https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

हिंदू धर्म एकता!

हिंदू धर्म किती हिंदू धर्मियांना कळलाय व कळतोय? हिंदू नुसते नावाला बहुसंख्य आहेत भारतात पण हिंदू धर्माच्या मूळ वैज्ञानिक स्वरूपाविषयी व सगुण निर्गुण परमेश्वराविषयी किती हिंदूंना खरे ज्ञान आहे? मूळ एकमेव परमेश्वर व नंतर मूळ देवदेवता, त्यांचा मूळ अर्थ बाजूला ठेवून बरेच हिंदू लोक काही बुवा, बाबांनाच परमेश्वराचे अवतार समजून त्यांची भक्ती करू लागले. नुसती अंधश्रद्धा आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही की कुठे एकवाक्यता नाही. कशी एकता राहणार हिंदू धर्मियांत? -©ॲड.बी.एस.मोरे

निसर्गधर्म व देवधर्म!

निसर्गधर्म व देवधर्म यात फरक हा की निसर्गधर्म हा निसर्गाच्या भौतिक नियमांचा व्यावहारिक भाग आहे जो भाग व्यावहारिक बुद्धीशी निगडित आहे, तर देवधर्म हा निसर्गाच्या मुळाशी परमेश्वर आहे या श्रद्धेवर आधारित असलेल्या देवभक्ती व देव प्रार्थनेचा आध्यात्मिक भाग आहे जो भाग आध्यात्मिक भावनेशी निगडीत आहे ज्याला भौतिक नियमांच्या काटेकोर बंधनात बांधता येत नाही, बुद्धी व भावना या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याने निसर्गधर्म व देवधर्म किंवा थोडक्यात विज्ञान व धर्म एकत्र आहेत! -©ॲड.बी.एस.मोरे

जय श्री हनुमान!

जय श्री हनुमान!

माझ्या पौराणिक माहिती प्रमाणे श्री हनुमान हा श्री महादेवाचा/शंकराचा अवतार तर श्रीराम व श्रीकृष्ण हे  श्रीविष्णूचे अवतार. रामायणात श्री हनुमान श्रीरामाचे भक्त (अर्थात शिवशंकरानेच केली श्रीविष्णूची भक्ती) म्हणून सतत दिसतात तर महाभारतात काही प्रसंगात भिमाचे गर्वहरण करताना व कौरव पांडव युद्धात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथ्य करीत असताना त्या रथावर श्रीहनुमान दिसतात. श्रीविष्णूचा अवतार श्री परशुराम यांचा क्षत्रिय विनाशाचा अधर्म रोखण्यासाठीही श्री हनुमान यांनी आपली शक्ती दाखवत परशुरामाला युद्धात हरवले व झाडाला बांधून ठेवले. म्हणजे श्रीविष्णूलाच शिवशंकराने हरवले. अधर्माविरूद्धची/अन्यायाविरूद्धची ही सतत चालणारी लढाई आहे. आधुनिक काळातील कायदा हाही अन्यायाविरूद्धचा धर्म आहे. असे म्हणतात की श्रीविष्णू व शिवशंकर या देवांचे व तसेच लक्ष्मी व पार्वती या देवतांचे अवतार त्यांचे अवतार कार्य संपले की संपुष्टात आले. पण शिवशंकराचा एकमेव अवतार श्रीहनुमान याचे अवतार कार्य संपले नाही कारण जगातून अधर्म/अन्याय संपूर्णपणे नष्ट झाला नाही. म्हणून वकील या भूमिकेत मी कायदा क्षेत्रात आहे अर्थात धर्म कार्यात आहे याचा मला अभिमान आहे. तसे तर न्यायाधीश, वकीलच नव्हे तर इतर सुद्धा म्हणजे पोलीस, प्रशासकीय अधिकारी, मंत्रीगण, लष्कर हे सर्वच धर्मकार्याचे अर्थात ईश्वर कार्याचे संरक्षक पुजारी आहेत हे त्यांनी नीट ध्यानात ठेवले पाहिजे. त्यांचा भ्रष्टाचार म्हणजे अधर्म होय. अधर्म जास्त काळ टिकत नाही. अतिरेक केला तर मग आहेच शिवशंकराचा जागृत अवतार श्री हनुमान!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.१२.२०२३

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

पंढरपूरचा मातोश्री वृद्धाश्रम काय शिकवतो?

पंढरपूरचा मातोश्री वृद्धाश्रम काय शिकवतो?

