https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!

विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!

सृष्टीकर्ता (ईश्वर) सृष्टीची नुसती रचना म्हणजे सृष्टीची आकारबद्ध निर्मिती करून गप्प बसला  नाही तर निर्माण केलेल्या सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी त्याने त्या सृष्टीत कायदेशीर व्यवस्थाही निर्माण केली. लक्षात घ्या की सृष्टी दृश्यमान आहे तशी सृष्टीची व्यवस्थाही दृश्यमान आहे. पण ही व्यवस्था ज्या जोरावर, ज्या प्रभावाखाली चालते तो ईश्वराच्या अधिकाराचा, सत्तेचा, हुकूमाचा प्रभाव मात्र सुप्त आहे, गुप्त आहे, अदृश्य आहे. म्हणजे ईश्वर अदृश्य व त्याचा प्रभावही अदृश्य! पण त्या अदृश्य प्रभावाची अप्रत्यक्षपणे जाणीव होतेय हे मात्र खरे! त्या सुप्त, अदृश्य प्रभावाची जाणीव जर अप्रत्यक्षपणे होतेय तर मग अदृश्य ईश्वराची अप्रत्यक्षपणे जाणीव नास्तिकांना का होत नाही हे कळायला मार्ग नाही. लोकशाहीत आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्यांच्या माध्यमातून कायदे बनवतो ते कुठून बनवतो? सृष्टीत असलेल्या मूलभूत व्यवस्थेतूनच ना! कायदे बनवतो म्हणजे काय करतो तर सृष्टीची आहे ती व्यवस्था आम्हाला समजावी म्हणून ती अधिक स्पष्ट करतो, तिला लिखित स्वरूपात समोर ठेवतो. नंतर हे लिखित कायदे आम्हीच निवडलेल्या आमच्या लोकप्रतिनिधी मार्फत राबवतो? पण राबवतो किंवा अंमलात आणतो म्हणजे काय करतो? तर सृष्टीच्या व्यवस्थेत अदृश्य ईश्वराचा जो अप्रत्यक्ष प्रभाव आहे त्या प्रभावाखाली राहून आम्ही सृष्टीची ती व्यवस्था अधिक स्पष्टपणे राबवतो. पण हे सर्व करायला आम्हाला कोण भाग पाडते तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! आम्हाला वाटते आम्हीच हे सर्व करतोय. पण आमच्यावर अप्रत्यक्ष प्रभाव टाकून आमच्याकडून करवून घेणारा कोण असतो तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा तो सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! म्हणजे ज्या अदृश्य ईश्वराने ही दृश्य सृष्टी रचली तोच ती सृष्टी तिच्या व्यवस्थेसह आम्हाला नकळत अर्थात अप्रत्यक्षपणे चालवत आहे. विश्वातील बऱ्याच गोष्टी विज्ञानापासून दूर व मानवाला अज्ञात आहेत. विश्वातील डार्क मॕटर ही अशीच अज्ञात गोष्ट! म्हणजे अप्रत्यक्ष पुराव्यातून हे डार्क मॕटर या विश्वात असल्याची जाणीव होतेय पण त्याचा प्रत्यक्ष पुराव्याने विज्ञानाला शोधच घेता येत नाही. त्या अदृश्य ईश्वराचे व त्याच्या अदृश्य, सुप्त प्रभावाचे हे असेच आहे अगदी त्या डार्क मॕटर सारखे! आता एकदा का हे कळले की, अदृश्य ईश्वर व त्याचा अदृश्य, सुप्त  प्रभाव हा विश्वातील डार्क मॕटर सारखा शोधता न येणारा, अनाकलनीय आहे मग हेही मनात निश्चित केले पाहिजे की तो अनाकलनीय असा  ईश्वर व त्याचा अनाकलनीय प्रभाव यांचा शोध घेण्यात व त्यात व्यर्थ चाचपडत बसण्यात अर्थ नाही. त्या अज्ञात, अदृश्य ईश्वराला व त्याच्या सुप्त प्रवाहाला त्याचे काम अप्रत्यक्षपणे करू द्यावे व आपण मात्र सृष्टीचे दृश्य स्वरूप व तिची दृश्य व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत सृष्टीच्या व्यवस्थेची स्वतःच्या बुद्धीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. असे करताना मनाला ईश्वरी शक्तीचा आधार वाटण्यासाठी अधूनमधून आत्मचिंतन करीत ईश्वराची प्रार्थना करायला मनाची काही हरकत नसावी.

