https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

आता बसा चिपळ्या वाजवत!

आता बसा चिपळ्या वाजवत!

अहो, हे माझे वाक्य नव्हे. तेलंगणा राज्यात काँग्रेस विजयी झाली पण उत्तरेकडील तीन राज्यांत भाजपने काँग्रेसला हरवले म्हणून भाजपच्या काहींनी काँग्रेसला काय सुनावले तर "आता बसा चिपळ्या वाजवत"! टी.व्ही. चॕनेलवर दररोज ही महान राजकारणी मंडळी एकमेकांना शिव्या घालतात आणि बातम्या बघाव्या म्हणून टी.व्ही. चालू केला की या राजकारण्यांची तोंडे बघून यांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. यालाच जर कोणी राजकारण म्हणत असेल तर धन्य!

पण "आता चिपळ्या वाजवत बसा" हे काँग्रेसला भाजपच्या लोकांकडून सुनावले जाणे हा काँग्रेसचा अपमान नसून हा चिपळ्यांचा अपमान आहे असे मला वाटते. कारण चिपळी हे वाद्य देवाचे गुणगाण गाण्यासाठी वाजवले जाते. हरीभक्तीचा प्रसार व समाज प्रबोधन ज्या कीर्तनाद्वारे केले जाते त्या कीर्तनातील संगीताचा एक भाग म्हणजे कीर्तनकाराच्या हातातील चिपळ्या.

अध्यात्मात महत्वाच्या असलेल्या या चिपळ्या राजकारणात मात्र तुच्छ होतात इतके हे राजकारण गलिच्छ झाले आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१२.२०२३

बुद्धीचे झाले खोबरे!

बुद्धीचे झाले खोबरे!

आपण जर फक्त भारतातील व भारतासंबंधीच बातम्या वाचत असाल तर ते चुकीचे आहे कारण भारत हा जगाचा एक भाग आहे आणि जग मोठे आहे. तसेच केवळ एखाद्या धर्मात जन्माला आलात म्हणून फक्त त्याच धर्माची माहिती घेत असाल तर ते संकुचितपणाचे लक्षण होय. कारण जगात अनेक धर्म आहेत व जगाचा परमेश्वर व त्या परमेश्वराचा निसर्ग जगासाठी एकच आहे.

आज दिनांक ४ डिसेंबर, २०२३ च्या लोकमत दैनिकात पान क्रमांक २ वर जगभर या सदरात बेडमेट मिळेल? ही टोरांटो शहरातील एका तरूणीची पोस्ट वाचली आणि माझ्या बुद्धीचे खोबरे झाले. त्या शहरात महागाई खूप वाढलीय म्हणून या तरूणीने तिच्या बेडचा एक कोपरा भाड्याने द्यायचाय अर्थात तिला बेडमेट हवीय (हवाय नव्हे) म्हणून तिने जाहिरात दिलीय. आतापर्यंत 'सोलमेट' म्हणजे मनाला मन जुळणारा मित्र किंवा मैत्रीण हा शब्द ऐकला होता. खरं तर सोलमेट ही संकल्पना वैचारिक मैत्रीशी निगडीत आहे. जग भावनेवर नाही तर बुद्धीवर चालते. हवा ही श्वसनासाठी आवश्यक असली तरी नुसत्या हवेवर जगता येत नाही. त्यासाठी जड पाणी व अन्न हे हवे असते. मी भावनेचा संबंध हलक्या हवेशी जोडतो व बुद्धीचा संबंध जड अन्न, पाण्याशी जोडतो. दोन किंवा अधिक व्यक्तींचे बौद्धिक विचारच जर जुळत नसतील तर त्यांच्यात भावनिक जवळीक काय निर्माण होणार?

सोलमेट ठीक पण 'बेडमेट' हा काय प्रकार आहे? टोरांटो शहरातील या तरूणीच्या जाहिरातीमुळे मला तो कळला. काय भन्नाट कल्पना आहे या तरूणीची! भाड्याची बेडमेट हवीय म्हणे तिला तिचा बेड भाड्याने शेअर करण्यासाठी! आज ही टोरांटो बातमी वाचताना मला बी.काॕम. च्या अभ्यासक्रमात शिकलेले अर्थशास्त्र आठवले. मानवी इच्छा अमर्यादित आहेत पण त्यांचे समाधान करणारी साधने जगात मर्यादित आहेत हेच ते वास्तव अर्थशास्त्रात शिकलो. मग साधनांची आंतरमानवी स्पर्धा हा भाग आलाच व या स्पर्धेचे नियमन करणारा कायदाही आला.

किती प्रचंड मोठी लोकसंख्या वाढवून ठेवलीय मनुष्य प्राण्याने या पृथ्वीवर! मनुष्य म्हणे अतिशय बुद्धिमान प्राणी. कसला बुद्धिमान? त्याला साधे अर्थशास्त्र कळत नाही आणि विकासाच्या गप्पा मारतोय. विकासी उद्योगात निर्माण झालेली विषारी रसायने, घाण, कचरा, सांडपाणी सरळ शुद्ध पाण्याच्या नद्यांत सोडून देतोय आणि नद्यांना गटारे बनवतोय. वर कहर हा की या गटारी नद्यांचे किनारे सुशोभित करतोय स्वतःच्या करमणूकीसाठी. याच गटारी नद्यांत तो परमेश्वराचे निर्माल्य सोडून देतोय. काय म्हणावे या मानवी बुद्धीला! परमेश्वर खरंच  कपाळावर हात मारून बसला असेल का त्याची निर्मिती असलेल्या  माणसाची ही बुद्धी बघून? बेडमेट वाचून माझ्या बुद्धीचे मात्र खोबरे झाले!

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१२.२०२३

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

शिक्षण व कृतीचे कालचक्र!

शिक्षण व कृतीचे कालचक्र!

मूलभूत जैविक वासना व उदात्त भावना या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत ज्या प्रेरणांचे समाधान करण्यासाठी मानवी बुद्धी सभोवतालच्या वातावरणातील पूरक घटकांचे अगोदर ज्ञान मिळवते व नंतर त्या घटकांवर ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती करते.

ज्ञानार्जन ही जशी बौद्धिक कृती आहे तशीच ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती हीही बौद्धिक कृती आहे. फरक हा की शिक्षण किंवा ज्ञानार्जन कृती ही फक्त मानसिक असते तर प्रत्यक्ष कृती ही मानसिक व शारीरिक असते.

वासना व भावना या दोन नैसर्गिक प्रेरणांच्या समाधानासाठी आवश्यक असलेल्या दोन कृती म्हणजे शिक्षण किंवा ज्ञानार्जन कृती व ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती या मूलतः बौद्धिक क्रिया आहेत. या दोन्ही बौद्धिक क्रिया जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत चालू राहतात. पण त्यांच्या विकासाची पातळी बालपण, तारूण्य व वृद्धावस्था या जीवनाच्या तीन टप्प्यांवर वेगळी असते व जोरही या तीन टप्प्यांवर वेगळा असतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१२.२०२३

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

संसार सोपा नाही!

संसार सोपा नाही!

या बातमीतील परिस्थितीतून मी गेलोय. वकिली नीट चालत नव्हती. महिना ५०० रूपयावर सिनियर वकिलाच्या हाताखाली केसेसची बंडले व कायद्याची पुस्तके उचलत या कोर्टातून त्या कोर्टात फिरत होतो. गरीब कामगार कुटुंबात जन्म पण मोठ्या कष्टाने उच्च शिक्षण घेतले. आजूबाजूला नोकरी एके नोकरी करणाऱ्यांचा गोतावळा. वकिलीत कोणाचे मार्गदर्शन नाही की पाठिंबा. पण वकिली सोडायची नाही, नोकरी करायची नाही ही जिद्द. पत्नी गृहिणी व मुलगी शाळेत. व्यापारी असोसिएशनचा कायदा सल्लागार म्हणून दरमहा ५०० रूपये मानधन मिळू लागले म्हणून सिनियर वकिलाचे स्टायपेंड ५०० रूपये धरून महिना १००० रूपये वकिलीतून कमाई सुरू होती. तो काळ होता १९८८ ते १९९० चा. तरीही त्याकाळी महिना १००० रूपये कमाई म्हणजे भयंकर गरिबी. मुलीच्या शाळेची फी भरता येत नव्हती व संसाराच्या दैनंदिन खर्चासाठी उसनवारी करावी लागत होती. उसने घेतलेले पैसे वेळेवर फेडता आले नाही की कर्जदार मागे लागायचे. घरी शेती नाही की वडिलोपार्जित इस्टेट नाही. तरीही हिंमत सोडली नाही. वकिली चालूच ठेवली. कमी फी मध्ये माझ्या ज्ञानाचा वापर सुरूच होता. एवढे शिक्षण घेऊन हेच का फळ असे सारखे मनात येत होते. पण कित्येक वेळा उच्च शिक्षणाची अवहेलना व मानहानी सहन करून संसाराची जबाबदारी नेटाने पार पाडली. एकच  मुलगी पण बापाचे कष्ट बघून कष्टाने शिकली. मोठ्या पगाराच्या उच्च पदाला पोहोचली. उच्च शिक्षित व उच्च पदस्थ तरूणाशी विवाह करून मोठ्या घरात संसारात स्थिर झाली. माझी व माझ्या पत्नीची आराधना सफल झाली. पतीने कुटुंबाकडे दुर्लक्ष केले म्हणून विवाहित स्त्रीने दोन मुलींसह रेल्वेखाली आत्महत्या केली ही दिनांक २ डिसेंबर २०२३ च्या लोकसत्तेतील बातमी वाचली आणि मन हेलावून गेले. संसार सोपा नाही एवढेच मी म्हणेन!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१२.२०२३

वकिलीतून निवृत्त झालो हो!

वकिलीतून निवृत्त झालो हो!

काही माणसे गर्विष्ठ, वर्चस्ववादी असतात तशीच काही राष्ट्रेही. शीत युद्धात सोव्हिएट रशिया अमेरिकाला भारी पडू लागली म्हणून अमेरिकेने रशियाविरूद्ध चीनला वापरून घेतले. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री किसिंजर हे जितके बुद्धिमान तितके कुटील व निर्दयीही. आणि मग चीनने अमेरिकन मैत्रीचा फायदा उठवून पूर्वीच्या बलवान रशियाची जागा घेतली तेंव्हा मात्र वर्चस्ववादी अमेरिकेला चांगलेच झोंबले व तिला आता भारताला जवळ करावे असे वाटू लागले. भारताला चीनविरूद्ध वापरून घेण्याची अमेरिकेची ही कुटील चाल तर नव्हे ना? अहो, मी शेवटी वकील आहे ना म्हणून ही रास्त शंका. भारताने अशा कुटील कारस्थानी अमेरिकेपासून सावध रहायला हवे. मानवी स्वभाव  मुळातच हा असा महास्वार्थी, कुटील व कारस्थानी आहे. त्या स्वभावाला परमेश्वराचे अध्यात्म व धर्म विरूद्ध अधर्म यातील संघर्षाचे तत्वज्ञान सांगणारे धर्मग्रंथ काय ताळ्यावर आणणार? यावर उपाय म्हणून लकडीशिवाय मकडी वळत नाही या न्यायाने अधर्माला (अन्यायी वर्तन) शिक्षेची भीती दाखवणारा कायदा बुद्धिमान माणसांनी बनवला आणि त्यासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले. पण हे कायद्याचे राज्य शेवटी चालवतेय कोण तर महास्वार्थी, कुटील, कारस्थानी राजकीय मंडळी. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी न्याययंत्रणा निर्माण केली गेली तरी ती या कुटील, कारस्थानी राजकीय मंडळी बरोबर किती संघर्ष करीत राहणार? तिलाही तिच्या मर्यादा आहेतच ना! या असल्या कुटील कारस्थानी जगात माझ्यासारख्या सरळमार्गी, प्रामाणिक वकिलाची काय डाळ शिजणार?अमेरिका कशी इतर राष्ट्रांना वापरून घेते तसेच मला म्हणजे माझ्या स्वकष्टार्जित ज्ञानाला श्रीमंतांनी चांगलेच वापरून घेतले. माझी वकिली कसली तर कमी फी मध्ये स्वतःचे शोषण करून घेत श्रीमंतांना कायद्याच्या ज्ञानाची मदत करून श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्याची वकिली. मी गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक गरीब वकील. मी गरिबांची कसली वकिली करणार? माझीच खायची पंचाईत आणि गरिबांकडून फी ची अपेक्षा करून माझी वकिली किती आणि कशी चालणार? मग वापरू दिले श्रीमंतांना काही दिवस माझ्या त्या मौल्यवान ज्ञानाला. आता मात्र या चालू लोकांचा उबग आला. म्हणून काय केले तर दिली वकिली सोडून म्हणजे वकिलीतून निवृत्त झालो हो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१२.२०२३

मै दिये की ऐसी बाती

मै दिये की ऐसी बाती, जल ना सकी जो बुझ भी ना पाती, आ मिल मेरे जीवन साथी, आजा रे परदेसी! १९५८ च्या मधुमती चित्रपटातील या गाण्यात वैजयंती माला स्वतःला अशा वातीची उपमा देत आहे की ती जळूही शकत नाही व विझूही शकत नाही. अर्थात या वातीला जळून ज्योत होण्याची मनोमन इच्छा आहे. पण या वातीला पेटवून तिची मंद ज्योत बनवणारा अग्नी कुठे आहे, ते चैतन्य कुठे आहे? त्या अग्नीची, त्या चैतन्याची तिला आस आहे. जगात अशा भक्कम आधारासाठी व्याकूळ असलेली बरीच निराधार माणसे जगत आहेत. -©ॲड.बी.एस.मोरे, अर्थ संवादी 

साद प्रतिसाद!

