https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
हळदी कुंकू!
एकाकीपणा!
आयुष्याच्या अखेरीस येणारे एकटेपणाचे दुःख भयंकर!
आज दिनांक ११.१०.२०२० च्या रविवारच्या लोकसत्तेत आयुष्याच्या अखेरीस एकाकीपणा असह्य झाल्याने अरण्य जीवनावर सतत लेखन करणारे प्रसिद्ध लेखक मारूती चितमपल्ली यांना नागपूर सोडून सोलापूरला स्थलांतर करावे लागले ही बातमी वाचून काळजात धस्स झाले. आधी त्यांची पत्नी गेली, मग मुलगीही काळाने हिरावून नेली. मग लेखकाची वैयक्तिक काळजी घ्यायला घरी कोणीच नाही. बाहेरून भरपूर मानसन्मान मिळवलेले. पण बाहेरची मंडळी वैयक्तिक काळजी घ्यायला घरी रहात नाहीत. बायको नाही, मुलगी नाही. मग घरात एकटेच मरून पडू की काय ही भीती मनाला सतत सतावू लागली. आयुष्याच्या अखेरीस आलेला हा एकाकीपणा खायला उठला. म्हणून शेवटी नागपूर ही कर्मभूमी सोडून चितमपल्ली यांनी सोलापूरला जायचे ठरवले. कारण काय तर तिथे त्यांचा पुतण्या आहे म्हणून. शेवटी काय तर बाहेरची माणसे तुमच्या उपयोगाला येत नाहीत. तुमच्यावर माया प्रेम करणारी तुमची जवळची माणसेच तुमच्या उपयोगाला येतात. असे नातेवाईक आयुष्यात शेवटपर्यंत जवळ असणे हेच जगातील सर्वात मोठे सुख आहे हेच वरील उदाहरणावरून सिद्ध होते. जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, तुमचा फायदा आहे तोपर्यंतच बाहेरचे लोक तुमच्या अवती भोवती घुटमळतील. वयानुसार तुम्ही त्यांना निरूपयोगी झालात की तुमचे कौतुक करणारी हीच मंडळी तुम्हाला टाटा, बाय बाय करून दूर निघून जातील. म्हणून सार्वजनिक लोकप्रियता, घराबाहेर मिळणारा मानसन्मान याची नशा डोक्यात शिरू देऊ नका. हा खेळ क्षणिक असतो. आयुष्याच्या अखेरीस जेंव्हा शरीर थकते व मन खचते तेंव्हा या खेळातील हवा फुस्स होते. दुसरे एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचा एक वयस्कर पुरूष क्लायंट आहे. भरपूर पैसा जवळ, मुंबईत आलिशान फ्लॅट पण पैशाच्या मस्तीत राहून लग्न केले नाही. मुंबईतील मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये आता एकटाच राहतोय. पण पैशाच्या मस्तीत सगळे जवळचे, लांबचे नातेवाईक दूर ठेवले. आता आयुष्याच्या अखेरीस जवळ कोणीच नाही. त्याने लग्न केले असते तर त्याच्या जवळ निदान बायको, मुले तरी असती त्याची काळजी घ्यायला. कोरोना लॉकडाऊन काळात तर या जीवघेण्या एकाकीपणामुळे त्याची हालत खूप खराब झाली. एकही नातेवाईक जवळ आला नाही. पैशाला मिठीत घेऊन जग आता शेवटचे आयुष्य असे ते म्हणाले. शेवटी एका मित्रालाच त्याची दया आली. तो मित्र पैशाने गरीब पण मनाने खूप श्रीमंत आहे. तो मित्र दररोज माझ्या या श्रीमंत क्लायंटच्या फ्लॅटवर दोन्ही वेळचे जेवण सकाळच्या नाष्ट्यासह आणून देतो. त्याचे पैसे मात्र घेत नाही. इथे तो पैसा किती भिकारी झाला बरे! अहो पण नुसते जेवण पुरेसे नसते आयुष्याच्या अखेरीस! मायाप्रेमाची माणसे जवळ लागतात तुमची आपुलकीने वैयक्तिक काळजी घेण्यासाठी! लोकप्रियता मिळवलेले मारूती चितमपल्ली व माझा श्रीमंत क्लायट यांची ही उदाहरणे खूप बोलकी आहेत. अखेरच्या आयुष्यात लोकप्रियता कामी आली नाही व पैसाही कामी आला नाही. फौजदारी कायद्यात एकांतवासाची शिक्षा (solitary confinement) ही फार भयंकर मानली जाते. एकटेपणा हा खायला उठतो. म्हणून हजारो, लाखो लोकांची लोकप्रियता तुम्ही नाही मिळवली तरी चालेल पण मरेपर्यंत तुमची काळजी घेणारी मायाप्रेमाची थोडी जरी माणसे मिळवलीत तरी खूप मिळवलेत. विवाहसंस्था ही या दृष्टीने अत्यंत मोलाचे काम करीत आहे. आयुष्यातील तिचे महत्त्व जाणा! जीवनभर तुमची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार व तुमच्यावर प्रेम करणारी तुमची मुले व तसेच आपुलकीचे नातेवाईक हीच जगातील तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे हे कायम ध्यानात ठेवा! वरील दोन उदाहरणातून मला बस्स एवढेच सांगायचे आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©११.१०.२०२०
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०
विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!
विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!
सृष्टीकर्ता (ईश्वर) सृष्टीची नुसती रचना म्हणजे सृष्टीची आकारबद्ध निर्मिती करून गप्प बसला नाही तर निर्माण केलेल्या सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी त्याने त्या सृष्टीत कायदेशीर व्यवस्थाही निर्माण केली. लक्षात घ्या की सृष्टी दृश्यमान आहे तशी सृष्टीची व्यवस्थाही दृश्यमान आहे. पण ही व्यवस्था ज्या जोरावर, ज्या प्रभावाखाली चालते तो ईश्वराच्या अधिकाराचा, सत्तेचा, हुकूमाचा प्रभाव मात्र सुप्त आहे, गुप्त आहे, अदृश्य आहे. म्हणजे ईश्वर अदृश्य व त्याचा प्रभावही अदृश्य! पण त्या अदृश्य प्रभावाची अप्रत्यक्षपणे जाणीव होतेय हे मात्र खरे! त्या सुप्त, अदृश्य प्रभावाची जाणीव जर अप्रत्यक्षपणे होतेय तर मग अदृश्य ईश्वराची अप्रत्यक्षपणे जाणीव नास्तिकांना का होत नाही हे कळायला मार्ग नाही. लोकशाहीत आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्यांच्या माध्यमातून कायदे बनवतो ते कुठून बनवतो? सृष्टीत असलेल्या मूलभूत व्यवस्थेतूनच ना! कायदे बनवतो म्हणजे काय करतो तर सृष्टीची आहे ती व्यवस्था आम्हाला समजावी म्हणून ती अधिक स्पष्ट करतो, तिला लिखित स्वरूपात समोर ठेवतो. नंतर हे लिखित कायदे आम्हीच निवडलेल्या आमच्या लोकप्रतिनिधी मार्फत राबवतो? पण राबवतो किंवा अंमलात आणतो म्हणजे काय करतो? तर सृष्टीच्या व्यवस्थेत अदृश्य ईश्वराचा जो अप्रत्यक्ष प्रभाव आहे त्या प्रभावाखाली राहून आम्ही सृष्टीची ती व्यवस्था अधिक स्पष्टपणे राबवतो. पण हे सर्व करायला आम्हाला कोण भाग पाडते तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! आम्हाला वाटते आम्हीच हे सर्व करतोय. पण आमच्यावर अप्रत्यक्ष प्रभाव टाकून आमच्याकडून करवून घेणारा कोण असतो तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा तो सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! म्हणजे ज्या अदृश्य ईश्वराने ही दृश्य सृष्टी रचली तोच ती सृष्टी तिच्या व्यवस्थेसह आम्हाला नकळत अर्थात अप्रत्यक्षपणे चालवत आहे. विश्वातील बऱ्याच गोष्टी विज्ञानापासून दूर व मानवाला अज्ञात आहेत. विश्वातील डार्क मॕटर ही अशीच अज्ञात गोष्ट! म्हणजे अप्रत्यक्ष पुराव्यातून हे डार्क मॕटर या विश्वात असल्याची जाणीव होतेय पण त्याचा प्रत्यक्ष पुराव्याने विज्ञानाला शोधच घेता येत नाही. त्या अदृश्य ईश्वराचे व त्याच्या अदृश्य, सुप्त प्रभावाचे हे असेच आहे अगदी त्या डार्क मॕटर सारखे! आता एकदा का हे कळले की, अदृश्य ईश्वर व त्याचा अदृश्य, सुप्त प्रभाव हा विश्वातील डार्क मॕटर सारखा शोधता न येणारा, अनाकलनीय आहे मग हेही मनात निश्चित केले पाहिजे की तो अनाकलनीय असा ईश्वर व त्याचा अनाकलनीय प्रभाव यांचा शोध घेण्यात व त्यात व्यर्थ चाचपडत बसण्यात अर्थ नाही. त्या अज्ञात, अदृश्य ईश्वराला व त्याच्या सुप्त प्रवाहाला त्याचे काम अप्रत्यक्षपणे करू द्यावे व आपण मात्र सृष्टीचे दृश्य स्वरूप व तिची दृश्य व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत सृष्टीच्या व्यवस्थेची स्वतःच्या बुद्धीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. असे करताना मनाला ईश्वरी शक्तीचा आधार वाटण्यासाठी अधूनमधून आत्मचिंतन करीत ईश्वराची प्रार्थना करायला मनाची काही हरकत नसावी.
