https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

दुरून डोंगर साजरे!

दुरून डोंगर साजरे!

विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की त्याचा अंदाज सुद्धा नीट करता येत नाही. विश्व म्हणजेच निसर्ग आणि या निसर्गातील विविधता लांबून सुंदर भासली तरी आपण तिच्या जेवढे जवळ जाऊ तेवढी ती किचकट, कठीण होत जाऊन तापदायक होते. कुतूहलाचे समाधान म्हणून विश्वाचे लांबून दर्शन घेणे म्हणजे त्याचे सामान्य ज्ञान घेणे वेगळे आणि त्याच्या एकदम जवळ जाऊन त्याचे विशेष ज्ञान घेऊन त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे वेगळे. उदाहरणार्थ, सूर्याला लांबून बघणे, त्याच्या उष्णतेचा, प्रकाशाचा लांबून फायदा घेणे वेगळे व त्याच्या जवळ जाऊन त्याच्या उर्जा कार्यात प्रत्यक्षात सहभागी होणे वेगळे.

विश्व पसाऱ्याच्या व निसर्गाच्या विविधतेच्या जेवढे जवळ जावे तेवढया गोष्टी अधिकाधिक कठीण होत जातात. निसर्गाने एकीकडून माणसाला प्रचंड मोठी बुद्धिमत्ता व निर्णयक्षमता दिली आहे तर दुसरीकडून निसर्गाचा पसारा प्रचंड  वाढवून व त्यातील विविधता कठीण  करून माणसाचे जीवन प्रचंड  आव्हानात्मक व संघर्षमय करून ठेवले आहे.

आकाशात असंख्य चांदण्या, ग्रह, तारे असतात. पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध व त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? अगदी तसेच या पृथ्वीतलावर निरनिराळ्या प्रदेशात असंख्य माणसे जगत असतात पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध, तसेच त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? माध्यमातून त्यांच्या बातम्या बघणे, वाचणे वेगळे व त्यांच्याशी प्रत्यक्षात व्यावहारिक संबंध असणे वेगळे.

आपल्या जवळचे कोण, आपल्या समोर परिस्थितीने काय मांडून ठेवलेय व आपल्यासाठी व्यवहार्य गोष्ट कोणती याकडेच प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्याशी संबंध नसलेल्या बाकीच्या गोष्टींकडे एक विरंगुळा (टाईम पास) म्हणूनच बघितले पाहिजे. थोडक्यात, दुरून डोंगर साजरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

अध्यात्माची व्यवहार्यता?

अध्यात्माची व्यवहार्यता?

निसर्गाच्या भौतिक विज्ञानात परमेश्वराच्या आध्यात्मिक धर्माची व्यवहार्यता मानवी बुद्धीला नगण्य वाटली तरी शेवटी मानवी बुद्धीला चांगुलपणाची उदात्त भावना चिकटलेली असल्याने या भावनेतून देवश्रद्धा निर्माण होते हे मान्य करावे लागेल. मानवी बुद्धीला ही उदात्त भावना चिकटली तेव्हाच निसर्गाच्या भौतिक विज्ञानाला परमेश्वराचा आध्यात्मिक धर्म चिकटला. असे भावनिक अध्यात्म ही मुळातच व्यवहाराची गोष्ट नसल्याने भौतिक विज्ञानातील आध्यात्मिक धर्माच्या  व्यवहार्यतेविषयी बुद्धीने वाद घालणे हे चुकीचे. परंतु भावनाविवश होणे जसे चुकीचे तसे देवभोळे होणे हेही चुकीचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

अर्धज्ञानी लोक व स्वार्थाचा बाजार!

अर्धज्ञानी लोक आणि स्वार्थाचा बाजार!

