https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ७ जुलै, २०२४

कायदा!

कायदा म्हणजे अडीअडचणीत, संकटात सापडलेल्या माणसालाच नव्हे तर मुक्या जनावरालाही त्याच्या नैसर्गिक अधिवासात, मार्गावर नेऊन सोडण्याची किंवा तसे मार्गदर्शन करण्याची नैसर्गिक प्रक्रिया ज्या प्रक्रियेत नैसर्गिक न्याय समाविष्ट असतो! -ॲड.बी.एस.मोरे

जीवन बोट!

आपण सर्व जीवनाच्या एकाच बोटीतून प्रवास करीत आहोत, बोटीत कोणाला कुठे उंचावर जागा मिळाली व कोणाला कुठे खाली जागा मिळाली म्हणून एकमेकांचा द्वेष करू नका, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे असतात, प्रत्येकाचे नशीब वेगळे असते, बोटीत मिळालेल्या जागेवर राहूनही मानवी जीवनाचा मनसोक्त, मनमुराद आनंद घ्या, कारण निसर्ग तुम्हाला बोटीतून कधी  उचलून समुद्रात फेकून देईल याचा नेम नाही! -ॲड.बी.एस.मोरे

पिछे मुड के देखने का नही!

पिछे मुड के देखने का नही!

एका गाण्यातून सांगितलेय की "मुड मुड के ना देख मुड मुड के" तर स्त्री या चित्रपटात सल्ला दिला गेलाय की "पिछे मुड के देखने का नही"! आणि हे खरेच आहे. तुम्ही एखादी कृती जरी नीट केलीत तरी मनात शंका येऊन तुम्ही तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघायला लागलात की ती नीट झालीच नाही असा तुमच्या मनाला भास होतो व मग तो भास खरा वाटून तुम्ही ती कृती पुन्हा पुन्हा करायला जाता. मनाला लागलेली अशी सवय म्हणजेच मंत्रचळ ज्याला इंग्रजीत आॕब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआॕर्डर (ओसीडी) म्हणतात.

जंगलात वाघ पुढे पुढे चालतो तेव्हा तो अधूनमधून मागे वळून बघतो या शंकेने की मागून कोणी जनावर हल्ला करायला तर येत नाही ना. अशी शंका, अशी काळजी वाघाला भूतकाळात आलेल्या अनुभवावर आधारित असते. अर्थात जंगलात राहणारे प्राणी काय किंवा मानवी वस्तीत राहणारी माणसे काय ही सगळीच सजीव मंडळी अनुभवातून शिकत असतात. पण अधूनमधून मागे वळून बघणे व सारखे सारखे मागे वळून बघणे यात फरक आहे.

रात्री निर्मनुष्य रस्त्यावरून चालत असताना कोणीतरी सांगितलेल्या भुताच्या कथेवरून किंवा एखाद्या हॉरर पिक्चरमध्ये बघितलेल्या सीन वरून मनात चुकूनही भुताची शंका आली व त्या शंके पोटी एखाद्या कमकुवत मनाच्या माणसाने पुन्हा पुन्हा मागे वळून बघण्यास सुरूवात केली तर त्याला हमखास पांढऱ्या कपड्यातील भुताची किंवा पांढऱ्या साडीतील हडळीची एखादी आकृती पाठलाग करीत असल्याचे दिसेल. खरं तर हा मनाचा भास असतो. पण तो भास त्यावेळी खरा वाटतो. आणि तो जर खरा वाटला तर एखादा माणूस घाबरून मरूही शकतो. इतकी ही भासाची व पुन्हा पुन्हा मागे वळून बघण्याची गोष्ट भयंकर आहे. भुताच्या त्या स्त्री चित्रपटात एक हडळ दाखवलीय व एकजण कोणाला तरी सल्ला देतो की "पिछे मुड के देखने का नही" कारण असे मागे वळून बघितले की ती हडळ स्त्री हमखास दिसायची.

