https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

माझी चळवळ बंद!

माझी चळवळ बंद, बंद, बंद!

लहानपणापासून चळवळी बघत आलोय व त्यातून शिकत आलोय. या चळवळी लोककल्याणासाठी असतात का? या चळवळींतून स्वतःच्या कल्याणासाठी भांडवल निर्मिती करून शेत जमिनी विकत घेऊन सधन शेतकरी झालेले तर काहींनी कारखाने उभे करून श्रीमंत  उद्योगपती झालेले धूर्त, वस्ताद लोक मी बघितले. याला काही अपवाद निघाले पण त्यांच्या आयुष्याची वाट लागली.

अशा स्वार्थी चळवळींपासून मी लांब राहिलो. या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत. शुद्ध राजकारण, शुद्ध समाजकारण, शुद्ध अर्थकारण इतकेच काय शुद्ध ज्ञानकारणही समाजात दुर्मिळ होत गेले व आता तर ते शोधूनही सापडेनासे झालेय. धर्मकारणाविषयी तर न बोललेले बरे. स्वार्थी अर्थकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी व तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी धूर्त लोक देवधर्माचा दुरूपयोग, गैरवापर करत असताना स्पष्टपणे दिसत आहे. श्रीमंत भांडवलदार, धूर्त राजकारणी व दहशतखोर गुन्हेगार यांची दुष्ट साखळी घट्ट झाल्याचे दिसत आहे. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होत असल्याचे दिसत आहे. पण माझी वकिली व माझी देवप्रार्थना या गोष्टी रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात माझ्या ज्ञान व धैर्याच्या जोरावर मी जी काही थोडीफार सामाजिक चळवळ केली ती आता बंद. माझी ती चळवळ या भयंकर दुष्ट रेट्यापुढे इतकी कमकुवत, इतकी क्षीण ठरली की ती कोणाच्या नजरेसही आली नाही.

आजूबाजूला चाललेल्या या स्वार्थी चळवळी बघून मीही चळवळ केली व ती चळवळ म्हणजे अशिक्षित व गरीब कौटुंबिक वातावरणात खूप हिंमतीने, खूप जिद्दीने, खूप कष्टाने उच्च शिक्षण घेण्याची चळवळ. याच चळवळीतून मी वकील झालो. पण वकील बनून पोटासाठी शेवटी मला काय करावे लागले तर काही सधन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजूरी करावी लागली व काही श्रीमंत कारखानदार लोकांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी करावी लागली.

मी या स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात वकील म्हणून जाणे ही गोष्टच माझ्या उच्च शिक्षणाचा, माझ्या प्रामाणिक वकिलीचा घोर अपमान होता. पण या वकिलीत कोणाचाही भरभक्कम पाठिंबा नसल्याने मला हा अपमान सहन करावा लागला. माझ्या घराला मी वकिलीचा फलक (बोर्ड) लावला पण माझ्या घराच्या दारात माझ्या ज्ञानाला योग्य किंमत देणारे अशील आलेच नाहीत. शेवटी मलाच स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात माझे ज्ञान घेऊन जावे लागले. दुसऱ्याच्या दारात जाऊन चांगल्या मालाची विक्री करू पाहणाऱ्या फिरत्या विक्रेत्याच्या मालाची लोक काय किंमत करतात? अगदी तसेच माझ्या ज्ञानाचे झाले.