गोपाळपूर हा पंढरपूरचा एक भाग. या गोपाळपूरातील मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे पंढरपूरच्या संत तनपुरे महाराज यांची कृपा. संत तनपुरे महाराजांचा एक मठ पंढरपूर स्टेशन रोडवर एस.टी. स्टँडजवळ आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सत्य कथा म्हणजे अनुभवाची शिदोरी. इथे राहणाऱ्या ६५ वृद्ध स्त्री पुरूषांच्या कथा थोड्या वेगळ्या असल्या तरी या सर्व कथांना जोडणारा एकच समान धागा म्हणजे ही सर्व वृद्ध मंडळी निराधार आहेत. म्हणजे काहींना मुलेच नाहीत, काहींना मुले होती पण ती मेलीत व काहींची मुले आहेत पण त्यांना आईबाप जड झालेले म्हणजे ती असून नसून सारखीच, तर काहीजण मुलांना आपला म्हातारपणी त्रास नको म्हणून स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात आलेली. या वृद्धांत काही अशिक्षित तर काही उच्च शिक्षित मंडळी आहेता म्हणजे शिक्षणाचा व वृद्धाश्रम जवळ करण्याचा काही संबंध नाही हे वास्तव सांगणाऱ्या या कथा. या सर्वांच्या जीवन कथा नीट समजून घेतल्यावर मी ६७ वर्षाच्या माझ्या वृद्धापकाळी या निष्कर्षापत आलो की जी माणसे विवाहित आहेत, ज्यांना जीवनसाथीची सोबत आहे, मुलेबाळे आहेत व ती सर्व मुले आपुलकीने वृद्धापकाळी ज्यांची (वृद्ध आईवडिलांची) आपुलकीने काळजी घेत आहेत व अशा मायेच्या वातावरणात वृद्ध आईवडिलांचा मृत्यू आपल्या मुलाबाळांच्या जवळ रहात असताना होत आहे अशी सर्व माणसे आयुष्यात खूप यशस्वी, खूप सुखी समाधानी व खूप नशीबवान आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.११.२०२३

वर्चस्वाचा उन्मादी गर्व व कायदा!

वर्चस्वाचा उन्मादी गर्व व कायदा!

आधुनिक व सुसंस्कृत मानवी जीवनशैलीचा विकास माणसांच्या रानटी, जंगली जीवनशैलीतून व वर्चस्वाच्या टोळी युद्धांतून झाला असल्याने आधुनिक काळातही माणसाची वर्चस्व वृत्ती जाता जात नाही. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवत गर्वाने जगण्याची ही मानवी वृत्ती ही मूळ पशू वृत्ती होय. जंगलात बळी तो कानपिळी या नियमाने वाघ, सिंह हे बलवान प्राणी इतर अशक्त प्राण्यांना आपल्या कह्यात ठेवून त्यांचे शोषण करून गर्वाने राजेशाही जीवन जगण्यासाठी वर्चस्वाच्या लढाया लढतात. त्यांचीच पद्धत अवलंबून मानव समाजात टोळी युद्धे हा जंगली प्रकार अंमलात आला. राजेशाहीत बलवान राजे अशक्त राजांना बळी तो कानपिळी या नियमाने युद्धात हरवून हरलेल्या राजांना व त्यांच्या प्रजेला मांडलिक बनवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करीत असत. त्या मांडलिकत्वाच्या म्हणजे झुकून राहण्याच्या व खंडणी देण्याच्या मोबदल्यात मांडलिक राजांना व त्यांच्या राज्यातील प्रजेला शांततामय जीवन जगण्याची हमी युद्धात जिंकणारे राजे देत असत. काळ बदलला. राजेशाही जाऊन लोकशाही आली पण लोकशाहीतही लोकांतून निवडून येणाऱ्या लोक प्रतिनिधींना राज्य कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी लोकांना त्यांच्या उत्पन्नातून काही भाग लोकशाही सरकारला कररूपाने द्यावा लागतो. हा कर म्हणजे आधुनिक खंडणीच होय. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवताना गर्व होण्याची पशू वृत्ती लोकशाही राजकारणात लोकप्रतिनिधींमध्येही अधूनमधून उफाळून येत असते. आणि लोकशाही सरकार तरी पूर्ण आधुनिक व सुसंस्कृत आहे का? उत्तर नाही असेच आहे. कारण तसे असते तर समाजात दहशत निर्माण करून समांतर अर्थव्यवस्था चालवत खंडणी वसूल करणारे अंडरवर्ल्डचे गँगस्टर्स अस्तित्वात राहिलेच नसते. मानव समाजातील धार्मिक उन्माद व जातीपातीमधून माणसाची वर्चस्व वृत्ती दिसून येते जी मूळ पशू वृत्ती आहे. कितीही देवधर्म, आध्यात्मिक देवभक्ती करा कोणत्याही धर्माला व कोणत्याही देवाला माणसाच्या या पशू वृत्तीचा संपूर्ण नायनाट करता आलेला नाही. त्यासाठी माणसांना विचार करून पुन्हा त्याच बळी तो कानपिळी या जंगली नियमाचा आधार घेत आधुनिक कायदा व शासन व्यवस्था निर्माण करावी लागली. इथे परमेश्वर व देवधर्म  उपयोगाला आले नाहीत व येत नाहीत. निरनिराळे खेळ जसे की क्रिकेट, कुस्ती, बुद्धीबळ यातून माणसाने त्याची वर्चस्व वृत्ती जिवंत ठेवण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे. या खेळांत जिंकणारे खेळाडू हरणाऱ्या खेळांडूवर वर्चस्व सिद्ध करतात व मग खेळ जिंकण्याचा आनंदोत्सव साजरा करतात. या आनंदाच्या सोहळ्यात म्हणजे खेळ जिंकण्याच्या सोहळ्यात सामान्य माणसेही टाळ्या वाजवून, फटाके वाजवून नाचतात. हा नाच असतो दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचा, दुसऱ्याला जिंकण्याचा व त्यातून निर्माण होणाऱ्या गर्वाचा. वर्चस्वाचा हा उन्मादी गर्व दैनंदिन जीवनात म्हणजे आंतर मानवी शैक्षणिक, आर्थिक व राजकीय व्यवहारांतही दिसून येतो. म्हणून तर संत तुकाराम म्हणतात "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग"! या वर्चस्व उन्मादी गर्विष्ठ वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी शासन व्यवस्थेअंतर्गत येणारी प्रशासन, पोलीस व लष्कर यंत्रणा कायद्याच्या माध्यमातून मार्शलचे काम करते तर न्याययंत्रणा अंपायरचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.११.२०२३

OCD POINTS VICIOUS CIRCLE

OBSESSIVE COMPULSIVE (OCD) POINTS!

The human mind is forced by environment mainly social environment to face certain irritating obsessive compulsive (OCD) points. Some OCD points are pure artificial created by some fools or selfish crooks out of their imagination. But these fools or crooks are powerful enough to pull ignorant or innocent human minds in vicious circle or chain of such OCD points artificially created them. Some mischievous people themselves act as OCD points by their irritating social conduct. It is upon you how much to respond or even to respond or not to such people or to such OCD points. More you respond to them more you get trapped in their chain or vicious circle!

-©Adv.B.S.More, 29.11.2023

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेतो!

निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेतो!

मनुष्याच्या प्रत्येक कृतीत, मग ती वैचारिक कृती असो की प्रत्यक्ष कृती असो, त्या कृतीतला चळी, मंत्रचळी भाग काढून टाकून आवश्यक तोच भाग ठेवला पाहिजे. आवश्यक कृती ही गरज असते तर चळ, मंत्रचळी कृती ही चैन असते. आपण आपल्या जीवनात बऱ्याच अनावश्यक कृती करीत असतो. उदाहरणार्थ, मनाचे स्वप्नरंजन हे मनोरंजन असते व ते एका आवश्यक त्या मर्यादेपलिकडे अनावश्यक असते कारण त्याचे रूपांतर गरजेतून चैनीत होत असते. चैन ही स्वतःलाच नव्हे तर समाज व निसर्ग पर्यावरण यांनाही घातक असते. आर्थिक श्रीमंतीचे, राजकीय सत्तेचे वेड इतकेच काय देवाधर्माचे वेड ही सुद्धा चैनीची व म्हणून मनुष्य जीवनासाठी अनावश्यक गोष्ट होय. अती तिथे माती ही गोष्ट भौतिक गोष्टीतच नव्हे तर आध्यात्मिक गोष्टीतही खरी असते. म्हणूनच धर्मादाय समाजकारण कितीही उदात्त वाटले तरी ते मर्यादेपलिकडे नेले की स्वतःसाठी त्रासदायक होते. कारण ही दुनिया फार स्वार्थी आहे. तिला फुकटातील गोष्टी लाटायला, चाटायला आवडतात. तेंव्हा देवधर्मी आध्यात्मिक व समाजकर्मी धर्मादाय बाबतीत कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे.

मर्यादेपलिकडची ज्ञानलालसा सुद्धा चैनीची गोष्ट होऊ शकते कारण मनुष्याचे आयुष्यच मर्यादित आहे व या मर्यादित आयुष्यात निसर्गाचे अमर्यादित ज्ञान मिळवून मिळवून तरी किती मिळवणार? त्यामुळे ज्ञानकारण विषयात सुद्धा कुठेतरी थांबायला शिकले पाहिजे. मी हल्ली उतार वयात माझी आवश्यक कृती कोणती व माझी चळकृती कोणती हे प्रत्येक कृतीच्या वेळी निश्चित करून चळकृती सुरू झाली की "थांब थांब, चळाचा भाग सुरू झाला रे मना" असे मनाला बजावून मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करतो. पण बाल व तरूण वयात लागलेल्या चळकृती उतार वयातही सुटता सुटत नाहीत व त्या करताना शरीर व मनाची चांगली फजिती होते. तरीही उतार वयात जुनाट चळकृती होता होईल तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर बाल व तरूण वयात आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी पुढे उतार वयात अनावश्यक होत जातात कारण निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेत असतो. मग माणसाने   परमेश्वराची कितीही आध्यात्मिक भक्ती करू देत निसर्ग हक्क काढून घेण्याची ही प्रक्रिया काही थांबवत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.११.२०२३