मंत्रचळ हा अशा सवयीतून होतो. केलेली कृती नीट केलीय की नाही अशी मनात थोडी जरी शंका आली तरी मन तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघायला लागते व तीच कृती पुन्हा पुन्हा करायला लागते. ही गोष्ट मानवी मनाच्या अती शंकेखोर, अती चिंतातूर, अती उत्सुक किंवा अती चिकित्सक स्वभावामुळेही होऊ शकते. अती तिथे माती त्यातलाच हा प्रकार. म्हणून "पिछे मुड के देखने का नही"!

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.७.२०२४

शनिवार, ६ जुलै, २०२४

आयुष्याची उजळणी!

आयुष्याची उजळणी!

वरळी बी.डी.डी. चाळ नंबर ८४, खोली नंबर ६६, मुंबई-१८ निवास. आई, काका, मावशी, ताई, सुशा, आशा, विठ्ठल यांचेबरोबर ते राहणे. ती तबेला शाळा, ती मराठा मंदिर शाळा. ते सकाळी ६ ला दूध केंद्रावर जाऊन पत्र्याचे ओळखपत्र दाखवून निळ्या बुचाच्या (होल) व पांढऱ्या बुचाच्या (टोन) दुधाच्या काचेच्या बाटल्या रांगेत उभे राहून घरी घेऊन येणे. संध्याकाळी ४ ते ६ खालच्या माळ्यावरून वरच्या माळ्यावर हंड्याने पाणी भरणे. रेशन दुकानात लाईन लावून रेशनचे धान्य आणणे. त्यातच तो अभ्यास. दुपारी चाळी चाळीतून प्रौढ साक्षरता वर्ग घेणे. गिरणगाव व काकाचे ते पुढारपण. पुढे कॉलेज वगैरे वगैरे.

वरळीच्या घरात कसा राहिलो आणि किती आनंद घेतला यावर शब्द अपुरे पडतील. बळी, पवार भाऊजी, विनायक मामा, नामदेव मामा, डिगा मामा, संदिपान नाना व रूक्मिणी नानी आणि सैतान चौकीचा तो मारूती तुळशीराम नागटिळक. मारूतीच्या वडिलाने म्हणजे तुळशीराम नागटिळकनेच माझ्या आईवडिलांना माझे नाव बळीराम सुचवले आणि तेच नाव माझ्या आईवडिलांनी स्वीकारले. संदिपान नाना व मारूतीने मला मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर सिनेमागृहात देवानंद आणि वैजयंती माला यांचा दुनिया पिक्चर दाखवला तर मारूतीने व्हिक्टोरिया मिल शेजारील दिपक टाॕकीज मध्ये मला जितेंद्र बबीताचा फर्ज चित्रपट दाखवला. नामदेव मामा व आई अशी घरची मंडळी लालबागच्या भारतमाता टाॕकीज मध्ये जाऊन अरूण सरनाईक व जयश्री गडकर आणि दादा कोंडके व उषा चव्हाण यांचे मराठी चित्रपट बघायचो. ती वेगळीच मजा होती. आई व मावशी यांची खाणावळ, गिरणी कामगार व पोलीस हे खाणावळी, महिना संपला की खाणावळी लोकांची खाणावळ रक्कम घेऊन काकाबरोबर मधल्या नळात किंवा दादरावर वही घेऊन हिशोब करीत बसायचे. दिवाळी सण, गिरणीचा बोनस, गोड फराळ करताना होणारी आईची ती घाई. ती मजा शब्दांत वर्णन करता येत नाही. बळी व पवार भाऊजी यांचेबरोबर कधी दारातील वटणात तर कधी गच्चीवर गप्पा मारीत झोपी जाणे ही गंमत होती. आणि आणखी दोन चुलते होते. महादेव मोरे हा चुलता डोक्यावर वरळीच्या गणपतीला घ्यायचा तर इंद्रजित मोरे हा चुलता व्हिक्टोरिया मिलच्या नाटकात काम करायचा. सैतान चौकीला लक्ष्मण व प्रकाश नागटिळक यांच्या घरी भेट दिली की मागच्या दाराने महादू काकाच्या (महादेव मोरे) घरी जायचे व नानीबरोबर गप्पागोष्टी करायच्या. तर इंद्रजित तात्याच्या अंधेरीच्या घरी २६ जानेवारीला जायचे व त्यांच्या सोसायटीच्या वार्षिक पूजा कार्यक्रमात चुलत बहीण उज्वलाचे नृत्य बघायचे. ती पण एक वेगळी मजा होती.

