https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

कोरोनावरील मुद्दा काय आणि कमेंटस काय?

माझा कोरोनावरील मुद्दा काय आणि कमेंटस काय?

लॉकडाऊन मध्ये लोक गेली जवळजवळ चार महिने घरी बसले असताना १०० तून फार तर १० जण कोरोनाबाधित झाले पाहिजेत! इथे जवळजवळ ४०% लोक बाहेर पडले कधी आणि बाधित झाले कधी हा महत्वाचा मुद्दा आहे. ३ अॉगष्ट २०२० लोकसत्तेचा अग्रलेख यावर तर्कशुद्ध विश्लेषण करतोय. तो माझ्या पोस्टवरील कमेंटमध्ये प्रतिमेत दिला.  नुसत्या कोरोनाने एवढे लोक मेलेत का? "कोरोनाचे संक्रमण जास्त पण कोरोना मृत्यू दर कमी" हा मुद्दा उपस्थित केला मी माझ्या पोस्टमधून. पण त्यावरील कमेंटस मात्र भलतीकडेच गेल्या.  माझी पोस्ट लोकसत्तेच्या अग्रलेखाबरोबर न वाचता सरळसरळ मंदबुद्धी वगैरे कमेंटस केल्या गेल्या माझ्या पोस्टवर. अशा कमेंटस फारच विचित्र व मनाला त्रासदायक वाटतात. लोकसत्ता संपादकाने विचारपूर्वक लिहिलेला ३ अॉगष्टचा तो अग्रलेख आहे. ती वृत्तपत्रातील बातमी नाही. त्या संपादकीयावर सुद्धा मंदबुद्धी वगैरे सारख्या विचित्र कमेंटस करता येतील काय? मी कोरोना विषाणूला कमी लेखत नाही. तो अत्यंत घातक विषाणू आहे याबद्दल माझे बिलकुल दुमत नाही. माझा ८२ वर्षाचा अत्यंत जवळचा क्लायंट तथा मित्र गेली चार महिने घरीच ठणठणीत होता. पण बाहेरून एकजण कागदपत्रांवर त्या क्लायंटची सही घेण्यासाठी घरी आला व माझ्या क्लायंटला कोरोना झाला. गेली आठ दिवस तो क्लायंट घरीच क्वारंटाईन होता. पण काल रात्री त्या कोरोना विषाणूने असा चाप दाबला, अशी कळ फिरवली की माझ्या त्या क्लायंट मित्राची तब्बेत अचानक खूप बिघडली. कालच रात्री अॕम्ब्युलन्सने त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. आता  ती महागडी इंजेक्शन्स वगैरे देऊन माझ्या त्या क्लायंट मित्राला बरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मुंबईच्या महापौर यांचा थोरला भाऊ कोरोनाने नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडला. भारताचे गृहमंत्री श्री. अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, तसेच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी आहे. तसेचा बिग बी अमिताभ बच्चन कुटुंबालाही कोरोनाने ग्रासले. ही सगळी मोठी माणसे. पण कोरोना श्रीमंत व गरीब असा भेदाभेद करीत नाही. कोरोनाच्या मगरमिठीतून जे बचावले ते नशीबवान, त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट! मग तुम्ही त्याला त्यांची मजबूत प्रतिकार शक्ती म्हणा किंवा आणखी काही. पण झोपडपट्टीतले गरीब लोक हे त्यांच्या मजबूत प्रतिकार शक्तीमुळे वाचतात व सदनिकांत राहणारे लोक त्यांच्या कमकुवत प्रतिकार शक्तीमुळे मरतात असा सर्वसाधारण अंदाज काढणे चुकीचे आहे. कोरोना विषाणू हा भयंकरच आहे. तो कोणाला कसा नाचवतो हे माहित नाही. मास्क लावणे व शारीरिक अंतर ठेवणे या दोन प्रमुख गोष्टी सद्या तरी आपल्या हातात आहेत. तेंव्हा काळजी घ्या! माझी किमान अपेक्षा एवढीच आहे की, तुमचे समाज माध्यमावरील लिखाण मग ते लेख रूपात असो, विचार वाक्यात असो की कमेंट मध्ये असो ते विचित्र, खोचक, चेष्टेखोर असू नये!

-ॲड.बी.एस.मोरे©४.८.२०२०

P.S.

Yesterday on 3rd August, 2020 night my 82 yrs home quarantined client friend is admitted in hospital because corona triggered his stable  condition. Corona is dangerous. We cannot take it lightly. All of you please take care of yourself and your family!

