https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

पंढरपूरचा मातोश्री वृद्धाश्रम काय शिकवतो?

पंढरपूरचा मातोश्री वृद्धाश्रम काय शिकवतो?

गोपाळपूर हा पंढरपूरचा एक भाग. या गोपाळपूरातील मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे पंढरपूरच्या संत तनपुरे महाराज यांची कृपा. संत तनपुरे महाराजांचा एक मठ पंढरपूर स्टेशन रोडवर एस.टी. स्टँडजवळ आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सत्य कथा म्हणजे अनुभवाची शिदोरी. इथे राहणाऱ्या ६५ वृद्ध स्त्री पुरूषांच्या कथा थोड्या वेगळ्या असल्या तरी या सर्व कथांना जोडणारा एकच समान धागा म्हणजे ही सर्व वृद्ध मंडळी निराधार आहेत. म्हणजे काहींना मुलेच नाहीत, काहींना मुले होती पण ती मेलीत व काहींची मुले आहेत पण त्यांना आईबाप जड झालेले म्हणजे ती असून नसून सारखीच, तर काहीजण मुलांना आपला म्हातारपणी त्रास नको म्हणून स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात आलेली. या वृद्धांत काही अशिक्षित तर काही उच्च शिक्षित मंडळी आहेता म्हणजे शिक्षणाचा व वृद्धाश्रम जवळ करण्याचा काही संबंध नाही हे वास्तव सांगणाऱ्या या कथा. या सर्वांच्या जीवन कथा नीट समजून घेतल्यावर मी ६७ वर्षाच्या माझ्या वृद्धापकाळी या निष्कर्षापत आलो की जी माणसे विवाहित आहेत, ज्यांना जीवनसाथीची सोबत आहे, मुलेबाळे आहेत व ती सर्व मुले आपुलकीने वृद्धापकाळी ज्यांची (वृद्ध आईवडिलांची) आपुलकीने काळजी घेत आहेत व अशा मायेच्या वातावरणात वृद्ध आईवडिलांचा मृत्यू आपल्या मुलाबाळांच्या जवळ रहात असताना होत आहे अशी सर्व माणसे आयुष्यात खूप यशस्वी, खूप सुखी समाधानी व खूप नशीबवान आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.११.२०२३

वर्चस्वाचा उन्मादी गर्व व कायदा!

वर्चस्वाचा उन्मादी गर्व व कायदा!

आधुनिक व सुसंस्कृत मानवी जीवनशैलीचा विकास माणसांच्या रानटी, जंगली जीवनशैलीतून व वर्चस्वाच्या टोळी युद्धांतून झाला असल्याने आधुनिक काळातही माणसाची वर्चस्व वृत्ती जाता जात नाही. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवत गर्वाने जगण्याची ही मानवी वृत्ती ही मूळ पशू वृत्ती होय. जंगलात बळी तो कानपिळी या नियमाने वाघ, सिंह हे बलवान प्राणी इतर अशक्त प्राण्यांना आपल्या कह्यात ठेवून त्यांचे शोषण करून गर्वाने राजेशाही जीवन जगण्यासाठी वर्चस्वाच्या लढाया लढतात. त्यांचीच पद्धत अवलंबून मानव समाजात टोळी युद्धे हा जंगली प्रकार अंमलात आला. राजेशाहीत बलवान राजे अशक्त राजांना बळी तो कानपिळी या नियमाने युद्धात हरवून हरलेल्या राजांना व त्यांच्या प्रजेला मांडलिक बनवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करीत असत. त्या मांडलिकत्वाच्या म्हणजे झुकून राहण्याच्या व खंडणी देण्याच्या मोबदल्यात मांडलिक राजांना व त्यांच्या राज्यातील प्रजेला शांततामय जीवन जगण्याची हमी युद्धात जिंकणारे राजे देत असत. काळ बदलला. राजेशाही जाऊन लोकशाही आली पण लोकशाहीतही लोकांतून निवडून येणाऱ्या लोक प्रतिनिधींना राज्य कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी लोकांना त्यांच्या उत्पन्नातून काही भाग लोकशाही सरकारला कररूपाने द्यावा लागतो. हा कर म्हणजे आधुनिक खंडणीच होय. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवताना गर्व होण्याची पशू वृत्ती लोकशाही राजकारणात लोकप्रतिनिधींमध्येही अधूनमधून उफाळून येत असते. आणि लोकशाही सरकार तरी पूर्ण आधुनिक व सुसंस्कृत आहे का? उत्तर नाही असेच आहे. कारण तसे असते तर समाजात दहशत निर्माण करून समांतर अर्थव्यवस्था चालवत खंडणी वसूल करणारे अंडरवर्ल्डचे गँगस्टर्स अस्तित्वात राहिलेच नसते. मानव समाजातील धार्मिक उन्माद व जातीपातीमधून माणसाची वर्चस्व वृत्ती दिसून येते जी मूळ पशू वृत्ती आहे. कितीही देवधर्म, आध्यात्मिक देवभक्ती करा कोणत्याही धर्माला व कोणत्याही देवाला माणसाच्या या पशू वृत्तीचा संपूर्ण नायनाट करता आलेला नाही. त्यासाठी माणसांना विचार करून पुन्हा त्याच बळी तो कानपिळी या जंगली नियमाचा आधार घेत आधुनिक कायदा व शासन व्यवस्था निर्माण करावी लागली. इथे परमेश्वर व देवधर्म  उपयोगाला आले नाहीत व येत नाहीत. निरनिराळे खेळ जसे की क्रिकेट, कुस्ती, बुद्धीबळ यातून माणसाने त्याची वर्चस्व वृत्ती जिवंत ठेवण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे. या खेळांत जिंकणारे खेळाडू हरणाऱ्या खेळांडूवर वर्चस्व सिद्ध करतात व मग खेळ जिंकण्याचा आनंदोत्सव साजरा करतात. या आनंदाच्या सोहळ्यात म्हणजे खेळ जिंकण्याच्या सोहळ्यात सामान्य माणसेही टाळ्या वाजवून, फटाके वाजवून नाचतात. हा नाच असतो दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचा, दुसऱ्याला जिंकण्याचा व त्यातून निर्माण होणाऱ्या गर्वाचा. वर्चस्वाचा हा उन्मादी गर्व दैनंदिन जीवनात म्हणजे आंतर मानवी शैक्षणिक, आर्थिक व राजकीय व्यवहारांतही दिसून येतो. म्हणून तर संत तुकाराम म्हणतात "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग"! या वर्चस्व उन्मादी गर्विष्ठ वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी शासन व्यवस्थेअंतर्गत येणारी प्रशासन, पोलीस व लष्कर यंत्रणा कायद्याच्या माध्यमातून मार्शलचे काम करते तर न्याययंत्रणा अंपायरचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.११.२०२३

OCD POINTS VICIOUS CIRCLE

OBSESSIVE COMPULSIVE (OCD) POINTS!

