https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

पोस्टमन आॕईल!

पोस्टमन रिफाईन्ड ग्राऊन्डनट अॉईल!

१९७८ साली बी.कॉम. झाल्यावर मी सहा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बऱ्याच कंपन्यांत अकौंटस क्लार्क म्हणून नोकऱ्या केल्या. त्या मध्ये दोन टाकी, पायधुनी, मुंबई-४०० ००८ येथील मुस्लिम बहुल विभागात त्या काळात प्रसिद्ध असलेली अहमद मिल्स ही अहमद उमरभॉय यांची एक कंपनी होती. त्या कंपनीचे पोस्टमन ब्रँड हे डबल फिल्टर गोडेतेल त्यावेळी खूप प्रसिद्ध होते. इतर गोडेतेलापेक्षा ते महाग असल्याने ती श्रीमंतांची खरेदी होती. तसेच खोबरेल तेल, साबण हीही त्या कंपनीची अन्य उत्पादने होती. स्टाफ बहुतेक मुस्लिम होता. त्यामुळे माझे सी.ए. बॉसही मुस्लिम होते. मी अकौंटस क्लार्क म्हणून तिथे कामाला होतो. मराठी माणूस असूनही त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. माझ्या चोख कामावर खूश होऊन त्यांनी मला कामाच्या वेळेत थोडी सवलत दिली व इतरांपेक्षा मला चांगली पगारवाढही दिली. ती देताना "स्पेशल ट्रिटमेंट फॉर स्पेशल पर्सन" हे शब्द त्यांनी उच्चारले व ते शब्द माझ्या पुढील आयुष्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी मला खूप उपयोगी ठरले. 

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

सुसंस्कृतपणा व कायदा!

सुसंस्कृतपणा व कायदा!

(१) भौतिक वासनेच्या खालच्या पातळीवरून आध्यात्मिक भावनेच्या वरच्या पातळीवर उंचावताना मानवी मनाची ना खाली ना वर अशी अवस्था होते. मनाच्या अशा गोंधळलेल्या, संभ्रमित अवस्थेत मध्यवर्ती भूमिका घेऊन विवेक बिंदू निश्चित करताना मानवी बुद्धीची ओढाताण होते या बौद्धिक कसरतीचा अनुभव अनेक माणसे वेळोवेळी घेत असतात. 

(२) भौतिक वासनेचा पूर्णपणे त्याग करून आध्यात्मिक भावनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचणे म्हणजे साधुसंत होणे. असे साधुत्व मिळविणे म्हणजे सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होणे होय. भौतिक वासनांविषयी जेंव्हा माणसाच्या मनात विरक्ती निर्माण होते तेंव्हाच माणूस सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याचा निर्णय घेतो. असे संन्यासी होणे हे नैसर्गिक आहे का या मुद्यावर वाद निर्माण होऊ शकतो. पण भौतिक वासनांबद्दल विरक्ती निर्माण होऊन येणारे साधुत्व व भौतिक वासना आणि आध्यात्मिक भावना यांच्यात संतुलन साधत निर्माण होणारा मनाचा सुसंस्कृतपणा यात खूप फरक आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च मानवी भावना आध्यात्मिक भावना होत असे माझे वैयक्तिक मत आहे.

(३) भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या दोन्हीही गोष्टी जर मानवासाठी नैसर्गिक आहेत तर मग दोन्हीही नैसर्गिक गोष्टींना एकत्रित ठेऊन त्यांचा नीट म्हणजे संतुलित सांभाळ करणे ही मानवी कृतीही नैसर्गिकच झाली. मग याचा अर्थ एवढाच निघतो की सुसंस्कृत वर्तन हेच मानवासाठी नैसर्गिक वर्तन आहे. तरीही शेवटी भौतिक वासनेचा पूर्ण त्याग करून फक्त आध्यात्मिक भावनेला चिकटून राहात संन्यासी होणे हे नैसर्गिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा राहतोच. 

(४) विवाहबद्ध होऊन वासना व भावना यात संतुलन साधत प्रजोत्पादन करणे व सांसारिक जबाबदाऱ्याही पार पाडणे याला मानवी मनाचा सुसंस्कृतपणा म्हणता येईल. पण काही विशेष वैयक्तिक कारणामुळे काहीजण विवाहच करीत नाहीत किंवा विवाह करूनही नंतर घटस्फोटाने एकटे राहण्याचा निर्णय घेतात. हा काही अंशी संन्यासी होण्याचाच प्रकार झाला असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत एकटे राहणाऱ्या लोकांना कदाचित आवडणारही नाही. कारण मानवी मनाची माणुसकी काय किंवा मानवी मनाचा सुसंस्कृतपणा काय हे ठरवताना मानवी बुद्धीचा कस लागतो. वेगवेगळ्या माणसांची बुद्धी याबाबतीत वेगवेगळी चालते आणि मग त्यातून खूप वादविवाद होतात. 

(५) अशा वादविवादातून समाजात गोंधळ, अराजक निर्माण होऊ नये म्हणून समाजाच्या सामूहिक बुद्धीने ठरवलेला सुसंस्कृतपणा हा समाजाचा कायदा झाला व तो कायदा हाच मनुष्यासाठीचा नैसर्गिक कायदा म्हणून मान्य करण्यात आला. मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करणाऱ्या अशा कायद्याला समाजमान्यता मिळविण्याची प्रक्रिया हीच लोकप्रतिनिधींकडून कायदे मंडळात कायदा बनविण्याची प्रक्रिया होय. 

(६) या कायद्याचे दोन भाग पाडण्यात आले. पहिला भाग म्हणजे समाजाच्या विवेकबुद्धीने निश्चित केलेले मनुष्याचे सुसंस्कृत वर्तन जे वासना व भावना यांच्यात सुवर्णमध्य साधते. कायद्याच्या या पहिल्या भागाला दिवाणी कायदा म्हणतात. दुसरा भाग म्हणजे मानवी सुसंस्कृतपणाची मध्यवर्ती पातळी सोडून वासनेच्या खालच्या पातळीवर उतरणाऱ्या मानवी मनाला रोखणारा फौजदारी कायदा. हा फौजदारी कायदा मानवी मनाला असंस्कृत बनू देत नाही (भ्रष्टाचार करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण होय) व असंस्कृतपणाहूनही खालची पातळी म्हणजे जंगली पातळी गाठू देत नाही (अत्याचार, खून, बलात्कार, दरोडा यासारख्या हिंसक गोष्टी करणारे वर्तन हे जंगलीपणाचे लक्षण होय). संन्यासी होण्यास मात्र कोणताच कायदा अडवू शकत नाही. कारण संन्यासी माणूस समाजालाच काय तर निसर्गालाही कोणताही त्रास देत नसतो. थोडक्यात काय तर सामाजिक कायदा हा मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करतो!

-ॲड.बी.एस.मोरे©१.८.२०२०

गुरुवार, ३० जुलै, २०२०

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी वगैरे लिहित नसतो. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. घरात वहीत लिहून स्वतःच त्याकडे बघत बसण्यापेक्षा चारचौघात विचार जाण्यासाठी फेसबुक हे माध्यम छान व व्हॉटसअप पेक्षा मोठे वाटले म्हणून मी फेसबुकवर! पण यात अनेक प्रकारचे वाचक असल्याने गडबड ही होतेच अधूनमधून! पण त्या हनी ट्रॕप घटनेमुळे आता समाजमाध्यमावरच काय तर इतर कोणत्याही अॉनलाईन संभाषणात सावध राहिले पाहिजे हे मात्र नक्की! या घटनेनंतर मी फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारलेली काही खाती तपासली तर अनफ्रेंड करताना गायब झाली. म्हणजे ती फेक होती. वृत्तपत्रात लिखाण छान पण तिथे ओळख हवी, आतल्या गोटात उठबस हवी. पूर्वी मी लिहायचो तिकडे पण संपादक महाशय लिखाणातला मूळ आशयच कट करायचे आणि बऱ्याच वेळा लिखाणाला प्रतिसादच देत नसायचे. म्हणजे आपण ढ व ते हुशार असा काहीसा प्रकार. इथे फेसबुकवर तसे काही नसते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होऊ शकता. मी दुसऱ्यांचे लिखाण आवडले तर त्यांच्या नावानेच ज्ञान संवर्धनासाठी पोस्ट करतो. पण ती पोस्ट माझी नाही हे जाहीर करतो. पण ९०% लिखाण हे माझे स्वतःचे मूळ लिखाण असते व म्हणून ते माझ्या नावानेच प्रसिद्ध करतो. ज्ञान, चिंतन व मनन यातून मनात निर्माण होणाऱ्या वैविध्यपूर्ण विचारांमुळे व लिखाणाच्या आवडीमुळे, त्या छंदामुळे व तसेच लोकांबरोबर ज्ञान, विचार शेअर करण्यात मला स्वतःला आनंद मिळतो म्हणून मी इथे फेसबुकवर वाचकांच्या सोबत व्यक्त होत असतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.७.२०२०

बुधवार, २९ जुलै, २०२०

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

मी माझे खरे अनुभव समाज माध्यमावर शेअर करतो ते माझे दुःख हलके करण्यासाठी मुळीच नाही. माझे वय ६४ आहे. आता कसले आले आहे दुःख हलके करणे? खूप गोष्टी पचवल्यात या आयुष्याने! पूर्वी कुठे होती समाजमाध्यमे वैयक्तिक दुःख हलके करायला? तेंव्हा स्वतःचे दुःख हलके करणे हा माझ्या सत्य लिखाणाचा हेतूच नाही. माझे अनुभव हे आत्मचरित्र म्हणून मी समाज माध्यमावर माझ्या पोस्टसमधून खुले करतो जेणे करून इतर समदुःखी लोकांना हलके वाटेल हे जाणून की कोणीतरी आहे तिथे जे आपलेच दुःख भोगतोय आणि दुसरा हेतू हा की इतर लोक माझ्या अनुभवातून अगोदरच सावध होतील. या गोष्टी लोकांपासून लपवून वर जायचे का? छे, ही तर स्वतःचीच शुद्ध फसवणूक झाली! अशा खोट्या चेहऱ्याने जगून काय उपयोग? लोक माझ्यासारखे जर मोकळे झाले असते तर जगातील बऱ्याच आत्महत्या थांबल्या असत्या. पण लोक खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसतात, उगाच लाजतात, घाबरतात व खोटे जीवन जगतच मरतात. मला असे जगणे आवडत नाही म्हणून मी हा असा आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.७.२०२०

मंगळवार, २८ जुलै, २०२०

आजपासून सर्व नातेवाईक ब्लॉक!

आजपासून सर्व नातेवाईकांना मी ब्लॉक करीत आहे!

(१) मित्रांनो, आज मी तुम्हाला मनातले सांगत आहे. मी लहानपणापासून न घाबरता मला जे योग्य वाटले त्याप्रमाणेच वागत आलो. खोट्या चेहऱ्यांनी फिरत खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसणाऱ्या समाजातील ढोंगी माणसांचा मला पहिल्यापासूनच तिटकारा आहे. गुंड, मवाली लोक स्वतःला साजूक तुपातले म्हणवून घेत नाहीत. आम्ही तसेच आहोत हे ते सांगतात. ते स्वतःचे खरे रूप झाकत नाहीत. त्यामुळे निदान  त्यांच्यापासून थोडे सावध तरी राहता येते. पण डबल ढोलकी माणसांचे काय? म्हणून मनात एक आणि ओठात दुसरे असणाऱ्या खोट्या चेहऱ्याच्या ढोंगी माणसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते.