-Adv.B.S.More (4.8.2020)

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

कोरोना बरोबर जगायला शिका!

कोरोनाला घाबरू नका, त्याच्याबरोबर जगायला शिका!

(१) एक सुप्त नैसर्गिक दबाव (प्रेशर) आहे निसर्गात जो आपल्याला नैसर्गिक गोष्टी पार पाडण्यास भाग पाडतोय. त्या दबावावर आपले नियंत्रण नाही. त्या दबावाखालील नैसर्गिक गोष्टी पार पाडताना आपण फार तर आपल्या नैसर्गिक बुद्धीने त्या गोष्टींचे स्वतःला सोयीस्कर असे व्यवस्थापन करू शकतो. अर्थात आपण या निसर्गाचे व्यवस्थापक होऊ शकतो, धनी नाही.

(२) एक गोष्ट लक्षात घ्या की, जन्म, जीवन व मृत्यू या जीवनचक्रावर आपले नियंत्रण नाही. ते चक्र नैसर्गिक दबावाखाली पुढे सरकते जशी पृथ्वीची स्वतःभोवतीची एक दिवसाची गिरकी व सूर्याभोवतीची एक वर्षाची प्रदक्षिणा! ही चक्रे नैसर्गिक आहेत व ती निसर्गातून निर्माण झालेल्या सुप्त दबावातून कार्यरत आहेत.

(३) नैसर्गिक दबावाखाली पुढे सरकणाऱ्या आपल्या जीवनचक्रात आपल्याला दोन गोष्टींचा सामना प्रामुख्याने करावा लागतो त्या दोन गोष्टी म्हणजे अर्थकारण व राजकारण! या दोन गोष्टी सुद्धा आपल्याला निसर्गाच्या दबावाखाली पार पाडाव्या लागतात. या दोन गोष्टींतील आपला जाणीवपूर्वक केलेला सहभाग हा अल्प असतो. पण तो आपल्याला उगाच खूप मोठा वाटतो. आपल्याला असे वाटते की आपणच हे सर्व करीत आहोत. पण तसे नसते!

(४) अर्थकारण काय आहे तर ती निसर्गातील पोषक गोष्टींशी आपली सुखद देवाणघेवाण आहे. याउलट राजकारण काय आहे तर ते निसर्गातील उपद्रवी गोष्टींविरूद्धचे आपले क्लेशकारक युद्ध आहे. स्वतःच्या जीवनापुरते मर्यादित असलेले आपले संकुचित अर्थकारण व राजकारण हे सूक्ष्म (मायक्रो) असते तर संपूर्ण समाज जीवनालाच नव्हे तर संपूर्ण निसर्गाला गवसणी घालणारे आपले अर्थकारण व राजकारण हे मोठे, विशाल (मॕक्रो) असते. असे विशाल (मॕक्रो) अर्थकारण व राजकारण हे राष्ट्रीय,जागतिक व वैश्विक असते.

(५) पोषक गोष्टींची आर्थिक देवाणघेवाण ही सुखद असते म्हणून ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. याउलट उपद्रवी गोष्टींविरूद्धचे राजकीय युद्ध हे क्लेशकारक असते म्हणून ते नकोसे वाटते. शेवटी राजकारण म्हणजे तरी काय? जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे याला तर राजकारण म्हणतात! पण कोणीतरी अन्याय करायचा आणि मग आपण त्याला जोरात लाथ मारायची हा प्रकार तसा त्रासदायकच ना! पण जीवनात अशा लाथाही माराव्या लागतात हेही जीवनाचे सत्य आहे. म्हणून राजकारणाची माझी सोपी व्याख्या काय तर अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे.

(६) सुखद अर्थकारण व त्रासदायक राजकारण  या दोघांना बरोबर घेऊनच आपले जीवन पुढे पुढे सरकत आहे. जीवनाचे हे पुढे, पुढे सरकणे गोलाकार आहे, चक्राकार आहे. आता आपण ज्या कोरोना विषाणूशी वैयक्तिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर लढा देत आहोत तो लढा हा आपल्या गोलाकार फिरणाऱ्या जीवनातील राजकारणाचाच एक भाग आहे. आपले सुखद अर्थकारण या त्रासदायक राजकारणाने गेली चार ते पाच महिने जवळजवळ बंद पाडले आहे. इतके क्लेशकारक असते हे राजकारण! पण निसर्गापुढे आपला नाइलाज आहे.

