https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

मैं तो चला जिधर चले रस्ता!

जेंव्हा सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे होतात!

मानवी मनाच्या लोखंडासारख्या जड भौतिक वासना व हवेसारख्या हलक्या आध्यात्मिक भावना यांच्या भरकटण्यावर नियंत्रण ठेवणारी व त्या दोघांत समन्वय व संतुलन साधणारी स्वतंत्र बुद्धी हीच सदसद्विवेकबुद्धी होय. ही स्वतंत्र बुद्धी जेंव्हा कोमात जाते किंवा काही काळापुरती रिकामी होते तेंव्हा तिचे दोन तुकडे होतात. सदसद्विवेकबुद्धीचा एक तुकडा जड वासनांबरोबर वाहत जातो व दुसरा तुकडा हलक्या भावनांबरोबर वाहत जातो व हे दोन्ही तुकडे मनाबरोबर भरकटले जातात. वासनिक व भावनिक मनावरील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा सुटणे यालाच बुद्धीचे भरकटणे म्हणतात. अशा अवस्थेत वासनांध व भावना वेडे मन हे बुद्धीचा ताबा घेते व बुद्धीच्या दोन तुकड्यांना मनाप्रमाणे नाचवते. स्वतंत्र कार्य करणाऱ्या सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे झाले की काय होते तर माणूस एकतर इहवादी बनतो किंवा देवभोळा किंवा अती नैतिक होतो. खरं म्हणजे इहवाद (मटेरियलिजम) हे निसर्गाचे पूर्ण विज्ञान नसून ते बुद्धीचे जड वासनेबरोबर भरकटणे होय. तसेच देवभोळेपणा किंवा अती नैतिकता (स्पिरिच्युअलिजम) ही आध्यात्मिकता नसून ते बुद्धीचे हलक्या भावनेबरोबर भरकटणे होय.

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

टीपः

माझ्या या लघु लेखाला १९७२ साली प्रदर्शित झालेल्या धडकन या चित्रपटातील संजय खान या नटावर चित्रित केलेले "मैं तो चला जिधर चले रस्ता" हे गाणे प्रातिनिधीक म्हणून घेतले आहे. आपल्या मनाला निश्चित ध्येय नसेल तर आपले मनही असेच जिथे रस्ता फुटेल तिथे भरकटते. आपली सदसद्विवेकबुद्धी जेंव्हा रिकामी होते व तिचे दोन तुकडे होतात तेंव्हा मग मन जिकडे धावेल तिकडे बुद्धीचे हे दोन तुकडेही भरकटलेल्या अवस्थेत धावत जातात. कारण मनाला निश्चित ध्येय सांगणारी व त्या ध्येयाच्या दिशेने योग्य मार्ग दाखविणारी स्वतंत्र   सदसद्विवेकबुद्धी जाग्यावर नसते. मग  काय, मैं तो चला जिधर चले रस्ता!

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

लोकल ट्रेन्सचा प्रवास व कोरोनाचे सुरक्षित अंतर?

लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?

हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच  घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

टीपः

माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

विचारपुष्पांची ओंजळ!

विचारपुष्पांची ओंजळ, विविध विषयांवरील चौफेर लिखाण असलेले एक सुंदर पुस्तक!

(१) विचारपुष्पांची ओंजळ हे २२९ पानांचे पुस्तक माझे फेसबुक मित्र श्री.सुधीर ना. इनामदार यांनी मला सोलापूरवरून माझ्या डोंबिवलीच्या घरी स्पीड पोस्टने पाठवून दिले. गेले आठवडा त्या पुस्तकाचे वाचन चालू होते. आज शिक्षक दिनी (५ सप्टेंबर २०२०) रोजी या पुस्तकाचे वाचन संपले हा एक सुंदर योगायोग! माझी श्री. इनामदार यांच्याशी फेसबुकवरच बहुतेक दोन वर्षापूर्वी मैत्री झाली. ते वयाने माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठे आहेत त्यामुळे परिपक्वता या निकषावर माझ्या जवळच! शिवाय ते सोलापूर न्याय खात्यातून प्रबंधक (अधिकारी वर्ग १) या उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत व मी वकील त्यामुळे कायदा व न्याय या विषयाच्या निकषावर आणखी जवळीक! शिवाय ते मूळ सोलापूरचे स्थायिक व पंढरपूर त्यांचे आजोळ आणि माझे बालपण पंढरपूरी गेले आहे. ती गावच्या मातीची ओढ ही मैत्री आणखी जवळ करीत गेली. आणि शेवटचा निकष म्हणजे तेही फेसबुक लेखक आणि मीही फेसबुक लेखक! या सर्व गोष्टींमुळे ही फेसबुक मैत्री तशी थोडी हटकेच!

(२) हे पुस्तक म्हणजे श्री. इनामदार यांच्या फेसबुक लिखाणाचे संकलन आहे. वैयक्तिक नातेसंबंध इथपासून ते न्याय खात्यातील त्यांचे नोकरीचे विविध अनुभव, सामाजिक जाण व संवेदनशीलता असल्याने विविध सामाजिक विषय, भारतातील विविध ठिकाणी केलेल्या प्रवासाचे वर्णन, बालपणीचे त्यांचे गरिबीचे दिवस इत्यादी विविध विषयांवरील चौफेर लिखाणामुळे हे पुस्तक नुसते वाचनीयच नव्हे तर ज्ञान वर्धक व मनाला प्रगल्भ, परिपक्व करणारे झाले आहे. काही लेख वाचताना तर जणूकाही तो अनुभव मीच घेतोय असा भास झाला. विशेष करून पान क्रमांक २१० व २११  वर असलेला त्यांचा "आर्थिक विवशता" हा लेख तर अक्षरशः माझाच बालपणीचा अनुभव आहे. लेखक इनामदार यांचे वडील सोलापूर येथील लक्ष्मी मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते तर माझे वडील मुंबईतील व्हिक्टोरिया मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते. त्यावेळी मिलच्या सोसायटी कडून मिळणारे रेशन, मिलमधील सावकारी कर्ज वगैरे गोष्टी मीही प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. हा लेख मला स्वतःचाच वाटला म्हणून मी तो इथे पोस्ट करीत आहे.

(३) हे पुस्तक म्हणजे प्रस्तुत लेखकाचे एक छोटेसे आत्मचरित्रच आहे असे मला वाटते. कसलाही संकोच न करता त्यांनी त्यांचा जीवनपट या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या वाचकांसाठी उघड केला आहे. पण त्यामध्ये आत्मप्रौढी बिलकुल नाही. ज्ञानाने प्रगल्भ, अनुभवाने संपन्न, बालपणी गरिबी अनुभवली तरी आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाचा उच्च आर्थिक स्तर व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी म्हणून सरकारी पेन्शनची सुरक्षितता अनुभवत पुण्याजवळ तळेगाव-दाभाडे येथील लॕटिस या सुंदर गृहसंकुलात २ बीएचके सदनिकेतील व त्या सुंदर परिसरातील सुखवस्तू जीवन, एक मुलगा सोलापूरात व दोन मुली पुण्यात उच्च विद्याविभूषित, हुशार व प्रेमळ नातंवडे, चांगले प्रेमळ नातेवाईक या एवढ्या चांगल्या गोष्टी जवळ असूनही अहंकाराचा लवलेशही नाही. मनाने सरळसाधा व प्रामाणिक माणूस! हे या लेखकाचे व माझ्या फेसबुक मित्राचे थोडक्यात वर्णन!

