https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ७ मार्च, २०२४

निसर्ग सृष्टीतील व्यवस्था!

निसर्ग सृष्टी व तिच्या कायदेशीर व्यवस्था!

निसर्ग सृष्टीत विविध प्रकारचे निर्जीव व सजीव पदार्थ जसजसे उत्क्रांत होत गेले तसतशी त्यांच्या अंतर्गत नैसर्गिक देवाणघेवाणीची कायदेशीर व्यवस्था तिच्यातील गुणदोषांसह उत्क्रांत होत गेली असावी व तशाच पद्धतीने निसर्ग सृष्टीत माणूस उत्क्रांत झाल्यानंतर माणसांच्या अंतर्गत सामाजिक देवाणघेवाणीची कायदेशीर व्यवस्था तिच्यातील गुणदोषांसह उत्क्रांत होत गेली असावी. या दोन्ही व्यवस्था त्यांच्यातील गुणदोषांसह आता पुढे सरकल्याने त्यांना मागे घेता येत नाही. फार तर त्यांच्यातील दोष जमेल तेवढे कमी करून या दोन्ही  व्यवस्थांमध्ये थोडीफार सुधारणा करीत पुढे जाणे एवढेच उत्क्रांत झालेल्या मानवी बुद्धीला शक्य आहे. पदार्थांची निसर्ग सृष्टी व या सृष्टी मधील या दोन्ही व्यवस्था अशाच आपोआप निर्माण झाल्या की या गोष्टी परमेश्वर नावाच्या गूढ निसर्ग शक्तीने निर्माण केल्या याविषयी नास्तिक व आस्तिक लोकांत वाद आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.३.२०२४

शुक्रवार, १ मार्च, २०२४

BE SELECTIVE!

BE NARROW MINDED AND SELECTIVE IN SELFISH WORLD!

In the world surrounded by parasites & selfish people, do not be so broad minded to become friend of every matter & every person you come across in your life. Be narrow minded, be choosy, be selective only with few things and few persons matching or at least near matching to your high rich quality & high standard mindset by coming down to quality from quantity. Remember the quality response comes only from quality things and quality people. God is one of such high powered high quality friend even if unreacheable & unseen who constantly through higher conscience and higher intelligence of human mind helps quality person in recognising as to what is right and what is wrong, who is friend and who is enemy and what are means of interacting with friends and weapons of fighting against enemies and what are right steps in right direction!

-©Adv.B.S.More, 2.3.2024

प्रयत्नांती परमेश्वर!

प्रयत्नांती परमेश्वर!

फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा हा गीतेचा सिद्धांत नीट समजून घेतला पाहिजे. याचा गर्भितार्थ असा आहे की योग्य ठिकाणी प्रयत्न केले नाहीत तर ते वाया जातात, मग त्या प्रयत्नांचे फळ कसले मिळणार व प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीची तरी कशी प्रचिती येणार?

हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. तसेही मी इतरांचे अनुभव स्वतःचे ज्ञान म्हणून सांगायला भितो व स्वतःच्या अनुभवातूनच बोलतो, लिहितो. आता प्रयत्नांविषयी नीट सांगतो. गरीब, अशक्त, असहाय्य माणसांसाठी प्रयत्नांचे पर्याय खूप कमी असतात. अशी माणसे आहे त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांतच चाचपडत असतात. एक सामान्य माणूस म्हणून असाच चाचपडणारा मीही एक.

धनिक, महाधनिक लोकांचे प्रयत्न भराभर फळाला कारण त्यांना पर्याय भरपूर असतात. पैसा व सत्ता या दोन गोष्टी हातात हात घालून प्रयत्नांचा धुव्वा उडवून देतात आणि मग काय घ्या फळेच फळे! आमच्या सारख्या गरीब माणसांच्या हातात त्या महान परमेश्वराने दोनच गोष्टी ठेवल्यात. एक म्हणजे आहे त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांत जीव ओतून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत चाचपडत बसायचे व या फाटक्या प्रयत्नांना यश दे, फळ दे म्हणून देवाची प्रार्थना करायची.

आम्ही गरीब तुपाच्या गाडग्यात हात घालायचे सोडा करंगळी बुडवायला पण घाबरतो. हे वाक्य गरिबांसाठी चालवलेल्या माझ्या कायदा सहाय्य केंद्रात येऊन मला एकाने बोलून दाखवले व अहो तुपाच्या गाडग्यात निदान करंगळी तरी बुडवा म्हणून सल्ला दिला. पण मला शेवटपर्यंत ती करंगळी काही तुपाच्या गाडग्यात बुडवता आली नाही. त्यातून मी किती मूर्ख वकील आहे हे सिद्ध केले. अहो माझ्या रक्तातच ती वकिली नाही. तसेही आम्हाला लबाडी, भ्रष्टाचार किंवा दांडगाई जमत नाही त्याला आम्ही काय करणार? ही कामे भ्रष्टाचारी व गुंडपुंड लोकांसाठी राखीव आहेत. आम्ही या दोन्ही गोष्टीं पासून फार लांब आहोत. त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांशी चाचपडत आम्ही जे काही प्रयत्न करतो ते प्रामाणिक असतात व त्यातून त्या महान परमेश्वर शक्ती कडून आम्हाला जे काही थोडेफार, तुटपुंजे फळ मिळते त्यात देवाचे नाव घेऊन आम्ही समाधानी असतो.

आता माझ्या वकिलीचेच उदाहरण घ्या ना. कायद्याचे ज्ञान सखोल घेतले. म्हणून तर मोठे उद्योगपती, मोठे व्यापारी यांनी मला कायदा सल्लागार पद बहाल करून जवळ केले. पण फी मात्र ते ठरवतील ती तुटपुंजी. शेवटी जगणे व वकिलीत टिकणे हे मला महत्त्वाचे असल्याने खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी हा अट्टाहास सोडून दिला व म्हणून समाधानी राहिलो. अहो पण, तसे समाधानी राहण्याशिवाय पर्यायच नव्हता ना मला!

आता उतार वयातही तीच समाधानी वकिली करतोय. हृदयविकार घेऊन डोंबिवलीहून मुंबईला दररोज प्रवास करतोय व जरी वयाने, ज्ञानाने ज्येष्ठ वकील झालो तरी त्या पूर्वीच्याच कमी फी मध्ये संध्याकाळची एका तासाची वकिली करतोय. त्यात समाधानी राहतोय. मोठ्या कंपनीचा कायदा सल्लागार असून तरी काय मोठा दिवा लावतोय? आमच्या त्या म्हाडा गिरणी कामगार लॉटरी घराचे साधे काम मला तडीला नेता येईना. आम्हा गरीब वारसांच्या छोट्या व लांबच्या घराला कर्ज देऊन धनिक लोक कशाला त्यांचे पैसे गुंतवतील?

पण मी मात्र चिकट आहे व म्हणून अधूनमधून नेटाने प्रयत्न करतो ज्या प्रयत्नांकडे मोठ्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. याचे कारण काय तर असल्या छोट्या व्यवहारात त्या मोठ्या धनिक लोकांना काही रस नसतो कारण त्यात त्यांचा मोठा फायदा नसतो. असो, तरीही प्रयत्न करीत राहणार कारण प्रयत्नांती परमेश्वर!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.३.२०२४

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना!

मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना!

दैनंदिन जीवनात व निसर्गसृष्टीत आपोआप होणाऱ्या काही गोष्टी  अनैच्छिक असतात. त्या विचार करण्यासाठी नसतात कारण त्यावर मानवी मेंदूमनाचे नव्हे तर निसर्गाचे प्रत्यक्ष नियंत्रण असते जे मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर असते.

मानवी मेंदूमन ऐच्छिक कृतीसाठी विचार करते जो विचार नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतो. ऐच्छिक गोष्टींपैकी काही गोष्टी तात्पुरत्या अल्पकालीन ऐच्छिक कृतीसाठी असतात ज्यावर मेंदूमनाने वरवर तात्पुरता विचार करायचा असतो. त्यावर सखोल विचार करणे चुकीचे. पण काही ऐच्छिक गोष्टींवर मात्र मेंदूमनाला सखोल विचार करावा लागतो. अशा सागोष्टी दीर्घकालीन योजनाबद्ध ऐच्छिक कृतीसाठी असतात.

मानवी मेंदूमनाच्या विचार प्रक्रियेत वरील तीन गोष्टींची गल्लत करणे, त्यांची एकमेकांत भेळमिसळ करणे चुकीचे.

मानवी मेंदूमनाच्या वरील विचार प्रक्रियेतून वैद्यक शास्त्राच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येईल की काही सामान्य आजार तात्पुरत्या अल्पकालीन ऐच्छिक वैद्यकीय कृतीसाठी असतात जे नुसत्या औषधांनी बरे होतात तर काही गंभीर आजार दीर्घकालीन सखोल वैचारिक ऐच्छिक वैद्यकीय कृतीसाठी असतात ज्यांना औषधांबरोबर सर्जिकल ट्रिटमेंटची गरज पडू शकते.

मानवी मेंदूमनाच्या वरील विचार प्रक्रियेतून समाजशास्त्र व तसेच सामाजिक कायद्याच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येईल की माणसांनी माणसांवर केलेल्या काही सामान्य अन्यायांचे निरसन सामाजिक कायद्याचा सामान्य विचार करणाऱ्या शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेच्या पातळीवर करता येते तर काही गंभीर सामाजिक अन्यायांचे निरसन सामाजिक कायद्याचा सखोल विचार करणाऱ्या शासनाचा स्वतंत्र भाग असलेल्या न्याय यंत्रणेच्या पातळीवर करता येते.

वरील विश्लेषणातून मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना थोडक्यात सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.२.२०२४

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

संसार करावा नेटका!

संसार करावा नेटका!

पती, पत्नी व मुले यांच्या कौटुंबिक नात्यातील भावनिक व व्यावहारिक नात्याचे वास्तव फार उच्च दर्जाचे उदात्त आहे. वकील म्हणून मी पती पत्नीच्या केसेस मध्ये जास्तीतजास्त तडजोडीची भूमिका घेत आलोय. घटस्फोट ही मुलांसाठी भयंकर शिक्षा असते. मुलांनी सांगितलेले नसते त्यांना जन्माला घाला म्हणून. मुलांचा त्यात काय दोष? मुलांना जन्माला घालण्यापूर्वी अगोदर पती पत्नी दोघांनीही ते दोघे मुलांची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडण्यासाठी मानसिक व आर्थिकदृष्ट्या समंजस व सक्षम आहेत का याचा सुज्ञपणे विचार केला पाहिजे. पती व पत्नी दोघेही उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या दोघेही कमावते व विशेष करून दोघेही करियर मांइडेड असल्यास त्यांनी तर याबाबतीत एकत्र बसून नीट विचार करूनच मुलाला किंवा मुलांना जन्म द्यायचा की नाही याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. विवाह व संसार हा काही खेळ नाही की मनात आले की खेळ मांडला व मनात आले की खेळ मोडला. जीवनशैली कितीही आधुनिक होवो, वैवाहिक बंधन हे खूप जबाबदारीचे बंधन असते. हे बंधन नको असलेले स्त्री पुरूष लिव इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. मनात येईल तेव्हा एकत्र या व मनात येईल तेव्हा सोडून द्या असला विचित्र प्रकार. हे कसले स्वातंत्र्य? विवाह संस्था टिकली पाहिजे. समाजात तिचे महत्व खूप मोठे आहे. संसारात एकत्र राहता न येणारी माणसे देशाची एकता काय सांभाळणार? देश हे सुद्धा एक मोठे कुटुंब आहे. करियर वगैरे स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी पती किंवा पत्नीने कोणीच मुलांच्या जीवनाशी खेळू नये. संसार म्हटला की कोणावरही विशेष करून जन्माला घातलेल्या मुलांवर अन्याय होऊ न देणाऱ्या तडजोडी पती व पत्नी दोघांनाही कराव्या लागतात याचे भान विवाह बंधनात पडू इच्छिणाऱ्या स्त्री व पुरूष दोघांनाही असलेच पाहिजे. म्हणून केवळ विवाहोत्तर कौटुंबिक वादात नव्हे तर विवाहपूर्व निर्णय प्रक्रियेत सुद्धा विवाहोच्छुक स्त्री पुरूषांच्या समुपदेशनाची गरज आहे.

