https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १० जून, २०२४

वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!

वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!

वृद्धत्व म्हणजे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत जाण्याचा अर्थात जीवनाकडून मृत्यूकडे जाण्याचा वेदनादायक प्रवास अर्थात जीवनाचे जहाज खोल समुद्रात बुडतानाची व्याकूळ अवस्था. वृद्धापकाळ हा अनिवार्य परिवर्तनाचा काळ ज्यात सजीव माणसाचे रूपांतर/परिवर्तन निर्जीव मृत शरीरात होते.

या परिवर्तनाच्या काळात माणसाची पुनर्निर्माणाची ताकद संपलेली असते. पुनर्निर्माणात नुसत्या लैंगिक पुनरूत्पादनाचा भाग नसतो तर इतर पदार्थीय उत्पादने काढण्याचाही भाग असतो. पुनर्निर्माणाची ताकद संपल्याने उत्पादन प्रक्रिया थांबलेली असते. जर उत्पादनच नाही तर मग देवाणघेवाणीचा व्यापार कुठून असणार? पुनर्निर्माण/उत्पादन व देवाणघेवाण/व्यापार या दोन्ही गोष्टी उतार वयातील वृद्ध माणसाकडून होत नाहीत कारण दोन्हीची ताकदच उतार वयात संपलेली असते. 

वृद्धापकाळात माणसाला सतत सक्रिय ठेवणाऱ्या पुनर्निर्माण व देवाणघेवाण प्रक्रिया एकीकडून थांबलेल्या असतात तर दुसरीकडून माणसाच्या परिवर्तनाची म्हणजे माणसाला जीवनाकडून मृत्यूकडे नेण्याची प्रक्रिया मात्र जोरात किंवा दमदार पावलाने चालू असते. वृद्ध माणसाची ही अवस्था ना घरका ना घाटका अशी असते. ही अवस्था म्हणजे निसर्गाने माणसांसह सर्व सजीवांवर हुकूमशाहीने लादलेली अनिवार्य निवृत्ती असते. 

पण वय लांबलेली म्हणजे फक्त सत्तरी नव्हे तर अगदी नव्वदी पार केलेली काही वृद्ध माणसे मात्र उतार वयातही सक्रिय असताना दिसतात. त्यांची मानसिक, बौद्धिक ताकद जोरात काम करीत असते पण तरीही त्यांची शारीरिक ताकद तरूणपणासारखी राहिलेली नसते. पण हातात भरपूर पैसा व सत्ता असली की त्या बाह्य पाठबळाच्या जोरावर ही असाधारण विशेष वृद्ध माणसे सर्वसामान्य वृद्ध माणसांपेक्षा जास्त सक्रिय असलेली दिसतात. पण ही असाधारण माणसे म्हणजे नियम नव्हे. या विशेष वृद्ध माणसांकडे इतर सामान्य वृद्धांनी अपवाद म्हणूनच बघितले पाहिजे. सामान्य वृद्धांनी असाधारण वृद्धांची नकल करण्याचा प्रयत्न करू नये. एकंदरीत काय वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.६.२०२४

रविवार, ९ जून, २०२४

मोठ्या लोकांबरोबर फोटो काढून घेण्याची हौस?

मोठ्या लोकांबरोबर फोटो काढून घेण्याची हौस?

केवळ कर्तुत्ववान आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांच्या मुलांना कर्तुत्ववान होता येत नाही. थोडेफार पाठबळ मिळत असले तरी शेवटी स्वतःचे कर्तुत्व स्वतःलाच सिद्ध करावे लागते. समाजातील मोठ्या लोकांच्या मुलांची ही स्थिती तर मग अशा मोठ्या लोकांशी काडीचाही संबंध नसताना त्यांच्या मागे लागून त्यांच्या बरोबर स्वतःचा फोटो काढून घेऊन तो जगभर मिरविण्याची हौस चुकीची नव्हे काय? स्वकष्टाने मिळविलेले आपले स्वतःचे कर्तुत्व छोटेसे का असेना पण त्याचा स्वाभिमान (सेल्फ रिस्पेक्ट) हवा. त्या स्वाभिमानाला त्या मोठ्या लोकांच्या शेजारी नेऊन छोटे करू नका. मी भूतकाळात असा वेडपटपणा काही प्रसंगी केला व स्वकष्टाने प्राप्त केलेल्या माझ्या उच्च शिक्षणाला व वकील पदाला अप्रत्यक्षपणे कमी लेखले. आता हा मूर्खपणा करणार नाही. या मोठ्या लोकांनी स्वतःहून तुमच्या कर्तुत्वाचा मान ठेवून तुमच्या बरोबर त्यांचा फोटो काढला तर तो फोटो स्वतःच्या कर्तुत्वाचा मान म्हणून जगाला दाखविण्यात काहीतरी अर्थ आहे नाहीतर नाही. तुम्ही एखाद्या प्रसिद्ध खेळाडूचे, कलाकाराचे, नेत्याचे चाहते (फॕन) असणे यात काही गैर नाही पण फॕनला (पंख्याला) लटकल्यासारखे त्या खेळाडू, कलाकार किंवा नेत्याच्या मागे मागे करून त्याच्या सोबत स्वतःचा फोटो काढून घेऊन तो जगभर मिरविणे यात स्वतःचे कर्तुत्व (असेल तर) झाकोळण्यासारखे आहे असे मला वाटते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.६.२०२४

सुज्ञ मानवी विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य!

मानवी वासना व भावना यांना लगाम घालणारी सुज्ञ मानवी विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य!

निर्जीव पदार्थांचे रासायनिक गुणधर्म व सजीव पदार्थांचे जैविक गुणधर्म हे एकमेकांशी संलग्न असले तरी त्या गुणधर्मांत खूप फरक आहे. दोन्ही पदार्थांचे हे रासायनिक व जैविक गुणधर्म वेगळे असले तरी ते दोन्हीही गुणधर्म निसर्गाच्या पदार्थीय विश्वाचे भौतिक गुणधर्मच होत. अर्थात निसर्गाची भौतिकता रासायनिक व जैविक अशा दोन्ही प्रकारची आहे.

मनुष्य हा निसर्गाने उत्क्रांत केलेला उच्च पातळीचा जैविक गुणधर्माचा सजीव पदार्थ आहे. या पदार्थाला अन्नाची भूक, लैंगिक भूक, झोप इ. मूलभूत जैविक वासना आहेत तशा मायाप्रेम, करूणा, परोपकार इ. पूरक नैतिक/सकारात्मक भावनाही आहेत व त्याचबरोबर भय, राग, लोभ, मोह, मद, मत्सर यासारख्या उपद्रवी अनैतिक/नकारात्मक भावनाही आहेत ज्या नकारात्मक भावनांच्या अतिरेकाचे रूपांतर हिंसा या विध्वंसक लक्षणात होते.

जैविक वासना, सकारात्मक नैतिक भावना व नकारात्मक अनैतिक भावना यांचे अत्यंत किचकट मिश्रण म्हणजे मानवी मन. या मनात जर निसर्गाने सुज्ञ विवेकबुद्धी घातली नसती तर मनुष्याने स्वतःबरोबर निसर्गाची पुरती वाट लावली असती. ही सुज्ञ मानवी विवेकबुद्धी मनुष्याच्या जैविक वासना व नैतिक भावना यांच्यात संतुलन साधण्याचा व मनुष्याच्या अनैतिक भावनांना नियंत्रित ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहते. जैविक वासना आततायी असतात, नैतिक भावना नम्र असतात तर अनैतिक भावना आक्रमक असतात. मानवी मनाच्या या तिन्ही कार्यप्रेरणा जशा नैसर्गिक आहेत तशी त्यांच्यात संतुलन साधणारी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी मानवी मनाची सुज्ञ विवेकबुद्धी ही सुद्धा नैसर्गिक आहे. निसर्गाने केलेली मानवी मेंदूची रचनाच अशाप्रकारे खूप किचकट आहे. मनुष्याच्या वासना व भावना यांच्यावर अंकुश ठेवून त्यांना लगाम घालणारी मानवी मेंदूमनाची सुज्ञ विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य होय.

जैविक वासना व नैतिक/अनैतिक भावना यांचा मानवी मेंदूमनावरील दबाव प्रचंड मोठा असतो. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या या दबावांना न जुमानता त्यांच्यात संतुलन साधणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ही साधी गोष्ट नाही. ही असाधारण गोष्ट सुज्ञ मानवी विवेकबुद्धीला साध्य करावी लागते. मानवी विवेकबुद्धीचे हेच आद्य नैसर्गिक कर्तव्य आहे ज्या मूलभूत बौद्धिक कर्तव्याचा समावेश मानवनिर्मित सामाजिक कायद्यात केला गेला आहे. या कायद्यानुसार मानवी विवेकबुद्धीने जैविक वासना, नैतिक भावना व अनैतिक भावना यांच्यापैकी कोणालाही झुकते माप देऊ नये हे अपेक्षित आहे. या आद्य नैसर्गिक कर्तव्याला मानवी बुद्धी सुज्ञपणाने, विवेकाने जागेल अशी अपेक्षा करूया!

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.६.२०२४

शनिवार, ८ जून, २०२४

निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत!

निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत हेच निसर्ग आपल्याला शिकवतोय!

निसर्गाकडे असलेला पदार्थांचा कच्चा माल मुळातच मर्यादित आहे. त्यातून तो बनवून बनवून तरी किती नवीन नवीन पदार्थ बनवत राहणार? तरी त्याची कमालच म्हणायची. याच कच्च्या मालातून त्याने कितीतरी विविध गुणधर्मी निर्जीव व सजीव
पदार्थ निर्माण करून निर्जीव-सजीव पदार्थांचे प्रचंड मोठे विश्व निर्माण केले आहे. निसर्ग व विश्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? की त्या एकच आहेत? म्हणजे निसर्गानेच निसर्ग बनवला किंवा विश्वानेच विश्व बनवले का? काही ठोस सांगता येत नाही. शेवटी निसर्ग व विश्व यांना एक मानले तरी त्याहून कोणती तरी मोठी शक्ती (चैतन्यशक्ती) निसर्ग किंवा विश्वात अस्तित्वात असावी व ती सर्वशक्तीमान असल्याने तिलाच तार्किक अंदाजाने परमेश्वर मानावे का? आणि तसे मानले तरी या चैतन्यशक्तीची आध्यात्मिक भक्ती, तपस्या, आराधना, प्रार्थना किंवा इतर धार्मिक कर्मकांडे करून ती प्रसन्न होते का व प्रसन्न होऊन तिनेच निर्माण केलेल्या परिस्थितीत, सृष्टी रचनेत, सृष्टी व्यवस्थेत भक्तांच्या सोयीनुसार बदल करते का, हे प्रश्न बुद्धिमान मानवी मनाला पडतातच.

विविध गुणधर्मी विविध मूलद्रव्यांचा एक निर्जीव अणू ते अनेक निर्जीव अणू यांच्या पासून बनलेले निर्जीव पदार्थांचे निर्जीव विश्व व एक सजीव पेशी ते अनेक सजीव पेशी यांच्या पासून बनलेले सजीव पदार्थांचे सजीव विश्व व या दोन विश्वांना नियमबद्ध करणारी निसर्ग व्यवस्था ही निसर्गाची अजब निर्मिती आहे.

या प्रचंड मोठ्या सजीव, निर्जीव विश्वांना नियमबद्ध करणाऱ्या निसर्ग व्यवस्थेत प्रामुख्याने तीन नैसर्गिक प्रक्रिया आढळून येतात. त्या म्हणजे पुनर्निर्माण, परिवर्तन, देवाणघेवाण. एखाद्या पदार्थाची त्याच प्रकारच्या पदार्थात पुनर्निर्मिती होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला पुनर्निर्माण असे म्हणतात. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरूषाच्या लैंगिक प्रक्रियेतून पुन्हा मनुष्याचीच निर्मिती होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे पुनर्निर्माण प्रक्रिया. दुसरी नैसर्गिक प्रक्रिया परिवर्तनाची. एखाद्या पदार्थाचे रूपांतर वेगळ्या प्रकारच्या पदार्थात होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला परिवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ  सजीव मानवी शरीराचे रूपांतर मृत्यूने निर्जीव शरीरात होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे परिवर्तन प्रक्रिया. या परिवर्तन प्रक्रियेत मानवी शरीर हळूहळू बाल व तरूण अवस्थेतून वृद्धावस्थेत म्हणजे मृत्यूच्या जवळ जाण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. 