The human mind is forced by environment mainly social environment to face certain irritating obsessive compulsive (OCD) points. Some OCD points are pure artificial created by some fools or selfish crooks out of their imagination. But these fools or crooks are powerful enough to pull ignorant or innocent human minds in vicious circle or chain of such OCD points artificially created them. Some mischievous people themselves act as OCD points by their irritating social conduct. It is upon you how much to respond or even to respond or not to such people or to such OCD points. More you respond to them more you get trapped in their chain or vicious circle!

-©Adv.B.S.More, 29.11.2023

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेतो!

निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेतो!

मनुष्याच्या प्रत्येक कृतीत, मग ती वैचारिक कृती असो की प्रत्यक्ष कृती असो, त्या कृतीतला चळी, मंत्रचळी भाग काढून टाकून आवश्यक तोच भाग ठेवला पाहिजे. आवश्यक कृती ही गरज असते तर चळ, मंत्रचळी कृती ही चैन असते. आपण आपल्या जीवनात बऱ्याच अनावश्यक कृती करीत असतो. उदाहरणार्थ, मनाचे स्वप्नरंजन हे मनोरंजन असते व ते एका आवश्यक त्या मर्यादेपलिकडे अनावश्यक असते कारण त्याचे रूपांतर गरजेतून चैनीत होत असते. चैन ही स्वतःलाच नव्हे तर समाज व निसर्ग पर्यावरण यांनाही घातक असते. आर्थिक श्रीमंतीचे, राजकीय सत्तेचे वेड इतकेच काय देवाधर्माचे वेड ही सुद्धा चैनीची व म्हणून मनुष्य जीवनासाठी अनावश्यक गोष्ट होय. अती तिथे माती ही गोष्ट भौतिक गोष्टीतच नव्हे तर आध्यात्मिक गोष्टीतही खरी असते. म्हणूनच धर्मादाय समाजकारण कितीही उदात्त वाटले तरी ते मर्यादेपलिकडे नेले की स्वतःसाठी त्रासदायक होते. कारण ही दुनिया फार स्वार्थी आहे. तिला फुकटातील गोष्टी लाटायला, चाटायला आवडतात. तेंव्हा देवधर्मी आध्यात्मिक व समाजकर्मी धर्मादाय बाबतीत कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे.

मर्यादेपलिकडची ज्ञानलालसा सुद्धा चैनीची गोष्ट होऊ शकते कारण मनुष्याचे आयुष्यच मर्यादित आहे व या मर्यादित आयुष्यात निसर्गाचे अमर्यादित ज्ञान मिळवून मिळवून तरी किती मिळवणार? त्यामुळे ज्ञानकारण विषयात सुद्धा कुठेतरी थांबायला शिकले पाहिजे. मी हल्ली उतार वयात माझी आवश्यक कृती कोणती व माझी चळकृती कोणती हे प्रत्येक कृतीच्या वेळी निश्चित करून चळकृती सुरू झाली की "थांब थांब, चळाचा भाग सुरू झाला रे मना" असे मनाला बजावून मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करतो. पण बाल व तरूण वयात लागलेल्या चळकृती उतार वयातही सुटता सुटत नाहीत व त्या करताना शरीर व मनाची चांगली फजिती होते. तरीही उतार वयात जुनाट चळकृती होता होईल तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर बाल व तरूण वयात आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी पुढे उतार वयात अनावश्यक होत जातात कारण निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेत असतो. मग माणसाने   परमेश्वराची कितीही आध्यात्मिक भक्ती करू देत निसर्ग हक्क काढून घेण्याची ही प्रक्रिया काही थांबवत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.११.२०२३

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

पदार्थ व त्यांची व्यवस्था!

निसर्गातील पदार्थ व त्यांच्या व्यवस्थेचे विज्ञान!

निसर्गाची उत्क्रांती होत असताना त्या उत्क्रांतीतून अगोदर विविध गुणधर्मी पदार्थ निर्माण झाले व नंतर त्यांच्या हालचालीची नैसर्गिक व्यवस्था निर्माण झाली की अगोदर पदार्थांच्या हालचालीची नैसर्गिक व्यवस्था निर्माण झाली व नंतर  विविध गुणधर्मी पदार्थ निर्माण होऊन ते तयार व्यवस्थेत बसवले गेले म्हणजे अगोदर पदार्थ व नंतर व्यवस्था की अगोदर व्यवस्था व नंतर पदार्थ, हे कळायला मार्ग नाही. पण वास्तवात या दोन्ही गोष्टी म्हणजे पदार्थ व व्यवस्था एकत्र आहेत हेच दिसते.

विविध गुणधर्मी असंख्य सजीव व निर्जीव पदार्थ व त्यांच्यामधील नैसर्गिक हालचालीची नैसर्गिक व्यवस्था व तसेच या नैसर्गिक व्यवस्थेच्या अंतर्गत जन्म घेऊन जगणारी, मरणारी व आहे त्या माणसांच्या पुनरूत्पादन क्रियेतून पुन्हा पुन्हा जन्मणारी करोडो माणसे व त्यांच्या सामाजिक हालचालीची सामाजिक व्यवस्था या सर्वांचे ज्ञान म्हणजेच विज्ञान. नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांच्या नियमांनाच एकत्रितपणे कायदा असे म्हणतात. नैसर्गिक व्यवस्थेचा नैसर्गिक कायदा (नॕचरल लाॕ) असतो व सामाजिक व्यवस्थेचा सामाजिक कायदा (सोशल लाॕ) असतो. या दोन्ही कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास हा माझा आवडीचा संशोधनाचा विषय आहे.

नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थेच्या अंतर्गत हालचाल करणारी करोडो माणसे पृथ्वीवर जन्माला येतात, जगतात व मरतात. पण त्यापैकी किती लोकांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येतो? फक्त काही माणसेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष संपर्कात  येतात. अशी प्रत्यक्ष संपर्कातील माणसे प्रथमतः कौटुंबिक नाते संबंधातील असतात व नंतर त्यांच्या माध्यमातून जवळ येणारी नातेवाईक मंडळी असतात. अशा जवळच्या नात्यांतील संबंध हे अनौपचारिक व वैयक्तिक स्वरूपाचे असतात ज्यात मायाप्रेम या भावनेचा भाग जास्त व कोरड्या, औपचारिक व्यवहाराचा भाग कमी असतो. त्यानंतर आपला प्रत्यक्ष संबंध येतो तो शैक्षणिक, आर्थिक व राजकीय गरजांतून निर्माण होणाऱ्या औपचारिक, कोरड्या व्यावहारिक संबंधाचा ज्यात गरज सरो व वैद्य मरो, कामापुरता मामा व ताकापुरती आजी अर्थात वापरा आणि फेका असा हिशोब असतो. पण शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा व राजकारण यासारख्या औपचारिक व्यवहार संबंधातूनही वैयक्तिक पातळीवरील जवळचे मैत्रीचे संबंध निर्माण होऊ शकतात. या मर्यादित संबंधाच्या बाहेर संबंध नसलेल्या करोडो अनोळखी लोकांचा प्रचंड मोठा परीघ आपल्या अवतीभोवती असतो व आपण अप्रत्यक्षरीत्या या परिघाचा भाग असतो. जवळच्या प्रत्यक्ष संबंधातील मर्यादित माणसांच्या बाहेर असलेल्या या परिघातील अनोळखी लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हालचाली समाज निर्मित वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ या पारंपरिक व हल्ली उदयास आलेल्या समाज माध्यमांतून आपल्याला कळत असतात. या परिघातील अनोळखी माणसांच्या हालचालीच्या बातम्या आपल्या वैयक्तिक जीवनावर किती परिणाम करतात हे आपला या बातम्यांना प्रतिसाद किती यावर अवलंबून असते. पण सगळ्याच बातम्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. करोडो माणसे सामाजिक व्यवस्थेत एकाच लयीत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकतील असे नसते. काही माणसे या व्यवस्थेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. तीच गोष्ट असते नैसर्गिक व्यवस्थेतील लहरीपणाची. तिथेही सगळंच सुरळीत चालेल असे नसते. अधून मधून ऊन, पाऊस, वारा यासारखे निसर्ग घटक नैसर्गिक व्यवस्थेत गोंधळ उडवून देण्याचे काम करीत असतात. विविध नैसर्गिक आपत्ती हा निसर्ग घटकांच्या अशा लहरी गोंधळाचाच भाग. पण शेवटी अधून मधून गोंधळ घालणाऱ्या या निसर्ग व समाज घटकांचा योग्य बंदोबस्त करण्याची ताकद नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांमध्ये असते. निसर्ग व समाज घटकांना निसर्गाने व समाजाने नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांच्या दावणीला घट्ट आवळून बांधलेले असते.

पण शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय? निसर्ग म्हणजे विश्व व विश्व म्हणजे प्रचंड मोठी अंतराळ पोकळी (स्पेस)  व त्या पोकळीतील विविध पदार्थांचा महासंघ. विश्वाचा/निसर्गाचा निर्माता व नियंता कोणीतरी आहे (ज्याला परमेश्वर म्हणतात) हा तर्क आहे तार्किक मानवी बुद्धीचा जो तर्क वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता आलेला नाही. तो परमेश्वर कोणाला कधी दिसत नाही की कोणाच्या  जवळ येऊन बोलत नाही. त्यामुळे त्याचे अस्तित्व विश्वात/निसर्गात खरंच आहे का हा प्रश्नही चौकस मानवी बुद्धीपुढे निर्माण होतो. पण परमेश्वर असो वा नसो, निसर्ग मात्र त्याच्या पदार्थांसह व पदार्थांच्या व्यवस्थेसह अस्तित्वात आहे हे वास्तव आहे. हे वास्तव नीट तपासून व स्वीकारून वास्तवात असलेल्या नैसर्गिक, सामाजिक व्यवस्थांनुसार जगणे व जगण्याची हालचाल करणे एवढेच माणसाच्या हातात आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.११.२०२३

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

चळमुक्ती!

चळापासून मुक्ती हाच शांतीचा आध्यात्मिक मार्ग!

गरज व चैन यात फरक आहे. गरज ही आवश्यकतेपुरती मर्यादित असते तर चैन ही आवश्यकतेची मर्यादा ओलांडून बेभान होते. माणसाने आवश्यकतेपुरत्याच त्याच्या इच्छा मर्यादित ठेवल्या तर त्याला चैनीचा चळ लागत नाही.

आवश्यकतेपलिकडे जाण्याची मानवी मनाची ओढ, हाव मनाला चळी बनवते. काही अती हुशार माणसे या ओढीला, हावेलाच महत्वाकांक्षा असे गोंडस नाव देतात. ही हाव किंवा महत्वाकांक्षा गरजा अकारण वाढवते व चैनीचे रूपांतर गरजेत करून टाकते. हा एक भयंकर चळ आहे.

जगाला स्वतःपुढे झुकवण्याची मानवी मनाची राजकीय इच्छा माणसाला सत्तापिपासू बनवते व जगातील जास्तीतजास्त संपत्तीची मक्तेदारी स्वतःकडे असावी ही मानवी मनाची आर्थिक इच्छा माणसाला अतीश्रीमंत होण्याचे वेड लावते. मानवी मनाच्या या दोन्ही इच्छा म्हणजे मानवी मनाचा भयंकर मोठा चळ होय. हा चळ माणसाच्या वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे तर जगाच्या नैसर्गिक व सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा घातक होय.

सातत्यपूर्ण शिक्षणातून (माणसाने मरेपर्यंत विद्यार्थी म्हणून जगावे) जगाचे ज्ञान मिळविण्याचा मानवी मनाचा ध्यास हा चळ नव्हे. ज्ञानाने माणूस आकाशातून जमिनीवर येतो व शांत होतो, विनम्र होतो. ज्ञानी मनाला अंधश्रद्धा चिकटत नाही. ज्ञानी मनुष्य निसर्गाचे विज्ञान व परमेश्वराचे अध्यात्म यांचे मर्म जाणून दोन्हीत सुवर्णमध्य साधतो. त्यामुळे तो विज्ञानाने भौतिक चंगळवादी व आध्यात्मिक धर्माने देवभोळा, देववेडा होत नाही. तो विज्ञानातील धर्म व धर्मातील विज्ञान म्हणजे निसर्गातील परमेश्वर व परमेश्वरातील निसर्ग जाणतो.

जर वैद्यकीय विज्ञानानुसार मंत्रचळ (इंग्रजीत आॕब्सेसिव्ह कंम्पलसिव्ह डिसआॕर्डर थोडक्यात ओसीडी) हा मानसिक आजार आहे तर मग मी असे म्हणेल की जगातील राजकीय  सत्तापिपासू व आर्थिक संपत्तीवेडे अतीश्रीमंत लोक हे या मानसिक आजाराने ग्रासलेले भयंकर मंत्रचळी लोक होत.

माणसाने अतीगरीब नसावे व अतीश्रीमंतही नसावे. त्याचा स्वार्थ मर्यादित असावा म्हणजेच मध्यम असावा. माझ्या मते, मंत्रचळ म्हणा किंवा चळ म्हणा त्यापासून मुक्ती हाच शांतीचा आध्यात्मिक मार्ग होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.११.२०२३

संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

भावनांना आवर घातला पाहिजे. वास्तव स्वीकारले पाहिजे. जुन्या पिढीतील जी माणसे जिवंत आहेत व बदललेल्या परिस्थितीतही व नवीन काळातही शरीराने नसली तरी मनाने तरी पूर्वीसारखी आहेत त्यांनाच फोन व व्हॉटसॲप संपर्कात ठेवणे याला उतार वयात अर्थ आहे. बाकी आपुलकीने चांगल्या संपर्कात असलेल्या जुन्या पिढीने जन्माला घातलेल्या नव्या पिढीशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा होय. एकतर ही नवीन पिढी जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टींना व त्यांच्या अनुभव विचारांना कालबाह्य समजत असते व तरूण रक्तामुळे स्वतःच्याच मस्तीत जगत असते.

उतार वयात स्वतःच्या मुलांशीही जपून बोलावे, वागावे लागते मग इतरांच्या मुलांशी काय बोलणार? मला हे कळायला जरा उशीरच झाला म्हणायचे नाहीतर माझ्या विचार, लेखांतून विशेष संपर्कात नसलेल्या जुन्या पिढीशी व संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेल्या नवीन पिढीशी संपर्क साधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत राहिलो नसतो.

मला काळजी याच गोष्टीची वाटते की जिवंत असताना संपर्कक्षेत्राच्या बाहेर असलेली ही माणसे मी शरीर व मनाने मेल्यावर माझ्या मयताला केवळ औपचारिकता म्हणून येतील का? मी मेलेला असल्यामुळे त्यांना "कारे बाबांनो, जिवंतपणी कुठे गेला होता तुम्ही" असा जाबही विचारू शकणार नाही. तेंव्हा माझा हा लेख हेच माझे मृत्यूपत्र समजून माझ्या  जिवंतपणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या अशा लोकांनी माझ्या अंत्यविधीला उगाच हजेरी लावू नये हीच मृत्यूपूर्व माझ्या अंतरात्म्याची इच्छा. अच्छे थे वो दिन लेकिन अब नही रहे! संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.११.२०२३

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

गिरण्यानंतर आता बी.डी.डी. चाळीही इतिहासजमा!

आमचा इतिहास भूतकाळात जमा!

वरळी बी.डी.डी. चाळी हळूहळू इतिहासात जमा होऊ लागल्यात. जांबोरी मैदानाशेजारच्या ३० ते ३५, ८, ९ व ११, नालंदा बुद्ध विहारच्या शेजारील ३९ व ४० व तबेला म्युनि. शाळेजवळील १०८ व १०९ अशा एकूण १३ बी.डी.डी. चाळी तोडून पोलीस मैदानात व इतर परिसरात वरळीतील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाचे काम जोरात चालू आहे. गिरण्या संपल्या व आता त्या बी.डी.डी. चाळीही संपत चालल्या. जांबोरी मैदानातील ललित कला भवन व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळही ओस पडलेय. शेजारचे अंबादेवी मंदिर मात्र होते तसे होत्या त्या ठिकाणी आहे. वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ५३, ६८, ७८, २०, १३ या चाळींत जांबोरी मैदानासमोरील ४९ नंबर चाळीतील आमच्या मराठा मंदिर वरळी हायस्कूलमधील माझे काही मित्र रहायचे. आता ते लांब रहायला गेलेत. आज त्यापैकी एका मित्राच्या १३ नंबर चाळीत जाऊन आलो. २० नंबर चाळीतही गेलो. मी माझ्या आईवडील व भावंडांसह ८४ नंबर चाळीतील ६६ नंबर खोलीत रहायचो. शेजारचा तेलगु मित्र आता ११० नंबर चाळीत रहातोय. पण आज त्याच्याकडे गेलो नाही. कारण मला एकट्यानेच वरळी परिसरात भटकंती करायची होती. जांबोरी मैदानात उद्या रविवार दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ संविधान दिनी आयोजित केलेल्या ज्वाला रॕलीची तयारी चालू असलेली दिसली. मोठे व्यासपीठ, मोठा मंडप व बैठक व्यवस्था या सर्वांनी जांबोरी मैदानाचे रूपांतर ज्वाला नगरात केल्याचे दिसले. त्या ठिकाणी मला ज्वाला महारॕलीच्या कार्यकर्त्यांकडून कढी भात देण्यात आला. सोबत थंड पाण्याची मोठी बाटलीही देण्यात आली. तो कढी भात मी जांबोरी मैदानातच बसून खाल्ला. शरीराने मागे जाता येत नसले तरी मनाने मागे जाऊन माझा भूतकाळ, जुना इतिहास मी आज जागवला आणि वर्तमानकाळातील बदल देखील पाहिले.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.११.२०२३

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म!

विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म!

हायड्रोजनचे दोन अणू (ॲटम) व आॕक्सिजनचा एक अणू (ॲटम) रासायनिक प्रक्रियेतून एकत्र आले की त्यातून पाणी हे संयुग तयार होते. पाण्याच्या संयुगाचा सूक्ष्म कण म्हणजे पाण्याचा रेणू (माॕलिक्युल). मूलद्रव्यांच्या अतिसूक्ष्म कणांना अणू (ॲटम) असे म्हणतात तर संयुगांच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू (माॕलिक्युल) असे म्हणतात. रेणू हा अणू पेक्षा थोडा मोठा असतो. अणू व रेणूत हा असा फरक आहे. गणितात एक अधिक एक मिळून दोनच होतात. हे भौतिक व रसायन शास्त्रीय अचूक, स्पष्ट, निश्चित गणिती निसर्ग विज्ञान होय. वनस्पती शास्त्र व मानवेतर जीवशास्त्र हे अचूक गणिती विज्ञान नसले तरी जवळजवळ निश्चित, स्पष्ट असे विज्ञान होय. पण मानवी जीवन विज्ञान हे अचूक गणिती विज्ञान नाही की जवळजवळ स्पष्ट, निश्चित विज्ञान नाही. ते निसर्गाचे अंदाजे, अस्पष्ट, अनिश्चित विज्ञान होय. याचे कारण म्हणजे इतर प्राणी मात्रांना असलेल्या जैविक वासना मनुष्य प्राण्यालाही असल्या तरी मानवी भावना व मानवी बुद्धी या दोन गोष्टी इतर निर्जीव व सजीव पदार्थांपासून पूर्णतः नसल्या तरी बऱ्याच अंशी वेगळ्या आहेत. म्हणून मानवी जीवन विज्ञान हे इतर विज्ञानांशी जोडले गेलेले पण तरीही एक स्वतंत्र विज्ञान आहे.

अचूक गणिती व जवळजवळ स्पष्ट, निश्चित विज्ञान व मानवी भावना आणि तर्कबुद्धी यांची अर्थपूर्ण देवाणघेवाण होऊन त्यातून मानवी जीवनविषयक तत्वज्ञान तयार होते. हे तत्वज्ञान संपूर्ण मानव समाजाने मान्य केले की त्याचा सामाजिक कायदा बनतो. याउलट मानवी जीवनविषयक तत्वज्ञानाला परमेश्वर श्रद्धा व भक्तीची जोड दिली की त्या तत्वज्ञानाचा धर्म होतो. अध्यात्म हे फक्त परमेश्वर श्रद्धा व भक्तीशी निगडित आहे. त्याचा बौद्धिक तत्वज्ञानाशी संबंध नाही. पण हेच अध्यात्म जर तत्वज्ञानाशी जोडले तर त्याचा धर्म बनतो. या धर्मातून अध्यात्म म्हणजे परमेश्वर बाजूला केला की शिल्लक राहते ते तत्वज्ञान ज्याला कायदा म्हणून समाज मान्यता मिळते. कायदा समाजमान्य झाला म्हणून धर्म समाजमान्य होईल असे नसते. म्हणून तर जगातील धर्माधर्मांमध्ये वाद आहेत. विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म या गोष्टी एकमेकांशी संलग्न व एकमेकांत गुंतलेल्या आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.११.२०२३

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

बदलणाऱ्या भूमिका!

बदलणाऱ्या भूमिका!

विविध गुणधर्माचे विविध निर्जीव व सजीव पदार्थ ही आहे आपल्या सृष्टीची रचना. या पदार्थांबरोबर विविध प्रकारचे अनेकविध व्यवहार करताना अनेकविध भूमिका पार पाडणे हे आहे मनुष्य जीवनाचे सार. माणसाला सतत एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत यावे लागते व हेच मोठे आव्हान असते. अशा अनेक आव्हानांशी माणसे दररोज सामना करीत असतात. हे इतके सहजपणे घडत असते की कित्येक वेळा एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत आपण कधी आलो हे आपल्याला कळतही नाही. भूमिकांची ही अशी सतत अदलाबदल होत असताना एखाद्या गोष्टीलाच बराच काळ धरून बसणे, तिला चिकटून राहणे, तिच्यात गुंतून राहणे म्हणजे वाट बघत असलेल्या दुसऱ्या अनेक भूमिकांना ताटकळत ठेवणे होय. एक भूमिका संपली की लगेच ती सोडून देऊन आवश्यक त्या दुसऱ्या भूमिकेत शिरता आले पाहिजे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.११.२०२३

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

स्थिर जीवन, शांत जीवन!

आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) होणे म्हणजे काय?

आयुष्य स्थिर नाही कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्य स्थिर नाही म्हणून मनही स्थिर नाही. तरीही माणूस स्थिर आयुष्याची व  स्थिर मनाची अपेक्षा करतो. त्यात त्याची चूक नसली तरी स्थिरता ही खूप कठीण गोष्ट आहे.

अज्ञानामुळे माणूस बौद्धिक दृष्ट्या अपंग होतो. बौद्धिक दृष्ट्या अपंग असलेला माणूस मानसिक दृष्ट्या अस्थिर होतो. म्हणून तो शाळा, काॕलेजातून शिक्षण घेऊन व पुढे  त्या ज्ञानाची अनुभव, सरावातून उजळणी करीत राहून आयुष्यात  शैक्षणिक स्थिरत्व आणण्याचा सतत प्रयत्न करतो. पण जगाचे ज्ञान भांडार एवढे मोठे आहे की मनुष्याने त्याच्या छोट्या आयुष्यात मिळवलेले तुटपुंजे ज्ञान आकाराने प्रचंड मोठ्या असलेल्या ज्ञानसागरात क्षुल्लकच राहते. त्यामुळे माणसाला शैक्षणिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही.

नुसते शैक्षणिक स्थिरत्व पुरेसे नसते. माणसाला आर्थिक स्थिरत्वही हवे असते. म्हणून माणूस नोकरी, उद्योग धंदा, व्यवसाय यात सातत्यपूर्ण स्थिरत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थिरत्व लाभावे. पण समाजात गरीब व श्रीमंत यातील आर्थिक दरी एवढी मोठी आहे की कितीही उच्च शिक्षण घेतले तरी गरिबांना पिढीजात श्रीमंतांएवढे आर्थिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही. काही माणसांना तर मरेपर्यंत कष्ट करीत रहावे लागते, मग ते कष्ट शारीरिक असो की बौद्धिक.

शैक्षणिक व आर्थिक स्थिरत्वानंतर माणूस कौटुंबिक स्थिरत्वासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी विवाह करून स्वतःचा जीवनसाथी, मुले यांचे छोटेसे कुटुंब बनवतो. पण काही जणांना हे कौटुंबिक स्थिरत्व लाभत नाही. काहींचे घटस्फोट होतात तर काहींची मुले वाया जातात.

सामान्य माणसाला सर्वसाधारणपणे आयुष्यात शैक्षणिक, आर्थिक व कौटुंबिक स्थिरत्व लाभले की तो खूश, सुखी समाधानी होतो. मोठ्या  भांडवलदार व राजकारणी मंडळींची गोष्टच निराळी. त्यांचे आर्थिक व राजकीय स्थैर्य वेगळे असते कारण त्यांची महत्वाकांक्षाही मोठी असते. पण भरपूर संपत्तीतून व राजकीय सत्तेतून त्यांना खरंच आयुष्यात स्थिरत्व व शांती लाभते का हा संशोधनाचा विषय आहे.

काही माणसे देवाधर्माच्या नादी लागून जीवनात आध्यात्मिक शांती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यातून खरंच परमेश्वर सापडतो का व आध्यात्मिक शांती लाभते का हाही संशोधनाचा विषय आहे.

घरातील वस्तू जिथल्या तिथे, नीट नेटक्या ठेवण्याचीही सवय काहींना असते. मी माझी कायद्याची व इतर पुस्तके, तसेच मला विशेष वाटलेली वृत्तपत्रांतील कात्रणे घरात ठराविक जागेवर नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे माझ्या मृत्यूनंतर काय होणार? ती बहुतेक रद्दीत जातील. कारण माझी बौद्धिक आवड व घरातील मंडळीची बौद्धिक आवड एकसारखी नाही. अर्थात माझ्या या संकलनाला स्थिरता नाही. जगाच्या प्रचंड मोठ्या ज्ञानभांडारात माझे हे ज्ञानभांडार फारच किरकोळ आहे.

तात्पर्य काय, तर माणूस त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) व्हायला बघतो, पण तो खरंच सेटल होतो का?

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.११.२०२३, कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

FROM HELL TO HEAVEN!

JOURNEY FROM HELL TO HEAVEN ON EARTH!

The Law for human beings is very big challenge from Nature for creating heaven on earth in the midst of hell all around on earth as evolved by Nature and also created by man on earth planet.

The forest life based on rule of survival of fittest is Nature oriented primary hell.

The black economy based on uncivilized and immoral way of human living such as prostitution, gambling etc. & underworld violence arising out of competition to control black economy is man oriented secondary hell.

The heaven is civilized & moral way of human living such as matrimonial sex & family life, lawful industry, trade and commerce etc. and lawful government for regulating such civilized way of human living. This heaven is all time challenge before human mind. The journey from hell to heaven on earth via man is very challenging journey and it still continues as journey because man has not fully succeeded in establishing heaven on earth out of hell on earth.

-©Adv.B.S.More,22.11.2023

दया कर, मदत कर!

दया कर, मदत कर?

निसर्ग हा पालनपोषणाचा पाळणा आहे तसा तो खडतर आव्हानांचा डोंगर आहे. हा पाळणा व डोंगर ही निसर्गातील सर्वोच्च शक्तीची अर्थात परमात्म्याची/परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून निसर्गालाच परमेश्वर मानणे चुकीचे!

इतर सजीव, निर्जीव पदार्थांप्रमाणे माणसे हीही परमेश्वराची लेकरे आहेत. या लेकरांना त्यांच्या माता पित्यांच्या माध्यमातून परमेश्वर काही काळ चमच्याने दूध भरवून आयते जगवतो. पण नंतर मात्र या लेकरांनी आईवडिलांवर कायम अवलंबून राहणे किंवा आयते खात बसणे हे परमेश्वराला बिलकुल मंजूर नाही.

आईवडिलांचा आयता घास खाऊन मोठ्या झालेल्या लेकरांनी स्वतःच्या ताकदीवर आव्हानांचा डोंगर पार करायला किंवा आकाशात उंच भरारी घ्यायला शिकावे लागते. ही नैसर्गिक ताकद परमेश्वराने प्रत्येक लेकराला दिली आहे. त्यात निसर्ग रचनेप्रमाणे कमीजास्त प्रमाण असू शकते. पण जगण्याची व लढण्याची ताकद परमेश्वराने प्रत्येकाला दिली आहे हे मात्र खरे!

सगळ्याचा आईवडिलांना आपली मुले स्वबळावर आव्हानांंचा डोंगर पार करताना किंवा आकाशात उंच भरारी घेताना आवडतात. त्यांना आपली लेकरे पुन्हा पुन्हा रडत घरी परत आलेली व घरात रडत बसलेली आवडत नाहीत. आदर म्हणून त्यांनी आईवडिलांच्या पाया पडून बाहेर पडणे वेगळे व सारखे सारखे त्यांचे रडगाणे आईवडिलांपुढे गात बसणे वेगळे. परमेश्वर तर नश्वर देहाच्या आईवडिलांचाही अनंत काळचा सर्वोच्च आईबाप. त्याला त्याच्या लेकरांनी सारखे त्याच्यापुढे येऊन "दया कर, मदत कर" अशी प्रार्थना करणे कसे बरे आवडेल? त्याला आदरयुक्त नमस्कार करणे वेगळे व त्याच्यापुढे प्रार्थनेतून रडगाणे गाणे वेगळे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.११.२०२३

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

भूमिका, भौतिक व आध्यात्मिकही!

भूमिका, भौतिक व आध्यात्मिकही!

निसर्गाकडे नुसत्या भौतिक दृष्टीनेच बघायचे व वागायचे किंवा नुसत्या आध्यात्मिक दृष्टीनेच बघायचे व वागायचे की दोन्हीच्या संमिश्र दृष्टीने बघायचे व वागायचे हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व भावनेचा प्रश्न. मी मात्र परमेश्वर नामक निर्मिका शिवाय निसर्ग नामक निर्मिती नाही अशा तार्किक विचाराने निसर्गाच्या बुडाशी परमेश्वर आहे असे मानतो (मानतो असे म्हणतो कारण निसर्गाच्या बुडाशी असलेल्या सर्वोच्च शक्तीचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व मला वैज्ञानिक पुराव्याने सप्रमाण सिद्ध करता येत नाही).

माझ्या तर्कातला परमेश्वर मला निसर्गात व निसर्गाचाच एक भाग असलेल्या मानव समाजात विविध रूपांत व विविध गुणधर्मी क्रियांत दिसतो. तसाच तो निरनिराळ्या धर्मांनी वर्णिलेल्या विविध रूपांतही दिसतो. पण परमेश्वराची ही विविध रूपे आठवत, आळवत, त्याच्या विविध रूपांच्या विविध जपमाळा ओढत बसायचे की या सगळ्या रूपांत एकाच परमेश्वराला बघायचे हाही ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व भावनेचा प्रश्न. त्याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यात कोणी लुडबूड करणे टाळावे.

निसर्गात व मानव समाजात संतुलन साधण्याच्या निसर्गातील सर्वोच्च शक्तीच्या (परमेश्वराच्या) अनेक पद्धती आहेत. त्यावर बौद्धिक विचारमंथन तरी किती करायचे? जंगलात तृणभक्षी प्राण्यांना हिंस्त्र मांसभक्षी प्राणी क्रूरपणे शिकार करून खातात हीही निसर्गातील त्या परमेश्वराची बळी तो कानपिळी या  जंगली नियमावर आधारित जंगलात संतुलन साधण्याची पद्धत आहे.

पण मनुष्य प्राण्याला परमेश्वराने उदात्त भावना व श्रेष्ठ बुद्धी दिल्याने मानव जगतात हा जंगली नियम अंमलात आणणे अमानवी होय. मनुष्य म्हणून आयुष्य जगताना दोन प्रमुख पर्याय परमेश्वराने मनुष्याच्या बौद्धिक विचारांसाठी ठेवले आहेत. ते म्हणजे सुज्ञ, समंजस, विवेकी (रॕशनल) वैचारिक धोरणाने चांगल्या आर्थिक सहकार्यातून शांततामय सहजीवन (पिसफुल कोएक्झीस्टंस) स्वीकारायचे की आर्थिक, राजकीय  दोन्ही स्तरावर प्रचंड मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तारवादी, आक्रमक, अविवेकी, हुकूमशाही वैचारिक धोरणाने जंगलातील "बळी तो कानपिळी" हा कनिष्ठ नियम स्वीकारून राजकीय संघर्षातून  विध्वंसक भूमिका घेत अशांत जीवन जगायचे, हे दोन्ही पर्याय मानवापुढे आहेत. मानव समाजाच्या माध्यमातून निसर्गात व समाजात संतुलन साधण्याची परमेश्वराची उच्च पातळीवरील हीही एक पद्धत आहे. सुसंस्कृत मानव समाजाकडून परमेश्वराच्या या पद्धतीचा सुज्ञपणे विचार केला जाऊन शांततामय सहजीवनाचा श्रेष्ठ पर्याय स्वीकारला गेलाय. पण या चांगल्या निर्णयात खोडा घालणारे काही विघ्नसंतोषी लोक असतात व त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुसंस्कृत समाज कायद्याला पार पाडावे लागते. हे काम चोखपणे पार पाडण्यासाठी मानव समाजातील कायदा रक्षक आस्तिक बनून परमेश्वराचे नाव घेतील किंवा परमेश्वराचे अस्तित्व नाकारून नास्तिक बनून परमेश्वराचे नाव घेणारही नाहीत. ते स्वातंत्र्य त्या सर्वोच्च निर्मिक शक्तीने मानवाला दिले आहे.

