https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १६ मे, २०२०

निसर्गातील देवाला माणसाकडून काय हवंय?

निसर्गातील देवाला माणसाकडून काय हवंय?

निसर्गाचा निर्माता असलेला देव जर निसर्गातच अदृश्य स्वरूपात लपून राहून निसर्गाची भौतिक  हालचाल करीत असेल व या हालचालीतून मनुष्यापुढे अनेक भौतिक आव्हाने निर्माण करीत असेल तर मग त्या देवाला माणसाने आध्यात्मिक प्रतिक्रिया द्यावी की भौतिक? देव निसर्गातून भौतिक प्रश्न निर्माण करीत असताना मनुष्याने त्या प्रश्नांत आध्यात्मिक उत्तरे शोधत बसणे कितपत बरोबर? देवाने निर्माण केलेली निसर्गातील भौतिकता लक्षात न घेता देवाला आध्यात्मिक दृष्टीने बघत त्याला आध्यात्मिक नमस्कार करणे, त्याची आध्यात्मिक प्रार्थना करणे व त्यातून त्याच्याकडून एका बाजूने भौतिक सुख व दुसऱ्या बाजूने आध्यात्मिक शांतीची अपेक्षा करीत राहणे हे किती बरोबर? खरं तर हे आध्यात्मिकतेचे खूळ डोक्यातून काढून टाकून मनुष्याने भौतिक निसर्गातील भौतिक देवाची भौतिक आव्हाने भौतिक भावनेने व भौतिक बुद्धीने स्वीकारून भौतिक प्रश्नांवर भौतिक उत्तरे शोधली पाहिजेत. देवाची नैसर्गिकता ही भौतिकता होय हे ओळखायला हवे. निसर्गातील भौतिक देवाला माणसाकडून काय हवंय, भौतिकता की आध्यात्मिकता की दोन्हीही? पण आध्यात्मिकता म्हणजे काय तर देवापुढे शरणागती! देवाला माणसाकडून अशी आध्यात्मिक शरणागती हवीय की भौतिक हुशारी? याचा छडा निसर्गातील घडामोडींचे नीट निरीक्षण व परीक्षण करून माणसाने लावलाच पाहिजे. माणसाने त्याची मानसिकता बदलण्याचा आटापिटा करण्यापेक्षा त्याची मानसिकता व्यावहारिक बनवायला हवी. निसर्गातील देवाचा व्यवहारच जर भौतिक असेल तर मग त्या व्यवहाराला माणसाने भौतिक प्रतिक्रिया देण्यातच त्याचा व्यावहारिक शहाणपणा होय! स्वतःच्या आध्यात्मिक भावनेला व्यावहारिक वळण द्यायला मनुष्याने शिकले पाहिजे. व्यावहारिक वळण म्हणजे भौतिक वळण! भौतिक व्यवहाराचे महत्व हे भौतिक फायद्यात असते. लोकांना हा फायदा कळला की त्यांची मानसिकता बदलते. भौतिक कायद्याचे बोल हे भौतिक फायद्याचे बोल असतात. निसर्गातील देवाला माणसाकडून हा व्यावहारिक शहाणपणा हवाय का?

-ॲड.बी.एस.मोरे©१७.५.२०२०

शुक्रवार, १५ मे, २०२०

लॉकडाऊन?

लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नव्हे!

कोरोनापासून काळजी घेणे म्हणजे स्वतःला घरात कोंडून घेणे असेच का? असे किती दिवस चालणार? एडस रोगाच्या एच.आय.व्ही विषाणू वर लस अजून सापडली नाही. तो विषाणू अंगाला चिकटू नये म्हणून काळजी घ्यायची असते. पण जग घरी बसलेय का त्या विषाणूला घाबरून? अगदी तसेच कोरोना विषाणूच्या बाबतीत करावे लागणार. मुखपट्टी लावून शारीरिक अंतर ठेवीत लोकांना आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागणार. किती दिवस घरात बसून राहणार? कोरोनावर लवकर लस निघण्याची किंवा लवकर जालीम औषध निघण्याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नव्हे हे सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.५.२०२०

गुरुवार, १४ मे, २०२०

Myth of God's spiritualism

MYTH OF GOD'S SPIRITUALISM!

The things of world can get straight natural to human mind if it changes its outlook towards God. Let mind see God with material outlook and not with spiritual outlook. Let God believing mind assume that God created material Nature and started living within it by making Nature as God's home. The next logic would then follow that if God's home viz. Nature is material, how can God live as spiritual entity within Nature as God's home? The two logics follow viz. God behind Nature as creator of material Nature and God within or in Nature as material resident and material controller of Nature. By this logic, God cannot be called as Nature or Nature cannot be called as God. The Nature is just a material world by, of and for God. God's motion in or within Nature is material. Such material motion is God's material conduct. God is thus materially natural and not spiritually divine within Nature. The humanity or human morality is also materially natural and should not be confused with God's spiritualism or divinity. Even cruelty found within Nature is materially natural and constant war between good and bad, right and wrong is also materially natural motion of God. The human concept of law and flaw or dharma and adharma is thus materially natural. There is nothing spiritual about it. We, the human beings, are all small parts of material Nature along with other material parts, living and non -living. Let us look at God as material entity in or within material Nature and then follow such God materially and not spiritually. Let us come out of myth of God's divinity or spiritualism.

-Adv.B.S.More©14.5.2020

बुधवार, १३ मे, २०२०

राजधर्म व नीतीधर्म

राजधर्म व नीतीधर्म!

नीती म्हणजे धोरण! धोरण दिशादर्शक असते. ते ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवते. धर्म काय किंवा कायदा काय तो नीतीधर्म असतो. ध्येयाच्या दिशेने न्याय बुद्धीने पुढे जाण्याचा तो मार्ग असतो. उदाहरणार्थ, राज सिंहासन प्राप्त करणे  अर्थात राजा होणे (लोकशाहीत देशाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान हा देशाचा लोकनियुक्त राजा असतो, निदान त्याचे स्थान राजाएवढे उच्च मानले जाते) हे जर एखाद्या राजकीय नेत्याचे ध्येय असेल तर त्यासाठी त्याला कायद्याचा नीतीधर्म (उदाहरणार्थ, निवडणूक कायदा) हा पाळावाच लागतो. राजेपद मिळविल्यानंतर राजाला राजधर्म पाळावा लागतो. राजधर्म व नीतीधर्म यात खरं तर फरक असताच कामा नये. कायद्याच्या राज्यात राजाला कायद्याच्या चौकटीत राहून अर्थात न्याय बुद्धीवर आधारित नीतीधर्मानुसारच राज्य कारभार करणे हे बंधनकारक असते. अर्थात धर्मनीती हीच राजनीती असली पाहिजे. पण असे होताना सहसा दिसत नाही. कारण राजकारणात राज सिंहासन मिळविणे ही महत्वाकांक्षा असते व तिच्यासाठी काही राजकारणी मंडळीकडून नीतीधर्माला म्हणजे कायद्याला गुंडाळून ठेवले जाते. पूर्वीचे राजे काय किंवा हल्लीचे राजकीय नेते काय, यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा, स्वार्थ, असूया इत्यादी वैयक्तिक गोष्टी जनतेला नाहक सार्वजनिक युद्धाच्या खाईत लोटतात. अशा युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी जनतेला धर्मयुद्धाचे तत्त्वज्ञान शिकविले जाते. शेवटी महाभारत कथेतून तरी आपल्याला काय संदेश मिळतो? हस्तिनापूर राज्यासाठी कौरव व पांडवांत जे महायुद्ध झाले त्याला अधर्म विरूद्ध धर्म असा रंग दिला गेला असला तरी यात हस्तिनापूरच्या जनतेचे हित किती होते? दोन्हीही बाजूंनी हस्तिनापूरच्या राज सिंहासनाचा वैयक्तिक हक्कच पुढे केला गेला. बरं मग ज्या वैयक्तिक हक्कासाठी अधर्म विरूद्ध धर्म असे हे युद्ध झाले त्या युद्धात तरी धर्माचे पालन दोन्ही बाजूंनी केले गेले का, हा अभ्यासाचा विषय आहे. कौरवांनी मागे अधर्म केला होता मग पांडवांनी आता युद्धात थोडा अधर्म केला तर बिघडते कुठे असा युक्तिवाद श्रीकृष्णाने करणे म्हणजे सोयीनुसार धर्माने बदलने नव्हे काय? पण एकदा का श्रीकृष्णाला देव मानले की मग असे धार्मिक प्रश्न गौण ठरतात. म्हणून राजधर्म हा बऱ्याच वेळा नीतीधर्म रहात नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१३.५.२०२०

विचलित मन

विचलित मन!

एखाद्या गोष्टीचे विशेष ज्ञान संपादन केल्यावर त्या गोष्टीत विशेष सराव करून तिच्यात विशेष प्रावीण्य मिळवून तज्ज्ञ होण्याची संधी मिळाली नाही की मग अशा व्यक्तीचे मन सर्वसाधारण गोष्टींकडे भरकटते. अशा व्यक्तीचे मन कुठेच स्थिर होत नाही. कशावरच लक्ष केंद्रित करता न आल्याने अशा व्यक्तीचे मन विचलित होऊन जगते.

-ॲड.बी.एस.मोरे©१३.५.२०२०

रविवार, १० मे, २०२०

आध्यात्मिक देव व भौतिक निसर्ग?

भौतिक निसर्ग हाच आध्यात्मिक देव की भौतिक निसर्गाच्या मागे आध्यात्मिक देव?

(१) देव ही संकल्पना माणसाचा पिच्छा सोडत नाही, मग माणूस आस्तिक असो की नास्तिक! आस्तिक माणूस देवाला मानतोच पण नास्तिक माणूस सुध्दा जगात देव नाहीच हे आग्रहाने पटवून देण्यासाठी तार्किक युक्तिवाद करीत  राहतो. म्हणजे नास्तिक माणूस सुध्दा देवाच्या अस्तित्वाला नाकारत अप्रत्यक्षपणे देवाला चिकटतोच. खरं म्हणजे, आस्तिक माणसाकडे देवाला स्वीकारण्यासाठी जसा ठोस पुरावा नसतो तसा नास्तिक माणसाकडेही देवाला नाकारण्यासाठी ठोस पुरावा हा नसतोच! दोघांकडेही असतो तो फक्त तर्क आणि तर्क!

(२) नास्तिकाच्या तर्काचा विचार नास्तिकाकडे सोपवून देऊन आस्तिकाच्या तर्काचा विचार करायचा तर मग देव ही संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे. देवाला मानायचे तर मग ते कसे मानायचे हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. देव तर दिसत नाही, मग दिसणाऱ्या निसर्गालाच देव मानायचे का? पण शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय? अंतराळ विश्व व उत्क्रांत, विकसित  झालेली पृथ्वीवरील सृष्टी मिळूनच निसर्ग होतो ना! या निसर्गात सूर्य, चंद्र, पृथ्वी, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे या गोष्टीही येतात. मग निसर्गाला देव मानायचे तर या गोष्टींच्याच पाया पडावे लागेल. मग माणसांनाही देव मानून त्यांच्याही पाया पडावे लागेल! हे मनाला पटत नाही. म्हणून मग तार्किक विचार करणारे मन निसर्गाला देव मानणे टाळते. थोडक्यात, निसर्ग म्हणजे तरी काय तर भौतिक जग व निसर्गाचे विज्ञान म्हणजे तरी काय तर निसर्गाचे भौतिक सत्य!

(३) पुढचा प्रश्न हा उपस्थित होतो की, निसर्ग हा जर देव नाही तर मग देव कोण आहे? मग मानवी मन असा तर्क करते की, देव हा निसर्गापेक्षाही मोठा आहे व तो निसर्गाहून वेगळा आहे. तो निसर्गाच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात उभा आहे. तो सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान आहे. तोच निसर्गाचा निर्माता, विधाता व नियंता आहे. विधाता म्हणजे विधीनियम, कायदा करणारा निसर्गाचा राजा व नियंता म्हणजे कायद्यानुसार निसर्ग नियमन, नियंत्रण करणारा निसर्गाचा न्यायाधीश. सर्वश्रेष्ठ देव अशाप्रकारे निर्माता, राजा व न्यायाधीश या तीनही भूमिका पार पाडतो हे एकदा का मनाने तर्काने कल्पले की मग मन देवश्रध्द होते. असे देवश्रध्द मन निसर्गातील आव्हानांना नीट व पूर्णपणे तोंड देता येत नाही म्हणून त्या अदृश्य पण सर्वश्रेष्ठ देवाला आध्यात्मिक भावनेने शरण जाते व त्याला भक्तीने प्रसन्न करण्याचा धार्मिक प्रयत्न करते. त्यासाठी देवाच्या भक्तीची उपवास, प्रार्थना यासारखी धार्मिक कर्मकांडे करते.

(४) शरण जायचे म्हणजे तरी काय करायचे असते? ज्यावेळी आपले शरीर व आपली बुद्धी  निसर्गाचे आव्हान पेलण्यात नुसती अशक्तच नव्हे तर पूर्णपणे हतबल ठरते तेंव्हा असहाय्य होऊन निसर्गाचे भौतिक आव्हान हलके करून देणाऱ्या कोणापुढे तरी शरणागत होऊन याचक व्हायचे. या संकटातून सोडव बाबा म्हणून त्या कोणा तरी सर्वशक्तीमानाची प्रार्थना करायची. देवाशिवाय असा या जगात कोण आहे की जो सर्वशक्तीमान आहे? म्हणून मग देवालाच शरण जायचे.