निसर्गाच्या विविधतेत त्याचे विविध ज्ञान शाखांत विखुरलेले विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या वास्तवाचे ज्ञान. निसर्गात जोपर्यंत हे विज्ञान आहे व त्या विज्ञानाचा भाग असलेली माणसे आहेत तोपर्यंत माणसे त्या विज्ञानाशी झोंबाझोंबी करीत राहणार व त्या झोंबाझोंबीतून विज्ञानाच्या विविध ज्ञान शाखांत विशेष ज्ञान व प्रावीण्य मिळवून त्या अर्धवट ज्ञानाच्या व प्रावीण्याच्या जोरावर ही अर्धवट ज्ञानी माणसे निसर्ग पदार्थांच्या तुकड्यांवर सत्ता गाजवत एकमेकांना एकमेकांवर अवलंबून ठेवणार. कोणताही एक मनुष्य त्याच्या मर्यादित आयुष्यात संपूर्ण विज्ञानाचे ज्ञान मिळवू शकत नाही मग संपूर्ण विज्ञानात प्रावीण्य मिळविण्याची तर गोष्टच सोडा.

त्यामुळे प्रत्येक माणसाला कोणत्या तरी विज्ञान शाखेत (समाजशास्त्र व सामाजिक कायदा हाही निसर्ग विज्ञानाचाच एक भाग) ज्ञानसंपन्न व प्रवीण होऊन विविध वस्तू, सेवांच्या देवाणघेवाणीच्या बाजारात स्वतःचे वैशिष्ट्य विकण्याचा प्रयत्न करावाच लागतो. या बाजारात परावलंबीत्व असते तसा नफ्या तोट्याचा हिशोब असतो, व्यावहारिक शहाणपणा असतो तसा अती स्वार्थातून निर्माण होणारा अप्रामाणिकपणा, संशय, अविश्वास, विश्वासघात, भ्रष्टाचार असतो.

स्वार्थाच्या बाजारातील अर्धज्ञानी माणसे स्वतःजवळ असलेल्या अर्धवट ज्ञानाचे व मर्यादित पदार्थ संपत्तीचे मोल ग्राहकांना (गरजूंना) एवढ्याचे तेवढे करून सांगतात व परावलंबी ग्राहकांना जास्तीतजास्त कसे लुटता येईल याचाच स्वार्थी (बहुधा महास्वार्थी) विचार करीत असतात व या स्वार्थी, व्यापारी वृत्तीतून एकमेकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत राहतात.

स्वार्थाच्या अशा बाजारात माणसा माणसांमध्ये माणुसकी रहात नाही. माणसे एकमेकांना माया प्रेमाने बघत नाहीत. स्वार्थाचे काम संपले की ओळख देत नाहीत. बाजारात स्वार्थ बोकाळला की मग लोक कायद्याला जुमानत नाहीत. अशा बाजारात कायद्याविषयीचा आदर व वचक कमी होतो. त्यामुळे बाजारू सामाजिक व्यवहारात भ्रष्टाचार वाढतो. हळूहळू विज्ञानाच्या बोकांडी तंत्रज्ञान बसते आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो. देवाच्या धर्मात ढोंग घुसते आणि अध्यात्मातला देव निष्क्रिय होतो. तरीही असहाय्य झालेली देवश्रद्ध आस्तिक माणसे कठीण विज्ञानात व माणसांच्या स्वार्थी बाजारात देवाने मदत करावी म्हणून देवाला साकडे घालीत राहतात.

या लेखाचा सार एवढाच की, स्वार्थी व्यवहारी जगात, व्यापारी बाजारात माणुसकी, माया प्रेम शोधत फिरणे हा शुद्ध वेडपटपणा होय. मायाप्रेम हे स्वतःच्या कुटुंबापुरतेच मर्यादित असते, बाहेर नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.२.२०२४

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!

हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!

