https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

कायदा व वकील!

कायदा शिकून वकील का बनायचे?

कायदा जगातील सगळ्या विषयांना, सगळ्या ज्ञान शाखांना, सगळ्या गोष्टींना स्पर्श करतो व माणसाची समज प्रगल्भ करतो, माणसाला जगाची खरी ओळख करून देतो, म्हणून कायदा शिकायचा. पैसे कमावण्यासाठी कायद्याचेच काय पण कोणतेही औपचारिक शिक्षण आवश्यक नाही हे उदाहरणासह सिद्ध करायची गरज नाही. फक्त डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला बघा म्हणजे पैसा कुठे कुठे फिरतोय हे दिसेल. जो मनुष्य फक्त पैसा कमावण्यासाठी वकील बनतो तो वकील नव्हे!

-ॲड.बी.एस.मोरे©१९.१०.२०२०

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नैसर्गिक आविष्कार!

निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही!

(१) निसर्गातील देवाचा अर्क हाच निसर्गरूपाने प्रकट झालाय, सादर झालाय. हा आविष्कार म्हणजे त्या देवाची नैसर्गिक अभिव्यक्ती! गंमत अशी की निसर्गातील मूलद्रव्ये मानवी बुद्धीच्या  आकलनाला (विज्ञानाला) सापडली असली तरी निसर्गातील देवाचा तो अर्क किंवा प्रत्यक्षात  तो देव मात्र विज्ञानाला सापडला नाही. मग तो देव सापडत नाही म्हणून निसर्गाचा आविष्कार हेच सत्य आहे, नैसर्गिक आविष्काराच्या या सत्यामागे देवाचा अर्क, देव वगैरे काही नाही  असा निष्कर्ष काढून काही माणसे सरळ हात वर करून मोकळी होतात.

(२) निसर्गातील देव निसर्गात (विश्वात/सृष्टीत) किती गुणांत, किती आकारात, किती रंग व रूपात प्रकट, सादर, व्यक्त झालाय! केवढी प्रचंड ही निसर्गाच्या आविष्काराची अनेकता व विविधता! हा एवढा मोठा निसर्गाचा आविष्कार  माणसाला त्याच्या मेंदूत साठवून ठेवता येईल का? शेतातून जीवनावश्यक धान्य पिकणे, आकाशातून पाऊस पडणे, नद्या समुद्राला जाऊन मिळणे आणि एवढेच नव्हे तर मानवी भाषा, संस्कृती तिच्या वैविध्यपूर्ण रंगढंगाने, लकबीने काय नटणे, प्रादेशिक विविधतेचा या विविध मानवी संस्कृतीवर विविधांगी प्रभाव पडणे, हे सर्व मानवी मनाला अचंबित, चकित करून टाकणारे आहे. फेसबुकवर भारतातील विविध राज्यांतील माझे मित्र, मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे वेगवेगळे व्हिडिओज, चित्रे मला बघायला मिळतात. सद्या चाललेल्या नवरात्रोत्सवाचेच उदाहरण घ्या! देवीचा उत्सव एकच पण पश्चिम बंगाल, आसाम, गुजराथ, महाराष्ट्र या विविध राज्यांत देवीच्या या सणाचे वेगळेपण दिसते. अर्थात देशात हिंदू संस्कृती एक पण तिच्यातही विविध राज्यांची प्रादेशिक विविधता पहायला मिळते.

(३) अशा पर्यावरणीय परिस्थितीत मानवी मन निसर्ग आविष्काराच्या किती रूपात, किती रंगात, किती गुणांत समरस होणार व या सर्व विविधतेला स्वतःत सामावून घेऊन स्वतःचा कृत्रिम मानवी आविष्कार दाखविणार? असा मानवी आविष्कार, अभिव्यक्ती ही निसर्गाची नकल (कॉपी) असते. अशी नकल करायला पण अक्कल लागते. म्हणून जे जे मानवनिर्मित आहे ते ते नकली (कृत्रिम) आहे. निसर्गाच्या आविष्काराची नकल (कॉपी) करणे व अशा कृत्रिमतेतही निसर्गाची नैसर्गिकता कायम राखणे हे माणसापुढे निसर्गातील देवाने निर्माण केलेले मोठे आव्हान होय! निसर्गाचा विविधांगी आविष्कार मनात मुरवणे, अंगात जिरवणे ही काही सोपी गोष्ट नाही.

