https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

विविधता, समरसता, सहजता, समता!

विविधतेत समरसता व सहजता आहे, पण समता (समानता) नाही!

(१) मानव समाजात माणसे सारखी का वागत नाहीत हा मला सतावणारा एक वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न! माणसे व त्यांची माणुसकी हा सुद्धा याच प्रश्नाला चिकटलेला दुसरा एक प्रश्न! माणसे इथून तिथून सारखीच! समता व बंधुत्व हे शब्द किती गोड! मन प्रसन्न होऊन जाते हे शब्द ऐकताना, वाचताना. पण हे खरेच असे आहे का?

(२) माणसे इथून तिथून सारखीच, त्यांच्या  सभोवतालचे नैसर्गिक पर्यावरण सारखेच, त्यांच्यावर असलेला निसर्गाचा प्रभाव पण सारखाच, पण या सारखेपणात जगणाऱ्या  माणसांचे विचार व वर्तन सारखे का नाही हा मला सारखा सतावणारा मूलभूत वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न!

(३) मग वरील प्रश्नातून बाहेर पडलेला माझा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने माणसांना दिलेली शरीरे व वासना-भावना-बुद्धी या तिन्हींचा संगम असलेली मने सारखी नाहीत का? मग आणखी पुढे पडणारा प्रश्न हा की, निसर्गाने सृष्टीत जशी विविधता निर्माण केलीय तशी माणसांच्या शरीर व मनातही विविधता निर्माण केलीय का? मग वरील विचारातून पडणारा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने जर सृष्टीप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केली असेल तर मग त्यांच्यात समानता कुठून येणार?

(४) वरील प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मला कळलेले नैसर्गिक सत्य हे आहे की, निसर्गाने माणसे अगदी तंतोतंत सारखी केली नाहीत. म्हणून तर मराठीत एक म्हण आहे की हात एक असला तरी हाताची सर्व बोटे सारखी नसतात. निसर्गाने सृष्टीच्या रचनेप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केलीय आणि म्हणून तर माणसांचे धर्म सारखे नाहीत, त्यांच्या भाषा सारख्या नाहीत, त्यांच्या संस्कृती सारख्या नाहीत. निसर्गाने जर सृष्टीप्रमाणेच विविधता प्रधान रचना माणसांतही निर्माण केली आहे तर मग त्यांच्यात समानता कुठून आणणार?

(५) विविधतेने नटलेल्या सृष्टीत समरसता आहे म्हणजे सृष्टीतील विविध आकारी, विविध गुणधर्मी पदार्थ एकमेकांशी समरसतेच्या एका समान धाग्याने बांधले आहेत, ते समरसतेच्या धाग्याने एकमेकांशी निगडीत आहेत. अशा विविध पदार्थांना एकमेकांशी जोडणारा हा समरसतेचा धागा समान असला तरी या विविध  पदार्थांत व त्यांच्या समरसी देवाणघेवाणीच्या जोडणीत समानता नाही अर्थात सर्वांना ५०ः५० टक्के असा समान न्याय नाही.

(६) वरील नैसर्गिक सत्य लक्षात घेऊन भारतीय   संविधानात वाजवी वर्गीकरण (reasonable classification) व त्याबरोबर वाजवी बंधने (reasonable restrictions) या महत्वाच्या तरतूदींचा समावेश केला आहे. या तरतूदी या मूलभूत नैसर्गिक तरतूदी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याच तरतूदीनुसार समान काम, समान वेतन व असमान काम, असमान वेतन हे मूलभूत नैसर्गिक तत्व मानवी श्रम कायद्यात समाविष्ट केले आहे. म्हणून तर औद्योगिक कारखान्यात व्यवस्थापक व कामगार यांच्या पगारात तफावत असते. याच नैसर्गिक तत्वाने समान वर्तणूकीला समान कायदा व असमान वर्तणूकीला असमान कायदा हे नैसर्गिक तत्व अधोरेखित होते.

(७) या लेखाचा सार हाच आहे की, माणसांनी कितीही ठरवले तरी त्यांच्यात पूर्ण समानता निर्माण होणे केवळ अशक्य आहे. समानतेचा असा कायदा करून का मानव समाजात अशी ओढूनताणून कृत्रिमपणे पूर्ण समानता निर्माण करता येऊ शकेल? अशा कृत्रिम समानतेत नैसर्गिक सहजता कशी असेल? साम्यवाद जर अशा कृत्रिम समानतेचा आग्रह धरीत असेल तर तो आग्रह अनैसर्गिक होय. म्हणून नैसर्गिक विविधता, समरसता, सहजता, पदार्थांतील मोजकी समानता (समता) व त्यासोबत सर्व विविध पदार्थांतील असमानता (असमता) ही नैसर्गिक तथ्ये व सत्ये नीट समजून घेतली पाहिजेत.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.१०.२०२०

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

हळदी कुंकू!