(७) आपण नुसत्या सुखद अर्थकारणाला (गुलाबाच्या फुलांना) कवटाळून बसून आपले जीवन जगू शकत नाही. आपल्या जीवनात गुलाबाच्या फुलांबरोबर निसर्गाने भरपूर काटेही पेरले आहेत. हे काटे आपल्याला सतत टोचतच राहणार व ते काढून टाकण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी सतत लढावेच लागणार. म्हणून आपल्याला सुखद अर्थकारण व त्रासदायक राजकारण या दोन्हीही गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे. त्यांच्याबरोबर जगायला शिकले पाहिजे. म्हणून म्हणतोय की, कोरोनाला घाबरू नका, त्याच्याबरोबर जगायला शिका!

-ॲड.बी.एस.मोरे©३.८.२०२०

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

इ-रक्षाबंधन!

इ-रक्षाबंधन!

फेसबुक वरील मैत्रिणी या माझ्या भगिनीच तर आहेत. त्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण आज इ-रक्षाबंधन/अॉनलाईन रक्षाबंधन साजरे करूया. कोरोनाने रक्षाबंधनाचा नवीन इ प्रकार आपल्याला शिकवलाय!

-ॲड.बी.एस.मोरे©३.८.२०२०

कोरोना काळजी घ्या!

वकील व क्लायंटच्या मैत्रीपूर्ण नात्याला कोरोनाने लावलाय घोर!

माझ्या ८२ वर्षाच्या एका जवळच्या क्लायंटला आठ दिवसांपासून कोरोना झालाय. तो क्लायंट घरातच होम क्वारंटाईन आहे. घरातील इतर लोक निगेटिव्ह आहेत. मुंबई महानगरपालिका व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते कोरोना नसलेले नातेवाईक त्या कोरोनाबाधित क्लायंटची नीट काळजी घेत आहेत. पण काल तो घरातच तोल जाऊन पडला. त्याला आता नीट उठबस करता येत नाही. फ्लॅट मोठा असल्याने त्या क्लायंटची घरातच वेगळी सोय करता आली. पण आता पडल्यामुळे त्याला स्वतःला नीट जेवता येत नाही. त्याला कोरोना असल्याने नातेवाईक त्याच्या सोबत राहून त्याला अंघोळ घालणे, जेवण खाऊ घालणे या गोष्टी करू शकत नाहीत. त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे व म्हणून तो सारखा माझ्याशी फोनवर बोलत असतो. त्याच्या काळजीने माझी झोप व जेवण उडालेय. वकील व क्लायंटचे नाते हे असेही मैत्रीपूर्ण असते. पण कोरोनाने या मैत्रीलाच घोर लावलाय. कोरोना संकट हे सत्य आहे. मित्रांनो व मैत्रिणींनो काळजी घ्या!

-ॲड.बी.एस.मोरे©३.८.२०२०


श्री रामकृष्ण हरी!

देवाचे अवतार जगण्याची संस्कृती निर्माण करतात!

(१) निसर्ग ही काय स्वतंत्र, स्वयंभू व सार्वभौम अस्तित्व असलेली एखादी वस्तू (एन्टिटि) आहे काय? निसर्ग म्हणजे काय तर अथांग पसरलेले विश्व, सृष्टी! या विश्वाचा धनी कोण? नास्तिक म्हणतील धनी कोणच नाही. पण एक आस्तिक म्हणून मी म्हणेल की निसर्गाला धनी आहे व तो देव आहे आणि हा देव याच निसर्गात आहे. पण तो अदृश्य आहे. त्याचे अस्तित्व माझ्या तर्काला पटते व त्याची जाणीव माझ्या मेंदूला होते. 

(२) हिंदू धर्म संस्कृतीत ब्रम्हा, विष्णू व महेश असे तीन प्रमुख देव त्यांच्या विशिष्ट कार्यानुसार मानले गेले आहेत. खरं तर ही एकाच देवाची तीन रूपे जशी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही एकाच राज्य संस्थेची तीन रूपे! पण निसर्गाचे निर्मिती कार्य ब्रम्हदेवाने पूर्ण केल्यावर त्याचे कार्य संपले व दोनच कार्ये शिल्लक राहिली आणि ती म्हणजे निसर्गाचे भरण, पोषण, संगोपन हे आर्थिक कार्य व याच निसर्गातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टींचा नाश करून निसर्गाचे संरक्षण हे दुसरे समांतर राजकीय कार्य! 

(३) माझ्या मते, निसर्ग निर्मिती नंतर देवाची श्री  विष्णू व श्री शंकर ही दोनच रूपे पुढे निसर्गात कार्यरत झाली. फायद्याच्या आमिषाने आर्थिक व्यवहार प्रोत्साहित करणारा देव म्हणजे विष्णू व शिक्षेच्या भीतीने राजकीय व्यवहार नियंत्रित करणारा देव म्हणजे महेश हीच ती दोन देव रूपे! म्हणून तर हिंदू संस्कृतीत ब्रम्हदेवाची मंदिरे दिसत नाहीत. पण सगळीकडे विष्णू नारायणाची व शिव शंकराची मंदिरे दिसतात. आता हिंदू धर्म संस्कृतीत प्रथम पूजली जाणारी श्री गणेश देवता ही बुद्धी देवता आहे जी विष्णू व महेश या देवतांना बौद्धिक मार्गदर्शन करते असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात गणेश हे त्या एकमेव देवाचेच श्री शंकराच्या माध्यमातून निर्माण झालेले एक रूप आहे जे रूप एक बौध्दिक मार्गदर्शक म्हणून ब्रम्हदेवाच्या जागी स्थित झालेय आणि म्हणूनच श्री गणेशाची मंदिरेही सगळीकडे दिसतात.

(४) निसर्गाचा धनी हा एकच देव आहे आणि तो जसा अदृश्य आहे तसे गणेश, विष्णू व महेश हे तीन देवही अदृश्य आहेत. या अदृश्य देवांचा निसर्गाच्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक म्हणून या देवांनी प्रत्यक्ष स्वरूपात अवतार घेणे हे आलेच. पण हिंदू धर्म संस्कृतीत गणेशाचे अवतार दिसत नाहीत. श्री गणेशाला त्याच्या मूळ रूपातच पूजले जाते. श्री शंकराचे खंडोबा, ज्योतिबा सारखे काही अवतार आहेत. त्या शंकर किंवा शिव अवताराची मंदिरेही आहेत. पण शंकराला जास्तीत जास्त त्याच्या लिंगाच्या/पिंडीच्या रूपातच पूजले जाते. मानव रूपात अवतार घेऊन धर्म संस्कृती निर्माण करणारा एकच प्रमुख देव आहे  व तो म्हणजे विष्णू नारायण! याच देवाचे दोन प्रमुख मानव अवतार आहेत आणि ते म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण! रामायणातून श्रीरामाचे आयुष्य पहायला मिळते व मनुष्य जीवनाचे उच्च नैतिक तत्वज्ञान कळते तर महाभारतातून श्रीकृष्णाचे आयुष्य पहायला मिळते व गीतेच्या संदेशातून जशास तसे हे व्यावहारिक तत्वज्ञान कळते.

(५) श्री विष्णू नारायणाने श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या मानव अवतारांतून जगाला जगायची संस्कृती दिली. खोल विचार केला तर रामायण व महाभारतातून कळणारी हिंदू धर्म संस्कृती जी सर्व वेद, उपनिषदांचे सार आहे, ही नुसती भारतीय संस्कृती न राहता जागतिक संस्कृती व्हायला हवी. सद्याच्या आधुनिक काळातील दिवाणी व फौजदारी हे दोन प्रमुख व्यावहारिक कायदे जर अभ्यासायचे असतील तर रामायण व महाभारत वाचा. त्यात तुम्हाला या दोन्ही कायद्यांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. हे दोन कायदे आपणास व्यावहारिक जीवन कसे जगायचे याविषयी नीट मार्गदर्शन करतात व त्यातून जगण्याची संस्कृती निर्माण करतात. श्रीराम व श्रीकृष्ण या विष्णू देवाच्या दोन प्रमुख मानव अवतारांनी अनुक्रमे रामायण व महाभारतातून जगण्याची संस्कृती घालून दिलीय असे माझे वैयक्तिक मत आहे.

श्री गणेशाय नमःII श्री नारायणाय नमःII
श्री शंकराय नमःII ओम् शांतीII

श्री रामकृष्ण हरीII

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

टीपः

हिंदू धर्मशास्त्र व पुराण कथा विस्ताराने लिहीत बसलो तर एक मोठे पुस्तक होईल. मी एका छोट्या लेखात हिंदू धर्म संस्कृतीचा सार लिहिलाय. गणेश पुराण, विष्णू पुराण, शिव पुराण किती पुराणे आहेत हिंदू धर्मात? मी अगोदर तीन मुख्य देव घेतले. मग निर्मिती संपल्यावर ब्रम्हदेवाच्या  ठिकाणी गणेशाला आणून बसवले.  केदारनाथ व त्रंबकेश्वर हे अवतार नव्हेत तर ज्योतिर्लिंगे आहेत ही चूक दुरूस्त करतो व खंडोबा बरोबर ज्योतिबा ही अवतार म्हणून लिहितो. पण खंडोबा, ज्योतिबा भारतात किती राज्यात माहित आहेत? म्हणून सर्व देशाला माहित असलेले राम व कृष्ण  या विष्णूच्या दोनच प्रमुख अवतारावर भर दिला आहे. शंकराला लिंग/पिंड स्वरूपी व गणपतीला त्याच्या मूळ रूपातच पूजणे सर्वमान्य आहे. माझे लिखाण हे माझे ओरिजनल स्वतःच्या विचारातून असते व म्हणून प्रत्येक ठिकाणी हे माझे वैयक्तिक मत असे लिहितो. मी रामायण व महाभारतात आधुनिक कायदा पाहतो हे किती लोकांच्या डोक्यात शिरेल? पण मला ती बुद्धी दिलीय. ती तशीच प्रत्येकाला असेल असे नाही. कारण सगळ्यांचे ज्ञान व बुद्धी सारखी नसते.

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

झोपडपट्टीतला कोरोना!

झोपडपट्टीतला कोरोना!

अहो, कोरोना असा का आटोक्यात येत असतो फक्त स्वयसेवी संस्था व डॉक्टरांच्या प्रयत्नांनी? झोपडपट्टीतील लोकांची मजबूत प्रतिकार शक्ती व न घाबरण्याची वृत्ती हे मुख्य कारण आहे या गरिबांच्या वस्तीत कोरोना आटोक्यात राहण्यासाठी. अशा स्वयंसेवी संस्था व डॉक्टर उच्चभ्रू वस्तीत लावून बघा व मग काय फरक पडतोय का ते बघा. वांद्रे येथील बेहराम पाडा किंवा धारावी झोपडपट्टी बघा. शिरायलाही जागा नाही तिथल्या गल्ली बोळात व एका एका छोट्या घरात १० ते १५ माणसे राहतात तिथे. ही खास भारतीय प्रतिकार शक्ती आहे. जगाच्या तुलनेत भारतात एवढी प्रचंड मोठी लोकसंख्या असूनही इथे कोरोना आटोक्यात आहे याचे मुख्य कारण म्हणजे साजूक तुपातले न खाता चटणी भाकरीवर दाटीवाटीने राहून निर्माण झालेली भारतीय प्रतिकार शक्ती! स्वयंसेवी संस्था व डॉक्टर हे पूरक सेवा देतात. पण मजबूत प्रतिकार शक्तीच नसती तर त्या पूरक सेवेचा किती उपयोग झाला असता याचा नीट विचार करावा लोकांनी!

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

पोस्टमन आॕईल!

पोस्टमन रिफाईन्ड ग्राऊन्डनट अॉईल!

१९७८ साली बी.कॉम. झाल्यावर मी सहा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बऱ्याच कंपन्यांत अकौंटस क्लार्क म्हणून नोकऱ्या केल्या. त्या मध्ये दोन टाकी, पायधुनी, मुंबई-४०० ००८ येथील मुस्लिम बहुल विभागात त्या काळात प्रसिद्ध असलेली अहमद मिल्स ही अहमद उमरभॉय यांची एक कंपनी होती. त्या कंपनीचे पोस्टमन ब्रँड हे डबल फिल्टर गोडेतेल त्यावेळी खूप प्रसिद्ध होते. इतर गोडेतेलापेक्षा ते महाग असल्याने ती श्रीमंतांची खरेदी होती. तसेच खोबरेल तेल, साबण हीही त्या कंपनीची अन्य उत्पादने होती. स्टाफ बहुतेक मुस्लिम होता. त्यामुळे माझे सी.ए. बॉसही मुस्लिम होते. मी अकौंटस क्लार्क म्हणून तिथे कामाला होतो. मराठी माणूस असूनही त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. माझ्या चोख कामावर खूश होऊन त्यांनी मला कामाच्या वेळेत थोडी सवलत दिली व इतरांपेक्षा मला चांगली पगारवाढही दिली. ती देताना "स्पेशल ट्रिटमेंट फॉर स्पेशल पर्सन" हे शब्द त्यांनी उच्चारले व ते शब्द माझ्या पुढील आयुष्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी मला खूप उपयोगी ठरले. 

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०