काय म्हणावे माझ्या या असल्या वकिलीला? पण मी शेवटी फिरता वकील म्हणूनच प्रसिद्ध झालो. गंमत ही की अगदी कालपरवा सुद्धा एका माणसाने मला मेसेज केला की त्याचा काहीतरी कायद्याचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्याच्या नरीमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात येऊ शकतो काय? काय म्हणावे या असल्या मागणीला? प्रश्न त्याचा, कायदेविषयक चर्चा त्याच्या प्रश्नावर करायची आणि त्यासाठी तो मला माझ्या डोंबिवलीच्या घरातून त्याच्या नरीमन पॉईंटच्या आॕफीसात बोलवतोय आणि त्यासाठी तो मला फी किती देणार यावर काही बोलत नाही? फिरता वकील म्हणून प्रसिद्ध झालेला मी वकील माझ्या भेटीची व नुसत्या चर्चेची फी कमीतकमी किती मागावी? निदान १०००० रूपये तरी पण नाही मला तो १००० रू. एवढी कमी फी सुद्धा त्याच्या दारात जाऊनही देणार नाही याची मला खात्री होती. शेवटी मी पडलो भिडस्त! म्हणून त्याला माझे खरे ते वैद्यकीय कारण सांगून शक्य नाही असे स्पष्ट सांगून टाकले. शिवाय त्याने ती तुटपुंजी १००० रू. फी त्या भेटीची व त्या चर्चेची दिली असती तरी माझे मन आता अशा फुटकळ भेटी व चर्चेला तयार नाही.

वकील असून आयुष्यभर श्रीमंतांच्या शेतात जाऊन एकतर शेतमजूरी केली किंवा त्यांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी केली. भले ही मजूरी किंवा चाकरी कधी तीन तासांची, कधी दोन तासांची तर कधी एक तासाची होती तरी ती स्वतंत्र बाण्याची वकिली मुळीच नव्हती. लोकांच्या दारात जाऊन कसला वकिलीचा रूबाब दाखवणार मी? त्यांच्या दारात लांबून जाणे हे होते शारीरिक कष्ट व त्यांच्या शेतीतील किंवा कारखान्यातील कचरा माझ्या  कायद्याच्या ज्ञान कौशल्याने साफ करणे हे होते बौद्धिक कष्ट. हे दुहेरी कष्ट मी स्वार्थी चळवळी लोकांच्या शेतात व कारखान्यांत जाऊन ६७ वर्षे वयातही गेल्या महिन्यापर्यंत  करीत होतो.

पण आता परमेश्वरालाच ही गोष्ट पटली नसावी. त्याने माझ्या या दारोदारी भटकण्याच्या वकिलीला चांगलाच खुट्टा मारून ठेवलाय. खरं तर परमेश्वराने हे खूपच मस्त काम करून टाकले. त्याने हृदयाचे ठोके नियमित ठेवणारा माझ्या हृदयाचा इलेक्ट्रिक ट्रान्समिटरच बिघडवून टाकला कसला तो ए.व्ही. ब्लॉक माझ्या हृदयात निर्माण करून. आता  डॉक्टरने कसला तो पेसमेकर माझ्या हृदयात बसवण्याचा वैद्यकीय सल्ला दिलाय. कशासाठी बसवू मी ते कृत्रिम उपकरण माझ्या हृदयात? पुन्हा लोकांची ती हमाली लोकांच्या दारात जाऊन करण्यासाठी? नाही म्हणजे नाही, बिलकुल नाही! आता तो पेसमेकर नाही की ती हमाली नाही. माझी चळवळ बंद, बंद, बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.२.२०२४

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वराचे सगुण अस्तित्व म्हणजे निसर्ग. निसर्गाच्या भौतिक विविधतेला परमेश्वराचे विविध अंश चिकटलेले आहेत ज्यांना ईश्वरी अंश म्हणता येईल. हिंदू धर्मातील विविध देवदेवता म्हणजे निसर्गातील विविध ईश्वरी अंश. हे अंश सगुण आहेत व ते निसर्गाच्या भौतिकतेला ईश्वरी आध्यात्मिकतेने नियंत्रित करतात. या ईश्वरी अंशानाच देवकण (गाॕड पार्टिकल) असे म्हणता येईल जे देवकण असंख्य आहेत. हिंदू धर्मात असलेल्या तेहतीस कोटी देवदेवता म्हणजे हे असंख्य ईश्वरी अंश किंवा देवकण. निर्गुण परमेश्वर एक आहे पण सगुण देवकण अनेक आहेत. कोणताही देवकण सर्वगुणसंपन्न नाही. पण त्यातला एखादा देवकण  जर बहुगुणसंपन्न म्हणून निसर्गात अवतीर्ण झाला तर त्याला हिंदू धर्मात निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप किंवा सगुण अवतार मानतात. हिंदू धर्मातील असंख्य देवदेवतांपैकी फक्त काही देवदेवताच बहुगुणसंपन्न आहेत. तीन मुख्य देव म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या स्त्री शक्तींसह, श्री गणेश, राम, कृष्ण, गुरूदेव दत्त हे सर्व देवकण असे बहुगुणसंपन्न देवदेवता व देवावतार होत. सारांश हाच की, परमेश्वर निर्गुण परमात्मा आहे तर ईश्वर हा त्या परमात्म्याचा सगुण ईश्वरी अंश किंवा देवात्मा आहे. निर्गुण परमात्मा कायम आहे तर सगुण देवात्मे येतात, जातात म्हणजे ते तात्पुरते आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.१.२०२४