-ॲड.बी.एस.मोरे©९.१०.२०२०

विश्व चिकित्सा!

जाणीव/आकलन!

विश्वाच्या मूर्त (concrete), दृश्य रूपाची (दृश्यमान विश्व शरीराची) प्रत्यक्ष जाणीव/ आकलन व विश्वातील अमूर्त (abstract), अदृश्य प्रभावाची (अतर्क्य, गूढ विश्व मनाची) अप्रत्यक्ष जाणीव/आकलन मानवी शरीर इंद्रियांना व अंतर्गत मानवी मनाला एकदम होत नाही. ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाणीव, ते आकलन विश्वाच्या सूक्ष्म निरीक्षणातून, सखोल प्रायोगिक अभ्यासातून हळूहळू होते. याच निरीक्षण व अभ्यास प्रवासातून पुढे पुढे जात असलेला मी माझे काही अभ्यासपूर्ण निष्कर्ष, मते या समाज माध्यमावर मांडतो तेंव्हा अभ्यासाची आवड नसणारी किंवा अभ्यासाचा कंटाळा करणारी उथळ मनाची काही माणसे माझ्या अभ्यासपूर्ण पोस्टसवर अशा पोरकट प्रतिक्रिया देतात की त्यांना समजावून सांगण्याचा उपद्व्याप करण्यापेक्षा त्यांना सोडचिठ्ठी देण्यातच मी धन्यता मानतो!

-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

सार्वजनिक जीवन व खाजगी जीवन!

समाज माध्यमावरील लाईक्स व कौटुंबिक जीवनातील लाईक्स यात फरक आहे!

खाजगी लाईक्स व सार्वजनिक लाईक्स यात फरक आहे. दोन्ही जीवनात अंतर आहे. सोशल मिडिया हे समाज माध्यम असल्याने ते खाजगी  नसून सार्वजनिक आहे. सार्वजनिक गोष्टी घरात मांडत बसल्या तर संसारात त्रास होऊ शकतो व घरच्या खाजगी गोष्टी सोशल मिडियावर उघड्या करीत बसल्या तर खाजगी जीवनाची वाट लागू शकते. दोन्हीत संतुलन राखा!

-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०

गरजेवर चैन भारी?

गरजेचा खून करण्याची संधी चैनीला देऊ नका!

सजीवांची जगण्याची गरज भागविण्यासाठी सृष्टीची रचना करणाऱ्या देवाने हवा, पाणी, अन्नधान्य मुबलक प्रमाणात दिले व कधीतरी चैन म्हणून अंगावर घालण्यासाठी सोने, हिरे, माणिक, मोती यांना दुर्मिळ केले. पण ज्या देवाने मनुष्याला बुद्धी दिली त्या बुद्धीचीच मनुष्याने पुरी वाट लावली. त्याने काय डोके चालवले तर देवाने जे मुबलक प्रमाणात दिले त्याची किंमत कमी केली व देवाने अल्प चैन म्हणून जे दुर्मिळ केले त्याची किंमत वाढवली.  मग काय दारू, सिगारेट, चित्रपट, नाट्य, संगीत कला, क्रिकेट सारखे खेळ या करमणूक प्रधान चैनीच्या गोष्टी सेलिब्रिटी झाल्या. या दुर्मिळ चैनीच्या गोष्टींचे अक्षरशः सोने झाले. शेतात कष्ट उपसणारा शेतकरी व उद्योगधंद्यात घाम गाळणारा कामगार मात्र या नीच मानसिकतेतून गरीब झाला. अतिशहाणी मूठभर मंडळी याला कारण काय देतात तर अशा कष्टकरी लोकांची संख्या मुबलक आहे व श्रीमंत भांडवलदार मूठभर असल्याने दुर्मिळ आहेत. अहो पण या मूठभर लोकांना दुर्मिळ व सेलिब्रिटी कोणी केले हो? देवाने का माणसाने? देवाने तर चांगली सृष्टी निर्मिली! पण त्याने एक चूक केली की माणसाला थोडी जास्तीची बुद्धी देऊन सृष्टीचे व्यवस्थापन माणसाच्या ताब्यात देऊन तो देव मोकळा झाला. हाच अनुभव पदोपदी येत आहे मग "ज्या प्रभूने या सृष्टीला रचले, तोच ही सृष्टी चालवत आहे" या देवाच्या भजनाला माझ्या सारख्या खोलात विचार करणाऱ्या माणसाने का बरे म्हणून गुणगुणत बसावे? तसे करीत बसले तर आभासात जगल्यासारखे होईल व सत्य लपले जाईल. मूठभर श्रीमंतांना व त्यांना गुपचूप मदत करणाऱ्या काही धूर्त राजकारणी  मंडळींना तर हेच हवे आहे की लोकांनी डोळे उघडून सत्य बघूच नये. त्यांनी डोळे झाकून कायमच आभासात जगावे. तेंव्हा लोकांनी "ठेविले अनंते तैसेची रहावे" हा विचार सोडून देऊन डोळे उघडणे गरजेचे आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनो तुम्ही आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणता कामा नये. तुम्ही असा विचार करून चैनीला गरजेचा खून करण्याची संधी देत आहात हे लक्षात घ्या!

-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

रचा है सृष्टी को जिस प्रभू ने, वही ये सृष्टी चला रहे है!

निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझी मूलभूत नैसर्गिक श्रद्धा आहे!

(१) आपल्याकडून जाणीवपूर्वक केली जाणारी कृती ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष कृती असते. ती आपल्या जागृत मनाने संपादन केलेल्या आपल्या ज्ञानावर आधारित असते. अशा कृतीची अचूकता ही ते ज्ञान नीट समजून घेण्याच्या आपल्या जागृत मनाच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून असते. अशी कृती जागृत मनाकडून कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत केली जाते. जागृत मन म्हणजे जागे असलेले मन. झोपी गेलेले मन अशी जाणीवपूर्वक कृती करू शकत नाही. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या क्रिया या ऐच्छिक क्रिया होत. पण काही क्रिया झोपेतही अजाणतेपणे केल्या जातात. उदा. प्रतिक्षिप्त क्रिया. आपल्या अजाणतेप्रमाणे केल्या जाणाऱ्या या क्रिया आपल्या जागृत मनाच्या विश्रांती (झोप) काळात आपल्या अजागृत मनाकडून गुपचूप केल्या जातात. या क्रियांना अनैच्छिक क्रिया म्हणतात. ऐच्छिक  क्रिया आपल्या मोठ्या मेंदूकडून व अनैच्छिक क्रिया आपल्या छोट्या मेंदूकडून पार पाडल्या जातात. पण हे दोन्ही मेंदू हे एकाच मेंदूचे दोन भाग आहेत.

(२) याच विज्ञानाचा आधार घेत मी अधिक खोलात जाऊन विचार केला तेंव्हा कळले की आपल्या जागृत मनावर आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो व त्या प्रत्यक्ष  प्रभावाखालीच आपले जागृत मन जाणीवपूर्वक कृती करते व त्या कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेते. पण मग आपल्या अजागृत मनावर कोणाचा प्रभाव असतो? ते अजागृत मन आपोआप आपल्या अजाणतेपणे कसे कार्य करते? या अप्रत्यक्ष प्रभावाची आपल्या जागृत मनाला बिलकुल जाणीव नसते काय? मग आपले जागृत मन झोपेत स्वप्ने बघते, त्या स्वप्नांचा अप्रत्यक्षपणे अनुभव घेते त्याचे काय करायचे? आपल्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेला जाणीव म्हणूच नये काय?

(३) निसर्ग (निसर्ग म्हणजे पदार्थांनी बनलेली सृष्टी) ही प्रत्यक्ष अनुभव घेता येणारी गोष्ट आहे. पण मग निसर्गात असलेल्या अप्रत्यक्ष प्रभावाचे काय करायचे? त्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावाचाही अनुभव येतोच की आपल्या जागृत मनाला! या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर आपल्या जागृत मनाचे नियंत्रण आहे का? मग आपला लिखित कायदा कशाचे नियंत्रण करतोय? कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय? आपल्या समाजाच्या लिखित कायद्याने फक्त आपल्या जागृत मनाच्या प्रत्यक्ष कृतीवर ध्यान देता येते व तिचे नियंत्रण करता येते. निसर्गातील गूढ शक्तीवर, आपल्या अजागृत मनावर असलेल्या   तिच्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर व त्या अप्रत्यक्ष प्रभावाखाली आपल्या अजागृत मनाकडून केल्या जाणाऱ्या अप्रत्यक्ष कृतीवर (अनैच्छिक क्रियांवर) आपल्या लिखित कायद्याचे नियंत्रण प्रस्थापित होणे केवळ अशक्य आहे. आपल्या जागृत मनाचेच या गूढ शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण नाही तर मग आपल्या जागृत समाजमनाकडून निर्माण केल्या गेलेल्या व केल्या जात असणाऱ्या लिखित कायद्याचे अशा गूढ नैसर्गिक शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण प्रस्थापित होणे कसे शक्य आहे?