(४) निसर्गाची कृत्रिम नकल करताना निसर्गाची नैसर्गिकता या कृत्रिमतेतही कायम ठेवण्याचे आव्हान स्वीकारणारा माणूस या आव्हानात नेहमीच यशस्वी होईल असे नसते. म्हणून तर त्याचे वर्तन कधीकधी नैसर्गिक (नॉर्मल) ऐवजी अनैसर्गिक (अबनॉर्मल) होते. अशा अनैसर्गिक वर्तनाला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवून माणसाला कृत्रिम पण नैसर्गिक वर्तन करण्यास  भाग पाडण्यासाठी सुशिक्षित, सुसंस्कृत मानव समाजाने कायद्याच्या राज्याची निर्मिती केली आहे जी कृत्रिम असली तरी नैसर्गिक आहे. निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही हे सांगण्यासाठी तर माझा हा अभ्यासपूर्ण लेख आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०

https://www.facebook.com/338024653358851/posts/958188094675834/

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

मानवी संबंधातील ओलावा व कोरडेपणा!

मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा!

लहानपणी आईवडिलांच्या छत्रछायेत वाढत असताना बहीण भावंडांत असलेला भावनिक ओलावा पुढे वय वाढत जाईल तसा कमीकमी होत जातो. लग्ने होऊन आपआपल्या संसारात पडल्यानंतर तर या भावनिक ओलाव्याचा प्रवास घट्ट, दाट ते पातळ असा होतो. आठवा ती लहानपणीची रक्षाबंधने, भाऊबीजेच्या ओवाळण्या व नंतर प्रौढपणीचे, वृध्दापकाळाचे बहीण भावातील भावनिक ओलावा जपणारे हेच सण! आईवडील दोघेही वारल्यावर तर मग रक्ताची नाती आणखी पातळ होत जातात. काही अपवाद असतीलही या अनुभवाला पण सर्वसाधारण अनुभव तर कालानुरूप होणाऱ्या भावनिक दुराव्याचाच असतो ना! अगोदरच दुरावलेल्या रक्ताच्या नात्यांत पुढे जेंव्हा व्यवहार आडवा येतो तेंव्हा तर अशा नातेसंबंधात खूप ताणतणाव निर्माण होतात. आईवडिलांच्या इस्टेटीची भावाबहिणीत वाटणी करताना तर भावनिक ओलाव्याची मोठी कसोटी लागते. रक्ताची नैसर्गिक नाती असोत की लग्नाची कृत्रिम नाती असोत, ही नाती इतर कारणांनी सुद्धा दुरावतात. नातेवाईकांतील कोणी त्याच्या स्वकर्तुत्वावर पुढे गेला की नातेवाईकांकडून त्याचे मनापासून कौतुक होण्याऐवजी असूया व तिरस्काराच्या नकारात्मक भावनेतून अशा नातेवाईकाबरोबर संपर्क कमी करीत त्याला दूर ठेवण्याचे (वाळीत टाकण्याचे) प्रकारही काही ठिकाणी होत असतात. अशा जळकुट्या नातेवाईकांकडून भावनिक ओलाव्याची अपेक्षा करणे हा शुद्ध मूर्खपणा! बाहेरच्या जगातही मानवी संबंध निर्माण होत असतात. पण त्यात जवळच्या नातेसंबंधासारखा भावनिक ओलावा नसतो. असे संबंध व्यावहारिक असतात जे कोरडे असतात. अशा व्यावहारिक संबंधात वस्तू व सेवांची व त्यासोबत पैशाची आर्थिक देवाणघेवाण होत असते तशी सत्तेची राजकीय देवाणघेवाणही होत असते. अशा व्यावहारिक संबंधात हृदयापेक्षा (भावनेपेक्षा) मेंदू (बुद्धी) महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. अशा संबंधात फायद्यातोट्याचा हिशोब असतो व अशा हिशोबातून निर्माण होणारा व्यावहारिक कोरडेपणा असतो. भावनिक ओलाव्याचा अंश नगण्य असल्याने असे कोरडे व्यावहारिक संबंध बिघडण्याची शक्यता मोठी असते. गरज सरो व वैद्य मरो असाच काहीसा प्रकार अशा व्यावहारिक संबंधात असतो. म्हणून तर अशा कोरड्या व्यावहारिक संबंधाना नियंत्रित करणे ही सरकारची मोठी जबाबदारी असते. त्यासाठी तर सरकारी कायदे असतात. माझा हा लेख मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा या विषयापुरताच मर्यादित आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!

निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!

निसर्गातील देव दिसत नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेत त्याला समोरासमोर नमस्कार करता येत नाही. परंतु निसर्गातील देवत्व मात्र प्रत्यक्षात दिसते, प्रत्यक्षात अनुभवता येते. पण हे देवत्व निसर्गातील दलदलीवर उभे आहे, त्या दलदलीला चिकटलेले आहे हेही सत्य आहे. याचा अर्थ हाच की देवाचा स्वर्ग राक्षसाच्या नरकाला चिकटलेला आहे. उदा. चिखलातून कमळ उमलते, काटेरी झुडुपाला गुलाबाची फुले येतात, लैंगिक वासनेतून प्रेमाचा अंकुर फुटतो. चिखल, काटे, लैंगिक वासनेचा अंगार यांना मी राक्षसी नरक म्हणतो तर अनुक्रमे कमळ, गुलाब, प्रेम यांना मी देवाचा स्वर्ग असे म्हणतो. या स्वर्गातच देवत्व दिसते, अनुभवता येते. पण निसर्गाची रचनाच अशी की देवत्वाचे निर्माण हे राक्षसी नरकातून, दलदलीतून होते. माझी पत्नी स्वैपाकघरात अन्नपदार्थ बनवून जेंव्हा माझ्यापुढे जेवणाचे ताट आणून ठेवते तेंव्हा जणूकाही अन्नपूर्णा देवीने प्रसन्न होऊन माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला अन्नदान केले असे वाटते व ताटातील अन्नपदार्थांत मला देवाचे देवत्व दिसते. मग मी माझे जेवण सुरू करण्यापूर्वी अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटाला नमस्कार करून जेवण सुरू करतो. माझा तो नमस्कार निसर्गातील देवाला असतो. कच्चे अन्नपदार्थ शिजवून खाण्यायोग्य व चवदार बनविणे ही एक सुंदर निर्मिती प्रक्रिया आहे. या सुंदरतेच्या नवनिर्माण प्रक्रियेत देवत्व असते व तेच देवत्व सुंदर नवनिर्मितीत उतरलेले असते. पण निसर्गात देवत्व शोधणे, स्वतःच्या मनात देवाला जाणून ते देवत्व स्वतःच्या परिश्रमाने निर्माण करणे व टिकविणे हे एक फार मोठे आव्हान असते. दलदलीचा राक्षस या देवत्व निर्मितीच्या व टिकविण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण करतो. त्या राक्षसी दलदलीने भरलेल्या अडचणींवर मात करून दलदलीत राहणाऱ्या राक्षसाला नामोहरम करणे, त्याला हरवणे हे फार मोठे आव्हान निसर्गातील अदृश्य देवाने माणसापुढे उभे केले आहे. सुंदर देवत्व निर्मितीचे हे आव्हान देवाने माणसापुढेच उभे केले आहे, जंगली जनावरांपुढे नव्हे. जंगली जनावरांना जंगली वागण्यासाठी देवाने मुक्त ठेवलेय. त्या जंगली जनावरांची ती नरकातली मुक्ती म्हणजे माणसांना कायम डोकेदुखी! ही डोकेदुखी म्हणजे दलदलीतून देवत्व निर्मितीचे माणसापुढे देवाने उभे केलेले मोठे आव्हान होय! दलदल ही केवळ जंगली जनावरांच्या जंगलीपणातच नसते. ती माणसांतल्या वाईट, दुष्ट प्रवृत्तीतही असते. खून, बलात्कार, चोऱ्या, दरोडे यासारखे गुन्हे करणारी जंगली माणसे, भ्रष्टाचार करणारी व तसेच दुसऱ्याच्या सुंदर नवनिर्मितीच्या कर्तुत्वावर जळणारी व त्या असूयेपोटी नातेसंबंधात विष कालवणारी दुष्ट, हलकट प्रवृत्तीची अर्धजंगली माणसे ही तर फार जवळ चिकटलेली दलदल होय. अशा माणसांना सरळ जंगलात नेऊनही सोडता येत नाही. देवत्वाची आवड असलेल्या चांगल्या माणसांना या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांसोबतच जगावे लागते. या बिकट परिस्थितीवर चिडून, त्रागा करून काही उपयोग नसतो. कमळाला चिखलासोबत व गुलाबांना काट्यांसोबत राहण्याशिवाय निसर्गाने की निसर्गातील अदृश्य देवाने पर्यायच ठेवला नाही. मग कमळाला चिखलावर व गुलाबाला काट्यांवर चिडून कसे चालेल? या त्रासदायक दलदलीच्या, काट्याच्या वास्तविक सत्याचा स्वीकार करून निसर्गातील सुंदरतेचा अर्थात देवत्वाचा अनुभव घेणे यातच कमळ व गुलाब यांचे हित आहे. माणसांनीही निसर्गाचे हे सार्वत्रिक कटू सत्य स्वीकारून त्यांच्या जीवनात देवत्वाचे निर्माण करण्याचा, ते देवत्व जगण्याचा व टिकविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न हीच निसर्गातील  देवाची देवपूजा होय! अशा देवपूजेतून देवत्व निर्माण करता येते व ते जगताही येते. प्रयत्नांती परमेश्वर ही मराठी म्हण बहुतेक या नैसर्गिक सत्यावर आधारित असावी.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

