https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २० जून, २०२०

सार्थक झाले!

आज माझ्या फेसबुक लिखाणाचे खरे सार्थक झाले!

आज शनिवार, दिनांक २० जून, २०२० हा माझा सार्थक दिन! आज मी खूश आहे, आनंदी आहे. कारण गेली पाच वर्षे फेसबुकवर मी जे सातत्याने लिखाण करतोय त्याचे सार्थक झाले. माझे हे तिसरे फेसबुक खाते. पहिल्या दोन फेसबुक खात्यांवर प्रत्येकी ५००० मित्र व तेवढेच अनुयायी म्हणजे जवळजवळ एकूण २०००० लोकांना मी माझ्या ज्ञान, अनुभव व विचार यांनी आकर्षित केले. पण त्या आकर्षक करणाऱ्या मित्र, अनुयायी संख्येवर मी खूष नव्हतोच! मला जे हवे ते त्या रेकॉर्ड ब्रेक संख्येतून मला मिळतच नव्हते. म्हणून माझे सर्व लिखाण व्यर्थ गेले या भावनेतून मी ती दोन्ही फेसबुक खाती बंद करून टाकली. तरीही अजून एकदा प्रयत्न करून बघू व मी जे लिहितोय ते बरोबर आहे का याची पुन्हा एकदा चाचपणी करू या विचाराने मी हे सद्याचे तिसरे फेसबुक खाते उघडले. पहिले खाते मी ठरवून  राजकारणापासून अलिप्त ठेवले होते, दुसरे खाते मी काही अंशी राजकारणाला जोडले व आता पुन्हा हे तिसरे खाते राजकारणापासून मी ठरवून अलिप्त केले. पण आजपर्यंत मला जे हवे होते ते मला माझ्या फेसबुक लिखाणातून मिळतच नव्हते. काय हवे होते मला? पैसा, सत्ता, प्रतिष्ठा? बिलकुल नाही. पण मला जे हवे होते ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या एका गावातील २२ वर्षाच्या एका मराठी शेतकरी तरूणाने मला देऊन टाकले. काय दिले त्याने मला तर त्याने प्रत्यक्ष फोन करून मला तो जे मनापासून बोलला ते ऐकून मी स्वतःच चाट पडलो. त्या तरूणाने मला सांगितले की, माझे विचार तो दररोज नुसते वाचतच नाही तर त्या विचारांचे मोबाईलने स्क्रीन शॉटस घेऊन त्यांची तो अधूनमधून उजळणी करतो. माझ्या विचारांनी त्याच्या जीवनात बदल झाला. त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. तो आता १४ वी ला आहे व "कायदा हा माझा श्वास" हा फेसबुक वरील माझा लेख त्याने वाचल्याने ग्रॅज्यूएट झाल्यावर कायद्याचे पुढील शिक्षण घेण्याचे त्याने ठरवले आहे व त्यासाठी तो पंढरपूर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. तसेच माझ्या विचारांतून त्याला अगोदरच कायद्याचे मूलभूत शिक्षण प्राप्त झाले आहे व होत आहे. त्याची आई चार वर्षापूर्वी वारली. वडील आहेत व तोच थोरला असल्याने धाकटया भावंडांची आता त्याच्यावर जबाबदारी आहे. तरीही माझ्या विचारांमुळे त्याला सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे व त्यामुळेच आता त्याला या सर्व जबाबदाऱ्यांची भीती वाटेनाशी झाली आहे. हे सर्व त्याच्या तोंडून प्रत्यक्षात ऐकताना मला एकच जाणीव झाली की माझ्या फेसबुक लिखाणाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले. हजारो लोकांतून मी एका तरूणाला योग्य दिशा देऊ शकलो आणि त्यातच मी जिंकलो, हीच ती माझी जाणीव! ही जाणीव मी त्या तरूणालाही "तूच माझा खरा शिष्य" असे लिहून शेअर करीत आहे, कारण माझा खरा शिष्य तोच आहे हे त्याने आज सिद्ध केले आहे. ही माझी स्वतःची आत्मप्रौढी नसून हा माझ्या जीवनाचा १००% सत्य अनुभव आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०

शुक्रवार, १९ जून, २०२०

गुळाला मुंगळे स्वार्थाचे

गुळाला चिकटलेले मुंगळे गूळ संपला की गायब होतात!

शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय या गोष्टी पुढे पुढे सरकत असताना अनेक मुले, मुली, पुरूष, स्त्रिया अभ्यास, कामाच्या निमित्ताने आयुष्यात आल्या व जवळून संपर्कात राहण्याचा स्वार्थ जसजसा संपत गेला तसतशा हळूहळू गायब होत गेल्या. शालांत परीक्षापूर्व निरोप समारंभ अनुभवल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिल्यावर जे निरोप समारंभ झाले त्यांचाही अनुभव मी घेतला आहे. त्या समारंभात कौतुकास्पद दोन शब्द ऐकताना आनंद होत असला तरी आता आपल्याला या सर्व सहकाऱ्यांना सोडून जायचे हे लक्षात आले की मनात खूप दुःख व्हायचे. पण वाटायचे की हा निरोप तात्पुरता आहे. जरी दुसऱ्या कंपनीत कामाला गेलो तरी पहिल्या कंपनीच्या सहकाऱ्यांबरोबरचे मैत्री संबंध चालू राहतील. पण हळूहळू जुने फोन कमी व्हायचे आणि मग मीही नवीन कंपनीच्या कामात नव्या सहकाऱ्यांबरोबर नवीन संबंधात बिझी होऊन जायचो. हल्लीची समाज माध्यमे त्यावेळी नव्हती. पण या समाज माध्यमांनी संपर्काचे जाळे वाढवले असले तरी माणसाचा स्वभाव तोच राहिलाय. लिंकडइन म्हणून असेच एक समाज माध्यम आहे. त्यावर उच्च शिक्षित व्यावसायिक व नोकरदार मंडळी भरपूर आढळली. अशाच एका उच्च शिक्षिताचे खाते भरपूर कनेक्शन्सने भरलेले पाहिले. त्याला मी विचारले की, "अरे तुझ्या लिंकडइन खात्यावर तुला किती मोठमोठी माणसे ओळखतात". तर तो म्हणाला "काही नाही रे, सुरूवातीला नोकरी शोधताना काढलेले ते खाते आहे, चांगली नोकरी मिळून पाच वर्षे झाली, ते खाते बंद केले नाही म्हणून तसेच धूळ खात पडलेय, त्या खात्यावरील कोणाशीही माझा आता संबंध नाही"! हे ऐकून मी चाटच झालो. काय माणसे असतात जगात! मतलब निकल गया तो पहचानते नही. अशीच मतलबी माणसे स्वार्थ संपला की निरोप घेताना स्टे कनेक्टेड म्हणजे संपर्कात रहा असा औपचारिक सल्ला देतात आणि मग तीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर निघून जातात. मी मात्र वेड्यासारखा अशा लोकांना फोन करायचो. मग काहीतरी औपचारिक बोलणे फोनवर व्हायचे व तिकडून रिस्पॉन्स तुटक आहे ही जाणीव व्हायची. मग समोरून फोन यायचे बंद व्हायचे. मग मीच त्यांना सारखा फोन का करायचा, असे एकतर्फी मागे लागणे काय कामाचे हे कळून चुकल्यावर मीही मग अशा लोकांचा नाद सोडून द्यायचो. असे संबंध कमी कमी होत गेले. पण तरीही पंधरा दिवसांपूर्वी मनात सहज आले की चला आपण या जुन्या कंपनी सहकाऱ्यांना फेसबुकवर तरी शोधून काढू. म्हणून काही जुनी नावे आठवली तशी फेसबुक सर्चवर टाकून दिली. पण त्यांच्या पैकी मला कोणीच फेसबुकवर आढळले नाही. कुठे असतील ही सर्व मंडळी याचा पत्ता लागणे आता शक्य नाही. या सर्वांना व मला जवळ करणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे कंपनी नोकरी आणि तोच त्यांचा व माझा एकत्र येण्याचा व काही काळ एकत्र राहण्याचा स्वार्थ होता. नोकरी संपली, स्वार्थ संपला, सर्व माणसे गायब! आयुष्यात असाच अनुभव घेत गेलो व मग पुढे त्याची सवय होत गेली. हे असे का होत असावे याचा बारकाईने विचार केला असता हे लक्षात आले की माणसांना जवळ आणणारी व त्यांचे संबंध टिकविणारी या जगात असलेली मुख्य गोष्ट म्हणजे स्वार्थ! हा स्वार्थ म्हणजे गूळाच्या ढेपी सारखा असतो. या ढेपीला माणसे मुंगळ्या सारखी चिकटतात व ढेपीचा गूळ संपला की हे मुंगळे गायब होतात!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०

गुरुवार, १८ जून, २०२०

कायदा माझा श्वास!

कायदा हा माझा श्वास!

(१) प्रत्येकाला नैसर्गिक जीवन जगण्याचा, तसेच नैसर्गिक मरण्याचा मूलभूत नैसर्गिक अधिकार आहे. आत्महत्या काय किंवा खून काय, हे दोन्हीही अनैसर्गिक मृत्यूचे प्रकार होत आणि म्हणून या दोन्ही मृत्यूची पोलीस चौकशी ही होतेच! आत्महत्येचे कारण काय, ती स्वतःच्या इच्छेने केलीय की तिला इतर कोणी जबाबदार आहे म्हणजे आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलेय का याची पोलीस चौकशी होते. तसेच खून कोणी केला याची खूनाच्या हेतूसह पोलीस चौकशी होते. या चौकशीत जर कोणी दोषी आढळले तर मग अशा गुन्हेगाराला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला किंवा खून करणाऱ्याला फौजदारी कायद्यानुसार कडक शिक्षा होते! कारण प्रत्येकाला नैसर्गिक जीवन जगण्याचा व तसेच नैसर्गिक मरण्याचा मूलभूत नैसर्गिक अधिकार आहे. पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे मरणे हे संवेदनशील आहे कारण अन्नसाखळीत मनुष्याला निसर्गाने त्याच्या उत्क्रांती प्रक्रियेतून सर्वोच्च पातळीवर आणून ठेवलेय.

(२) नैसर्गिक मरणापेक्षा नैसर्गिक जगण्याचा विषय हा मनुष्यासाठी खूप मोठा विषय आहे. माणसाचे नैसर्गिक जगणे हे इतर प्राण्यांच्या नैसर्गिक जगण्यापेक्षा खूप वेगळे आहे. त्याच्या जगण्याला माया, प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च भावनांची व देव, धर्मासारख्या आध्यात्मिक भावनांची जोड आहे. म्हणूनच माणसाचे नैसर्गिक जगणे हे दिवाणी कायद्याने जास्त व फौजदारी कायद्याने कमी नियंत्रित आहे. अनैसर्गिक जगण्याच्या प्रकारात बलात्कारासारख्या अनैसर्गिक लैंगिकतेचा प्रकार येतो व म्हणूनच बलात्कार हा फौजदारी कायद्यानुसार गुन्हा आहे व अशा गुन्ह्यासाठी फौजदारी कायद्यात कडक शिक्षा आहे.

(३) माणसाचे नैसर्गिक जगणे हे फक्त मनुष्य समाजापुरतेच मर्यादित नाही. निसर्गात जे इतर प्राणीमात्र, वनस्पती आहेत त्यांच्या नैसर्गिक जगण्यात मनुष्याने किती लुडबूड करावी व एकंदरीतच नैसर्गिक पर्यावरणाशी मनुष्याने कसे जुळवून घ्यावे हा मोठा विषय माणसाच्या नैसर्गिक जगण्यात येतो. या सर्व नैसर्गिक गोष्टींचा समावेश कायद्याच्या दिवाणी व फौजदारी या दोन प्रमुख शाखांत केला गेला आहे. माणसाचे इतर माणसांबरोबरचे उच्च पातळीवरील नैसर्गिक जगणे म्हणजे काय हा दिवाणी कायद्याचा फार मोठा विशेष भाग आहे.

(४) माणूस हे काही कृत्रिम यंत्र नाही. तो पण एक नैसर्गिक प्राणी आहे. या नैसर्गिक प्राण्याचे नैसर्गिक जगणे व नैसर्गिक मरणे म्हणजे काय हे जर नीट समजून घ्यायचे असेल तर हिमालय पर्वताची उंची, सागराची खोली व पृथ्वीची रूंदी असलेल्या दिवाणी व फौजदारी कायद्यांचा नुसता वरवर नाही तर सखोल अभ्यास करा. कायदा हे माझे फक्त पैसे कमावण्याचे साधन नाही तर तो माझा श्वास आहे, जो श्वास मी प्रत्येक क्षणाला आत घेतो व बाहेर सोडतो. माझे शरीर, माझे मन, माझे जीवन (तन, मन, जीवन) संपूर्णपणे कायद्याने व्यापलेले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.६.२०२०

बुधवार, १७ जून, २०२०

कोरोना काळातील वकिली!

कोरोना काळात गरीब वकिलांची परिस्थिती खूप नाजूक!

माणूस, मग वकील असो नाहीतर आणखी कोणी, कोरोना लॉकडाऊन मुळे तीन महिने घरी कोंडून राहिल्यावर कोणाचीही मानसिक स्थिती ठीक राहू शकत नाही. कोरोनाने निर्माण केलेली वैद्यकीय आणीबाणी व भारत-चीन सीमेवर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती या आणीबाणी सदृश्य गंभीर बाबी! आपल्या  रोजच्या व्यवहारातील वादविवाद व त्यावर असलेले दिवाणी कायद्याचे तोडगे या गोष्टी अशा आणीबाणीत मोडू शकत नाहीत. कोरोना लॉकडाऊन काळात पोलीसांचा दंडुकाही भारी वजनाचा झाल्याने गुन्हेगार पण हल्ली घाबरून आहेत. त्यामुळे दिवाणी व फौजदारी अशी दोन्ही प्रकारची वकिली सद्या गॕसवर आहे. अशा परिस्थितीत वकिलांची मानसिक स्थिती कशी असेल याचाही लोकांनी जरा नीट विचार करावा. स्पर्धा तर सगळ्याच क्षेत्रात आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या जागा मजबूत करून बसलेले बोके आहेत. अशा बोक्यांची मोठी लॉबी असते. त्यात एखादा गरीब घराण्यातील माणूस बोक्यांच्या तोडीस तोड असलेले टॕलेंट घेऊन उतरला की मग बोक्यांची जळते. मग असे बोके एक होऊन अशा माणसाला वाळीत टाकतात. त्याला पुढे येऊ देत नाहीत. अशा विचित्र परिस्थितीमुळे असा माणूस खचतो. खूप निराश होतो. नैराश्येच्या गर्तेत गेल्यावर अशा माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात. सद्याच्या कोरोना लॉकडाऊन काळात संपूर्ण वकिली व्यवसायच गॕसवर आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मग त्यात गरीब घराण्यातून कायद्याचे शिक्षण घेऊन वकील झालेले नवोदित वकील सद्या कोणत्या परिस्थितीत जगत असतील याचा कोणी विचार केलाय का? वकिलांना पोट नसते काय? ज्यांचे आईवडील, नातेवाईक या क्षेत्रात पूर्वीपासून आहेत त्यांचा थोडा का असेना पण जम बसलेला असतो. पण ज्यांच्या पाठीशी अशी घराणेशाही उभी नाही अशा वकिलांची या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जी जीवघेणी धडपड चालू असते ती काय असते हे मला विचारा. या परिस्थितीतून मी गेलोय व जातोय. म्हणूनच या कोरोना लॉकडाऊनच्या काळात अशा गरीब वकिलांची स्थिती काय असेल याची लोकांनी कल्पना करावी एवढीच किमान अपेक्षा!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.६.२०२०

माझा स्वाभिमानी बाप!

माझा स्वाभिमानी बाप!