हळदी कुंकू!

हळदी कुंकू म्हणजे पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण.... 

हळदीकुंकू या विषयावर लिखाण करताना महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे. कोणाला बरं वाटाव कोणी मला चांगले म्हणावे म्हणून मी कधीही लिखाण केले नाही.

ज्या सणामध्ये पती मयत झालेल्या स्त्रिया, शहीद जवानांच्याच्या वीर पत्नी व आत्महत्या शेतकर्‍यांच्या पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आज ही समर्थन करत नाही या पुढे करणार नाही. संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रम घरोघरी गल्लीबोळात दिसतात. हळदी कुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटून थटून एकमेकींना हळदी कुंकू लावतात व भेटवस्तू देतात. हे हळदी कुंकू त्याच स्त्रिया लावतात ज्यांचा पती जिवंत आहे. हा कार्यक्रम करत असताना त्या महिलेचा नवरा असणे अपेक्षित आहे. तिला सवाष्णी असे म्हणतात.

देशाच्या सिमेवर शहीद झालेल्या वीर पत्नीला कधी सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी पाहिले नाही. जेव्हा तुम्ही नटूनथटून तुम्ही हळदीकुंकू समारंभात जाता तेव्हा ज्या महिलांचे पती जिवंत नाहीत त्यांच्या मनात सतत येत असते माझे पती असते तर मीही अशी नटली असते. फक्त महिला बोलतात एका स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. कधी पती नसलेल्या महिलांचे हळदीकुंकू विषयावर मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? सतत त्यांना हेतू पुरस्सर अपमानीत केल जाते. का यांना सन्मानपूर्वक वागणूक देणारा सण असू शकत नाही का? कोणत्या शुभ कार्यात त्यांना पुढे येऊन देत नाही. ती चुकून त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्यावर रागावले जाते. असं का  अपमानीत जीवन जगायचे. 

"नवरा असणे" हाच केंद्रबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करणार का? खरंतर जास्तीची भावनिक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेंव्हा अपमानीत न करता त्यांना सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.

पती नसलेल्या स्त्रियांना अपमानीत करणारे सण, उत्सव, प्रथा अजून किती काळ चालू ठेवायच्या? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळ सरळ 'विषमतेला' खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षे पाळायचे ? पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त 'सौभाग्यवती भवः' असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!

वर्षानुवर्षे चालत आलेल्या या मानसिक गुलामगिरीचं काय? परंपरांच्या नावाखाली चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय?  मूग गिळून गप्प बसणार का ?
आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू?

शिकलेला स्त्री, पुरुष समाज आपल्या परिवार, समाजाला अनिष्ट रूढी, परंपरा, यातून मुक्त करु शकत नाही त्या शिक्षणाचे काय उपयोग? शिक्षण याला म्हणावे जे घेतल्यानंतर चांगले वाईट यातील फरक समजतो व वाईट कृतीला विरोध करतो.आता आपण बदलायला हवं. नवरा नसलेल्या स्रीलाही सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे.

साभार🙏

(फेसबुक कॉपी पेस्ट)

एकाकीपणा!

आयुष्याच्या अखेरीस येणारे एकटेपणाचे दुःख भयंकर!

आज दिनांक ११.१०.२०२० च्या रविवारच्या लोकसत्तेत आयुष्याच्या अखेरीस एकाकीपणा असह्य झाल्याने अरण्य जीवनावर सतत लेखन करणारे प्रसिद्ध लेखक मारूती चितमपल्ली यांना नागपूर सोडून सोलापूरला स्थलांतर करावे लागले ही बातमी वाचून काळजात धस्स झाले. आधी त्यांची पत्नी गेली, मग मुलगीही काळाने हिरावून नेली. मग लेखकाची वैयक्तिक  काळजी घ्यायला घरी कोणीच नाही. बाहेरून भरपूर मानसन्मान मिळवलेले. पण बाहेरची मंडळी वैयक्तिक काळजी घ्यायला घरी रहात नाहीत. बायको नाही, मुलगी नाही. मग घरात एकटेच मरून पडू की काय ही भीती मनाला सतत सतावू लागली. आयुष्याच्या अखेरीस आलेला हा एकाकीपणा खायला उठला. म्हणून शेवटी नागपूर ही कर्मभूमी सोडून चितमपल्ली यांनी सोलापूरला जायचे ठरवले. कारण काय तर तिथे त्यांचा पुतण्या आहे म्हणून. शेवटी काय तर बाहेरची माणसे तुमच्या उपयोगाला येत नाहीत. तुमच्यावर माया प्रेम करणारी तुमची जवळची माणसेच तुमच्या उपयोगाला येतात. असे नातेवाईक आयुष्यात शेवटपर्यंत जवळ असणे हेच जगातील सर्वात मोठे सुख आहे हेच वरील उदाहरणावरून सिद्ध होते. जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, तुमचा फायदा आहे तोपर्यंतच बाहेरचे लोक तुमच्या अवती भोवती घुटमळतील. वयानुसार तुम्ही त्यांना निरूपयोगी झालात की तुमचे कौतुक करणारी हीच मंडळी तुम्हाला टाटा, बाय बाय करून दूर निघून जातील. म्हणून सार्वजनिक लोकप्रियता, घराबाहेर मिळणारा मानसन्मान याची नशा डोक्यात शिरू देऊ नका. हा खेळ क्षणिक असतो. आयुष्याच्या अखेरीस जेंव्हा शरीर थकते व मन खचते तेंव्हा या खेळातील हवा फुस्स होते. दुसरे एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचा एक वयस्कर पुरूष क्लायंट आहे. भरपूर पैसा जवळ, मुंबईत आलिशान फ्लॅट पण पैशाच्या मस्तीत राहून लग्न केले नाही. मुंबईतील मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये आता एकटाच राहतोय. पण पैशाच्या मस्तीत सगळे जवळचे, लांबचे नातेवाईक दूर ठेवले. आता आयुष्याच्या अखेरीस जवळ कोणीच नाही. त्याने लग्न केले असते तर त्याच्या जवळ निदान बायको, मुले तरी असती त्याची काळजी घ्यायला. कोरोना लॉकडाऊन काळात तर या जीवघेण्या एकाकीपणामुळे त्याची हालत खूप खराब झाली. एकही नातेवाईक जवळ आला नाही. पैशाला मिठीत घेऊन जग आता शेवटचे आयुष्य असे ते म्हणाले. शेवटी एका मित्रालाच त्याची दया आली. तो मित्र पैशाने गरीब पण मनाने खूप श्रीमंत आहे. तो मित्र दररोज माझ्या या श्रीमंत क्लायंटच्या फ्लॅटवर दोन्ही वेळचे जेवण सकाळच्या नाष्ट्यासह आणून देतो. त्याचे पैसे मात्र घेत नाही. इथे तो पैसा किती भिकारी झाला बरे! अहो पण नुसते जेवण पुरेसे नसते आयुष्याच्या अखेरीस! मायाप्रेमाची माणसे जवळ लागतात तुमची आपुलकीने वैयक्तिक काळजी घेण्यासाठी! लोकप्रियता मिळवलेले मारूती चितमपल्ली व माझा श्रीमंत क्लायट यांची ही उदाहरणे खूप बोलकी आहेत. अखेरच्या आयुष्यात लोकप्रियता कामी आली नाही व पैसाही कामी आला नाही. फौजदारी  कायद्यात एकांतवासाची शिक्षा (solitary confinement) ही फार भयंकर मानली जाते. एकटेपणा हा खायला उठतो. म्हणून हजारो, लाखो लोकांची लोकप्रियता तुम्ही नाही मिळवली तरी चालेल पण मरेपर्यंत तुमची काळजी घेणारी मायाप्रेमाची थोडी जरी माणसे मिळवलीत तरी खूप मिळवलेत. विवाहसंस्था ही या दृष्टीने अत्यंत मोलाचे काम करीत आहे. आयुष्यातील तिचे महत्त्व जाणा! जीवनभर तुमची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार व तुमच्यावर प्रेम करणारी तुमची मुले व तसेच आपुलकीचे नातेवाईक हीच जगातील तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे हे कायम ध्यानात ठेवा! वरील दोन उदाहरणातून मला बस्स एवढेच सांगायचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©११.१०.२०२०

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!

विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!

