https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ जून, २०२४

आकर्षणांनी पछाडलेले मन म्हणजे अस्थिर व अशांत मन!

आकर्षणांनी पछाडलेले मन म्हणजे  कायम अस्थिर व अशांत मन!

निसर्गातील विविधतेचे कोडकौतुक जास्त नको. याच विविधतेने जगात अनेक आकर्षणे निर्माण केलीत व याच आकर्षणांच्या नादी लागून माणसांनी जगात आकर्षणांचा बाजार मांडलाय. या बाजारातील ही विविध आकर्षणे विविध माध्यमांतून मानवी मनाला सतत क्षणाक्षणाला स्पर्श करून जातात व मनाला ये ये म्हणून सतत डिवचत राहतात.

आकर्षणांच्या या मोहमायी दुनियेत जगताना आपली गरज किती व आपली ताकद किती हे माणसाने नीट ओळखूनच या आकर्षणांच्या चैनीचा नाद करावा. माणसाच्या गरजा तशा खूपच कमी आहेत. पण या विविध आकर्षणांनी माणसाच्या चैनी मात्र खूप वाढवल्या आहेत.

आकर्षणांनी पछाडलेले मन म्हणजे कायम अस्थिर व अशांत मन. अशा मनालाच आकर्षणांचा मंत्रचळ लागू शकतो. खरं तर विविध आकर्षणांनी घेरलेल्या मानवी मनापुढे सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर आकर्षणांनी विचलित न होता स्थितप्रज्ञ राहणे.

जगातील आकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत काही का असेना मला स्वतःला समजलेला आकर्षणांचा सिद्धांत या लेखात मी विस्तृतपणे कारणमीमांसेसह सांगितला आहे. जगातील इतर शहाण्या लोकांनी जवळ केलेला आकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत माझ्या या समजेच्या विपरीत असेल तर या लेखातील माझे म्हणणे वाचक मंडळी नाकारू शकतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.६.२०२४

बुधवार, १२ जून, २०२४

वैचारिक मैत्री!

वैचारिक मैत्री!

चिकित्सक असणे म्हणजे अभ्यासू असणे ज्याचा उद्देश ज्ञान प्राप्ती हाच असतो. पण ज्ञानसागर एवढा मोठा आहे की जगात कोणीही सर्वज्ञानी होऊ शकत नाही. पण तरीही तरंगलांबी (वेवलेंग्थ) जमली तर अशी चिकित्सक, अभ्यासू माणसे एकमेकांशी चांगली वैचारिक मैत्री निर्माण करू शकतात. अशी माणसे कमी असतात व ती शोधून सापडत नाहीत. योगायोगाने संपर्कात येतात. त्यामुळे वैचारिक मैत्री ही तशी दुर्मिळच. मैत्री ही एक भावना आहे. ती जाणिवेतून अनुभवायची असते जसे प्रेम हे जाणिवेतून अनुभवायचे असते. पण जग नुसत्या भावनेवर चालत नाही. जगात स्वार्थ आहे व स्वार्थावर आधारित व्यवहार आहे. निःस्वार्थी प्रेम किंवा निःस्वार्थी मैत्री ही जगातील खूप दुर्मिळ गोष्ट. प्रेम असो की मैत्री, दोन्ही बाजूंनी सूर जुळणे महत्वाचे असते. विचार हे नेहमी व्यवहाराभोवतीच घुटमळत नाहीत. ते त्याही पलिकडे जाऊन जगाच्या कल्याणाचाही विचार करतात. वैचारिक मैत्रीत वैचारिक सूर जुळणे महत्वाचे असते. जर विचारच जुळले नाहीत तर नात्यात प्रेमाची किंवा मैत्रीची भावना निर्माण होणे जवळजवळ अशक्य असे माझे वैयक्तिक मत आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.६.२०२४

मंगळवार, ११ जून, २०२४

प्रेमाची खरी कसोटी कोणत्या नात्यात?

प्रेमाची खरी कसोटी कोणत्या नात्यात?

असे कोणते नाते आहे की जिथे प्रेमाची खरी कसोटी लागते? माझ्या मते कुटुंबातील आईवडील व मुले, भाऊ बहिणी या जैविक रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची खरी कसोटी जर कोणत्या नात्यात लागत असेल तर ती जैविक रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या, परक्या कुटुंबातील असूनही विवाहाच्या माध्यमातून एकत्र येऊन आयुष्यभर एकत्र राहण्याची परीक्षा देणाऱ्या पती पत्नीच्या नात्यात. 

पती पत्नीचे नाते हेच जगातील इतर कोणत्याही नात्यापेक्षा अतिशय संवेदनशील व नाजूक नाते आहे असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. याचे मूलभूत कारण कोणते असेल तर या नात्यातील प्रेमाला चिकटलेली आगीपेक्षाही दाहक असलेली लैंगिक वासना. ही लैंगिक वासना एका मोहाच्या क्षणी आयुष्यभर जपलेल्या पती पत्नीतील प्रेमाची एका क्षणात वाट लावू शकते.

पती पत्नीच्या नात्यात याच लैंगिक वासनेशी जोडल्या गेलेल्या तीन प्रमुख गोष्टी म्हणजे प्रेम, विश्वास व चारित्र्य. या तीन गोष्टींची खरी कसोटी लागते ती लैंगिक वासनेला विवाह बंधनात मर्यादित ठेवताना. या बंधनातील फक्त एक चूक म्हणजे एका क्षणात पती पत्नीतील प्रेम, विश्वास, चारित्र्य या तीन गोष्टींच्या चिंधड्या व या नात्याला गेलेला कायमचा तडा. जसा काचेचे भांडे तडा गेल्यावर कायमचे बाद होते तसेच पती पत्नीचे नाते विवाह बाह्य लैंगिक संबंधाच्या एका मोहाच्या प्रसंगाने कायमचे बाद होते. मग मुलांच्या मायाप्रेमापोटी व जगाच्या लाजेस्तव असे पती पत्नी पुढे  संसारात मरेपर्यंत एकत्र राहिले तरी एकदा का अशा मोहाच्या प्रसंगाने हे नाते तुटले की ते कायमचे तुटलेच.

पैसा माणसांना जसा जोडतो तसा तोडतोही असे म्हणतात. पण या पैशापेक्षाही दोन जिवांना जोडणारी व तोडणारी जगातील सर्वात मोठी आव्हानात्मक गोष्ट कोणती असेल तर पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात बंदिस्त केलेली लैंगिक वासना. ही लैंगिक वासना पती पत्नीने एखाद्या मोहाच्या क्षणी बाहेर जरा जरी मोकळी केली तरी विवाहबाह्य लैंगिक संबंधाचा तो एक क्षण एका क्षणात खूप काळजीने, खूप प्रेमाने जपलेल्या पती पत्नीच्या नात्याची व त्यांच्या संसाराची राखरांगोळी करतो. म्हणून माझ्या मते, लैंगिक वासना दोघांपुरतीच मर्यादित ठेवून पती पत्नी म्हणून आयुष्यभर एकत्र राहणे हेच जगातील सर्वात मोठे आव्हान असून या आव्हानातच प्रेमाची खरी कसोटी लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.६.२०२४

HOW CAN AI HELP LAWYERS?

HOW CAN ARTIFICIAL INTELLIGENCE HELP LAWYERS?

The AI can be used by the lawyers as useful machine or tool in drafting of legal notices, agreements, deeds etc. But it should not be forgotten that AI is just a mechanical tool. It cannor act as learned and trained lawyer. It will not replace the lawyers, but it can help them like legal typist etc. But if lawyers do not adapt to this new technical tool such attitude may make such lawyers outdated.

But artificial intelligence is after all artificial meaning just mechanical. The law as applicable to living things cannot be as mechanical as applicable to non-living things. The human mind is most sensitive and most intelligent mind and law as applicable to human beings cannot be mechanical and therefore mechanical tool called AI cannot apply this law specially applicable to human beings in the same natural way as the human beings can apply. Hence, AI can never replace human human intelligence.

-©Adv.B.S.More, 12.6.2024

प्रगल्भ, परिपक्व, विकसित वृद्धत्व!

प्रगल्भ, परिपक्व, विकसित वृद्धत्व!