व्हॉटसॲप हे संवादाचे चांगले माध्यम आहे, पण?

सर्वांनाच स्वतःच्या लिखाणातून किंवा वक्तृत्वातून मनातले विचार व्यक्त करता येत नाहीत कारण लेखन व वक्तृत्व ही कला आहे. ती सर्वांना साध्य असलीच पाहिजे हा माझा विचार चुकीचा. व्हॉटसॲप हे समाजमाध्यम असले तरी ते तसे वैयक्तिक संवादाचे माध्यम आहे. यु ट्युब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादी माध्यमे ही विशाल सार्वजनिक संवादासाठी असलेली समाजमाध्यमे होत. अशा संवादात वैयक्तिक संवाद खूपच कमी असतो. पूर्वी व्हॉटसॲप नव्हते तेंव्हा माणसे फोन करून प्रत्यक्ष संवाद साधायची जो वैयक्तिक स्वरूपाचा असायचा. व्यावहारिक संबंधात सुद्धा प्रत्यक्ष फोनाफोनी व्हायची.

व्हॉटसॲप संपर्कात असलेल्या माझ्या नातेवाईक व मित्रमंडळींनी माझ्यासारखे स्वतंत्र लिखाण करून त्यांची स्वनिर्मितीच मला शेअर करावी, इतरांचे विचार, व्हिडिओ मला शेअर करू नयेत कारण ते इतर माध्यमातून फिरत असतात हा माझा विचार मुळातच चुकीचा व म्हणून माझी चूक मान्य करून तो विचार मी मागे घेत आहे. याबाबतीत मी माझ्या एका बहिणीचे उदाहरण देतो. ती मला म्हणते "दादा, मला तुझ्यासारखे लिहिता येत नसले तरी तू जे लिहितो ते मी वाचते व ते मला समजते. मग ती मला अधूनमधून प्रत्यक्ष फोन करून बोलते किंवा काही सेकंदाच्या तिच्या आवाजात ध्वनीफिती बनवून मला व्हॉटसॲप वर पाठवून माझ्या व्हॉटसॲप लेखनावर थोडक्यात प्रतिसाद देते. ही तिची पद्धत मला खूप आवडते. इतर काही नातेवाईक व मित्रमंडळी सुद्धा अधूनमधून थोडक्यात लिहून प्रतिसाद देत असतात. काही मंडळी बराच काळ नुसत्याच दोन निळ्या पाठवून देतात. त्यांचा हा विचित्र प्रतिसाद मी काही दिवस सहन करतो व नंतर मात्र त्यांना सरळ ब्लॉक करून टाकतो.

माझे एवढेच म्हणणे आहे की, जर तुम्हाला माझ्यासारखे लिखाणातून, व्हिडिओतून व्यक्त होता येत नसेल तर इतरांचे चांगले विचार, चांगले व्हिडिओ मला जरूर पाठवा. त्यातून तुम्हाला मला काय सांगायचे आहे हे मी समजून घेईन व त्यावर माझी योग्य प्रतिक्रियाही देईन. पण असे इतरांचे लेख, व्हिडिओ मोठे असले तर मला लगेच प्रतिक्रिया देता येणार नाही. तरीही उगाच दिसला व्हिडिओ आणि पाठवला असे व्हायला नको. तुम्हाला तुमच्या मनातील विचार, भावना ज्यातून व्यक्त करायच्या आहेत तेवढेच साहित्य पाठवा. केवळ विविध माध्यमांतून माहितीचा महापूर ओसंडून वाहतोय म्हणून त्यातून सहज हाताशी येईल ते उचलून काहीतरी पाठवायचे म्हणून उगाच पाठवू नका. ही वैयक्तिक संवादाची पद्धत नव्हे. थोडक्यात काय तर व्हॉटसॲप हे संवादाचे चांगले माध्यम आहे पण सुसंवाद घडण्यासाठी दोन्ही बाजूंनी योग्य साद, प्रतिसाद हवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २.१२.२०२३