सृष्टीकर्ता (ईश्वर) सृष्टीची नुसती रचना म्हणजे सृष्टीची आकारबद्ध निर्मिती करून गप्प बसला  नाही तर निर्माण केलेल्या सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी त्याने त्या सृष्टीत कायदेशीर व्यवस्थाही निर्माण केली. लक्षात घ्या की सृष्टी दृश्यमान आहे तशी सृष्टीची व्यवस्थाही दृश्यमान आहे. पण ही व्यवस्था ज्या जोरावर, ज्या प्रभावाखाली चालते तो ईश्वराच्या अधिकाराचा, सत्तेचा, हुकूमाचा प्रभाव मात्र सुप्त आहे, गुप्त आहे, अदृश्य आहे. म्हणजे ईश्वर अदृश्य व त्याचा प्रभावही अदृश्य! पण त्या अदृश्य प्रभावाची अप्रत्यक्षपणे जाणीव होतेय हे मात्र खरे! त्या सुप्त, अदृश्य प्रभावाची जाणीव जर अप्रत्यक्षपणे होतेय तर मग अदृश्य ईश्वराची अप्रत्यक्षपणे जाणीव नास्तिकांना का होत नाही हे कळायला मार्ग नाही. लोकशाहीत आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्यांच्या माध्यमातून कायदे बनवतो ते कुठून बनवतो? सृष्टीत असलेल्या मूलभूत व्यवस्थेतूनच ना! कायदे बनवतो म्हणजे काय करतो तर सृष्टीची आहे ती व्यवस्था आम्हाला समजावी म्हणून ती अधिक स्पष्ट करतो, तिला लिखित स्वरूपात समोर ठेवतो. नंतर हे लिखित कायदे आम्हीच निवडलेल्या आमच्या लोकप्रतिनिधी मार्फत राबवतो? पण राबवतो किंवा अंमलात आणतो म्हणजे काय करतो? तर सृष्टीच्या व्यवस्थेत अदृश्य ईश्वराचा जो अप्रत्यक्ष प्रभाव आहे त्या प्रभावाखाली राहून आम्ही सृष्टीची ती व्यवस्था अधिक स्पष्टपणे राबवतो. पण हे सर्व करायला आम्हाला कोण भाग पाडते तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! आम्हाला वाटते आम्हीच हे सर्व करतोय. पण आमच्यावर अप्रत्यक्ष प्रभाव टाकून आमच्याकडून करवून घेणारा कोण असतो तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा तो सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! म्हणजे ज्या अदृश्य ईश्वराने ही दृश्य सृष्टी रचली तोच ती सृष्टी तिच्या व्यवस्थेसह आम्हाला नकळत अर्थात अप्रत्यक्षपणे चालवत आहे. विश्वातील बऱ्याच गोष्टी विज्ञानापासून दूर व मानवाला अज्ञात आहेत. विश्वातील डार्क मॕटर ही अशीच अज्ञात गोष्ट! म्हणजे अप्रत्यक्ष पुराव्यातून हे डार्क मॕटर या विश्वात असल्याची जाणीव होतेय पण त्याचा प्रत्यक्ष पुराव्याने विज्ञानाला शोधच घेता येत नाही. त्या अदृश्य ईश्वराचे व त्याच्या अदृश्य, सुप्त प्रभावाचे हे असेच आहे अगदी त्या डार्क मॕटर सारखे! आता एकदा का हे कळले की, अदृश्य ईश्वर व त्याचा अदृश्य, सुप्त  प्रभाव हा विश्वातील डार्क मॕटर सारखा शोधता न येणारा, अनाकलनीय आहे मग हेही मनात निश्चित केले पाहिजे की तो अनाकलनीय असा  ईश्वर व त्याचा अनाकलनीय प्रभाव यांचा शोध घेण्यात व त्यात व्यर्थ चाचपडत बसण्यात अर्थ नाही. त्या अज्ञात, अदृश्य ईश्वराला व त्याच्या सुप्त प्रवाहाला त्याचे काम अप्रत्यक्षपणे करू द्यावे व आपण मात्र सृष्टीचे दृश्य स्वरूप व तिची दृश्य व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत सृष्टीच्या व्यवस्थेची स्वतःच्या बुद्धीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. असे करताना मनाला ईश्वरी शक्तीचा आधार वाटण्यासाठी अधूनमधून आत्मचिंतन करीत ईश्वराची प्रार्थना करायला मनाची काही हरकत नसावी.

-ॲड.बी.एस.मोरे©९.१०.२०२०

विश्व चिकित्सा!

जाणीव/आकलन!

विश्वाच्या मूर्त (concrete), दृश्य रूपाची (दृश्यमान विश्व शरीराची) प्रत्यक्ष जाणीव/ आकलन व विश्वातील अमूर्त (abstract), अदृश्य प्रभावाची (अतर्क्य, गूढ विश्व मनाची) अप्रत्यक्ष जाणीव/आकलन मानवी शरीर इंद्रियांना व अंतर्गत मानवी मनाला एकदम होत नाही. ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाणीव, ते आकलन विश्वाच्या सूक्ष्म निरीक्षणातून, सखोल प्रायोगिक अभ्यासातून हळूहळू होते. याच निरीक्षण व अभ्यास प्रवासातून पुढे पुढे जात असलेला मी माझे काही अभ्यासपूर्ण निष्कर्ष, मते या समाज माध्यमावर मांडतो तेंव्हा अभ्यासाची आवड नसणारी किंवा अभ्यासाचा कंटाळा करणारी उथळ मनाची काही माणसे माझ्या अभ्यासपूर्ण पोस्टसवर अशा पोरकट प्रतिक्रिया देतात की त्यांना समजावून सांगण्याचा उपद्व्याप करण्यापेक्षा त्यांना सोडचिठ्ठी देण्यातच मी धन्यता मानतो!

-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

सार्वजनिक जीवन व खाजगी जीवन!

समाज माध्यमावरील लाईक्स व कौटुंबिक जीवनातील लाईक्स यात फरक आहे!

खाजगी लाईक्स व सार्वजनिक लाईक्स यात फरक आहे. दोन्ही जीवनात अंतर आहे. सोशल मिडिया हे समाज माध्यम असल्याने ते खाजगी  नसून सार्वजनिक आहे. सार्वजनिक गोष्टी घरात मांडत बसल्या तर संसारात त्रास होऊ शकतो व घरच्या खाजगी गोष्टी सोशल मिडियावर उघड्या करीत बसल्या तर खाजगी जीवनाची वाट लागू शकते. दोन्हीत संतुलन राखा!

-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०

गरजेवर चैन भारी?

गरजेचा खून करण्याची संधी चैनीला देऊ नका!

सजीवांची जगण्याची गरज भागविण्यासाठी सृष्टीची रचना करणाऱ्या देवाने हवा, पाणी, अन्नधान्य मुबलक प्रमाणात दिले व कधीतरी चैन म्हणून अंगावर घालण्यासाठी सोने, हिरे, माणिक, मोती यांना दुर्मिळ केले. पण ज्या देवाने मनुष्याला बुद्धी दिली त्या बुद्धीचीच मनुष्याने पुरी वाट लावली. त्याने काय डोके चालवले तर देवाने जे मुबलक प्रमाणात दिले त्याची किंमत कमी केली व देवाने अल्प चैन म्हणून जे दुर्मिळ केले त्याची किंमत वाढवली.  मग काय दारू, सिगारेट, चित्रपट, नाट्य, संगीत कला, क्रिकेट सारखे खेळ या करमणूक प्रधान चैनीच्या गोष्टी सेलिब्रिटी झाल्या. या दुर्मिळ चैनीच्या गोष्टींचे अक्षरशः सोने झाले. शेतात कष्ट उपसणारा शेतकरी व उद्योगधंद्यात घाम गाळणारा कामगार मात्र या नीच मानसिकतेतून गरीब झाला. अतिशहाणी मूठभर मंडळी याला कारण काय देतात तर अशा कष्टकरी लोकांची संख्या मुबलक आहे व श्रीमंत भांडवलदार मूठभर असल्याने दुर्मिळ आहेत. अहो पण या मूठभर लोकांना दुर्मिळ व सेलिब्रिटी कोणी केले हो? देवाने का माणसाने? देवाने तर चांगली सृष्टी निर्मिली! पण त्याने एक चूक केली की माणसाला थोडी जास्तीची बुद्धी देऊन सृष्टीचे व्यवस्थापन माणसाच्या ताब्यात देऊन तो देव मोकळा झाला. हाच अनुभव पदोपदी येत आहे मग "ज्या प्रभूने या सृष्टीला रचले, तोच ही सृष्टी चालवत आहे" या देवाच्या भजनाला माझ्या सारख्या खोलात विचार करणाऱ्या माणसाने का बरे म्हणून गुणगुणत बसावे? तसे करीत बसले तर आभासात जगल्यासारखे होईल व सत्य लपले जाईल. मूठभर श्रीमंतांना व त्यांना गुपचूप मदत करणाऱ्या काही धूर्त राजकारणी  मंडळींना तर हेच हवे आहे की लोकांनी डोळे उघडून सत्य बघूच नये. त्यांनी डोळे झाकून कायमच आभासात जगावे. तेंव्हा लोकांनी "ठेविले अनंते तैसेची रहावे" हा विचार सोडून देऊन डोळे उघडणे गरजेचे आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनो तुम्ही आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणता कामा नये. तुम्ही असा विचार करून चैनीला गरजेचा खून करण्याची संधी देत आहात हे लक्षात घ्या!

-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०