निसर्गाने किंवा निसर्गातील त्या महान परमेश्वराने मानवी शरीर हे काय अजब यंत्र बनविले आहे त्याचा फाॕर्म्युला त्या परमेश्वरालाच ठाऊक. मेंदू, हृदय, किडनी, छाती, पोट, डोळे, नाक, कान अशा अनेक अवयवांचे वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ शरीराच्या ठराविक भागाविषयीच्या त्यांच्या विशेष पण तरीही मर्यादित वैद्यकीय ज्ञानाने रूग्णांच्या शरीरावर निरनिराळे प्रयोग करीत असतात. गंमत ही की त्यांच्या या प्रयोगांनी शरीराचा एक अवयव सुधारला तर दुसरा अवयव बिघडतो. मग जा त्या दुसऱ्या अवयवाच्या तज्ज्ञाकडे.

माझेच उदाहरण घ्या ना. माझ्या हृदयात ६७ वयात कसला तो २:१ ए.व्ही. ब्लॉक निर्माण झालाय व त्याने माझ्या हृदयाचे इलेक्ट्रिक सर्किटच बिघडवून टाकले. आता  इलेक्ट्रिक करंटच अनियमित झाला तर हृदयाचे पंप बिघडून हृदयातून संपूर्ण शरीराला होणारा रक्तप्रवाह पण अनियमित होणार ही नैसर्गिक वैज्ञानिक गोष्ट आहे ज्यावर देवाचे अध्यात्म काय करणार? माझ्या मेंदूत जगाच्या विचाराचा किडा सारखा वळवळत असतो. त्यामुळे माझा मेंदू हृदयाकडून जास्तीतजास्त रक्ताची मागणी करतो. ६७ वर्षे रक्ताचे पंपिंग करून करून माझे हृदय बिच्चारे थकले. आता ते माझ्या मेंदूला जुमानत नाही. माझ्या  हृदयाच्या या असहकारामुळे माझा मेंदू हल्ली संभ्रमित व घाबरट झाला आहे. तो त्याचा आत्मविश्वास गमावत चाललाय आणि ही सर्व परिस्थिती हृदयाच्या ब्लॉकमुळे निर्माण झालीय. इथे हृदय मेंदूवर वरचढ ठरलेय.

त्यामुळे झालेय काय की अंघोळ ही साधी गोष्ट सुद्धा मला कठीण होऊन बसलीय. शरीराच्या खांद्याखालील भागाला कितीही साबण लावा त्याने त्रास होत नाही. पण एकदा का डोक्याला व तोंडाला साबण लावला की कधी डोक्यावरून पाणी घेतोय व डोक्याचा, तोंडाचा तो फेस धुवून काढतोय असे होऊन जाते. नेमके याच वेळी हृदयाला मस्ती येऊन ते मेंदूचा रक्त पुरवठा कमी करते आणि मग मेंदूला काय करावे हे सुचतच नाही. तो घाबरून जातो व मेंदू घाबरला की जीव गुदमरून जातो. हा क्षण म्हणजे धड जीवन नाही व धड मरण नाही असा मधल्या मध्ये लटकण्याचा क्षण. या क्षणात देवाचे कसले ते अध्यात्म सुचतच नाही. इतक्या देवदेवता आहेत व इतके साधुसंत आहेत पण एकाचेही नाव घेता येत नाही मग त्यांचा धावा कसला करणार? त्यावेळी कोणीच वाचवायला येत नाही. मग स्वतःच स्वतःला सावरून डोक्यावर पाणी घेऊन त्या भयंकर क्षणातून बाहेर यावे लागते.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर हार्ट ब्लॉक नंतर आता माझ्या मेंदूत  मेंटल ब्लॉक झालाय. याचे कारण हृदय व मेंदू हे शरीराचे दोन प्रमुख अवयव एकमेकांशी निगडीत आहेत.  एक अवयव बिघडला की दुसरा अवयव बिघडतो. कॉर्डिओलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सुचवलेय तर माझ्या हृदयाजवळ पेसमेकर म्हणजे  हातातील घड्याळाची आकाराची बॕटरी बसवा. त्यांना हृदयाच्या पलिकडे काही कळतच नाही. ती कृत्रिम बॕटरी छातीत घातली तर माझ्या हृदयाची टिकटिक वाढेल म्हणे. पण त्याने माझा मेंदू बिघडेल त्याचे काय? यावर कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टरांकडे काय उपाय आहे? या बॕटरीने माझा मेंदू शंभर टक्के बिघडणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण माझा मेंदू या असल्या कृत्रिम उपकरणांवर जगायला तयारच नाही.