(४) योगायोगाने आज ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे व या पुस्तकाचे लेखक श्री. सुधीर ना. इनामदार यांनी त्यांच्या ज्ञान प्रगल्भ व अनुभव संपन्न जीवनपटातून माझा आणखी एक शिक्षक होण्याचे काम केले आहे. म्हणजे तेही माझे गुरूजी झाले. या पुस्तकाने माझे ज्ञान आणखी प्रगल्भ झाले, अनुभव आणखी संपन्न झाला व विचार आणखी परिपक्व झाले. फेसबुकचा वापर कसा करायचा व फेसबुक लिखाणाचे लोकांच्या लक्षात राहील असे सुंदर छापील पुस्तक कसे बनवायचे हे श्री. सुधीर ना. इनामदार यांच्याकडूनच शिकावे. मीही फेसबुक वर लिहित असतो. माझेही गेल्या पाच वर्षांत  ५०० च्या वर लेख व असंख्य विचार वाक्ये फेसबुकवर लिहून झालीत. पण त्या प्रदीर्घ लिखाणाचे मला पुस्तक काही बनवता आले नाही ही माझी वैयक्तिक खंत आहे. श्री. सुधीर ना. इनामदार यांच्याकडून प्रेरणा घेतल्याने  कदाचित माझ्या फेसबुक लिखाणाचीही पुस्तके  बनतील अशी आशा व्यक्त करून मी या सुंदर पुस्तकावरील माझे मनोगत इथेच संपवतो. या पुस्तकाच्या लेखकास व माझ्या या फेसबुक मित्रास उत्तम आरोग्य व भरपूर आयुष्य लाभो व त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचे काम असेच आणखी होत राहो ही परमात्म्याजवळ प्रार्थना!

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

आधी पोटोबा, मग विठोबा?

आधी पोटोबा, मग विठोबा?

आधी पोटोबा, मग विठोबा ही म्हण मराठीत  प्रचलित आहे. तिच्या मागे खूप मोठा अर्थ दडला आहे. आपले शरीर, त्या शरीरात मन व त्या मनात आत्मा ही साखळी काही लोकांच्या डोक्यातच जात नाही. मनुष्याचा मेंदू व इतर प्राण्यांचा मेंदू यात फार फरक आहे. मानवी मेंदू   हा मोठा मेंदू व छोटा मेंदू या दोन भागांत आहे. आपला छोटा मेंदू आपल्या नकळत आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया पार पाडत असतो. त्याचे कार्य मोठ्या मेंदूशी संलग्न असले तरी ते बहुतांशी स्वतंत्र असते. आपला मोठा मेंदू मात्र तो काय करतोय याची आपल्याला जाणीव करून देत असतो. तो जाणीवपूर्वक आपल्या नुसत्या शरीराच्याच नव्हे तर आपल्या जाणिवेत असलेल्या मनाच्याही ऐच्छिक क्रिया पार पाडत असतो. जिथे जाणीव तिथे मन! छोटा मेंदू जर जाणीवच करून देत नाही तर मग त्याला मन आहे हे कसे म्हणावे? म्हणूनच माझ्या मते, आपले मन हे जाणीवपूर्वक ऐच्छिक शारीरिक व ऐच्छिक मानसिक क्रिया पार पाडणाऱ्या आपल्या मोठ्या मेंदूतच असते. मोठ्या मेंदूत असलेल्या या मनाच्या जाणिवा माझ्या मते दोन प्रकारच्या असतात. एक असते ती भौतिक जाणीव म्हणजे तहान, भूक, लैंगिक समाधान यासारख्या कनिष्ठ पातळीवरील शारीरिक वासनांची प्राथमिक जाणीव व दुसरी म्हणजे प्रेम, करूणा, देव, धर्म, देश यासारख्या उच्च पातळीवरील मानसिक भावनांची दुय्यम परंतु श्रेष्ठ जाणीव! ही श्रेष्ठ जाणीव मानवी नैतिकता व ज्यांची देवावर भावनिक श्रद्धा आहे त्यांची देवधार्मिक आध्यात्मिकता यांच्याशी निगडीत असते. मोठ्या मेंदूतील मानवी मनाची ही दुय्यम पण उच्च स्तराची श्रेष्ठ जाणीव हाच तर आत्मा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हा आत्मा नसेल तर माणूस हा माणूस रहात नाही. तो जनावर होतो. आपण ज्याला माणुसकी वगैरे म्हणतो ही याच आत्म्याची उच्च स्तरीय श्रेष्ठ जाणीव व अभिव्यक्ती आहे हेही माझे वैयक्तिक मत आहे. मग आधी पोटोबा व मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय तर अगोदर शारीरिक गरजा भागवायच्या व त्यानंतरच मानसिक भावनांचा आदर करायचा. म्हणजे अगोदर आपल्या  मनाच्या शारीरिक वासनांची तृप्ती करायची व नंतर मनात असलेल्या आत्म्याच्या आध्यात्मिक  भावनांचे समाधान करायचे. पण असे करून चालेल काय? म्हणजे आपल्या शरीराची भूक किंवा लैंगिकता यांची तृप्ती करताना आत्मा हळूच बाजूला काढून ठेवायचा व मग शारीरिक तृप्ती झाली की मग आत्म्याचे भजन करायचे. याचा अर्थ असाही होईल की एखाद्याने वारकरी संप्रदायाची विठ्ठल माळ गळ्यात घालायची व मटण खाऊ वाटले की ती विठ्ठल माळ हळूच गळ्यातून काढून खुंटीला अडकवायची, मग मटण खायचे व नंतर अंघोळ करून शुद्धीकरण  भास करून घेत गळ्यात पुन्हा ती विठ्ठल माळ घालायची. यालाच आत्म्याला तात्पुरते खुंटीवर टांगणे असे म्हणतात. मनुष्याचे वासनिक मन व भावनिक आत्मा या दोन गोष्टी जाणीवपूर्वक ऐच्छिक काम करणाऱ्या मोठ्या मेंदूतून अलग करता येत नाहीत. कारण त्या संलग्न असतात. वासनिक मन व आध्यात्मिक आत्मा यांना जोडणारा एक दुवा मोठ्या मेंदूत असतो ज्याला सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. जनावरांच्या मेंदूत फक्त बुद्धी असते व ती त्यांच्या वासनिक मनाशी निगडीत असते. त्यांना आध्यात्मिक आत्माच नसतो व त्यामुळे सदसद्विवेकबुद्धी असण्याचा तिथे प्रश्नच नसतो. म्हणून जीवो जीवस्य जीवनम हा नियम फक्त जनावरांना लागू होतो. तो उच्च पर्यावरणीय पातळीवरील माणसांना लागू होत नाही. तसे जर असते तर जगात कधीही माणुसकी दिसली नसती. सर्व माणसे हिंस्त्र झाली असती व त्यांनी एकमेकांना खाल्ले असते. ही हिंस्त्र वृत्ती एखाद्या माणसात जेंव्हा जागृत होते तेंव्हा समजावे की त्याची सदसद्विवेकबुद्धी काही काळ नाहीशी झाल्याने अशा माणसाने स्वतःचा आत्मा खुंटीला टांगून ठेवलाय. स्त्री व पुरूष जेंव्हा विवाह करतात तेंव्हा त्यांच्या लैंगिक वासना व आध्यात्मिक भावना यांचा संगम होतो. विवाहात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या व एकमेकांशी निगडीत असतात. या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडणारी वैवाहिक  सदसद्विवेकबुद्धी पती व पत्नी दोघांतही असेल तरच त्यांचा विवाह कायम टिकतो, नाहीतर मग घटस्फोट होतो. काही मानसशास्त्रज्ञ बुद्धीचे वासनिक बुद्धी व भावनिक बुद्धी असे दोन भाग करून मग वासनिक बुद्धीचे मोजमाप इंटेलिजन्स क्वोशंटने (आय. क्यू.) करतात व भावनिक बुद्धीचे मोजमाप इमोशनल क्वोशंटने (इ.क्यू.) करतात. पण दोन्ही बुद्धी या एकत्रच काम करतात व त्यांची सदसद्विवेकबुद्धी बनते त्या सदसद्विवेकबुद्धीचे मोजमाप कोण व कसे करणार? म्हणून म्हणतोय की मन व आत्मा या दोन गोष्टी व तसेच त्यांना नेहमी एकत्र ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी यांना अलग करता येत नाही. कोणी तसे अलग केले की माणूस हा माणूस रहात नाही. तो जनावर होतो. मनाचे ऐहिक सुख व दुःख व त्यासोबत असलेल्या आत्म्याचे आध्यात्मिक समाधान व शांती या गोष्टी जिथे एकत्र नांदतात तिथे माणूस होतो. म्हणून आधी पोटोबा व मग विठोबा ही मराठी म्हण माझ्या  सदसद्विवेकबुद्धीला पटत नाही. पोटोबा व विठोबा दोन्हीही गोष्टी एकत्रच हव्यात अर्थात मन व आत्मा हे दोघेही एकत्रच नांदले पाहिजेत अशी माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते.