(५) अशाप्रकारे अदृश्य देवापुढे आध्यात्मिक भावनेने किंवा श्रध्देनेच शरण जाता येते. तिथे स्वतःच्या शरीराचा माज व स्वतःच्या बुद्धीचा शहाणपणा बाजूला काढून ठेवावा लागतो. तिथे असते ती भावना आणि फक्त भावनाच व तीही आध्यात्मिक! आध्यात्मिक भावना व वैज्ञानिक भावना यात फरक असतो. वैज्ञानिक म्हणजे सत्य! आता जर अदृश्य देव (ईश्वर) हाच सत्य स्वरूपात पुराव्यासह सिद्ध करता येत नाही तर मग आध्यात्मिक भावनेचा व सत्याचा संबंध कसा जोडायचा? बरं, देवाचा पुरावा मागायचा तर आध्यात्मिक भावनेपुढे बुद्धीला वावच नाही. मग देवाच्या सत्याचा शोध कसा घेणार?अशाप्रकारे देव हा नेहमीच अज्ञात, अदृश्य व आध्यात्मिक पातळीवरच राहतो. देवापुढे बुद्धीचे काय काम? तिथे फक्त आणि फक्त आध्यात्मिक भावना किंवा श्रध्दा! मग देवाची चिकित्सा कशी करायची? नव्हे ती करायचीच नसते आणि इथेच श्रध्दाळू आस्तिक विरूद्ध केवळ बुद्धीलाच प्रमाण मानणारा नास्तिक यांच्यात वाद होतो.

(६) निसर्ग प्रत्यक्ष स्वरूपात बघता येतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. अर्थात निसर्गाचे भौतिक सत्य हे पुराव्यासह सिद्ध करता येते. म्हणून निसर्गाकडे वैज्ञानिक भावनेने बघायचे व  त्याला वैज्ञानिक बुद्धीने अंगावर घ्यायचे! एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन शब्दांतील अर्थात खूप फरक आहे. जिथे निसर्गाची भौतिकता आहे तिथे निसर्गाचे भौतिक सत्य म्हणजे भौतिक विज्ञान आहे व जिथे देवाची आध्यात्मिकता किंवा भावनिक श्रध्दा आहे तिथे देवाचे सर्वश्रेष्ठ  आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ही आध्यात्मिक भावना माणसाला निसर्गापलिकडील देवाचा आधार घेत त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला, त्याला शरण जायला प्रेरित करते.

(७) प्रश्न हा आहे की, निसर्गात रहायचे तर मग निसर्गाचे भौतिक सत्य टाळून फक्त देवावर विसंबून चालेल का? जर निसर्गाची निर्मिती हीच मुळी देवाने केली असे गृहीत धरायचे तर मग निसर्गाबरोबर निसर्गाचे भौतिक सत्यही आहे त्या स्वरूपात स्वीकारायलाच हवे ना! हे सत्य डोईजड होत असेल तर मग त्याचा भार हलका करण्यासाठी त्या महान देवाची फक्त  आध्यात्मिक प्रार्थना करीत बसून चालेल का? माणूस तेवढेच करीत बसला असता तर त्याला विज्ञानाचे म्हणजे निसर्गाच्या भौतिक सत्याचे शोध लावता आले असते का व त्या सत्यावर आधारित त्याला तंत्रज्ञानातील प्रगती करता आली असती का?

(८) म्हणून आस्तिक माणसाला सुद्धा देवावर आध्यात्मिक श्रध्दा ठेवत निसर्ग व निसर्गाच्या भौतिक सत्याला वैज्ञानिक भावनेने व वैज्ञानिक बुद्धीने सोयीस्करपणे अंगावर घ्यावेच लागते! अर्थात निसर्गाच्या सान्निध्यात भौतिक निवास करताना मनुष्याला आध्यात्मिक भावनेऐवजी वैज्ञानिक भावना (सत्य दृष्टिकोन) व वैज्ञानिक बुद्धी (सत्याला प्रमाण मानणारी बुद्धी ज्यात विवेकबुद्धीचाही समावेश असतो) या दोन्हींचा आश्रय घ्यावा लागतो. अशावेळी आध्यात्मिक भावनेने भौतिक निसर्गामागील आध्यात्मिक देवाची प्रार्थना करताना आस्तिक माणसाने त्याच्या देवश्रध्देला मिथ्या गोष्टी चिकटवून अंधश्रध्द होणे हे चुकीचे होय!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.५.२०२०


शुक्रवार, ८ मे, २०२०

Instincts versus Emotions and Intelligence!

मानवी जीवनाचे निसर्ग विज्ञान!

(१) सजीवांची नैसर्गिक उत्क्रांती होत असताना मानवी जीवन हे इतर सजीवांपासून उच्च जैविक कसे झाले याचा लाखो वर्षांपासूनचा इतिहास थक्क करून सोडणारा आहे. या उत्क्रांतीत मानवी मेंदू अधिकाधिक विकसित झाला व या विकसित मानवी मेंदूनेच मानवी जीवन उच्च जैविक पातळीवर आणून सोडले.

(२) उच्च जैविक पातळी म्हणजे मानवी मनाची  मूलभूत जैविक वासनांपासून उंचावलेली उच्च भावनिक पातळी! या उच्च पातळीवर मानवी जीवनाच्या निसर्ग विज्ञानाचा अभ्यास वासना व भावना या दोन नैसर्गिक प्रेरणांत विभागून केला तर सोपा होतो. वासना म्हणजे भूक, लैंगिकता, झोप यासारख्या मूलभूत जैविक वासना. मानव सोडून इतर प्राणीमात्रांच्या मनाची पातळी ही या जैविक वासनेच्या पातळीवरच स्थिर असते. पण मनुष्याला या मूलभूत जैविक वासनांच्या बरोबर भावनाही असतात.

(३) मानवी भावनांची विभागणी दोन पातळीत करता येते. एक असते ती कनिष्ठ भावनिक पातळी जी फक्त मूलभूत जैविक वासनांनीच बरबटलेली असते. कनिष्ठ भावनिक पातळीवर मनुष्य व जनावर यात फार मोठा फरक राहत नाही. दुसरी असते ती श्रेष्ठ भावनिक पातळी जी मनुष्याला वासनेच्या कनिष्ठ पातळीवरून वर उंचावून प्रेम, करूणा, परोपकार, समाजहित, विश्वहित या परमार्थी भावनांकडे ओढून नेते. कनिष्ठ पातळीवरील भावनांना वाईट भावना व उच्च पातळीवरील भावनांना चांगल्या भावना अशी सर्वसाधारण मानवी भावनांची वर्गवारी करता येईल.

(४) वासना व भावना यांच्यासोबत मानवी मेंदूत बुद्धीचाही निवास असतो. वासना व वाईट भावना यात फारसा फरक न करता वाईट भावना व चांगल्या भावना यात फरक करणे मानवी बुद्धीला सोपे पडते. वासनेने पूर्णपणे  बरबटलेल्या वाईट भावना व प्रेम, करूणा, परोपकार, समाजहित, विश्वहित यांची ओढ असलेल्या चांगल्या भावना या दोन्ही भावनांचा संतुलित, विवेकी विचार करून त्यांच्यावर विवेकी विचाराचे स्थिर नियंत्रण मिळविणारी बुद्धी हीच मनुष्याची श्रेष्ठ बुद्धी होय. वाईट भावनांच्या आहारी जाऊन भ्रष्ट होणारी बुद्धी ही नीच बुद्धी होय. तसेच दोन्ही भावनांच्या मध्ये चाचपडणारी व ठाम विवेकी निर्णय घेऊ न शकणारी बुद्धी ही अस्थिर बुद्धी होय.

(५) मानवी बुद्धीचा विचार करता ईश्वर व धर्म या संकल्पनांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या संकल्पनांविषयी मानवी बुद्धी बऱ्याच वेळा  गोंधळून जाते. निसर्गात ईश्वर (देव) बघायचा की नाही अर्थात आस्तिक व्हायचे की नास्तिक व्हायचे, हा देव विरूद्ध निसर्ग वाद हा मानवी बुद्धीच्या दृष्टिकोनातील गोंधळाचा भाग झाला. तर ईश्वरवादी किंवा आस्तिक होत आध्यात्मिक विचारांचा म्हणजे ईश्वराला स्मरून चांगल्या भावनिकतेचा "ईश्वर धर्म" स्वीकारायचा की निरीश्वरवादी किंवा नास्तिक होऊन ईश्वराला सोडून देऊन फक्त मानवी बुद्धीशीच प्रामाणिक असलेल्या विवेकी विचारांचा म्हणजे चांगल्या पण निरीश्वरी भावनिकतेचा "मानव धम्म" स्वीकारायचा, हा धर्म विरूद्ध धम्म वाद हा मानवी बुद्धीच्या वैचारिक किंवा तात्त्विक गोंधळाचा भाग झाला. अशी गोंधळलेली बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. यावर तोडगा हाच की, जोपर्यंत दुसऱ्यांचे युक्तिवाद तुमच्या बुद्धीला पटत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम राहिले पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©८.५.२०२०