https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

गरिबी!

गरीब गरीबच का राहतात?

गरिबांना बचतीचे सल्ले कोणी देऊ नयेत. कसली बचत? त्यांचे सगळे पैसे त्यांच्याकडून खर्च केले जातात हे गरिबांच्या गरिबीचे कारण नाही. त्यापेक्षा फार मोठे कारण आहे ते म्हणजे जगातील मूठभर श्रीमंतांची जगातील बहुतांश संपत्तीवरील मक्तेदारी व तेच समाजातील आर्थिक विषमतेचे प्रमुख कारण आहे. काटकसर कसली करणार गरीब माणूस? कष्टाने मिळविलेल्या थोड्या पैशात त्याचे साधेसुधे जगणे तरी शक्य आहे काय? खरं तर त्याचा कष्टाचा पैसा महिन्याचा खर्च भागवता भागवता संपून जातो. बचत कसली करणार? त्या मूठभर श्रीमंतांची श्रीमंती गरिबांकडे तेव्हाच वळेल जेव्हा गरिबांच्या कष्टाचे आर्थिक मूल्य वाढेल. कोण वाढवणार हे मूल्य, गरीब कष्टकरी, श्रीमंत भांडवलदार की मायबाप सरकार?

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

MY POOR ADVOCACY!

*MY POOR ADVOCACY!*

Oh my God, so much legal fee of Sr. Advocates (lakhs of rupees) just on legal opinion. I give big big legal advices to big big builders and corporates and draft big big documents for said big rich clients but my fee is ONLY Rs.1000 for one hour of my professional engagement by them. If this is degradation of my law knowledge and skill then it is simply because I am visiting lawyer to these clients offices and could not have my independent office and also being fully  dependant on my legal profession for earning livelihood for me and my family and I think this may be the case of every  advocate born in poor families without having born with golden or silver spoon in mouth. Having  poor & uneducated family background of textile mill worker I had to run from one rich corporate client to another as visiting lawyer (degraded name) and being fed up I had to reduce my court practice and reverse my daily time schedule. This resulted in reverse biological clock meaning sleeping from morning to afternoon and working only as part time evening legal consultant to rich clients visiting their offices in Mumbai by long distance local train travel from Dombivli to Mumbai. I do NOT blame rich clients for this. I blame my own failure to overcome this testing situation and big thanks to this wonderful advocacy!

- *Adv.B.S.More,* Mumbai (17.01.2024)

समाजमाध्यमी मैत्री!

समाज माध्यमावरील मित्रांशी असलेली वैचारिक मैत्री ही फक्त हवेतली मैत्री, शेवटी प्रत्यक्ष व्यवहार व मदतीसाठी जवळ कोण आहे याला महत्त्व असते, मुले तिकडे परदेशात व आईवडील इकडे भारतात, त्यांनी दररोज कितीही आॕनलाईन गुजगोष्टी करोत, पण दूर परदेशात स्वतःच्या मुलांवर आलेले संकट दूर करायला भारतातील आईवडील तिकडे प्रत्यक्षात धावून जाऊ शकत नाहीत व भारतात आईवडिलांवर आलेले संकट दूर करायला परदेशातील मुले इकडे प्रत्यक्षात धावून येऊ शकत नाहीत, शेवटी प्रत्यक्षात जवळ काय आहे याला महत्व असते! -ॲड.बी.एस.मोरे

श्रीमंती!

अबब, केवढी ही श्रीमंती!

जगातील मूठभर नव्हे तर फक्त ५ श्रीमंतांनी जगातील बहुसंख्य लोकांना गरीब ठेवलेय. एवढी प्रचंड संपत्ती या ५ जणांकडे एकवटलीच कशी? लोकांच्या मतांवर निवडून येणारी सरकारे काय करीत आहेत? या ५ जणांची श्रीमंती जसजशी पुढे वाढत जाईल तसतशी जगातील गरिबी वाढत जाईल. आपल्या महान परमेश्वराला फक्त हे ५ श्रीमंत लोकच अत्यंत प्रिय झालेले दिसत आहेत. मग आपण काय करायचे? काही नाही आपण ईश्वर नाम सत्य है असे म्हणत आपल्या महान परमेश्वराचा जप करीत बसायचे व हेच आपले प्रारब्ध म्हणून जमेल तेवढे आनंदात जगायचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१.२०२४

(संदर्भः आॕक्सफॕम संस्थेचा वार्षिक विषमता अहवाल, बातमी लोकसत्ता दिनांक १६.१.२०२४)

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

नात्यांतील मानसिक संतुलन!

