https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

जशास तसे तत्वज्ञान!

देवाची जपमाळ ओढत बसायचे की जशास तसे वागायचे?

डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत हा नुसता निसर्ग विज्ञानापुरताच मर्यादित नाही तर तो परमेश्वराच्या अध्यात्म धर्माची चिकित्सा करण्यासाठीही उपयुक्त आहे. पुराणे ही घडली की रचली यावर वाद आहेत. इतिहासाला पुरावे आहेत पण पुराणांना पुरावे नाहीत. पुराण कथा या बोध कथा म्हणून घ्यायच्या की सत्य कथा म्हणून घ्यायच्या यावर सत्याचे पुरावे हाच निकष आहे. 

प्रश्न हा आहे की निसर्गापासून परमेश्वराला वेगळा करून त्याची आध्यात्मिक उपासना करण्याची कल्पना प्राचीन, अर्वाचीन समाजात का व कशी निर्माण झाली? मुद्दा हा आहे की सजीव शरीरापासून जसे मनाला वेगळे करता येत नाही तसे निसर्गाच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला किंवा परमेश्वराला वेगळे करता येत नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या वेगळ्या कशा असू शकतात? निसर्गाला विज्ञानात जगायचे व त्याच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला, परमेश्वराला मात्र अध्यात्मात भजायचे, पूजायचे ही मानवी मनाची संभ्रमावस्था नव्हे काय?

पूर्वी लोक टोळ्यांनी जगायचे. नंतर सुद्धा टोळ्या संपल्या नाहीत. सद्या सुद्धा अंडरवर्ल्ड मध्ये अधूनमधून टोळी युद्धे होतच असतात. अशाच काही परकीय टोळ्यांनी आपल्या भारतावर अनेकदा आक्रमणे केली. ब्रिटिश ही सुद्धा व्यापाराचे निमित्त करून हळूच भारतात घुसलेली व नंतर भारतालाच गुलाम करून राज्य केलेली धूर्त परकीय टोळीच होय. मग भले त्याला राष्ट्र हे आधुनिक नाव द्या. अशा या परकीय टोळ्यांचे हल्ले परतवून लावता न आल्याने, त्यांच्या आक्रमणापुढे टिकाव लागू न शकल्याने, बराच काळ त्यांचे गुलाम होऊन रहावे लागल्याने पराभूत मानसिकतेतून गुलाम लोकांकडून निसर्गात परमेश्वराचा दैवी आधार शोधला गेला असावा का? त्यातूनच पुढे सगुण-निर्गुण परमेश्वराची कल्पना उदयास येऊन त्याची आध्यात्मिक उपासना सुरू झाली असावी का? पण हळूहळू पुढे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव जसजसे जनमानसाला कळत गेले तसतसे अध्यात्म धर्मातील अंधश्रद्धा दूर होत जाऊन चांगल्यास चांगले, वाईटास वाईट, म्हणजे जशास तसे हे निसर्ग वास्तववादी तत्वज्ञान उदयास आले असावे का? हे जशास तसे तत्वज्ञान डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतील बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाशी जुळते. जगातील राष्ट्रांनी निर्माण केलेली लष्करे व शस्त्रसज्जता याच बळी तो कानपिळी निसर्ग नियमावर आधारित आहेत. त्यात परमेश्वर व त्याचे अध्यात्म कुठे येते? जशास तसे हे वास्तववादी तत्वज्ञानच आधुनिक नीतीधर्म व कायदेकानून, नियमांचा आधार आहे. आता या नैसर्गिक वास्तवातून परमेश्वराला बाजूला करून त्याची जपमाळ किती ओढत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१.२०२४

फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!

फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!

नाशिकच्या डाॕक्टर बरोबर ठाण्याची महिला एवढया लांबून मैत्री करते काय, जवळीक निर्माण झाल्यावर त्याच्याकडून ५० लाख रूपयांची खंडणी मागते काय आणि डाॕक्टर मित्राने खंडणी देण्यास नकार दिला म्हणून त्याच्या हत्येचा कट रचते काय, सगळेच भयंकर (बातमी, लोकसत्ता दि. २३.१.२०२४). बापरे, मैत्री एवढी भयंकर, खतरनाक असू असते? मी पैशाने जाम गरीब आहे पण तरीही कोणाचे कधी आणि कशावरून डोके फिरेल याचा काही नेम नाही. म्हणून तर मी फेसबुक इनबाॕक्स चॕटिंग टाळतो. ओळख ना पारख आणि मग कशाला हवी ही असली इलेक्ट्रॉनिक जवळीक किंवा आॕनलाईन मैत्री? वैचारिक मैत्री वैचारिक पोस्टसपुरती मर्यादित ठेवलेली बरी. आणि खरंच काही कायद्याचे काम असेल तर, तेही चार पाचशे फेसबुक मित्रांमधून एखाद्या कडून कधीतरी निघते व बऱ्याचदा फुकटात असते, प्रत्यक्ष भेटून केलेले बरे. या समाज माध्यमातून वास्तव लिखाण करताना सांभाळून करावे लागते. काही जणांनी तर माझी ३५ वर्षाची वकिली व ६७ वर्षाचे वय याचा मुलाहिजा न ठेवता मला बिनधास्त शिव्या हासडल्यात माझ्या काही सरळमार्गी वास्तव पोस्टस वरून. असल्या फेसबुकी मित्रांना मी जाम टरकतो आणि घाबरून त्यांना लगेच ब्लॉक करून टाकतो. कशाला उगाच म्हातारपणी नसते लचांड मागे लावून घ्यायचे? 

