https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

माझ्या ज्ञानाची शोकांतिका!

माझ्या ज्ञानाची शोकांतिका!

मी एकटाच करतोय माझ्या लेखनाचा सगळा उपद्व्याप! मी काय विचार करतोय, काय लिहितोय याच्याशी माझी पत्नी व एकुलती एक उच्च शिक्षित मुलगी यांना काहीही घेणे देणे नाही, मग इतर नातेवाईक किंवा मित्रांची गोष्टच सोडा. मी पहिली दोन फेसबुक खाती अशीच वैतागून बंद केली. ५०० ते १००० पर्यंत पोस्टस साठल्या होत्या तिथे. पण एखादा संशोधक वैतागून स्वतःच्या हस्तलिखित वह्या फाडतो त्याप्रमाणे फेसबुकवर जतन केलेला तो लेखन साठा डिलिट करून टाकला. आता हे तिसरे फेसबुक खाते मी उघडलेय. कारण डोक्यात साठलेले ज्ञान व त्यावर निर्माण होत असलेले विचार कुठेतरी शेअर केल्याशिवाय मला स्वस्थ बसवत नाही. हा माझा एकखांबी मोठा बौद्धिक कारखाना आहे. देवाने म्हणा नाहीतर निसर्गाने म्हणा माझ्या डोक्यात बळ दिले, पण माझे पंख छाटून टाकलेत. त्यामुळे या ज्ञान व बुद्धीच्या बळावर उंच भरारी घेता येत नाही. मागच्या जुन्या फेसबुक खात्यावर मी छान लिहितो वगैरे बरीच स्तुती केली लोकांनी, पण त्या पलिकडे काही नाही. एक हैद्राबादचा वकील तर माझ्या लिखाणावर इतका खूश झाला की त्याच्या ओळखीने व खर्चाने माझ्या फेसबुक पोस्टसचा भला मोठा ज्ञानग्रंथच करूया म्हणून माझ्या बराच मागे लागला व शेवटी आशा लावून निघून गेला. काय सांगू मी स्वतःविषयी! अधिक काही बोललो तर आत्मप्रौढी होईल. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्रमुख माझ्या लेखनाचा काही भाग बघून मला म्हणाले की विद्यापीठाच्या आवारातील झाडाखाली रोज संध्याकाळी आपण बसू. मग तुम्ही हे जे काय लिहिलेय त्याचा अर्थ नीट समजावून सांगा. मग तुम्हाला पी.एच.डी. चे मार्गदर्शन करता येईल. पण विद्यापीठाच्या झाडाखाली बसून माझे लेखन त्या प्रमुखाला सांगण्याचा पुढे योगच आला नाही. ते कायदा विभाग प्रमुखही नंतर सेवानिवृत्त झाले. हे फेसबुक लिखाण तर काहीच नाही. माझ्या हस्तलिखित लिखाणाच्या जवळजवळ चाळीस मोठ्या वह्या कपाटात धूळ खात पडल्या आहेत. त्यांना कोणी सुद्धा  गॉडफादर मिळाला नाही. मग मी पाच वर्षापूर्वी फेसबुकला जवळ केले. पण इथेही निराशाच पदरी पडतेय. म्हणून मी वैतागून पहिली दोन फेसबुक खाती त्यावरील माझ्या ५०० ते १००० लेखांसह बंद करून टाकली. मागे एकदा मी इंडियन लॉ इन्स्टिट्यूटला माझ्या हस्तलिखित वह्यांची झेरॉक्स पाने सरळ रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून दिली. पण त्या इन्स्टिट्यूटच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी तो सगळा लेखन पसारा मला तसाच रजिस्टर्ड पोस्टाने न वाचता परत पाठवून दिला. मागे एका व्यक्तीने माझे लेखन बघून काय अॉफर द्यावी? तर म्हणे माझ्या लेखाचे मोठे पुस्तक होईल पण लेखक म्हणून त्या व्यक्तीचे नाव असेल त्या पुस्तकाला व त्याचा मोबदला म्हणून ती व्यक्ती काही पैसे मला देईल. मी नंतर डॉक्टरेट होण्याचा, लेखनाचे पुस्तक करण्याचा नादच सोडून दिला. ही आहे माझ्या ज्ञानाची शोकांतिका, माझ्या आयुष्याची सत्यकथा! आज अंतर्मनातील ही गोष्ट व्यक्त करून मनापासून मोकळा झालो बस्स एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©२.१०.२०२०

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

समाजकार्याचा जेंव्हा पोपट होतो!

#couplechallenge एक बाजार कल्पना!

स्त्रियांना काय आवडते, त्या कोणता ड्रेस घालतात व त्यांच्या पुरूष जोडीदारांनाही काय आवडते वगैरेचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या तरी मार्केटिंग कंपनीने बहुतेक ही #couplechallenge ची भन्नाट कल्पना काढलीय की काय असे या सकाळ (सांगली परिसर) वृत्तपत्रातील बातमीतून दिसत आहे. या लोकांचे हे असे धंदेवाईक डोके चालते व मी उगाच असल्या गोष्टींना महत्व देऊन लोकांना सावध करण्याचे समाजकार्य हाती घेतले. या बातमीने माझ्या या उतावळ्या समाजकार्याचा पुरता पोपट झाला. काय अर्थ राहिला नाही या फेसबुकवर गंभीर, वैचारिक लेखन करण्याला!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.९.२०२०

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

देवा, सर्वांना सुखी व शांत ठेव!

देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव!

(१) निसर्गात देव आहे व तो निसर्गाचा निर्माता व नियंता आहे असे मानून "देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव" अशी सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना कितीजण करत असतील? मुद्दा हा आहे की, अशी प्रार्थना करून सर्व जग व त्या जगातील सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे सुखी व शांत होऊ शकतात का?

(२) वनस्पतीजन्य प्राण्यांना मारून मांसाहारी हिंस्त्र प्राणी वनस्पतीजन्य प्राण्यांच्या मांसावर जगतात तेंव्हा वरील प्रार्थना अशी हिंसा रोखू शकत नाही हे सत्य आहे. तसेच तुम्ही दुसऱ्यांचे कितीही भले चिंता, दुसरी माणसे तुमचे हित जपतीलच याची शास्वती नाही. तुम्ही इतरांच्या शांतीची प्रार्थना कराल, पण तुमच्या अशांतीचे कारण बनणाऱ्या उपद्रवी माणसांचे तुम्ही काय कराल?

(३) माणूस हळूहळू उत्क्रांत झाला व मानवी संस्कृतीही हळूहळू विकसित झाली. उत्क्रांती ही झटपट क्रांतीची प्रक्रिया नव्हे. निसर्गाच्या विज्ञानाविषयी सुशिक्षित झालेला माणूस हा निसर्गाच्या व समाजाच्या पर्यावरणाविषयी सुसंस्कृत असेलच असे नाही. तसे असते तर मग मानव समाजाला पर्यावरणीय रक्षणाचे व सामाजिक सुसंस्कृतपणाचे कायदे करावेच लागले नसते.

(४) तुमच्या चांगुलपणाकडे अर्थात तुमच्या सुसंस्कृतपणाकडे पाठ फिरवून असंस्कृतपणा इतकेच नव्हे तर हिंसक गुन्हेगारीपणा दाखवून तुमच्यावर उलटणाऱ्या माणसांबरोबर तुमचे वर्तन कसे असेल? मानसिक समाधान म्हणून सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना ठीक, पण प्रत्यक्ष व्यवहार हे अशा आध्यात्मिक देव प्रार्थनेवर आधारित असू शकत नाहीत.

(५) खरं तर, निसर्गात देव आहे असे मानून चालले तरी तो देव तुम्हाला देवभोळे व्हा असे सांगत नाही तर व्यवहारी व्हा असेच सांगतो. या व्यवहाराचे मूलभूत नैसर्गिक तत्व काय तर जशास तसे वागणे. तुमच्यावर अन्याय करून सुसंस्कृतपणाने जगण्याचा तुमचा हक्क जर कोणी बळाने हिसकावून घेऊ लागला तर तुम्ही त्याच्यापुढे देवाची प्रार्थना करीत बसणार की त्याला तुमचा जशास तशाचा हिसका दाखवून वठणीवर आणणार? फौजदारी कायदा तर हेच शिकवतो ना!

(६) स्वभाव गुणधर्मानुसार समाजात सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. आंतरमानवी संबंधातून निर्माण होणाऱ्या नात्यांचेही तीन प्रकार निरीक्षण व अभ्यासातून माझ्या लक्षात आले आहेत. पहिला प्रकार म्हणजे वीट येऊन संपृक्त अवस्था प्राप्त झालेली मृत नाती, दुसरा प्रकार म्हणजे सद्या अचल पण भविष्यात चल होऊ शकणारी संभाव्य उर्जेची अचल नाती व तिसरा प्रकार म्हणजे प्रेम व व्यवहाराच्या संततधारेने खेळती राहिलेली वाहत्या उर्जेची चल नाती!

(७) आंतरमानवी नातेसंबंधातील वरील तीन प्रकारचे वर्गीकरण मी मनुष्य स्वभावाच्या गुणधर्मानुसार केले आहे. पदार्थांच्या गुणधर्मा नुसार वागणे म्हणजे जशास तसे वागणे. असे गुणधर्मीय वर्तन हेच जर निसर्गाचे नैसर्गिकत्व आहे तर मग तेच निसर्गातील देवाचे देवत्व आहे असे तार्किक अनुमान निघते.

(८) या निसर्ग नियमाला जर निर्जीव पदार्थ, मानवेतर सजीव पदार्थ व माणूस हे सगळेच जण बांधील आहेत तर मग निसर्गातील देव या नियमापासून कसा मुक्त राहील? देवाची भक्ती किंवा अध्यात्म हे सुद्धा या नियमापासून मुक्त होऊ शकत नाही किंवा अपवाद होऊ शकत नाही असे मला वाटते.

(९) म्हणून प्रभो गुणधर्मा असेच निसर्गातील देवाचे नामस्मरण करीत जशास तसे नियमाने गुणधर्मीय वर्तन करणे हीच निसर्गातील देवाची भक्ती होय, देवपूजा होय असे माझे वैयक्तिक मत आहे. मी निसर्गातील देवाला निसर्गाचा आधार मानत असल्याने निसर्गाच्या विज्ञानातच मी देवाचा धर्म बघतो. माझ्या या वैयक्तिक मताशी सगळेजण सहमत होणार नाहीत हे मला माहित आहे. पण हे माझे वैयक्तिक मत असल्याने त्यावर वादविवाद घालू नयेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.९.२०२०

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

व्यवहारज्ञान घेऊन व्यवहारी बना!

व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!

अन्न, वस्त्र, निवारा ही मनुष्याच्या जीवनावश्यक  गरजा भागविणारी मूलभूत साधने! ही साधने निसर्गात कच्च्या स्वरूपात सापडतात. म्हणजे जमीन, हवा, पाणी व सूर्यप्रकाश यांच्या सोबत नैसर्गिक बी बियाणे या गोष्टी निसर्गात फुकट सापडतात ज्यातून अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत साधनांची पक्क्या स्वरूपात निर्मिती करता येते. म्हणजे निसर्ग माणसाला कच्चे भांडवल फुकट पुरवतो. त्याबदल्यात निसर्गाला हवे असतात ते माणसाचे बौद्धिक व शारीरिक श्रम. मानवी श्रम व निसर्गाकडून मिळणारे फुकटचे कच्चे भांडवल यांच्यात भौतिक व्यवहाराची देवाणघेवाण होत असते व ती व्यावहारिक देवाणघेवाण नैसर्गिक असते ज्यात व्यवहार असतो. निसर्गाबरोबरचा हा मूलभूत भौतिक व्यवहार पार पाडल्यानंतर पुढे सुरू होते ती आंतरमानवी व्यावहारिक देवाणघेवाण व या देवाणघेवाणीचे सामाजिक माध्यम असते तो म्हणजे पैसा. आंतरमानवी भौतिक व्यवहार हा मुख्यत्वे पैशाच्या माध्यमातून होतो. निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार व माणूस व माणूस यांच्यातील पूरक भौतिक व्यवहार यांचे नियमन दोन कायद्यांकडून होते ते म्हणजे निसर्गाचा मूलभूत नैसर्गिक कायदा व मानव समाजाचा पूरक सामाजिक कायदा. मानवी जीवन टिकून राहण्यासाठी स्री व पुरूष यांच्यातील लैंगिक पुनरूत्पादन हा सुद्धा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. कारण स्त्री व पुरूष निसर्गानेच निर्माण केले आहेत व त्यांच्यात लैंगिक वासना ही सुद्धा निसर्गानेच निर्माण केली आहे म्हणजे कच्चे भांडवल हे निसर्गानेच पुरवले आहे. या कच्च्या भांडवलावर होणारा स्त्रीपुरूषातील लैंगिक व्यवहार हा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. पण याच निसर्ग प्रेरित मूलभूत भौतिक व्यवहारातून मानव समाजाची निर्मिती झाली. मग पुढे या मूलभूत भौतिक लैंगिक व्यवहाराचे सामाजिक नियमन करणे गरजेचे झाले. त्यातून वैवाहिक संबंध यासारखे पूरक भौतिक व्यवहार निर्माण झाले व मग या पूरक भौतिक व्यवहारांचे नियमन करण्यासाठी त्याप्रकारचे पूरक सामाजिक कायदे निर्माण झाले. निसर्गाचा मूलभूत भौतिक कायदा काय किंवा समाजाचा पूरक भौतिक कायदा काय हे कायदे निसर्ग व माणूस व त्याबरोबर माणूस आणि माणूस यांच्यातील भौतिक व्यवहारांचे अर्थात भौतिक व्यावहारिक देवाणघेवाणीचे नियमन करतात. या भौतिक व्यवहारांत जे काही देवाचे अध्यात्म घुसले आहे ते आभार प्रदर्शनाचे अध्यात्म आहे म्हणजे निसर्गाकडून मनुष्याला जे आयते, फुकट कच्चे भांडवल मिळते त्याबद्दल निसर्गराजा किंवा निसर्गातील देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अध्यात्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. पण शेवटी या सगळ्याच्या पाठीमागे निसर्गाचा भौतिक व्यवहार आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.९.२०२०

सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!

सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!

जंगली जनावरांच्या हिंस्त्र वर्तनाचा हळूहळू त्याग करीत जाऊन मानवी वर्तन सुधारत गेले व ते सुसंस्कृत झाले. निसर्ग विज्ञानाविषयी सुशिक्षित होणे व सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे यात फरक आहे. सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत असतोच असे नसते. तसे असते तर सुशिक्षित माणसांनी सामाजिक गुन्हे केलेच नसते. सामाजिक सुसंस्कृतपणाचे मी तीन भाग पाडले आहेत. पहिला भाग हा उच्च श्रेणीचा स्वर्गीय भाग म्हणजे सुसंस्कृत भाग, दुसरा भाग हा मध्यम श्रेणीचा अर्ध स्वर्गीय व अर्ध नरकीय भाग म्हणजे असंस्कृत भाग व तिसरा भाग हा कनिष्ठ श्रेणीचा नरकीय भाग म्हणजे गुन्हेगारी भाग! यातील सुसंस्कृत भागाला प्रोत्साहन देण्याचे व असंस्कृत भागाचे नियंत्रण करण्याचे काम दिवाणी कायदा (सिव्हिल लॉ) करतो तर गुन्हेगारी भागाचे नियंत्रण करण्याचे काम फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ) करतो. आता हे तीन भाग पुढील तीन उदाहरणांसह स्पष्ट करतो. स्वैराचारी लैंगिक वृत्तीला लगाम घालून विवाह बंधनात राहणारी किंवा एकटे राहूनही स्वैराचार न करणारी माणसे सुसंस्कृत होत, विवाह करूनही जोडीदाराला फसवून विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणारी माणसे असंस्कृत होत व एखाद्याच्या इच्छेविरूद्ध लैंगिक बलात्कार करणारी माणसे गुन्हेगार होत. सामाजिक सुसंस्कृतपणा हा नरकापासून स्वर्गापर्यंतचा अत्यंत अवघड प्रवास असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण सुसंस्कृतपणा हा कधीही एकतर्फी असू शकत नाही, जसे प्रेम हे एकतर्फी असू शकत नाही. सुसंस्कृतपणाची मैत्री असंस्कृतपणाशी कधीही होऊ शकत नाही मग सुसंस्कृतपणाने गुन्हेगारीला जवळ करणे हा तर टोकाचा प्रश्न जो तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा सुसंस्कृतपणाच्या चांगुलपणाला हिंस्त्र गुन्हेगारीचे आव्हान निर्माण होते. मानव समाज हा सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगार अशा तीन वर्गात विभागला गेला आहे. तसे नसते तर मग दिवाणी कायद्याबरोबर फौजदारी कायद्याची गरज मानव समाजाला भासलीच नसती. वरील तीन वर्गात विभागल्या गेलेल्या मानव समाजात राहताना जशास तसे या धोरणाचा नाइलाजाने अवलंब करावा लागतो. या धोरणानुसार कधी कोमल तर कधी कठोर वागावे लागते. संपूर्ण सुसंस्कृतपणा असलेली आदर्श समाजव्यवस्था अजून खूप दूर आहे. अर्थात स्वर्ग अजून खूप लांब आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

आयुष्याच्या ओंजळीत निसर्गाचे दान?

आयुष्याच्या ओंजळीत विविधतेने नटलेल्या अवाढव्य निसर्गाचे काय आणि किती भरून घेणार?

निसर्गाचा प्रचंड मोठा पसारा हा विविधतेच्या अनेक तुकड्यांत विखुरलेला आहे. यातील एकेक तुकडाच इतका मोठा आहे की या सर्व तुकड्यांनी बनलेला निसर्ग प्रचंड मोठा झाला आहे. किती प्रकारचे विविध सजीव व निर्जीव पदार्थ आणि या पदार्थांच्या किती ज्ञान शाखा! बापरे, यातील काय म्हणून व किती उचलणार? निसर्गाने भरभरून दिले पण दुबळी मनुष्याची झोळी! ही झोळी खरं तर निसर्गानेच दुबळी बनविली आहे ओंजळीएवढे आयुष्य मनुष्याला देऊन! या छोट्याशा ओंजळीत काय आणि किती मावणार अवाढव्य निसर्गाच्या विविध तुकड्यांचे? उपाशी माणसाला जेवणाचे ताट न देता अन्नधान्याचे कोठार व मोठी फळबागच दान दिली तर तो काय आणि किती खाईल? एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे अन्नपदार्थ बघून त्या माणसाला त्या पदार्थांविषयी नक्कीच वीट, किळस, मळमळ, तिटकारा निर्माण होईल.  म्हणून मग निसर्गातील किती गोष्टींच्या मागे लागायचे, त्यांचा किती लोभ करायचा अर्थात कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे. तसे नाही कळले तरी निसर्ग थांबवतो! उदाहरणार्थ, उपाशी माणसाला खायला बिस्कीटचा मोठा पुडा दिला तर पहिले बिस्कीट खाताना त्याला जो आनंद मिळेल तो हळूहळू पुढील बिस्कीटे खाताना कमी कमी होत जाईल व पुढे पुढे तर बिस्कीट खाण्याची त्याची इच्छाच नष्ट होईल. अशा अती तृप्त अवस्थेला संपृक्तता म्हणतात. तृप्ती, समाधान अवस्था ठीक पण त्यापलिकडे असलेली अती तृप्ती, अती समाधानाची स्थिती  किळसवाणी होय. एखाद्या निवडक गोष्टीचा ध्यास घेऊन तिचा अभ्यास करणे वेगळे व त्या गोष्टीचा लोभ जडून तिचे वेड लागणे वेगळे! कुठे थांबायचे ही अक्कल माणसाला आली नाही तर ती अक्कल निसर्ग शिकवतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

अनैतिकतेच्या पायावर उभा नैतिकतेचा डोलारा!

अनैतिकतेच्या पायावर उभा मानवी नैतिकतेचा डोलारा!

(१) सृष्टीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्याशिवाय मानवी संस्कृतीचा अभ्यास अपूर्ण होय. मनुष्य प्राणी हा पर्यावरणीय साखळीचा कळस होय. या कळसाचा पाया काय तर निर्जीव पदार्थ, मग अर्धसजीव वनस्पती, मग वनस्पतीवर जगणारे शाकाहारी सजीव प्राणी, मग शाकाहारी सजीव प्राण्यांवर जगणारे मांसाहारी सजीव प्राणी व सर्वात शेवटी या सगळ्यांचे मिश्रण असलेला मनुष्य प्राणी जो शाकाहारी व मांसाहारी असा दोन्हीही आहे.

(२) ही पर्यावरणीय साखळी कशी उत्क्रांत होत गेली तो सृष्टीचा इतिहासही मोठा रोमांचकारक आहे. पण मनुष्यापर्यंतची उत्क्रांती पूर्ण झाली म्हणजे ती संपली असे नाही. ती चालूच आहे. पण आतापर्यंतच्या उत्क्रांतीतून तयार झालेल्या  पर्यावरणीय साखळीतील विविध सजीव व निर्जीव पदार्थ तरी कुठे परिपूर्ण, निश्चित वागत आहेत. नाहीतर पावसाचा लहरीपणा दिसलाच नसता. सृष्टीच्या पर्यावरणीय साखळीतील मानवेतर प्राणी व निर्जीव पदार्थ जर अधूनमधून लहरीपणाने वागतात, तर मग त्यांच्या मूलभूत पायावर उभा असलेला माणूस अधूनमधून लहरीपणाने वागला नाही तर नवलच! सृष्टीतील लहरीपणा व अनिश्चितता मानवी जीवनातही उतरली आहे.

(३) मानवी जीवनाचा व मानवी संस्कृतीचा मूलभूत पाया काय तर पर्यावरणीय साखळी! या साखळीच्या तळाला व मध्यवर्ती भागात काय आहे तर दलदल, हिंस्त्रपणा! चिखलात कमळ उमलते म्हणून चिखलाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मानवी जीवनाचे कमळ हे चिखलातून उमललेले आहे आणि या कमळाचे बंध चिखलाशी कायम आहेत. पर्यावरणीय साखळीतून मनुष्य उत्क्रांत झाल्यावर त्याची पुढील प्रगती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे चाललेला अविरत प्रवास! सृष्टीच्या उत्क्रांतीचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे असला तरी प्रकाशाचा पायाच मुळी अंधार आहे म्हणजेच दिव्याखाली अंधार आहे हे विसरून कसे बरे चालेल?

(४) पण माणूस जरी प्रकाशात आला असला तरी अंधाराने त्याची पाठ सोडलेली नाही. हे म्हणजे चिखलाने कमळाची पाठ न सोडणे असे आहे. हे असे आहे की, निसर्गातील देवाने मनुष्याला स्वर्गात आणून सोडले तरी त्याला नरकापासून मुक्त केले नाही, प्रकाशात आणले तरी अंधारापासून मुक्त केले नाही व नैतिकतेचा सुगंध दिला तरी अनैतिकतेच्या दुर्गंधीपासून मुक्त केले नाही. तसे नसते तर मग आपल्या समाजाची रचना जातीपातीच्या उतरंडीवर उभी राहिली नसती, कायदेशीर अर्थव्यवस्थेबरोबर बेकायदेशीर समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली नसती व सुसंस्कृत समाजात अंडरवर्ल्डची उपस्थिती दिसली नसती.

(५) मानवी वस्तीची निर्मिती जंगलाशेजारीच झाली आहे. मानवी वस्तीला स्वर्ग व जंगलाला नरक मानले तर मग नरक हाच स्वर्गाचा शेजारी आहे असे मान्य करावे लागेल. पण जंगलांना नरक मानून जंगले नष्ट करता येतील का? तसे केले तर जंगलातील जैव विविधता नष्ट होईल व हवेतील प्राणवायू व पाऊसपाणी नष्ट होऊन मनुष्याचे जगणेच अशक्य होईल. सत्य काय तर अंधाराशिवाय प्रकाश नाही, जंगलाशिवाय मनुष्य जीवन नाही, चिखलाशिवाय कमळ नाही व अनैतिकतेशिवाय नैतिकता नाही. म्हणजेच नरकाशिवाय स्वर्ग नाही. स्वर्गाची वाट नरकातून जाते जशी गुलाबाची वाट काट्यांतून जाते. हेच तर निसर्गाचे वैज्ञानिक सत्य आहे. नरक हाच स्वर्गाचा पाया हेच ते आश्चर्यकारक नैसर्गिक सत्य!

(६) नरकापासून जशी स्वर्गाची मुक्ती नाही तशी अनैतिकतेपासून नैतिकतेची मुक्ती नाही. खरं तर अनैतिकतेच्या पायावरच मानवी नैतिकतेचा डोलारा उभा आहे. अर्थात मानवी नैतिकतेची इमारत अनैतिकतेच्या मूलभूत पायापासून अलग करता येणार नाही जसे मनुष्य जीवन हे जंगलापासून अलग करता येणार नाही. पण नरक व स्वर्ग, जंगल व मनुष्य जीवन व तसेच अनैतिकता व नैतिकता यांना आपआपल्या मर्यादा आहेत. निसर्गातील देवाने कोणालाही अमर्यादित स्वातंत्र्य बहाल केलेले नाही. प्रत्येक  जण वाजवी मर्यादांच्या बंधनात आहे.

(७) निसर्गातील देवाने घालून दिलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा जो कोणी ओलांडेल त्याचा विनाश अटळ आहे. त्यापासून स्वर्ग व नरक, प्रकाश व अंधार, नैतिकता व अनैतिकता या दोन्ही गोष्टी मुक्त नाहीत. म्हणून मानवी वस्तीने जंगले तोडू नयेत, जंगलावर अतिक्रमण करू नये. पण मानवी वस्तीच्या शेजारी जंगल कायम राहणार हे नक्की! कारण जंगल हाच मनुष्य जीवनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या शेजारी शेजारी राहणार. त्यातून माणसे अधूनमधून जंगलात जाण्याचे धाडस करणार व जंगली जनावरे सुद्धा मानवी वस्त्यांत येण्याचे धाडस करणार. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या यांच्या सीमारेषा निश्चित करून मध्ये कुंपण हे घातलेच पाहिजे. असे कुंपण हीच दोन्हीमधील मर्यादेची लक्ष्मणरेषा असेल.

(८) या लेखाचे तात्पर्य काय, तर मनुष्याला त्याच्या आयुष्यात पूर्ण सुख व शांती लाभूच शकत नाही. कारण स्वर्गाचा पायाच मुळी नरक आहे. या पायाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कमळाला चिखलाकडे दुर्लक्ष करून चालेल का? पण म्हणून काय कमळाने चिखलाला सतत घाबरून रहावे? तसेच सद्या आलेल्या कोरोना महामारीचे आहे. हा कोरोना विषाणू कुठून आला? जंगलातून आला की मानवी वस्त्यांतच तयार झाला याचा शोध घेताना हेही ध्यानात ठेवले पाहिजे की सद्याचा कोविड-१९ हा कोरोना विषाणू निघून गेला किंवा नष्ट केला गेला तरी पुन्हा अशा प्रकारचे विषाणू निर्माण होणारच नाहीत असे नाही. याचे कारण म्हणजे  स्वर्गाला कायम नरकाची सोबत आहे व मानवी वस्त्यांना कायम जंगलाची सोबत आहे.

(९) सद्या तरी कोरोनाची दहशत भयंकर आहे. मास्क लावून बाजारात फिरताना माणसे पूर्वीसारखी आनंदी दिसत नाहीत. वातावरणात उदासीनता आहे. कारण कोरोनाचा दंश भयंकर आहे. त्याचे विष उतरून कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोरोना निगेटिव्ह झाला तरी अशा रूग्णाला सोडून जाताना कोरोना रूग्णाचे अवयव फार अशक्त करून जातो. एकप्रकारचे अपंगत्वच ते! काही माणसे कोरोनातून मुक्त झाल्यावरही अवयव अशक्त व पुढे निकामी झाल्याने मृत्यू पावतात. प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे काल ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले ते कोरोनामुक्त झाल्यानंतर! का तर कोरोना दंशाने त्यांची फुफ्फुसे व इतर अवयव निकामी झाले म्हणून. हे सर्व भयंकर आहे.

(१०) निसर्गातील देवाने मनुष्याला पर्यावरणीय साखळीच्या सर्वोच्च पदावर आणून खरंच स्वर्ग दाखवला म्हणून त्या देवाचे आभार मानणे हे योग्यच होय. पण याच देवाने या स्वर्गाचा पाया नरक आहे हे निश्चित करून नरकापासून स्वर्ग मुक्त नाही हे मनुष्याला बजावले आहे. हा देव याच पायाभूत नरकातून मनुष्यापुढे कायमच काहीना काहीतरी जगण्याची आव्हाने, संकटे निर्माण करीत असतो. त्याबद्दल या देवाला काय म्हणावे? मनुष्याने त्याचे आभार मानावेत की अशा संकटांशी लढण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना करावी?

-ॲड.बी.एस.मोरे©२५.९.२०२०