मी मात्र परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून निसर्गाकडे व त्याचाच भाग असलेल्या मानव समाजाकडे व त्यातील घटनांकडे, घडामोडींकडे परमेश्वराची लीला म्हणून बघतो व याच लीलेचा भाग म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेला माझ्या बौद्धिक कुवतीनुसार व वैयक्तिक ताकदीनुसार न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ती भूमिका पार पाडताना परमेश्वर हा माझा आधार, सोबती, सांगाती असा आध्यात्मिक विचार करतो. तसा विचार करताना या जगातील प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याची बौद्धिक कुवत व प्रत्येक प्रश्न सोडविण्याची ताकद माझ्याकडे नाही हे वास्तव स्वीकारून बऱ्याच गोष्टी जगावर व जगाचा कर्ता व करविता असलेल्या परमेश्वरावर टाकून/सोडून मोकळा होतो. छोट्या गोष्टी मोठ्या करण्याचा व मोठ्या गोष्टी छोट्या करण्याचा जेंव्हा जेंव्हा माझ्या मनाला मोह होतो तेंव्हा तेंव्हा त्यातून सावरण्यासाठी मी माझ्या  बुद्धीची सांगड परमेश्वराच्या सोबत,  आधाराशी घालतो. माझी भूमिका अशाप्रकारे भौतिक आहे तशी ती आध्यात्मिकही आहे. निसर्गात अधूनमधून नैसर्गिक आपत्ती येत असतात तशा मानव समाजातही अधूनमधून विकृत, समाज विघातक व विध्वंसक घटना घडतच असतात. पण केवळ त्यावरून निसर्गातील परमेश्वराचे अस्तित्व नाकारायचे हे मला मान्य नाही. कारण या वाईट, भीतीदायक घडामोडी, घटना कायम नसतात. त्या तात्पुरत्या असतात. सर्वोच्च परमेश्वरी शक्तीकडून पुन्हा संतुलन साधले जाते अशी माझी वैयक्तिक आध्यात्मिक श्रद्धा आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.११.२०२३

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

नुसते शिक्षण ही पाॕवर नव्हे!

नुसते शिक्षण ही पाॕवर नव्हे!

बौद्धिक हुशारीवर उच्च शिक्षण घेता येईलही पण त्या उच्च शिक्षणाला साजेल अशा मोठ्या कामांचा सराव  करण्याची संधी जर अशा सुशिक्षित माणसाला सातत्याने मिळाली नाही तर त्याचे उच्च शिक्षण वाया जाऊ शकते. उच्च शिक्षणाचा सातत्यपूर्ण सराव होण्यासाठी त्या शिक्षणाला योग्य अशा उच्च दर्जाच्या मोठ्या कामांची सातत्यपूर्ण संधी मिळणे आवश्यक असते. उच्च शिक्षणाला मोठे आर्थिक व राजकीय पाठबळ मिळाले तर अशा शिक्षणाचे सोने व्हायला वेळ लागत नाही. नाहीतर अशा शिक्षणाची माती होऊ शकते. मग डोक्यात सतत मोठ्या कामांचे विचार पण हातात मात्र छोटी कामे या वास्तवाशी जुळवून घेता घेता ती छोटी कामेही नीट होत नाहीत व मग छोटी कामेच मोठ्या कामांसारखी करण्याचे मंत्रचळी वेड मनाला लागू शकते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.११.२०२३

उत्साह, शक्ती, शांती!

उत्साह, शक्ती, शांती!

स्वतःच स्वतःवर लादून घेतलेल्या कृत्रिम गोष्टी उतार वयात टाळण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामध्ये मानव जगतातले अव्यावहारिक, निरर्थक, बिनकामाचे, निरूपयोगी, उपद्रवी संबंध कमी करणे हेही आले. पण निसर्गाने शरीर, मनावर लादलेल्या काही नैसर्गिक गोष्टी अशा आहेत की त्या दुर्लक्षित करून टाळता येत नाहीत. त्या पार पाडण्यासाठी मला निसर्गातील सर्वोच्च शक्तीकडून म्हणजे परमेश्वराकडून मर्यादित का असेना पण उत्साह, शक्ती व शांती हवीय!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.११.२०२३

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

निरागस मुलगी!

निरागस मुलगी!

डिलाईल रोड महाराष्ट्र हायस्कूल मैदानाशेजारील करी रोड स्टेशनकडे जाणारी डिलाईल रोडची फूटपाथ. एक साधारण १६ वर्षे वयाची एक निरागस मुलगी छोट्या टेबलावर  घरगुती भाजी पोळी विकत उभी. बहुतेक इयत्ता दहावीत असावी. "मुली, काय काय आहे तुझ्याकडे", मी. "काका, चवळीची सुकी भाजी, राजमाची पातळ भाजी व चपाती आहे, आज मला यायला थोडा उशीरच झाला", ती मुलगी. "अगं, पण मला मच्छी हवी होती, आता मला त्या शेजारच्या महागड्या हॉटेलात जावे लागेल मच्छी घ्यायला आणि तुझ्याकडे मस्त घरगुती मच्छी स्वस्तात मिळेल म्हणून आलो इथे", मी. "काका, हो ते हॉटेल महाग आहे पण तुम्ही बुधवारी या, इथे स्वस्तात छान मच्छी मिळेल, त्या हॉटेलात १३० रूपयात मिळणारा तळलेला बांगडा त्यापेक्षाही छान घरगुती पद्धतीचा माझ्याकडे ५० रूपयात मिळेल, पण आज शाकाहारी भाजी, चपाती घेऊन जा", ती. "बरं, पण मला ती सुकी चवळीची भाजी नको, पातळ राजमाची भाजी दे, चपात्या घरी बायकोने करून ठेवल्यात, ती भाजी केवढ्याला?", मी. "काका, २० रू.". मी तिच्याकडून फक्त २० रूपयाची राजमाची पातळ भाजी घेतली व निरोप घ्यायला लागलो तेंव्हा ती म्हणाली "काका, बुधवारी या, मच्छी मिळेल". हो म्हणून मी तिचा निरोप घेतला.

आता तुम्ही म्हणाल की, हा अनुभव  तर सगळ्यांनाच येतो मग तो लिहून का सांगितला? सांगितला कारण यात मुद्दा दृष्टिकोनाचा व छोट्या गोष्टींतही मोठा आनंद घेण्याचा आहे. त्या मुलीची निरागसता व प्रामाणिकपणा मला भावला. असे संभाषण करायला मला आवडते. पण त्यासाठी अशा सरळ मनाची, निरागस स्वभावाची, प्रामाणिक माणसे मिळणे दुर्मिळ झालेय. किती श्रीमंत उद्योगपती, व्यापारी व किती पोपटपंची राजकारणी असे सरळ मिळतील? मला संभाषणासाठी ढोंगी, खोटी माणसे आवडत नाहीत तर माझ्या या लेखातील सरळसाध्या मुलीसारखी माणसे संभाषणासाठी आवडतात म्हणून हा अनुभव शेअर केला.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.११.२०२३

हवेतील श्रीमंती!

बाजारमूल्याच्या गणिती जुगारावर नाचणारी हवेतील श्रीमंती!

वस्तू व सेवांच्या बाजारातील तुमची आर्थिक पत ही तुमच्या बौद्धिक व भौतिक भांडवली मालमत्तेच्या व त्यातून तुम्ही बाजाराला पुरवठा करीत असलेल्या वस्तू व सेवांच्या बाजारातील मागणीवर अवलंबून असते. थोडक्यात काय तर मागणी व पुरवठ्याच्या दबाव घटकांवर तुमचे बाजार मूल्य ठरते व त्यावर ठरते तुमची आर्थिक पत. बाजार मूल्य व बाजार भाव स्थिर नसतात. ते सतत वरखाली होत असतात. खरं तर बाजार मूल्याचे गणित हाच मोठा जुगार आहे जो सतत वरखाली होणाऱ्या बाजारमूल्य व बाजार भावाच्या अस्थिरतेवर आधारित आहे आणि या असल्या जुगारात पैसे कमावण्यासाठी सर्वसामान्य माणसे जेंव्हा केविलवाणी धडपड करतात तेंव्हा ती जबरी फसतात, कोलमडतात. मूठभर भांडवलदारी मंडळींनी केवळ शेअर बाजारातच नव्हे तर वस्तू व सेवांच्या बाजारात सुद्धा मांडलेल्या या बाजारमूल्यी जुगारी श्रीमंती पासून सावध रहा. ही श्रीमंती म्हणजे हवेने फुगवलेला फुगा होय जो कधीही फुटू शकतो!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.११.२०२३

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

विज्ञान, धर्म व धम्म!

विज्ञान, धर्म व धम्म!

विज्ञान म्हणजे निसर्गाचे वास्तव. या वास्तवात श्रद्धाळू मानवाने परमेश्वर हेही वास्तव आहे असे मानले तेंव्हा ईश्वर धर्म निर्माण झाला. पण जगात अनेक देवधर्म आहेत. खरं तर हे धर्म म्हणजे परमेश्वर या गृहीतकाभोवती आपआपल्या देव कल्पनांप्रमाणे फिरणारे व देवधार्मिक कर्मकांडात एकवाक्यता नसणारे अनेक संप्रदाय होत. अशा धर्मात बुद्धीचा भाग कमी व भावनेचा (श्रद्धेचा) भाग जास्त असतो. परमेश्वराशिवाय निसर्ग/ विश्व शक्यच नाही हा मूलभूत तर्क (जो वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आला नाही) हाच काय तो ईश्वर धर्मातील बुद्धीचा अल्प भाग.

याउलट धम्मात बुद्धी व भावना यांच्यात संतुलन साधलेले असते. धम्म म्हणजे केवळ गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म नव्हे. कारण त्या धम्मात नास्तिकता आहे. माझ्या मते धम्म म्हणजे संपूर्ण निसर्ग व मानव समाज यांचे कल्याण साधणारा जगव्यापी असा सार्वजनिक कायदा. हा सार्वजनिक कायदा लोकांवर नास्तिकता लादत नाही. निसर्गात अलौकिक सर्वोच्च शक्ती असलेला परमात्मा आहे असे मानायला धम्म किंवा कायदा जशी मुभा देतो तशी मुभा तो नास्तिक व्हायलाही देतो.

पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे अर्थात आस्तिक असणे म्हणजे जगातील धर्म संप्रदायांनी घोषित केलेल्या प्रेषित, देवावतार यांनाच मानणे व त्यांच्याविषयी धर्मांनी सांगितलेल्या धार्मिक कर्मकांडी पद्धती अवलंबणे असे नव्हे. ईश्वर श्रद्धा असलेला आस्तिक माणूस त्याच्या वैयक्तिक पातळीवर स्वतःचा वैयक्तिक ईश्वर धर्म निर्माण करून त्याला सोयीस्कर असलेल्या पद्धतीने ईश्वर प्रार्थना करू शकतो. स्वतःपुरत्या मर्यादित असलेल्या या वैयक्तिक ईश्वर धर्माचा म्हणजे वैयक्तिक पातळीवरील ईश्वर प्रार्थना पद्धतीचा सार्वजनिक गाजावाजा करण्याची काही गरज नसते.

माझ्या माहितीप्रमाणे गौतम बुद्ध हे नास्तिक असल्याने त्यांच्या बुद्ध धम्माला ईश्वर धर्म मान्य असणे हे शक्य नाही. माझ्या धम्म संकल्पनेत मात्र ईश्वर धर्म येऊ शकतो. धम्म व धर्म यांच्या संयुक्त मिश्रणाचा माझा हा स्वतंत्र विचार प्रचलित धम्म व रूढ धर्म संकल्पनांमध्ये बसेलच असे नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.११.२०२३

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

Science of Constructive Intellectual Partnership!

SCIENCE OF CONSTRUCTIVE INTELLECTUAL PARTNERSHIP!

When I say that Nature is creative I mean the super powerful spirit of Nature is creative. We can call this super powerful spirit of Nature as God by logical belief in God by being theists. Those who reject this theory of God are free to remain as atheists. My belief as theist is that God is creative through its medium called Nature. The Nature is what? It is the systematic union of diverse natural resources having diverse properties & diverse energies derived from God i.e. super powerful spirit of Nature. The Nature can also be called as universe.

We know very little about creative activism of God within Nature/Universe. Our scientific knowledge about Nature/Universe and God's creative activism within it is very limited. Our earth is very smallest part of the giant Nature/Universe. We are still struggling to know about of our earth and material world including life evolved systematically on earth (created by God on earth).

The procreation of life and continuous survival of life are the two basic issues of living things on earth viz. plants, birds, animals and ecologically top animals viz. human beings. The life science has its own system of resolving these two main issues of life on earth. The production & consumption are two answers to these two issues. The parasitical consumption is criminal consumption. But it is the part of life science.

The plants consume basic elements of land, water, air and sunlight parasitically means without their direct contribution to these basic elements. They are ready made for consumption within Nature that exists on earth. The herbivorous animals follow plants and survive by the parasitical consumption of plants. The carnivorous animals follow herbivorous animals which are ready made by their procreation within Nature and survive by parasitical consumption of herbivoros animals. However, such parasitical consumption has been given a twist by God within Nature. The cycle of evolution seems to have been completed by God on earth by putting human beings at the end/on the top of ecological pyramid.

The human beings can consume non-human things parasitically but such parasitical criminal  consumption is restricted between human beings. This natural restriction is the foundation of human good that is human divinity which is responsible for causing human brain/mind to look spiritually at God within Nature. This human  inclination is natural. It is this inclination which has made the human life really  meaningful by developing productive & consumptive partnership by and between human beings by smart  recognition of their end/top ecological position within Nature on earth as divine creation of God. The spirit of God is wonderful and so its diverse creations within Nature are wonderful. The wonderful Nature/Universe itself is wonderful creation of God. The human beings are thus not only material, they are spiritual too.

The scientific production & scientific consumption of natural resources from Nature is pre-condition of life science including law of Nature created by God. But this scientific production & consumption is not one man's job. It requires/needs collective human efforts of two and/or more human beings as social endeavour. The fair and equitable co- sharing of such scientific production & consumption activities between human beings is God's second pre-condition for human life survival in terms of social law which is a natural part of giant law of Nature as created by God.

The aforesaid co-sharing in the form of constructive intellectual partnership with mutual cooperation between human beings is the basic foundation of aforesaid social law and punishment to anybody attacking this foundation with destructive criminal intention is also the part of  constructive intellectual partnership with mutual cooperation between the human beings.

The God is natural human inclination towards Nature. Such inclination is basically  emotional means spiritual. But mere such emotional inclination towards God within Nature does not help in science of Nature and in the aforesaid constructive intellectual partnership for human survival. In my view, one can remain spiritual towards God by thanking God for giving intelligent human brain and for giving   ready made diverse natural resources for using such brain for living of dignified and meaningful human life.

-Adv.B.S.More©15.11.2023

Science of constructive intellectual partnership!
-Author©Adv.B.S.More