रविवार, २८ जानेवारी, २०२४

भारत संघराज्य राष्ट्र

भारत एक संघराज्यीय राष्ट्र!

भारत हे संघराज्यीय राष्ट्र आहे. या संघराज्यातील प्रत्येक राज्याच्या वेगळ्या प्रादेशिक अस्मिता व वेगळी भाषिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत.  हीच परिस्थिती या संघराज्यातील जनतेची आहे. ही भारतीय जनता विविध धार्मिक व जातीय समाज गटात विभागलेली आहे. प्रत्येक समाज गटाची वेगळी धार्मिक व जातीय अस्मिता, संस्कृती आहे. या विविधतेमुळे या संघराज्याला एकच धर्म व एकच जात नाही. तरीही सर्व भारतीय एक राष्ट्र म्हणून एक आहेत हे विविधतेतील एकतेचे जगातील एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. भारताला कोणताही एक धर्म किंवा जात नाही हे वास्तव हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१.२०२४

भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे!

भौतिक स्पर्धा व मानसिक आरोग्य!

या पदार्थीय सृष्टीतील विविध निर्जीव वस्तू पदार्थ व सजीव वनस्पती, प्राणी, माणसे या सर्वांबरोबर वैज्ञानिक निसर्ग नियमांनुसार प्रमाणबद्ध व मर्यादित देवाणघेवाणीचे संबंध प्रस्थापित करण्याऐवजी मानवी मन त्यांच्याशी स्पर्धा करते, ईर्षा करते व त्यातून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवते. इतरांशी तुलनात्मक स्पर्धा सोडा पण मानवी मन स्वतःशीही स्पर्धा करते. भौतिक यशासाठी ठराविक मर्यादेपर्यंत स्पर्धा ठीक आहे. पण मानवी मन या स्पर्धेचा अतिरेक करते व स्वतःबरोबर इतरांचेही शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवते.

जीवनात स्वतःच्या मर्यादा ओळखून  त्या मर्यादेतील शक्य तेवढे भौतिक यश मर्यादित स्पर्धेतून मिळवल्या नंतर स्पर्धेतून बाजूला व्हायला हवे. अर्थात स्पर्धेतून निवृत्ती घ्यायला हवी. अशी निवृत्ती घेतल्यानंतर आपण जगाच्या भौतिक स्पर्धेत नाही आहोत याची खंत न बाळगता इतरांची स्पर्धा त्या स्पर्धेपासून अलिप्त राहून लांबून बघायची असते. मोह झाला तरी त्यात भाग घ्यायचा नसतो व त्याचा विचारही करायचा नसतो.

अशी अवस्था प्राप्त केल्यानंतर प्रवास सुरू होतो तो परमेश्वराच्या अध्यात्माचा. ज्याने हे सर्व विविध पदार्थ निर्माण केले व त्यांच्यापासून ही विज्ञानबद्ध भौतिक पदार्थीय सृष्टी रचली त्या निर्माता, नियंता, परमेश्वराबरोबर मानवी मनाला भौतिक स्पर्धा करता येईल का? परमेश्वराबरोबर भौतिक स्पर्धाच काय पण त्याच्याबरोबर भौतिक देवाणघेवाणही शक्य नाही. मग त्याच्यापुढे भौतिक स्पर्धेतील भौतिक यशाची मागणी का करावी?

