https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

माझे लेखन विज्ञान, धर्म व कायदा या तीनच गंभीर विषयांवर व त्यांच्या अंतर्गत संबंधाच्या तुलनात्मक अभ्यासावर आधारित संशोधनपर, सखोल चिकित्सक व विश्लेषक असते म्हणून ते सगळ्यांना रूचत नाही. जगातील बाकी सगळ्या गोष्टी या तीन प्रमुख विषयांशी निगडीत व त्यांच्यात समाविष्ट आहेत. पण लोकांना मूलभूत गोष्टींऐवजी त्यांच्या भोवती फिरणाऱ्या वरवरच्या गोष्टीत रूची असल्याचे दिसते. त्यामुळे माझा मूलभूत अभ्यास, विचार व लेखन कुठे आणि कोणाबरोबर शेअर करायचे हा माझा कायमचा प्रश्न व सततची खंत राहिली आहे. कारण या मूलभूत विषयांत रूची असणारी माणसे माझ्या संपर्क व संगत क्षेत्राच्या बाहेर फार दूरवर आहेत ज्यांच्यापर्यंत मी ना कधी पोहोचू शकलो ना आता उतार वयात कधी पोहोचू शकेन. सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

DIVIDE AND RULE POLICY OF NATURE!

DIVIDE AND RULE POLICY OF NATURE!

The divide and rule policy is not man oriented. This is Nature oriented policy. The Nature made world is divided in diverse elements and matters having diverse properties. In fact, journey of Nature and its expanded world is from division of the united matter (say God particle) by way of big bang explosion of such united matter/particle.

The journey of Nature is from division to re-union in cyclic rotation. This may be called as Nature's law of re-union. But this re-union is from division and it is the basic fact of Nature. We the people experience this law of re-union in our birth, life and death cycle & in our daily cyclic routine from waking up from sleep, working and then going to sleep. We are compelled to follow this process by force of Nature's law of re-union. But as we grow old by our aging process (which is also part of Nature's law of re-union) we become weak and tired in our day to day working.

Our retirement from our employment/engagement in our cyclic life business has its origin in this cyclic tiredness. The fact remains that the Nature follows its policy of divide and rule in application of its law of re-union moving in cyclic rotation from division of world in diverse elements and matters.

-©Adv.B.S.More,13.12.2023

विज्ञानाला जोड धर्म व कायद्याची!

विज्ञानाला जोड धर्म व कायद्याची!

निसर्गधर्माचे वैज्ञानिक निसर्गनियम निसर्गातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थांना (ज्यात उच्च जैविक व पर्यावरणीय पातळीवरील प्रचंड मोठी बुद्धिमत्ता असलेली माणसेही आली) समसमान लागू नाहीत तर विविध पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनुसार वेगवेगळ्या नियमांनी लागू आहेत. त्यामुळे माणसाला लागू असलेला वैज्ञानिक निसर्गधर्म कोणता म्हणजे माणसाचे नैसर्गिक वर्तन काय व कसे या प्रश्नापासून मानवी बुद्धीच्या वैचारिक समजेचा आंतर्बाह्य संघर्ष सुरू होतो. याच वैचारिक संघर्षातून निसर्गात देव म्हणजे परमेश्वर आहे की नाही हा विचार पुढे आला. प्राचीन काळी मानवी बुद्धीची वैज्ञानिक समज आताइतकी प्रगल्भ नसल्याने देवाचे अस्तित्व मान्य करून त्या देवाची मनधरणी करणारा आध्यात्मिक धर्म निर्माण झाला. पृथ्वीवरील अनेक प्रदेशांत असे अनेक धर्म निर्माण झाला. यावर वैज्ञानिक चिंतन करून देवाचे अस्तित्व नाकारणारा गौतम बुद्धांचा नास्तिक धम्म (धर्म नव्हे) नंतर निर्माण झाला. आंतरमानवी वैचारिक संघर्षातून आता आस्तिक धर्म विरूद्ध नास्तिक धम्म असे वाद समाजात सुरू आहेत. या वादात निसर्ग पडत नाही की मानलेला देव पडत नाही. कारण हा मानवाच्या वैचारिक संघर्षातून निर्माण झालेला वाद आहे.

