https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

जास्त खोलात जाऊ नये!

जास्त खोलात जाऊ नये!

सागराची खोली व आकाशाची उंची मोजण्याचा प्रयत्न करू नये. अती खोलात जाऊन विचार करू नये. कारण जास्त खोलात गेल्यास हाती गाळच येतो. निसर्ग विज्ञानाच्या जास्त खोलात गेले तर अंतराळ पोकळीत चाचपडत बसावे लागते व ईश्वर अध्यात्माच्या जास्त खोलात गेले तर ईश्वर तर सापडतच नाही पण वेड लागण्याची पाळी येते. त्या अनाकलनीय ईश्वराचे ध्यान केल्यास मिथ्या कल्पना वाढतच जातात व आध्यात्मिक शांती मिळण्याऐवजी माणूस भ्रमिष्ट होण्याची शक्यता असते. मग काय करावे? तर भानात यावे व वास्तवाचे ध्यान करून त्यात रमावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

DO NOT TRY TO EXPLAIN OR CONVINCE!

DO NOT TRY TO EXPLAIN OR CONVINCE!

Do not try to explain or convince in general and/or in specific your thoughts on science and/or law with people who are not learned even in basic framework of science and/or law.

First of all such people will not understand what you say and even if they understand little bit of your saying they will trouble you by asking you hundreds of questions without any fee consideration in return or may even oppose you with their half knowledge.

So be professional and do not get emotional about peoples ignorance in what you have learned by your hard and smart intellectual exercise and efforts.

If you are truly learned in any branch of science and/or law then just practice that branch of knowledge by sharing said valuable knowledge with the people who really need your said knowledge and your said professional service in said branch of knowledge in return for your reasonable fee consideration and that is all!

-©Adv.B.S.More, 10.1.2024

तुलना नको!

तुलना नको!

प्रसिद्ध वकील श्री. राम जेठमलानी ९४ वयापर्यंत सुप्रीम कोर्टात वकिली करीत होते. आताही मुंबई हायकोर्ट व इतर कोर्टात नव्वदी पार केलेले वकील कोर्टाच्या केसेसमध्ये सक्रिय आहेत. पण वय लांबले व जीवन सक्रियता लांबली म्हणून निसर्ग कोणाला सोडत नाही. शेवटी निसर्ग त्याचा इंगा दाखवतोच. गानसम्राज्ञी लता मंगेशकर दीर्घकाळ जगल्या व दीर्घकाळ गात होत्या. पण एक काळ असा आला की त्यांना त्यांनी गायलेलेच एखादे गाणे थोडे गायला विनंती केली तरी त्या हात जोडून नम्रपणे नकार द्यायच्या. देवानंद खूप वर्षे जगला व चित्रपट क्षेत्रात सक्रिय राहिला पण शेवटी त्याला माघार घेऊन गप्प बसावेच लागले. प्रसिद्ध किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा तो आवाज किती गोड व खणखणीत होता. नुसते ऐकतच रहावे. पण तो आवाजही हळूहळू निसर्गाने क्षीण केला. निसर्ग हा असा वयानुसार प्रत्येकाला गप्प बसवतो. जास्त वय जगणे म्हणजे वय लांबणे व ऐंशी, नव्वदी नंतरही सक्रिय राहता येणे हे निसर्गाचे अपवाद आहेत. त्या अपवादांची तुलना सर्वसाधारण नियमांशी करू नये. अपवाद हे शेवटी अपवादच असतात. उगवता सूर्य निरागस बाळासारखा, दुपारचा तळपता सूर्य तरूणांच्या सळसळत्या रक्ताचा व त्यांच्या प्रचंड मोठ्या उत्साहाचा तर मावळतीचा सूर्य आता पूर्वीसारखी हालचाल जमत नाही म्हणून केवळ नाईलाजास्तव गप्प बसाव्या लागणाऱ्या वृद्धांचा. काही वृद्धांच्या मावळतीच्या कळा थोड्याफार लांबतात म्हणून त्यांनी सत्तरीतच गळाटलेल्या वृद्धांसमोर त्यांचे ते आभासी तरूणपण व त्यातला तो आभासी आनंद नाचवू नये. त्यांची पण ती गप्प बसण्याची वेळ येणार असते. एका तरूण फेसबुक मित्राने माझी थोडी मरगळ बघून मला एक सूचना केली की मी गाण्यावर नाच करून आपले तारूण्य दाखवित व्हिडिओ बनवणाऱ्या ग्रुपला जाॕईन व्हावे. माझ्या वैचारिक पोस्टस न वाचताच असले सल्ले देणाऱ्या फेसबुकी मित्रांना काय म्हणावे. मी ज्येष्ठ वकील आहे. माझा वकील मित्रांचा व मनसे पक्षातील महाराष्ट्र सैनिकांचा मोठा ग्रूप आहे. पण तिथे वयानुसार मी जमेल तेवढाच सक्रिय असतो. या समाज गटांना संलग्न असणे हे ज्ञानाचे व सन्मानाचे काम आहे. गाणी गाणे किंवा नाच करणे या गोष्टी माझ्यासाठी नाहीत हे यांना कळत कसे नाही? तात्पर्य काय की कोणीही कोणाशी तुलना करू नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

रविवार, ७ जानेवारी, २०२४

अनाकलनीय ईश्वर म्हणून का वाटेल ते करायचे?

अनाकलनीय ईश्वर कळत नाही म्हणून वाटेल ते करायचे का?

अनाकलनीय निर्मिकाने (ईश्वराने) रचलेली सृष्टीची भौतिक रचना (विज्ञान या रचनेला निसर्गाची उत्क्रांती म्हणते) विधायक आहे. त्या निर्मिकाच्या मनात आले तर एका क्षणात तो या सृष्टी रचनेचा विनाश करू शकतो. पण त्या निर्मिकाची मानसिकता विधायक आहे, विध्वंसक नाही. ही साधी गोष्ट काही अर्धवट, मूर्ख माणसांना कळत नाही. म्हणून तर निर्मिकाच्या नावानेच विस्फोटक विधाने करून समाजमनाला अशांत करून ते पेटवण्याचा अधार्मिक उद्योग अशी माणसे करीत असतात. निर्मिकाचा धर्म कोणता हे नीट समजून न घेता स्वतःसाठी सोयीच्या असलेल्या धर्मात त्या निर्मिकाला (ईश्वराला) बसवून त्याच्या नावाने विध्वंसक कृत्यांचे समर्थन करायचे, तसेच अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बुवा, बाबा, बायांचे व तसेच वरून धर्म आतून अधर्म करणाऱ्या समाजकंटकांचे राजकीय फायद्यासाठी उदात्तीकरण करायचे ही असली मानवी कृत्ये बघून त्या अनाकलनीय निर्मिकाला काय वाटत असेल हे सुद्धा अनाकलनीय! प्रश्न हा आहे की अनाकलनीय ईश्वर कळत नाही म्हणून वाटेल ते करायचे का?

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.१.२०२४

एकटक रोखून बघू नका!

एकटक रोखून बघणे किती त्रासदायक?

एखाद्या व्यक्तीकडेच नव्हे तर एखाद्या वस्तूकडे, गोष्टीकडे जास्त वेळ अर्थात एकटक रोखून बघत बसणे हे किती त्रासदायक होऊ शकते हा पुन्हा माझ्या चिकित्सक वृत्तीचा विषय. पण मला आता कळून चुकलेय की माझी ही असली चिकित्सक वृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिच्या खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती हा सुद्धा एकटक रोखून बघण्याचाच एक प्रकार. या वृत्तीचा माझ्या मलाच त्रास होतो हेही खरे आहे. याला अती विचारी वृत्ती असेही म्हणता येईल. अती तिथे माती या म्हणी नुसार अती विचार सुद्धा मनात तणाव निर्माण करून स्वतःलाच त्रास देतात.

एखाद्या गोष्टीकडे सहज बघायला निसर्गाची हरकत नसते, पण एकटक रोखून बघायला निसर्ग हरकत घेतो. सहज बघणे म्हणजे मवाळ, अहिंसक नजरेने बघणे व एकटक रोखून बघणे म्हणजे कडक, हिंसक नजरेने बघणे. उदा. एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर बोट ठेवणे, दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच जास्त डोकावून बघणे किंवा उगाच फालतू लुडबूड करणे, एखाद्या गोष्टीकडे अती चिकित्सक नजरेने म्हणजे अती खोलात जाऊन बघणे ही एकटक रोखून बघण्याची काही उदाहरणे आहेत.

निसर्ग नियमानुसार एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडे एकटक रोखून बघितले तर त्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडून सहज, तालबद्ध देवाणघेवाण होण्यासाठी योग्य प्रतिसाद, सहकार्य मिळणे तर सोडाच पण समोरून एकदम हिंसक प्रतिक्रिया मिळू शकते. उदा. एखादा पुरूष एखाद्या स्त्री कडे जास्त वेळ एकटक रोखून बघत बसला तर त्या स्त्री कडून त्या पुरूषाच्या थोबाडीत बसू शकते. यालाच एकदम हिंसक प्रतिक्रिया म्हणतात. एकटक रोखून बघणे हेच या प्रतिक्रियेला कारण असते.

जगाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर जगाकडे सहज बघणे फायद्याचे असते. जगाविषयी अती अपेक्षा, अती लालच हा जगाकडे एकटक रोखून बघण्याचाच प्रकार. या अशा एकटक  रोखून बघण्यातूनच मनात अहंभाव, मोह, मद, मत्सर, क्रोध, भ्रष्टाचार, व्यभिचार व हिंसाचार या नकारात्मक गोष्टी तयार होतात. मी तर असे म्हणेल की, जगाकडे, इतरांकडे एकटक रोखून बघणे हे तर चुकीचे आहेच, पण स्वतःच स्वतःकडे एकटक रोखून बघणे हे सुद्धा चुकीचे आहे. जगाकडे सहज बघून जगाचा सहजानंद घेतला पाहिजे हे मला म्हातारपणी उशिरा सुचलेले शहाणपण!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.१.२०२४

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

मानवी जीवन सर्वोत्तम का?

मानवी जीवन सर्वोत्तम का?

निसर्गाची भौतिकता अशुद्ध आहे, प्रदूषित आहे. निसर्गाच्या भौतिकतेत हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे, व्यभिचार आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे. निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेने भारलेले मानवी शरीर व मानवी मन भोगी आहे, वासनांध आहे. हे भौतिक मानवी मन त्याच्या  आतल्या अंतरात्म्याचे म्हणजे शुद्ध आध्यात्मिक आत्म्याचे अस्तित्वच नाकारते. अंतरात्म्याचे अस्तिव नाकारणारे भौतिक मन निसर्गातील  परमात्म्याचे म्हणजे शुद्ध चैतन्याचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व नाकारते आणि म्हणून अशा भौतिक मनाला परमेश्वराच्या शुद्ध अध्यात्माचे वावडे असते. मानवी जीवन सर्वोत्तम आहे कारण अनेक मूलद्रव्ये, अनेक पदार्थ यांची भेसळ असलेल्या निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेतही शुद्ध अंतरात्म्याची व त्याबरोबर शुद्ध परमात्म्याची आध्यात्मिक अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी परमेश्वराने फक्त मनुष्यालाच दिली आहे, इतर पदार्थ, प्राणीमात्रांना नाही ज्यांना या शुद्ध चैतन्याची जाणीवही नसते. जिथे जाणीवच नाही तिथे अनुभूती कसली?

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१.२०२४

धरले तर चावते, सोडले तर पळते!

धरले तर चावते, सोडले तर पळते!

धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी खालील अवस्था बघू.

(१) तरूणपणी सहजसोप्या व वजनाला हलक्या वाटणाऱ्या गोष्टी पुढे वय वाढल्यावर अवघड व वजनाला जड होऊनही त्या कराव्या लागणे, नीट न पेलवणाऱ्या, नीट न झेपणाऱ्या गोष्टी व्यवस्थित जमत नसूनही हळूहळू का होईना पण बळेच कराव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(२) जगाच्या पाठीवर कुठेही जा पण तीन दृश्ये जरूर दिसतील. एक लहान मुलांना हाताला धरून शाळेत सोडणारे त्यांचे तरूण आईवडील, दोन पैसा व जमलेच तर सत्ता प्राप्त करण्यासाठी जोशात (होश कमी असला तरी) धावणारी तरूण, प्रौढ मंडळी व तीन सक्रिय जीवनाच्या व्यासपीठावरून खाली उतरून लांब कुठेतरी कोपऱ्यात बसलेली (ज्येष्ठ नागरिक कट्टा) वृद्ध मंडळी. कुठेही जा, ही तीन दृश्ये हमखास दिसतात. गौतम बुद्धांना आजारी माणूस, म्हातारा माणूस व प्रेत अशी तीन दृश्ये दिसली होती जी त्यांच्या आत्मचिंतनास कारणीभूत ठरली. पण इथे मी नमूद केलेली तीन दृश्ये सर्वांना नेहमीच दिसतात पण त्यावर किती जण आत्मचिंतन करतात? पण शेवटी हे दृश्य वास्तव आहे, ते टाळता येत नाही, मग त्यावर काय आणि कसले आत्मचिंतन करायचे असा सर्वसाधारण विचार लोक करतात. हे वास्तव कंटाळवाणे वाटले तरीही ते स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(३) कोणालाही निसर्ग विज्ञानाच्या व समाजशास्त्राच्या अनेकविध ज्ञान शाखांत प्रावीण्य मिळवून त्या सर्व ज्ञान शाखांत तज्ज्ञ होता येत नाही त्यामुळे परावलंबीत्व येते. आंधळे पणाने डाॕक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए. सारख्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवता येत नाही व सामान्य ज्ञानाच्या जोरावर त्यांचे सल्ले सर्वसामान्यांना  खोडूनही काढता येत नाहीत. मग सुरू होते ती मनात चूक की बरोबर यांची घालमेल. तरीही हे इतरांवरील हे परावलंबीत्व स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(४) होश असो नसो पण तरीही जोशात असलेल्या तरूण, प्रौढ पिढीबरोबर वृद्धांना नीट मिसळता न येणे व त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्तही होता न येणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(५) वृद्धापकाळात शरीराचे अवयव झिजून झिजून थकलेले, खचलेले असल्याने पूर्वीचा आत्मविश्वास रहात नाही, तरीही डळमळीत झालेल्या आत्मविश्वासाने जीवनाची गाडी म्हातारपणी चालवावी लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(६) राजकारणी कितीही भ्रष्ट वागले तरी त्यांच्याशिवाय कायद्याचे राज्य पुढे सरकत नाही म्हणून गरजेपोटी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून द्यावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(७) कायद्याच्या राज्यात कायद्याने न्याय मिळण्यासाठी न्यायालयांत कितीही वेळ लागला व तारीख पे तारीख असे कितीही वेळा झाले तरी शेवटी गरजेपोटी अंतिम न्यायासाठी न्यायालयांत सारख्या खेटा घालाव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

मला जवळून कळलेल्या धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव देणाऱ्या काही मोजक्या अवस्था मी वर दिल्या आहेत. जिवाची घालमेल करणाऱ्या आणखी अशा बऱ्याच इतर अवस्था असू शकतील.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४