https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

मृत्यू शुभेच्छा!

मृत्यू शुभेच्छा!

जमल्यास/शक्यअसेल तरच आतापासूनच जे जे मनात आल्यास ते ते कर्म पूर्ण करावेत. I Wish you best of luck for your death. तुम्हास आतापासूनच शुभेच्छा ह्याकरीता देत आहे कारण की तुम्ही देवाघरी गेल्यानंतर तुम्हास मनापासून शुभेच्छां देता येणार नाही. मेल्यावर मला लक्षात ठेवाल असे म्हणणार नाही कारण की, मृत्यूनंतर आपले काय होते ते मला माहीत नाही. असो सरजी, आपला आजचा दिवस व तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्या जीवनातील तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा राहो, हीच माझी सदिच्छा. आपला पुढील प्रवास सुखाचा व आनंदाचा राहो.

-एक मित्र

हार्ट ब्लॉक!

मित्रा, तसे काही सिरिएस नाही. फक्त उपयोग होत नसल्याने होमोपॕथी औषधे बंद करून टाकली. तसेही औषधांचे बरेच मेडिकल घोटाळे चालू आहेत दररोज आणि आता डॉक्टरही पूर्वीसारखे राहिले नाहीत. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे झालेत काही तुरळक अपवाद सोडता. निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने प्रत्येक माणसाला त्याने नैसर्गिक बुद्धी दिलेली असते. पण तिचा लोक नीट उपयोगच करीत नाहीत. तथाकथित तज्ज्ञ लोक घाबरवून सोडतात. मला तर कार्डिओलॉजिस्टस डॉक्टरांनी पेसमेकर बसवा नाहीतर चक्कर येऊन डोक्यावर पडाल, पायावर पडाल असे सांगितले. मी कसला खमक्या माणूस आहे हे त्यांना माहित नव्हते. पेसमेकर नाही बसवला तर मरणार ना मी, अहो डॉक्टर मी त्याचीच तर आतुरतेने वाट बघतोय. तुम्ही जे काय आता मला सांगितलेय त्याची फी घ्या आणि तुम्हाला सांगतो मेलो तरी पेसमेकर नाही बसवणार. ते होमोपॕथी डॉक्टर स्वतःच काहीतरी द्रवपदार्थ मिक्स करून मला त्यांनी बनवलेली औषधे देत होते. मी त्यांना म्हटले की तुमच्या या औषधांचे घटक मला कळत नाहीत. उगाच होत्याचे नव्हते होऊन जायचे. तेव्हा बाहेरची होमोपॕथी औषधे लिहून द्या. त्यांनी नाही म्हणून सांगितले. मग मीही मला आता तुमची औषधे घ्यायची नाहीत व तुमच्याशी बोलायचेही नाही असे सांगून त्यांना रामराम केला. आता कोणीही मोठा डॉक्टर असो त्याच्या नादी लागायचे नाही असे ठरवलेय. केईएम हॉस्पिटलमच्या दोन गोळ्या एक रक्त पातळ करण्याची व दुसरी कोलेस्ट्राल कंट्रोलची घेत राहणार. खरं या दोन्ही गोळ्यांचा हृदयाचा विद्युत प्रवाह खंडित करणाऱ्या माझ्या हार्ट ब्लॉकवर काही उपयोग नाही. या गोळ्या हृदयात ब्लॉकेजेस होऊ नयेत म्हणून आहेत. ब्लॉक असू दे. त्याला मी माझ्या पद्धतीने सहन करीन. पण आणखी हे ब्लॉकेजेस नकोत म्हणून या एकदम स्वस्तातल्या दोन गोळ्या घेत आहे. मस्त रूबाबात ६७ वर्षाचे आयुष्य जगलोय. आता आणखी कशाला जास्त जगण्याची हौस? जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही हे राजेश खन्नाचे आनंद चित्रपटातील वाक्य माझे एकदम आवडते वाक्य. या व्हॉटसॲप वगैरे समाज माध्यमांचा तसा काही उपयोग नाही. फोनवरून बोलत जाईन तुझ्याशी व जमलेच तर कल्याणला तुझ्या घरी येऊन तुझी भेट घेईन.👍 -बाळू मित्र

सोमवार, १ एप्रिल, २०२४

किचकट जीवन, कासावीस मन!

किचकट जीवन, कासावीस मन!

