https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २७ मार्च, २०२४

वधू परीक्षा!

वधू परीक्षा!

हल्ली मुले मुली एकतर अगोदर प्रेम करून आईवडिलांना नंतर सांगतात की अमूक अमूक हा किंवा ही माझा जीवनसाथी/जोडीदार किंवा स्वतःच वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून आपला जोडीदार निवडून आपल्या आईवडिलांपुढे उभा करतात. मग आईवडिलांना लग्न मंडपात जाऊन त्यांना आशीर्वाद द्यायचे तेवढेच  काम उरते.

आमच्या काळात परिस्थिती वेगळी होती. प्रेम विवाहाला विशेष करून घरातूनच अनेक अडथळे निर्माण केले जायचे. त्यामागे आईवडिलांचे तसे ठोस कारणही असायचे व ते कारण म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणी अनोळखी व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवू नये. माझ्या बाबतीत थोडे असेच झाले. माझे आॕफीसमधल्या एका मुलीवर प्रेम बसले. ती तशी  आमच्याच मराठा जातीतली होती. शिवाय एम.ए., बी.एड. अशी उच्च शिक्षित होती. मीही नोकरी करीत त्यावेळी बी.कॉम. (आॕनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. अशा तीन शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्या होत्या. ती दिसायलाही सुंदर होती. दोघे एकाच ठिकाणी नोकरीत व दोघेही कायम झालेलो. थोडक्यात आमचे ते परफेक्ट मॕच होते.

ती मला म्हणाली "अरे, तुझे घर व आईवडील कधी दाखवतोस"? मी तिला सांगितले की "तू आमच्या घरी गणपतीला ये, देव दर्शनही होईल, घरही बघशील आणि आईवडील पण भेटतील". ती तयार झाली. मग गणपतीत मी आईला ती घरी येतेय तेव्हा काकांना (माझ्या वडिलांना) घरी थांबायला सांग असे सांगितले. आईने वडिलांना तसे सांगितलेही.

मग ती व मी आॕफीस सुटल्यावर आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीत असलेल्या १२० चौ. फुटाच्या छोट्या खोलीत आलो. पण घरी आलो तर काय माझे वडील अंगावर कधी नाही ती फाटकी बनीयन घालून बसलेले. आईचा चेहरा हिरमुसलेला. कारण माझ्या वडिलांसमोर कोणाचे काही चालत नसे. माझ्याकडे बघत तिने कसेबसे गणपतीचे दर्शन घेतले व आईने दिलेला चहा घेऊन सर्वांना नमस्कार करून मला "चल खाली मला कॕबमध्ये बसवून दे" म्हणाली. मी तिला घेऊन चालत चालत कॕब शोधण्यासाठी जांबोरी मैदानाजवळ येईपर्यंत ती माझ्याशी काही बोलली नाही. मग त्या भयाण शांततेतच मी तिला कॕबमध्ये बसवून दिले. मी घरी आलो तेव्हा फाटक्या बनियनमध्ये बसलेल्या वडिलांना जाम भांडावे असे वाटले पण शेवटी गप्प बसलो व कसेबसे चार घास खाऊन वर गच्चीवर जाऊन झोपलो. त्या रात्री खरंच मी गच्चीवर एकटाच खूप रडलो.

आता पुढची गोष्ट सांगतो. दुसऱ्या दिवशी मी आॕफीसमध्ये गेलो. मला वाटत होते की ती आमचे छोटे घर व आमच्या गरीब, फाटक्या व अशिक्षित माणसांपेक्षा प्रतिकूल परिस्थितीतून एवढे उच्च शिक्षण घेतलेल्या मला किंमत देईल व आपण स्वतंत्र राहू असे म्हणून लग्नाला होकार देईल. पण तिने त्या दुसऱ्याच दिवशी मला नकार दिला. ही होती माझ्या वडिलांनी फाटकी बनीयन घालून तिची घेतलेली साधी वधू परीक्षा. पुढे वडिलांनीच गावी जाऊन दुसरे स्थळ जमवले ती माझी बायको फक्त बारावी शिकलेली पण दिसायला तिच्यापेक्षा सुंदर जिच्या बरोबर मी १९८५ पासून गेली ३९ वर्षे संसार करीत आहे.