हृदयात ब्लॉक्स निघूनही माझ्या बापाने शेवट पर्यंत हृदयाचे अॉपरेशन टाळले. घाबरून नव्हे तर मुलाला (म्हणजे मला) खर्चात पाडायचे नाही म्हणून. माझा बाप एकटाच मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलच्या दारात जायचा व रक्त पातळ करणाऱ्या कसल्या त्या गोळ्या घेऊन यायचा. मला एकांतात म्हणायचा "बाळू, याच गोळ्यांवर मी जगणार, तुला तुझ्या वकिलीतून एकच मुलगी असलेला तुझा छोटा संसार नीट चालवता येत नाही आणि तू माझे अॉपरेशन काय करणार"? माझा बाप पुन्हा म्हणायचा "अरे, करमाळा तालुक्यातील साडे गावातून फाटक्या चड्डीवर मुंबईत आलेला मी माणूस स्वतःच्या हिंमतीवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा पुढारी झालो पण मला छक्केपंजे करता आले नाहीत म्हणून पैशाने गरीबच राहिलो पण तरीही जगण्यासाठी तुझ्यावर अवलंबून राहिलो नाही, अधूनमधून उसने म्हणून तुझ्याकडून घेतलेले पैसे तुला परत करून टाकलेत, मग मी माझ्या हृदयाच्या अॉपरेशनचा खर्च तुझ्यावर टाकीलच कसा, आयुष्यभर स्वाभिमानाने जगलोय आणि स्वाभिमानाने मरणार"! असा माझा स्वाभिमानी बाप शेवटी के.ई.एम. हॉस्पिटलमध्येच मेला. छातीत दुखू लागले की एकटाच के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये अॕडमिट व्हायचा व नंतर त्याची खबर आमच्या पर्यंत उशिरा यायची. मरायच्या काही दिवस अगोदर के.ई.एम. हॉस्पिटलच्या हृदय विकार वार्डात ॲडमिट झालेल्या माझ्या बापाला बघायला मी गेलो तर खाट मिळाली नाही म्हणून माझा बाप त्या वार्डात खालीच गादीवर झोपला होता. पण स्वतःचे दुःख लपवून मलाच तू कसा आहेस वगैरे चौकशी करू लागला. जुन्या के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोर त्याच हॉस्पिटलची हृदय विकारावर इलाज करणारी एक इमारत आहे. त्याच इमारतीतील एका वार्डात माझा बाप ॲडमिट होता. तिथे मोठमोठी उंदरे इकडून तिकडे फिरत होती. ते दृश्य मला बघवत नव्हते. पण माझा स्वाभिमानी बाप त्या वातावरणातही बिनधास्त होता. अशा बापाचा मी मुलगा आहे. त्याचेच रक्त माझ्या अंगात आहे. मग मी कोरोनाला काय घाबरणार! बायको, मुलीला माझ्या स्वाभिमानी बापाची हीच कथा सांगून त्यांना म्हणालोय की, मला कोरोना झालाच तर जमले तर जिथे गरीब मरतात त्याच पालिकेच्या किंवा शासनाच्या रूग्णालयात मला अॕडमिट करा, माझ्यावर खर्च करायचा नाही, भरपूर जगलोय मी, आता पुन्हा पैसे खर्च करून मला जगवायचा प्रयत्न करायचा नाही"! कोरोनाच्या निमित्ताने माझ्या स्वाभिमानी बापाची आठवण हेच आता माझ्यासाठी अमृत आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.६.२०२०

कोरोना उदार झाला!

कोरोना उदार झाला!

