https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ७ जानेवारी, २०२४

अनाकलनीय ईश्वर म्हणून का वाटेल ते करायचे?

अनाकलनीय ईश्वर कळत नाही म्हणून वाटेल ते करायचे का?

अनाकलनीय निर्मिकाने (ईश्वराने) रचलेली सृष्टीची भौतिक रचना (विज्ञान या रचनेला निसर्गाची उत्क्रांती म्हणते) विधायक आहे. त्या निर्मिकाच्या मनात आले तर एका क्षणात तो या सृष्टी रचनेचा विनाश करू शकतो. पण त्या निर्मिकाची मानसिकता विधायक आहे, विध्वंसक नाही. ही साधी गोष्ट काही अर्धवट, मूर्ख माणसांना कळत नाही. म्हणून तर निर्मिकाच्या नावानेच विस्फोटक विधाने करून समाजमनाला अशांत करून ते पेटवण्याचा अधार्मिक उद्योग अशी माणसे करीत असतात. निर्मिकाचा धर्म कोणता हे नीट समजून न घेता स्वतःसाठी सोयीच्या असलेल्या धर्मात त्या निर्मिकाला (ईश्वराला) बसवून त्याच्या नावाने विध्वंसक कृत्यांचे समर्थन करायचे, तसेच अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बुवा, बाबा, बायांचे व तसेच वरून धर्म आतून अधर्म करणाऱ्या समाजकंटकांचे राजकीय फायद्यासाठी उदात्तीकरण करायचे ही असली मानवी कृत्ये बघून त्या अनाकलनीय निर्मिकाला काय वाटत असेल हे सुद्धा अनाकलनीय! प्रश्न हा आहे की अनाकलनीय ईश्वर कळत नाही म्हणून वाटेल ते करायचे का?

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.१.२०२४

एकटक रोखून बघू नका!

एकटक रोखून बघणे किती त्रासदायक?

एखाद्या व्यक्तीकडेच नव्हे तर एखाद्या वस्तूकडे, गोष्टीकडे जास्त वेळ अर्थात एकटक रोखून बघत बसणे हे किती त्रासदायक होऊ शकते हा पुन्हा माझ्या चिकित्सक वृत्तीचा विषय. पण मला आता कळून चुकलेय की माझी ही असली चिकित्सक वृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिच्या खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती हा सुद्धा एकटक रोखून बघण्याचाच एक प्रकार. या वृत्तीचा माझ्या मलाच त्रास होतो हेही खरे आहे. याला अती विचारी वृत्ती असेही म्हणता येईल. अती तिथे माती या म्हणी नुसार अती विचार सुद्धा मनात तणाव निर्माण करून स्वतःलाच त्रास देतात.

एखाद्या गोष्टीकडे सहज बघायला निसर्गाची हरकत नसते, पण एकटक रोखून बघायला निसर्ग हरकत घेतो. सहज बघणे म्हणजे मवाळ, अहिंसक नजरेने बघणे व एकटक रोखून बघणे म्हणजे कडक, हिंसक नजरेने बघणे. उदा. एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर बोट ठेवणे, दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच जास्त डोकावून बघणे किंवा उगाच फालतू लुडबूड करणे, एखाद्या गोष्टीकडे अती चिकित्सक नजरेने म्हणजे अती खोलात जाऊन बघणे ही एकटक रोखून बघण्याची काही उदाहरणे आहेत.

निसर्ग नियमानुसार एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडे एकटक रोखून बघितले तर त्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडून सहज, तालबद्ध देवाणघेवाण होण्यासाठी योग्य प्रतिसाद, सहकार्य मिळणे तर सोडाच पण समोरून एकदम हिंसक प्रतिक्रिया मिळू शकते. उदा. एखादा पुरूष एखाद्या स्त्री कडे जास्त वेळ एकटक रोखून बघत बसला तर त्या स्त्री कडून त्या पुरूषाच्या थोबाडीत बसू शकते. यालाच एकदम हिंसक प्रतिक्रिया म्हणतात. एकटक रोखून बघणे हेच या प्रतिक्रियेला कारण असते.

जगाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर जगाकडे सहज बघणे फायद्याचे असते. जगाविषयी अती अपेक्षा, अती लालच हा जगाकडे एकटक रोखून बघण्याचाच प्रकार. या अशा एकटक  रोखून बघण्यातूनच मनात अहंभाव, मोह, मद, मत्सर, क्रोध, भ्रष्टाचार, व्यभिचार व हिंसाचार या नकारात्मक गोष्टी तयार होतात. मी तर असे म्हणेल की, जगाकडे, इतरांकडे एकटक रोखून बघणे हे तर चुकीचे आहेच, पण स्वतःच स्वतःकडे एकटक रोखून बघणे हे सुद्धा चुकीचे आहे. जगाकडे सहज बघून जगाचा सहजानंद घेतला पाहिजे हे मला म्हातारपणी उशिरा सुचलेले शहाणपण!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.१.२०२४

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

मानवी जीवन सर्वोत्तम का?

मानवी जीवन सर्वोत्तम का?

निसर्गाची भौतिकता अशुद्ध आहे, प्रदूषित आहे. निसर्गाच्या भौतिकतेत हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे, व्यभिचार आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे. निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेने भारलेले मानवी शरीर व मानवी मन भोगी आहे, वासनांध आहे. हे भौतिक मानवी मन त्याच्या  आतल्या अंतरात्म्याचे म्हणजे शुद्ध आध्यात्मिक आत्म्याचे अस्तित्वच नाकारते. अंतरात्म्याचे अस्तिव नाकारणारे भौतिक मन निसर्गातील  परमात्म्याचे म्हणजे शुद्ध चैतन्याचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व नाकारते आणि म्हणून अशा भौतिक मनाला परमेश्वराच्या शुद्ध अध्यात्माचे वावडे असते. मानवी जीवन सर्वोत्तम आहे कारण अनेक मूलद्रव्ये, अनेक पदार्थ यांची भेसळ असलेल्या निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेतही शुद्ध अंतरात्म्याची व त्याबरोबर शुद्ध परमात्म्याची आध्यात्मिक अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी परमेश्वराने फक्त मनुष्यालाच दिली आहे, इतर पदार्थ, प्राणीमात्रांना नाही ज्यांना या शुद्ध चैतन्याची जाणीवही नसते. जिथे जाणीवच नाही तिथे अनुभूती कसली?

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१.२०२४

धरले तर चावते, सोडले तर पळते!

धरले तर चावते, सोडले तर पळते!

धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी खालील अवस्था बघू.