(२) मी जो वकील झालो आहे तो मी माझ्या स्वकष्टाने व स्वतःच्या हिंमतीवर झालो आहे. माझे लहानपणापासून बाहेर काम करून मी माझे शालेय व कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरात दोन वेळेचे जेवण मिळत होते हाच तो काय घरचा पाठिंबा! मला इतर भावंडे होती पण ती दहावी, अकरावी पर्यंत कशीबशी येऊन पोहोचली आणि तिथेच ठप्प झाली. म्हणजे शेवटी शिक्षण हे तुम्हाला तुमच्या कष्टानेच घ्यावे लागते. माझ्या शाळेची, कॉलेजची फी मी स्वतः बाहेर काम करून भरली आहे. माझ्या शालेय जीवनात सुद्धा मी प्रौढ साक्षरता वर्ग घेत होतो व त्यातून दरमहा  ५० रूपये मिळायचे त्यातून शाळेची फी भरत होतो. मी वकील होण्याला तर मला घरातूनच विरोध होता. नातेवाईकांचे तर विचारूच नका. याला भिकेचे डोहाळे लागले असे म्हणून जवळच्या लोकांकडूनच माझा अपमान झाला, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण मी डगमगलो नाही. लहानपणापासूनच आत्मनिर्भर झाल्याने घरातील लोकांची वा इतर कोणाचीही पर्वा न करता मी वकील झालो व माझ्या पद्धतीने या आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहिलो. यात मला ना माझ्या आईवडिलांची मदत झाली ना कोणा नातेवाईकाची. वकिलीत सुध्दा काँग्रेसचे तत्कालीन बडे प्रस्थ बॕ. ए. आर. अंतुले यांच्या विरूद्ध सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल करणे असो किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे असो या सर्व गोष्टी मी एकट्याच्या हिंमतीवर केल्या. यात घरातल्या माणसांचा किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांचा सहभाग नव्हता की पाठिंबा नव्हता.

(३) पण मी कृतघ्न नाही. लग्न झाल्यावर मला वकिलीत कमी पैसे मिळत असल्याने माझी व माझ्या बायकोची भांडणे व्हायची. माझा हा स्वभाव असा बंडखोर असल्याने त्याचा माझ्या बायकोला खूप त्रास व्हायचा. मग आमची ती भांडणे आमच्या नातेवाईकांपर्यंत जायची. मग मला संसाराच्या दोन गोष्टी सुनवल्या जायच्या. काहीवेळा नातेवाईकांबरोबर उसनवारीही झाली आहे. पण मी कोणाचेही पैसे बुडवले नाहीत. सगळ्यांचे उसने पैसे चुकते केले. पण माझीही एक वकील व धडपड्या, धाडसी माणूस म्हणून  माझ्या नातेवाईकांना काही ना काहीतरी मदत झालीच आहे. बाहेरच्या जगाबरोबर ९० टक्के देवाणघेवाण सुरू असताना नातेवाईक मंडळी बरोबर निदान १० टक्के तरी देवाणघेवाण ही होणारच ना!

(४) या पार्श्वभूमीवर २६ व २७ जुलै, २०२० च्या मध्यरात्री मी एका महिला फेसबुक फ्रेंडच्या हनी ट्रॕप मध्ये सापडलो. एकवेळ समाजात माझी बदनामी झाली तरी चालेल पण ही गोष्ट  समाज हिताच्या दृष्टिकोनातून उघड करायचीच या हेतूने मी लगेच फेसबुकवर ती पोस्ट टाकली व नंतर स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला याबाबत ईमेलने अॉनलाईन तक्रारही केली. सामाजिक हितासाठी हे रॕकेट उघड झालेच पाहिजे म्हणून मी जे सत्य घडले ते न घाबरता उघड केले आहे. पण हे सत्य उघड केल्याने माझ्यासारखा माणूस आपला नातेवाईक असल्याची लाज माझ्या कोणत्याही  नातेवाईला वाटू नये किंवा त्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी आजपासून माझ्या सर्व नातेवाईकांना माझ्या फेसबुक व व्हॉटसअप खात्यांवरून ब्लॉक करीत आहे.

(५) आता माझे एकट्याचे काय व्हायचे ते होऊनच जाऊद्या. नाहीतरी मला आयुष्यात तग धरून राहण्यासाठी बाहेरच्या क्लायंटस व मित्र मंडळींनीच आधार दिला आहे. शेवटी "एकला चलो रे" हेच माझे खडतर जीवन आहे. माझ्या मयताला कोणीही नातेवाईक हजर असण्याची मला बिलकुल गरज नाही. नाहीतरी मेल्यावर आपल्या डेड बॉडीचे काय होते हे मेलेल्या माणसाला कळतच नाही. मग मी नातेवाईक मंडळीनी माझ्या मयताला यावे म्हणून माझ्या बिनधास्त जगण्याला का आवरावे? पण माझ्या या अशा बिनधास्त जगण्याने माझ्या नातेवाईक मंडळींची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांना मी आजपासून ब्लॉक करीत आहे. पण नातेवाईक ज्या गावात, शहरात, विभागात राहत आहेत तिथले माझे मित्र मात्र बिलकुल ब्लॉक होणार नाहीत याची नातेवाईक मंडळींनी नोंद घ्यावी.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०

सोमवार, २७ जुलै, २०२०

निवडक मित्रांसाठीच हे फेसबुक खाते!

काही निवडक मित्रांसाठीच आहे हे फेसबुक खाते!

(१) माझ्या या फेसबुक खात्यावर फक्त काही निवडक व्यक्तीच माझे मित्र आहेत, बाकीची मंडळी नुसती नावापुरती आहेत ही गोष्ट मला माहित आहे. माझ्या रोजच्या विचारांतून या काही निवडक मित्रांशी मी बोलत असतो व त्यामुळे माझ्याशी वेगळे वैयक्तिक बोलण्याची तशी गरज नाही. आता फेसबुक इनबॉक्स चॕटिंग नकोच नको!

(२) काल मध्यरात्री (२६ व २७ जुलैच्या मधली रात्र) मला हनी ट्रॕप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मागे एका माणसाने इनबॉक्स मध्ये अगोदर चांगले बोलून अचानक होमो लैंगिकतेचे फोटो पाठवले. कोणाला कसा ओळखू आणि कितीजणांना ब्लॉक करीत बसू? ६४ वय होऊन अनुभवाने परिपक्व व ज्ञानाने प्रगल्भ झालो असलो तरी शेवटी मीही एक माणूसच आहे ना! असे काही विचित्र घडले, माझ्या पोस्टसवर कोणी काही विचित्र कमेंटस केल्या की मग मी वैतागून जाऊन फेसबुक खातेच बंद करून टाकतो. पूर्वी पण अशाच काही गोष्टींमुळे वैतागून जाऊन मी माझी दोन फेसबुक खाती कायमची बंद केली. पण विचार थांबत नाहीत. ते लोकांना सांगावेसे वाटतात म्हणून पुन्हा हे तिसरे फेसबुक खाते उघडले. पण त्यालाही काल दृष्ट लागली. हनी ट्रॕपच्या जाळ्यात काल कसा ओढला गेलो हे कळलेच नाही. मग रात्रभर झोप आली नाही. सकाळी नाष्टा वगैरे न करता स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला तक्रार केली.

(३) माझ्या सततच्या विचारांतूनच या काही निवडक फेसबुक मित्रांशी माझी मैत्री सुरू आहे. मी आता व्हॉटसअप पण कमी करणार आहे. नको ते गुड मॉर्निंग, गुड नाईटसचे औपचारिक संदेश व नको ती इकडून तिकडून फिरणारी माहिती! पूर्वी आमच्या काळात ही समाजमाध्यमे नव्हती तेच खूप चांगले होते. पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांतून होणारा संवाद खूप जवळचा वाटायचा. समोरासमोर बोलणे व्हायचे तेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रत्यक्ष बघायला मिळायचे. त्यामुळे फसगत होत नसायची. आता या अॉनलाईन संवादात समोरची व्यक्ती तिकडून कोणत्या मूड मध्ये आहे, तिच्या मनात काय चाललेय, ती पुढे काय करणार आहे याचा अंदाजच येत नाही. मला तर मोबाईल वरून स्क्रीन शॉटस कसे घ्यायचे हेही माहित नव्हते. एका फेसबुक मित्रानेच ते शिकवले. ते माहित नसते तर मला काल त्या हनी ट्रॕप चॕटिंगचे पुरावेच ठेवता आले नसते. मग माझ्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. या सर्व गोष्टी फार भयंकर आहेत. काय पण अनुभव! माणसे पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागलीत! अॉनलाईन व्यवहार तर मला जमतच नाहीत. मला कधी एटीएम ने बँकेतून पैसे काढता आले नाहीत.