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४

समाजवाद!

समाजवादात बसवता येईल का भांडवलशाही व साम्यवादाची संमिश्र अर्थव्यवस्था?

संपूर्ण समाजाचा जगण्याचा अधिकार तोच समाजवाद! फक्त एकाच समूहाचा म्हणजे गटाचा असा जगण्याचा अधिकार समाजवाद होऊ शकत नाही. ती कंपूगिरी झाली. कंपूगिरी मक्तेदारी निर्माण करते. समाजवाद हा संपूर्ण समाजाला जगवण्याचा वाद! भांडवलशाही व साम्यवाद एकत्र नांदवायचा म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग समाजवादात अपेक्षित आहे. समाजवादात म्हणजे एकूणच समाज जगवण्याच्या वादात फक्त भांडवलशाही किंवा फक्त साम्यवाद हा एकसूरी, एककल्ली प्रयोग होय. हे माझे वैयक्तिक मत आहे. मतमतांतरे असू शकतात!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.९.२०२०

निसर्गापासून अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?

निसर्गापासून निसर्गाचा अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?

निसर्गापासून निसर्गाचा अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल, मानवी मनाचे अंतरंग हेच तर मानवी शरीराचे बाह्यरंग असतात, शारीरिक हालचालीतून ते प्रकट होतात, मनाचे अंतरंग व शरीराचे बाह्यरंग हे जर वेगळे नाहीत तर निसर्ग व निसर्गाचा अंतरात्मा किंवा परमात्मा हे वेगळे कसे, याच तर्काने निसर्गाचे विज्ञान व अंतरात्म्याचे किंवा परमात्म्याचे अध्यात्म हे वेगळे कसे, आम्ही निसर्ग व निसर्गाचे विज्ञान जगतो पण परमात्मा व त्याचे अध्यात्म पूजतो व त्यातून आम्ही वास्तवालाच काल्पनिक बनवतो! -ॲड.बी.एस.मोरे

भानासाठी ज्ञान!

भानासाठी ज्ञान!

शिक्षण म्हणजे सभोवतालच्या पर्यावरणाचे व त्यात असलेल्या स्वतःचे ज्ञान. ज्ञान हे मर्यादेचे भान देते. शिक्षणातून मिळवलेले ज्ञान हे पैसे कमावण्याचे व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकत नाही. त्या ज्ञानात मिळवलेले विशेष प्रावीण्य, कौशल्य हे पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकते. असे कौशल्य विशिष्ट ज्ञानावर केलेल्या प्रयत्नातून, सरावातून प्राप्त होते. असा सराव म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकार असतो. पण ज्ञानाच्या अनेक शाखा असल्याने त्या प्रत्येक शाखेत सराव करून सर्व शाखांत प्रावीण्य मिळवता येत नाही. अर्थात ज्ञानाच्या खाणीतील सर्व हिऱ्यांना एकटा माणूस पैलू पाडू शकत नाही. तशी अपेक्षा करणे चुकीचे. मुळात शिक्षण व ज्ञानाला पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल समजणेच चूक आहे. सर्व ज्ञान शाखांचे, क्षेत्रांचे थोडे थोडे जुजबी ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान जे सर्वांना असणे आवश्यक असते. हे सामान्य ज्ञान शालेय शिक्षणातून मिळते. या सामान्य ज्ञानाशिवाय माणसाला सामान्य भान येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला निदान इयत्ता दहावी पर्यंत तरी शिक्षण हे असलेच पाहिजे. एवढेही शिक्षण नसलेली माणसे राजकारणात यशस्वी होऊ शकतात पण कधी तर समाज बहुसंख्येने अशिक्षित असेल तर. बहुसंख्य जनता जर सुशिक्षित असेल तर अशिक्षित (म्हणजे कमीतकमी सामान्य ज्ञानाचे शालेय शिक्षण नसलेल्या) माणसांची राजकारणात डाळ शिजणार नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की मर्यादा भानासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण ते पैसा व सत्ता मिळविण्याचे भांडवल होऊ शकत नाही. मी अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण, नंतर बी.काॕम. चे पदवी शिक्षण, पुढे पदव्युत्तर कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षण व शेवटी कायद्याचे पदव्युत्तर एलएल.बी. शिक्षण एवढे उच्च शिक्षण घेतले. पण या एवढ्या ज्ञान पसाऱ्यातून मी उदरनिर्वाहासाठी वकिली व्यवसाय स्वीकारला व तो करताना कायदा ज्ञानाच्या विशाल सागरातील काही थेंबांवरच प्रभुत्व मिळवले, त्यात कौशल्य प्राप्त केले. ते कौशल्य माझ्या संपूर्ण ज्ञानाच्या एक टक्का (१%) एवढेही नाही. अर्थात माझे एक टक्का ज्ञान एवढेच माझे पैसा कमावण्याचे भांडवल झाले. त्या भांडवलावर मी फक्त माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सामान्य गरजांपुरता थोडाच पैसा कमवू शकलो. ही झाली अर्थकारण क्षेत्राची गोष्ट. राजकारण क्षेत्रात मला गतीच नाही कारण त्या क्षेत्रात मला कौशल्य प्राप्त करता आले नाही. त्यामुळे राजकीय सत्तेचा मला गंधही नाही. ज्ञानाने माझ्यावर खूप उपकार केलेत. मी सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे मी जास्त उंच उड्या मारू नयेत याचे भान मला सतत याच ज्ञानाने दिले व मला भानावर ठेवले. थोडक्यात, मर्यादा भानासाठी ज्ञान हाच ज्ञानाचा मुख्य हेतू एवढेच मला या लेखातून सांगायचे आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.१.२०२४

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे!

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे लागते!

श्री. रविंद्र मालुसरे, अध्यक्ष, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, आपण रामायणावर हे छान लिहिले आहे ते मी समाज माध्यमावर शेअर करतो. पण धर्माचे राजकारण करणाऱ्यांना हे कितपत रूचेल? सद्या वाल्मिकी रामायणाचाच गाजावाजा होताना दिसत आहे. तुलसीदासांचे रामायण पण आहे. भृगू ऋषी यांनी पण टीकात्मक रामायण लिहिले आहे असे कुठेतरी वाचण्यात आले. पण बहुसंख्य लोकांना धार्मिक भावनांवर डोलताना भौतिक वास्तवाचा अर्थात आकाशात उडताना पृथ्वीवरील जमिनीचा विसर पडताना दिसतो. लोकांच्या याच भावनिक मानसिकतेचा राजकारणी लोक फायदा उठवतात व धर्माला राजकारणाच्या दावणीला बांधतात. पण राजकारण्यांचा हा धूर्तपणा लोकांना कळत नाही. धर्माचा राजकारणासाठी वापर होऊ नये असे कितीही वाटले व ते असंविधानिक असले तरी तसा वापर होतोच. यावर रोखठोक बौद्धिक विचार मांडण्याची सोय नाही. कारण धर्मभावनेने बेभान  झालेले लोक अंगावरून चवताळून येतात. त्यांना वास्तव लेखन आवडत नाही. मला सुद्धा समाज माध्यमावर फार सांभाळून लेखन करावे लागते. खूप बौद्धिक कष्टाने मिळवलेले वकील पद व वयाचे ज्येष्ठत्व याची बिलकुल पर्वा न करता ओळख पाळख नसलेले पण स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्र झालेले फेसबुकी मित्र अशा स्पष्ट लिखाणावर सरळ सरळ शिव्या द्यायला कमी करत नाहीत. मला असे अनुभव अधूनमधून येतात. मग खालची बौद्धिक पातळी असलेल्या चुकून माझे मित्र झालेल्या लोकांना मला ब्लॉक करावे लागते. म्हणून तर मी माझे फेसबुक खाते निवडक वैचारिक मित्रांसाठी मर्यादित ठेवले आहे. आपले लेखन छान असते. धन्यवाद!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१.२०२४
https://poladpuraasmita.blogspot.com/2024/01/blog-post_21.html

व्यायाम व जीवन योग!

झोप अर्थात निद्रितावस्था ही जिवंत शरीर व मनाची तात्पुरती विश्रांती होय, झोप पुरी झाल्यानंतर सुरू होते जागृतावस्था ज्यात शरीराच्या शारीरिक हालचालीचा व मनाच्या भावनिक, बौद्धिक क्रियेचा व्यायाम सुरू असतो, दृढ निश्चय, मनोनिग्रह हा मनाच्या व्यायामाचा प्रमुख भाग असतो, शारीरिक व मानसिक व्यायाम ही समांतर प्रक्रिया आहे व दोन्ही व्यायाम प्रक्रियेत संतुलन हाच जीवन योग असतो! -ॲड.बी.एस.मोरे