https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

चौकट!

चौकट!

चौकटीबाहेर जाऊन जीवन जगण्याचा किंवा प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा प्रयास हा शेवटी महागात पडतो. याचा अर्थ असा नव्हे की माणसाने प्रवाहपतित होऊन जीवन जगावे. तसे असते तर मनुष्य जनावरांच्या पातळीवर जंगली जीवनच जगत राहिला असता.

पण तरीही आयुष्याला चौकट हवी. बेभान, मुक्त जीवन म्हणजे कटी पतंग जीवन. म्हणून मी पुरूष मुक्ती व स्त्री मुक्ती या दोन्ही विचारांना अतिरेकी विचार समजतो. याचे कारण म्हणजे निसर्गाची चौकटच अशी आहे की स्त्री व पुरूष दोघेही एकमेकांसाठी बनले आहेत. त्यांचे एक होणे, एकत्र राहणे, एकमेकांसाठी जगणे हेच तर स्त्री शक्ती व पुरूष शक्ती यांच्या निर्मितीच्या मागील निसर्गाच्या अनाकलनीय मुळाचे अर्थात परमेश्वराचे मूळ उद्दिष्ट आहे. स्त्री मुक्ती काय किंवा पुरूष मुक्ती काय हे अतिरेकी विचार या मूळ उद्दिष्टाला, पायाला छेद देणारे घातक विचार आहेत.

मानवी जीवनाला दोन चौकटी आहेत. एक चौकट ही निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व दुसरी चौकट ही समाजाची पूरक सामाजिक चौकट! या दोन्ही चौकटींची मिळून कायदेशीर चौकट तयार होते. मनाचे काल्पनिक बुडबुडे व निसर्गाचे वास्तव सत्य यात फरक आहे. 

निसर्गाच्या वैज्ञानिक चौकटीत राहून माणसांनी माणसांसाठी तयार केलेली सामाजिक चौकट म्हणजे सामाजिक कायद्यांची (नीतीनियमांची) चौकट ही बुद्धीच्या जोरावर समाजमनाने तयार केलेली विशेष चौकट होय. जंगली जनावरे निसर्गाच्या मूळ चौकटीतच जीवन जगणे पसंत करतात कारण त्यांना उच्च श्रेणीची कुशाग्र मानवी बुद्धी नसते. त्यामुळे बळी तो कानपिळी या निसर्गाच्या मूळ जंगली नियमापलिकडे ती विचार करू शकत नाही. निसर्गातील मूळ शक्तीला म्हणजे अनाकलनीय परमेश्वरालाच या जंगली नियमाचा उबग आल्याने त्याने उच्च बुद्धीचा मनुष्य प्राणी निर्माण केला असावा.

पण सगळी माणसे सारख्या बुद्धीमत्तेची का दिसत नाहीत? सगळी माणसे समान बौध्दिक पातळीवर असती तर त्यांच्यात खरी समानता निर्माण झाली असती. पण मानवी समतेचे तत्व सामाजिक कायद्यात समाविष्ट केले असले तरी प्रत्यक्षात ते दिसत नाही याचे कारण म्हणजे माणसांमधली असमान बौध्दिक पातळी.

आता मी सांगत असलेल्या वरील दोन चौकटी किती जणांना नीट समजल्या आहेत? मुळात या दोन चौकटी अस्तित्वात आहेत का इथूनच वादाला सुरूवात होईल. देव अस्तित्वात आहे की नाही अर्थात ती कल्पना आहे की वास्तव आहे या वादाप्रमाणेच या दोन चौकटी वास्तवात आहेत की त्या केवळ कल्पना आहेत इथून या आंतरमानवी वादाला सुरूवात होईल. याचे मूळ कारण म्हणजे या दोन चौकटी समजून घेण्याची निरीक्षणशक्ती व आकलनक्षमता अर्थात बुद्धी  सगळ्या माणसांना सारखी असत नाही. म्हणून तर समाजात खालच्या पातळीवरील कनिष्ठ न्यायालयांपासून वरच्या पातळीवरील उच्च व सर्वोच्च न्यायालयांपर्यंत खालून ते वर अशा चढत्या क्रमाने वेगवेगळी न्यायालये आहेत.

या लेखाचा सार एवढाच आहे की वरील दोन चौकटीत राहून बंदिस्त जीवन जगताना मानवी मनाची घालमेल, कुतरओढ झाली तरी या दोन चौकटीत राहून जीवन जगणे मनुष्याच्या हिताचे आहे. निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व मानव समाजाची पूरक सामाजिक चौकट या चौकटी पलिकडे निसर्गातील देवाचा कोणता धर्म नाही की कोणते अध्यात्म नाही. जे काही आहे ते या दोन चौकटीतच आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा