https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २५ मार्च, २०२४

शुभ मंगल सावधान!

शुभ मंगल सावधान!

अरे बेटा, नको वाटतंय रे तुझ्यासाठी आॕनलाईन जोडीदार शोधायला. ही आॕनलाईन जोडीदार शोधायची प्रक्रिया खूपच कठीण वाटतेय मला. ही आॕनलाईन वधूवर मंडळे अनुरूप जोडीदार शोधून देऊन हा जोडीदार तुम्हाला मॕच होतोय असे सांगतात आणि त्या मॕच जोडीदाराबरोबर बोलायला परवानगी द्या म्हटले की लगेच आॕनलाईन पैसे भरा म्हणतात. बेटा, मी तुझ्यासाठी आज दोन तीन मुली पसंत करून त्यांना लगेच फोन लावायचा प्रयत्न केला तर मला त्या आॕनलाईन वधूवर सूचक मंडळाचा मध्यस्थ मध्येच येऊन ताबडतोब पैसे भरा म्हणाला. अरे बेटा, मी पण गरीब आणि तू पण गरीब. मग काय माझ्याकडे पैसे नाहीत आणि बेटा तुझ्याकडेही पैसे नाहीत. आपण काय करणार? आणि तसेही आपण गरीब लोकांनी का म्हणून असे पैसे द्यावेत या मध्यस्थ विवाह संस्थांना? आॕनलाईन पैसे भरून पुढची गॕरंटी काय? ते पैसे फुकट गेले तर? ही मंडळे त्यांच्या विवाह संस्थेची जाहिरात मात्र फुकट करतात आणि नंतर हळूहळू पैसे उकळायला सुरूवात करतात. बेटा, तुझ्यासाठी मी काही आॕनलाईन विवाह संस्थेत फुकटात नोंदणी केली. त्यांना माझा ईमेल आय.डी. दिला. मग तुझे ते आॕनलाईन प्रोफाईल आवडले म्हणून मला वधूवर मंडळांमधील काही मुलींकडून ईमेल आले. पण मुलींनी पाठवलेल्या लिंकवर गेलो की लगेच प्रोफाईल प्रिमियम अपग्रेड करा व साधारण १५०० रू. एवढी रक्कम आॕनलाईन भरून मुलीशी अमूक अमूक काळ साधारण फक्त १० मिनिटे बोला असे मेसेज आले. खरंच हे सगळे माझ्या डोक्यावरून चाललेय बघ. बेटा, हल्ली काळ फार बिकट आलाय बघ. प्रत्यक्ष नोंदणी करणारी काही वधूवर सूचक मंडळे आहेत पण तीही ५०० रू. पासून ते ३००० रूपयापर्यंत नोंदणी फी मागतात. तिचा काळही मर्यादित एक वर्षासाठी असतो. त्या एक वर्षात लग्न नाही जमले तर पुन्हा नवीन नोंदणी फी भरा. तिथे त्यांच्या फाईल्समध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये विवाह इच्छुक मुला मुलींची माहिती ठासून भरलेली असते. पण बेटा, आॕनलाईन नोंदणी असो नाहीतर प्रत्यक्ष नोंदणी, ही वधूवर सूचक मंडळे या सामाजिक संस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्याही फुकट समाजसेवेची अपेक्षा करू नकोस. लग्नाचा बाजार मांडलाय यांनी व विवाह हा पैसे कमावण्याचा धंदा केलाय यांनी. हल्लीची तरूण मुले मुली यांच्या जाळ्यात कशी सापडलीत हेच कळेनासे झालेय. मला खूप वाईट वाटते याचे. पण हल्लीच्या या तरूण पिढीला तरी माझे म्हणणे काय पटणार? कारण आम्ही जुनाट वळणाची माणसे. आणि आमच्या जुनाट गोष्टी म्हणजे आम्हाला फुकटात नातेवाईकच मध्यस्थ बनून लग्न जमवायला मदत करायचे. आमचे आईवडीलही पदराला पदर लागतोय का याची काळजी घ्यायचे. पण खरंच जुनाट वळणाच्या आमचे संसार या जुनाट वळणावरच व्यवस्थित पार पडले ही गोष्ट खरी आहे. तरीही आम्ही नवीन पिढीला जुनाट वाटतो. मग फसतात बिच्चारे आणि भोगतात फळे. पण याला काही चांगल्या विवाह संस्था व काही चाणाक्ष मुलेमुली अपवाद आहेत बरं का! पण हे अपवाद सोडले तर बेटा आयुष्याची धूळवड केलीय बघ या विवाह संस्थांनी व त्यांच्या नादी लागलेल्या हल्लीच्या मुलामुलींनी!

-©ॲड.बी.एस.मोरे, धूळवड, २५.३.२०२४,

 

शनिवार, २३ मार्च, २०२४

एकाच घरातील दोन विवाहांची कथा!

वाचा कथा एकाच घरातील दोन विवाहांची!

घरात नवरा ग्रॕज्यूएट व बायको बारावी. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती चांगली. नवरा चांगल्या कंपनीत नोकरीला त्यामुळे त्याचा पगार चांगला. या नवरा बायकोला झाली दोन मुले. एक मुलगा व एक मुलगी. या सुशिक्षित व चांगल्या आर्थिक स्थितीतील छोट्या कुटुंबात ही दोन मुले लाडात वाढली. दोन्हीही मुले गोरी गोमटी दिसायला सुंदर. थोरला मुलगा डबल ग्रॕज्यूएट झाला व तोही चांगल्या कंपनीत नोकरीला लागून महिना ८०,००० रूपये पगार कमवू लागला. मुलगीही ग्रॕज्यूएट होऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागून महिना ३०००० रूपये पगार कमवू लागली.

मुले मोठी झाली. शिकून सवरून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. आता या दोन मुलांच्या आईवडिलांना या दोन्ही मुलांच्या लग्नाची काळजी लागली. मग त्या आईवडिलांनी त्या दोन्ही मुलांच्या लग्नाचे प्रयत्न गावा पासून मुंबई पर्यंत सुरू केले. पण मुलीचे लग्न त्यांच्या नातेवाईकांच्या ओळखीतून अगोदर जमले. तिला अनुरूप चांगल्या ५०००० रूपये पगाराचा ग्रॕज्यूएट नवरा मिळाला. पण मुलगी सहा महिन्यांतच मुलाची आई खोडसाळ आहे म्हणून माहेरी निघून आली. मला नांदायला जायचे नाही म्हणून हट्ट करून बसली व मग  दोघांच्या संमतीने तिला कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोट मिळाला.

बहीण घटस्फोट करून घरी येऊन बसली आणि घरात घटस्फोटित बहीण आहे या कारणावरून तिच्या त्या डबल ग्रॕज्यूएट भावाचे लग्नच जमेना. तो उच्च शिक्षित चांगल्या पगाराचा मुलगा त्याच्या घटस्फोटित बहिणीमुळे बराच काळ म्हणजे ३५ वर्षे उलटून गेली तरी अविवाहित राहिला.