काकांनी १९६३ ते १९६८ या दीर्घ सहा वर्षांच्या काळात आम्हाला पंढरपूरला ठेवले होते. दर महिन्याला काकांची मनीआॕर्डर यायची त्यातून आई महिन्याचा खर्च चालवायची. मावशी पंढरपूरच्या शेतात शेतमजूरी करायची व मलाही तिच्याबरोबर खुरपायला घेऊन जायची. शेताचा मालक संध्याकाळी घरी न्यायला पालेभाज्या द्यायचा. इतक्या भाज्या की खाऊन खाऊन कंटाळा यायचा. पंढरपूरला शेजारी काकाचे काका म्हणजे घाडगे काका व भागिरथी मावशी होती. पलिकडे चौकात सुंदरा मावशी व कासेगावचे शाळा मास्तर पांडुरंग नाना (पांडुरंग शंकर गायकवाड) होते. तर जुन्या पेठेत भाभाताई व भाऊजी (विजय धोंडिबा मोरे) होते. या सगळ्यांची घरे पालथी घालणे हे माझे कामच होते. या सगळ्यांचाच मी मस्तीखोर पण लाडका बाळू होतो. पंढरपूरला बळीची आई (रूक्मिणी आत्या) अधूनमधून यायची. मग तिला घेऊन तनपुरे महाराज, कैकाडी महाराज यांच्या मठात, गोपाळपूरला जायचो.

पवार भाऊजींबरोबर गोव्याची मजा एकदम खास होती. गोव्याची अनेक ठिकाणे मडगाव, पणजी, म्हापसा वगैरे पवार भाऊजीबरोबर मोटर सायकलवर फिरण्यात वेगळीच मजा होती. हॉटेलात मस्त चहा, नाष्टा व्हायचा. गोव्यात पावसाळ्यात वेगळीच मजा यायची. नंतर भाऊजी पुण्याला कासारवाडीला राहू लागले. तिथल्या लांडगे चाळीत अधूनमधून जायचो. रहदारीचा मुंबई पुणे हायवे रस्ता ओलांडून ताई बरोबर स्वच्छ पाण्याच्या नदीवर जायचो. ताई तिथे कपडे धुवायला जायची. भाऊजी, ताई व मी आम्ही तिघे पिंपरीच्या अशोक टाॕकीजला पिक्चर बघायला जायचो. आम्ही तिघांनी राजेश खन्ना, शर्मिला टागोर व राखीचा दाग चित्रपट तिथे बघितल्याचे मला आठवतेय.

वरळीच्या चाळीत बळीबरोबर राहण्याचा माझा जेवढा संबंध आला तेवढा गजानन बरोबर आला नाही. पण तरीही गजानन व माझे वय जवळजवळ सारखे असल्याने जवळीक निर्माण झालीच. गजानन बरोबर मी परांड्याला गेलो होतो. पुण्याहून परांड्याला जाताना दोघेही ट्रेनमध्ये नाचलो होतो. ती गंमत विसरणार नाही.