होऊन होऊन काय होईल? माझ्या हृदयाची हळूहळू चालू असलेली टिकटिक बंद पडेल आणि मी मरेल एवढेच ना! त्याला तर माझा मेंदू केंव्हाच तयार झालाय. कदाचित मी बाथरूम मध्ये अंघोळ करतानाच मरून पडेल असे वाटतेय. कारण अंघोळ करताना माझा हार्ट ब्लॉक माझ्या मेंदूत मेंटल ब्लॉक तयार करतो. यावर तात्पुरता इलाज म्हणून आता मी काय करणार तर अंगाला भरपूर साबण लावला तरी डोके व तोंड या भागांना अगदी थोडा साबण लावणार म्हणजे तिथे जास्त फेस होणार नाही आणि मग तो मेंटल ब्लॉक तयार व्हायच्या आत पटकन डोक्यावरून पाणी घेऊन मोकळे होणार. उगाच लोचा व्हायला नको. पण हॉस्पिटलमध्ये मरण्यापेक्षा घरात मरणे ही तशी चांगलीच गोष्ट आहे मग त्यासाठी बाथरूम तर बाथरूम.

मी बायकोला व मुलीला सांगूनच टाकलेय की मला हृदयविकाराचा झटका आला की लगेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यायची बिलकुल घाई करायची नाही. मी बेशुद्ध असलो तर मला न विचारता तिथे माझ्या छातीची चिरफाड करून तो पेसमेकर बसवला तर? माझ्या हृदयाचे मिटर बंद झाले तरी चालेल पण त्या डॉक्टरांच्या जबरदस्त फी चे मिटर चालू व्हायला नको. तसे तर हार्ट अटॕकने पटकन मृत्यू यायला माणूस पुण्यवान असावा लागतो. मी तसा पुण्यवान माणूस आहे हे सिद्ध करण्याची मला देवाने दिलेली संधी मी का दवडू?

अंगाला विशेष करून डोक्याला व तोंडाला जास्त साबण लावला की त्रास होतो व देवाचे अध्यात्म जास्त केले की नैराश्य येते हा तसा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझे वडील जास्त देवदेव करीत नव्हते पण ते ७९ वर्षे जगून शांतपणे हार्ट अटॕकने गेले. याउलट माझी आई देवाची खूप पूजा अर्चा करायची पण तिला कमी वयात मधुमेह झाला आणि त्या साखर आजाराने तिला भयंकर त्रास दिला. पायाला मधुमेहामुळे गँगरीन झाले. जे. जे. हॉस्पिटलमध्ये पायाची बरीच आॕपरेशन्स झाली. शेवटी कमी वयातच जे.जे. रूग्णालयातच तिने प्राण सोडले. हा कसला देवाचा उलटा न्याय? इतरांचे अनुभव मला माहित नाहीत व त्यांच्याशी माझे काही घेणे देणे नाही. मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून बोलतो व लिहितो. निसर्गाचे विज्ञान काय किंवा परमेश्वराचे अध्यात्म काय, या दोन्ही गोष्टी मी जेवढ्यास तेवढ्या करतो. माझ्या हार्ट व मेंटल ब्लॉकसनी माझे ज्ञान आणखी वाढवले एवढे मात्र नक्की!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

निसर्गाचे साचेबंद विज्ञान!

साचेबंद निसर्ग व त्याचे विज्ञान!

पृथ्वीच्या अनेक बिळांतून जशी अनेक उंदरे जन्माला येतात तशी पृथ्वीवरील अनेक घरांतून अनेक माणसे जन्माला येतात. उंदरे असोत नाहीतर माणसे सर्वच सजीवांचे जीवन तसे साचेबंदच. निर्जीव पदार्थांचे अस्तित्व तर एकदम कडक गणिती साचेबंद. फक्त प्रत्येक गटाचे साचे वेगळे एवढेच. मनुष्याचा साचा थोडा हटकेच. निसर्गाकडून मनुष्य प्राण्याला लाभलेली बुद्धी एकदम उच्च पातळीची. याच बुद्धीच्या जोरावर मनुष्याने विज्ञानाचे रूपांतर आधुनिक तंत्रज्ञानात केले व मानवी जीवनाला तंत्रज्ञान निर्मित सुखसोयी व जीवनविषयक तत्वज्ञान यांच्यात बद्ध केले. हा मानवनिर्मित साचा तसा कृत्रिम पण तो नैसर्गिक बुद्धीने निर्माण केला असल्याने या कृत्रिम साच्यालाही नैसर्गिक साचा म्हणावे लागेल. मनुष्याच्या तांत्रिक साच्यात वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी इ. गोष्टी तर मनुष्याच्या तात्विक साच्यात अर्थकारण, राजकारण, धर्म इ. गोष्टी अशा बऱ्याच मानवनिर्मित कृत्रिम गोष्टी समाविष्ट आहेत. याच साच्यात निर्माण होतात कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, वकील, धर्मपंडित, श्रीमंत उद्योजक (अर्थकारणी), बलवान राजकारणी व सर्वसामान्य माणसे. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. या सर्व गोष्टींच्या मुळाशी परमेश्वर आहे असे मानावे तर परमेश्वराच्या धार्मिक अध्यात्माचा निसर्गाच्या वैज्ञानिक भौतिकतेवर खरंच प्रभाव आहे का व असलाच तर तो किती आहे हे कळायला मार्ग नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

वैज्ञानिक धर्मकारण व आध्यात्मिक धर्मकारण वेगळे!

निसर्गाचे वैज्ञानिक धर्मकारण वेगळे आणि परमेश्वराचे आध्यात्मिक धर्मकारण वेगळे!

निसर्ग रचित साचेबंद विज्ञानाच्या मुळाशी देव (परमेश्वर) मुळापासून आहे की मनुष्यानेच स्वतःच्या विचारातून किंवा अनाकलनीय नैसर्गिक अनुभवातून परमेश्वर व त्याचे अध्यात्म जीवनात आणले हा वादग्रस्त मुद्दा आहे. याच वादावर मनुष्य समाजातील आस्तिकवाद व नास्तिकवाद आधारित आहे. पण मूलभूत प्रश्न हा आहे की परमेश्वरच जर सगळे निर्णय घेत असेल तर मग मनुष्याच्या बुद्धीचे व त्या बुद्धीच्या  नैसर्गिक निर्णयक्षमतेचे मनुष्याने काय करायचे? मनुष्याच्या बौद्धिक निर्णयक्षमतेने निसर्गाच्या मूलभूत  भौतिक रचनेत बरीच लुडबूड करून अर्थात निसर्गाच्या या मूळ रचनेत बऱ्याच कृत्रिम काड्या घालून या रचनेची मुळापासून वाट लावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे व या उपद्रवी काड्यांमुळे मानवी जीवन सुसह्य होण्याऐवजी असह्य झाल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. मानवी जीवनात कल्याणकारी अर्थकारण व रक्षणकारी राजकारण हे मूलभूत आधार खांब आहेत. शिक्षण व ज्ञानकारण हा आधार खांब सुद्धा अर्थकारण व राजकारण या दोन मुख्य आधार खांबांशी निगडीत आहे. शिक्षणातून ज्ञान का घ्यायचे तर अर्थकारणी व राजकारणी  व्यावहारिक जीवन नीट जगता यावे म्हणून. पण अर्थकारणातील व राजकारणातील व्यवहाराचे वास्तव काय आहे? राहिलीय का नैतिकता, राहिलाय का देव (परमेश्वर) या मूलभूत व्यवहारात? उत्तर नाही असेच आहे. या व्यवहारात खरंच देवाचे (परमेश्वराचे) अधिष्ठान असते तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण (सॉरी गुन्हेगारीचे राजकीयीकरण) झालेच नसते. तरीही परमेश्वरावर श्रद्धा असणारा सर्वसामान्य माणूस त्याची आध्यात्मिक भक्ती, प्रार्थना करीत या भयानक वास्तवाला कलियुग म्हणत या युगाचा अंत करण्यासाठी परमेश्वर कधीतरी अवतार घेईल म्हणून त्याच्याकडे पिढ्यानपिढ्या आशेने डोळे लावून बसलाय. मुळात आपण ज्या घरात राहतोय त्या घरालाच अशी आग लागलेली असताना आपण आगीने वेढलेल्या अशा घरात परमेश्वराची आध्यात्मिक कामना, भक्ती करीत शांतीची मोक्षप्राप्ती मिळवू शकतो का हा मूलभूत प्रश्न आहे. निसर्गाचे वैज्ञानिक धर्मकारण वेगळे आणि परमेश्वराचे आध्यात्मिक धर्मकारण वेगळे, दोन्हीचा कुठेही ताळमेळ नाही. पण तरीही देवश्रद्ध माणूस निसर्ग विज्ञानाची आव्हाने हिंमतीने पेलण्यासाठी देवाच्या अध्यात्माचा आधार घेतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

