https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

राम कृष्ण हरी!

देव प्रार्थना!

आपल्या जवळच्या माणसांशी जशी आपली नाळ जुळते तशी आपल्या जवळच्या धार्मिक  संस्कृतीशी व आपल्या जवळच्या देवदेवतांशी आपली नाळ जुळते. म्हणून आपल्या धर्मातील लोकांमध्ये विवाह केल्यास जवळच्या संस्कृती साधर्म्यामुळे संसारात अडचणी कमी होतात. बाकी हल्ली सुशिक्षित, अती सुशिक्षित लोक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करताना दिसून येतात. शिक्षण, विचार त्यांना संसारात एकत्र ठेवत असतील तर तेही योग्यच म्हणावे लागेल.

पण जवळीक ही महत्वाची. आपण हिंदू धर्मीय लोक मंदिरांसमोरून जातो तेंव्हा आपले हात आपोआप जोडले जातात. पण आपण जर इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांपुढून गेलो तर तसे होत नाही याचे कारण म्हणजे आपल्या धर्माशी व देवदेवतांशी लहानपणापासून जोडली गेलेली आपली नाळ. अशी जवळीक आपल्या कुळ देवतेशी व आपल्या ग्रामदेवतेशी असते. विशेष बाब ही की माझे वडील करमाळा तालुक्यात असलेल्या साडे गावचे व माझी आई माढा तालुक्यात असलेल्या ढवळस गावची. दोन्ही गावे सोलापूर जिल्ह्यातीलच. साडेगावचे ग्राम दैवत कोणते तर कोडलिंग (खरं तर कोटलिंग म्हणजे महादेव/शंकर) व ढवळसची ग्रामदेवता कोणती तर अंबाबाई ( म्हणजे शंकर पत्नी पार्वती). म्हणजे काय तर वडिलांचे ग्रामदैवत शंकर व आईची ग्रामदेवता पार्वती. या दोन्ही गोष्टी कशा जुळून आल्या बघा काका-आईच्या विवाहाने! मी ढवळस गावाला मावशी बरोबर (माझ्या आईची सख्खी बहीण ) जाऊन उंच टेकडीवर असलेल्या अंबाबाईचे एकदा दर्शन घेतलेय. पण मी अजूनही वडिलांच्या साडे गावातील कोडलिंगाचे दर्शन घेतलेले नाही. ही गोष्ट ग्रामदैवतांची. पण माझे कुळदैवत कोणते हे ६५ वय झाले तरी अजूनही मला माहित नाही हे विशेष! याचे कारण काय तर माझे वडील (काका) हेच मुळात तेवढे आध्यात्मिक नव्हते. त्यांनी कधीही घरात ग्रामदैवत, कुळदैवत यांचा आग्रह धरला नाही की साडे गावाला आम्हाला घेऊन गेले नाहीत. माझी आई मात्र घरातील देव्हाऱ्यात पितळेचे देव ठेवून तिला जमेल तशी पूजा करायची. पण ती निरक्षर असल्याने तिला त्या देव्हाऱ्यातील ग्रामदैवत कोण व कुळदैवत कोण हे आम्हाला सांगता येत नसे. त्यामुळे माझ्या मनावर आईच्या देवधर्मापेक्षा काकांच्या बिनधास्त राहण्याचाच जास्त पगडा पडला. या इथे जवळीक या शब्दाला अर्थ आहे. आपल्या मनावर पगडा ज्याच्याशी आपली जवळीक निर्माण होते त्याचाच पडतो.

गजू व बळी, तुम्हाला आठवत असेल की तुमची आई  ही परडी भरायची. तुमच्या आईची ती परडी मी लहानपणी बारकाईने न्याहाळत बसायचो. पण मला ते नीट कळत नसायचे. ती परडी अंबाबाई देवीची असते बहुतेक, नक्की माहित नाही व ठामपणे सांगताही येणार नाही. कारण परडीशी जवळीक निर्माण झाली नाही व त्यामुळे तिचा पगडा माझ्या मनावर पडला नाही. 

पुण्याच्या भाऊजीबरोबर मी दोन, तीन वेळा सोनारीला गेलोय. तिथली गाव जत्रा पाहिलीय व सोनारीचे ग्रामदैवत भैरवनाथ (शंकराचा अवतार) याचेही दर्शन घेतलेय. मागे बहिणीच्या  कुटुंबाबरोबर कोल्हापूरच्या जोतीबाला जाऊन (तोही शंकराचाच अवतार) त्याचेही दर्शन घेतलेय. मात्र अजून जेजुरीच्या खंडोबाचे (तोही शंकराचाच अवतार) दर्शन घेतलेले नाही.

हिंदू धर्मात शिव पंथी व वैष्णव पंथी असे दोन पंथ आहेत. शिवपंथीयांची जवळीक शंकराशी जास्त तर वैष्णवपंथीयांची जवळीक विष्णूशी जास्त. वर उल्लेखित भैरवनाथ, जोतिबा व खंडोबा हे शंकराचे अवतार आहेत तर राम, कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. पंढरपूरचा पांडुरंग (विठ्ठल) हा कृष्णच म्हणजे विष्णूचा अवतार. मोहोळची ताई व दादा हे पंढरपूरकरच व त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) जास्त संस्कार. त्यामुळे त्यांचा मुलगा नेहमी "राम कृष्ण हरी" असे म्हणून देव प्रार्थना करतो. राम काय किंवा कृष्ण काय दोघेही विष्णूचेच अवतार. मग आपल्या नातेवाईकांत भाऊजी  भैरवनाथी म्हणजे शिवपंथी व ताईचा मुलगा पांडुरंगी म्हणजे वैष्णवपंथी झाले काय?

माझी दोन बहिणी व माझी भावजय यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचे मोठे फोटो मला पहायला मिळतात. श्री स्वामी समर्थांशी त्यांची ही जी जवळीक निर्माण झालीय ती बहुतेक एखाद्या अनुभूतीमुळे झाली असावी. माझा मुंबईत एका श्री स्वामी समर्थ मठाशी योगायोगाने संबंध आला. पण मी त्यांचे आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करीत नाही. कारण एकंदरीतच सगळ्या देवाधर्माविषयीचा माझा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. पण मी सगळ्या देवांना नमस्कार करतो. कारण विश्वात, निसर्गात कोणती तरी अद्भुत, अनाकलनीय शक्ती आहे व ती शक्ती म्हणजेच परमेश्वर, परमात्मा असे मी मानतो. तो एकच आहे. फक्त त्याचे अवतार (इतर धर्मात देवाच्या अवतारांना देवदूत म्हणतात) निरनिराळे आहेत असे मी मानतो. त्यामुळे श्री भैरवनाथ काय, श्री स्वामी समर्थ काय किंवा राम कृष्ण हरी काय या सगळ्याच देव प्रार्थना एकाच परमेश्वराला, परमात्म्याला जाऊन मिळतात असे मी मानतो.

माझे बालपण पंढरपूरला श्रीविठ्ठल मंदिराच्या सान्निध्यात गेले असल्याने त्या देवाशी थोडीशी जास्तच जवळीक निर्माण झाली आहे व म्हणून "राम कृष्ण हरी" असे म्हणून या लेखाचा शेवट करतो.

राम कृष्ण हरी!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.१२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा