https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

तुकड्यांचे आर्थिक मूल्य!

तुकड्यांचे आर्थिक मूल्य!

विविध पदार्थ, वनस्पती, पशूपक्षी व माणसे जशी निसर्गात विखुरलेली आहेत तसे निसर्गाचे विज्ञानही निसर्गात विखुरलेले आहे. एका माणसाला या विखुरलेल्या विविध गोष्टींवर व विखुरलेल्या विज्ञानावर एकट्याचे स्वराज्य निर्माण करता येत नाही, मग सुराज्याचा तर प्रश्नच नाही.

एकटा माणूस त्याच्या आयुष्यात फार तर विखुरलेल्या तुकड्यांच्या काही तुकड्यांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो व त्या प्रावीण्याच्या जोरावर त्या ठराविक तुकड्यांवरच मर्यादित राज्य करू शकतो. विखुरलेल्या या सगळ्या तुकड्यांना आर्थिकदृष्ट्या एकत्रित करून त्यांचे एकत्रित आर्थिक मूल्य मोजून तेवढाच पैसा बाजारात खुला करण्याचे काम देशाच्या मध्यवर्ती बँकेचे (भारतीय रिझर्व्ह बँक हे उदाहरण) असते.

माझा प्रश्न हा आहे की, अनैसर्गिक व असामाजिक वर्तनातून पर्यावरण प्रदूषित करणारे विनाशी घटक पर्यावरणात सतत निर्माण होत असतात व त्यांच्याकडे वातावरण बिघडवण्याचे उपद्रव मूल्य (न्युसन्स वॕल्यू) जबरदस्त असते. हे विनाशी उपद्रव मूल्य देशाची मध्यवर्ती बँक विखुरलेल्या तुकड्यांच्या एकूण आर्थिक मूल्यातून वजा करते काय?

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.१२.२०२३

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

छळणाऱ्या गोष्टी!

मनाला छळ छळ छळणाऱ्या उपद्रवी गोष्टी!

जग विविधतेने भरलेले आहे पण त्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या प्रत्येक विविधतेशी प्रत्येकाची मैत्री होऊ शकत नाही. त्यातील बऱ्याच गोष्टी दुरून डोंगर साजरे प्रकारातील असतात. निरनिराळे खेळ प्रकार, निरनिराळ्या कलाकृती, राजकारण इतकेच काय कसले ते देवधर्मी अध्यात्म या माझ्यासाठी तरी अशाच दुरून डोंगर साजरे प्रकारातील गोष्टी  आहेत. त्यामुळे कदाचित लोक मला निरस, अरसिक म्हणतील पण मला त्याची पर्वा नाही. कारण इतरांसाठी फायद्याच्या असणाऱ्या या गोष्टी त्यांचा खुळा नाद केल्याने मला मात्र उपद्रवी, छळवादी होतात.

जोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्या क्रियाशीलतेशी मैत्री संबंध जुळवत नाही तोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्यासाठी कायम परकी राहणार. परक्या माणसांना मायाप्रेमाने तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न केला तर तुमची फजिती होणार त्यापेक्षा ती गोष्ट टाळलेली बरी.

मूलभूत, आवश्यक गोष्टी कोणत्या व त्यांना पूरक गोष्टी कोणत्या म्हणजे गरजा कोणत्या व चैनी कोणत्या याची यादी प्रत्येकाने करायला हवी. मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून पूरक गोष्टींकडेच जास्त लक्ष दिले तर मनाला पूरक गोष्टींचाच खुळा नाद लागतो. अशा पूरक गोष्टींचीच मनाला सवय लागते, मनाला त्यांचे वेड, व्यसन लागते. त्यामुळे चैनच मनाची गरज बनते. उद्योगधंद्याचे जाहिरात तंत्र (मार्केटिंग) मानवी मनाच्या या वेडावर, व्यसनावर चालते. मनाला चिकटलेली अशी चैन पुढे मनाचा छळ सुरू करते. दारू सिगारेटचे, जुगाराचे व्यसन हे याच छळवादी प्रकारातले. पण याच छळवादी मानसिक वेडावर काही चालू माणसे गडगंज श्रीमंत होतात व व्यसनाधीन माणसे भिकेला लागतात.