CONNECTION BETWEEN NATURE SCIENCE AND GOD SPIRITUALISM!

CONNECTION BETWEEN SCIENCE OF NATURE AND SPIRITUALISM OF GOD!

I was finding it very difficult to connect Nature with God, Science with Religion (Dharma) and materialism of Nature with spiritualism God. But ultimately I got relieved from confusion when I seriously thought over the meaning of four purusharthas contained in Hindu religion. These four purusharthas are dharm, arth, kam and moksh. Each purusharth has very deep meaning within it. The simple meanings of these four purusharthas whose true understanding and determined practice in life is difficult but worth doing are as stated hereinbelow.

The Dharm means religion or law. It means performing all material karmas of the science of Nature in terms of religion or law. The law tells what is right conduct (dharm) and what is wrong conduct (adharm). The law or religion does not only mean performing of only good karmas (dharma). It also includes destruction of bad karmas (adharma). This is basic principle or substantive law.

The next purusharth is Arth. The Arth means earning, enjoying & securing of the material wealth of Nature by all lawful means and weapons. It simply means materialism of science of Nature in terms of law (religion/dharm). The law within arth is actually detailed principled procedure prescribed by basic principle of law viz. first purusharth of dharm. The arth is right conduct in terms of due process of law.

The third purusharth is Kam. The Kam does not mean any material karma or sex as people commonly understand. The simple meaning of Kam is Ishwar Kamana means spiritual desire of establishing union with God, the creator of Nature and controller of its science. It is love or bhakti of God.

The fourth purusharth is  Moksh. The Moksh does not mean renouncing of material world as Sanyasi or death. Actually, Moksh means divine peace one gets by spiritual union with God and it can be enjoyed by human being during his life time itself.

Now I come to the point of connection between the science of Nature and the spiritualism of God. For understanding this basic connection I have divided above four purusharthas in two parts. The first part is that of Dharm and Arth which two purusharthas in combination become the science of Nature. The next two parts of Kam & Moksh in combination become the spiritualism of God. Since all four purusharthas are connected with each other first two parts viz. Science of Nature and latter two parts viz. Spiritualism of God are also connected with each other. This is my personal analysis and my personal understanding which may vary with other masters in this field.

God bless!

-©Adv.B.S.More, 12.2.2024