https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १० मार्च, २०२४

बाळूचे लग्न!

बाळूचे लग्न!

बरोबर ३९ वर्षापूर्वी १९८५ सालच्या याच मार्च महिन्यात बाळूचे (माझे) लग्न जमविण्यासाठी काकांनी (माझ्या वडिलांनी) जावईबापू श्री. बी.एन.पवार यांना (आमचे गोव्याचे भाऊजी) गळ घातली. मग आमच्या गोव्याच्या भाऊजींनी त्यांच्या नाते संबंधातील (बहुतेक बिरूताई पवार, पुणे) कुर्डुवाडीचे स्थळ माझ्यासाठी शोधले. याच महिन्यात १९८५ साली माझे वडील (काका) व गोव्याचे भाऊजी माझ्या होणाऱ्या बायकोला (मुलीला) बघण्यासाठी कुर्डुवाडीला गेले. त्यानंतर पुढच्याच महिन्यात (एप्रिल १९८५) मी व पंढरपूरची माझी ताई (भामाताई) मुलीला बघण्यासाठी कुर्डुवाडी येथे गेलो. मी माझ्या होणाऱ्या बायकोला (जी १९८५ ते २०२४ हा ३९ वर्षाचा एवढा मोठा दीर्घकाळ अर्धांगिनी बनून माझ्याशी संसार करीत आहे) एक दोन प्रश्न पाहुणे मंडळींसमोर विचारून लगेच तिला पसंत केली व मुंबईला परत आल्यावर आईवडील व गोव्याच्या भाऊजींमार्फत माझा तिकडे होकार कळविला. लगेच त्याच महिन्यात (एप्रिल १९८५) आलेल्या श्रीराम नवमीला माझी लग्नाची सुपारी फुटली व टिळा लावण्याचा कार्यक्रम पार पडला. मग पुढील महिनाभर (मे १९८५) लगीनघाई आणि ३१ मे १९८५ रोजी भामाताईच्या दारात पंढरपूरला माझे लग्न व्यवस्थित पार पडले.

संसारात भांड्याला भांडे लागतेच त्यात काही नवल नाही. तशी आम्हा पती पत्नीतही क्षुल्लक कारणांवरून भांडणे झाली. पण तरीही संसार मजेत झाला. त्या भांडणांचीही मजा होती. आता उतार वयात आमच्या संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्याने आमची भांडणेच होत नाहीत. एकुलत्या एक मुलीचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन ती तिच्या सासरी आनंदात आहे. जीवन कृतार्थ झाले!

माझ्या या यशस्वी संसारासाठी मी माझे भाऊजी (बी.एन.पवार) यांना खूप धन्यवाद देतो. कारण त्यांनी केलेल्या प्रामाणिक, काळजीपूर्वक प्रयत्नांमुळेच मला माझी अर्धांगिनी मिळाली जिने मला माझ्या गरिबीत, खडतर प्रवासात कायम साथ दिली. दुसरे धन्यवाद माझे दुसरे भाऊजी म्हणजे पंढरपूरच्या भामाताईचे पती कै. विजय धोंडिबा मोरे यांना. माझे लग्न पंढरपूरला त्यांच्याच दारात झाले जरी लग्न अक्षता चंद्रभागा नदीकाठी असलेल्या द्वारकाधीश मंदिरात पडल्या. माझ्या लग्न पत्रिकेत श्री. बी.एन. पवार व श्री. विजय धोंडिबा मोरे या माझ्या दोन मेहुण्यांचीच नावे निमंत्रक म्हणून आहेत. आईवडील तर होतेच पाठीशी. पण ते आता हयात नाहीत.

अशी व्हायची पूर्वीची लग्ने. नाहीतर आता काय ती वधूवर सूचक मंडळे व लग्नाचा बाजार!

-©ॲड.बी.एस.मोरे (बाळू), ११.३.२०२४

ज्येष्ठांनी पुढे पुढे करू नये!

ज्येष्ठांनी उतार वयात पुढे पुढे करू नये!

माझ्या वडिलांच्या पुढारपणाचे खंदे समर्थक असलेल्या विनायक मामाचे काय झाले? जिवंत आहेत पण वय झाल्याने आता ते कालबाह्य झालेत. जमाना बदललाय आणि काळाची सूत्रे नवीन पिढीच्या हाती आलीत. मग जुन्या पिढीला कोण विचारेल? हे सर्वसामान्य ज्येष्ठांचे वास्तव आहे. मोठ्या राजकारणी व भांडवलदार मंडळींचे काय? त्यांचे तरूणपण जसे हटके असते तसे त्यांचे वृद्धत्व पण हटके असते. त्यांच्या ज्येष्ठत्वात सुद्धा वेगळाच रूबाब असतो. ही बडी माणसे निसर्गाने म्हातारी केली तरी समाजातून ती कालबाह्य होत नाहीत हे विशेष. सर्वसामान्य ज्येष्ठ लोकांसाठी आयुष्याच्या आठवणी चघळत बसण्यासाठी ज्येष्ठ कट्टा असतो. तिथे बसण्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो. कारण त्यांच्या जुन्या आठवणींना कोणी विचारत नाही. तरूण पिढी तिच्याच विश्वात गुरफटलेली असते. तिला सामान्य ज्येष्ठांच्या सामान्य आठवणी व जुना अनुभव चालू काळात बिनकामाचा, बिनफायद्याचा वाटतो. यात त्यांचा तरी काय दोष म्हणा. त्यांना तरूण रक्ताचा जोश असतो. पण आपणही पुढे वृद्ध होणार आहोत याचा होश नसतो. पुढचे पुढे बघता येईल असा त्यांचा त्यांच्या वयाला साजेसा असा विचार असतो. जुन्या वस्तू, जुनी माणसे (मोठे राजकारणी व मोठे भांडवलदार सोडून) कालबाह्य होतात. हे वास्तव स्वीकारून ज्येष्ठ मंडळींनी तरूण पिढीच्या जास्त पुढे पुढे करू नये. त्यांना परिपक्व सल्ला देण्याचा तर कधी प्रयत्न करू नये. स्वतःचा आब राखून वृद्धत्व जगावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.३.२०२४

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

विज्ञानातले अध्यात्म!

विज्ञानातले अध्यात्म!

निसर्ग व निसर्गाचे विज्ञान एकीकडे व परमेश्वर व परमेश्वराचे अध्यात्म दुसरीकडे या दोन गोष्टींचे विभाजन करून त्या विरोधाभासी कोणी व का केल्या हे कळायला मार्ग नाही.
काही स्वार्थी लोकांनी ज्याप्रमाणे मानव समाजाची विभागणी अनेक जातीपातीत केल्याचे दिसून येते तशीच काही स्वार्थी लोकांनी एकाच परमेश्वराची विभागणी अनेक देव धर्मांत केली असावी.

खरं तर परमेश्वर संकल्पना वैज्ञानिक आहे. त्यामागे कारण हेच की निसर्ग व निसर्गाचे विज्ञान हे विस्कळीत आहे. या विस्कळीत (विखुरलेल्या) निसर्गाला व त्याच्या विस्कळीत (विखुरलेल्या) विज्ञानाला एका सामाईक साखळीत जोडल्याचे दिसून येते. म्हणून निसर्ग व त्याचे विज्ञान विस्कळीत असले तरी ते सामाईक साखळीमुळे एकजिनसी (एकत्र जोडलेले) आहे हे कळते. यातूनच सगळ्या निसर्गाचा कर्ता करविता परमेश्वर (विश्वकेंद्री शक्ती) असावा ही संकल्पना निर्माण झाली असावी.

विस्कळीत निसर्गाला एकजिनसी करणारा परमेश्वर एकजीव आहे ही संकल्पना स्वीकारली की ती निव्वळ भावनिक न राहता वैज्ञानिक होते. त्यातून निसर्गाचे भौतिक क्रियाकर्म हे निव्वळ भौतिक न राहता ते आध्यात्मिक योगकर्म बनते. त्यातून भौतिक कर्मांना नुसती भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक शिस्तही लागते व इथेच निसर्ग व परमेश्वर आणि विज्ञान व अध्यात्म (परमेश्वराचा धर्म) एक होतात.

जर निसर्ग व परमेश्वर आणि विज्ञान व धर्म (अध्यात्म) या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर मग एकाच परमेश्वराचे अनेक देवधर्मात विभाजन करून विश्वकेंद्री शक्तीची अर्थात परमेश्वराची वेगळी धार्मिक रूपे व कर्मकांडे कोणी व का निर्माण केली?

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.३.२०२४

भयंकर अंधश्रद्धा!

आजच्या आधुनिक काळातही समाजात इतकी अंधश्रद्धा चालू आहे यावर विश्वास बसत नाही. पण कटू वास्तव तेच आहे. बदलापूरला जादूटोण्याच्या संशयावरून एका ७५ वर्षाच्या वृद्धाला निखाऱ्यांवर चालवण्याचा प्रकार अत्यंत अमानुष व लांच्छनास्पद होय. (वाचा बातमी लोकसत्ता दिनांक ८.३.२०२४). या असल्या अघोरी अंधश्रद्ध प्रकाराला आळा घालण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रामाणिक प्रयत्न तर अपुरे पडतच आहेत पण कायदाही अपुरा पडतोय. पण तरीही या असहाय्य वृद्धाला व त्याच्या पिडित मुलीला न्याय देण्यासाठी कोणता देव पुढे आला नाही तर कायदाच पुढे आला. पण याच कायद्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा होणे अजून बाकी आहे. या असल्या प्रवृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. हे सर्व अघोरी प्रकार व समाजातील भ्रष्टाचार, अत्याचार बघत देव शांत बसलाय दुसरे काय! - *ॲड.बी.एस.मोरे*

गुरुवार, ७ मार्च, २०२४

निसर्ग सृष्टीतील व्यवस्था!

निसर्ग सृष्टी व तिच्या कायदेशीर व्यवस्था!

निसर्ग सृष्टीत विविध प्रकारचे निर्जीव व सजीव पदार्थ जसजसे उत्क्रांत होत गेले तसतशी त्यांच्या अंतर्गत नैसर्गिक देवाणघेवाणीची कायदेशीर व्यवस्था तिच्यातील गुणदोषांसह उत्क्रांत होत गेली असावी व तशाच पद्धतीने निसर्ग सृष्टीत माणूस उत्क्रांत झाल्यानंतर माणसांच्या अंतर्गत सामाजिक देवाणघेवाणीची कायदेशीर व्यवस्था तिच्यातील गुणदोषांसह उत्क्रांत होत गेली असावी. या दोन्ही व्यवस्था त्यांच्यातील गुणदोषांसह आता पुढे सरकल्याने त्यांना मागे घेता येत नाही. फार तर त्यांच्यातील दोष जमेल तेवढे कमी करून या दोन्ही  व्यवस्थांमध्ये थोडीफार सुधारणा करीत पुढे जाणे एवढेच उत्क्रांत झालेल्या मानवी बुद्धीला शक्य आहे. पदार्थांची निसर्ग सृष्टी व या सृष्टी मधील या दोन्ही व्यवस्था अशाच आपोआप निर्माण झाल्या की या गोष्टी परमेश्वर नावाच्या गूढ निसर्ग शक्तीने निर्माण केल्या याविषयी नास्तिक व आस्तिक लोकांत वाद आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.३.२०२४

शुक्रवार, १ मार्च, २०२४

BE SELECTIVE!

BE NARROW MINDED AND SELECTIVE IN SELFISH WORLD!

In the world surrounded by parasites & selfish people, do not be so broad minded to become friend of every matter & every person you come across in your life. Be narrow minded, be choosy, be selective only with few things and few persons matching or at least near matching to your high rich quality & high standard mindset by coming down to quality from quantity. Remember the quality response comes only from quality things and quality people. God is one of such high powered high quality friend even if unreacheable & unseen who constantly through higher conscience and higher intelligence of human mind helps quality person in recognising as to what is right and what is wrong, who is friend and who is enemy and what are means of interacting with friends and weapons of fighting against enemies and what are right steps in right direction!

-©Adv.B.S.More, 2.3.2024

प्रयत्नांती परमेश्वर!

प्रयत्नांती परमेश्वर!

फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा हा गीतेचा सिद्धांत नीट समजून घेतला पाहिजे. याचा गर्भितार्थ असा आहे की योग्य ठिकाणी प्रयत्न केले नाहीत तर ते वाया जातात, मग त्या प्रयत्नांचे फळ कसले मिळणार व प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीची तरी कशी प्रचिती येणार?

हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. तसेही मी इतरांचे अनुभव स्वतःचे ज्ञान म्हणून सांगायला भितो व स्वतःच्या अनुभवातूनच बोलतो, लिहितो. आता प्रयत्नांविषयी नीट सांगतो. गरीब, अशक्त, असहाय्य माणसांसाठी प्रयत्नांचे पर्याय खूप कमी असतात. अशी माणसे आहे त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांतच चाचपडत असतात. एक सामान्य माणूस म्हणून असाच चाचपडणारा मीही एक.

धनिक, महाधनिक लोकांचे प्रयत्न भराभर फळाला कारण त्यांना पर्याय भरपूर असतात. पैसा व सत्ता या दोन गोष्टी हातात हात घालून प्रयत्नांचा धुव्वा उडवून देतात आणि मग काय घ्या फळेच फळे! आमच्या सारख्या गरीब माणसांच्या हातात त्या महान परमेश्वराने दोनच गोष्टी ठेवल्यात. एक म्हणजे आहे त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांत जीव ओतून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत चाचपडत बसायचे व या फाटक्या प्रयत्नांना यश दे, फळ दे म्हणून देवाची प्रार्थना करायची.

आम्ही गरीब तुपाच्या गाडग्यात हात घालायचे सोडा करंगळी बुडवायला पण घाबरतो. हे वाक्य गरिबांसाठी चालवलेल्या माझ्या कायदा सहाय्य केंद्रात येऊन मला एकाने बोलून दाखवले व अहो तुपाच्या गाडग्यात निदान करंगळी तरी बुडवा म्हणून सल्ला दिला. पण मला शेवटपर्यंत ती करंगळी काही तुपाच्या गाडग्यात बुडवता आली नाही. त्यातून मी किती मूर्ख वकील आहे हे सिद्ध केले. अहो माझ्या रक्तातच ती वकिली नाही. तसेही आम्हाला लबाडी, भ्रष्टाचार किंवा दांडगाई जमत नाही त्याला आम्ही काय करणार? ही कामे भ्रष्टाचारी व गुंडपुंड लोकांसाठी राखीव आहेत. आम्ही या दोन्ही गोष्टीं पासून फार लांब आहोत. त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांशी चाचपडत आम्ही जे काही प्रयत्न करतो ते प्रामाणिक असतात व त्यातून त्या महान परमेश्वर शक्ती कडून आम्हाला जे काही थोडेफार, तुटपुंजे फळ मिळते त्यात देवाचे नाव घेऊन आम्ही समाधानी असतो.

आता माझ्या वकिलीचेच उदाहरण घ्या ना. कायद्याचे ज्ञान सखोल घेतले. म्हणून तर मोठे उद्योगपती, मोठे व्यापारी यांनी मला कायदा सल्लागार पद बहाल करून जवळ केले. पण फी मात्र ते ठरवतील ती तुटपुंजी. शेवटी जगणे व वकिलीत टिकणे हे मला महत्त्वाचे असल्याने खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी हा अट्टाहास सोडून दिला व म्हणून समाधानी राहिलो. अहो पण, तसे समाधानी राहण्याशिवाय पर्यायच नव्हता ना मला!

आता उतार वयातही तीच समाधानी वकिली करतोय. हृदयविकार घेऊन डोंबिवलीहून मुंबईला दररोज प्रवास करतोय व जरी वयाने, ज्ञानाने ज्येष्ठ वकील झालो तरी त्या पूर्वीच्याच कमी फी मध्ये संध्याकाळची एका तासाची वकिली करतोय. त्यात समाधानी राहतोय. मोठ्या कंपनीचा कायदा सल्लागार असून तरी काय मोठा दिवा लावतोय? आमच्या त्या म्हाडा गिरणी कामगार लॉटरी घराचे साधे काम मला तडीला नेता येईना. आम्हा गरीब वारसांच्या छोट्या व लांबच्या घराला कर्ज देऊन धनिक लोक कशाला त्यांचे पैसे गुंतवतील?

पण मी मात्र चिकट आहे व म्हणून अधूनमधून नेटाने प्रयत्न करतो ज्या प्रयत्नांकडे मोठ्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. याचे कारण काय तर असल्या छोट्या व्यवहारात त्या मोठ्या धनिक लोकांना काही रस नसतो कारण त्यात त्यांचा मोठा फायदा नसतो. असो, तरीही प्रयत्न करीत राहणार कारण प्रयत्नांती परमेश्वर!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.३.२०२४