(४) म्हणून माझे हे म्हणणे आहे की, निसर्गाच्या विज्ञानाची व समाजाच्या कायद्याची जाणीव ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष जाणीव होय तर निसर्गातील गूढ शक्तीची व त्या शक्तीच्या गुप्त प्रभावाची जाणीव ही आपल्या जागृत मनाची अप्रत्यक्ष जाणीव होय. मानवी मनाच्या याच अप्रत्यक्ष जाणिवेतून निसर्गातील देवावर मानवी मनाची श्रद्धा निर्माण झाली असावी. जगात देवावर श्रद्धा ठेवणारे जे धर्म आहेत ते याच नैसर्गिक श्रद्धेवर आधारित आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. हे देवधर्म जागृत मानवी मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून आपोआप, सहज नैसर्गिकपणे निर्माण झाले असावेत असे मला वाटते. निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझ्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून निर्माण झालेली मूलभूत नैसर्गिक श्रद्धा असल्याने मी तिच्यावर ठाम आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

सरकारनामा!

पोरांनी आईबापाला विसरून कसे चालेल?

अरेरे, काय पण जमाना आलाय! पोरं आईबाप विसरू लागलीत, त्यांच्या काही चुकांवर बोट ठेऊन त्यांनी दिलेले योगदान विसरू लागली, त्यांचा चांगला इतिहास पुसू लागली. काळा चष्मा घालून आईबापाच्या चांगल्या गोष्टींवर काळे फासू लागली. भारतीय काँग्रेसच्या मुख्य माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीचे योगदान नाही, राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाही, राष्ट्राच्या वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीत प. नेहरूंचे योगदान नाही, सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचेच पण त्यांचे काही योगदान नाही, १९६५ भारत पाकिस्तान युद्धात लालबहादूर शास्त्रींचे योगदान नाही, समाजवादी व भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था विकसित करून हरित क्रांती, १९७१ भारत पाकिस्तान युद्ध, संस्थानिकांचे तनखे बंद व बँकांचे राष्ट्रीयीकरण, अॉपरेशन ब्लू स्टार मध्ये देशासाठी बलिदान केलेल्या लोहस्त्री इंदिरा गांधीचे योगदान नाही, राजीव गांधींचे संगणक क्रांतीत योगदान नाही, त्यांनी भारत श्रीलंका शांती करारात देशासाठी केलेले बलिदान व्यर्थच, नरसिंह राव यांचे उदारीकरण धोरणात योगदान नाही, मोठी जागतिक मंदी आली होती तेंव्हा भारताला आर्थिक संकटातून वाचविण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान नाही. म्हणजे काँग्रेसने देशासाठी काहीच का चांगले केले नाही! सगळे वाटोळे केले! अहो, इतिहासाची पाने फाडून किंवा डिजिटल क्रांती करताना डिलिट मारून का कधी इतिहास संपवता येतो? खोटे रेटून सांगितले म्हणजे का सत्य लपवता येते? आहात कुठे तुम्ही? जुना इतिहास पुसून टाकताय का? ज्यांनी मूलभूत पाया घालून मोठे केले त्या आईबापालाच तुम्ही विसरताय का? धन्य हो तुमची! कोपरापासून नमस्कार तुम्हाला! मतभेद टोकाचे आहेत बरं का आपल्यात! तरीही आम्ही तुमच्यावर केवळ करायची म्हणून टीका करणार नाही. चांगल्या कामाला चांगलेच म्हणणारी आम्ही माणसे! अहो, तुम्ही कितीही नावे ठेवली तरी आम्हा गरिबांना इंदिरा गांधी यांचा त्या काळात खूप आधार वाटायचा. मी तर इंदिरा गांधी यांच्या शिका व कमवा (Earn while you learn) या योजने अंतर्गत कॕनरा बँकेत अर्धवेळ नोकरी करीत कॉलेज गाठायचो व त्यांच्याच राष्ट्रीय कर्ज शिष्यवृत्ती (NLS - National Loan Scholarship) च्या जोरावर बी.कॉम. चे शिक्षण पूर्ण केलेय. तो माझा इतिहास पुसता येईल का तुम्हाला? आता काय श्रीमंतांचे दिवस आलेत. खाली मान घालून आहे त्या पगारात काम करायचे नाहीतर उद्यापासून काम बंद असे अमेरिकन स्टाईलचे हायर आणि फायरचे दिवस आलेत हो! करार पद्धतीने नोकऱ्या (कॉन्ट्रॕक्ट लेबर) मिळतात हल्ली! परमनंट नोकरी आता इतिहासजमा! किती कामगार चळवळी पाहिल्या आम्ही, पण आता कुठे ती चळवळच दिसत नाही. चळवळ कशाला साधी वळवळ सुद्धा दिसत नाही. सगळं चिडीचूप! असं का कधी जास्त दिवस चालते! असो, आपण काही चांगली कामेही करीत आहात. काश्मीरचा तो स्वतंत्र दर्जा तुम्ही रद्द केला तेंव्हा किती बरे वाटले आम्हाला! गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही फटक्यात करून दाखवले. श्रीराम मंदिराचा गहन प्रश्नही सयंमाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निकालात निघाला. आताही अटल टनेलचे उदघाटन तुम्ही  केले, बरे वाटले! पण एक सांगा या टनेलसाठी काँग्रेसने काहीच केले नव्हते का? बरं त्या नोटबंदीने व जी.एस.टी. ने काय साधलेय हे अजूनही आमच्या डोक्यात नीट शिरलेले नाही. तुमचा लॉकडाऊन मात्र खूपच कडक होता. आता तो सैल करा ना लोकल ट्रेन चालू करून. आम्ही मास्क लावून कामाला जाऊ. गेले सहा महिने जाम टरकून आम्ही अर्धपोटी आमच्या घरी सुरक्षित राहिलोय. पण आता थोडी रिस्क ही घ्यायला लागणारच ना! नाहीतर काय होईल की आम्ही घरात कोरोना पासून सुरक्षित राहू पण उपासमारीने तडफडून मरू. आमचे माय बाप सरकार आहात तुम्ही! काही चुकलं का आमचं असे स्पष्ट बोलून? अहो, भीती वाटते आम्हाला कारण शेवटी तुम्ही सरकार आहात!

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

सोपान मोरे, माझा डॕशिंग बाप!

सोपान मोरे या डॕशिंग बापाचा मुलगा आहेस तू!

शिक्षण सातवी, बलभीम नागटिळक या मामाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील  साडे खेडेगावातून मुंबईत आणलेला मुलगा, मग व्हिक्टोरिया मिलमध्ये बदली कामगार म्हणून नोकरी, चौकस बुद्धीमत्ता, वृत्तपत्रीय वाचनातून परिसर अभ्यास, स्वतःच विकसित केलेली वक्तृत्व कला, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगार पुढारी म्हणून नाव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर जवळून उठबस आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही पाठबळाशिवाय फक्त आणि फक्त स्वतःच्या हिंमतीवर, कर्तुत्वावर मिळवून एक आदरयुक्त दरारा निर्माण केलेला डॕशिंग माणूस म्हणजे माझा बाप सोपान मारूती मोरे! त्याच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस रे तू. या माझ्या बापाने कोणाची पर्वा केली नाही. जे स्वतःला पटले तेच करीत पुढे गेला. ज्यांना हे जमले नाही ते मागे राहिले, माझ्या बापाला वचकून राहिले. बाहेरच्या माणसांना ओळखून त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेऊन थोडे लांबच राहिलेल्या माझ्या बापाने नातेवाईकांना सुद्धा हातभर लांब ठेवले व एकटा स्वतःच्या रूबाबात राहून स्वतःचा आब राखून जगला माझा बाप! मग भले त्याला नातेवाईक काहीही म्हणोत. कारण कामगार पुढारी म्हणून मिळविलेले स्थान हे बापाने स्वकर्तुत्वावर मिळविले होते. कोणा नेत्यांची हाजी हाजी केली नाही की कोणा नातेवाईकाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून चिडचिड केली नाही, मग का करावी कोणाची पर्वा! संसार केला आणि जमेल तेवढे माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, पण घरात कोणाचेच अतिरेकी लाड केले नाहीत. माझी आई (चंद्रभागा सोपान मोरे) ही ढवळस गावची पूर्ण अशिक्षित, अंगठे बहाद्दर स्त्री असल्याने माझ्या बापाला कामगारांचे पुढारीपण करताना बायकोकडून जो काही थोडाफार मानसिक आधार लागतो तो पण मिळाला नाही. पण ती बिच्चारी घरात तिच्या थोरल्या बहिणी बरोबर खाणावळ घालून संसारात कष्ट उपसत होती. माझ्या बापाला कौटुंबिक जिव्हाळा होता पण त्यात अतिरेकी भावनाप्रधानता नव्हती. स्वतःच्या कुटुंबाविषयी माझ्या बापाचे हे कडक धोरण, मग दुसऱ्या  नातेवाईकांचे तर विचारूच नका. माझ्या डॕशिंग बापाच्या ओळखी मोठ्या, मग त्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी गुळाला मुंगळे जसे चिकटतात तसे हळूच चिकटलेले काही मुंगळे