जगाचे अर्थकारण व राजकारण कोण ठरवतेय भांडवलवादी अमेरिका की साम्यवादी चीन? हा या जगात जगायचे कसे या मूलभूत वादाचा  दृश्य परिणाम आहे. एवढे धर्म या जगात पण एकाही धर्माला या वादावर उत्तर सापडले नाही. धर्माची तत्वे व त्यातला देवही मला डिजिटल दुनियेसारखा आता आभासी वाटू लागलाय. निसर्ग व त्या निसर्गातील मानवाचे सत्य या आभासापासून फार वेगळे आहे. किती सुखी व शांत होतो मी लहानपणी! मी सुखी व शांत होतो कारण माझे आईवडील सुध्दा त्या सुवर्ण काळात गरिबीतही सुखी व शांत होते. आजार संकटाची कसली खिचखिच नव्हती की वाद संघर्षाची कसली खिचपिच नव्हती. सुवर्ण युगातील सुंदर गाणी ऐकत, सुंदर चित्रपट बघत कष्ट करतानाही माझे आईवडील अगदी आनंदी दिसायचे व गरीब म्हणून फी माफीवर शिक्षण घेणारा मीही आनंदाने शिक्षण घेत होतो. पण कोणाच्या तरी डोक्यात उदारीकरणाचे व जागतिकीकरणाचे खूळ घुसले व अमेरिका आणि रशिया (त्यावेळचे मोठे सोव्हिएट युनियन) यांच्यातील अणुस्पर्धेचे राजकीय शीतयुध्द संपून आर्थिक स्पर्धेतून जगात नवीन अर्थयुद्ध सुरू झाले. जागतिक अर्थयुद्धाचाच वाईट परिणाम आज जग अनुभवत आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध हे जागतिक अर्थयुद्धच आहे. दोन हत्ती लढतात तेंव्हा झाडे उन्मळून पडतात तशी जगातील इतर छोट्या मोठ्या देशांची स्थिती सद्या झाली आहे. यात आपला भारत देश कुठे आहे यावर मोठमोठे अर्थ तज्ज्ञ भाष्य करतील. कारण मी अर्थतज्ज्ञ नाही. मला माझ्या कॉमन सेन्सने जेवढे कळते तेवढेच मी बोलतो, लिहितो. प्रश्न हा आहे की, अर्थयुद्धाचे रूपांतर पुढे विध्वंसक राजकीय युद्धात होते जसे दिवाणी वाद वेळीच मिटले नाहीत तर अशा वादांचे रूपांतर पुढे फौजदारी गुन्ह्यांत होते. हे एक दुष्टचक्र आहे. कोरोना हा याच दुष्ट चक्रातून निर्माण झालेला भयंकर किडा आहे असे मला वाटते. माझा हा कयास कितपत खरा यावरही मोठमोठे तज्ज्ञ भाष्य करतील. मी तसा तज्ज्ञ नसल्याने मी हे माझ्या कॉमन सेन्सने बोलतोय. कसली प्रगती आणि कसला विकास केलाय माणसाने? मुंबईत एका बाजूने उध्वस्त कापड गिरण्यांच्या जागांवर उंच उंच इमारती उभ्या केल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूने समोरच ती धारावी झोपडपट्टी आहे तशीच रडत बसलीय. माणूस निसर्गाला असा फॉलो करतोय काय! म्हणजे निसर्गाने एकीकडून हिमालयासारखे उंच पर्वत निर्माण केले व दुसरीकडून खोल पाण्याचे मोठमोठे सागर निर्माण केले. उंच उंच इमारती म्हणजे हिमालय पर्वत व धारावी झोपडपट्टी म्हणजे हिंदी महासागर अशी कल्पना करतोय. हा माझा आभास आहे की सत्य आहे यावरही मोठमोठे तज्ज्ञ भाष्य करतील. मी तर एक सामान्य माणूस, मग मी माझ्या कॉमन सेन्सनेच बोलणार ना! या उतार वयात माझी सुख शांती लोभी माणसांनी हिरावून घेतलीय असेच माझ्या कॉमन सेन्सला वाटतेय!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.६.२०२०

मंगळवार, १६ जून, २०२०

कोरोनात चहा चपाती?

कोरोनाचे भान ठेवा व मग मला चहा चपाती मागा!

कोरोना लॉकडाऊन काळात माणूस समाज माध्यमातून काही गंमतीच्या, आवडीच्या, आनंदाच्या गोष्टी शेअर करतो याचा अर्थ असा नव्हे की तो कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे सावरलाय. उलटसुलट बातम्यांनी तो अगोदरच गांगरून गेलाय. सद्या कोणाचीही प्रतिकार शक्ती कितीही मजबूत असली तरी अशी व्यक्ती पैलवान बनून कोरोनाशी लढण्यासाठी तयार आहे असे नव्हे. हा कोरोना विषाणू जगाला नवीन असल्याने आपले शरीर या शत्रूला नीट ओळखू शकलेले नाही. त्यामुळे चांगले आरोग्य असलेल्या व्यक्तीचे शरीरही या कोविड-१९ विषाणूमुळे गडबडून जाऊ शकते. अशा गंभीर परिस्थितीत काही दिवसांपूर्वी चहा चपातीचा एक फोटो मी फेसबुकवर टाकला होता म्हणून  एकजण फारच लाडात येऊन "मला चहापाती कधी देणार" म्हणून मागे लागलाय. विनोद म्हणून एखादे वेळी ठीक. पण चहा चपातीची मागणी त्याच्याकडून सारखीच येऊ लागल्याने नाइलाजास्तव मला त्यास खालील मेसेज पाठवावा लागला. अती झाले तर मला त्यास ब्लॉक करावे लागणार हे निश्चित!

"अहो कसली चहा चपाती घेऊन बसलाय कोरोना लॉकडाऊन मध्ये? इथे मी माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे जाणे बंद केलेय आणि दुसरीकडे जाण्याचे काय घेऊन बसलात. कोरोना हद्दपार झाल्याशिवाय बाहेर कुठे चहा चपाती खायची नाही व स्वतःच्या घरातही कोणाला चहा चपाती खायला बोलवायचे नाही. सक्त नियम म्हणजे नियम"! 🙏🙏

सद्य परिस्थितीचे गांभीर्य सर्वांनीच समजून घ्यावे, ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.६.२०२०