राजकीय मतभेद काहीही असोत पण राजकारणातील वृद्ध माणसे सोबत त्यांचे काही आजार घेऊन ज्या उमेदीने, ज्या उत्साहाने न थकता उतार वयातही सतत कार्यरत राहतात त्याला सलाम करावाच लागेल. हीच गोष्ट वृद्ध कलाकार, उद्योजक, व्यावसायिक यांचीही. एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्याकडे यांच्याइतके आर्थिक, राजकीय पाठबळ जरी नसले तरी यांच्याकडे बघितले की उतार वयात आलेली शारीरिक, मानसिक मरगळ थोडी तरी दूर होते. प्रगल्भ, परिपक्व व विकसित वृध्दत्व नैसर्गिक रीत्या कसे जगावे हे या प्रेरक वृद्धांकडून जरूर शिकावे!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.६.२०२४

समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा!

समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा!

मी परवा एक छोटीशी पोस्ट शेअर केली होती जिचा सार असा होता की गुन्हेगारांच्या मनात परमेश्वराच्या भीतीपेक्षा कायद्याची भीती घाला कारण गुन्हेगार परमेश्वराला नाही तर थोडे तरी कायद्याला घाबरतात. ही एक सरळसाधी, वास्तव पोस्ट होती. पण लगेच या पोस्टमधील गर्भितार्थ नीट समजून घेता फेसबुक वरील काही जणांनी मला "तू नास्तिक असलास तर तुझी नास्तिकता तुझ्या  जवळ ठेव" अशा अर्थाच्या काही असभ्य भाषेत अर्थहीन प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रिया देताना माझे वय काय, शिक्षण काय, अभ्यास काय याचा जराही विचार न करता या पोस्टवरून मी नास्तिक आहे असा सरळ निष्कर्ष काढून असल्या प्रतिक्रिया दिल्या.

या समाज माध्यमावर आपले विचार मांडणारे आपण सर्वजण सामान्य माणसे आहोत व त्यामुळे आपल्या सर्वांच्या वेदना, सर्वांची सुखदुःखे जवळजवळ सारखी आहेत हे प्रथम ध्यानात घ्या. आपण कोणी टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी सारख्या अती श्रीमंत उद्योजकांच्या कुटुंबात किंवा पिढीजात मोठा राजकीय वारसा असलेल्या मोठ्या राजकीय घराण्यात जन्माला आलो आहोत का? आपल्यापैकी तसे कोण असेल तर कृपया तशी स्पष्ट ओळख द्या म्हणजे मी अधिक सावध होईन. या मोठ्या लोकांच्या कळपात आपण जाऊ शकत नाही की राहू शकत नाही. आपण सर्वसामान्य माणसे एकाच जीवन बोटीतून प्रवास करीत असल्याने आपली एकमेकांना भीती वाटता कामा नये. तेव्हा मतमतांतरे काहीही असोत समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा ही नम्र विनंती.

परमेश्वर व कायदा यावरील माझी पोस्ट नीट समजून घेण्यासाठी काल दिनांक १० जून, २०२४ ची दैनिक लोकसत्तातील बातमी नीट वाचा. जम्मू काश्मीर मध्ये वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले अशी ती बातमी आहे. जम्मू काश्मिर मधील वैष्णोदेवीच्या या निष्पाप यात्रेकरूंवर असा भ्याड हल्ला करताना या दहशतवाद्यांना परमेश्वराची भीती का वाटली नाही? या गुन्हेगारांना असे भयंकर गुन्हे करताना जर परमेश्वराची भीतीच वाटणार नसेल तर मग त्यांच्या मनात मानवनिर्मित सामाजिक  कायद्याची भीती निर्माण करावी की नको?

