https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

निसर्ग व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन!

निसर्ग, निसर्गाची व्यवस्था व त्या व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन?

(१) मानवी मन इतर प्राणी मात्रांपासून बरेच वेगळे आहे. ते त्याचा मूळ गुणधर्म व त्याची निसर्गाशी असलेली नाळ विसरून स्वतःला जरा हटके सवयी लावून घेते व पुढे त्या सवयींचे गुलाम बनते. या विशेष सवयी जेंव्हा एका बरोबर अनेक माणसांना लागतात तेंव्हा त्यांना त्या मानव समूहाकडून संस्कृती असे गोंडस नाव दिले जाते. मग त्या समूहातूनच काही खास माणसे पुढे येतात व अशा संस्कृती रक्षणाचा ठेका स्वतःकडे घेतात. त्यांना संस्कृती रक्षक म्हणतात. त्यांच्या विरूद्ध कोणी बोलायची हिंमत करू शकत नाही व जर कोणी केलीच तर त्याचा झुंडबळी होण्याची भीती असते.

(२) मोठमोठया शास्त्रज्ञांना सातत्याने प्रयत्न करूनही विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येणारा निसर्गाचा मेंदू कुठे आहे हे शोधता आले नाही. तसेच मोठमोठया साधूसंतांना सातत्याने भक्तीमार्गावर राहूनही देवाचा आत्मा(परमात्मा) निसर्गात कुठे आहे हे शोधता आले नाही. याचा अर्थ हाच घ्यावा लागेल की निसर्गाला एकतर स्वतंत्र मेंदूच नाही किंवा निसर्गात देवच नाही. हा झाला नास्तिक विचार. आस्तिक विचाराने निसर्गाला स्वतंत्र मेंदू आहे किंवा निसर्गात देव आहे असे समजावे तर मग असेही म्हणता येईल की हा निसर्गाचा मेंदू किंवा निसर्गातला परमात्मा (देव) मानवी मेंदूच्या संपर्क क्षेत्राबाहेर आहे. निसर्ग मेंदू किंवा देव अशाप्रकारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे मानवी मेंदूच्या फोनमध्ये काहीतरी बिघाड आहे किंवा निसर्गाच्या मेंदूचे किंवा निसर्गातील देवाचे (परमात्म्याचे) क्षेत्रच मुळात मानवासह निसर्गातील सर्व पदार्थांना निषिद्ध क्षेत्र म्हणून संरक्षित केले गेले आहे. असे जर असेल तर मग विज्ञान किंवा धर्म यातील मूलभूत गाभाच मानवी मेंदू पासून फार अलग, विलग, अलिप्त आहे हे लक्षात घ्यायला हवे.

(३) अशा परिस्थितीत मानवी मेंदूला निसर्ग व निसर्गाची व्यवस्था जमेल तितकी समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. निसर्गाची व्यवस्था तयार आहे. पण मानवी मेंदूला एकतर त्या व्यवस्थेचे पूर्ण ज्ञान नाही किंवा जे काही ज्ञान प्राप्त झालेय (ज्याला विज्ञान म्हणतात) त्याच्या जोरावर त्या निसर्ग व्यवस्थेचे नीट व्यवस्थापन करणे मानवी मेंदूला जमत नाही किंवा असेही असेल की अती स्वार्थामुळे मानवी मेंदू या तयार निसर्ग व्यवस्थेची वाट लावण्यात आनंद मानतोय.

(४) या लेखाच्या सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे मानवी मेंदूला लावावी तशी सवय लागते. तो स्वतःच निर्माण केलेल्या कल्पनांना कवटाळून स्वप्नाळू बनतो, स्वतःच लावून घेतलेल्या काही सवयींना चिकटून त्या सवयींचा गुलाम बनतो आणि स्वतःच निर्माण केलेल्या वादांशी झुंजत स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतो. मानवी मेंदूचे आयुष्य तेच माणसाचे आयुष्य. मानवी मेंदू मेला की माणूस मरतो. यालाच इंग्रजीत ब्रेन डेथ म्हणतात.

(५) निसर्गाने मानवी मेंदूलाच मानवी जीवनाचे  शिल्पकार बनविले आहे. मानवाला निसर्गाने दिलेली ही एक मोठी संधी आहे. पण ही संधी देताना निसर्गाने सगळ्या माणसांना सारखी परिस्थिती दिली नाही व त्यामुळे सर्वांना समान संधी व समान कायदा असूनही सर्व माणसांना निसर्गाकडून समान नैसर्गिक न्याय मिळत नाही. याला त्या निसर्गाचा दुजाभाव म्हणावे की आणखी दुसरे काही? एवढे मात्र निश्चित की, निसर्गाने माणूस नावाच्या प्राण्याला इतर प्राण्यांपासून चांगल्या स्थितीत ठेवले आहे. त्याच्या व्यवस्थेत थोडीफार छिद्रे ही राहणारच. त्यांच्याशी माणसाला जुळवून घ्यावे लागणार. निसर्ग व्यवस्थेचे व्यवस्थापन हे मानवी मेंदूपुढे मोठे आव्हान आहे हे मात्र खरे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.८.२०२०

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

लॉकडाऊनवर मनसे प्रश्न व माझी उत्तरे!

कोरोना लॉकडाऊनवर मनसेचे रोखठोक प्रश्न व त्यांना माझी रोखठोक उत्तरे!

लॉकडाऊन आता बस्स! कोरोनाचे गांभीर्य या लॉकडाऊनने लोकांना चांगले समजावलेय. आता १५ अॉगष्ट २०२० या स्वातंत्र्य दिनी लॉकडाऊन उठवा, रेल्वे चालू करा, मुंबई लोकल्स व बसेस सर्वसामान्यांसाठी चालू करा व लोकांना मास्क लावून कामाला जाऊ द्या!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.८.२०२०

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

इहवाद Materialism

विवेकी इहवाद? Rational materialism?

(१) आभासी/मिथ्या आध्यात्मिकतेला पर्याय विवेकी भौतिकता?

(1) Rational/Reasoned/Judicious materialism as substitute for superstitious or mythological spiritualism?

(२) त्यासाठी आध्यात्मिकता ही आभासी/मिथ्या आहे हे विवेकी भौतिकतेला पुरावा व कारणमीमांसा देऊन सिद्ध करावे लागेल.

(2) For that rational materialism will have to prove spiritualism as fantasy or myth by giving convincing proof and reason.

(३) मूलभूत प्रश्न हा आहे की भौतिक निसर्गात आध्यात्मिक देव कसा व माणसाच्या भौतिक शरीरात आध्यात्मिक आत्मा की भौतिक मन?

(3) How can there be spiritual God in material Nature and spiritual soul in material human body instead of material human mind?

-ॲड.बी.एस.मोरे©१२.८.२०२०
-Adv.B.S.More©12.8.2020

मुंबईतील सिनेमागृहे!

मुंबईची सिनेमागृहे आणि मी!

ताडदेवचे गंगा जमुना हे जुळे सिनेमागृह जमीनदोस्त झाले. वाईट वाटले ही बातमी वाचून कारण कॉलेज जीवनात परळचे दिपक, वरळीचे गीता, सत्यम-शिवम-सुंदरम, हाजीअलीचे लोटस, दादरचे प्लाझा, मुंबई सेंट्रलचे मराठा मंदिर, ग्रँट रोडचे नॉवेल्टी, अप्सरा, मिनर्व्हा व आता जमीनदोस्त केलेले ताडदेवचे गंगा, जमुना या सिनेमागृहांत मी भरपूर हिंदी चित्रपट बघितले आहेत.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.८.२०२०

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

निसर्गाचे सत्य व माहिती अधिकार!

मानवी बुद्धीला निसर्गाचे सत्य कळणे हा माहिती अधिकाराचाच भाग!

विविध गुणधर्मी मूलद्रव्यांच्या अनेक पदार्थ कणांनी बनले विविध गुणधर्मी अनेक पदार्थ, त्या पदार्थांची बनली व्यवस्था आणि माणूस झाला या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग! या अनेक पदार्थांच्या समूहाला विश्व किंवा निसर्ग म्हणायचे आणि या पदार्थांच्या समूह व्यवस्थेला म्हणायची विश्व किंवा निसर्ग व्यवस्था! हे पदार्थ  कण, पदार्थ व त्यांची व्यवस्था यांचे ज्ञान हेच तर विज्ञान! या पदार्थ कणांशी, पदार्थांशी व त्यांच्या समूह व्यवस्थेशी प्रस्थापित झालेल्या  मानवी संबंधाविषयीचे ज्ञान हे सुद्धा विज्ञानच! निसर्गातील विविध पदार्थांशी व त्यांच्या समूह व्यवस्थेशी असलेला मानवी संबध नीट समजून घेणे म्हणजे निसर्ग व मानव संबंधाचे विज्ञान समजून घेणे. मनुष्य जेंव्हा हे विज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणतो तेंव्हा त्याला तंत्रज्ञान म्हणतात. मानवी समाज व या समाजाची कायदा व्यवस्था हा सुद्धा या विज्ञान व तंत्रज्ञानाचाच भाग आहे. निसर्गाच्या विज्ञानाला मानवाने दिलेला नैसर्गिक  प्रतिसाद म्हणजेच तंत्रज्ञान होय! निसर्गाच्या या सत्याबरोबर त्या सत्य स्वरूपात जगायचे की काल्पनिक, आभासी स्वरूपात जगायचे हे माणसाने त्याच्या बुद्धीचा नीट वापर करून ठरवावे. निसर्गाचे विज्ञान व मानव समाजाचा कायदा, धर्म या दोन गोष्टी वेगळ्या करणे हेच मुळात चुकीचे आहे. धर्म व कायदा यात सुद्धा फरक करणे चुकीचे आहे. धर्मात जेंव्हा असत्य मिथ्यके, कल्पना व आभास घुसवले जातात तेंव्हा धर्म विज्ञान व कायद्यापासून अलग होतो व असे अलगीकरण हे मानवाला निसर्गाच्या सत्यापासून दूर नेत त्याला निसर्गाच्या नैसर्गिक सादाला नैसर्गिक प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण करते. मानवी बुद्धीला निसर्गाचे सत्य कळणे हा माहिती अधिकाराचाच भाग आहे हे लक्षात घ्यायला हवे!

-ॲड.बी.एस.मोरे©११.८.२०२०

नैसर्गिक वर्तन!

कोरोना आणि माणसाचे नैसर्गिक वर्तन?

(१) माणूस ना पूर्ण वासनिक ना पूर्ण भावनिक, ना पूर्ण भौतिक ना पूर्ण आध्यात्मिक, ना पूर्ण वैज्ञानिक ना पूर्ण धार्मिक व ना पूर्ण ज्ञानी ना पूर्ण अज्ञानी! अशा अर्धवट माणसाकडून पूर्ण नैसर्गिक वर्तन शक्य आहे का हा मला पडलेला एक मूलभूत प्रश्न! निसर्गाच्या नैसर्गिक सादाला पूर्णपणे नैसर्गिक प्रतिसाद देण्याच्या मानवी कृतीलाच मानवाचे पूर्ण नैसर्गिक वर्तन म्हणता येईल.

(२) माणूस हा असा अपूर्ण, अर्धवट असल्याने त्याने शासन व्यवस्थेचे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ असे तीन तुकडे केले व हे तीन तुकडे एकमेकांवर अंकुश ठेवीत कायदा व न्याय यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण खरंच यात हे तीन तुकडे यशस्वी झालेत का? जगातून अन्याय संपलाय का? हजारो कायदे व लाखो न्यायनिवाडे, बापरे मला धडकीच भरते यांच्या भरतीकडे बघत!

(३) निसर्गाने माणसाला अपूर्ण, अर्धवट ठेऊन त्याच्यापुढे नैसर्गिक वागण्याचे आव्हान उभे केलेय. मानवी वर्तन, मग ते शैक्षणिक असो, आर्थिक असो की राजकीय असो, ते खरोखरच नैसर्गिक आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे. याचे कारण म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरात नैसर्गिक न्याय लपला आहे. 

(४) पण माणसाला निसर्गाशी पूर्णपणे समरस होत पूर्णपणे नैसर्गिक वर्तनातून नैसर्गिक न्याय मिळविणे शक्य झालेय का? त्यासाठी बुद्धीमान  माणसाला निसर्गाचे पूर्ण ज्ञान नको का? पण निसर्गाचे असे पूर्ण ज्ञान कोणत्याच माणसाला नसते आणि मग अशा अर्ध ज्ञानातून सुरू होतो तो सावळागोंधळ व अन्याय! सद्या कोरोनाच्या बाबतीत असेच काहीसे वाटत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०

माणूस कुठे हरवलाय?

माणूस कुठे हरवलाय?

शरणागत होऊन अन्याय सहन करीत जगणे व अन्याय अती झाला की शेवटी अन्यायापुढे आत्महत्या करणे किंवा योद्धा होऊन अन्याय सहन न करता अन्यायाविरूद्ध लढत जगणे व अन्याय अती झाला की शेवटी अन्यायाचा खून करणे या दोन टोकांमध्ये माणसाचे अमूल्य जीवन कुठेतरी हरवलेय. या दोन टोकांमध्येच जगा व जगू द्या या न्याय धोरणाचे कुठे तरी तीन तेरा वाजलेत. या दोन टोकांमध्येच न्यायाने जगण्याचे अर्थकारण व अन्यायाविरूद्ध नेटाने लढण्याचे राजकारण अधांतरी लटकलेय.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०