(४) अशा परिस्थितीत मी या अॉनलाईन समाज माध्यमावर का रहावे आणि कशासाठी रहावे? फक्त ज्ञान व अनुभवावर आधारित माझे विचार मांडण्यासाठी? पण आज माणसाला चांगल्या विचारांचे कोठे सोयरसुतक आहे! काहीजण मलाच म्हणतील की, अहो मोठमोठे विचार मांडणारे तुम्ही हनी ट्रॕप मध्ये असे कसे हो सापडलात? त्यामुळे मित्रांनो, आता माझ्याशी फेसबुक इनबॉक्स, व्हॉटसअप वर संवाद करू नका. माझ्या पोस्टस आवडल्या तर लाईक करा. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. म्हणून मी फेसबुक सारख्या समाज माध्यमावर आहे. पण मला अॉनलाईन जग हे आता खूपच आभासी वाटू लागलेय. औपचारिकता खूपच भरलीय या जगात! इथे निर्मळ मैत्री हे केवळ मृगजळ आहे.

(५) पण याच फेसबुकने मला काही चांगले मित्र दिले. कालच्या घडलेल्या प्रसंगात हेच मित्र पुढे आले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला आधार दिला. दोन वकिलांनी तर प्रत्यक्ष फोन करून मला स्थानिक पोलीस स्टेशन, सायबर क्राईम सेल चे ईमेल आयडी पाठवून ईमेलने पोलीस तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले, धीर दिला. माझे काही मनसैनिक मित्र, मैत्रिणींनी त्या हनी ट्रॕपवाल्या फेक फेसबुक अकाऊंटसचा पाठलाग केला. हे खरे प्रेमही मला याच अॉनलाईन जगातील फेसबुक वर मिळाले. त्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी वाईट  नाहीत व सगळीच माणसे ढोंगी नाहीत. पण इथे सावधानता ही खूप महत्त्वाची!

(६) माझ्या या तिसऱ्या फेसबुक अकाऊंटसवर या कोरोना लॉकडाऊन काळात पटापट झालेले माझे मित्र किती तर जवळजवळ ३४०० व मला माझ्या कालच्या हनी ट्रॕप प्रसंगात माझ्या त्या जाहीर पोस्टवर मला जाहीर पाठिंबा देणारे मित्र  किती तर जवळपास फक्त १५० च! म्हणजे फेसबुकवर माझे खरे मित्र किती तर फक्त ४ टक्केच! मग बाकीच्या ९६ टक्के  लोकांना मित्र म्हणून उगाच का मिरवत बसू? या ९६ टक्के तथाकथित मित्रांना हळूहळू रामराम करायला हवा! वेळ मिळेल तसे ते काम करणे आवश्यक झालेय. आता यापुढे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे हेच आव्हान असणार आहे. कारण बरीच मंडळी माझ्या पोस्टस, माझे विचार वाचून फ्रेंड रिक्वेस्टस पाठवत असताना दिसत नाहीत.

(७) महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारून काहीही वैचारिक सुसंवाद निर्माण होत नाही. एकतर माझे ९५ टक्के लिखाण हे मराठीत असते. मी काय लिहितोय हेच त्यांना कळत नाही. आता परप्रांतातील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना वकील हाच निकष ठेवावा तर त्यातही भाषेची अडचण येतेच. शेवटी माझी मातृभाषा मराठी! म्हणून मायबोली मराठी हीच माझ्या लिखाणासाठी मला योग्य व सोपी भाषा आहे. इंग्रजी भाषा ही फक्त काही कायदेशीर व्यवहारासाठी वापरायची. बाकी इतर ठिकाणी फक्त आणि फक्त मराठी भाषाच वापरायची! बाकी या तथाकथित ९६ टक्के मित्रांना हळूहळू रामराम कसा करायचा ही आणखी एक नवीन डोकेदुखी! कारण जर कोणाला अनफ्रेंड करायचे असेल तर प्रत्येक खात्याला स्पर्श करावा लागतो. आता एवढ्या खात्यांना स्पर्श करणे म्हणजे महादिव्यच! मग या खोट्या, वरवरच्या फेसबुक मित्रांना असेच नावाला ठेऊन पुढच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना काळजी घेणे एवढेच सद्या तरी ठीक वाटतेय! माझे काही निवडक चांगले फेसबुक मित्र इथे आहेत. त्यांच्या मैत्रीसाठी माझे हे फेसबुक खाते चालू ठेवावे असे म्हणतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०


देव भावनेला देवाचा आधार!

देव भावनांना देवाचा आधार!