-ॲड.बी.एस.मोरे©९.१०.२०२०
विश्व चिकित्सा!
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०
सार्वजनिक जीवन व खाजगी जीवन!
समाज माध्यमावरील लाईक्स व कौटुंबिक जीवनातील लाईक्स यात फरक आहे!
खाजगी लाईक्स व सार्वजनिक लाईक्स यात फरक आहे. दोन्ही जीवनात अंतर आहे. सोशल मिडिया हे समाज माध्यम असल्याने ते खाजगी नसून सार्वजनिक आहे. सार्वजनिक गोष्टी घरात मांडत बसल्या तर संसारात त्रास होऊ शकतो व घरच्या खाजगी गोष्टी सोशल मिडियावर उघड्या करीत बसल्या तर खाजगी जीवनाची वाट लागू शकते. दोन्हीत संतुलन राखा!
-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०
गरजेवर चैन भारी?
गरजेचा खून करण्याची संधी चैनीला देऊ नका!
सजीवांची जगण्याची गरज भागविण्यासाठी सृष्टीची रचना करणाऱ्या देवाने हवा, पाणी, अन्नधान्य मुबलक प्रमाणात दिले व कधीतरी चैन म्हणून अंगावर घालण्यासाठी सोने, हिरे, माणिक, मोती यांना दुर्मिळ केले. पण ज्या देवाने मनुष्याला बुद्धी दिली त्या बुद्धीचीच मनुष्याने पुरी वाट लावली. त्याने काय डोके चालवले तर देवाने जे मुबलक प्रमाणात दिले त्याची किंमत कमी केली व देवाने अल्प चैन म्हणून जे दुर्मिळ केले त्याची किंमत वाढवली. मग काय दारू, सिगारेट, चित्रपट, नाट्य, संगीत कला, क्रिकेट सारखे खेळ या करमणूक प्रधान चैनीच्या गोष्टी सेलिब्रिटी झाल्या. या दुर्मिळ चैनीच्या गोष्टींचे अक्षरशः सोने झाले. शेतात कष्ट उपसणारा शेतकरी व उद्योगधंद्यात घाम गाळणारा कामगार मात्र या नीच मानसिकतेतून गरीब झाला. अतिशहाणी मूठभर मंडळी याला कारण काय देतात तर अशा कष्टकरी लोकांची संख्या मुबलक आहे व श्रीमंत भांडवलदार मूठभर असल्याने दुर्मिळ आहेत. अहो पण या मूठभर लोकांना दुर्मिळ व सेलिब्रिटी कोणी केले हो? देवाने का माणसाने? देवाने तर चांगली सृष्टी निर्मिली! पण त्याने एक चूक केली की माणसाला थोडी जास्तीची बुद्धी देऊन सृष्टीचे व्यवस्थापन माणसाच्या ताब्यात देऊन तो देव मोकळा झाला. हाच अनुभव पदोपदी येत आहे मग "ज्या प्रभूने या सृष्टीला रचले, तोच ही सृष्टी चालवत आहे" या देवाच्या भजनाला माझ्या सारख्या खोलात विचार करणाऱ्या माणसाने का बरे म्हणून गुणगुणत बसावे? तसे करीत बसले तर आभासात जगल्यासारखे होईल व सत्य लपले जाईल. मूठभर श्रीमंतांना व त्यांना गुपचूप मदत करणाऱ्या काही धूर्त राजकारणी मंडळींना तर हेच हवे आहे की लोकांनी डोळे उघडून सत्य बघूच नये. त्यांनी डोळे झाकून कायमच आभासात जगावे. तेंव्हा लोकांनी "ठेविले अनंते तैसेची रहावे" हा विचार सोडून देऊन डोळे उघडणे गरजेचे आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनो तुम्ही आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणता कामा नये. तुम्ही असा विचार करून चैनीला गरजेचा खून करण्याची संधी देत आहात हे लक्षात घ्या!
-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
रचा है सृष्टी को जिस प्रभू ने, वही ये सृष्टी चला रहे है!
निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझी मूलभूत नैसर्गिक श्रद्धा आहे!
