https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २१ मे, २०१७

*माझ्या लग्नाची गोष्ट*!

*माझ्या लग्नाची गोष्ट*!

(१) खरंच लग्न ही जगातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे का? या प्रश्नाचे उत्तर मी लग्न करून ३२ वर्षे झाली तरी अजूनपर्यंत मला सापडले नाही. तसेच लग्नाचा आधार घेतल्याशिवाय प्रेम नीट खुलत नाही, फुलत नाही हेही मला ६० वयाचा म्हातारा होऊन सुध्दा नीटपणे कळले नाही. प्रेमाच्या बाबतीत मी तसा बावळटच राहिलो आहे. अर्थात बाळू हे नाव "बावळट बाळू" म्हणून मी सार्थ केले आहे.

(२) आता माझ्या लग्नाची गोष्टच मी तुम्हाला बिनधास्त सांगतो. आतापर्यंतचा एकूण ३२ वर्षांचा माझा लग्नाचा अनुभव. बायकोने जवळ बसून फोटो काढू दिला तर मग दोघांचा फोटो फेसबुक वर टाकून ३१ मे २०१७ रोजी मी माझ्या लग्नाचा ३२ वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणार. 

(३) ३१ मे १९८५ रोजी पंढरपूर तिर्थक्षेत्री माझ्या बायकोशी माझे लग्न झाले. सुरक्षित संभोग क्रियेतून एकाच वर्षात आम्ही दोघांनी एका मुलीला जन्म दिला. कामगार वर्गाची पार्श्वभूमी असलेल्या आमच्या खानदानीत कोणी कधीही वकिली केली नाही. पण कसलेही पाठबळ नसताना गृहिणी बायको आणि मुलीला वाढविण्याची जबाबदारी अंगावर घेऊन काहीतरी वेगळे करुन दाखवायचे म्हणून मीच वकिलीत उडी घेतली. पण उडी महागात पडली. दरमहा ५०० रूपयांची कमाई करताना सुध्दा नाकीनऊ आले. मग ठरवून टाकले. "खर्चाला कार आणि बाळूला भार" म्हणून दूसरे मूल होऊ द्यायचे नाही, पण वकिलीत ठाम उभे रहायचे.

(४) मग वकिली थाटात मुलीला नामांकित शाळेत घातले. पोरगी पण भलतीच हुशार निघाली. परीक्षांमध्ये चांगले यश मिळवू लागली. पण नामांकित शाळेची फी परवडत नव्हती. बायकोला सारखी उसणवारी करावी लागत होती. मग काय घरात नेहमीच भांडणे. शेवटी एकदाचे स्वतःचे घरदार झाले. चाळीतील भाड्याच्या खोलीतून मालकीच्या फ्लॅटमध्ये आलो.

(५) संसारात राहून मुलीच्या शिक्षणाचा खर्च जरी मी उचलला असला तरी मुलगी हुशार नसती तर त्या खर्चाचा काही उपयोग नव्हता. पण हुशार मुलीने नामांकित व्यवस्थापन संस्थेतून मेरीटवर एम.बी.ए. चा पूर्णवेळ अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. आता ती नामांकित कंपनीत उच्च पदावर स्थिर आहे.

(६) आता माझ्या लग्नानंतर विषय पुढे येतो तो माझ्या मुलीच्या लग्नाचा. तिचा जीवन साथीदार तिनेच शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्ही पतीपत्नीने तिला दिले आहे. पण आमच्यापेक्षा लोकांनाच तिच्या लग्नाची जास्त काळजी आहे असे दिसते. अजून कसे जमले नाही म्हणून सारखी चौकशी करतात. 

(७) आता एकतर मी फटकळ माणूस. त्यामुळे यापुढे मुलीच्या लग्नाची जे कोणी चौकशी करतील त्यांना सरळ बोलूनच टाकणार की, "मुलीचे लग्न होईल, नाहीतर होणार नाही. मी काय मोठा दिवा लावलाय लग्न करून"? या ठिकाणी "दिवा" या शब्दाचा अर्थ "वंशाचा दिवा" अर्थात मुलगा असा घेऊ नये. लग्नाला एक जीवन व्यवहार समजणारा मी माणूस मुलामुलीत भेद करणाऱ्या फालतू गोष्टींना काडीचीही किंमत देत नाही. दिवा लावणे म्हणजे जीवनात येऊन महान कार्य करणे, असे मला म्हणायचे आहे. लग्न करणे आणि प्रेमाच्या नावाखाली ते खपवणे, याला मी जीवनातील महान कार्य मानत नाही. अजून संपली नाही माझ्या लग्नाची गोष्ट. हा झाला भाग एक. दूसरा भाग अजून बाकी आहे, कारण आयुष्य अजून बाकी आहे. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा