https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मानवता व कायदा!

मानवतेचे कायदे अधांतरी व न्याय असमान!

मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धी हाच खरं तर मानवतेचा मुख्य आधार! सदसद्विवेकबुद्धीचा हा आधार घेऊन पुढे सरकलेल्या मानवतेला समाजमान्यता मिळणे म्हणजे मानवतेचे समाज कायद्यांत रूपांतर होणे. पण राज्यघटनेसह असे समाज कायदे लोकशाही संसदेत संमत झाले की लगेच समाजात मानवता प्रस्थापित झाली असे होत नाही. या समाज कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी हा मानवतेचा पुढचा टप्पा असतो. पण याच टप्प्यावर ही मानवता अधांतरी राहते. लोकशाही संसदेत बहुमतानेच काय पण सर्वमताने संमत झालेल्या समाज कायद्यांची अंमलबजावणी पुढे नीट होईल याची शास्वती नसते. याचे कारण म्हणजे शासन नियुक्त कायदा अंमलदार व लोक यांच्या सदसद्विवेकबुद्धीत असलेली भली मोठी तफावत, असमानता! मानवतेचा प्रमुख आधार काय तर मनुष्याची सदसद्विवेकबुद्धी आणि ही सदसद्विवेकबुद्धीच जर असमान असेल तर मग समाजात मानवता समान कशी राहील? ती कायम अधांतरीच राहते! त्यामुळे मानवतेवर आधारित न्याय सुद्धा कायमच असमान राहतो. मग भले "कायद्यापुढे सगळी माणसे समान" असे कायद्यात भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले का असेना!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

सदसद्विवेकबुद्धी आपली मार्गदर्शक!

सदसद्विवेकबुद्धी आपली मार्गदर्शक!

निर्जीव पदार्थांना त्यांचे गुणधर्मच कळतात, त्या पलिकडचे त्यांना कळत नाही. वनस्पतींना जगण्यापलिकडचे काही कळत नाही. पण जगताना स्वसंरक्षण करण्यासाठी त्या असमर्थ असतात. त्या बाबतीत त्या अपंगच! मनुष्य सोडून इतर सजीव प्राणी, पक्षी यांनाही त्यांच्या जगण्यापलिकडचे काही कळत नाही. मात्र जगताना स्वसंरक्षण करण्याची शक्ती व बुद्धी त्यांना प्राप्त असते. माणूस हाही एक सजीव प्राणी असला तरी तो इतर सजीवांपासून वेगळा आहे. इतर सजीवांना स्वतःच्याच जगण्याचा व स्वसंरक्षणाचा स्वार्थ कळतो. माणूस मात्र याला अपवाद आहे. त्याला स्वार्थाबरोबर परमार्थही कळतो. मानवी मनाला चिकटलेल्या उदात्त नैतिक भावना या मनुष्याला परमार्थाचा मार्ग दाखवतात. लैंगिकता, तहान, भूक, झोप इ. जैविक वासना माणसाला स्वार्थ शिकवितात तर प्रेम, करूणा, परोपकार इ. नैतिक भावना त्याला परमार्थ शिकवितात. आस्तिक माणसे देवावर श्रद्धा ठेवतात. त्या श्रध्देतून केलेली देवभक्ती हा सुद्धा त्यांच्या परमार्थाचा विशेष भाग असतो. वासनिक स्वार्थ व भावनिक परमार्थ यांच्यात संतुलन साधण्यासाठी मानवी मनात सदसद्विवेकबुद्धी असते. खरं तर, उदात्त मानवी भावना व सदसद्विवेकबुद्धी या मानवी मनाच्या खास वैशिष्ट्यांमुळे तर माणूस हा इतर सजीवांपासून वेगळा होतो. सदसद्विवेकबुद्धी ही मनुष्याची मार्गदर्शक आहे. जर बुद्धीपासून सदसद्विवेक (सत् सत् विवेक) अलग झाला तर बुद्धी भ्रष्ट होते. ती वासना व भावना यांच्यात नीट संतुलन साधू शकत नाही. ती भरकटते. अंमली पदार्थ सेवन केल्यानंतर हे पदार्थ मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा घेतात व मग बुद्धीला चिकटलेल्या सदसद्विवेकाला बुद्धी पासून अलग करून बुद्धीला एकटे पाडतात. बुद्धी एकटी पडली की तिला नैतिक भावनांचा विसर पडतो व ती वासनांध होते. वासनेच्या आहारी जाऊन ती हिंसकही होते. अशाप्रकारे हे अंमली पदार्थ माणसाचे रूपांतर जनावरात करतात. म्हणून माणसाने नशा आणणाऱ्या या अंमली पदार्थांपासून नेहमी दूर रहावे. अंमली पदार्थ टाळले तरी सदसद्विवेकबुद्धी इतर काही  कारणांमुळे अस्थिर होऊ शकते. उदा. उपद्रवी माणसे व त्यांनी निर्माण केलेली आव्हानात्मक परिस्थिती. अशावेळी देवश्रद्धा उपयोगाला येऊ शकते. निसर्गात देव आहे व देवाची महाशक्ती आपल्याला संकटातून वाचवेल हीच ती श्रद्धा! जेंव्हा आस्तिक माणसाची सदसद्विवेकबुद्धी संकटकाळी अस्थिर होते तेंव्हा आस्तिक तिला देवापुढे घेऊन जातो व देवापुढे नतमस्तक, लीन होऊन त्या सदसद्विवेकबुद्धीला शक्ती, स्थिरता मिळवतो आणि मग स्थिर होऊन संकटाशी सामना करतो. शिवरायांचे मावळे हरहर महादेव म्हणून असेच शत्रूवर तुटून पडायचे. या श्रध्देला कोणी अंधश्रद्धा म्हणणे हे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मानवी मनाला देवाचा  आधार वाटणे यात चुकीचे ते काय? नास्तिक माणसांचा त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रचंड मोठा आत्मविश्वास असणे ही कौतुकास्पद गोष्ट असली तरी त्यांनी आस्तिक मनांना कमकुवत समजू नये किंवा आस्तिकांच्या देवश्रद्धेची चेष्टा करू नये.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०

कर्तुत्वाची उंची व उंचीचे पुतळे!

कर्तुत्वाची उंची व उंचीचे पुतळे!

महापुरूषांच्या कर्तुत्वाची उंची पुतळ्यांच्या उंची पेक्षा खूप मोठी आहे. नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबई जवळील अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. दिनांक ११.९.२०२० च्या लोकसत्तेतील बातमीनुसार मुंबईतील इंदु मिल स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. महापुरूषांचे हे भव्य दिव्य पुतळे व त्यांची स्मारके बघण्याचे भाग्य साठी, पासष्टी पार केलेल्या आमच्या सारख्या वृध्दांना आहे की नाही हे कोरोनाग्रस्त काळच ठरवेल! या महापुरूषांच्या कर्तुत्वाची उंची इतकी मोठी आहे की त्या उंचीचे पुतळे उभारणे खरं तर अवघड आहे. पण तरीही पुतळ्यांची ही उंची बघून थक्क व्हायला होते. आपण सर्वसामान्य माणसे महापुरूषांच्या कर्तुत्वाच्या पायाजवळही पोहोचू शकलो नाही आहोत हे सत्य आहे. या महापुरूषांना वंदन!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२०

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

सर्पमित्रांचे मानधन!

सर्पमित्र व एकंदरीतच पर्यावरण मित्रांचे मानधन सरकारने निश्चित करावे!

सर्व सर्पमित्रांना माझे अनेक धन्यवाद! साप आणि तेही नाग, घोणस, मण्यार सारखे विषारी साप पकडण्याचे तंत्र अवगत केले तरी ते तंत्र हातात घेऊन अंमलात आणायला फार मोठे धाडस लागते आणि ते या सर्पमित्रांत आहे. पण तरीही  सांभाळून करत जा बाबांनो हे काम! खरं तर या कामाचे मोल पैशात करताच येणार नाही. तरीही सरकारने सर्पमित्रांसाठी व एकंदरीतच पर्यावरण मित्रांसाठी प्रोत्साहनपर मानधन निश्चित केले पाहिजे हे माझे वैयक्तिक मत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२०

संसार मांडते मी!

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडते मी संसार मांडते!

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले व आशा काळे यांच्यावर चित्रित झालेले माझ्या आवडीचे हे मराठी गीत! या महान कलाकारांच्या नखाजवळही बसायची  माझी लायकी नाही. पण हे गाणे मला आवडते म्हणून आज सोमवार दिनांक १४.९.२०२० च्या पहाटे घरातच गाण्याचा प्रयत्न केला. कोरोना बाबा अजून अंगाला चिकटला नाही तोपर्यंत त्याच्या भितीच्या छायेतही आनंदाने रहायचा प्रयत्न करायचा!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२०
https://youtu.be/q4GWGs8WlhI

सावधान!

सावधान!

