https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

स्वतःच्या मर्यादा व स्वतःची प्रमाणे ओळखली पाहिजेत!

स्वतःच्या मर्यादा व स्वतःची प्रमाणे ओळखली पाहिजेत!

कोणतीही गोष्ट मर्यादेत व प्रमाणात केली ती त्रासदायक होत नाही. उतार वयात हा नियम जरा जास्तच कडक होतो. नाहीतरी उतार वयात शरीर व मनाची लवचिकता कमी झालेलीच असते.

मर्यादा व प्रमाणबद्धतेचा नियम सर्वांना लागू असला तरी प्रत्येकाची जडणघडण व परिस्थिती सारखी नसल्याने प्रत्येकाच्या मर्यादा जशा वेगळ्या असतात तशी प्रमाणेही वेगळी असतात. त्यामुळे सक्रिय राहण्याचा प्रत्येकाचा आवाका वेगळा असतो.

काहींची वये इतकी लांबतात की त्यांचा वृद्धापकाळ त्यांच्या बाल व तरूण वयापेक्षा खूप मोठा होतो. लांबलेल्या या आयुष्याला बोनस आयुष्य म्हणावे की प्रमाणबद्धता चुकलेले आयुष्य म्हणावे हे कळत नाही. पण या बाबतीत समसमान परिस्थिती नाही.

पण आयुष्य लांबलेली माणसे जेंव्हा उतार वयातही बाल व तरूण वयात असल्याप्रमाणे उंच उड्या मारायला जातात तेंव्हा कधीतरी हाडे मोडून घेतात. स्वतःच्या मर्यादा व स्वतःची प्रमाणे ओळखली पाहिजेत!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.१२.२०२३


I AM NOT RETIRING!

I AM NOT RETIRING FROM ADVOCACY AND FROM BEING SOCIAL!

My dear friend Adv. Vijay Tawde, thank you very much for sharing this eye opening video with me. This is really great inspiring video at the turning point of my social declaration that I am retiring from advocacy. I am actually lucky to be in legal profession as an advocate because this profession is basically social and I am basically social minded person.

The decision of retirement from advocacy was sad & bad decision of killing myself means killing my inborn social spirit. Hence, I am cancelling said foolish decision of retirement from advocacy. It is correct to say that advocate never retires till he is dead by his body and mind. The dead here also means physically and mentally handicapped or incapacitated. This video made me realise my silly  mistake and I am now back to my advocacy including legal consultancy once again. I am also restarting my facebook account once again along with my other social activities such as my society's executiveship and other social contacts.

I have not worked as any servant or employee in any private or government organization to get retired compulsorily after reaching age of say 58 or 60 with some pension or bank balance in my hand? What will I do after retiring from advocacy? Just sitting idle at home? Just writing my thoughts in the social media without face to face social contacts with people or just chatting with my wife who is also idling away her time on you tube and TV entertainment after finishing her household work including some round up in market for purchasing vegetables? She is alright with her household work because she has been doing so with interest as a full time housewife since our marriage in the year 1985. But how can I be like her all of a sudden? Can I share my intellectual ideas and thoughts with her? Can I give my social speeches to her in home? Absolutely not!

Let me remain creative as earlier and social too till I really become incapable of being so by force of Nature and thank you friend once again for opening my eyes by sharing this inspiring video!🙏🙏

-Adv.B.S.More, 6.12.2023

आत्ममित्र (सोलमेट)!

आत्ममित्र (सोलमेट)!

माणसाला आयुष्यात निदान एक तरी आत्ममित्र (सोलमेट) असावा आणि तो माणूस असावा, कुत्रा वगैरे प्राणी नव्हे. मित्र या शब्दात मैत्रीण आली. अशी व्यक्ती सोलमेट तेंव्हाच होते जेंव्हा तिचे तुमच्याशी वैचारिक सूर जुळतात. जर बुद्धीचे सूर जुळले नाहीत तर भावनेशी कसे जुळतील?  वैचारिक जवळीक हा भावनिक जवळीकीचा पाया आहे.

बाहेरच्या व्यावहारिक जगात वापरा आणि फेका हा हिशोब असतो. तिथे बुद्धीचेच जास्त काम असते. तिथे सोलमेट मिळणे हा प्रकार फारच दुर्मिळ असतो. राजकीय नेत्यांचे असंख्य अनुयायी असतात पण ते कामापुरते असतात. हे अनुयायी राजकीय नेत्यांचे खरंच सोलमेट असतात का? तसे असते तर या  नेत्यांनी व त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी इकडून तिकडे पक्षांतरी कोलांट उड्या मारल्याच नसत्या. असतील शिते जर जमतील भुते!

सोलमेट हा शब्द खाजगी आयुष्यात वैयक्तिक असतो. आता प्रश्न हा की नवरा बायकोच्या संसारी नात्यात ते दोघे एकमेकांचे सोलमेटस असतात का? बरं ते जाऊद्या, दोघांनी ज्या मुलांना जन्माला घातले ती मुले तरी त्यांच्या आईवडिलांची सोलमेटस असतात का? जर सर्वांची वैचारिक पातळीच सामान्य व समान असली तर मग हा सोलमेटचा प्रश्नच तिथे निर्माण होत नाही. असे खरंच असते का? तसे असते तर कुटुंबात कधी भांडणतंटाच झाला नसता. संसारात समंजस तडजोड हा वेगळा भाग आहे. तडजोडीत सोलमेट हा प्रकार नसतो.

आता पुढे प्रश्न येतो तो देवधर्माचा? अध्यात्म या शब्दात आत्मा व परमात्मा हे दोन्ही शब्द समाविष्ट आहेत. अर्थात स्वतःच्या आत्म्याशी स्वतःचीच मैत्री व मग परमात्म्याशी मैत्री हा आत्ममित्र (सोलमेट) प्रकार अध्यात्मात असतो. स्वतःच्या आत्म्याशी मैत्री होऊ शकते म्हणजे माणूस स्वतःच स्वतःचा आत्ममित्र (सोलमेट) होऊ शकतो. पण मग परम्यात्म्याच्या मैत्रीचे काय? जगात परमेश्वराविषयी अनेक चमत्कार मिश्रित गोष्टी सांगणारे अनेक धर्म आहेत व अनेक प्रेषित, देवावतार, देवदेवता व साधुसंतही आहेत. त्यातला नेमका आपला आत्ममित्र (सोलमेट) कोणता आणि ज्या परमेश्वराशी कधी प्रत्यक्ष संपर्क साधताच येत नाही (खरं तर या आध्यात्मिक बाबतीत आपलेच मन आपल्याशी बोलत असते) तो आपला आत्ममित्र (सोलमेट) होऊ शकतो का? की इतर लोक करतात म्हणून मनाला वरवरचे मानसिक समाधान म्हणून आपणही तेच करायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१२.२०२३

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

आता बसा चिपळ्या वाजवत!

आता बसा चिपळ्या वाजवत!

अहो, हे माझे वाक्य नव्हे. तेलंगणा राज्यात काँग्रेस विजयी झाली पण उत्तरेकडील तीन राज्यांत भाजपने काँग्रेसला हरवले म्हणून भाजपच्या काहींनी काँग्रेसला काय सुनावले तर "आता बसा चिपळ्या वाजवत"! टी.व्ही. चॕनेलवर दररोज ही महान राजकारणी मंडळी एकमेकांना शिव्या घालतात आणि बातम्या बघाव्या म्हणून टी.व्ही. चालू केला की या राजकारण्यांची तोंडे बघून यांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. यालाच जर कोणी राजकारण म्हणत असेल तर धन्य!

पण "आता चिपळ्या वाजवत बसा" हे काँग्रेसला भाजपच्या लोकांकडून सुनावले जाणे हा काँग्रेसचा अपमान नसून हा चिपळ्यांचा अपमान आहे असे मला वाटते. कारण चिपळी हे वाद्य देवाचे गुणगाण गाण्यासाठी वाजवले जाते. हरीभक्तीचा प्रसार व समाज प्रबोधन ज्या कीर्तनाद्वारे केले जाते त्या कीर्तनातील संगीताचा एक भाग म्हणजे कीर्तनकाराच्या हातातील चिपळ्या.

अध्यात्मात महत्वाच्या असलेल्या या चिपळ्या राजकारणात मात्र तुच्छ होतात इतके हे राजकारण गलिच्छ झाले आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१२.२०२३

बुद्धीचे झाले खोबरे!

बुद्धीचे झाले खोबरे!

आपण जर फक्त भारतातील व भारतासंबंधीच बातम्या वाचत असाल तर ते चुकीचे आहे कारण भारत हा जगाचा एक भाग आहे आणि जग मोठे आहे. तसेच केवळ एखाद्या धर्मात जन्माला आलात म्हणून फक्त त्याच धर्माची माहिती घेत असाल तर ते संकुचितपणाचे लक्षण होय. कारण जगात अनेक धर्म आहेत व जगाचा परमेश्वर व त्या परमेश्वराचा निसर्ग जगासाठी एकच आहे.

आज दिनांक ४ डिसेंबर, २०२३ च्या लोकमत दैनिकात पान क्रमांक २ वर जगभर या सदरात बेडमेट मिळेल? ही टोरांटो शहरातील एका तरूणीची पोस्ट वाचली आणि माझ्या बुद्धीचे खोबरे झाले. त्या शहरात महागाई खूप वाढलीय म्हणून या तरूणीने तिच्या बेडचा एक कोपरा भाड्याने द्यायचाय अर्थात तिला बेडमेट हवीय (हवाय नव्हे) म्हणून तिने जाहिरात दिलीय. आतापर्यंत 'सोलमेट' म्हणजे मनाला मन जुळणारा मित्र किंवा मैत्रीण हा शब्द ऐकला होता. खरं तर सोलमेट ही संकल्पना वैचारिक मैत्रीशी निगडीत आहे. जग भावनेवर नाही तर बुद्धीवर चालते. हवा ही श्वसनासाठी आवश्यक असली तरी नुसत्या हवेवर जगता येत नाही. त्यासाठी जड पाणी व अन्न हे हवे असते. मी भावनेचा संबंध हलक्या हवेशी जोडतो व बुद्धीचा संबंध जड अन्न, पाण्याशी जोडतो. दोन किंवा अधिक व्यक्तींचे बौद्धिक विचारच जर जुळत नसतील तर त्यांच्यात भावनिक जवळीक काय निर्माण होणार?

सोलमेट ठीक पण 'बेडमेट' हा काय प्रकार आहे? टोरांटो शहरातील या तरूणीच्या जाहिरातीमुळे मला तो कळला. काय भन्नाट कल्पना आहे या तरूणीची! भाड्याची बेडमेट हवीय म्हणे तिला तिचा बेड भाड्याने शेअर करण्यासाठी! आज ही टोरांटो बातमी वाचताना मला बी.काॕम. च्या अभ्यासक्रमात शिकलेले अर्थशास्त्र आठवले. मानवी इच्छा अमर्यादित आहेत पण त्यांचे समाधान करणारी साधने जगात मर्यादित आहेत हेच ते वास्तव अर्थशास्त्रात शिकलो. मग साधनांची आंतरमानवी स्पर्धा हा भाग आलाच व या स्पर्धेचे नियमन करणारा कायदाही आला.

किती प्रचंड मोठी लोकसंख्या वाढवून ठेवलीय मनुष्य प्राण्याने या पृथ्वीवर! मनुष्य म्हणे अतिशय बुद्धिमान प्राणी. कसला बुद्धिमान? त्याला साधे अर्थशास्त्र कळत नाही आणि विकासाच्या गप्पा मारतोय. विकासी उद्योगात निर्माण झालेली विषारी रसायने, घाण, कचरा, सांडपाणी सरळ शुद्ध पाण्याच्या नद्यांत सोडून देतोय आणि नद्यांना गटारे बनवतोय. वर कहर हा की या गटारी नद्यांचे किनारे सुशोभित करतोय स्वतःच्या करमणूकीसाठी. याच गटारी नद्यांत तो परमेश्वराचे निर्माल्य सोडून देतोय. काय म्हणावे या मानवी बुद्धीला! परमेश्वर खरंच  कपाळावर हात मारून बसला असेल का त्याची निर्मिती असलेल्या  माणसाची ही बुद्धी बघून? बेडमेट वाचून माझ्या बुद्धीचे मात्र खोबरे झाले!

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१२.२०२३

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

शिक्षण व कृतीचे कालचक्र!

शिक्षण व कृतीचे कालचक्र!

मूलभूत जैविक वासना व उदात्त भावना या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत ज्या प्रेरणांचे समाधान करण्यासाठी मानवी बुद्धी सभोवतालच्या वातावरणातील पूरक घटकांचे अगोदर ज्ञान मिळवते व नंतर त्या घटकांवर ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती करते.

ज्ञानार्जन ही जशी बौद्धिक कृती आहे तशीच ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती हीही बौद्धिक कृती आहे. फरक हा की शिक्षण किंवा ज्ञानार्जन कृती ही फक्त मानसिक असते तर प्रत्यक्ष कृती ही मानसिक व शारीरिक असते.

वासना व भावना या दोन नैसर्गिक प्रेरणांच्या समाधानासाठी आवश्यक असलेल्या दोन कृती म्हणजे शिक्षण किंवा ज्ञानार्जन कृती व ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती या मूलतः बौद्धिक क्रिया आहेत. या दोन्ही बौद्धिक क्रिया जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत चालू राहतात. पण त्यांच्या विकासाची पातळी बालपण, तारूण्य व वृद्धावस्था या जीवनाच्या तीन टप्प्यांवर वेगळी असते व जोरही या तीन टप्प्यांवर वेगळा असतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१२.२०२३

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

संसार सोपा नाही!

संसार सोपा नाही!

या बातमीतील परिस्थितीतून मी गेलोय. वकिली नीट चालत नव्हती. महिना ५०० रूपयावर सिनियर वकिलाच्या हाताखाली केसेसची बंडले व कायद्याची पुस्तके उचलत या कोर्टातून त्या कोर्टात फिरत होतो. गरीब कामगार कुटुंबात जन्म पण मोठ्या कष्टाने उच्च शिक्षण घेतले. आजूबाजूला नोकरी एके नोकरी करणाऱ्यांचा गोतावळा. वकिलीत कोणाचे मार्गदर्शन नाही की पाठिंबा. पण वकिली सोडायची नाही, नोकरी करायची नाही ही जिद्द. पत्नी गृहिणी व मुलगी शाळेत. व्यापारी असोसिएशनचा कायदा सल्लागार म्हणून दरमहा ५०० रूपये मानधन मिळू लागले म्हणून सिनियर वकिलाचे स्टायपेंड ५०० रूपये धरून महिना १००० रूपये वकिलीतून कमाई सुरू होती. तो काळ होता १९८८ ते १९९० चा. तरीही त्याकाळी महिना १००० रूपये कमाई म्हणजे भयंकर गरिबी. मुलीच्या शाळेची फी भरता येत नव्हती व संसाराच्या दैनंदिन खर्चासाठी उसनवारी करावी लागत होती. उसने घेतलेले पैसे वेळेवर फेडता आले नाही की कर्जदार मागे लागायचे. घरी शेती नाही की वडिलोपार्जित इस्टेट नाही. तरीही हिंमत सोडली नाही. वकिली चालूच ठेवली. कमी फी मध्ये माझ्या ज्ञानाचा वापर सुरूच होता. एवढे शिक्षण घेऊन हेच का फळ असे सारखे मनात येत होते. पण कित्येक वेळा उच्च शिक्षणाची अवहेलना व मानहानी सहन करून संसाराची जबाबदारी नेटाने पार पाडली. एकच  मुलगी पण बापाचे कष्ट बघून कष्टाने शिकली. मोठ्या पगाराच्या उच्च पदाला पोहोचली. उच्च शिक्षित व उच्च पदस्थ तरूणाशी विवाह करून मोठ्या घरात संसारात स्थिर झाली. माझी व माझ्या पत्नीची आराधना सफल झाली. पतीने कुटुंबाकडे दुर्लक्ष केले म्हणून विवाहित स्त्रीने दोन मुलींसह रेल्वेखाली आत्महत्या केली ही दिनांक २ डिसेंबर २०२३ च्या लोकसत्तेतील बातमी वाचली आणि मन हेलावून गेले. संसार सोपा नाही एवढेच मी म्हणेन!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१२.२०२३