मग मानवी मन काय करू शकते? तर परमेश्वरापुढे आध्यात्मिक मनाने लीन होऊ शकते. आध्यात्मिक मन म्हणजे भौतिक भावना व भौतिक विचार यांचा त्याग केलेले, या सर्व भावना व हे सर्व विचार परमेश्वर चरणी अर्पण केलेले मन. असे आध्यात्मिक मनच परमेश्वराशी एकरूप होऊ शकते. आणि अशी आध्यात्मिक एकरूपता मनुष्याला जिवंतपणीही साधता येते व त्यातून आध्यात्मिक आनंद व शांतीची अनुभूती मिळवता येते.

या आध्यात्मिक अनुभूतीसाठी मला हिंदू धर्मातील सगुण ईश्वरापासून निर्गुण परमेश्वरापर्यंतचा आध्यात्मिक प्रवास आवडतो जो मी खालील आध्यात्मिक प्रार्थनेने दररोज करतो.

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री रामकृष्णाय नमः !
ओम नमः शिवाय !
ओम श्री गुरूदेव दत्ताय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम शरणम गच्छामी !
ओम सर्वम सुखीनम भवती !
ओम शांती !

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१.२०२४
https://youtu.be/E-NqjMfZeMk?si=fRC0-xfLkD6rOncV

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निवृत्ती!

वाढत्या वयानुसार वाढणाऱ्या बौद्धिक व शारीरिक कष्टावरील मर्यादा व निवृत्ती!

मानवी मेंदूमनाला वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या सुशिक्षित-सुसंस्कृत करणारे ज्ञान  सतत देण्याचा कार्यक्रम राबवणारा शिक्षणाचा कारखाना अविरतपणे सतत चालू आहे. त्याला क्षणभरही विश्रांती नाही. या कारखान्यात लहानपणापासून सतत काम करून करून मानवी मेंदू थकतो. कारण या कारखान्याला शेवट नाही पण नश्वर मानवी आयुष्याला शेवट आहे.

शिक्षणाच्या कारखान्यात हळूहळू  ज्ञान प्रगल्भ होत जाणारे मेंदूमन त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग म्हणजे सराव करण्याचा प्रयत्न सुरू करते. म्हणजे एकीकडून सतत सुरू असलेला ज्ञानाचा ओघ तर दुसरीकडून सतत त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, सराव व त्यासाठी मेंदू बुद्धीला व शरीर अवयवांना सतत कार्यरत ठेवण्याचा दुहेरी कार्यक्रम म्हणजे बौध्दिक व शारीरिक कष्टाचा दुहेरी कार्यक्रम आयुष्यभर सुरू राहतो.

मेंदूमनावर झालेले ज्ञानसंस्कार मनुष्याला गप्प बसू देत नाहीत. या ज्ञानसंस्काराचा वापर सातत्याने व्यवहारात करण्यासाठी मेंदूमन सारखे पुढे पुढे करते. अशाप्रकारे मानवी आयुष्यात शिक्षणाचा व व्यवहाराचा असे दोन्ही कारखाने सतत सुरू राहतात. पण या दोन्ही  कारखान्यात काम करताना बौद्धिक व शारीरिक कष्ट करण्यावर वाढत्या वयानुसार नैसर्गिक मर्यादा पडतात. या मर्यादा लक्षात घेऊन कालानुरूप शरीर, मनाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाच्या विश्रांतीचा काळ उतार वयात वाढवत जाण्यालाच निवृत्ती असे म्हणतात जी निवृत्ती नुसती नोकरीतच नव्हे तर सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, राजकारण, समाजकारण यातूनही घ्यावी लागते व या नैसर्गिक निवृत्तीला वैद्यकीय, वकिली किंवा इतर कोणतेही व्यवसाय, उद्योगधंदे किंवा राजकारण, समाजकारण हे अपवाद होऊ शकत नाहीत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१.२०२४

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

NATION!