संसार करावा नेटका. संसारासारखे दुसरे सुख जगात नाही. विवाह बंधनात राहून एकमेकांना समजून घेत, एकमेकांना आधार देत मुलांची संयुक्त जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षण देणे, त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा फार मोठा सांसारिक आनंद आहे. त्यासाठी पती व पत्नी दोघांनीही करियर व संसार यांची सांगड घालत संतुलित तडजोडी कराव्यात व संसार नेटका, यशस्वी करावा. करियर मधील यशापेक्षा हे यश कितीतरी मोठे आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.२.२०२४


ताणमुक्ती म्हणजे संन्यास!

ताणमुक्ती म्हणजे संन्यास!

पुराव्याने सिद्ध झालेल्या व त्यामुळे मेंदूने वास्तव म्हणून स्वीकारलेल्या निसर्गाच्या गोष्टी म्हणजे विज्ञान. निसर्ग व विज्ञानाचा निर्माता म्हणून परमेश्वर नावाची एक अलौकिक ईश्वरी शक्ती निसर्ग व विज्ञानाच्या मुळाशी आहे असे मानवी मेंदूमनाने एकदा का गृहीत धरले की असे मेंदूमन परमेश्वराचा विचार करते. इतकेच नव्हे तर त्याला शरण जाऊन त्याची भक्ती, प्रार्थना करते. परमेश्वर किंवा ईश्वरी शक्ती कदाचित वास्तव असेल किंवा कदाचित वास्तव नसेलही अशी रास्त शंका मानवी मेंदूमनात येऊ शकते कारण परमेश्वर ही पुराव्याने सिद्ध करता न आलेली व सिद्ध करता न येणारी गोष्ट आहे व म्हणून ती अनाकलनीय गोष्ट आहे. त्यामुळे परमेश्वराला मानायचे की नाही आणि मानलेच तरी त्याचे भक्तीभावाचे अध्यात्म किती व कसे करायचे हा प्रत्येकाच्या मेंदूमनाचा प्रश्न आहे. या प्रश्नात समाजाचा आस्तिक धर्म लुडबूड करतो तेव्हा हा वैयक्तिक प्रश्न सामाजिक पातळी वर येऊन गंभीर होतो. इतका गंभीर की परमेश्वर व त्याच्या धर्माच्या नावाने हिंसा घडतात, रक्तपात होतो. खरं तर या वैयक्तिक निर्णय प्रक्रियेत समाजाने किंवा सरकारने लुडबूड करू नये. एखाद्याने नास्तिक म्हणून जगायचे व नास्तिक म्हणून मरायचे ठरवले तर अशा नास्तिक व्यक्तीने आस्तिकांच्या आध्यात्मिक भक्ती भावनेला दुखवू नये. तसेच आस्तिक लोकांनीही नास्तिकांच्या स्वतंत्र विचाराची खिल्ली उडवू नये. हा सुज्ञ विचार नास्तिक व आस्तिक दोन्ही समाज गटांकडून व्हायला हवा. खरं तर पुराव्याने सिद्ध करता न येणारा अनाकलनीय परमेश्वर, त्याचे भक्ती भावाचे अध्यात्म व त्याच्या विषयी निर्माण झालेला आस्तिक-नास्तिक वाद या गोष्टींना निव्वळ भावनिक प्रतिसाद दिल्यास मेंदूमनात ताण निर्माण होतो. असा ताण मेंदूमनात निर्माण होऊ नये म्हणून धार्मिक, आध्यात्मिक गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टीने व तर्कशुद्ध बुद्धीने बघितले पाहिजे. हा प्रतिसादाचा भाग झाला. परमेश्वराच्या अध्यात्मालाच काय पण निसर्गाच्या विज्ञानालाही तुम्ही किती आणि कसा प्रतिसाद देता यावर तुमचे मानसिक आरोग्य बरेच अवलंबून असते. निसर्गाचे विज्ञान असो की परमेश्वराचे अध्यात्म या गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त राहता येत नाही, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करता येत नाही, त्यांना पूर्णपणे टाळता येत नाही, त्यांच्यापासून पूर्ण मुक्ती किंवा संन्यास घेता येत नाही. पण त्यांना जास्त डोक्यावर घेतले की डोक्यावर ओझे वाढते. म्हणून मेंदूमनावरील त्यांचे ओझे कमी करून त्यांच्या ताणापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. निसर्गाचे विज्ञान असो की परमेश्वरी अध्यात्म यांचे डोक्यावर (मेंदूवर) ओझे कधी निर्माण होते जेव्हा या गोष्टींना अती महत्व देऊन त्यांना जास्त डोक्यावर घेतले जाते तेव्हा. अर्थात या गोष्टींना जास्त प्रतिसाद दिल्यानेच त्यांचे ओझे मेंदूमनावर निर्माण होते व त्या ओझ्याचा ताण मेंदूमनावर वाढतो. खरं तर विज्ञान असो की अध्यात्म या गोष्टींना जेवढ्यास तेवढे महत्व व जेवढ्यास तेवढा प्रतिसाद दिल्यास मेंदूमनावर या गोष्टींचे ओझे, ताण वाढत नाही. या गोष्टींना जेवढ्यास तेवढा प्रतिसाद देऊन त्यांच्यापासून ताणमुक्त होणे म्हणजे त्यांच्यापासून संन्यास घेणे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.२.२०२४