सृष्टीची रचनाच मुळात किचकट गुंतागुंतीची. तिचा मुळापासून अभ्यास करीत तिच्या शेपटाला येऊन पोहोचायचे ज्या शेपटीत सृष्टी रचनेत उत्क्रांत झालेल्या माणसाची पैदास वळवळ करताना दिसते. या वळवळीचा व सृष्टीच्या मुळाचा संबंध अभ्यासायचा. हा शैक्षणिक अभ्यास ज्याला ज्ञानप्राप्ती म्हणतात तो असतो अनाकलनीय सृष्टी निर्मात्याचा मानवी मनावरील बलात्कार. या प्रदीर्घ अभ्यासातून मिळवलेल्या ज्ञानाची आयुष्यभर उजळणी, सराव करीत रहाण्याची जबरदस्ती हा असतो त्या सृष्टी निर्मात्याचा मानवी शरीर मनावरील अत्याचार. किड्या मुंग्यासारखी माणसे सृष्टी रचनेच्या या शेपटीत जन्माला येतात, हा बलात्कार व अत्याचार सहन करीत वळवळ करतात आणि शेवटी मरतात. हे सहन करावेच लागते कारण हे भोग किचकट सृष्टी निर्माण करणाऱ्या सृष्टी निर्मात्याने माणसांवर लादले आहेत. तरीही काहींना हे असले बलात्कारी, अत्याचारी जीवन सोडता सोडवत नाही. मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांचा जीव कासावीस होतो. परंतु ही तर मृत्यू समयीची अवस्था झाली मानवी मनाची. पण संपूर्ण आयुष्यभर वळवळ करणारा माणूस खरंच त्याच्या वळवळीतून सुखी असतो का? त्याला या वळवळीतून खरंच शांती मिळते का? या भौतिक वळवळीला कारणीभूत असलेल्या परमेश्वराला (सृष्टी निर्मात्याला) आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघून का कधी आध्यात्मिक शांती मिळते? हे माझे वैज्ञानिक वास्तवावर आधारित वैयक्तिक भाष्य आहे. ते सर्वांना पटेलच असे नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २.४.२०२४

नाती जपली पाहिजेत!

नाती जपली पाहिजेत!

या मोबाईल, व्हॉटसॲप, फेसबुक मुळे नातेवाईक मंडळी दुरावली आणि ज्यांचा प्रत्यक्षात काहीही उपयोग नाही अशा अनोळखी लोकांचा भरणा आयुष्यात झाला. माझ्या पुतण्यासाठी लग्नस्थळे जमविण्याच्या निमित्ताने हवेने भुगलेला माझा आॕनलाईन फुगा, भ्रमाचा भोपळा फुटला आणि नातेवाईक मंडळींचे महत्व अधोरेखित झाले. -बाळू

मी माझा पुतण्या सिद्धीसाठी माझ्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले वधुवर सुचक मंडळांचे सर्व अॕप्स डिलिट केले. सगळी आॕनलाईन फालतूगिरी चाललीय या ॲप्सवर. कुठून हे असले दिवस बघायची वेळ आली खरंच वैतागलो. आता पुण्याची नातेवाईक मंडळी म्हणजे पवार भाऊजी, रमेश, हेमा, कांचन, बळी, गजानन, मोहोळचा शिवा, मोहोळ येथील सिद्धीच्या आजोळची मंडळी, बदलापूरची आशा, वसंतराव, राजू, बंटी, कोल्हापूरची सुशा, सोनी, दिपू, रवि, जमलेच तर वांगणीची नानी, मगराच्या वाडीची नानी व स्वतः मी या नातेवाईक मंडळी शिवाय मला तरी आता कोणता मार्ग दिसत नाही सिद्धीला मुलगी (वधू) बघण्यासाठी. -बाळू

रविवार, ३१ मार्च, २०२४

यशाचे गुपीत!

यशाचे गुपीत!

या जगात यशस्वी माणूस कधी खरे ज्ञान देत नाही व खरे ज्ञान देणारा माणूस कधी यशस्वी होत नाही. वरवरची माहिती देणारे भरपूर भेटतील पण त्या माहितीतला सार कोण देणार नाही. सार वाटत बसले तर यश कसे मिळणार? उद्योग, धंदा किंवा व्यवसायातील व्यवहार ज्ञान म्हणजे व्यापारी गुपीत. भांडवलदार लोक त्यांची व्यापारी गुपिते वाटत फिरत नाहीत. भांडवल म्हणजे नुसता पैसा, संपत्ती नव्हे तर ज्ञानही. मूर्ख लोक यशाची गुपिते गुप्त ठेवणाऱ्या धूर्त भांडवलदार लोकांच्या कंपूचे पाय चाटण्यात आयुष्य घालवतील पण खरे ज्ञान देणाऱ्या प्रामाणिक ज्ञानी माणसाला कधी किंमत देणार नाहीत. खरं तर असे ज्ञान फुकटात वाटत बसणाऱ्या माणसाला या जगात मूर्ख माणूस असे म्हणतात!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४

मुलांचे यश आणि आईबापांचा बडेजाव!

मुलांचे यश आणि आईबापांचा बडेजाव!

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या यशाचा आनंद होणे हे नैसर्गिक आहे. परंतु आपण मनुष्य  जन्म घेऊन आपण स्वतः आपल्या आयुष्यात काय कर्तुत्व गाजवले याकडे न बघता नुसत्या मुलांच्या यशाची टिमकी वाजवत फिरणे हे मला तरी पटत नाही. मी इतरांच्या अनुभवावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून बोलतो, लिहितो.

मीही बी.कॉम. (आॕनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी एवढे उच्च शिक्षण घेतलेय. परंतु उपयोग काय? या एवढ्या मोठ्या शिक्षणाचा ५% भाग सुद्धा मी माझ्या गेल्या ३६ वर्षांच्या वकिलीत वापरू शकलो नाही. अर्थात माझ्या शिक्षणाच्या मानाने मी ५% एवढेही यश माझ्या आयुष्यात मिळवू शकलो नाही. पण याच्या उलट माझी उच्च शिक्षित मुलगी व माझा उच्च शिक्षित जावई या दोघांनी थोड्याच काळात जगात व्यवहारी बनून या अल्प काळातच एवढे मोठे यश मिळवलेय की त्या यशाच्या ५% एवढेही यश मी माझ्या अख्ख्या आयुष्यात (६७ वर्षाच्या आयुष्यात) मिळवू शकलो नाही. मग मी काय माझ्या मुलीच्या व जावयाच्या यशाची टिमकी वाजवत गावभर फिरावे? मी स्वतः अयशस्वी वकील आहे हे तर जगजाहीर आहे आणि तरीही स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी मी माझ्या मुलीच्या व माझ्या जावयाच्या यशाची टिमकी वाजवत गावभर फिरू? हसतील ना लोक माझ्या या वेडेपणाला आणि हो असे करताना माझी मला स्वतःलाच लाज वाटेल त्याचे काय?

हेच कारण आहे की मी माझी पत्नी, माझी मुलगी व माझा जावई यांच्या सोबतचे कौटुंबिक फोटो समाज माध्यमावर टाकत नाही. तो आनंद फक्त स्वतःपुरताच, इतरांना काय पडलेय त्याचे? मी समाज माध्यमात फक्त माझे स्वतःचे अनुभव व विचार लिहितो. पण त्यालाही काही अर्थ राहिला नाही. अपयशी माणसाचे अनुभव व विचार वास्तव असले तरी लोकांना त्याची काहीही किंमत नसते व ती अपेक्षा करणेही चुकीचे. असो, यशाच्या धुंदीत जगणे सहज सोपे असते पण अपयश पचवून जगणे महाकठीण असते. माझ्या मनाला कसा आवर घालावा? ते गप्प बसत नाही. सारखे व्यक्त होत राहते. ही खरं तर माझी निरर्थक बडबड आहे. लोकांपासून अलिप्त राहू का मी? माझे बोलणे, लिहिणे बंद करू का मी? अशाप्रकारे मौन बाळगणे यालाच अध्यात्म म्हणू का मी?

-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४

आम्रपाली!

आम्रपाली!

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम मानले गेले. स्त्रियांना तर प्रगत देशातही मतदानाचा अधिकार नव्हता. पती परमेश्वर कल्पनेवर आधारित सतीची परंपरा घालवण्यासाठी राजा राममनोहर राय या समाज सुधारकाला संघर्ष करावा लागला. राजकारणात स्त्रियांना किती टक्के आरक्षण द्यायचे यावर वादविवाद झाले. स्त्री पुरूष समानतेचे कायदे येण्यासाठी हजारो वर्षे जावी लागली. पण अजूनही स्त्री कडे भोगवस्तू म्हणून बघण्याची काही पुरूषांची सडकी मनोवृत्ती कायम आहे. आम्रपाली हा हिंदी चित्रपट छान आहे. आम्रपाली या वैशाली नगरातील वेश्येची (नगर वधूची) कथा ही तर हृदयाला पीळ पाडणारी आहे. कान्होपात्रा ही सुद्धा वेश्या होती. पण तिला श्रीविठ्ठल पांडुरंगाने त्याच्या हृदयात स्थान दिले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात याच कान्होपात्रेचे छोटेसे मंदिर आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४