ही माझी स्वतःची सत्यकथा आहे. पूर्वी लग्ने ही अशी जमायची व वधू परीक्षा या अशा व्हायच्या. पदराला पदर लागलाच पाहिजे म्हणजे वधू वराच्या कुटुंबांचा धागा हा जवळच्या नातेवाईकांच्या नातेसंबंधात कुठेतरी जुळलाच पाहिजे यावर दोन्ही कुटुंबांचा कटाक्ष असायचा. हल्ली लग्ने कशी जमतात, आॕनलाईन वधूवर सूचक मंडळांनी पैशासाठी लग्नाचा काय बाजार मांडलाय यावर लिहावे व बोलावे तितके कमीच!

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४

भौतिकतेचा भस्मासूर!

भौतिकतेच्या आहारी गेलेला माणूस आध्यात्मिक शांती शोधतोय?

विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे म्हणतात. तेव्हापासून हे विश्व प्रसरण पावतेय. या प्रसरणाचा एक भाग म्हणजे पृथ्वीवरील निर्जीव व सजीव पदार्थ सृष्टीची उत्क्रांती.  बुद्धिमान माणूस हा सृष्टी उत्क्रांतीचा वरचा टप्पा.

बुद्धिमान माणसाची बुद्धी अचानक निर्माण झाली नाही. तीही अनेक आव्हाने, संकटे झेलत उत्क्रांत झाली व अजूनही होत आहे. प्रचंड मोठ्या विश्वाचे अंतराळ विज्ञान व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीचे विज्ञान हे एकसारखे नाही. अंतराळ विश्व व पृथ्वीवरील सृष्टी या दोघांची बेरीज म्हणजे निसर्ग असे ढोबळ मानाने म्हणता येईल.

निसर्ग व निसर्गाचे विज्ञान हे वास्तव आहे कारण ते प्रयोग, अनुभव व पुरावे यातून सिद्ध करता येते व ते सिद्ध झालेय. तसे परमेश्वराचे नाही. परमेश्वर हा मानवी बुद्धीचा तार्किक अंदाज आहे. निसर्ग आहे, निसर्गाचे विज्ञान आहे मग नक्कीच त्याच्या मागे कोणती तरी महान दैवी शक्ती असली पाहिजे व ती महाशक्ती म्हणजे परमेश्वर हा तर्क. हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही.

माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा व आताही वैज्ञानिक व तांत्रिक दृष्ट्या खूप प्रगत झाल्यानंतर सुद्धा मानवी जीवनातील संकटे, आव्हाने, स्पर्धा, अशांती, भीती या गोष्टी चालूच आहेत. त्यामुळे मानवी मन तर्कावर आधारित असलेल्या परमेश्वराचा आधार शोधते.

पण परमेश्वराचा आधार खरंच किती जणांना मिळतो? तो सर्वांना समान मिळतो का? असमान मिळत असेल तर त्याची कारणे कोणती? या अशा तार्किक प्रश्नांतून अनेक कल्पना मानवी मनाने निर्माण केल्या. मुळात परमेश्वर हाच तर्कावर आधारित.  मग त्याचा आधार असमान म्हणून पुन्हा अनेक तर्कवितर्क. गतजन्माचे संचित (प्रारब्ध) ही अशीच एक कल्पना. स्वर्ग व नरक या सुद्धा कल्पना आहेत. या सर्व कल्पना असल्याने त्या पुराव्याने सिद्ध करता येणे शक्यच नाही. स्वतः परमेश्वर कोणालाही पुराव्याने सिद्ध करता आला नाही व येणार नाही. फक्त तर्कावर आधारित भावनिक श्रद्धा परमेश्वरावर ठेवायची. पण याच श्रद्धेचे जेव्हा अंधश्रद्धेत रूपांतर होते तेव्हा ते खूप त्रासदायक होते.

पिढ्यानपिढ्या काही अंधश्रद्धा पुढे ढकलल्या गेल्या व मानवी मनात रूतून बसल्या. त्या बाहेर काढून फेकून देण्याची हिंमत करण्यासाठी वास्तव काय व आपण करतोय काय याचा सारासार विचार करता आला पाहिजे. पण कोणाला वेळ आहे असा विचार करायला? एकीकडून डोंगर फोडून इमारती बांधल्या जात आहेत तर दुसरीकडून समुद्राच्या खालून रस्ता (टनेल) काढला जात आहे. यात परमेश्वराला कुठे शोधत बसायचे? तंत्रक्रांती ते अर्थक्रांतीच्या विकास प्रवासाने भयंकर गती धारण केलीय व भयानक स्पर्धा, भयाण अशांतता निर्माण केलीय. 

विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक जीवनशैलीने शरीराला थोडा आराम मिळतही असेल पण मनाचे काय? मन प्रचंड अस्थिर, अशांत व भयभीत झालेय त्याचे काय करायचे? मग आध्यात्मिक शांती मिळवायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी मंदिरात जावे तर तिथेही भक्तांची भयाण गर्दी. हे भक्त त्या मंदिरात देवापुढे उभे राहून देवाचे ध्यान कमी व भौतिकतेचाच विचार जास्त करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी कसली आध्यात्मिक शांती मिळणार?

आध्यात्मिक शांती सोडा साधी शांती मिळावी म्हणून शेतात एखाद्या मोठ्या दगडावर जाऊन शांत बसावे तर तिथेही खालून विंचू, साप येतील की काय याची भीती. जंगलात झाडाखाली जाऊन बसावे तर हिंस्त्र प्राणी हल्ला करण्याची भीती. इतकी ही भौतिकता भयानक, भयंकर भितीदायक आहे जिचा निर्माता कोण तर स्वतः परमेश्वर आणि त्याच परमेश्वराकडे संकटमुक्तीची, शांतीची प्रार्थना करायची? पटतात का या गोष्टी बुद्धीला?

विश्व प्रसरण पावतेय आणि भौतिक गोष्टींच्या हव्यासाचे शेपूट वाढतच चाललेय. ते कोणी रोखू शकणार नाही. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ताही मनुष्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोडीला आलीय. या भागीदारीतून भौतिकता हाहाकार माजवणार हे नक्की. भौतिकतेच्या भस्मासूराला परमेश्वर रोखू शकेल काय? तो रोखेल तेव्हा रोखेल पण तोपर्यंत आपणच स्वतःच्या भौतिक वेडाला रोखले पाहिजे. आपण जर स्वतःच आपल्या भौतिक मागण्या कमी केल्या व आजूबाजूला भौतिक विकासाचा जो धिंगाणा चाललाय त्यापासून स्वतःला जास्तीतजास्त अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर आध्यात्मिक शांती नाही मिळाली तरी थोडी साधी शांती तरी मनाला जरूर मिळेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४

मंगळवार, २६ मार्च, २०२४

मॕट्रिमोनी ताई!

मॕट्रिमोनी ताई, नमस्कार.

मी वराचा डोंबिवलीला राहणारा काका आहे. वर बदलापूर येथे राहतो. मी तुम्हाला मुली (वधू) विषयीच्या अपेक्षा प्रत्यक्ष तुमच्या साईटवर सांगितल्या आहेत. अहो, तुम्ही तुमच्या साईटसवर वधूवर स्थळांच्या नोंदण्या फुकटात करता व नंतर कसले ते पॕकेज देऊन जोडीदार संपर्कासाठी पैसे मागता? हे मला मंजूर नाही. हा तर पैशाच्या तालावर चालवलेला लग्नाचा बाजार झाला. शेवटी मी वकील आहे त्यामुळे ही गोष्ट थोडी गांभीर्याने घ्या. स्थळ जमल्यावर आम्ही खुशीने देऊ की भेट म्हणून काही पैसे तुम्हाला. ही वधूवर सूचक सेवा तुम्ही समाजसेवा म्हणून अगोदर फुकटात किंवा अत्यंत कमी पैशात करा. अगोदर नीट स्थळे दाखवा व मगच पैशाची मागणी करा. तुम्हाला मध्यस्थ म्हणून पैशात कमिशन लागते काय? तुम्ही माझ्या पुतण्याच्या स्थळाची तुमच्याकडे नोंदणी करतानाच जर १०० रूपयांच्या वर एक जरी पैसा जादा मागितला असता तर मी तुमचा नाद लगेच तिथल्या तिथेच सोडून दिला असता. नोंदणी फुकट करून नंतर स्थळ दाखवताना तुम्ही पैशाची मागणी करता ही पद्धतच चुकीची आहे. धन्यवाद!

-ॲड.बळीराम मोरे, डोंबिवली

सोमवार, २५ मार्च, २०२४

शुभ मंगल सावधान!

शुभ मंगल सावधान!

अरे बेटा, नको वाटतंय रे तुझ्यासाठी आॕनलाईन जोडीदार शोधायला. ही आॕनलाईन जोडीदार शोधायची प्रक्रिया खूपच कठीण वाटतेय मला. ही आॕनलाईन वधूवर मंडळे अनुरूप जोडीदार शोधून देऊन हा जोडीदार तुम्हाला मॕच होतोय असे सांगतात आणि त्या मॕच जोडीदाराबरोबर बोलायला परवानगी द्या म्हटले की लगेच आॕनलाईन पैसे भरा म्हणतात. बेटा, मी तुझ्यासाठी आज दोन तीन मुली पसंत करून त्यांना लगेच फोन लावायचा प्रयत्न केला तर मला त्या आॕनलाईन वधूवर सूचक मंडळाचा मध्यस्थ मध्येच येऊन ताबडतोब पैसे भरा म्हणाला. अरे बेटा, मी पण गरीब आणि तू पण गरीब. मग काय माझ्याकडे पैसे नाहीत आणि बेटा तुझ्याकडेही पैसे नाहीत. आपण काय करणार? आणि तसेही आपण गरीब लोकांनी का म्हणून असे पैसे द्यावेत या मध्यस्थ विवाह संस्थांना? आॕनलाईन पैसे भरून पुढची गॕरंटी काय? ते पैसे फुकट गेले तर? ही मंडळे त्यांच्या विवाह संस्थेची जाहिरात मात्र फुकट करतात आणि नंतर हळूहळू पैसे उकळायला सुरूवात करतात. बेटा, तुझ्यासाठी मी काही आॕनलाईन विवाह संस्थेत फुकटात नोंदणी केली. त्यांना माझा ईमेल आय.डी. दिला. मग तुझे ते आॕनलाईन प्रोफाईल आवडले म्हणून मला वधूवर मंडळांमधील काही मुलींकडून ईमेल आले. पण मुलींनी पाठवलेल्या लिंकवर गेलो की लगेच प्रोफाईल प्रिमियम अपग्रेड करा व साधारण १५०० रू. एवढी रक्कम आॕनलाईन भरून मुलीशी अमूक अमूक काळ साधारण फक्त १० मिनिटे बोला असे मेसेज आले. खरंच हे सगळे माझ्या डोक्यावरून चाललेय बघ. बेटा, हल्ली काळ फार बिकट आलाय बघ. प्रत्यक्ष नोंदणी करणारी काही वधूवर सूचक मंडळे आहेत पण तीही ५०० रू. पासून ते ३००० रूपयापर्यंत नोंदणी फी मागतात. तिचा काळही मर्यादित एक वर्षासाठी असतो. त्या एक वर्षात लग्न नाही जमले तर पुन्हा नवीन नोंदणी फी भरा. तिथे त्यांच्या फाईल्समध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये विवाह इच्छुक मुला मुलींची माहिती ठासून भरलेली असते. पण बेटा, आॕनलाईन नोंदणी असो नाहीतर प्रत्यक्ष नोंदणी, ही वधूवर सूचक मंडळे या सामाजिक संस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्याही फुकट समाजसेवेची अपेक्षा करू नकोस. लग्नाचा बाजार मांडलाय यांनी व विवाह हा पैसे कमावण्याचा धंदा केलाय यांनी. हल्लीची तरूण मुले मुली यांच्या जाळ्यात कशी सापडलीत हेच कळेनासे झालेय. मला खूप वाईट वाटते याचे. पण हल्लीच्या या तरूण पिढीला तरी माझे म्हणणे काय पटणार? कारण आम्ही जुनाट वळणाची माणसे. आणि आमच्या जुनाट गोष्टी म्हणजे आम्हाला फुकटात नातेवाईकच मध्यस्थ बनून लग्न जमवायला मदत करायचे. आमचे आईवडीलही पदराला पदर लागतोय का याची काळजी घ्यायचे. पण खरंच जुनाट वळणाच्या आमचे संसार या जुनाट वळणावरच व्यवस्थित पार पडले ही गोष्ट खरी आहे. तरीही आम्ही नवीन पिढीला जुनाट वाटतो. मग फसतात बिच्चारे आणि भोगतात फळे. पण याला काही चांगल्या विवाह संस्था व काही चाणाक्ष मुलेमुली अपवाद आहेत बरं का! पण हे अपवाद सोडले तर बेटा आयुष्याची धूळवड केलीय बघ या विवाह संस्थांनी व त्यांच्या नादी लागलेल्या हल्लीच्या मुलामुलींनी!

-©ॲड.बी.एस.मोरे, धूळवड, २५.३.२०२४,

 

शनिवार, २३ मार्च, २०२४

एकाच घरातील दोन विवाहांची कथा!

वाचा कथा एकाच घरातील दोन विवाहांची!

घरात नवरा ग्रॕज्यूएट व बायको बारावी. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती चांगली. नवरा चांगल्या कंपनीत नोकरीला त्यामुळे त्याचा पगार चांगला. या नवरा बायकोला झाली दोन मुले. एक मुलगा व एक मुलगी. या सुशिक्षित व चांगल्या आर्थिक स्थितीतील छोट्या कुटुंबात ही दोन मुले लाडात वाढली. दोन्हीही मुले गोरी गोमटी दिसायला सुंदर. थोरला मुलगा डबल ग्रॕज्यूएट झाला व तोही चांगल्या कंपनीत नोकरीला लागून महिना ८०,००० रूपये पगार कमवू लागला. मुलगीही ग्रॕज्यूएट होऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागून महिना ३०००० रूपये पगार कमवू लागली.

मुले मोठी झाली. शिकून सवरून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. आता या दोन मुलांच्या आईवडिलांना या दोन्ही मुलांच्या लग्नाची काळजी लागली. मग त्या आईवडिलांनी त्या दोन्ही मुलांच्या लग्नाचे प्रयत्न गावा पासून मुंबई पर्यंत सुरू केले. पण मुलीचे लग्न त्यांच्या नातेवाईकांच्या ओळखीतून अगोदर जमले. तिला अनुरूप चांगल्या ५०००० रूपये पगाराचा ग्रॕज्यूएट नवरा मिळाला. पण मुलगी सहा महिन्यांतच मुलाची आई खोडसाळ आहे म्हणून माहेरी निघून आली. मला नांदायला जायचे नाही म्हणून हट्ट करून बसली व मग  दोघांच्या संमतीने तिला कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोट मिळाला.