-ॲड.बी.एस.मोरे©४.९.२०२०

लोकल ट्रेन्स चालू करो!

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

मिडिया ट्रायल व कायदा!

मिडिया ट्रायल व कायदा!

मी तुम्हाला घडलेली एक सत्यकथा सांगतोय. एका केसची ही सत्य गोष्ट आहे व ती प्रत्यक्षात घडली आहे. नवीनच लग्न झालेले! नवरा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक तर बायको बारावी पर्यंत शिकलेली एक गृहिणी! नातेवाईकांनी ठरवून केलेले हे लग्न! पण शिक्षण व वैचारिक तफावत होती दोघांत! क्षुल्लक कारणांवरून दोघांत भांडणे व्हायची व त्याचा आवाज बाहेर जायचा. बायको तापट स्वभावाची अपरिपक्व स्त्री होती. प्राध्यापक नवऱ्याला खूप त्रास होत होता. पण आज सुधारेल, उद्या सुधारेल म्हणून तो शांत राहिला. आपल्या मुलीचा स्वभाव कसा आहे हे तिच्या आईवडिलांना चांगले ठाऊक होते. पण लग्न जमवताना तिच्या स्वभावाचा अंदाज येणे हे केवळ अशक्य होते. हळूहळू आपण फसलो आहोत हे प्राध्यापक नवऱ्याच्या लक्षात येऊ लागले. त्याने आपल्या व तिच्या नातेवाईकांना तिच्या स्वभावाची कल्पना दिली. पण सर्वांनी नवीन संसार आहे. भांड्याला भांडे लागणारच असे म्हणून त्या नवऱ्याला शांत केले. एके दिवशी कॉलेजला जाताना बायकोने वांग्याची भाजी जेवणात दिली. ती एकदम बेचव झाली म्हणून नवरा तिच्यावर भडकला. मग साध्या वांग्याच्या भाजीवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. ते भांडण शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही ऐकले. मग प्राध्यापक नवरा तणतणत कॉलेजला निघून गेला आणि इकडे त्याच्या बायकोने डोक्यात राग घेऊन घरात गळफास लावून आत्महत्या केली. नवरा कॉलेजवरून घरी आल्यावर बायको आतून दाराची कडी उघडेना म्हणून त्याने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी दरवाजा बाहेरून ढकलून ढकलून तोडला व मग सर्वांनी घरात बायकोचे फासावर लटकलेले शरीर पाहिले. प्राध्यापक नवरा तर डोक्यावर हात मारून सुन्न होऊन रडत बसला. कोणीतरी पोलीसांना कळवले. पोलीसांनी मृतदेह खाली उतरवून त्याचा पंचनामा केला व ॲम्ब्युलन्स बोलवून शव विच्छेदनासाठी तो मृतदेह जवळच्याच सरकारी रूग्णालयात पाठवला. चौकशीसाठी प्राध्यापक नवऱ्यास पोलीस स्टेशनला नेण्यात आले. पोलीसांनी सुरूवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद करून चौकशीला सुरूवात केली. तोपर्यंत ही बातमी मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली.  मुलीकडचे सर्व नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये येऊन "हा नवराच आमच्या मुलीला सारखा हुंड्यासाठी छळत होता, याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करा" असे म्हणून रडू लागले. काही नातेवाईक "आता मुलगी तर गेलीय, पण याला सोडायचा नाही" असे म्हणू लागले. मग पोलीसांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांचे जबाब घेतले. तर सगळ्यांनी "यांची सारखी भांडणे होत होती" अशी साक्ष दिली. मग गळ्याला फास लागल्याने मृत्यू असा शव विच्छेदनाचा अहवाल आला. पोलीसांनी प्राध्यापक नवऱ्याचे म्हणणे ग्राह्य न धरता भांडणे होत होती या प्राथमिक अंदाजावर संशयावरून नवऱ्यावर "आत्महत्येस प्रवृत्त करणे" हा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नवरा प्राध्यापक असल्याने मिडियाने आकाश पाताळ एक केले. पुढे ती केस कोर्टात चालली. शेवटी कोर्टाकडून तो नवरा निर्दोष सुटला. कारण त्यांच्यात भांडणे होत होती याशिवाय नवऱ्याविरूद्ध कोणताच पुरावा नव्हता. पण केसचा निकाल लागेपर्यंत त्या प्राध्यापक नवऱ्याची कॉलेजची चांगली नोकरी गेली होती व समाजात खूप बदनामी झाली होती. तो प्राध्यापक आता कसाबसा सावरला आहे. दुसरीकडे नोकरीला लागला आहे. फक्त वांग्याची भाजी एवढा मोठा अनर्थ घडवू शकते. अशा केसेस होत असतात. काही केसेस मध्ये आरोपी गुन्हेगार असतातही. पण काही केसेस मध्ये ते निष्पापही असतात. पण कोर्टाकडून हे सर्व ठरेपर्यंत माध्यमे जेंव्हा संवेदनशील केसेस मध्ये स्वतःच न्यायालये बनून आरोपी गुन्हेगारच आहे असे समाजापुढे ठसवण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्यांच्यावर कोर्टाने बंधन आणले पाहिजे. राज्य पोलीस असो किंवा सी.बी.आय. असो, या यंत्रणांनी आरोपपत्र तयार होऊन ते रितसर फौजदारी कोर्टात दाखल होईपर्यंत त्यांची चौकशी पूर्णपणे गुप्त ठेवली पाहिजे. चार्जशीट दाखल होईपर्यंत मिडियाला त्यांच्या समांतर चौकशी नुसार व तर्कानुसार समाजाला काय सांगायचे ते सांगू द्यावे पण काही झाले तरी पोलीस चौकशी ही गुप्तच राहिली पाहिजे. फौजदारी खटला हा कोर्टात खुला चालतो. त्या खटल्याचे रिपोर्टिंग मिडियाने करणे वेगळे व खटला रितसर उभा रहायच्या अगोदर मिडिया ट्रायल घेणे यात फरक आहे. वर उल्लेखित एका खऱ्या केसचे उदाहरण देऊन एक वकील या नात्याने मी एवढेच म्हणेल की, मिडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे हे मान्य केले तरी कायद्याच्या प्रक्रियेवर या मिडियाचा प्रभाव पडेल अशा कोणत्याही कृत्यापासून मिडियाला रोखलेच पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

मराठी मुस्लिम अस्मिता अभियान!

मराठी मुस्लिम अस्मिता अभियान!

मला मराठी मुस्लिम अस्मिता अभियान ही संकल्पना खूप आवडली. महाराष्ट्राची मराठी माती, मराठी संस्कृती व मराठी भाषा यांच्याशी समरस झालेल्या माझ्या असंख्य मुस्लिम बंधू व भगिनींनो तुम्ही जर जाहीरपणे मराठी मनाला हात घालणारे हे अभियान चालवत असाल तर मला याचा खूप आनंद होतोय. मी हिंदू धर्मीय असलो तरी इतर कोणत्याही धर्माचा तेवढाच आदर करतो जेवढा मी माझ्या हिंदू धर्माचा करतो. निसर्गातील देवाला समजून घेण्याच्या आपल्या धार्मिक संकल्पना व त्या देवाची आराधना करण्याच्या आपल्या धार्मिक पद्धती आपआपल्या धर्मानुसार वेगळ्या असतीलही पण प्रादेशिक संस्कृती हे सर्व धर्मांना एकत्र करणारे एक अजब असे भावनिक रसायन आहे. म्हणूनच भारतीय हिंदू, भारतीय मुस्लिम, भारतीय ख्रिश्चन व भारतीय संस्कृतीशी समरस  झालेले असे अनेक विविध धर्मीय भारतीय हे त्यांच्या धार्मिक विविधतेसह एक आहेत. काही विघ्नसंतोषी लोक या एकतेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे काही लोक हे भारतीय म्हणून आपल्या सर्वांचे शत्रू आहेत. आपल्या भारतात विविध प्रांताची राज्ये बनली आहेत. त्या राज्यांची सुद्धा एक विशेष अशी प्रादेशिक संस्कृती, प्रादेशिक भाषा व प्रादेशिक अस्मिता आहे. जशी महाराष्ट्राची मराठी संस्कृती, मराठी भाषा व मराठी अस्मिता!  महाराष्ट्रात राहणाऱ्या भारतीय मुस्लिम बंधू व भगिनींनो, आपण महाराष्ट्राच्या मराठी संस्कृती, मराठी भाषा व मराठी अस्मितेविषयी इतके भावूक व जागृत आहात हे या मराठी मुस्लिम अस्मिता अभियानातून कळले व खूप आनंद झाला. मी आपणास आवर्जून सांगतो की, पंढरपूर शहरात माझे बालपण हनीफ शेख यांच्या वाड्यात गेले आहे. त्या वाड्यात हनीफ शेख या घरमालकाचे भाडेकरू म्हणून राहताना त्यांच्या कुटुंबाशी आम्ही एकरूप झालो होतो. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा सलीम शेख हा माझा जिवलग मित्र होता, तर त्यांची थोरली मुलगी साराप्पा ही मला माझ्या थोरल्या बहिणी सारखी होती. साराप्पा ही मला "ये काळ्या" म्हणूनच हाक मारायची. पण त्यात खूप माया, आपुलकी होती. मी सलीम बरोबर पंढरपूर पालथे घालायचो. हनीफ शेख यांच्या घरात मी जेवायचो, चहा घ्यायचो. सलीमही माझ्या घरी जेवायचा. गणपती, दसरा व दिवाळी या सणात आम्ही केलेले गोडधोड पदार्थ हनीफ शेख यांच्या घरी जात तर इद वगैरे मुस्लिम सणातील शिरकुंबा सारखे पदार्थ शेख यांच्या घरातून आमच्या घरी येत. आमचे धर्म वेगळे होते पण आम्हाला त्या वेगळेपणाची कधीच जाणीव झाली नाही. उलट आमच्या धार्मिक विविधतेचा आम्ही आनंद घ्यायचो. या प्रत्यक्ष अनुभवाचा एकच सार की, मित्रांनो जरी आपले धर्म वेगळे असले तरी माणूस म्हणून आपण एक आहोत. म्हणूनच मराठी मुस्लिम अस्मिता अभियानाचे मी आनंदाने अभिनंदन व स्वागत करतो. आज एका मुस्लिम बांधवाची मला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याच्या फेसबुक प्रोफाईल वर या अनोख्या अभियानाची अक्षरे मला दिसली व इतर पोस्टसही चांगल्या दिसल्या म्हणून मी लगेच ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि तीही आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी!

-ॲड.बी.एस.मोरे©१.९.२०२०