स्वतःच्या मनाला उगाच चिकटून घेतलेल्या अशा पूरक चैनीच्या, व्यसनी गोष्टी कोणत्या याची यादी बनवा व त्यांना अती किंमत न देता होता होईल तेवढ्या त्या दूर ठेवा. त्यांची छळवादी सवय जबरदस्तीने मोडून काढता आली नाही तरी ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. या उपद्रवी गोष्टींची किंमत हळूहळू शून्यावर आणा. स्वतःपुढे काय वाढून ठेवलेय हे न बघता जगाचा निष्फळ विचार करणे सोडून द्या. आभासात, कल्पनाविश्वात जगणे सोडून देऊन वास्तवात जगायला शिका. स्वतःच स्वतःचा मानसिक छळ करू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१२.२०२३

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

माझ्या माहितीनुसार (चुकत असेल तर स्पष्ट करून सांगा) ओशो हेच सांगतात की भौतिकतेचा अत्युच्च आनंद घ्या मग संपृक्त अवस्था प्राप्त होईल. त्या अवस्थेला पोहोचल्यावर भौतिकता जरा सुद्धा आवडणार नाही आणि मगच तुम्ही भौतिक मार्ग सोडून आध्यात्मिक मार्गावर याल. असे कुठे होते काय? हे तत्वज्ञान भांडवलदार लोकांना पटले असते तर जगात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालीच नसती. गंमत ही आहे की अध्यात्म गरीब लोकांना सांगून त्यांना ठेविले अनंते तैसेची रहावे शिकवले जाते म्हणजे षडयंत्री लोकांना मलई खायला रान मोकळे. अशावेळी अध्यात्मातला देव शांतपणे ही गंमत बघत असतो. आपण वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१२.२०२३

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!

जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!

जात हा ज्ञात शब्दाचा अपभ्रंश असावा. पिढ्यानपिढ्या ठराविक  समाज वर्गाकडे निसर्ग विज्ञानाचे विशिष्ट ज्ञान व त्यातील कौशल्य (विशिष्ट विज्ञान-तंत्रज्ञान) संचयित झाल्याने विशिष्ट ज्ञान कौशल्यावर आधारित व्यवसाय, उद्योगधंदा करणाऱ्या लोकसमूहाचा विशिष्ट समाज वर्ग निर्माण झाला असावा व त्या वर्गाची विशिष्ट जात निर्माण झाली असावी. अशाप्रकारची जात ही ज्ञानाधारित असल्याने तिला जात म्हणण्याऐवजी ज्ञात म्हटले तर समाजातील विविध जाती या ज्ञाती म्हणून दिसू लागतील.

विज्ञानाला धर्माचा रंग देऊन किंवा विज्ञानावर धर्माचा मुलामा चढवून एखाद्या समाज वर्गाने विज्ञानाचा गाभा पिढ्यानपिढ्या स्वतःच्या ताब्यात ठेवून बहुजन समाजाला ज्ञानापासून खरंच पिढ्यानपिढ्या वंचित ठेवले का अर्थात ज्ञानाला सामाजिक दृष्ट्या संकुचित करून ठेवले का हा जातीचा (माझ्या मते ज्ञातीचा) इतिहास अभ्यासण्याचा विषय आहे. यावर डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल संशोधन करून शूद्र पूर्वी कोण होते यावर संशोधनात्मक कारणमीमांसा करीत निष्कर्ष काढला आहे. परंतु ज्याला हे संशोधनात्मक आंबेडकरी साहित्य वाचण्याचा आळस, कंटाळा असेल त्याने स्वतःचा काॕमन सेन्स (सामान्य जाणीव) वापरला तरी समाजातील जातसंघर्षाची कारणे कळतील.

डाॕक्टरांच्या मुलाबाळांनी वैद्यकीय ज्ञान स्वतःकडे एकवटून ठेवून तोच वैद्यकीय व्यवसाय पिढ्यानपिढ्या करायचे ठरवले तर डाॕक्टरांचीही ज्ञानाधारित डॉक्टर जात (ज्ञात) बनेल. वकिलांच्या मुलाबाळांनीही पिढ्यानपिढ्या तेच केले तर वकील वर्गाचीही जात (ज्ञात) बनेल. हेच काय पण पोलीस, लष्कर, उद्योजक व व्यापारी, अर्थकारणी यांच्याही ज्ञानाधारित जाती (ज्ञाती) बनतील. प्रश्न आहे तो सफाई कामगारांचे काय करायचे? त्यांच्या मुलांनीही पिढ्यानपिढ्या सफाई कामगार बनूनच जगायचे का? म्हणजे ज्ञान वंचित राहिल्याने पिढ्यानपिढ्या खालच्या दर्जाची कनिष्ठ कामेच करीत रहायचे का? जन्माने अशी जात (वंचित ज्ञानाधारित वंचित ज्ञात असे वाचावे) त्यांच्यावर उच्च ज्ञान वर्गीय समाजाने लादल्यामुळेच समाजात शूद्र हा समाज वर्ग निर्माण झाला व त्या वर्गातून अनेक शूद्र जाती निर्माण झाल्या हे महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन वाचल्यास कळेल. जन्माने अशी शूद्र जात विशिष्ट कनिष्ठ वर्गावर उच्च वर्गीय समाजाने लादल्याने शूद्रांचा ज्ञान, अर्थ व राज (सत्ता) विकास होऊ शकला नाही म्हणून भारतीय राज्य घटनेत अशा कनिष्ठ (शूद्र) जातींच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासासाठी जातनिहाय आरक्षण कायद्याने निर्माण करावे लागले, ही मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

समाजाने जर अशी विशिष्ट जात विशिष्ट समाज वर्गावर जन्माने लादली तर अशी गोष्ट मनुष्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्य, विकासाच्या आड येते. डॉक्टरच्या मुलाला इंजिनियर होऊ वाटले तर त्याला इंजिनियर होऊ दिले पाहिजे. वकिलाच्या मुलीला जर आंतरराष्ट्रीय कंपनीची व्यवस्थापिका होऊ वाटले तर तिला तशी व्यवस्थापिका होऊ दिले पाहिजे. माझ्या मुलीला मी तेच निवडीचे स्वातंत्र्य दिले व वकील होण्याऐवजी ती आंतरराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापिका झाली. म्हणजे माझी वकिली माझ्याबरोबरच संपणार. माझे वडील गिरणी कामगार पुढारी होते पण मी कामगारच झालो नाही. कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन वकील झालो तर मग पुढे कामगार पुढारी होण्याचा प्रश्नच उरला नाही. जन्माने माझ्या वडिलांची, माझी व माझ्या मुलीची जात एकच व ती म्हणजे मराठा. पण ज्ञानकर्माने आमच्या एकाच मराठा कुटुंबात तीन जाती (ज्ञाती) निर्माण झाल्या त्या म्हणजे अनुक्रमे कामगार पुढारी, वकील व व्यवस्थापन. आमच्या या तीन जाती आमच्या वैयक्तिक ज्ञानकर्मावर आधारित आहेत. आमचे नातेवाईक केवळ मराठा समाजाचे आहेत या एकाच निकषावर आमचे आमच्या नातेवाईकांशी बौद्धिक, वैचारिक पातळीवर जमेलच असे नाही. तिथे वैचारिक आंतरविरोध व जातसंघर्ष असू शकतो व त्याला मुख्य कारण म्हणजे ज्ञानकर्मावर आधारित निर्माण झालेल्या आपआपल्या कुटुंबातील आमच्या अंतर्गत जाती (ज्ञाती) या वेगवेगळ्या आहेत. त्यात समानता नाही. एवढेच काय एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेली मुले एकाच जैविक रक्ताची असली तरी ती बौद्धिक, वैचारिक दृष्ट्या पुढे एकसारखी राहतील याची शास्वती देता येत नाही. कारण बौद्धिक कष्ट व कर्म वेगळे असते. हाताची पाच बोटे सारखी नसतात त्यातलाच हा भाग. असे म्हणतात की वेगवेगळी असलेली हाताची ही पाच बोटे एक झाली तर एकजूटीची मूठ बनते व जेवण करणे सोपे जाते. पण एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या हातांची नुसती बोटेच वेगळी नसतात तर त्यांच्या मुठीही वेगळ्या असतात ही गोष्ट विसरता कामा नये. एकाच कुटुंबातील अशी सगळीच मुले उच्च शिक्षित झाली तरी अशा उच्च विद्याविभूषित भावाबहिणींमध्ये सुद्धा वैचारिक संघर्ष असू शकतो कारण त्यांच्या वैचारिक जाती (ज्ञाती) वेगवेगळ्या असू शकतात. एकाच धर्मात अनेक पंथ व एकाच जातीत अनेक पोट जाती असतात व त्यांच्यात आंतर विरोध असतो त्यातलाच हा प्रकार. माझ्या मते, शिक्षण, व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यात कौटुंबिक व सामाजिक अडवणूक केल्यानेच आंतरविरोध व जातसंघर्ष निर्माण होतो.