कोणती नाती जास्त जवळची, रक्ताची नाती की लग्नाची नाती?

आधी रक्ताचे नाते की लग्नाचे नाते? कारण पुरूष व स्त्री लग्न करून नवरा व बायको होतात व लैंगिक संबंधातून मुलांना जन्म देतात. अशा मुलांना औरस मुले म्हणतात. लग्न न करता स्त्री पुरूष मुलांना जन्म देतात तेंव्हा त्यांना अनौरस मुले म्हणतात. मुले औरस असोत किंवा अनौरस त्यांचे त्यांच्या आईवडिलांशी नाते असते ते रक्ताचे नाते असते. रक्ताचे नाते म्हणजे जैविक नाते. पती पत्नी यांचे नाते लग्नाचे असते. ते जैविक नाते नसून सामाजिक नाते असते. पण या लग्नाच्या सामाजिक नात्यातही लैंगिक संबंधामुळे पती पत्नीत जैविक संबंध प्रस्थापित होत असतात व त्यामुळे नवरा बायकोचे नाते नैसर्गिक-सामाजिक असे मिश्र नाते असते. पण आईवडील व मुले व त्यांच्या मुलांतील भाऊ, बहीण ही नाती रक्ताची (जैविक) असतात.

मला जवळची, सरळसोपी नाती पटकन कळतात. पण गुंतागुंतीची नाती कळायला थोडा वेळ जातो. वडील, आई, सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, आजोबा (वडिलाचे वडील व आईचे वडील), आजी (वडिलाची आई व आईची आई) ही नाती फार जवळची रक्ताची नाती व म्हणून कळायला सोपी. पण पंजोबा, पंजी, खापर पंजोबा, खापर पंजी ही नाती तशी रक्ताची असली तरी फार लांबची. मी तर आजोबा, आजी (वडिलाकडचे व आईकडचे) यांना बघितले नाही तर पंजोबा, पंजी यांना बघण्याचा प्रश्नच नाही.

जवळच्या रक्ताच्या नात्यांना चिकटलेली लांबच्या रक्ताची नाती असतात ती म्हणजे चुलता (काका किंवा नाना), चुलती (काकी/काकू किंवा नानी), चुलत भाऊ, चुलत बहीण, मावशीचा नवरा (काका), मावशी, मावस भाऊ, मावस बहीण, मावशीतही आईची सख्खी बहीण ही सख्खी मावशी तर आईची मावस बहीण ही मावस मावशी, वडिलांची बहीण म्हणजे आत्या व आत्याच्या मुलाला आतेभाऊ तर आत्याच्या मुलीला आतेबहीण म्हणतात, आईचा भाऊ तो मामा तर मामाच्या मुलाला मामेभाऊ व मामाच्या मुलीला मामेबहीण म्हणतात. पण लांबच्या रक्ताच्या नात्यांतही लग्न हाच दुवा असतो. एकंदरीत नाती रक्ताची व वैवाहिक अशी मिश्र असतात. या मिश्र नात्यांतून निर्माण होणारी इतर नाती म्हणजे जावई, सून, सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी, नातू, नात वगैरे. या नात्यांना संलग्न अशी इतर बरीच नाती असतात. अशी ही नात्यांची लांबलचक माळ असते. नातीगोती म्हणजे नात्यांची ही अशी लांबलचक माळ.