सजीव मनाची नैसर्गिक वासना जनावरांना जशी असते तशी माणसांनाही असते आणि मनाच्या या वासनेला मनाच्याच बुद्धीचे जे बळ लाभलेले असते त्याला बुद्धीबळ म्हणतात. जनावरे याच बुद्धीबळावर स्वार होऊन त्यांचा शरीर घोडा पळवतात व त्यांच्या मूळ वासनांची तृप्ती करतात. तहान, भूक, झोप, लैंगिकता या त्या मूळ नैसर्गिक वासना होत. पण माणसांचे गणित निसर्गाने थोडे वेगळे बनवले आहे. ते तसे का बनवले याचे कारण त्या निसर्गालाच ठाऊक! पण एवढे मात्र खरे की या वेगळ्या गणितामुळेच माणूस इतर जनावरांपासून वेगळा झाला. जनावरांमध्ये माणसांपासून वेगळे असलेले प्राणी व पक्षी हे दोघेही आले. हे गणित एकाच गोष्टीने झाले आणि ती म्हणजे माणसांना जनावरांच्या वासनांसोबत दिलेली उच्च मानवी भावना! प्रेम, करूणा, परोपकार, कृतज्ञता इत्यादी उच्च भावना या माणसांनाच असतात. निसर्गात देव आहे अशी श्रद्धाच नव्हे तर तसा ठाम विश्वास असणारे आस्तिक लोक या उच्च मानवी भावनांना देव भावना असेही म्हणू शकतील. मानवी मनात जनावरांच्या मूळ नैसर्गिक वासना व या देव भावना ज्या सुद्धा नैसर्गिकच आहेत यांचे मिश्रण आहे. ते जर संयुग झाले असते तर वासना व भावना यांचा वेगळा विचार करण्याचा प्रश्नच मानवी मनात निर्माण झाला नसता. पण मानवी मनात संयुग न होता ते मिश्रण झाले व मग मानवी बुद्धीपुढे प्रश्न निर्माण झाला की वाईट वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना मनात ठेऊनच वागायचे की चांगले वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना व मानवी भावना या दोन्ही मध्ये संतुलन ठेवीत विवेकाने वागायचे? जी मानवी बुद्धी वासना व भावना यांच्या संतुलनावर लक्ष केंद्रित करून त्या संतुलनाची तृप्ती करण्यालाच स्वतःचे बळ अर्थात बुद्धीबळ देते अशा बुद्धीला विवेकबुद्धी म्हणतात. पण कधीकधी असे होते की मानवी मनात असलेल्या वासना व भावनांचे मिश्रण थोडे इकडेतिकडे होते, त्यांच्यातील संतुलन बिघडते व मग मानवी बुद्धी थोडीशी भ्रमिष्ट होऊन बुद्धीबळाचा शरीरावरील ताबा सुटतो व शरीर रूपी घोडा उधळतो. भरकटलेली बुद्धी व उधळलेला शरीर रूपी घोडा माणसाला कधी जनावर बनवून टाकतो हे कळतच नाही. या विश्लेषणातून एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे मानवी बुद्धीचे चांगले वागणे म्हणजे काय तर वासना व भावना यांच्या मिश्रणात संतुलन ठेवीत विवेकाने वागणे. असे विवेकी वागण्यासाठी मनातील देव भावनांना बळ प्राप्त होणे आवश्यक असते. देव भावनांना देव शक्ती मिळण्यासाठी मग आस्तिक लोक देवाचा आधार घेतात. देवावर श्रद्धा, विश्वास ठेऊन मिळविलेला तो आधार खूप मोठे काम करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व त्यांचे मर्द मावळे जेंव्हा शत्रूवर चढाई करीत तेंव्हा हर हर महादेव अशी आध्यात्मिक आरोळी देत चढाई करीत. महादेवावर असलेली श्रद्धा, विश्वास त्या मर्द मावळ्यांत अशी चेतना निर्माण करीत असे की आपण देव भावनेच्या रक्षणासाठीच म्हणजेच धर्मासाठी जनावरांच्या वासनेने जगणाऱ्या दुष्ट शत्रूवर महादेवाचे रौद्र रूप अंगात संचारून घेत चढाई करीत आहोत. देव भावनांचा वासनांमुळे चोळामोळा होऊ नये म्हणून आस्तिक माणसे देवाचा आधार घेतात व यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२७.७.२०२०