बहीण घटस्फोट करून घरी येऊन बसली आणि घरात घटस्फोटित बहीण आहे या कारणावरून तिच्या त्या डबल ग्रॕज्यूएट भावाचे लग्नच जमेना. तो उच्च शिक्षित चांगल्या पगाराचा मुलगा त्याच्या घटस्फोटित बहिणीमुळे बराच काळ म्हणजे ३५ वर्षे उलटून गेली तरी अविवाहित राहिला.

मग आईवडील पुन्हा काळजीत पडले. त्यांना घरातील अन्न गोड लागेना. शेवटी कसाबसा अपत्य नसलेला एक विधुर मुलगा त्यांच्या नातेवाईकांच्याच ओळखीतून त्यांना मिळाला. त्या घटस्फोटित मुलीचे दुसरे लग्न त्या विधुर मुलाशी लावून देण्यात आले. ती मुलगी त्या दुसऱ्या नवऱ्याकडे नांदायला गेली. मग ३५ वर्षाच्या तिच्या अविवाहित भावाला हायसे वाटले. मग त्याचे लग्न पुन्हा नातेवाईक लोकांच्या ओळखीतूनच जमून आले. त्याची पत्नीही ग्रॕज्यूएट व मुंबईत एका कंपनीत अकौंटंट म्हणून महिना ३०००० रू. पगार कमावणारी. पण झाले काय की तिला एकत्र कुटुंबातील तिचे सासू सासरे जड झाले. "मी जर माझ्या आईवडिलांना सोडून तुझ्या बरोबर संसार करायला आले तर तू तुझ्या आईवडिलांना धरून का बसलास? आपण दोघे आपल्या पैशातून स्वतंत्र  फ्लॅट घेऊ व तिथे संसार करू. तू अधूनमधून तुझ्या आईवडिलांकडे जात जा व मीही माझ्या माहेरी अधूनमधून जात जाईन" असा हट्ट धरून ती मुलगी बसली. मुलाला हे बिलकुल पटले नाही. "तू तुझ्या आईवडिलांना सोडले म्हणून मी पण माझ्या आईवडिलांना सोडले पाहिजे ही कसली अट"? असे तो मुलगा म्हणाला. झाले ती मुलगी त्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली ती पुन्हा परत आलीच नाही. मग त्या दोघांचा कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोट झाला.

तिकडे ती घटस्फोटित मुलगी विधुर मुलाबरोबर दुसरा विवाह करून नांदायला गेली होती तिला तिकडे विवाह संबंधातून एक मूल झाले. ते मूल म्हणजे मुलगा. पण तिचे त्या विधुर नवऱ्याबरोबर काय बिनसले माहित नाही. ती तडक त्या बाळाला घेऊन आईवडिलांकडे निघून आली व आता तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज टाकलाय. आता ही दोन्हीही सुशिक्षित, कमावती मुले त्यांच्या आईवडिलांकडे घटस्फोटित जीवन जगत आहेत. ही सत्यकथा आहे. फक्त नावे गुप्त ठेवली आहेत. वकील म्हणून पूर्वीही अशा केसेस हाताळल्या आहेत. पण असे प्रकार पूर्वी फारच कमी होते. ते हल्ली खूप वाढलेत. हल्ली काही मुले मुली तर बिनधास्त लिव इन रिलेशनशिप मध्ये राहतात. त्यांना विवाह बंधन व कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोशा झाल्याचे दिसत आहे. विवाह संस्थेचा असा खेळ झालेला बघवत नाही. काय झालेय काय हल्लीच्या पिढीला? पण या बदललेल्या परिस्थितीतही नवीन पिढीतील काही मुले मुली समंजसपणे संसार करताना बघून आनंद वाटतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.३.२०२४

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

आईवडिलांच्या इस्टेटीच्या वाटण्या कशा कराव्यात?

आईवडिलांच्या इस्टेटीच्या वाटण्या कशा कराव्यात?

भाऊ बहिणींनी आईवडिलांच्या इस्टेटीत वाटण्या मागण्यात गैर काहीच नाही. पण मुलगी दिली तिथे मेली ही पुरूषप्रधान मानसिकता अत्यंत वाईट, घरातील मायाप्रेमाची वाट लावणारी. माझ्या दोन्ही धाकटया बहिणी मोठ्या मनाच्या. माझे वडील मृत्यूपत्र न करता गेले. कारण त्यांचा विश्वास होता की मी म्हणजे त्यांचा थोरला मुलगा भावा बहिणींना योग्य न्याय देणार. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या  घराच्या चार भावंडात चार समान वाटण्या करायच्या मी ठरवले. मी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या समर्थ होतो. पण माझा धाकटा भाऊ व त्याचे कुटुंब खूप गरीब, अशक्त होते. माझ्या दोन्ही बहिणींनी मला स्पष्ट सांगितले की "दादा, आम्ही दोघी आमच्या २५% हक्कातील फक्त निम्मा म्हणजे १२.५% हक्क घेऊ, आमच्या दोघींच्या १२.५% हक्कांचा मिळून २५% हक्क आम्हाला धाकट्या भावाला द्यायचाय म्हणजे त्याचा २५% हक्क व आमच्या दोघींचा २५% हक्क मिळून त्याचा ५०% हक्क होईल, तू तुझा २५% हक्क घे." एवढ्या समजूतदार बहिणी घरात असल्यावर कसला वाद आणि कसले भांडण? या न्याय वाटणीमुळे आम्ही चौघेही भावंडे आज उतार वयातही एक आहोत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.३.२०२४

गुरुवार, २१ मार्च, २०२४

विसरलेली नाती माझ्या वडिलांनी पुन्हा कशी जोडली?

विसरलेली नाती माझ्या वडिलांनी पुन्हा कशी जोडली?

अनुवंशशास्त्र हे फार महत्वाचे शास्त्र आहे. वंश सातत्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी ही एक स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. कूळ हा शब्द वंश या शब्दाशी निगडित आहे. वंश किंवा कूळ हा डी.एन.ए. म्हणजे वंश तत्वाने एकमेकांशी जोडला गेलेला एक अत्यंत जवळचा (सोप्या भाषेत जवळच्या रक्ताच्या नात्याचा) एक मानव समूह असतो. डी.एन.ए. ने, रक्ताने, संस्कृतीने व कुळदैवतांनी जोडला गेलेला हा लोकसमूह घट्ट नात्यांनी बांधलेला असतो.

हल्लीचे जीवन जीवघेण्या स्पर्धेचे व कृत्रिम व्यावहारिक संबंधापुरते मर्यादित झाल्याने पूर्वीची एकत्र कुटुंब व्यवस्था संपून स्वतःपुरतेच बघणारी छोटी छोटी संकुचित कुटुंबे निर्माण झाली. या अशा सामाजिक बदलाने नातेसंबंध दुरावले. वंश, कूळ, कुळदैवत, कुळाचार या सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या. आपण कधी काळी एकमेकांशी जवळच्या नात्यांनी जोडलो गेलो होतो ही गोष्ट नातेवाईकांच्या विस्मरणात गेली.

माझे वडील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावात त्यांच्या इतर चार भांवडांबरोबर अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत होते. त्यांची शेती वगैरे त्यांच्या वडिलांनी विकल्यामुळे साडे गावातील आमचे ते मोरे कुटुंब निराधार झाले होते. माझ्या वडिलांसह पाचही भावंडांची दया येऊन मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या  मामांनी त्या सर्वांना मुंबईत आणले व त्यांना मुंबईच्या कापड गिरणीत कामाला लावून त्यांची लग्नेही त्या मामांनी लावून दिली. त्यासाठी जवळच्या नात्यातील मुली शोधल्या. या पाच भावंडांपैकी चार भाऊ होते तर एक बहीण होती (माझी आत्या). तिचेही लग्न नातेसंबंधात लावून दिले.

निराधारांना कसली नाती आणि कसले काय? पण मामांनी मुंबईत आधार दिला आणि निराधार मोरे कुटुंबाला नाती मिळाली. माझे वडील फक्त सातवी पर्यंत शिकलेले पण अत्यंत हुशार व धाडसी होते. स्वकर्तुत्वावर ते मुंबईत मोठे गिरणी कामगार पुढारी झाले. तो इतिहास वेगळा व रोमांचकारक आहे. पण इथे विषय हा आहे की मामांनी लग्नांनी जोडून दिलेली नाती माझ्या वडिलांनी पुढे कशी जोडली, वाढवली व टिकवली?

माझ्या वडिलांचे लग्न त्यांच्या मामांनी सोलापूर जिल्ह्यातील केम जवळील ढवळस गावातील एका अशिक्षित मुलीशी जमवले ती माझी आई. त्याकाळी साधा फोन नव्हता. मोबाईल फोनची तर गोष्टच विसरा. त्याकाळी होती ती फक्त साधी पोस्ट कार्डस व अंतर्देशीय पत्रे. माझ्या वडिलांनी त्यांच्या खेडगल्लीतील मामांकडून व माझ्या आईकडून हळूहळू सर्व नातेवाईक मंडळींची माहिती गोळा करायला सुरूवात केली. त्यांचे मुंबईतील व सोलापूर जिल्ह्यातील पत्ते शोधले व सर्वांना सुरूवातीला पोस्ट कार्डस व नंतर अंतर्देशीय पत्रे लिहून सगळ्यांच्या कुळांची मुळे शोधून आपण सर्व एकमेकांना जवळच्या नात्यांनी कसे जोडले गेलो आहोत हे समजावून सांगितले. आणि मग हळूहळू मुंबई, व सोलापूरच्या गावांतून नातेवाईक मंडळीच्या पत्रांचा ओघ आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील घरी सुरू झाला. मग पुढचा टप्पा होता मुंबईतील खेडगल्ली ते पार बोरीवली पर्यंत विखुरलेल्या व सोलापूर जिल्ह्यातील  निरनिराळ्या गावांत वास्तव्य करून असलेल्या नातेवाईकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याचा. तो टप्पा माझ्या वडिलांनी यशस्वीपणे पार पाडला. आणि मग सुरू झाली आमच्या वरळीच्या घरी विस्मरणात गेलेल्या आमच्या नातेवाईकांची वर्दळ.

आमचे वरळीचे घर फक्त १२० चौ. फुटाचे. पण त्याच छोट्या घरात माझ्या वडिलांनी पूर्णपणे विसर पडलेल्या नातेवाईकांची जत्रा भरवली. त्यातील काहींना त्यांच्याच मिलमध्ये नोकरीला लावले. मी घरात थोरला मुलगा असल्याने माझे वडील सतत मला त्यांच्याबरोबर फिरवायचे. विसरलेली नाती पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांच्या जोरावर पुन्हा जोडल्यावर बार्शी, पांगरी, मोहोळ, पंढरपूर अशा विविध ठिकाणी माझे वडील मला घेऊन फिरायचे. काय तो मायाप्रेमाचा गोतावळा होता. नुसत्या पत्रांनी जवळ आलेला तो गोतावळा केवढा आनंद देऊन गेला. केवढी आपुलकी होती त्यात.

खंत याचीच आहे की काकांना (माझ्या वडिलांना आम्ही काका म्हणायचो) जे साध्या पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांवर जमले ते मला हल्लीच्या एकदम फास्ट असलेल्या मोबाईल, व्हॉटसॲपवर जमले नाही. तो काळच वेगळा होता. ती माणसेही वेगळी होती.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.३.२०२४