दिनांक ११.९.२०२० च्या लोकसत्तेतील "७०० मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे बाळगणाऱ्या तरूणाला अटक" ही या पोस्टसोबतची बातमी काळजीपूर्वक वाचा. मलाही या रॕकेटचा एकदा वाईट अनुभव आला आहे. मला हनी ट्रॕप मध्ये आकर्षित करून मग माझ्या प्रोफाईल वरून माझ्या कुटुंबाचे फोटो मला ब्लॕकमेलिंग साठी पाठवण्यात आले. मी सायबर गुन्हे शाखेस इमेल तक्रार करून लगेच माझ्या फेसबुक अकाऊंट वरून माझ्या फॕमिलीचे फोटो डिलीट करून टाकले. तुमच्या महिला कुटुंब सदस्यांच्या फोटोंचा अशा टोळीकडून गैरवापर होण्याची शक्यता आहे. तेंव्हा कृपया समाजमाध्यम खात्यांवर खाजगी आयुष्यातील छायाचित्रे विशेष करून तुमच्या महिला कुटुंब सदस्यांची छायाचित्रे, कुटुंबाची माहिती प्रसिद्ध करू नका. तसेच अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका व अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्टस काळजी घेऊन म्हणजे व्यक्तीच्या पोस्टस, मित्र, फोटो तपासूनच स्वीकारा. समाजमाध्यमावर चांगले लोक आहेत तसे वाईट लोकही आहेत. तेंव्हा सावधान रहा!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.९.२०२०

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

पितृ पंधरवडा!

पितृ पंधरवडा व सर्वपित्री अमावास्याच्या मागे असलेल्या भावना जेंव्हा रडतात!

जेंव्हा पासून या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली तेंव्हा पासून विविध जीव या पृथ्वीवर सतत पुनरूत्पादन करून आपआपली पिढी जतन करण्याचा प्रयत्नात आहेत. निरनिराळ्या  वनस्पती, मानवेतर प्राणी व मनुष्य प्राणी हेच कार्य करून या पृथ्वीतलावर स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा खरं तर निसर्ग निर्मित प्रचंड मोठा छापखाना आहे. हे बोलायला, लिहायला सोपे आहे पण मनुष्याच्या  भावनिक मनाला हे सहन करणे कठीण आहे. जुनी पिढी मरते व नवीन पिढी जुन्याची जागा घेते हा या छापखान्याचा भाग! पण जुनी पिढी नष्ट होते तेंव्हा जुन्या पिढीतल्या लोकांचे उभे संसार नष्ट होतात, राहतात फक्त त्या संपलेल्या संसाराच्या आठवणी व त्याही काही काळच! सध्या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू आहे. सालाबाद प्रमाणे आलेला हा पितृ श्राद्ध पंधरवडा! येत्या गुरूवारी १७ सप्टेंबर, २०२० सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी आपल्या मृत झालेल्या आईवडिलाची, आजीआजोबाची आठवण म्हणून त्यांच्या स्मृतीला नैवेद्य द्यायचा. भले हा नैवेद्य त्यांना पोहोचत नसेल, भले काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील पण या वार्षिक आठवण क्रियेमागे भावना आहेत हे विसरून कसे चालेल? का पुनरूत्पादन हा नैसर्गिक छापखाना आहे म्हणून या भावनांची चेष्टा करायची? मृत आईवडील, आजीआजोबा यांना दाखवलेला नैवेद्य कावळ्यानेच खाल्ला पाहिजे असे काही नसते. ही झाली अंधश्रद्धा. कोणाच्याही मुखात तो गेला तरी काही फरक पडत नाही. मी जेंव्हा माझ्या सद्याच्या ६४ वयात माझे आईवडील आठवतो तेंव्हा त्यांचा संपूर्ण संसार माझ्यापुढे उभा राहतो. त्यांच्या त्या संसारातील त्यांची ती धडपड, लगबग माझ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. काय भयंकर सत्य आहे या निसर्गाचे! माझे वडील अगोदर गेले तेंव्हाच त्यांचा तो संसार मोडला. मग आईही गेली आणि मग तो संसारच बघता बघता नष्ट झाला. आजीआजोबा यांचा संसारच काय त्यांचे चेहरेही मला नीट आठवत नाहीत. हा त्या निसर्गाचा खेळ! आता मी ६४ वयाचा तर माझी बायको ६० वयाची. आमची मुलगी मोठी होऊन तिच्या संसारात व्यस्त झालेली. पण आम्हा नवरा बायकोचा संसारही हळूहळू लयाला चालला आहे, तो एक दिवस माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या मृत्यूने संपणार आहे याची जाणीव झालीय. मध्येच हा दुष्ट कोरोना थयथयाट घालतोय. त्यामुळे वातावरण तसेही भयावह झालेय. पण भावना रडतात हो! या पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने बस्स एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.९.२०२०