पूर्वी जगातील मानवी जीवनशैली धर्माला बांधली होती. पण धर्माने जगात हाहाकार माजवला तेंव्हा मानव समाजाला धर्माऐवजी निसर्ग  विज्ञाननिष्ठ कायद्याची व त्यावर आधारित शासनव्यवस्थेची गरज निर्माण झाली. पण अजूनही कायदा आधारित शासन व्यवस्थेला धर्माच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

प्रथमतः ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निसर्गाचे विज्ञान व त्याचा प्रत्यक्ष उपयोग करणारे तंत्रज्ञान हीच जगातील मूलभूत गोष्ट आहे. धर्म (किंवा धम्म) व कायदा या दोन्ही गोष्टी मूलभूत विज्ञानाला पूरक गोष्टी आहेत. या पूरक गोष्टी माणसाच्या भावना व बौद्धिक तर्क यावर मुख्यतः आधारित असल्याने  त्या शंभर टक्के वैज्ञानिक असू शकत नाहीत कारण यातील काही गोष्टी केवळ मानवी भावना व तर्क यावर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक पुराव्याचा ठोस आधार नाही. तसे असते तर धर्मावरून वाद निर्माण झाले नसते व कायद्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी कनिष्ठ न्यायालये ते उच्च न्यायालये ते सर्वोच्च न्यायालय अशी न्यायालयीन उतरंड समाजाला निर्माण करावी लागली नसती.

भावनिक-तार्किक तत्वज्ञान जेंव्हा मूलभूत विज्ञानाला वरचढ होते तेंव्हा मूलभूत विज्ञानाची वाट लागते. मग आभासी कल्पनांची तर गोष्टच नको. भावनिक-तार्किक तत्त्वज्ञान असो की आभासी कल्पना असोत, या गोष्टी मनात घोळत राहिल्याने समोरच्या नैसर्गिक वास्तवावरून वैज्ञानिक दृष्टी (मूळ लक्ष) हटली की अपघात, दुर्घटना होण्याचा धोका असतो.

निसर्गाचे वैज्ञानिक नियम हेच जगाचे मूलभूत सत्य आहे जे धर्म (किंवा धम्म) व कायदा यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, नव्हे ते जगात सर्वश्रेष्ठ आहे. विज्ञानाला पूरक असलेल्या धर्म व कायदाया गोष्टींपासून मानवी जीवनशैली (संस्कृती) आकार घेते. पण या पूरक गोष्टी विज्ञानापासून वेगळ्या केल्या की त्या डोईजड होतात व मानवी जीवन अवघड करून टाकतात. त्यांचे अती लाड अंगाशी येतात. कायदा भ्रष्टाचारी होऊ शकतो व संस्कृती सोयीनुसार बदलते हे सत्य लक्षात ठेवले तरी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

एखाद्या गडगज श्रीमंत असलेल्या उद्योगपतीच्या किंवा पाॕवरबाज राजकीय नेत्याच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या मैदानात तयार केलेल्या राजमहालात असले की सार्वजनिक सभांमधून किंवा टी.व्ही. सारख्या माध्यमांतून एकमेकांवर जबरी टीकेचे आसूड ओढणारी राजकीय मंडळी, मंत्री, संत्री त्यांच्या खास रूबाबात अशा ठिकाणी जमा होतात तेंव्हा या मंडळींचे एकमेकांना आलिंगन देणे, खळखळून हसत एकमेकांशी हातात हात घालून गोड बोलणे, हळूच कानात हसत हसत काहीतरी बोलणे वगैरे गोष्टी खरंच बघण्यासारख्या असतात. सामान्य माणसांना या असल्या राजेशाही थाटाच्या लग्न सोहळ्यासाठी ना कसले निमंत्रण असते ना आत प्रवेश असतो. काही माध्यमांतून अशा सोहळ्याचे दर्शन सामान्यांना घडते आणि त्यांचे डोळे दिपून जातात. डोळे दिपणे म्हणजे थक्क होणे. पण एकमेकांशी तावातावाने भांडणारी ही मंडळी अशा कार्यक्रमात एवढी दिलखुलास कशी होऊ शकतात याचे मात्र फार आश्चर्य वाटते. धर्म, जातपात काय किंवा इतर मुद्दे काय, लोकांच्या मेंदूचा किती भुगा करतात ही मंडळी आणि पुन्हा अशा सोहळ्यात एकत्र येऊन हसतात काय, खिदळतात काय! समाजातील सर्वसामान्य माणसांना वाकुल्या दाखवण्याचाच हा प्रकार नव्हे काय?

पण मी या राजकीय मंडळींना असे नावे ठेवले तर हीच मंडळी वकील म्हणून मला म्हणतील की "तुम्ही वकील मंडळी नाही का तुमच्या अशिलांच्या वतीने न्यायालयात तावातावाने युक्तिवाद करता व पुन्हा कोर्टाच्या कँटिनमध्ये एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारीत बसता किंवा वकिलांच्या खास मेळाव्यात न्यायाधीश मंडळींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून छान हितगुज करता, अगदी तसेच आमचे आहे". शेवटी ही राजकीय मंडळी आहेत. वेळ आली तर वकिलांचे सुद्धा तोंड बंद करतील मग सामान्य लोकांची तर गोष्टच विसरा. प्रश्न हा आहे की सर्वसामान्य लोकांनी यांचे हे असले विरोधाभासी वागणे निमूटपणे बघून ते सहजपणे घ्यायचे काय आणि ते किती घ्यायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

ढ पण चालू विद्यार्थी?

ढ पण चालू विद्यार्थी?

काही हुशार मुले ही जरा जास्तच हुशार असतात. ती ढ मुलांबरोबर संगनमत करून ढ मुलांच्या ऐवजी त्यांच्या वतीने स्वतःच परीक्षा देतात आणि ढ मुलांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करतात. याला प्रोक्झी तोतयेगिरी म्हणता येईल. अशी प्रकरणे आमच्या काळातही घडत होती व वर्तमान काळातही अशा बातम्या माध्यमातून येत असतात. ही अशी तोतयेगिरी हुशार विद्यार्थी ढ मुलांच्या मैत्रीसाठी किंवा त्यांच्या प्रेमापोटी करीत नाहीत तर अशा ढ मुलांकडून मिळणाऱ्या पैशासाठी करतात. अशाप्रकारे गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशासाठी हे अती हुशार विद्यार्थी नुसत्या विद्या देवतेशीच  गद्दारी करीत नाही तर अशा गैरव्यवहारात पैशाचा गैरवापर करून लक्ष्मी देवतेचाही अपमान करतात. लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. त्यामुळे ती याप्रकारच्या अप्रामाणिक विद्यार्थ्यांना कायम साथ देईलच असे नसते. पण विद्या देवता मात्र बौद्धिक मेहनतीचा आळस करणाऱ्या या ढ विद्यार्थ्यांना कायम लांबच ठेवते. तोतयेगिरी करणारे अती हुशार विद्यार्थीही कायद्याच्या कचाट्यात कधीतरी सापडतातच. एकवेळ लक्ष्मी देवता या ढ विद्यार्थ्यांना काही काळ जवळ करेल पण विद्या देवता मात्र अशा ढ विद्यार्थ्यांना तिच्याजवळ जराही फिरकू देत नाही. पण काही ढ मुले पुढे त्यांच्या चालूगिरीमुळे आयुष्यात नुसता भरपूर पैसाच नाही तर इतर बरेच काही मिळवतात व स्वतःला यशस्वी म्हणवून घेत समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवतात आणि विशेष म्हणजे समाजही अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांचा उदो उदो करण्यात कमीपणा मानत नाही. पण कोणता समाज? ज्या समाजात अप्रामाणिक व भ्रष्ट लोकांचा भरणा जास्त असतो अशाच समाजात अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांची चलती असते. पण तसे तर दुधात पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणारा दुधवालाही भरपूर पैसे मिळवून समाजात निर्लज्जपणे राहतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

मैत्रकुल!

मैत्रकुल!

मैत्रकुल ही निराधार मुलामुलींना शिक्षण व निवारा देण्याचा प्रयत्न करणारी संस्था. या संस्थेच्या कल्याण येथील वसतीगृहात मी करोना लॉकडाऊन काळात भेट दिली होती व तिथल्या निराधार मुलामुलींशी चर्चा केली होती. तिथे मला असे कळले की या संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. किशोर जगताप हे दोन्ही पायांनी अपंग असल्याने व्हिलचेअर वर असतात. संस्थेचे चांगले कार्य बघून मी खरंच भारावून गेलो होतो. पण अचानक दि. ११.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात मैत्रकुल संस्थेचे संस्थापक श्री. किशोर जगताप यांच्याविरूद्ध विनयभंग व पोक्सो (बाल लैंगिक शोषण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली. याची योग्य ती पोलीस व न्यायालयीन चौकशी होईलच. पण एका चांगल्या सामाजिक कार्याला असले गालबोट लागणे हा मनाला धक्का होता. प्रामाणिकपणे समाजकार्य करणे हे तसेही आता धोक्याचे झाले आहे. कारण समाजातील विघ्नसंतोषी व भ्रष्टाचारी लोकांना प्रामाणिक या शब्दाचेच वावडे आहे. जेवढ्यास तेवढे असा हा कलियुगी जमाना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३

रविवार, १० डिसेंबर, २०२३

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

शाळा, काॕलेजातील मुले सहलीच्या निमित्ताने पाण्याजवळ गेली आणि खोलीचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात, नदीत, तलावात बुडाली, अशा बातम्या अधूनमधून माध्यमात येतात व मन सुन्न होते. खरंच पाणी आणि आगीशी खेळ नको. पट्टीचे पोहायला येत असेल तर पाण्यात व अग्नीसुरक्षा तंत्रात तज्ञ असाल तर आगीत उतरावे न पेक्षा नको. तसेच अनोळखी ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी एकट्याने जायचे दिवसाही धाडस नको, मग रात्रीची तर गोष्टच सोडा. आठवा ती मुंबईतील ओसाड शक्ती मिल कंपाऊंड मध्ये एकटे जाण्याचे धाडस केल्याने महिला पत्रकारावर बलात्कार झाल्याची भयानक घटना. आठवा ती एका मुलुंडच्या जंगलात सकाळी एकटे जाण्याचे धाडस केल्याने वकिलाला बिबट्या वाघाने खाल्ल्याची काही वर्षापूर्वीची भयानक घटना. मी साधारण १९६२ ते १९६६ या पाच वर्षाच्या काळात पंढरपूरला १ ली ते ५ वी इयत्तेत शाळेत शिकत होतो तेंव्हा तिथल्या चंद्रभागा नदीच्या पाण्यात किनाऱ्यापासून छातीभर पाण्यापर्यंत चालत जाऊन तिथेच पोहायचा प्रयत्न करायचो. पोहण्यात तरबेज असणारी कोळ्याची पोरे पुढे खोल नदी पात्रात बिनधास्त पोहायची. त्यांचे ते पोहणे बघून मला एकदा सहज पुढे जाण्याचा मोह झाला. पण एक पाऊल पुढे टाकल्याबरोबर पाणी गळ्याला लागले. मग घाबरून लगेच उलटा होऊन पोहत मागे फिरलो. कसले ते पोहणे. नुसतेच कडेकडेने तरंगणे. नदीच्या गावात पंढरपूरी राहूनही मी पोहायला शिकलो नाही. कोणी मला शिकवलेही नाही. मात्र तरीही ती चंद्रभागा नदी उनाडक्या करण्याचे माझे आवडते ठिकाण होते. पण तरीही जपून वागलो  म्हणून वाचलो. मस्ती कधीकधी जिवावर बेतते हे मात्र खरे. अगदी साठ वयात मी लोणावळ्याला एका रिसाॕर्ट मध्ये वरून गोल गोल चक्राकार फिरत खाली छातीभर पाण्यात घसरत येण्याचा आगाऊपणा केला होता. खाली पाणी छातीभर असले तरी वरून गोल चक्राकार फिरत येताना वेग भलताच वाढतो व त्या जोराने माणूस त्या पाण्यात खाली जाऊन गोल गटांगळ्या खात राहतो. मला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीनंतर मृत्यूच्या दाढेतला तो फार भयंकर अनुभव ६० वयात लोणावळा रिसाॕर्ट मध्ये आला. याला कारण माझी निर्बुद्ध मस्ती. बुद्धी दिलीय ना त्या निसर्गाने म्हणा की परमेश्वराने मग ती नीट वापरा आणि भलते सलते धाडस करू नका. निसर्गाचे विज्ञान वरवर दिसते तेवढे खरंच सोपे नाही. त्यातील काही भागाचेच तंत्र तुम्ही आयुष्यात अवगत करू शकता. विज्ञानाच्या सर्वच शाखांत तुम्ही तज्ञ होऊ शकत नाही. मग जिथे अज्ञान आहे किंवा अर्धवट ज्ञान आहे तिथे भलते सलते धाडस करू नका. देव अशावेळी वाचवायला येत नाही. कारण असे संकट तुम्ही निर्बुद्धपणे स्वतःहून ओढवून घेतलेले असते जे निसर्गाच्या नियमांविरूद्ध असते. मित्रांनो, जीव खूप मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.१२.२०२३