NATION!

The nation is an artificial institution created by union of people under the law of nation called constitution. This institution remains the notional owner and director of the wealth and resources of nation including people who continue as members of this institution. These members are allowed to own and enjoy the national wealth and resources of nation privately but subject to the restrictions and  conditions of the law of nation called constitution. The united maintenance & protection of such wealth & resources is the condition precedent for this private ownership and enjoyment. The people may come by birth and go by death but the nation remains alive & constant all time. This is the truth with any artificial institution. The institution created by people can be dissolved only by people and this happens when there is a breakdown in the union of people.

-©Adv.B.S.More, 26.1.2024

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

निरक्षरांची लोकशाही?

निरक्षरांची लोकशाही?

कसेही करून विशेषतः बळी तो कानपिळी नियमाने जगणे हा मनुष्य सोडून इतर सर्व प्राणीमात्रांचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे तर मनुष्याच्या विशेष नैसर्गिक बुद्धीमुळे सन्माननीय जीवन (डिग्नीफाईड लाईफ) हा मनुष्याचा व एकंदरीत मानव समाजाचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे. या हक्काची जाणीव जेव्हा कधीकाळी मनुष्याला झाली व त्याचे मनुष्याला भान आले तेव्हापासून या विशेष मानवी हक्काचा विकास व्हायला सुरूवात झाली. ही विकास प्रक्रिया अजूनही पिढ्यानपिढ्या चालूच आहे.

राजेशाही, हुकूमशाही, लोकशाही हे याच मूलभूत मानवी हक्काच्या संक्रमणाचे टप्पे आहेत. लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही जे वरील विशेष मानवी हक्कासाठी म्हणजे सन्माननीय जीवन या मूलभूत हक्कासाठी चालविलेले राज्य. तसे तर निसर्गात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जीवन कसे जगायचे हे सामान्य ज्ञान (काॕमन सेन्स) निसर्ग जन्मापासून ते मरेपर्यंत निसर्गाच्या खुल्या शाळेत देत असतो. अर्थात या सामान्य ज्ञानासाठी मानवनिर्मित शाळा, काॕलेजात जाऊन सुशिक्षित होण्याची गरज नसते. पण मनुष्य प्राण्याचा सन्माननीय जीवनाचा हक्क काय व तो कसा जगायचा हे कळण्यासाठी मात्र खास शिक्षणाची गरज असते कारण मुळात हा हक्क मनुष्याला निसर्गाकडून विशेष हक्क म्हणून प्राप्त झाला आहे पण त्या हक्काचे विशेष संगोपन करण्याची जबाबदारी मात्र निसर्गाने मानव समाजावरच टाकून दिली आहे.

या विशेष मानवी हक्काविषयी जागरूक होण्यासाठी व तो विशेष नैसर्गिक-सामाजिक पद्धतीने जगण्यासाठी विशेष शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी अक्षर ओळख ही मूलभूत गोष्ट आहे. अक्षर ओळखी शिवाय माणूस सामान्य ज्ञानी होऊ शकतो पण तो सुशिक्षित होऊ शकत नाही. ज्या समाजात बहुसंख्य लोक निरक्षर म्हणजे अशिक्षित आहेत अशा समाजात लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होणे फार कठीण आहे. बहुसंख्य निरक्षर  लोकांचे बहुमत यालाच लोकशाही म्हणायचे तर अशा लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत व्हायला वेळ लागत नाही. कारण अशा निरक्षरी बहुमतावर सन्माननीय जीवन हक्क म्हणजे काय हे लिखित स्वरूपात सांगणाऱ्या अक्षरी संविधानाची हुकूमत चालत नाही. याचा अर्थ हाच की निरक्षरी बहुमताची लोकशाही ही सांविधानिक लोकशाही होऊ शकत नाही. बहुतेक हाच विचार करून म. गांधीनी "साक्षर लोकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा" असे हरिजन मध्ये लिहिले होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.१.२०२४