माझ्या अशा काही स्पष्ट वक्तव्यातून मी नास्तिक आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. मी आस्तिकच आहे. मी निसर्गातील परमेश्वराला मानतो. पण त्या परमेश्वराकडे मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतो. जसा निसर्ग तसा परमेश्वर. निसर्गातील अनाकलनीय चैतन्यशक्ती हा माझा परमेश्वर. हा परमेश्वर निसर्गापासून वेगळा कसा असेल? त्याचा धर्म निसर्ग विज्ञानापासून वेगळा कसा असेल? आणि हिंदू देवदेवतांकडून आपण काय शिकायचे? कित्येक देवदेवतांच्या हातात शस्त्रे असतात ती का असतात? दुष्टांचे, अन्याय करणाऱ्यांचे निर्दालन करण्यासाठीच ना! आणि भगवद् गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले आहे? नुसती माझी आराधना, माझी पूजा, माझा धावा करीत बस असे सांगितले की हातात शस्त्र घेऊन अन्याय करणाऱ्या समोरच्या शत्रूचा नाश कर असे सांगितले. मग धार्मिक अध्यात्मात, निसर्ग विज्ञानात व सामाजिक कायद्यात काही फरक जाणवतो का? धर्म, विज्ञान, कायदा सगळं एकच आहे, निसर्ग व त्यातील परमेश्वर एकच आहे, फक्त आपली बौद्धिक समज वेगळी आहे.

समाज माध्यमावरील मित्र मैत्रिणींनो गोष्टी जरा नीट समजून घ्या व मगच एखाद्या अभ्यासू लेखकाच्या सुज्ञ लिखाणावर प्रतिक्रिया द्या. समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.६.२०२४

सोमवार, १० जून, २०२४

वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!

वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!

वृद्धत्व म्हणजे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत जाण्याचा अर्थात जीवनाकडून मृत्यूकडे जाण्याचा वेदनादायक प्रवास अर्थात जीवनाचे जहाज खोल समुद्रात बुडतानाची व्याकूळ अवस्था. वृद्धापकाळ हा अनिवार्य परिवर्तनाचा काळ ज्यात सजीव माणसाचे रूपांतर/परिवर्तन निर्जीव मृत शरीरात होते.

या परिवर्तनाच्या काळात माणसाची पुनर्निर्माणाची ताकद संपलेली असते. पुनर्निर्माणात नुसत्या लैंगिक पुनरूत्पादनाचा भाग नसतो तर इतर पदार्थीय उत्पादने काढण्याचाही भाग असतो. पुनर्निर्माणाची ताकद संपल्याने उत्पादन प्रक्रिया थांबलेली असते. जर उत्पादनच नाही तर मग देवाणघेवाणीचा व्यापार कुठून असणार? पुनर्निर्माण/उत्पादन व देवाणघेवाण/व्यापार या दोन्ही गोष्टी उतार वयातील वृद्ध माणसाकडून होत नाहीत कारण दोन्हीची ताकदच उतार वयात संपलेली असते. 

वृद्धापकाळात माणसाला सतत सक्रिय ठेवणाऱ्या पुनर्निर्माण व देवाणघेवाण प्रक्रिया एकीकडून थांबलेल्या असतात तर दुसरीकडून माणसाच्या परिवर्तनाची म्हणजे माणसाला जीवनाकडून मृत्यूकडे नेण्याची प्रक्रिया मात्र जोरात किंवा दमदार पावलाने चालू असते. वृद्ध माणसाची ही अवस्था ना घरका ना घाटका अशी असते. ही अवस्था म्हणजे निसर्गाने माणसांसह सर्व सजीवांवर हुकूमशाहीने लादलेली अनिवार्य निवृत्ती असते. 

पण वय लांबलेली म्हणजे फक्त सत्तरी नव्हे तर अगदी नव्वदी पार केलेली काही वृद्ध माणसे मात्र उतार वयातही सक्रिय असताना दिसतात. त्यांची मानसिक, बौद्धिक ताकद जोरात काम करीत असते पण तरीही त्यांची शारीरिक ताकद तरूणपणासारखी राहिलेली नसते. पण हातात भरपूर पैसा व सत्ता असली की त्या बाह्य पाठबळाच्या जोरावर ही असाधारण विशेष वृद्ध माणसे सर्वसामान्य वृद्ध माणसांपेक्षा जास्त सक्रिय असलेली दिसतात. पण ही असाधारण माणसे म्हणजे नियम नव्हे. या विशेष वृद्ध माणसांकडे इतर सामान्य वृद्धांनी अपवाद म्हणूनच बघितले पाहिजे. सामान्य वृद्धांनी असाधारण वृद्धांची नकल करण्याचा प्रयत्न करू नये. एकंदरीत काय वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.६.२०२४