कोल्हापूरच्या घरी आण्णा, आक्का असल्यापासून जाणे, राहणे चालू राहिले. लग्न झाल्यावर आण्णाने आम्हा नवरा बायकोला त्यांच्या कर्नाटकातील अथनीच्या लॉजवर नेले होते. अण्णा मला खूप मानायचे तर बबनराव मला कोल्हापूरला गेलो की थिएटरमध्ये नेऊन पिक्चर दाखवायचे. २००२ साली रिलिज झालेला बिपाशा बासू, दिनू मोरिया यांचा राज हा सस्पेन्स चित्रपट कोल्हापूरला बबनराव बरोबर पाहिल्याचे आठवते. कोल्हापूरची मिसळ व कुंदा हे माझ्या आवडीचे दोन पदार्थ बबनराव हॉटेलात हमखास मागवायचे. जेव्हा जेव्हा कोल्हापूरला जायचो तेव्हा तेव्हा बबनराव, सुशा, मी, बेबीताई आम्ही मिळून बागेत फिरायला जायचो. तिथे बबनराव मस्त गाणी गायचे. ससुराल चित्रपटातील गाणी तर असायचीच. वेगळीच मजा होती ती.

नंतरच्या काळात मोहोळला सहज गेलो होतो तेव्हा भामाताई, भाऊजी (विजय मोरे) थोडे थकलेले होते तेव्हा त्यांच्या शेतावर गेलो होतो. तिथे माऊली बरोबर बैलगाडीत बसून वगैरे शेतावर मस्त फोटो काढले होते. भामाताई, भाऊजी गेले आणि त्या गोड आठवणी आता फक्त आठवणीच राहिल्यात.

मोहोळलाच धाकटी बहीण आशा हिचे सासर आहे. राजूच्या लग्नाच्या निमित्ताने तिथे शेतावर राहण्याचा योग आला. त्या लग्नातले गुलाब जामुन म्हणजे अस्सल खव्यातील गुलाब जामुन. तसले गुलाब जामुन पुन्हा नाही मिळाले खायला. भरपूर शिल्लक राहिले. मग त्यातले काही गुलाब जामुन भामाताईच्या घरी नेऊन दिले तर काही डोंबिवलीला घरी घेऊन आलो.

आयुष्याच्या अशा कितीतरी सुंदर आठवणी आहेत. त्यातल्या काही ठळक आठवणी लिहिल्या. मी, माझी बायको व माझी मुलगी या तिघांच्या छोट्या संसाराच्या गोष्टी मी जवळून जगतोय. त्यामुळे त्यांना आठवणी म्हणता येणार नाहीत. आठवणी कशाला म्हणायच्या तर ज्या गोष्टी आता पुन्हा प्रत्यक्षात जगता येणार नाहीत त्यांना. या आठवणी गोड असल्याने त्या माझ्या मनात कायम राहिल्या आहेत. जेव्हा जेव्हा मी माझ्या गेलेल्या आयुष्याची उजळणी करतो तेव्हा तेव्हा मी या आठवणीत रमतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.७.२०२४

चैतन्यशक्तीच परमेश्वर!

चैतन्यशक्तीच परमेश्वर!

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असली तरी युक्तीतही बौद्धिक शक्ती असते याचा विसर पडता कामा नये. आपण ज्या सुख व शांती या दोन गोष्टींसाठी निसर्गातील परमेश्वराला प्रार्थना करतो त्या दोन्ही गोष्टी हे शक्तीचे सुखद परिणाम आहेत. हे परिणाम साध्य करण्यासाठी शक्तीची मूलभूत आवश्यकता असते.

आपल्याला दिसणारा व हालचाल करणारा निसर्ग हा निसर्गातील अदृश्य शक्तीचा दृश्य परिणाम आहे. शक्तीच निसर्ग रूपाने प्रकट झाली आहे. अर्थात निसर्ग किंवा सृष्टीचा निर्माता नसून निर्माती आहे व ती निर्माती म्हणजे शक्ती. म्हणून शक्ती पूजनीय आहे, वंदनीय आहे व तीच परमेश्वर आहे. महात्मा गांधी "सत्य हाच परमेश्वर" असे म्हणतात. तर मी "शक्ती हाच परमेश्वर" असे म्हणतो. निसर्ग निर्मिती व हालचाली मागे अदृश्य शक्ती आहे व तीच परमेश्वर आहे. ही शक्ती अदृश्य आहे म्हणून परमेश्वर अदृश्य आहे असे म्हणता येईल. या शक्तीला निसर्गशक्ती किंवा चैतन्यशक्ती असेही म्हणता येईल.