असे म्हणतात की वडिलाकडील नात्यांपेक्षा मुलांना आईकडील नाती जास्त जवळची वाटतात. माझ्या नात्यांच्या बाबतीत म्हटले माझी जवळच्या रक्ताची नाती पाच व ती म्हणजे माझे आईवडील, माझ्या दोन धाकटया बहिणी व माझा एक धाकटा भाऊ. या पाच जणांत मला धरले तर एकूण कुटुंब सहा जणांचे. माझ्या वडिलांना तीन भाऊ व एक बहीण म्हणजे मला तीन चुलते व एक आत्या. चुलते (काका/नाना) आले म्हणजे चुलत्या (काकी/नानी) आल्याच. मग त्यांची मुले म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहिणी आल्या. माझ्या आत्याला दोन मुले म्हणजे मला दोन आतेभाऊ व तीन मुली म्हणजे तीन आतेबहिणी. ही सर्व वडिलाकडील नाती. माझ्या आईला एकच सख्खी थोरली बहीण. ती माझी सख्खी मावशी. या सख्ख्या मावशीला एकच एकुलती एक मुलगी (जशी मलाही एकुलती एक मुलगी आहे). सख्ख्या मावशीची ही एकुलती एक मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण. माझी सख्खी मावशी व माझी सख्खी मावस बहीण वरळीला आमच्याच घरी रहात असल्याने ती सख्खी मावशी मला माझ्या आईसारखी तर तिची मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण मला सख्ख्या बहिणीसारखी. माझ्या सख्ख्या बहिणींच्या पतीशी (सख्ख्या मेहुण्यांशी) जवळीक तशी माझ्या या मावस बहिणीच्या पतीशी (सख्ख्या मावस मेहुण्याशी) सुद्धा जवळीक. माझ्या आईची सोलापूर येथे एक मावस बहीण होती. ती माझी मावस मावशी. त्या मावस मावशीलाही एकच एकुलती एक मुलगी. ती माझी मावस मावस बहीण. मावस मावस बहिणीचे पती म्हणजे माझे मावस मावस मेहुणे. आता हे मावस मावस नाते जरी आईकडील असले तरी ते थोडे लांब पडले. तसे हे नाते रहायलाही लांब म्हणजे पंढरपूरला. त्यामुळे सख्ख्या मावस बहिणीचे नाते व मावस मावस बहिणीचे नाते यात थोडे अंतर पडले. पण तरीही पंढरपूरची माझी मावस मावस बहीण ही खूप प्रेमळ होती. ती पंढरपूरला प्राथमिक शिक्षिका होती. तिचा स्वभाव इतका प्रेमळ होता की मी पंढरपूरला असताना तिच्या घरी सारखा जात असे व मुंबईला आल्यावरही तिचा व माझा सारखा पत्र व्यवहार चालू असे. मावस मावस बहिणीचे नाते सख्ख्या बहिणीच्या नात्यापेक्षाही जवळ झाले होते ते केवळ त्या बहिणीच्या प्रेमळ स्वभावामुळे. आता असे मायाप्रेम जवळच्या नात्यांतही अनुभवायला मिळत नाही याचे वाईट वाटते.

आईकडील नात्यांप्रमाणे माझ्या वडिलाकडील नात्यांशी म्हणजे चुलते, चुलत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी, आत्या, आतेभाऊ, आते बहिणी यांच्याशी माझी फार जवळीक का निर्माण झाली नाही याला कारण हेच असावे की ही सर्व नाती वडिलाकडील नाती पडली. पण माझ्या एका धाकटया चुलत्या बरोबर (नाना) व चुलती बरोबर (नानी) मला लहानपणी खूप म्हणजे  खूपच जवळीक निर्माण झाली होती कारण ते दोघेही माझे खूप लाड करीत होते. तसेच माझ्या वडिलाचे पंढरपूरला काका व मावशी होते तेही मी पंढरपूरला असताना माझे खूप लाड करीत होते. त्यांचाही मला लळा लागला होता.

माझ्या बायकोकडील नाती म्हणजे माझ्या लग्नाची नाती. ही नाती म्हणजे माझे सासू, सासरे, मेहुणे, मेहुण्या, त्या मेहुण्यांचे पती म्हणजे माझे साडू, त्यांची मुले. या नात्यांशी सासू, सासरे सोडून माझे एवढे सूर जुळले नाहीत. या सर्वांपैकी माझी एक थोरली मेहुणी व धाकटा मेहुणा यांच्याशी माझी जास्त जवळीक आहे कारण या दोघांशी माझ्या बायकोची जास्त जवळीक आहे व हेच त्यांच्याशी असलेल्या माझ्या जवळीकीचे कारण असावे. बाकी माझ्या लग्नाकडची इतर नाती असून नसून सारखीच. माझ्या मुलीचा विवाह हल्ली म्हणजे तीन वर्षांपूर्वी झाला आहे त्यामुळे माझ्या मुलीमुळे माझ्या जावयाशी माझे नाते मुलासारखे जुळून आले असले तरी मुलीचे सासू, सासरे, मुलीची नणंद यांच्याशी अजून तरी तितकेसे संबंध जुळले नाहीत.

माझ्या वरील नातेसाखळीचा जर अभ्यास केला तर असे दिसून येईल की माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (बायको, मुलगी व जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून, त्यात मुलगी रक्ताच्या नात्याची) माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या रक्ताच्या नात्यांचीच (रक्त जवळचे व लांबचेही) साखळी फार मोठी आहे व तीच मला जास्त जवळची आहे. अर्थात माझ्यापुरती तरी माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (माझी बायको, मुलगी, जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून त्यात मुलगी ही रक्ताच्या नात्याची) मला माझ्या रक्ताचीच म्हणजे माझ्या आईवडिलांच्या माध्यमातील नातीच जास्त जवळची आहेत. पण याबाबतीत माझे वडील खरंच ग्रेट होते. त्यांनी रक्ताच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडील नात्यांना म्हणजे त्यांचे भाऊ, बहीण, काका, मावशा या सर्वांना जवळ केले होते व त्यांच्या लग्नाच्या म्हणजे त्यांच्या बायको कडील नात्यांना म्हणजे माझा चुलत मामा (माझ्या आईला सख्खा भाऊ नव्हता, आई व मावशी या दोन सख्ख्या बहिणी हीच दोन अपत्ये), माझी मावशी, माझी मावस बहीण, तसेच माझी मावस मावशी, माझी मावस मावस बहीण या सर्वांना जवळ केले होते. दोन्हीकडे असे संतुलन साधणे सगळ्यांनाच जमत नाही. मला ते जमले नाही. पण माझ्या वडिलांना ते जमले. तरीही प्रश्न हा आहेच की ज्या नात्यांमुळे आपले मानसिक संतुलन बिघडते अशी नाती जपावी का?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१.२०२४


शनिवार, १३ जानेवारी, २०२४

जीवन कर (लाईफ टॕक्स)

जगण्याचा जीवन कर (लाईफ टॕक्स)!

माणसांना जगण्यासाठी निसर्गाने दिलेली विविध साधने तशी फुकटच. पण ही साधने निसर्गाने फुकट दिली असली तरी ती माणसांच्या हाती निसर्ग सहजासहजी लागू देत नाही. त्यासाठी माणसांना निसर्गाला दोन प्रकारचे जीवन कर (लाईफ टॕक्स) द्यावे लागतात. एक कर म्हणजे कष्ट (बौद्धिक व शारीरिक) आणि दुसरा कर म्हणजे धोके (जे कधीकधी माणसांचा जीव घेतात). पाण्यात मासे भरपूर आहेत. जा आणि मासे फुकट पकडा व खा. पण हे मासे माणसांच्या हातात सहजासहजी येत नाहीत. ते निसटतात. म्हणून मग पाण्यात जाळे फेका आणि मग माशांना जाळ्यात पकडा. आला ना कष्ट नावाचा जीवन कर. दुसरी गोष्ट म्हणजे या मासेमारीत धोका हा असतोच. खोल पाण्यात नावेने जावे लागते. नाव बुडण्याचा धोका असतो. आला ना धोका नावाचा जीवन कर. जी गोष्ट मासेमारीची तीच गोष्ट शेतात धान्य पिकवण्याची. शेतात राबावे लागते (कष्ट). लहरी पाऊस कधीकधी दगा देतो (धोका). शेतात कष्ट करताना साप, विंचवाची भीती (धोका).

कष्ट व धोका हे दोन कर निसर्गाला दिल्यानंतर हातात जे येईल ते खा व शिल्लक राहिलेले बाजारात विका. म्हणजे पुन्हा बाजारात मालाची विक्री करण्याचे कष्टच. हा जीवन कर (कष्ट) मात्र समाजाला द्यावा लागतो. त्यात पुन्हा बाजारभावाची शास्वती नाही कारण ते कमीजास्त होतात (धोका). कष्ट व धोका हे दोन कर निसर्गाला देऊन भागत नाही. तर हे दोन्ही कर अशाप्रकारे पुन्हा समाजाला द्यावेच लागतात. पण यात समाजातील दुष्ट माणसांकडून फसवणूक किंवा लूटमार होण्याचा धोका असतो (हा एक विचित्र उपद्रवी समाज कर). मग या विचित्र उपद्रवी करापासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून समाजाने नेमलेल्या सरकारला राजकीय कर हा द्यावाच लागतो.

अशाप्रकारे निसर्ग, समाज व समाज पुरस्कृत सरकार या तिघांना वरील कर दिल्यावर हातात जे शिल्लक राहील ते खा, संसारात खर्च करा व त्यातून थोडीफार बचत करा जी म्हातारपणी उपयोगी येईल (बचत नाही केली तर ज्या मुलांचे नीट संगोपन केले त्याच मुलांकडून लाथ बसण्याचा धोका) आणि मग या बचतीतून जी काही शिल्लक राहील ती मुलांना सुपुर्द करून या भौतिक जगाचा कायमचा निरोप घ्या. या करयुक्त जगण्याला जीवन ऐसे नाव!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.१.२०२४

देवत्वाची अनुभूती!

चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती!

मानवी जीवन विलक्षण आनंददायी आहे कारण याच जीवनात मनुष्य सकारात्मक, कल्याणकारी, चांगल्या भावनांचा अनुभव घेऊ शकतो. हा विशेष अनुभव हीच देवत्वाची श्रेष्ठ अनुभूती होय. मी देव पाहिला असे म्हणणारी व्यक्ती देवत्वाची हीच श्रेष्ठ अनुभूती घेत असते.

हे समजण्याची निसर्गाने पृथ्वीवर रचलेली सृष्टीची पर्यावरणीय रचना विज्ञानाच्या सहाय्याने अभ्यासली पाहिजे. या रचनेच्या पायाशी आहेत निर्जीव पदार्थ. या पदार्थांचे गुणधर्म  अजैविक व त्यांची या गुणधर्मांशी निगडीत असलेली बुद्धी यांत्रिक. मानवाने शोधलेली व उपयोगात आणलेली निर्जीव पदार्थांची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या निर्जीवांची यांत्रिक बुद्धी. निर्जीव पदार्थांचे अजैविक गुणधर्म व त्यांची यांत्रिक बुद्धी तंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तळ मजला होय.

या पायावरील पहिली पायरी उत्क्रांत झालीय ती अर्धसजीव वनस्पतींची. अर्धसजीव वनस्पतींना जीव असतो, म्हणून त्यांना वासना, भावना व बुद्धी या तिन्ही गोष्टी असतात. पण त्या अर्ध विकसित पातळीवर असतात. या वनस्पतींचे अर्धजैविक गुणधर्म व या गुणधर्मांशी निगडीत असलेली या वनस्पतींची बुद्धी अर्ध यांत्रिक व अर्ध जैविक असते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा पहिला मजला होय.

वनस्पतींच्या नंतर उत्क्रांत झालेली दुसरी पायरी सजीव पशूपक्षांची. या सजीव पशूपक्षांचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्यांची पूर्ण सजीव जैविक बुद्धी ही वनस्पतींपेक्षा जास्त विकसित पण अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा दुसरा मजला होय.

पशूपक्षांच्या नंतर उत्क्रांत झालेली तिसरी पायरी म्हणजे पूर्ण विकसित झालेल्या सजीव माणसांची. मनुष्य  प्राण्याचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्याची पूर्ण सजीव जैविक बुद्धी सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण हे मानवी गुणधर्म व ही मानवी बुद्धी श्रेष्ठ असली तरी ती तंतोतंत नसते कारण निर्जीव पदार्थांप्रमाणे ती यांत्रिक नसते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तिसरा मजला होय. अशा रीतीने तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला अशी चार मजल्यांची ही पर्यावरणीय सृष्टी रचनेची इमारत निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांती करीत बांधली आहे.

या इमारतीच्या अगदी वरच्या म्हणजे तळ मजला (पाया) धरून चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या (जगणाऱ्या) माणसाच्या मूलभूत जैविक वासना (बेसिक इन्सटिन्क्टस) यांना ज्या पूरक भावना निसर्गाने चिकटवल्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. या भावनांचा एक प्रकार आहे तो देव भावनांचा म्हणजे सकारात्मक किंवा चांगल्या, विधायक भावनांचा (उदा. प्रेम, करूणा) व दुसरा प्रकार आहे तो दैत्य/राक्षस भावनांचा म्हणजे नकारात्मक किंवा वाईट, विध्वंसक भावनांचा (उदा. राग, लोभ).

मूलभूत जैविक वासनांचे समाधान करण्याच्या प्रक्रियेत दैत्य/राक्षस भावनांना चांगले, विधायक वळण लावण्याचे काम देव भावना करीत असतात. अशाप्रकारे मेंदूमनाला चांगले वळण लावण्याच्या कामात जी मानवी बुद्धी योग्य साथ देते तिला सुबुद्धी म्हणतात व जी मानवी बुद्धी दैत्य/राक्षस भावनांना अयोग्य साथ देते तिला कुबुद्धी म्हणतात. सुबुद्धी मनुष्याच्या हातून देवकार्य म्हणजे चांगले कर्म घडवते तर कुबुद्धी मनुष्याच्या हातून दैत्यकार्य म्हणजे वाईट कर्म घडवते. मानवी जगात देव व दैत्यांचे हे युद्ध सतत चालू असते. माझ्या मते, मानवी जीवनात चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती. नीट अभ्यास केला तर सर्व धर्म, धम्मात याच मंगलाची प्रार्थना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४