(१) आपल्याकडून जाणीवपूर्वक केली जाणारी कृती ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष कृती असते. ती आपल्या जागृत मनाने संपादन केलेल्या आपल्या ज्ञानावर आधारित असते. अशा कृतीची अचूकता ही ते ज्ञान नीट समजून घेण्याच्या आपल्या जागृत मनाच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून असते. अशी कृती जागृत मनाकडून कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत केली जाते. जागृत मन म्हणजे जागे असलेले मन. झोपी गेलेले मन अशी जाणीवपूर्वक कृती करू शकत नाही. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या क्रिया या ऐच्छिक क्रिया होत. पण काही क्रिया झोपेतही अजाणतेपणे केल्या जातात. उदा. प्रतिक्षिप्त क्रिया. आपल्या अजाणतेप्रमाणे केल्या जाणाऱ्या या क्रिया आपल्या जागृत मनाच्या विश्रांती (झोप) काळात आपल्या अजागृत मनाकडून गुपचूप केल्या जातात. या क्रियांना अनैच्छिक क्रिया म्हणतात. ऐच्छिक क्रिया आपल्या मोठ्या मेंदूकडून व अनैच्छिक क्रिया आपल्या छोट्या मेंदूकडून पार पाडल्या जातात. पण हे दोन्ही मेंदू हे एकाच मेंदूचे दोन भाग आहेत.
(२) याच विज्ञानाचा आधार घेत मी अधिक खोलात जाऊन विचार केला तेंव्हा कळले की आपल्या जागृत मनावर आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो व त्या प्रत्यक्ष प्रभावाखालीच आपले जागृत मन जाणीवपूर्वक कृती करते व त्या कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेते. पण मग आपल्या अजागृत मनावर कोणाचा प्रभाव असतो? ते अजागृत मन आपोआप आपल्या अजाणतेपणे कसे कार्य करते? या अप्रत्यक्ष प्रभावाची आपल्या जागृत मनाला बिलकुल जाणीव नसते काय? मग आपले जागृत मन झोपेत स्वप्ने बघते, त्या स्वप्नांचा अप्रत्यक्षपणे अनुभव घेते त्याचे काय करायचे? आपल्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेला जाणीव म्हणूच नये काय?
(३) निसर्ग (निसर्ग म्हणजे पदार्थांनी बनलेली सृष्टी) ही प्रत्यक्ष अनुभव घेता येणारी गोष्ट आहे. पण मग निसर्गात असलेल्या अप्रत्यक्ष प्रभावाचे काय करायचे? त्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावाचाही अनुभव येतोच की आपल्या जागृत मनाला! या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर आपल्या जागृत मनाचे नियंत्रण आहे का? मग आपला लिखित कायदा कशाचे नियंत्रण करतोय? कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय? आपल्या समाजाच्या लिखित कायद्याने फक्त आपल्या जागृत मनाच्या प्रत्यक्ष कृतीवर ध्यान देता येते व तिचे नियंत्रण करता येते. निसर्गातील गूढ शक्तीवर, आपल्या अजागृत मनावर असलेल्या तिच्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर व त्या अप्रत्यक्ष प्रभावाखाली आपल्या अजागृत मनाकडून केल्या जाणाऱ्या अप्रत्यक्ष कृतीवर (अनैच्छिक क्रियांवर) आपल्या लिखित कायद्याचे नियंत्रण प्रस्थापित होणे केवळ अशक्य आहे. आपल्या जागृत मनाचेच या गूढ शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण नाही तर मग आपल्या जागृत समाजमनाकडून निर्माण केल्या गेलेल्या व केल्या जात असणाऱ्या लिखित कायद्याचे अशा गूढ नैसर्गिक शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण प्रस्थापित होणे कसे शक्य आहे?
(४) म्हणून माझे हे म्हणणे आहे की, निसर्गाच्या विज्ञानाची व समाजाच्या कायद्याची जाणीव ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष जाणीव होय तर निसर्गातील गूढ शक्तीची व त्या शक्तीच्या गुप्त प्रभावाची जाणीव ही आपल्या जागृत मनाची अप्रत्यक्ष जाणीव होय. मानवी मनाच्या याच अप्रत्यक्ष जाणिवेतून निसर्गातील देवावर मानवी मनाची श्रद्धा निर्माण झाली असावी. जगात देवावर श्रद्धा ठेवणारे जे धर्म आहेत ते याच नैसर्गिक श्रद्धेवर आधारित आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. हे देवधर्म जागृत मानवी मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून आपोआप, सहज नैसर्गिकपणे निर्माण झाले असावेत असे मला वाटते. निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझ्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून निर्माण झालेली मूलभूत नैसर्गिक श्रद्धा असल्याने मी तिच्यावर ठाम आहे!
-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०