माझ्या या लेखाचा थोडक्यात अर्थ एवढाच आहे की प्रत्येकाची जात (ज्ञात) ही जन्माने नव्हे तर प्रत्येक मनुष्याच्या ज्ञानकर्माने ठरते. हे तत्व समाजमान्य व्हायला हवे तरच जन्माधारित जातीपातींचा अंत होऊन जातसंघर्ष नष्ट होईल व मग आरक्षण या विषयावर कायमचा समाजमान्य तोडगा निघेल. सद्या तरी समाजात जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण हे दोन्ही मुद्दे हे वास्तविक मुद्दे आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

आध्यात्मिक मार्गावर केव्हा, का, कुठे?

आध्यात्मिक मार्गावर केव्हा, का, कुठे?

मानवी ज्ञानेंद्रियांना सहज कळणारे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव भौतिक आहे व म्हणून ते जड आहे. म्हणून विज्ञानाला भौतिक विज्ञान म्हणणे योग्य होईल. पदार्थ विज्ञान, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, जीव शास्त्र इतकेच काय मानव समाज शास्त्र या  सर्व भौतिक विज्ञानाच्याच शाखा आहेत. या भौतिक विज्ञानाच्या कुशल वापराला तंत्रज्ञान म्हणतात. म्हणून विशाल अर्थाने मानव समाज शास्त्रीय सामाजिक कायदा हा सुद्धा तंत्रज्ञानाचाच भाग होय असे माझे वैयक्तिक मत आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श देणारे समाजमान्य नैतिक तत्वज्ञान हा सुद्धा मानव समाज शास्त्रीय कायद्याचा भाग आहे हेही माझे वैयक्तिक मत आहे. पण मानव स्पर्शी असे नैतिक तत्वज्ञान जर समाजमान्य नसेल तर ते माणसाच्या वैयक्तिक पातळीवरच राहते. मानव स्पर्शी तत्वज्ञान हे मानवी जीवनाला तात्त्विक बैठक व तात्विक दिशा देत मानवी जीवन अर्थपूर्ण करण्याचे काम करते. तत्वज्ञानाने मानवी मनाला काही काळ स्थिरता व शांती लाभत असली तरी ती चिरकाल टिकेल याची शास्वती नसते इतका जड भौतिकतेचा मनावरील प्रभाव शक्तीशाली असतो.

निसर्गाची जड भौतिकता नश्वर देह मृत्यूने नष्ट होईपर्यंत मानवी मनाला घट्ट चिकटलेली असते. हा चिकटा निघता निघत नाही. तो अशाप्रकारे शरीर, मनाला घट्ट चिकटलेला असल्याने पटकन जाणवतो, कळतो व म्हणून तोच वास्तव, मूर्त वाटतो. निसर्गाची भौतिकता गोल चक्रात फिरणारी व परिवर्तनशील आहे. म्हणजे ती पूर्णतः नश्वर नाही. ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत परिवर्तित (ट्रान्सफाॕर्म) होते. उदा. मनुष्य मृत्यू पावला की त्याचे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत रूपांतर (परिवर्तन) होते. मनुष्याचा सजीव देह अशाप्रकारे नश्वर आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू अटळ आहे व माणूस या भौतिक निसर्ग नियमाला अपवाद नाही. मग माणूस हळूहळू विचार करतो की या परिवर्तनशील नश्वर भौतिकतेला, नश्वर भौतिक देहाला किती चिकटून रहायचे. भौतिक देह व या देहाला चिकटलेल्या भौतिक मनाच्या सहाय्याने मिळवलेली भौतिक संपत्ती, नातीगोती सगळे या भौतिक निसर्गातच सोडून जायचे आहे. मग निसर्गाच्या या भौतिक वैज्ञानिक वास्तवाचा विचार करून मनुष्य निसर्गातील मूळ ईश्वर तत्वाचा व सत्वाचा शोध घेण्यास सुरूवात करतो. त्यासाठी निसर्गाच्या मूर्त (काॕन्क्रिट) जड भौतिक वास्तवाच्या आत खोलवर हलके फुलके असे (भौतिक जडत्व नसलेले) ईश्वरी मूलतत्व व सत्व याच जड भौतिक निसर्गात आहे जे अमूर्त म्हणजे अनाकलनीय आहे याची जाणीव मानवी मनाला व्हावी लागते. तशी जाणीव झाली की माणूस त्या मूळ ईश्वरी तत्वाशी व सत्वाशी एकरूप होण्याचा व त्यातून जड भौतिक मनाला आध्यात्मिक आनंद शांती व स्थिरता देण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात तो आध्यात्मिक मार्गावर येतो. या आध्यात्मिक जाणिवेतून त्याच्या मनात भौतिक कर्मे करताना सुद्धा परमेश्वराचा आधार वाटतो.

विज्ञानातले व कायद्यातले सगळंच सगळ्यांना जसं कळत नाही तसं अध्यात्मातले सगळंच सगळ्यांना कळत नाही. आध्यात्मिक बाबतीत माझ्यासारख्या ज्या लोकांना पूर्ण अध्यात्म समजत नाही व ते समजत नसल्याने ज्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करता येत नाही अशा वरवर अध्यात्म करणाऱ्या माझ्यासारख्या  सामान्य लोकांसाठी "श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" म्हणजे काही काळ का असेना पण जड भौतिक मनाला हलक्या फुलक्या आध्यात्मिक अवस्थेत आणून त्या मनाला भौतिक जडत्वापासून मुक्ती द्यायचे ठिकाण म्हणजे ईश्वराचे ध्यान व प्रार्थनास्थळ हाच आध्यात्मिक थांबा असतो व तेवढाच त्या थांब्याचा आध्यात्मिक उद्देश असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

मोजक्यांचे मोजके खेळ!

मोजक्यांचे मोजके खेळ!

आयपीएल क्रिकेट सामन्यांत क्रिकेट खेळाडूंचा लिलाव होतो. त्यांच्यावर गडगंज पैसा जवळ असणारे श्रीमंत अर्थसम्राट करोडो रूपयांची बोली लावतात आणि त्या बोलीवर या खेळाडूंचे खेळ मूल्य ठरते. हा प्रकार म्हणजे बुद्धिमान माणसाची भन्नाट कल्पना. या कल्पनेच्या खोलात गेले की कळते की खेळाडूच काय पण कलाकार, राजकारणी वगैरे सर्व सेलिब्रिटी मंडळी मूठभर अर्थसम्राट लोकांकडून वापराच्या वस्तू झाल्या आहेत. सर्वसामान्यांचे हित वगैरे या सर्व फेक आश्वासनांच्या गोष्टी आहेत. हे सर्व मोजक्या मर्जीतल्या लोकांचे (कंपूगिरी) आपसातले मोजके खेळ आहेत जे सर्वसामान्य लोकांनी फक्त बघत रहायचे व त्यावर फक्त टाळ्या वाजवायचे काम करायचे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

डिजिटल क्रांतीचा धुमाकूळ!

डिजिटल क्रांतीचा धुमाकूळ!

जगातील डिजिटल क्रांतीने भाषिक मर्यादांच्या भिंती ओलांडून सर्व भाषिकांना जवळ आणण्याचे काम सुरू केले आहे. भाषिणी नावाचे ॲप एका सेकंदात एका भाषेचे भाषांतर दुसऱ्या भाषेत करते असे माझ्या दिनांक २३.१२.२०२३ च्या लोकसत्ता वृत्तपत्रात वाचण्यात आले व मी खूप आश्चर्यचकित झालो.

वेगाने प्रगत होत चाललेल्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा भाषिणी हा एक छोटा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा तर आणखी पुढचा भाग. नशीब अजून तरी कृत्रिम भावना हा प्रकार निर्माण झाला नाही. भावना अजून तरी नैसर्गिक पातळीवरच स्थिर आहे. तिला कृत्रिमतेचा स्पर्श अजून तरी झाला नाही.

ई काॕमर्स, आॕनलाईन बँकिंग हे शब्द अंगवळणी पडल्यानंतर आॕनलाईन निवडणूक सुद्धा पुढे आली आहे. या आॕनलाईन निवडणूक यंत्रणेचे एक तांत्रिक मोड्युल बाजारात आलेय. तसेच न्यायालयांतून आॕनलाईन दावे व खटले दाखल करण्याची यंत्रणा उभी राहिलीय. नशीब अजून तरी आॕनलाईन जस्टिस देणारे कृत्रिम तंत्रज्ञान निर्माण झाले नाही. जोपर्यंत मानवी भावना नैसर्गिक राहतील तोपर्यंत मानवी न्याय सुद्धा वकील व न्यायाधीश यांच्या स्वतंत्र माध्यमातून नैसर्गिकच राहील असे मला वाटते. आमच्या सारखी जुन्या काळातील माणसे मात्र या डिजिटल क्रांतीने हळूहळू कालबाह्य होत चालली आहेत हे मात्र खरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३