त्यांचा फायदा झाला की माझ्या बापाला टाटा करून गेले व विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरे काय! माझ्या बापाच्या याच खंबीला पावलावर पाऊल टाकून मी जगत आलोय. बापाचे क्षेत्र राजकीय तर कायद्याच्या उच्च शिक्षणामुळे माझे क्षेत्र वकिली! पण दोन्हीही क्षेत्रे ही सामाजिकच! माझ्या बापासारखाच माझा स्वभाव! मग कोणाची बॉसिंग मी काय सहन करून घेणार! डझनभर नोकऱ्या मी मिळविल्या पण बॉस लोकांची दादागिरी सहन झाली नाही की त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून देऊन त्यांना रामराम करीत सोडल्या.  घरात कोणीही वकील, न्यायाधीश नसताना किंवा इतर कोणत्याही मित्राचा, नातेवाईकांचा पाठिंबा नसताना हिंमतीने वकिलीत पडलो. बायको गावची बारावी शिकलेली मुलगी व गृहिणी. त्यात मुलगी झालेली. बायकोच्या नातेवाईकांनीही माझ्या या भलत्या धाडसामुळे (काहींनी याला खाता पंढरी अशी नावे ठेवली) मला त्यांच्यापासून हातभर लांब ठेवले. या  वकिलीत सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती, सगळा अंधार! त्यातून हळूहळू शिकत गेलो व गेली ३२ वर्षे वकिलीत पाय घट्ट रोवून उभा आहे. खडतर परिश्रम घेतले पण अशिलांकडून फी कशी वसूल करायची याची अक्कल नाही. मग या कोर्टातून त्या कोर्टात वणवण व सतत पैशाची चणचण! पण तरीही कसाबसा संसार केला. एकुलत्या एक मुलीला एम.बी.ए. चे उच्च शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन दिले. तिनेही स्वकर्तुत्वावर ते उच्च शिक्षण घेऊन मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदाची नोकरी मिळवली. सांगायचे तात्पर्य काय, तर माझा फक्त सातवी शिकलेला डॕशिंग बाप, हिंमत करून वकील झालेला मी स्वतः व एम.बी.ए. चे शिक्षण घेऊन व्यवस्थापक झालेली माझी मुलगी ही प्रगतीची चढती कमान आहे. हे यश कोणतेही माध्यम छापून आणणार नाही कारण तिथे माझी जरा सुद्धा पोहोच नाही. पण गरजच काय मोठ्या माध्यमात जायची. समाज माध्यम आहे ना माझ्या जवळ माझे हे सत्य सांगण्यासाठी! अरे रूबाबात जग रे, भरपूर यश मिळवलेस तू आयुष्यात!

(माझ्या हयात नसलेल्या डॕशिंग बापाचा व माझ्या हयात नसलेल्या अशिक्षित पण अत्यंत प्रेमळ असलेल्या आईचा फोटो समोर ठेऊन स्वतःच स्वतःशी केलेले हे स्वगत आहे. माझ्या बापाला वडील म्हणण्याऐवजी मी या लेखात बाप म्हटलेय कारण तो बाप माणूस होता. एका फोटोत माझा बाप राष्ट्रीय नेते श्री. पी.ए. संगमा यांच्याबरोबर खळखळून हसताना जेंव्हा मी बघतो तेंव्हा उतार वयातही (६४) मला शक्ती मिळते).

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०