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

स्वार्थी कंपूगिरी!

स्वार्थी गटबाजी, कंपूगिरीचे दुःख!

संपूर्ण जग, सृष्टी ही परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील जीवनचक्रात कालानुरूप वाढत्या वयानुसार थकलेल्या शरीराला तारूण्यातील शक्तीप्रमाणे कामाला जुंपता येत नाही व मरगळलेल्या मनाला बळेच उत्साही करता येत नाही. वृद्ध शरीर व मन ओढाताण सहन करू शकत नाही. वृद्ध माणसांची उपयुक्तता जगण्याच्या स्पर्धेत जगासाठी कमी झाल्याने त्यांची जगाशी व्यावहारिक देवाणघेवाण कमी होत जाते व त्यातून जगाशी संवादही कमी होत जातो. तरूण पिढी व वृद्ध पिढी यांच्यातील अंतर (जनरेशन गॕप) याच व्यावहारिक उपयुक्ततेच्या कारणावरून वाढत जाते. इतकेच काय वृद्धांचे वृद्धांशी संबंधही पूर्वी सारखे रहात नाहीत. त्यांच्यातील संवाद कमी होत जातात. शिवाय तरूण पिढीत जसे शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, वांशिक  किंवा जातीय अंतर असते ते अंतर पुढे वृद्धापकाळीही टिकून राहते. म्हणून तर उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, श्रीमंत उद्योगपती, बलवान राजकारणी, सेलिब्रिटी कलाकार व खेळाडू यांचे तरूणपणी बनलेले गट वृद्धापकाळीही कायम राहतात. त्यामुळे या पॉवरफुल लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघ व सर्वसामान्य लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघ वेगळे असतात. ही सामाजिक दरी वृद्धापकाळीही कायम राहते. आयुष्यभर गुंडगिरी केलेला गँगस्टर म्हातारा झाला तरी त्याची दहशत असतेच. त्यामुळे तो इतर वृद्ध माणसांच्या ज्येष्ठ नागरिक संघात नसतो. अर्थात मानवी स्वार्थ व त्यातून निर्माण झालेली गटबाजी, कंपूगिरी माणसांच्या म्हातारपणीही कायम राहते. स्वार्थ हेच मानवी दुःखाचे कारण आहे असा गौतम बुद्धांच्या चिंतनाचा निष्कर्ष आहे. स्वार्थी गटबाजी, कंपूगिरीचे हे दुःख म्हातारपणी मरणाच्या दारातही मानव समाजात कायम राहते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.२.२०२४