https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाती!

बोला की बाळूमामा!

काही नाती जन्माने चिकटली, काही लग्नाने बनली, काही अशीच योगायोगाने जमली, काही जुळली, काही परिस्थिती, प्रसंगाने डळमळीत होऊन तुटली. हवामान बदलते तशी माणसे बदलतात व मग नातीही बदलतात.

व्यावहारिक नाती ही व्यवहारापुरती मर्यादित राहतात. व्यवहार संपला की नाते संपले. जर व्यवहार दीर्घकाळ टिकले तर व्यावहारिक नाती सुद्धा दीर्घकाळ टिकतात. व्यवहार नाही पण भावनिक जवळीक आहे अशी नाती भावनिक आधारावर टिकतात. भावनिक जवळीकेला वैचारिक जवळीकेची जोड मिळाली म्हणजे विचार जुळले की नाती अधिक घट्ट होतात.

व्यवहार कशाला म्हणतात तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या देवाणघेवाणीला व्यवहार म्हणतात. व्यवहारात स्वार्थ असतो. स्वार्थाचे समाधान दोन्ही बाजूने झाले पाहिजे. पण स्वार्थाला महास्वार्थ चिकटला की मग तो व्यवहार राहत नाही. मीच एकटा सगळं खाईन तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल असा विचार जेंव्हा बुद्धी करते तेंव्हा ती महास्वार्थी झालेली असते. 

नाती जर नुसती व्यावहारिक असतील तर ती व्यवहारापुरती कोरडी असतात. अशा नात्यात भावनेचा ओलावा नसतो. बुद्धीची खरी कसोटी तेंव्हाच लागते जेंव्हा नात्यात भावनाही असते व स्वार्थी व्यवहारही असतो. पण काही नाती ही भावनिक जवळीक व वैचारिक सुसंवादावर आधारित असतात. अशा नात्यांत स्वार्थ नसतो व स्वार्थ नसल्याने व्यवहारही नसतो.

माझीही अशी काही भावनिक नाती आहेत की जिथे व्यवहार नसल्याने व विचार सरळस्पष्ट असल्याने वाद निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भामाताई ही तर माझी मावस मावस बहीण होती. पण तिच्याबरोबरचे माझे नाते हे मनमोकळे होते. कारण त्या नात्यात फक्त भावनिक जवळीक होती. व्यवहार बिलकुल नव्हता. हल्लीच ती बहीण हे जग सोडून गेली. त्यामुळे ते निर्मळ माया प्रेमाचे भावनिक नाते नैसर्गिक रीत्या संपले. पण तिचा मुलगा शिवा हा तिच्या स्वभावासारखाच आहे व त्यामुळे त्याच्याशी बोलताना भामाताईचा तो फिल येतो. परवा त्याला असाच फोन केला तर तिकडून त्याचा नेहमीचाच गोड आवाज आला "बोला की बाळूमामा"! आवाजात तोच गोडवा व तीच निर्मळ भावना जी भामाताईत होती. कसले व्यावहारिक देणे नाही की घेणे नाही. नुसती भावनिक जवळीक. अशी नाती दुर्मिळ असतात. 

-बाळू, २५.१२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा