https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

मनाचे स्वातंत्र्य!

मेंदूमनाचा स्वयंनिर्णयाचा अधिकार अर्थात मनाचे स्वातंत्र्य!

सजीवांचे मेंदूमन खरंच स्वतंत्र आहे काय? मनुष्य हाही सजीव प्राणी असल्याने त्याच्या मेंदूमनालाही हा प्रश्न लागू आहे. माझ्या मते मनुष्याचे मेंदूमन निसर्गाचे निसर्गमन व मानव समाजाचे समाजमन या दोन बाह्य मनांच्या कचाट्यात सापडलेले आहे. तसे पाहिले तर समाजमन हाही निसर्गमनाचाच एक भाग पण त्याचा एक वेगळाच प्रभाव मानवी मेंदूवर असल्याने सोयीसाठी समाजमनाला निसर्गमनापासून थोडे वेगळे धरले आहे.

मूलभूत नैसर्गिक गरजांपुरत्या मर्यादित असलेल्या आवश्यक गोष्टी कोणत्या हे निसर्गमन मानवी मेंदूला शिकवत असते तर या आवश्यक गोष्टींच्या पलिकडे जाऊन उपभोगता येणाऱ्या सुखकर व अतीसुखकर अशा चैनीच्या गोष्टी कोणत्या व त्यासाठी नैसर्गिक मूलभूत गोष्टींचा विकास कसा करायचा हे समाजमन मानवी मेंदूला शिकवत असते.

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या म्हणजे आवश्यकतेपुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टी (नेसेसिटीज) व विकासाच्या अत्युच्च पातळीवर असलेल्या श्रीमंती थाटाच्या चैनीच्या गोष्टी (लक्झरीज) यांच्या बरोबर मध्ये शरीर, मनाला सुखसमाधानी, सोयीस्कर, आरामशीर ठेवणाऱ्या गोष्टी (कम्फर्टस) असतात. या कम्फर्ट झोन मध्ये मानवी मन स्थिर राहिले तर ते आनंदी व शांत राहते. यालाच मानवी मेंदूमनाचा मध्यम मार्ग असे म्हणता येईल. मानवी मेंदूमनाचे एक जैविक घड्याळ आहे. या जैविक घड्याळाच्या सेकंद काट्याला गरज, मिनिट काट्याला आराम व तास काट्याला चैन असे म्हणता येईल का? मला वाटते वेळेचे हे वर्गीकरण गरज, आराम व चैन या अनुक्रमे तीन गोष्टींना लागू होणार नाही कारण त्यांचा संदर्भ वेगळा आहे. पण गरज, आराम व चैन या तीन गोष्टींचे चक्र मेंदूमनात सतत गोल फिरत असते एवढे मात्र नक्की. माझ्या मते मानवी शरीर, मनाला सुख व शांती मध्यम म्हणजे आराम अवस्थेत लाभू शकते व या अवस्थेतच मेंदूमन स्थिर रहायला हवे. निसर्ग व समाज या दोन्हींमध्ये परमेश्वर असेल तर त्यालाही गरज व चैन यांच्या बरोबर मधल्या म्हणजे स्थिर अशा आराम अवस्थेत सुख व शांती लाभत असेल. म्हणून या मध्यम अवस्थेतच मानवी मनाचा परमेश्वर मनाशी (परमात्म्याशी) सुसंवाद निर्माण होऊन दोन्ही मने एकजीव होऊ शकतात असे मला वाटते.

प्रश्न हा आहे की, निसर्गमन व समाजमन या दोन बाह्य मनांच्या प्रभावाखाली सतत असणाऱ्या मानवी मनाला स्वयंनिर्णयाचा अधिकार किती? कधीकधी मनाच्या चैनीचा प्रश्नच नसतो. शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी जर आवश्यक म्हणून न करता त्या चैनीच्या गोष्टी म्हणून केल्या म्हणजे आवश्यक गोष्टींचा (गरजांचा) मर्यादेपलिकडे, प्रमाणाच्या बाहेर अतिरेक केला तर गरजांचे रूपांतर चैनीत होऊन गरजाच त्रासदायक होऊ शकतात. शेवटी विचारपूर्वक स्वयंनिर्णय घेण्याचा मानवी मनाला मर्यादित का असेना पण अधिकार आहेच. याबाबतीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनाला पटतात. त्यांच्या मते, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य व मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१२.२०२३

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

मनाला आवरा!

गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

मन म्हणजे हलकी हवा तर शरीर म्हणजे जड पृथ्वी. प्रश्न असा आहे की जड पृथ्वीने तिच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणावर राज्य करावे की त्या हवेच्या आवरणाने पृथ्वीवर राज्य करावे? अर्थात मनाने शरीरावर राज्य करावे की शरीराने मनावर राज्य करावे?

यासाठी अंतराळ म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. अंतराळ म्हणजे एक प्रचंड मोठी निर्वात म्हणजे हवा नसलेली पोकळी. या निर्वात पोकळीने ग्रह, ताऱ्यांच्या जड भौतिक विश्वाला झेलले आहे ज्यात भौतिक हवाही आली जिला वजन आहे म्हणजे तीही जडच. हवा जड ग्रहांच्या तुलनेने हलकी आहे पण तिलाही वजन असल्याने तीही तशी जडच असा निष्कर्ष निघतो. जड भौतिक विश्वाला अंतराळातील निर्वात पोकळी झेलतेय हे खरेच आश्चर्यकारक, चमत्कारिक आहे. जड भौतिक विश्वाला निसर्ग मानले तर अंतराळातील निर्वात पोकळीला की त्या पोकळीत असलेल्या अदृश्य अनाकलनीय शक्तीला परमेश्वर मानावे काय आणि मानले तर त्या पोकळीतील त्या परमेश्वरापर्यंत आध्यात्मिक भक्तीने पोहोचता येईल काय? अंतराळ पोकळीने झेललेल्या जड भौतिक विश्वाला वेळ काळाचे बंधन असल्याचे दिसून येते. पण असे वेळ काळाचे बंधन पोकळीतील त्या परमेश्वराला असेल का किंवा तो परमेश्वर कोणत्याच बंधनात नसेल का? हे सगळे प्रश्न या जर तर च्या तार्किक गोष्टी ज्यांना तर्काशिवाय कसलाही आधार नाही. खरं तर आपण त्या पोकळीत जन्मत नाही, जगत नाही व मरतही नाही. आपले सगळे काही आपल्या जड पृथ्वीच्या जड वातावरणातच होते.

आता जड पृथ्वीवरून ती ज्याच्या बंधनात आहे त्या जड वेळेचा विचार करूया म्हणजे आपल्यालाही वेळेचे बंधन समजेल. जड पृथ्वीला जड वेळेने बंधनात ठेवलेय म्हणून तर पृथ्वीवरील सर्व जड पदार्थ (ज्यात माणसेही आली) जड वेळेच्या बंधनात आहेत. अमूक अमूक वेळेत (२४ तास) पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते व अमूक अमूक काळात (वेळेचा मोठा भाग म्हणजे ३६५ दिवसांचा काळ) पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार प्रदक्षिणा घालते. तिच्या या कर्माचे व त्या कर्माच्या वेळेचे बंधन तिच्यावर कोणी बरे घातले? मध्यवर्ती सूर्याने की त्या अंतराळ पोकळीतील अदृश्य शक्तीने म्हणजे परमेश्वराने? काही कळायला मार्ग नाही. आपण काही गोष्टी (परमेश्वर सुद्धा) आपल्या तर्काने मानतो. पण या तर्काला कसलाच वैज्ञानिक पुरावा नाही. तर्काने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक नाही का?

पृथ्वीचे वेळेचे एक घड्याळ आहे जे तिने माणसांसहीत पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर लादलेय. माझ्यावर वेळेचे बंधन मग मी तुम्हाला सोडतेय होय असेच ती अप्रत्यक्षपणे तिच्यावरील व तिच्यातील पदार्थांना म्हणते. या वेळेच्या (घड्याळाच्या) बंधनात गोल फिरत राहून दिवसांमागून दिवस कधी जातात व आपण कधी म्हातारे होतो हे कळतच नाही. वेळेचे घड्याळ आपल्या अवस्थांत बदल करते. ते आपल्याला बालपण, तरूणपण व म्हातारपण दाखवते व त्याबरोबर जन्म मरणाचा फेराही दाखवते जो फेरा परमेश्वराची कोणी कितीही आध्यात्मिक भक्ती केली तरी चुकता चुकत नाही.

माणसांनी वेळेच्या बंधनात राहून कालानुरूप जीवनकर्मे करीत राहणे मी समजू शकतो. पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेड लागल्यासारखे नुसते धावत रहायचे हे मला पसंत नाही. मी माझ्या गरजा कमी केल्या आणि या घड्याळांच्या काट्यांनाच माझ्या बंधनात ठेवले म्हणजे वेळेची दादागिरी चालू दिली नाही. तुम्हीही हे करू शकता जर तुम्ही तुमच्या गरजा कमी केल्या तर. विकासाच्या नावावर तुम्ही तुमच्या गरजा सतत वाढवतच राहिला तर तुम्हाला तुमचे आयुष्य पुरणार नाही. तुम्हाला शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.१२.२०२३

वेळेला मुठीत ठेवा!

गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

मन म्हणजे हलकी हवा तर शरीर म्हणजे जड पृथ्वी. प्रश्न असा आहे की जड पृथ्वीने तिच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणावर राज्य करावे की त्या हवेच्या आवरणाने पृथ्वीवर राज्य करावे? अर्थात मनाने शरीरावर राज्य करावे की शरीराने मनावर राज्य करावे?

यासाठी अंतराळ म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. अंतराळ म्हणजे एक प्रचंड मोठी निर्वात म्हणजे हवा नसलेली पोकळी. या निर्वात पोकळीने ग्रह, ताऱ्यांच्या जड भौतिक विश्वाला झेलले आहे ज्यात भौतिक हवाही आली जिला वजन आहे म्हणजे तीही जडच. हवा जड ग्रहांच्या तुलनेने हलकी आहे पण तिलाही वजन असल्याने तीही तशी जडच असा निष्कर्ष निघतो. जड भौतिक विश्वाला अंतराळातील निर्वात पोकळी झेलतेय हे खरेच आश्चर्यकारक, चमत्कारिक आहे. जड भौतिक विश्वाला निसर्ग मानले तर अंतराळातील निर्वात पोकळीला की त्या पोकळीत असलेल्या अदृश्य अनाकलनीय शक्तीला परमेश्वर मानावे काय आणि मानले तर त्या पोकळीतील त्या परमेश्वरापर्यंत आध्यात्मिक भक्तीने पोहोचता येईल काय? अंतराळ पोकळीने झेललेल्या जड भौतिक विश्वाला वेळ काळाचे बंधन असल्याचे दिसून येते. पण असे वेळ काळाचे बंधन पोकळीतील त्या परमेश्वराला असेल का किंवा तो परमेश्वर कोणत्याच बंधनात नसेल का? हे सगळे प्रश्न या जर तर च्या तार्किक गोष्टी ज्यांना तर्काशिवाय कसलाही आधार नाही. खरं तर आपण त्या पोकळीत जन्मत नाही, जगत नाही व मरतही नाही. आपले सगळे काही आपल्या जड पृथ्वीच्या जड वातावरणातच होते.

आता जड पृथ्वीवरून ती ज्याच्या बंधनात आहे त्या जड वेळेचा विचार करूया म्हणजे आपल्यालाही वेळेचे बंधन समजेल. जड पृथ्वीला जड वेळेने बंधनात ठेवलेय म्हणून तर पृथ्वीवरील सर्व जड पदार्थ (ज्यात माणसेही आली) जड वेळेच्या बंधनात आहेत. अमूक अमूक वेळेत (२४ तास) पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते व अमूक अमूक काळात (वेळेचा मोठा भाग म्हणजे ३६५ दिवसांचा काळ) पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार प्रदक्षिणा घालते. तिच्या या कर्माचे व त्या कर्माच्या वेळेचे बंधन तिच्यावर कोणी बरे घातले? मध्यवर्ती सूर्याने की त्या अंतराळ पोकळीतील अदृश्य शक्तीने म्हणजे परमेश्वराने? काही कळायला मार्ग नाही. आपण काही गोष्टी (परमेश्वर सुद्धा) आपल्या तर्काने मानतो. पण या तर्काला कसलाच वैज्ञानिक पुरावा नाही. तर्काने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक नाही का?

पृथ्वीचे वेळेचे एक घड्याळ आहे जे तिने माणसांसहीत पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर लादलेय. माझ्यावर वेळेचे बंधन मग मी तुम्हाला सोडतेय होय असेच ती अप्रत्यक्षपणे तिच्यावरील व तिच्यातील पदार्थांना म्हणते. या वेळेच्या (घड्याळाच्या) बंधनात गोल फिरत राहून दिवसांमागून दिवस कधी जातात व आपण कधी म्हातारे होतो हे कळतच नाही. वेळेचे घड्याळ आपल्या अवस्थांत बदल करते. ते आपल्याला बालपण, तरूणपण व म्हातारपण दाखवते व त्याबरोबर जन्म मरणाचा फेराही दाखवते जो फेरा परमेश्वराची कोणी कितीही आध्यात्मिक भक्ती केली तरी चुकता चुकत नाही.

माणसांनी वेळेच्या बंधनात राहून कालानुरूप जीवनकर्मे करीत राहणे मी समजू शकतो. पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेड लागल्यासारखे नुसते धावत रहायचे हे मला पसंत नाही. मी माझ्या गरजा कमी केल्या आणि या घड्याळांच्या काट्यांनाच माझ्या बंधनात ठेवले म्हणजे वेळेची दादागिरी चालू दिली नाही. तुम्हीही हे करू शकता जर तुम्ही तुमच्या गरजा कमी केल्या तर. विकासाच्या नावावर तुम्ही तुमच्या गरजा सतत वाढवतच राहिला तर तुम्हाला तुमचे आयुष्य पुरणार नाही. तुम्हाला शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.१२.२०२३

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

निसर्ग विचार करायला भाग पाडतो!

निसर्ग विचार करायला भाग पाडतो!

मूलद्रव्ये, निर्जीव पदार्थ, वनस्पती, सूक्ष्मजीव, प्राणी, माणसे (माणूस हा उच्च वर्गीय प्राणी आहे) ही सर्व निसर्गाची वैविध्यपूर्ण साधनसंपत्ती पृथ्वीवर कायम तीच राहते. तिच्यात एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत सतत परिवर्तन होत राहते एवढेच काय ते वैशिष्ट्य या साधनसंपत्तीचे आहे. या परिवर्तनशील साधनसंपत्ती भोवती पुन्हा पुन्हा जन्मणारी, पुन्हा पुन्हा जगणारी, पुन्हा पुन्हा मरणारी माणसे बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन अवस्थांतून पुढे पुढे जात गोलाकार फिरत राहतात. हे निसर्गाचे भले मोठे गोल चक्र आहे त्यात निसर्ग माणसांना गोल गोल फिरवत राहतो.

या वैविध्यपूर्ण साधनसंपत्तीशी योग्य आंतर समन्वय साधता आला तर माणसांचे भरणपोषण होऊन जगणे सुसह्य होते आणि या साधनसंपत्ती बरोबर आंतर विरोध निर्माण झाला तर याच साधनसंपत्ती कडून विविध आजार निर्माण होऊन जगणे असह्य होते. मानव समाजातही जेंव्हा आंतर मानवी आंतर विरोध (उदा. धर्म, जातपात इ.) निर्माण होतो तेंव्हा समाज स्वास्थ्य बिघडते.

हे आंतर समन्वयी भरणपोषणाचे व आंतर विरोधी आजार, संघर्षाचे कर्म बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन अवस्थांतून जात माणसे गोल गोल फिरत आयुष्यभर करीत शेवटी त्यांच्या मृत्यूने निसर्गातच नष्ट होतात (म्हणजे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत परिवर्तीत होतात).

या गोल जीवनचक्रातून माणसांना गोल गोल फिरायला लावणारा निसर्ग (की निसर्गात सुप्त व गुप्त असलेला तो अनाकलनीय परमेश्वर) त्याची ही अजब करामत माणसांना दाखवताना मानवी बुद्धीला विचार करायला भाग पाडतो. या अनिवार्य नैसर्गिक विचार प्रक्रियेमुळे काही गोष्टी कळण्यास मदत होत असली तरी त्यामुळे मन अस्थिर होऊन चीड  वैताग सुद्धा येतो या अनिवार्य विचार प्रक्रियेचा कारण विचारांच्या लाटा जबरदस्तीने, बळेच थांबवता येत नाहीत मग मनाचा कितीही निश्चय करा.

उतार वयात तर थांबता न थांबणारी ही विचार प्रक्रिया खूपच त्रासदायक होते कारण मेंदूत आयुष्यभराच्या कटू गोड आठवणी साठलेल्या असतात व त्या जबरदस्तीने विचार करायला भाग पाडतात. इतकेच काय झोपेत स्वप्नेही निर्माण करतात. त्यात तुम्ही जर उच्च शिक्षित व अनुभव संपन्न अर्थात ज्ञानसंपन्न व प्रगल्भ असाल तर ही विचार प्रक्रिया जरा जास्तच जोरात धावते व उतार वयात शरीराचे अवयव थकलेले, क्षीण झालेले असल्याने ती जास्तच त्रासदायक होते. अशा परिस्थितीत एखादी कृती करताना मनात दुसरा विचार येणे किंवा दुसरेच विचार मनात चालू असणे व त्यामुळे समोर असलेल्या कृतीवर नीट लक्ष नसणे व कृती पूर्ण झाल्यावर फलिताकडे अपूर्ण, असमाधानी, शंकेखोर मनाने एकटक बघत राहणे म्हणजे त्याच गोष्टीत बराच वेळ अडकून राहणे अशा कार्यात अडथळा आणणाऱ्या गोष्टी घडत राहतात. निसर्ग विचार करायला भाग पाडतो व त्यातून तो मनाला त्रासही देतो. पण तरीही मेंदूत विचार येणे हेच तर जिवंतपणाचे लक्षण आहे ना!

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.१२.२०२३

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

कळतंय पण वळत नाही!

कळतंय पण वळत नाही!

पदार्थांचे गुणधर्म व त्यांना नियंत्रित करणारे निसर्ग नियम व माणसांचे स्वभाव व त्यांना नियंत्रित करणारे समाज नियम या गोष्टी आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतात. त्यामुळे पदार्थ असोत की माणसे त्यांच्यात आपण पूर्ण किंवा आमूलाग्र बदल घडवून आणू शकत नाही. हे सर्वजण तसेच चालणार, तसेच वागणार व तसेच राहणार हे नीट ध्यानात ठेवायचे. जोपर्यंत तुमच्यात मध आहे तोपर्यंत मधमाशा तुमच्या भोवती गोंगावणार व मध संपला की तुम्हाला सोडून जाणार. गुळाला चिकटणारे मुंगळेही याच स्वार्थी स्वभावाचे. माणसे या स्वार्थी स्वभावाला अपवाद नाहीत. निःस्वार्थ मायाप्रेम, निःस्वार्थ सेवा या गोष्टी मानव समाजात दिसत असल्या तरी त्या अत्यंत दुर्मिळ असतात. वापरा आणि फेकून द्या असाच स्वार्थी जगाचा सर्वसाधारण नियम आहे. या सर्वच गोष्टी कटू सत्य असल्या तरी त्यांच्यातील दोष शोधत बसण्याऐवजी त्यांना कसा व किती प्रतिसाद द्यायचा हे आपल्या मनालाच ठरवावे लागते. खरं तर आपल्याला न जुमानणाऱ्या, न पटणाऱ्या या स्वार्थी गोष्टींना प्रमाणाबाहेर महत्व व प्रतिसाद देण्यात आपणच चूक करीत असतो. आपल्या मनाचा हा दोष ओळखून तो वेळीच दुरूस्त केला पाहिजे. आपल्या मनात जर काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होत असेल तर दोष त्या गोष्टींपेक्षा त्यांना प्रमाणाबाहेर महत्व व प्रतिसाद देणाऱ्या आपल्या मनाचा असतो. आपल्या मनाचा हा दोष आपणच सुधारू शकतो. त्यासाठी कोणत्याही मानसतज्ज्ञाची गरज नसते. काही गोष्टी टाळता येत नसल्या तरी त्यांना किती प्रतिसाद द्यायचा याचे प्रमाण मनाला नीट कळले पाहिजे. त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा हे मनाला माहित असले तरी तो किती द्यायचा हे मनाला नीट कळत नाही आणि जरी कळले तरी नीट वळत नाही. कळतंय पण वळत नाही असाच मनाचा तो सावळागोंधळ असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१२.२०२३

तू मोठा, मी छोटा?

तू मोठा, मी छोटा?

बाजारात फिरताना दुकानदारांकडून खूप शिकण्यासारखे असते. छोटा दुकानदार कधी स्वतःच्या छोट्या दुकानाची तुलना मोठ्या दुकानाशी करीत बसत नाही. स्वतःच्या छोट्या  दुकानालाच ईश्वरी देणगी समजून त्याच दुकानाच्या दारात उभा राहून स्वतःचा व्यापार, धंदा वाढविण्याचा जमेल तेवढा प्रयत्न करतो व मिळेल त्यात खूश राहतो. मी मात्र त्याची वकिली भारी, माझी वकिली साॕरी अशी तुलना करीत बसलो. तो धंदा आहे, माझा उच्च शैक्षणिक वकिली व्यवसाय आहे असे म्हणत माझ्या तथाकथित उच्च शिक्षित बुद्धीचे तुणतुणे वाजवत बसलो आणि मिळालेय त्यातला आनंद घालवून बसलो. चलो, देर है दुरूस्त है!

-©ॲड.बी.एस.मोरे,१७.१२.२०२३

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

तर काय करायचे?

तर काय करायचे?

बुद्धी शिवाय भौतिकतेच्या सागरात पोहणे शक्य नाही व भावनेशिवाय आध्यात्मिकतेच्या आकाशात विहार करणे शक्य नाही. पण या दोन्ही गोष्टी एकमेकांना चिकटलेल्या असल्याने यांची सांगड कशी घालायची हा पुन्हा जड बुद्धीचाच प्रश्न. आध्यात्मिक श्रद्धा भावनेच्या मदतीने जड बुद्धीचे हे सांगड काम सहज, हलकेफुलके होत असेल तर मग आध्यात्मिक श्रद्धा भावना महत्वाची ठरते. पण जड बुद्धीच्या भौतिक मार्गात आध्यात्मिक श्रद्धा भावना अडथळा आणत असेल किंवा श्रद्धा भावनेच्या आध्यात्मिक मार्गात जड बुद्धी अडथळा आणत असेल तर काय करायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१२.२०२३