निसर्गातील चैतन्यशक्ती अनेक रूपे घेऊन निसर्गात वावरत असते. तिला भौतिक शक्ती म्हणा, रसायनशक्ती म्हणा, प्रकाश शक्ती म्हणा, विद्युत शक्ती म्हणा, यांत्रिक शक्ती म्हणा, शारीरिक शक्ती म्हणा, मानसिक शक्ती (मनःशक्ती) म्हणा की अजून काही म्हणा ती एकच चैतन्यशक्ती आहे जी अनेक रूपात वावरते व निसर्गात सतत क्रियाशील राहते.

मानवासह संपूर्ण सृष्टीच्या उत्क्रांती मागे ही निसर्गशक्तीच आहे. या चैतन्यशक्तीचे नुसते चैतन्य असे नाव ठेवले की ती स्त्री रूपी न भासता पुरूष रूपी भासते. चैतन्यशक्तीच्या याच पुरूषी नावामुळे कदाचित स्त्री रूपी शक्तीदेवतेचे पूजन, आराधना, प्रार्थना करण्याऐवजी पुरूष रूपी परमेश्वराचे पूजन, आराधना, प्रार्थना करण्याचा प्रघात मानव समाजात पडला असावा. पण शक्तीला पुरूषी नावाने परमेश्वर म्हणा नाहीतर स्त्री नावाने निसर्गदेवता म्हणा ती संपूर्ण विश्वाला व्यापून राहिली आहे हे विज्ञानही नाकारत नाही. विज्ञान या निसर्गशक्तीकडे फक्त ऊर्जा (एनर्जी) या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघते, आध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे हाच काय तो फरक. उदाहरणार्थ, विज्ञान हे सूर्य शक्तीला सौरऊर्जा असे म्हणते तर मी या सौरऊर्जेला सूर्य शक्ती असे म्हणतो. निसर्गातील या अदृश्य असलेल्या सर्वशक्तिमान चैतन्यशक्तीलाच माणसे अनेकविध दृश्य प्रतिकांतून बघतात. वास्तविक या प्रतिकांचे आध्यात्मिक पूजन हे निसर्गातील अदृश्य महाशक्तीमान चैतन्यशक्तीचेच श्रद्धेने पूजन असते.

मी निसर्गशक्तीकडे वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही दृष्टिकोनातून बघतो व म्हणून मी आस्तिक आहे. इतर धर्मातील गॉड, अल्ला असोत की हिंदू धर्मातील अनेक देवदेवता असोत मी या सगळ्यांत निसर्गशक्ती किंवा चैतन्यशक्ती/निसर्गदेवतेलाच बघतो. या शक्तीची आराधना करणे म्हणजे या शक्तीच्या आध्यात्मिक प्रार्थनेने तिला आपल्या शरीर व मनात जागृत करण्याचा प्रयत्न करणे व तिच्या जोरावर जीवनात सुख व शांती हे दोन परिणाम साध्य करण्याचा प्रयत्न करणे. ही शक्ती कुठेतरी कमी, अपुरी पडते तेव्हाच हे परिणाम साध्य करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात असे माझे वैयक्तिक मत आहे. मनातील धैर्य, साहस, निश्चय इत्यादी शक्तीशाली गुण हे या शक्तीचेच आविष्कार होत.

ही चैतन्यशक्ती जिवंत मानवी शरीरातून

निघून गेल्यावरच माणूस मरतो. ही गोष्ट इतर सर्व सजीवांना लागू आहे. सजीव शरीरातील चैतन्यशक्ती सजीवाच्या मृत्यूनंतर निर्जीव पदार्थ जवळ करते असे मला वाटते. आता याला जर कोणी अंधश्रद्धा म्हटले तरी मला त्याची पर्वा नाही कारण मी लोकांच्या म्हणण्याऐवजी निसर्गाचा मूलभूत पाया असलेल्या निसर्गशक्ती अर्थात चैतन्यशक्ती/निसर्गदेवतेवर विश्वास ठेवतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.७.२०२४

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

धर्म व कायद्यातील फरक!

धर्म व कायद्यातील फरक!

इतर प्राणीमात्रांप्रमाणे मानवालाही मूलभूत जैविक वासना आहेत. पण या वासनांचे समाधान करण्याच्या इतर प्राणीमात्रांच्या नैसर्गिक पद्धती व मानवाच्या नैसर्गिक पद्धती यात फरक आहे व या फरकाचे नैसर्गिक कारण म्हणजे मानवाला असलेल्या कनिष्ठ तमोगुणी, मध्यम रजोगुणी व उच्च सत्वगुणी भावना व त्यासोबत असलेली उच्च बुद्धी.

आदिमानवापासून आधुनिक मानवा पर्यंतचा उत्क्रांतीचा काळ म्हणजे मानवी तमोगुण ते मानवी रजोगुण ते मानवी सत्वगुण असा गुणात्मक विकासाचा संक्रमण काळ. तमोगुण म्हणजे क्रूर गुन्हेगारी राक्षसी प्रवृत्ती. रजोगुण म्हणजे असभ्य भ्रष्टाचारी व सभ्य नैतिक यांचे मिश्रण असलेली मिश्र प्रवृत्ती. सत्वगुण म्हणजे मानवी सभ्यतेची आदर्श नैतिक प्रवृत्ती. मनुष्याचा तमोगुण म्हणजे कनिष्ठ (नीच) भावना, मनुष्याचा रजोगुण म्हणजे मध्यम भावना व मनुष्याचा सत्वगुण म्हणजे उच्च भावना.

धर्म म्हणजे अध्यात्म नसून ती मनुष्याच्या उच्च भावनेवर आधारित  असलेल्या आदर्श नैतिक प्रवृत्तीची आचार संहिता होय. जिथे सत्वगुणी धर्म नांदतो तिथे सौम्य व कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याची गरज नसते. पण जिथे अधर्म असतो म्हणजे तमोगुण व रजोगुण यांचा निवास असतो तिथे शिक्षा प्रधान कायद्याची आवश्यकता असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.७.२०२४

गुरुवार, ४ जुलै, २०२४

घरात डबके होऊन राहणे मला पसंत नाही!

घरात डबके होऊन राहणे मला पसंत नाही!

मला मुलापेक्षाही भारी मुलगी व जावई आहेत जे उच्च शिक्षित व चांगल्या आर्थिक स्थितीत आहेत. आम्हा नवरा बायकोला त्यांचा मोठा आधार आहे. मला आता घरी बसून आराम करा असे ते दोघेही म्हणतात. आम्हा नवरा बायकोला पर्यटनस्थळी जाण्यासाठी पैसे देऊ करतात. पण माझी बुद्धी व माझे शरीर नीट काम देतेय तोपर्यंत मी माझ्या आवडत्या वकिली व्यवसायाचे काम करीत राहणार व त्यातून पैसे कमवून बायकोबरोबर मजेत राहणार. जेव्हा हातपाय काम देईनासे होतील तेव्हाच विवाहित मुलीकडून अतिशय गरज पडली तरच पैसा घेणार. संघर्ष हेच माझे जीवन. नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठांसारखे जीवन जगणे मला मंजूर नाही. तसेही डॉक्टर, वकील रिटायर्ड होत नसतात जोपर्यंत त्यांचे शरीर व बुद्धी नीट काम देत असते तोपर्यंत. घरी बसून राहणे म्हणजे डबके होऊन राहणे. डबक्यावर डास तयार होतात, वाहत्या झऱ्यावर नाही, हे व. पु. काळे यांचे वाक्य माझ्या जीवनाला लागू आहे. मला झरा होऊन रहायला आवडते. नुसती संघर्षमय वकिलीच नव्हे तर दररोज लिहित असलेले माझे वैचारिक विचार हा सुद्धा माझा वाहता झरा आहे.  

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.७.२०२४