हिऱ्यांचे नशीब!

सगळ्याच हिऱ्यांच्या नशिबी चमकणे नसते!

सद्या गाजत असलेला दूरदर्शन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा हा खोटे खोटेच स्वतःला वर उंचावण्याच्या माणसाच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा एक भाग आहे. पण शैक्षणिक पात्रतेची खोटी प्रमाणपत्रे मिळवून का कोणी सुशिक्षित होतो? स्वतःचे खोटे सत्कार घडवून आणून का कुठे सामाजिक प्रतिष्ठा मिळते? इस्त्रीची पांढरीशुभ्र कपडे घालून का कुठे गुंड मवाली चारित्र्यवान होतात? समाजात असे कितीतरी हिरे आहेत की ज्यांना स्वतःवर पैलू पाडण्याची योग्य  संधी मिळत नाही व त्यांना कायम अंधारातच रहावे लागते. याचे एक कारण असेही आहे की, कृत्रिम प्रक्रियेने सोन्याचा मुलामा अंगावर चढवून तांबे, पितळ, लोखंड हे धातू सोन्याची खोटी चमक दाखवित अंधारात चाचपडणाऱ्या खऱ्या हिऱ्यांना वाकुल्या दाखवित खोट्या रूबाबात फिरत आहेत. अंधारात पडलेल्या हिऱ्यांची पारख करू शकणारे जवाहीर या हिऱ्यांच्या नशिबी येत नाहीत हे या हिऱ्यांचे दुर्दैवच होय! "पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार, देवा अजब तुझे सरकार" असे म्हणतच हे अंधारात चाचपडणारे हिरे जगत असतात. फेसबुक, व्हॉटसॲप सारख्या समाजमाध्यमांवर स्वतःची सुंदर कलाकृती जशी सुंदर चित्रे, सुंदर गायन किंवा नृत्य, लेखन टाकून या माध्यमांवर कोणी कलेची, ज्ञानाची पारख असलेला जवाहीर मिळतोय का याची मोठ्या आशेने चाचपणी करीत या माध्यमांवर वावरणारी काही ज्ञानी,  गुणी मंडळी आहेत. सामान्य लाईक्सपेक्षा कोणी जवाहीर मिळतोय का याकडे त्यांचे लक्ष असते. पण या समाजमाध्यमावर हिऱ्यांची पारख असलेले जवाहीर असतील का याविषयी मला शंका आहे. हे जवाहीर समाजमाध्यमाच्या बाहेर राहून विमानातून प्रवास करीत हिऱ्यांचा शोध घेत फिरत असावेत! समाजमाध्यमांवरील कलाकारांची कला एखाद्या दर्दी माणसाच्या हृदयाला जाऊन भिडेल व मग त्या कलेचे चीज होईल या आशेने समाजमाध्यमी कलाकार मंडळी आपआपल्या कलेच्या चित्रफिती या समाजमाध्यमावर टाकत असतात. माझे लेखन हा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. पण गेल्या पाच वर्षातील माझ्या अखंडित फेसबुक लेखनाला एक पण मायका लाल जवाहीर भेटला नाही. मी मात्र दुसऱ्यांच्या लेखनाची, कलेची मनापासून प्रशंसा करीत अधूनमधून त्या गोष्टी माझ्या स्वतःच्या फेसबुक खात्यावर शेअर करीत असतो. पण माझ्या त्या वैयक्तिक कौतुकाशिवाय इतरांच्या त्या सुंदर कलाकृतीला खरा न्याय मिळत नाही. कारण हिऱ्यांची खरी पारख असलेले जवाहीर बाहेरच विमानातून फिरत असतात. ते समाजमाध्यमात घुटमळत नसतात.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

बौद्धिक कौशल्याने व्हा ज्ञानबेटाचे राजे!

बौद्धिक कौशल्याशिवाय ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही!

माहिती, ज्ञान व कौशल्य असे बौध्दिक प्रगतीचे तीन टप्पे असतात. निसर्गाचे ज्ञान हेच विज्ञान! हे विज्ञान म्हणजे महासागर! या महासागराची वरवरची माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती ही मनाची प्राथमिक जाणीव असते. ही जाणीव प्रगल्भ होण्यासाठी अर्थात माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी बुद्धीला त्या माहितीवर काम करावे लागते. महासागर लांबून दिसतो तसा नसतो जसा उंच डोंगर लांबून दिसतो तसा नसतो. म्हणून दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे. महासागरात लांब गेल्यावर व डोंगरावर उंच गेल्यावर जे प्रत्यक्षात दिसते व अनुभवास येते त्याला ज्ञान म्हणतात. माहितीचे रूपांतर ज्ञानात अशाप्रकारे होते. चौकस बुद्धी नुसत्या माहितीवर गप्प बसत नाही. ती माहितीच्या अधिक खोलात जाते व माहितीतून ज्ञान बाहेर काढते. ज्ञान म्हणजे माहितीचे ताक घुसळून बाहेर काढलेला लोण्याचा गोळा होय. पण नुसते ज्ञान जवळ असून फार उपयोग नसतो. बुद्धीला त्या ज्ञानाचा सराव केल्याशिवाय त्यात कौशल्य प्राप्त करता येत नाही. ज्ञानात बौद्धिक कौशल्य नसेल तर कृती सहज व उत्कृष्ट होऊ शकत नाही. निसर्ग विज्ञानात असलेल्या अनेक ज्ञानशाखा ही ज्ञानाच्या महासागरातील विविध ज्ञान बेटे होत. या ज्ञान बेटांचे राजे होण्यासाठी एखादे बेट निवडून त्या बेटावरील पर्यावरण आत्मसात करून त्यावर बुद्धीचे प्रभुत्व प्राप्त करावे लागते. बेटावरील पर्यावरणाच्या ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय अशा निवडलेल्या बेटाचे राजेपण प्राप्त होत नाही. कला, क्रीडा, वैद्यक शास्त्र, अभियांत्रिकी, कायदा, धर्म, अर्थकारण, राजकारण अशा कितीतरी ज्ञानशाखा मानवी बुद्धीला निसर्ग विज्ञानातून सापडल्या आहेत. या सर्व ज्ञान शाखांत कौशल्य प्राप्त करणे मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या वैयक्तिक  आवडीनुसार व बौद्धिक गतीनुसार निरनिराळी माणसे विविध ज्ञान शाखांतून विशेष प्रावीण्य मिळवित चित्रपट अभिनेते, संगीतकार, गायक, खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए., व्यवस्थापक, शिक्षक, अर्थकारणी, राजकारणी होतात. ही सर्व तज्ज्ञ मंडळी फक्त त्यांच्याच ज्ञान शाखेत तज्ज्ञ असतात. इतरांच्या ज्ञान शाखा म्हणजे त्यांच्यासाठी वरवरची माहिती असते किंवा त्यांच्याविषयी त्यांना फार जुजबी ज्ञान असते. सर्वसामान्य माणसे निरनिराळ्या ज्ञान शाखांच्या फक्त माहितीवर किंवा जुजबी ज्ञानावर जगत असतात. पण सामान्य ज्ञान व सर्वसाधारण अक्कल (कॉमन सेन्स) ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे, मग तो माणूस तज्ज्ञ असो की सर्वसामान्य माणूस असो. माहिती, ज्ञान व कौशल्य या तीन पायऱ्या पार केल्याशिवाय बुद्धीला पर्यावरणातील पदार्थांना, प्राणीमात्रांना व माणसांना योग्य प्रतिसाद देता येत नाही. उदा. एखादी व्यक्ती ही अन्नावाचून उपाशी आहे व तिला तुम्ही अन्न देण्याऐवजी आध्यात्मिक भक्तीमार्ग शिकवताय हा प्रतिसाद योग्य होईल का? तुम्ही योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपर्कात येणाऱ्या पदार्थ, प्राणी व माणसांविषयी अगोदर माहिती व नंतर सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच तुमची अशा पदार्थ, प्राणी व माणसांबरोबर व्यावहारिक देवाणघेवाण शक्य आहे. फेसबुकवर तुमचे मित्र झालेल्या किती लोकांविषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे? त्यांच्याविषयी ज्ञान असणे हा तर खूप पुढचा भाग झाला. मग अशा जवळजवळ अनोळखी असलेल्या व्यक्तीं बरोबर किती संपर्क ठेवायचा, त्यांच्याबरोबर एखाद्या विषयावर किती वादविवाद घालायचे हे तुमच्या बुद्धीला कळले पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रथम माहिती मिळवा, नंतर सखोल अभ्यासाने त्या माहितीतले ज्ञान मिळवा व नंतर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करून त्यात बौद्धिक कौशल्य प्राप्त करा. कारण तुमचे बौद्धिक कौशल्य तुम्हाला तुमच्या कृतीत आत्मविश्वास व सहजता प्राप्त करून देते. ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय त्या ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.१०.२०२०

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!

(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या  पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र  प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.

(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.

(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.

(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.

(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी  म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.

(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.

(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.

(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.

(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०