मग आईवडील पुन्हा काळजीत पडले. त्यांना घरातील अन्न गोड लागेना. शेवटी कसाबसा अपत्य नसलेला एक विधुर मुलगा त्यांच्या नातेवाईकांच्याच ओळखीतून त्यांना मिळाला. त्या घटस्फोटित मुलीचे दुसरे लग्न त्या विधुर मुलाशी लावून देण्यात आले. ती मुलगी त्या दुसऱ्या नवऱ्याकडे नांदायला गेली. मग ३५ वर्षाच्या तिच्या अविवाहित भावाला हायसे वाटले. मग त्याचे लग्न पुन्हा नातेवाईक लोकांच्या ओळखीतूनच जमून आले. त्याची पत्नीही ग्रॕज्यूएट व मुंबईत एका कंपनीत अकौंटंट म्हणून महिना ३०००० रू. पगार कमावणारी. पण झाले काय की तिला एकत्र कुटुंबातील तिचे सासू सासरे जड झाले. "मी जर माझ्या आईवडिलांना सोडून तुझ्या बरोबर संसार करायला आले तर तू तुझ्या आईवडिलांना धरून का बसलास? आपण दोघे आपल्या पैशातून स्वतंत्र  फ्लॅट घेऊ व तिथे संसार करू. तू अधूनमधून तुझ्या आईवडिलांकडे जात जा व मीही माझ्या माहेरी अधूनमधून जात जाईन" असा हट्ट धरून ती मुलगी बसली. मुलाला हे बिलकुल पटले नाही. "तू तुझ्या आईवडिलांना सोडले म्हणून मी पण माझ्या आईवडिलांना सोडले पाहिजे ही कसली अट"? असे तो मुलगा म्हणाला. झाले ती मुलगी त्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली ती पुन्हा परत आलीच नाही. मग त्या दोघांचा कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोट झाला.

तिकडे ती घटस्फोटित मुलगी विधुर मुलाबरोबर दुसरा विवाह करून नांदायला गेली होती तिला तिकडे विवाह संबंधातून एक मूल झाले. ते मूल म्हणजे मुलगा. पण तिचे त्या विधुर नवऱ्याबरोबर काय बिनसले माहित नाही. ती तडक त्या बाळाला घेऊन आईवडिलांकडे निघून आली व आता तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज टाकलाय. आता ही दोन्हीही सुशिक्षित, कमावती मुले त्यांच्या आईवडिलांकडे घटस्फोटित जीवन जगत आहेत. ही सत्यकथा आहे. फक्त नावे गुप्त ठेवली आहेत. वकील म्हणून पूर्वीही अशा केसेस हाताळल्या आहेत. पण असे प्रकार पूर्वी फारच कमी होते. ते हल्ली खूप वाढलेत. हल्ली काही मुले मुली तर बिनधास्त लिव इन रिलेशनशिप मध्ये राहतात. त्यांना विवाह बंधन व कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोशा झाल्याचे दिसत आहे. विवाह संस्थेचा असा खेळ झालेला बघवत नाही. काय झालेय काय हल्लीच्या पिढीला? पण या बदललेल्या परिस्थितीतही नवीन पिढीतील काही मुले मुली समंजसपणे संसार करताना बघून आनंद वाटतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.३.२०२४

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

आईवडिलांच्या इस्टेटीच्या वाटण्या कशा कराव्यात?

आईवडिलांच्या इस्टेटीच्या वाटण्या कशा कराव्यात?

भाऊ बहिणींनी आईवडिलांच्या इस्टेटीत वाटण्या मागण्यात गैर काहीच नाही. पण मुलगी दिली तिथे मेली ही पुरूषप्रधान मानसिकता अत्यंत वाईट, घरातील मायाप्रेमाची वाट लावणारी. माझ्या दोन्ही धाकटया बहिणी मोठ्या मनाच्या. माझे वडील मृत्यूपत्र न करता गेले. कारण त्यांचा विश्वास होता की मी म्हणजे त्यांचा थोरला मुलगा भावा बहिणींना योग्य न्याय देणार. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या  घराच्या चार भावंडात चार समान वाटण्या करायच्या मी ठरवले. मी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या समर्थ होतो. पण माझा धाकटा भाऊ व त्याचे कुटुंब खूप गरीब, अशक्त होते. माझ्या दोन्ही बहिणींनी मला स्पष्ट सांगितले की "दादा, आम्ही दोघी आमच्या २५% हक्कातील फक्त निम्मा म्हणजे १२.५% हक्क घेऊ, आमच्या दोघींच्या १२.५% हक्कांचा मिळून २५% हक्क आम्हाला धाकट्या भावाला द्यायचाय म्हणजे त्याचा २५% हक्क व आमच्या दोघींचा २५% हक्क मिळून त्याचा ५०% हक्क होईल, तू तुझा २५% हक्क घे." एवढ्या समजूतदार बहिणी घरात असल्यावर कसला वाद आणि कसले भांडण? या न्याय वाटणीमुळे आम्ही चौघेही भावंडे आज उतार वयातही एक आहोत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.३.२०२४

गुरुवार, २१ मार्च, २०२४

विसरलेली नाती माझ्या वडिलांनी पुन्हा कशी जोडली?

विसरलेली नाती माझ्या वडिलांनी पुन्हा कशी जोडली?

अनुवंशशास्त्र हे फार महत्वाचे शास्त्र आहे. वंश सातत्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी ही एक स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. कूळ हा शब्द वंश या शब्दाशी निगडित आहे. वंश किंवा कूळ हा डी.एन.ए. म्हणजे वंश तत्वाने एकमेकांशी जोडला गेलेला एक अत्यंत जवळचा (सोप्या भाषेत जवळच्या रक्ताच्या नात्याचा) एक मानव समूह असतो. डी.एन.ए. ने, रक्ताने, संस्कृतीने व कुळदैवतांनी जोडला गेलेला हा लोकसमूह घट्ट नात्यांनी बांधलेला असतो.

हल्लीचे जीवन जीवघेण्या स्पर्धेचे व कृत्रिम व्यावहारिक संबंधापुरते मर्यादित झाल्याने पूर्वीची एकत्र कुटुंब व्यवस्था संपून स्वतःपुरतेच बघणारी छोटी छोटी संकुचित कुटुंबे निर्माण झाली. या अशा सामाजिक बदलाने नातेसंबंध दुरावले. वंश, कूळ, कुळदैवत, कुळाचार या सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या. आपण कधी काळी एकमेकांशी जवळच्या नात्यांनी जोडलो गेलो होतो ही गोष्ट नातेवाईकांच्या विस्मरणात गेली.

माझे वडील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावात त्यांच्या इतर चार भांवडांबरोबर अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत होते. त्यांची शेती वगैरे त्यांच्या वडिलांनी विकल्यामुळे साडे गावातील आमचे ते मोरे कुटुंब निराधार झाले होते. माझ्या वडिलांसह पाचही भावंडांची दया येऊन मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या  मामांनी त्या सर्वांना मुंबईत आणले व त्यांना मुंबईच्या कापड गिरणीत कामाला लावून त्यांची लग्नेही त्या मामांनी लावून दिली. त्यासाठी जवळच्या नात्यातील मुली शोधल्या. या पाच भावंडांपैकी चार भाऊ होते तर एक बहीण होती (माझी आत्या). तिचेही लग्न नातेसंबंधात लावून दिले.

निराधारांना कसली नाती आणि कसले काय? पण मामांनी मुंबईत आधार दिला आणि निराधार मोरे कुटुंबाला नाती मिळाली. माझे वडील फक्त सातवी पर्यंत शिकलेले पण अत्यंत हुशार व धाडसी होते. स्वकर्तुत्वावर ते मुंबईत मोठे गिरणी कामगार पुढारी झाले. तो इतिहास वेगळा व रोमांचकारक आहे. पण इथे विषय हा आहे की मामांनी लग्नांनी जोडून दिलेली नाती माझ्या वडिलांनी पुढे कशी जोडली, वाढवली व टिकवली?

माझ्या वडिलांचे लग्न त्यांच्या मामांनी सोलापूर जिल्ह्यातील केम जवळील ढवळस गावातील एका अशिक्षित मुलीशी जमवले ती माझी आई. त्याकाळी साधा फोन नव्हता. मोबाईल फोनची तर गोष्टच विसरा. त्याकाळी होती ती फक्त साधी पोस्ट कार्डस व अंतर्देशीय पत्रे. माझ्या वडिलांनी त्यांच्या खेडगल्लीतील मामांकडून व माझ्या आईकडून हळूहळू सर्व नातेवाईक मंडळींची माहिती गोळा करायला सुरूवात केली. त्यांचे मुंबईतील व सोलापूर जिल्ह्यातील पत्ते शोधले व सर्वांना सुरूवातीला पोस्ट कार्डस व नंतर अंतर्देशीय पत्रे लिहून सगळ्यांच्या कुळांची मुळे शोधून आपण सर्व एकमेकांना जवळच्या नात्यांनी कसे जोडले गेलो आहोत हे समजावून सांगितले. आणि मग हळूहळू मुंबई, व सोलापूरच्या गावांतून नातेवाईक मंडळीच्या पत्रांचा ओघ आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील घरी सुरू झाला. मग पुढचा टप्पा होता मुंबईतील खेडगल्ली ते पार बोरीवली पर्यंत विखुरलेल्या व सोलापूर जिल्ह्यातील  निरनिराळ्या गावांत वास्तव्य करून असलेल्या नातेवाईकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याचा. तो टप्पा माझ्या वडिलांनी यशस्वीपणे पार पाडला. आणि मग सुरू झाली आमच्या वरळीच्या घरी विस्मरणात गेलेल्या आमच्या नातेवाईकांची वर्दळ.

आमचे वरळीचे घर फक्त १२० चौ. फुटाचे. पण त्याच छोट्या घरात माझ्या वडिलांनी पूर्णपणे विसर पडलेल्या नातेवाईकांची जत्रा भरवली. त्यातील काहींना त्यांच्याच मिलमध्ये नोकरीला लावले. मी घरात थोरला मुलगा असल्याने माझे वडील सतत मला त्यांच्याबरोबर फिरवायचे. विसरलेली नाती पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांच्या जोरावर पुन्हा जोडल्यावर बार्शी, पांगरी, मोहोळ, पंढरपूर अशा विविध ठिकाणी माझे वडील मला घेऊन फिरायचे. काय तो मायाप्रेमाचा गोतावळा होता. नुसत्या पत्रांनी जवळ आलेला तो गोतावळा केवढा आनंद देऊन गेला. केवढी आपुलकी होती त्यात.

खंत याचीच आहे की काकांना (माझ्या वडिलांना आम्ही काका म्हणायचो) जे साध्या पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांवर जमले ते मला हल्लीच्या एकदम फास्ट असलेल्या मोबाईल, व्हॉटसॲपवर जमले नाही. तो काळच वेगळा होता. ती माणसेही वेगळी होती.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.३.२०२४

कलियुगाची समाप्ती?

कलियुगाची समाप्ती?

उत्क्रांती काळ म्हणजे संक्रमण काळ. माणूस या संक्रमण काळातून हळूहळू विकसित होत पुढे चालला आहे. विकास म्हणजे नुसता भौतिक विकास नव्हे तर आध्यात्मिक विकासही. माणूस सद्या वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित झाला आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे बाकी आहे. दोन्ही दृष्ट्या विकसित युग म्हणजे सतयुग. सतयुग येणे बाकी आहे. सद्या कलियुग चालू आहे. कलियुग म्हणजे कलीने काड्या घालण्याचे, उपद्रव करण्याचे युग. या युगात कलीचा प्रभाव जरी वाढला असला तरी देव निष्प्रभ झालेला नाही. कलीला फटके देत त्याला त्याची जागा दाखवून देण्याचे देवकार्य चालू आहे. या कलीला पूर्णपणे नष्ट करून कलियुगाचा पूर्ण अंत करून सतयुग प्रस्थापित करण्यासाठी देवाचा पूर्णावतार होणे बाकी आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे असे लवकर व्हावे अर्थात सतयुग लवकरात लवकर यावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.३.२०२४

बुधवार, २० मार्च, २०२४

माणसातले देवत्व!

माणसातले देवत्व!

डी.एन.ए. स्वरूपातील आनुवंशिक तत्वच सजीवांचे शरीर घडवतं, धारण करतं. हेच आनुवंशिक तत्व पुढच्या पिढीत संक्रमित होत जातं व सजीवांना पुनर्निर्मित, पुनर्जिवित करून त्यांना पुनर्जन्म देते. हे जरी अनुवंश शास्त्रानुसार (अनुवंशशास्त्र ही वंश सातत्याचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र विज्ञानशाखा) वैज्ञानिक दृष्ट्या खरे असले तरी शेवटी अनेक माणसांतून फक्त काही माणसेच मानवी जीवनाची उदात्त पातळी गाठून समाजात एक मोठा आदर्श निर्माण करून जातात व त्यातून सामान्य माणसांच्या मनात प्रश्न निर्माण होतोच की असे कोणते आनुवंशिक तत्व बरोबर घेऊन अशी माणसे जन्माला येतात की जे तत्व सूर्यासारखे त्यांच्या आयुष्यभर तळपत राहते व संपूर्ण समाजापुढे एक कायमचा आदर्श घालून जाते?या माणसांकडील विशेष उदात्त गुण व तशीच अलौकिक शक्ती हा दैवी चमत्कार वाटून त्यांच्याविषयी सर्वसामान्य माणसांच्या मनात देवत्वाची आध्यात्मिक भावना निर्माण होणे गैर नाही. एवढेच की देवत्वाच्या या आध्यात्मिक भावनेची कर्मकांडी अंधश्रद्धा होता कामा नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.३.२०२४

हृदयविकार!

हृदयविकार! 

रक्ताच्या धमन्यांत कोलेस्ट्राल मुळे अडथळे (ब्लॉकेजेस) होणे किंवा हृदयाला पंपिंग करणाऱ्या विद्युत प्रवाहात अडथळा (ब्लॉक) निर्माण होणे असे मला माहित असलेले हृदयविकाराचे दोन प्रकार. ब्लॉकेजेस ओपन हार्ट/बाय पास सर्जरीने काढतात तर छातीत बॕटरीवाला पेसमेकर बसवून हृदयाचे बिघडलेले इलेक्ट्रिक सर्किट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मला दुसऱ्या प्रकारचा हृदयविकार म्हणजे २ एवी ब्लॉक आहे. दोन मोठ्या एम.डी. कार्डिओलॉजिस्ट यांनी मला पेसमेकर बसवावाच लागेल नाहीतर माझे काही खरे नाही अशी भीती घातली. पण के.ई.एम. हॉस्पिटलजवळील रतन सेंट्रल बिल्डिंगमधील, परळ, मुंबईच्या डॉ. सुभाष ढवळे, एम.डी. (होमिओपॕथी) यांनी गेल्या दोन महिन्यापासून नुसत्या होमिओपॕथी औषधांनी माझे दर मिनिटाचे हृदयाचे अनियमित ठोके ४० वरून ६० पर्यंत आणले. ते दर मिनिटाला ७० झाले की मी पुन्हा नॉर्मल होईन. ६७ वयात सर्जरी करून पेसमेकर छातीत बसवणे व त्या बॕटरी यंत्रावर जगणे मला मान्य नसल्याने व नैसर्गिक मृत्यू यावा ही इच्छा असल्याने मी होमिओपॕथीचा पर्याय स्वीकारला. आता प्रश्न राणीच्या बागेतील प्राण्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा. तिथल्या पशुवैद्यकांनाच माहित की तिथल्या प्राण्यांना कोणत्या प्रकारचे हृदयविकार होते, आहेत व त्यावर वैद्यक शास्त्रात इलाज काय व ते वापरण्यात त्यांच्याकडून काही निष्काळजीपणा झाला काय? याची चौकशी पशुवैद्यक व फॉरेन्सिक सायन्स मध्ये तज्ज्ञ असलेले मेडिको-लिगल वकील यांची समितीच करू शकेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.३.२०२४