(१) तरूणपणी सहजसोप्या व वजनाला हलक्या वाटणाऱ्या गोष्टी पुढे वय वाढल्यावर अवघड व वजनाला जड होऊनही त्या कराव्या लागणे, नीट न पेलवणाऱ्या, नीट न झेपणाऱ्या गोष्टी व्यवस्थित जमत नसूनही हळूहळू का होईना पण बळेच कराव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(२) जगाच्या पाठीवर कुठेही जा पण तीन दृश्ये जरूर दिसतील. एक लहान मुलांना हाताला धरून शाळेत सोडणारे त्यांचे तरूण आईवडील, दोन पैसा व जमलेच तर सत्ता प्राप्त करण्यासाठी जोशात (होश कमी असला तरी) धावणारी तरूण, प्रौढ मंडळी व तीन सक्रिय जीवनाच्या व्यासपीठावरून खाली उतरून लांब कुठेतरी कोपऱ्यात बसलेली (ज्येष्ठ नागरिक कट्टा) वृद्ध मंडळी. कुठेही जा, ही तीन दृश्ये हमखास दिसतात. गौतम बुद्धांना आजारी माणूस, म्हातारा माणूस व प्रेत अशी तीन दृश्ये दिसली होती जी त्यांच्या आत्मचिंतनास कारणीभूत ठरली. पण इथे मी नमूद केलेली तीन दृश्ये सर्वांना नेहमीच दिसतात पण त्यावर किती जण आत्मचिंतन करतात? पण शेवटी हे दृश्य वास्तव आहे, ते टाळता येत नाही, मग त्यावर काय आणि कसले आत्मचिंतन करायचे असा सर्वसाधारण विचार लोक करतात. हे वास्तव कंटाळवाणे वाटले तरीही ते स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(३) कोणालाही निसर्ग विज्ञानाच्या व समाजशास्त्राच्या अनेकविध ज्ञान शाखांत प्रावीण्य मिळवून त्या सर्व ज्ञान शाखांत तज्ज्ञ होता येत नाही त्यामुळे परावलंबीत्व येते. आंधळे पणाने डाॕक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए. सारख्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवता येत नाही व सामान्य ज्ञानाच्या जोरावर त्यांचे सल्ले सर्वसामान्यांना  खोडूनही काढता येत नाहीत. मग सुरू होते ती मनात चूक की बरोबर यांची घालमेल. तरीही हे इतरांवरील हे परावलंबीत्व स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(४) होश असो नसो पण तरीही जोशात असलेल्या तरूण, प्रौढ पिढीबरोबर वृद्धांना नीट मिसळता न येणे व त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्तही होता न येणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(५) वृद्धापकाळात शरीराचे अवयव झिजून झिजून थकलेले, खचलेले असल्याने पूर्वीचा आत्मविश्वास रहात नाही, तरीही डळमळीत झालेल्या आत्मविश्वासाने जीवनाची गाडी म्हातारपणी चालवावी लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(६) राजकारणी कितीही भ्रष्ट वागले तरी त्यांच्याशिवाय कायद्याचे राज्य पुढे सरकत नाही म्हणून गरजेपोटी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून द्यावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(७) कायद्याच्या राज्यात कायद्याने न्याय मिळण्यासाठी न्यायालयांत कितीही वेळ लागला व तारीख पे तारीख असे कितीही वेळा झाले तरी शेवटी गरजेपोटी अंतिम न्यायासाठी न्यायालयांत सारख्या खेटा घालाव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

मला जवळून कळलेल्या धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव देणाऱ्या काही मोजक्या अवस्था मी वर दिल्या आहेत. जिवाची घालमेल करणाऱ्या आणखी अशा बऱ्याच इतर अवस्था असू शकतील.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४


बी.डी.डी. चाळी!

पुनर्विकासानंतर मुंबईतील सर्व बी.डी.डी. चाळी इतिहासजमा होणार!

मित्रांनो, ही आहे परळ, दादर जवळील नायगावची एक बी.डी.डी. चाळ. मी तिचा बाहेरून व आतून फोटो घेतला कारण बी.डी.डी. चाळीशी माझे बालपण व थोडेसे तरूणपण जोडले गेले आहे. ब्रिटिश काळात मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजे वरळी, डिलाईल रोड, नायगाव वगैरे ठिकाणी बांधल्या गेलेल्या या चाळी सगळीकडे अगदी एकसारख्या आहेत. या चाळीतील एकेक खोली एकदम छोटी म्हणजे १०×१२ म्हणजे १२० चौ.फूटाची. तळ, पहिला, दुसरा, तिसरा अशा चार मजल्यांच्या या चाळीत प्रत्येक मजल्यावर २० खोल्यांनुसार एकूण ८० खोल्या. प्रत्येक मजल्यावर इकडून १० व तिकडून १० अशा खोल्यांच्या मधोमध ऐसपैस व्हरांडा ज्याला वटण असेही म्हणतात. या वटणात आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील खोलीच्या बाहेर मी माझे अंथरूण टाकून झोपायचो. आई सकाळी शाळेत जाण्यासाठी व नंतर काॕलेजला जाण्यासाठी मला ६ वाजता झोपलेले शरीर अलगद हलवून उठवायची. मजल्यावर मधल्या भागात २० खोल्यांच्या सामूहिक वापरासाठी मधला नळ व शौचविधी साठी स्त्रियांसाठी ३ व पुरूषांसाठी ३ असे दोन्ही बाजूला सार्वजनिक संडास. एकेका खोलीत एक कुटुंब म्हणजे आईवडील व साधारण ४ मुले असा गरीब गिरणी कामगाराचा संसार गिरणगावातील बी.डी.डी. चाळीत थाटलेला. तो अनुभवच फार वेगळा होता जो मला माझ्या वृद्धापकाळीही विसरता येत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४

माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी,

माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी?

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम शांती !

(१) श्री गणेशाय नमः !
बुद्धीदेवतेचे प्रथम स्मरण, मेंदूचे बौद्धिक इंजिन नीट चालावे म्हणून.

(२) श्री परमेश्वराय नमः !
परमेश्वराचे द्वितीय स्मरण, भौतिक जगातील काही काळच असलेला तात्पुरता प्रवास अडथळे न येता किंवा येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून सुखाचा व्हावा यासाठी मनाला एक भरभक्कम, कणखर आधार लागतो म्हणून. परमेश्वर कोणत्याही शब्दात, दस्तऐवजात, प्रतिमेत, मूर्तीत पूर्णपणे साठवता येत नाही कारण तो अनाकलनीय व प्रवाही आहे. म्हणून मी जगातील कोणत्याही देवधर्मात व कोणत्याही देवदेवतांच्या प्रतिमांत, मूर्तींत एकच परमेश्वर बघतो. तिथे मला एकच परमेश्वर दिसत असल्याने माझे हात तिथे नम्रपणे जोडले जातात. माझ्या दृष्टिकोनातून, आंतरधर्मीय संघर्ष हा मानवनिर्मित संघर्ष आहे, नक्कीच तो परमेश्वर निर्मित संघर्ष नव्हे. म्हणून मी या संघर्षापासून स्वतःला अलिप्त ठेवून संपूर्ण चराचर सृष्टीत सर्वांसाठी एकच असलेला परमेश्वर समोर ठेवून त्याच्यापुढे लीन होतो.

(३) श्री स्वामी समर्थाय नमः !
साधुसंतांचे तृतीय स्मरण, जगात होऊन गेलेल्या सर्व धर्मातील सर्व साधुसंतांचे प्रातिनिधीक प्रतीक व देवत्वाचे प्रत्यक्ष गुणात्मक रूप म्हणून मी श्री स्वामी समर्थांकडे बघतो व त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांच्या माध्यमातून परमेश्वर जवळ असल्याची अनुभूती मिळते.

(४) ओम शांती !
शेवटी मनःशांतीची प्रार्थना गणेश, परमेश्वर व स्वामी समर्थ या तिघांना एकत्र, कारण म्हातारपणी उतार वयामुळे शरीर झिजलेले, थकलेले असते. ते पूर्वीसारखे भौतिक कार्य करू शकत नाही. शरीराचे जडत्व वाढून शरीराच्या हालचालींची गती संथ झालेली असते.

उतार वयाची हालचाल म्हणजे परतीचा पाऊस. जन्म म्हणजे नव्या नवतीचा पाऊस, जीवन म्हणजे पावसाचे काही काळ स्थिरावणे व मृत्यूपंथाला लागलेला वृद्धापकाळ म्हणजे जिथून आला त्या ठिकाणी पुन्हा माघारी परतणारा परतीचा पाऊस. याच काळात म्हणजे म्हातारपणीच परमेश्वरी अध्यात्माची जास्त गरज असते.

याचे मुख्य शास्त्रीय कारण म्हणजे वृद्धापकाळात आयुष्याच्या परतीचा पाऊस सुरू झालेला असतो आणि तरीही थकलेल्या, झिजलेल्या, जीर्ण झालेल्या शरीरात असलेले मेंदूमन ते वास्तव न स्वीकारता स्वतःला उगाच चिरतरूण समजत असते. त्याला वाटते की वृद्धापकाळातही आपण तरूण शरीरातच आहोत. म्हणून आपण जशा उड्या मारतो तशा उड्या या जीर्ण शरीरानेही मारल्या पाहिजेत. म्हणून ते मेंदूमन हट्टाने थकलेल्या वृद्ध शरीरालाही स्वतःच्या कलाने नाच म्हणते. ज्याप्रमाणे लहान नातवंडे वृद्ध, थकलेल्या आजी आजोबांना बोकांडी बसून त्यांना घोडा करून धाव म्हणतात व त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीराची चाळण करतात तसेच वृद्ध शरीरात उड्या मारणाऱ्या मेंदूमनाचे असते. काही आजी आजोबांना ही नातवंडी धमाल, मस्ती आवडते तसेच काही म्हाताऱ्यांना आपण अजूनही तरूण आहोत असेच वाटत असते.

मी या अवास्तव गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवतो. माझे मेंदूमनही मला नाच म्हणते, पूर्वीसारखे धाव म्हणते. पण माझे थकलेले शरीर माझ्या मनाला बिलकुल जुमानत नाही. पूर्वी मन शरीरावर राज्य करायचे. आता उतार वयात शरीर मनावर राज्य करीत आहे. ते राज्य स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नाही. पण माझे मन हे वास्तव स्वीकारायला तयार होत नाही. या कटू वास्तवामुळे ते नाराज, हिरमुसले होऊन अशांत होते. अशा या अशांत मनाला शांत करण्यासाठी म्हणजे माझ्या मनःशांतीसाठी मला परमेश्वरी अध्यात्माची गरज भासते. अर्थात उतार वयात अध्यात्म ही माझी चैन नसून गरज आहे. ही गरज मी माझ्या वरील आध्यात्मिक पद्धतीने भागवतो. या लेखातून माझी आध्यात्मिकता का (गरज म्हणून), कुठे (परमेश्वरापाशी) व कशी तर (ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री परमेश्वराय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः,ओम शांती) या पद्धतीने. या अध्यात्म पद्धतीत मी सुरूवात ओम ने करतो कारण ओम मधूनच विश्व निर्माण झाले व ओम मध्येच सारे विश्व सामावलेले आहे व या ओम विश्वाचे मूळ परमेश्वर आहे ही हिंदू धर्मीय संकल्पना, धारणा मी स्वीकारली आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१.२०२४

Copyright Disclaimer!

COPYRIGHT DISCLAIMER!

All please know it well that this videographed film song is within public domain and being open for public watching on public platform, its public sharing by members of public cannot be claimed as the exclusive copyright of its original creator provided its original artistic form is not changed and is not claimed to be original creation of one who shares it in public meaning the name & credit of original creator remains reserved with such original creator only.

I do respect the copyright of original creator of any art such as music, writing etc. I being myself a writer. I have shared this musical video without any change or modification in its original content with my facebook friends purely for the purpose of enjoying its music in its original form within friend circle and not with commercial purpose of making any profit out of such sharing. 

I am not at all claiming it as my own creation & original creation remains with the original creator of artistic creation or musical video. The copying simply means imitation of others creation as creation of copy master. I have shared this musical video with my facebook friends for FAIR USE for purpose of enjoying it within friend circle. This FAIR USE is  permitted by Copyright Act and there is no infringment of copyright of original creator. It is non-profit sharing only for personal entertainment purpose within friend circle and such use is FAIR USE. I disclaim my ownership  right over this creation and I disclaim that I have infringed with copyright of its original creator. Thank you!

-©Adv.B.S.More