https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

चळमुक्ती!

चळापासून मुक्ती हाच शांतीचा आध्यात्मिक मार्ग!

गरज व चैन यात फरक आहे. गरज ही आवश्यकतेपुरती मर्यादित असते तर चैन ही आवश्यकतेची मर्यादा ओलांडून बेभान होते. माणसाने आवश्यकतेपुरत्याच त्याच्या इच्छा मर्यादित ठेवल्या तर त्याला चैनीचा चळ लागत नाही.

आवश्यकतेपलिकडे जाण्याची मानवी मनाची ओढ, हाव मनाला चळी बनवते. काही अती हुशार माणसे या ओढीला, हावेलाच महत्वाकांक्षा असे गोंडस नाव देतात. ही हाव किंवा महत्वाकांक्षा गरजा अकारण वाढवते व चैनीचे रूपांतर गरजेत करून टाकते. हा एक भयंकर चळ आहे.

जगाला स्वतःपुढे झुकवण्याची मानवी मनाची राजकीय इच्छा माणसाला सत्तापिपासू बनवते व जगातील जास्तीतजास्त संपत्तीची मक्तेदारी स्वतःकडे असावी ही मानवी मनाची आर्थिक इच्छा माणसाला अतीश्रीमंत होण्याचे वेड लावते. मानवी मनाच्या या दोन्ही इच्छा म्हणजे मानवी मनाचा भयंकर मोठा चळ होय. हा चळ माणसाच्या वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे तर जगाच्या नैसर्गिक व सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा घातक होय.

सातत्यपूर्ण शिक्षणातून (माणसाने मरेपर्यंत विद्यार्थी म्हणून जगावे) जगाचे ज्ञान मिळविण्याचा मानवी मनाचा ध्यास हा चळ नव्हे. ज्ञानाने माणूस आकाशातून जमिनीवर येतो व शांत होतो, विनम्र होतो. ज्ञानी मनाला अंधश्रद्धा चिकटत नाही. ज्ञानी मनुष्य निसर्गाचे विज्ञान व परमेश्वराचे अध्यात्म यांचे मर्म जाणून दोन्हीत सुवर्णमध्य साधतो. त्यामुळे तो विज्ञानाने भौतिक चंगळवादी व आध्यात्मिक धर्माने देवभोळा, देववेडा होत नाही. तो विज्ञानातील धर्म व धर्मातील विज्ञान म्हणजे निसर्गातील परमेश्वर व परमेश्वरातील निसर्ग जाणतो.

जर वैद्यकीय विज्ञानानुसार मंत्रचळ (इंग्रजीत आॕब्सेसिव्ह कंम्पलसिव्ह डिसआॕर्डर थोडक्यात ओसीडी) हा मानसिक आजार आहे तर मग मी असे म्हणेल की जगातील राजकीय  सत्तापिपासू व आर्थिक संपत्तीवेडे अतीश्रीमंत लोक हे या मानसिक आजाराने ग्रासलेले भयंकर मंत्रचळी लोक होत.

माणसाने अतीगरीब नसावे व अतीश्रीमंतही नसावे. त्याचा स्वार्थ मर्यादित असावा म्हणजेच मध्यम असावा. माझ्या मते, मंत्रचळ म्हणा किंवा चळ म्हणा त्यापासून मुक्ती हाच शांतीचा आध्यात्मिक मार्ग होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.११.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा