मनही असेच जिथे रस्ता फुटेल तिथे भरकटते. आपली सदसद्विवेकबुद्धी जेंव्हा रिकामी होते व तिचे दोन तुकडे होतात तेंव्हा मग मन जिकडे धावेल तिकडे बुद्धीचे हे दोन तुकडेही भरकटलेल्या अवस्थेत धावत जातात. कारण मनाला निश्चित ध्येय सांगणारी व त्या ध्येयाच्या दिशेने योग्य मार्ग दाखविणारी स्वतंत्र   सदसद्विवेकबुद्धी जाग्यावर नसते. मग  काय, मैं तो चला जिधर चले रस्ता!

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

लोकल ट्रेन्सचा प्रवास व कोरोनाचे सुरक्षित अंतर?

लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?

हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच  घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

टीपः

माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०