https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

कट्टरता अनैसर्गिक!

सामायिक साखळीत कट्टरतेला थारा नाही!

निसर्गातील विविधता मानव समाजात आलीय. निसर्गातील विविधतेत असलेले विशेष ज्ञान मिळवून त्या ज्ञानात प्रावीण्य मिळवून माणसे त्या त्या विषयातील तज्ज्ञ (स्पेशालिस्ट) होतात. या तज्ज्ञ मंडळीमुळे मानव समाजात विविधता निर्माण होते.

समाजात विविध प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीची विविधता व तिची विशेषतः निर्माण झाली आहे. विशिष्ट प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीशी विशेष भावनिक जवळीक निर्माण झाली की त्यातून जी विशेष जाणीव निर्माण होते तिला अस्मिता म्हणतात. अस्मिता माणसाला त्या अस्मितेशी चिकटून रहायला व तिच्याशी काटेकोर रहायला शिकवते. त्यातून मानव समाजात तुकड्या तुकड्यांची कट्टरता निर्माण होते. ही कट्टरता अस्मितेचा अभिमान नाही तर गर्व करायला शिकवते. ही गर्वाची भावना अस्मितेचा अहंकार फुलवते जो समाज एकतेसाठी घातक असतो.

निसर्गात विविधता व विशेषतः असली तरी त्या विशेषतेची कट्टरता आहे का हा अभ्यासाचा विषय आहे. निसर्ग हा सर्वसमावेशक आहे. तो कोणत्याही विशेष पदार्थाला व त्याच्या विशेष गुणधर्माला कट्टर होऊ देत नाही. या नैसर्गिक सत्यावर आधारित "शेरास सव्वाशेर" ही म्हण  निर्माण झाली आहे. निसर्गाने विविधतेला एकत्र ठेवण्यासाठी समरसतेची एक साखळी निर्माण केली आहे. विविधता म्हणजे असमानता. पण या असमानतेतच सामायिक साखळी निर्माण करून निसर्गाने अटीशर्तीची समता (समानता) निर्माण केली आहे. कायद्यापुढे सर्व समान याचा अर्थ निसर्गापुढे सर्व समान. सामायिक  साखळीत निसर्ग कोणाचीही कट्टरता चालू देत नाही.

विविधतेची अर्थात विशेषतेची एकजूट करणे म्हणजे विशेषीकरणाचे (स्पेशलायझेशनचे) सामान्यीकरण (जनरलायझेशन) करणे. निसर्ग तेच करतोय व मानव समाजालाही तेच करावे लागतेय. सामान्यीकरणात विशेषतेला भाव असला तरी तिच्या कट्टरतेला थारा नसतो. तिथे शेरास सव्वाशेर ही व्यावहारिक म्हण प्रत्यक्षात कार्यरत असते. म्हणून तर कोणत्याही विशेष गोष्टीला अतिशय महत्व देणे किंवा तिच्याबद्दल एकदम काटेकोर (कट्टर) राहणे चूक!

एखादा मनुष्य एखाद्या विशिष्ट विषयात विशेष प्रावीण्य मिळवून त्या विषयात जरी तज्ज्ञ होऊ शकला तरी तो विविधतेने युक्त असलेल्या सर्व विषयात तज्ज्ञ होऊ शकत नाही. त्या अर्थाने मानव समाजातील सर्व व्यक्ती ज्ञान व कौशल्य यांच्या बाबतीत मरेपर्यंत सर्वसामान्य राहतात व सामान्य होऊन सामायिक साखळीला जोडल्या जातात. नैसर्गिकरीत्या सामायिक साखळीला असे जोडले गेल्यानंतर सर्व विषयातच नव्हे तर विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विषयाशी सुद्धा काटेकोर (कट्टर) राहण्याचा अट्टाहास करणे हे चुकीचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा