https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

वेडेपणा म्हणजे काय?

कायद्याच्या भाषेत वेडेपणा (insanity) कशाला म्हणतात?

(१) भ्रम (delusion)
(२) खोटी कल्पना (hallucination)
(३) भास (illusion)
(४) आवेश (impulse)
(५) कल्पनेने पछाडणे, घेरणे (obsession)
(६) खूळ, मूर्खपणा, विक्षिप्तपणा, उन्माद 
     (lunacy, lucid interval)  

संदर्भः Medical Jurisprudence and Toxicology by Rai Bahadur Jaising P. Modi

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

बुद्धी दे!

गणपती बाप्पा, वाचव रे बुद्धीला निर्बुद्धांच्या तावडीतून!

बुद्धीमान लोकांनी बनविलेले सरकारी नियम बुद्धीमान लोकांनीच अंमलात आणायला हवेत की नकोत? त्यांची अंमलबजावणी जर निर्बुद्ध लोकांच्या हातात दिली तर त्या नियमांचे तीन तेरा वाजतील नाहीतर काय होईल? यालाच म्हणतात माकडाच्या हातात कोलीत देणे. हे असे लिहिण्यालाही तसेच कारण घडतेय. सुका व ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबीन्स मध्ये ठेवला नाही तर तो उचलला जाणार नाही असा सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नियम आला. पर्यावरण रक्षणासाठी हे ठीकच आहे. पण या कोरोना लॉकडाऊन काळात होते काय की सोसायटीत कचरा उचलायला घाबरून कोणी येतच नाही. मग होते काय की, प्रत्येकजण सुक्या व ओल्या कचऱ्याचे ते दोन डस्टबीन्स स्वतःच उचलून घेऊन जवळच्याच एखाद्या  कचरा पॉईंटवर जातात व तिथे ते दोन्हीही डस्टबीन्स एकत्र ओतून घरी परत येतात. याचा अर्थ असा की, त्या कचरा पॉईंटवर सुका व ओला कचरा एक होतो. मग तिथे पालिकेची घंटा गाडी येऊन सुक्या व ओल्या कचऱ्याचा तो एकच ढीग उचलून घेऊन जाते. असेच जर करायचे होते तर मग हा कचरा विभाजनाचा नियम केलाच कशाला? खरं तर त्या कचरा पॉईंटवर पालिकेने एका ऐवजी दोन कचरा कुंड्या (सिमेंटचे दोन मोठे हौद) ठेवल्या पाहिजेत व एका कुंडीवर सुका कचरा व तसेच  दुसऱ्या कुंडीवर ओला कचरा अशी मोठी अक्षरे रंगविली पाहिजेत व तसे न करणाऱ्यास मोठा दंड ठोठावला जाईल असा ठळक अक्षरात तिथे बोर्ड लावला पाहिजेत. पण या नियमाची वाट दोन्ही बाजूंकडून ही अशी लावली जाते. कचऱ्याच्या बाबतीत जर हे असे होत असेल तर कोरोना उपचार व नियमांच्या बाबतीत काय होत असेल? बापरे, कल्पनाच करवत नाही! निर्बुद्ध माणसांच्या घोळक्यात बुद्धीमानांनी आपली बुद्धी पाजळू नये. बुद्धीमान लोकांना  जगायचे असेल तर त्यांनीही निर्बुद्धांबरोबर  निर्बुद्ध व्हावे असाच धडा या अनुभवातून मिळतो. गणपती बाप्पा, अरे काय चाललेय हे! तू तर बुद्धीचे दैवत पण इथे बुद्धीच संकटात सापडलीय! वाचव रे बाबा तुझ्या बुद्धीला या निर्बुद्धांच्या तावडीतून!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०

टीपः

हा निर्बुद्धपणा काय एकाच पालिकेकडून होतो का? तर नाही हेच उत्तर आहे. कारण असा सावळागोंधळ सगळीकडेच चालू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही पोस्ट सर्वसाधारण निरीक्षण म्हणून वाचावी. माझे काही चुकले असेल तर चुकभूल द्यावी घ्यावी!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

गणपती बाप्पा मोरया!

श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज शनिवार दिनांक २२ अॉगष्ट २०२० रोजी श्रीगणेश चतुर्थी आली आहे. गेल्या वर्षी २०१९ साली ती २ सप्टेंबरला आली होती तर २०१८ साली ती १३ सप्टेंबरला आली होती. अर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही हिंदू कालगणना तारीख इंग्रजी कॕलेंडरच्या पुढे मागे होते. गणपतीला हिंदू धर्मात बुद्धीचे दैवत मानले आहे. हे दैवत सुखकर्ता व दुःखहर्ता/विघ्नहर्ता ही असल्याने या दैवताची आराधना चांगल्या कार्याचा आरंभ करण्यापूर्वी करतात. शिवपार्वती हे या दैवताचे उगमस्थान! म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेची पूजा, व्रत करतात. निसर्ग सृष्टीची रचना व व्यवस्था समजून घेऊन त्या नुसार वर्तन व्हावे म्हणून योग्य मार्गदर्शनाची गरज असते व ते काम बुद्धी करते. निसर्ग व्यवस्थेनुसार योग्य वर्तन होण्यासाठी मानवी मनातील वासना व भावना यावर नियंत्रण व त्यात संतुलन ठेवण्यासाठीही बुद्धीचा उपयोग होतो. आज या बुद्धी देवतेचे आगमन झाले आहे. मात्र कोरोना विषाणूचे संकट/विघ्न चालू असल्याने यावर्षीचा गणेशोत्सव डामडौलात साजरा करता येत नाही. तरीही साध्या पद्धतीने का होईना पण लोक श्रीगणेश मूर्ती घेऊन आले आहेत व श्री गणेशाची यथासांग पूजा अर्चा करीत आहेत. गौरी गणपतीचा सण खरंच खूप आनंदाचा! या सणातील श्रद्धा व उत्साह मला खूप भावतो कारण तो लोकांना जवळ करतो! श्रीगणेश चरणी एवढीच प्रार्थना की, बाबारे हे कोरोनाचे संकट आता लवकरात लवकर दूर कर कारण तू विघ्नहर्ता आहेस व सरकार नावाच्या व्यवस्थेला चांगली बुद्धी देऊन ही टाळेबंदी लवकर उठवायला सांग व मुंबईच्या लोकल ट्रेन्स लवकर सुरू होऊ देत. गणपती बाप्पा मोरया!

-ॲड.बी.एस.मोरे©२२.८.२०२०

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कायदा व धर्म वेगळे नाहीत!

कायदा व धर्म यांना वेगळे समजणे मुळातच चुकीचे!

मानव समाज हा निसर्ग सृष्टीचाच एक छोटा भाग आहे. त्यामुळे फुले व काटे या दोन्ही गोष्टी जशा निसर्गाच्या भाग आहेत तशाच त्या मानव समाजाच्याही भाग आहेत. या दोन्ही भागांतील फुलांचा आस्वाद कसा घ्यायचा याचे आर्थिक नियम व या दोन्ही भागांतील काट्यांना बाजूला कसे करायचे याचे राजकीय नियम निसर्गाच्या मूलभूत कायद्यात आहेत व हा नैसर्गिक कायदा निसर्गाच्या विज्ञानाचा भाग आहे. निसर्गातील व समाजातील फुलांचे आकर्षण व निसर्गातील व समाजातील काट्यांची भीती प्रत्येक मनुष्याला असते. प्रत्येक माणूस या सर्व फुलांना एकटाच ओरबाडू लागला व सर्व काट्यांशी एकटाच लढू लागला तर त्यातून समाजातील एकही माणूस आर्थिकदृष्ट्या सुखी व राजकीयदृष्ट्या शांत, सुरक्षित होऊ शकणार नाही. म्हणून निसर्गाच्या आर्थिक व राजकीय कायद्याचाच पूरक भाग असलेला समाजाचा आर्थिक व राजकीय कायदा बुद्धीमान माणसांनी शोधला व त्या सामाजिक कायद्याच्या अंमलबजावणी साठी मानव समाजातूनच एक स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण केली. समाजाचे नीतीनियम पाळले नाहीत तर समाजाकडून कोणालाच फुलांचे सुख मिळणार नाही व कोणालाच काट्यांपासून संरक्षण मिळणार नाही असा या सामाजिक कायद्याचा दंडक असतो. निसर्गाच्या व मानव समाजाच्या कायद्यांत समाविष्ट असलेल्या नीतीनियमांनाच नीतीधर्म म्हणता येईल. म्हणून कायदा व धर्म यांना वेगळे समजणे हे मुळातच चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मी सायन्स लॉ एक्सप्रेस नावाचे फेसबुक पेज सुरू केले व माझ्या फेसबुक खात्याचेही तेच नाव आहे. निसर्ग, निसर्गाचे विज्ञान, त्या विज्ञानात असलेला कायदा व त्या कायद्याचाच धर्म असा माझ्या ज्ञान, विचारांचा सारांश आहे. तो सर्वांना तसा पटेलच असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की या लेखातील पटेल तेवढेच घ्यावे व बाकीचे सोडून द्यावे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.८.२०२०

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

आध्यात्मिकतेची मर्यादा!

आध्यात्मिकतेच्या मर्यादा!

लहानपणीचा सगळा अनुभवच वेगळा! देव, धर्म, धार्मिक सण, उत्सव या गोष्टी गोडधोड खाण्यापुरत्याच मर्यादित होत्या. मस्त खायला मिळतेय ना मग त्या सर्व गोष्टी हव्या हव्याशा वाटायच्या. पण त्यामागचा अर्थ कळत नव्हता  व म्हणूनच लहान मुलांमुलीत वाद, भांडणेच होत नसायची. आजूबाजूला माणसे मरायची. पण त्याचेही काही वाटत नसायचे. कारण घरातील आईवडील, भाऊ, बहिणी, चुलते, मामा वगैरे जवळची मंडळी जिवंत असायची. अर्थात मृत्यूचा अर्थच कळत नसायचा. त्यामुळे मनात विरक्ती वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता सगळं कळतंय आणि हे कळणेच फार त्रासदायक झालेय. आजूबाजूला चाललेली जगण्याची प्रचंड मोठी स्पर्धा, अनेक धर्म, पंथ, जातीपाती, हेवेदावे, त्यात पुन्हा प्रत्येकाचे ज्ञान वेगळे, अनुभव वेगळा, परिस्थिती वेगळी, तसेच ताकद वेगळी आणि तरीही समानतेचे तुणतुणे वाजवत भांडत बसायचे! कसली समानता आणि कुठे आहे समानता? त्यात पुन्हा काही वजनदार मंडळींची अघोषित हुकूमशाही सहन करीत लोकशाहीचे गुणगाण गात रहायचे. मग मध्येच कोरोनासारखा विषाणू काय उठतो व  सहा सहा महिने सगळ्यांच्या नाड्या आवळत मोकाट सुटतो, सगळे जनजीवन विस्कळीत करतो आणि आमचे प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान त्यावर उलटसुलट चर्चा करीत राहते. मग पुढे धार्मिक सण काय, उत्सव काय या सगळ्याच गोष्टी थंड होतात. जिथे देवाला शोधायचे ती मंदिरे, त्या मशिदी, ती चर्चेस कड्या, कुलूपे लावून बंद होतात. आणि तरीही आम्ही घरात बसून गो करोना, गो करोना असे म्हणत देवाची प्रार्थना करीत रहायचे. या आध्यात्मिकतेवर स्वतःच बराच अभ्यास केला, स्वतःच स्वतःशी चिंतन, मनन केले, पण ठोस असे काहीच सापडले नाही. शेवटी कळून चुकले की आपले आयुष्यच मर्यादित आहे तर मग या गोष्टीही मर्यादित असणारच! आध्यात्मिकतेलाही मर्यादा आहेत ही गोष्ट कळली हेही नसे थोडके! माझा हा लेख वाचकांना मूळ सत्याची जाणीव करून देणारा न वाटता नकारात्मकता निर्माण करणारा वाटला तर कृपया तो कचरापेटीत फेकून द्यावा. पण त्यावरून मी नैराश्येत म्हणजे इंग्रजीत डिप्रेशन मध्ये वगैरे गेलोय असा कृपया कयास काढू नये. या असल्या गोष्टींची मला आता चांगली सवय झालीय. मी माझी काळजी घेतोय, आपणही आपली काळजी घ्या! आणि हो, माझ्या दृष्टिकोनातून या जगात नकारात्मक, सकारात्मक वगैरे काही नसते! सत्य हे सत्य असते आणि त्याकडे सत्य म्हणूनच बघायला हवे. गुलाबाला गुलाब म्हणून व काट्यांना काटे म्हणूनच बघितले पाहिजे. यासंदर्भात मी इयत्ता सातवीसाठी असलेल्या हिंदी सुलभभारती या पुस्तकातील फूल और काँटे कवितेचा अभ्यास केला असता मला हा अर्थबोध झाला की निसर्ग गुलाबाच्या रोपट्याला समानतेच्या न्यायाने जमिनीतील अन्नद्रव्ये, हवा, पाणी, सूर्यप्रकाश देतो पण त्या रोपट्यातून गुलाबाची फुले व काटे अशा दोन विभिन्न गुणधर्मांचे दोन वेगवेगळे पदार्थ बाहेर काढतो. गुलाबाचे गुण चांगले तर काट्याचे गुण वाईट! कवितेचा सारांश हा की माणसांनी गुलाबाप्रमाणे चांगले वागावे. काट्यां प्रमाणे वाईट वागू नये. पण माझे म्हणणे हे की, निसर्ग माणसांना गुलाबाप्रमाणे चांगले वागू देतो का? माणसाच्या आयुष्यात काटे पेरून निसर्ग माणसाला काय सांगतो की, बघ तुला गुलाबाचे सुख हवे असेल तर अगोदर मार्गातले काटे बाजूला काढ व त्यासाठी हातात शस्त्र घे! ही कसली परीक्षा आणि शिकवण निसर्गाची? यात काय सकारात्मकता व नकारात्मकता घ्यायची निसर्गाकडून? हे माझे वैयक्तिक मत आहे व ते मत इतरांनी पटवून घ्यावे असा माझा बिलकुल आग्रह नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.८.२०२०

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

Sr. Citizens Pension?

Just Rs. 200 per month as social security pension to Sr. Citizens?

From the draft letter on letter head of Sr. Citizens addressed to the President of India, it is understood that Government of India is paying just Rs.200 per month as social security pension to the Sr. Citizens. Is this fair? What is the truth? Can anybody explain what is the reality in matter?

-Adv.B.S.More©16.8.2020

प्रभो दया!

ध्यान योग!

गोंधळलेले मन, घाबरलेले मन, भरकटलेले अस्थिर मन अशा मानसिक अवस्थेत ध्येयावर/लक्षावर मन केंद्रित/एकाग्र होण्यासाठी एखादा आस्तिक माणूस देवाची खालीलप्रमाणे छोटीशी पूर्व प्रार्थना करून देवाकडे एकाग्रतेची याचना करू शकतो.

                    "प्रभो दया!"

मात्र त्यासाठी देवाचा आभास नको, तर त्यावर ठाम विश्वास हवा!

या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवीला!

प्रभो नामाचा गजर करीत ईश्वरावरील ठाम विश्वासाचा झेंडा घट्ट रोवून स्वतःचे मन निश्चित ध्येयावर (लक्षावर) केंद्रित (एकाग्र) करण्याची कृती म्हणजे निसर्गाच्या अदृश्य शक्तीला किंवा  चैतन्याला (अदृश्य ईश्वराला) मनात एकवटून निश्चित ध्येय गाठण्याची कृती! निसर्गातील  ईश्वर शक्तीला (चैतन्याला) म्हणजेच देवाला आकार, रंग, रूप नसल्याने त्या चैतन्यमय शक्तीला काल्पनिक आकार, रंग, रूप देऊन त्या प्रतिमेचा आभास मनात निर्माण केल्याने मनाची एकाग्रता साध्य करणे कठीण! असा आभास निर्माण न करता ईश्वर शक्तीला किंवा निसर्गातील चैतन्याला मनात एकवटून एकाग्रता साध्य करण्याच्या योगाला ध्यान योग म्हणता येईल. असा ध्यान योग डोळे मिटून नाही तर ध्येयावर/लक्षावर नजर रोखून करावा लागतो. नेमबाजी ही याच ध्यान योगाने डोळे उघडे ठेऊन शिकतात, डोळे बंद करून नव्हे! पण नेमबाजी शिकण्यासाठी मनुष्याला आस्तिक असण्याची गरज नसते. नास्तिक मनुष्यही सर्व शक्ती एकवटून मनाची एकाग्रता साध्य करू शकतो. त्या शक्तीला आस्तिक मनुष्य ईश्वर म्हणेल तर नास्तिक मनुष्य निसर्गाची शक्ती म्हणेल एवढाच काय तो आस्तिक व नास्तिक यांच्यातील फरक!

-ॲड.बी.एस.मोरे©१६.८.२०२०

टीपः माझा कोणीही ऐहिक किंवा आध्यात्मिक गुरू नसल्याने मी स्वतःच स्वतःवर स्वतःच्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर असे प्रयोग करीत असतो. माझे ज्ञान व अनुभव अपुरे असल्याने असे प्रयोग हे प्रयोगच मानावेत, ते सत्य किंवा सिद्धांत मानू नयेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©१६.८.२०२०