पुनर्निर्माण व परिवर्तन या दोन प्रक्रियांच्या मध्ये तिसरी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती म्हणजे आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रिया. उदाहरणार्थ, जिवंतपणी मानवी शरीराने हवेतील प्राणवायू आत घेऊन कार्बन वायू हवेत सोडणे ही श्वासोच्छवास प्रक्रिया, निसर्गातील अन्न, पाणी शरीरात घेऊन विष्ठा बाहेर टाकण्याची पचन प्रक्रिया, स्त्री व पुरूष यांच्यातील लैंगिक संभोग प्रक्रिया, आंतर मानवी ज्ञानकारण, अर्थकारण, राजकारण यासारख्या सामाजिक प्रक्रिया, या सर्व आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रिया होत. अर्थात, आंतर मानवी सामाजिक देवाणघेवाण प्रक्रिया ही सुद्धा खोल अर्थाने आंतर पदार्थीय नैसर्गिक देवाणघेवाण प्रक्रिया होय. विशेष म्हणजे पुनर्निर्माण, परिवर्तन व देवाणघेवाण या तिन्ही नैसर्गिक प्रक्रिया एकमेकांशी संलग्न आहेत. उदाहरणार्थ, मुलामुलींचे लग्नाच्या वयात येणे हा परिवर्तन प्रक्रियेचा भाग आहे, वयात आल्यावर लग्न करून स्त्री पुरूषांनी त्यांच्या लैंगिक संबंधातून मुलामुलींना जन्म देणे हा पुनर्निर्माण प्रक्रियेचा भाग आहे तर स्त्री पुरूषांमधील लैंगिक-सांसारिक देवाणघेवाण हा आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रियेचा भाग आहे. 

निसर्गातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थ या तीन प्रक्रियांत चक्राकार फिरत असतात. सागरी खारट पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन (बाष्पीभवन) तिच्यापासून पिण्यास योग्य असलेल्या गोड्या पाण्याचा पाऊस पडणे ही निर्जीव पदार्थांची पुनर्निर्माण प्रक्रिया होय. मूलद्रव्यांच्या रासायनिक क्रियेतून त्यांचे संयुग (कम्पाऊंड) पदार्थात रूपांतर होणे ही निर्जीव पदार्थांची परिवर्तन प्रक्रिया होय. वनस्पतींनी जमिनीतील पोषक पदार्थ, सूर्याची उष्णता, पावसाचे पाणी घेऊन फुले व फळांची निर्मिती करणे ही निर्जीव व अर्धसजीव वनस्पतींमधील देवाणघेवाण प्रक्रिया होय. याचा अर्थ सजीव व निर्जीव हे दोन्ही प्रकारच्या पदार्थांना पुनर्निर्माण, परिवर्तन व देवाणघेवाण या तिन्ही प्रक्रियांतून जावे लागते. या तिन्ही प्रक्रियांचे सुद्धा एक चक्र बनले आहे व या चक्रापासून कोणताही पदार्थ मुक्त नाही मग माणसाने जीवनचक्र प्रक्रियेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी किंवा या चक्रातून मुक्ती मिळविण्यासाठी महान परमेश्वराची (चैतन्यशक्तीची) कितीही प्रार्थना केली तरी काही फरक पडत नाही. विज्ञान व धर्मातील हाच तर मोठा फरक आहे.

निसर्ग चक्र व निसर्ग नियम यांच्या वर कोणत्याही पदार्थाचे नियंत्रण नाही. निसर्गाने फक्त माणूस हाच असा प्राणी घडवलाय की तो त्याच्या बुद्धीने (बौध्दिक शहाणपणाने) या निसर्ग चक्राचे व निसर्ग नियमांचे योग्य किंवा त्याला सोयीस्कर असे व्यवस्थापन करू शकतो. माणसाने त्याच्या बौद्धिक शहाणपणाच्या जोरावर पृथ्वीवरील निसर्गसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले आहे ज्या मर्यादित राज्याचा तो मर्यादित राजा झाला आहे व हे राजेपण तो निसर्गाच्या परवानगीने मिरवतो. या मर्यादित राज्याचे कायदे मानवाने स्वतःच्या सोयीसाठी खास बनवले व मग कायद्याचे राज्य असे या राज्याचे नामकरण केले. पण मानवनिर्मित कायदे हे निसर्ग नियमांना म्हणजे निसर्ग कायद्याला बांधील आहेत ही गोष्ट विसरता कामा नये.

निसर्गाचे पदार्थीय विश्व, या विश्वाची हालचाल निसर्ग नियमांनी बनलेल्या ज्या निसर्ग व्यवस्थेने होते ती निसर्ग व्यवस्था या सर्व गोष्टींचे ज्ञान तेच विज्ञान. निसर्ग विशाल तसे त्याचे निसर्ग विज्ञानही विशाल. पुनर्निर्माण व त्याबरोबर परिवर्तन, देवाणघेवाण या प्रक्रियांतून निसर्गातील पदार्थ विश्वाची होणारी हालचाल कधीकधी मानवी मनाला रटाळ वाटते. तेच ते पदार्थ, तीच तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा पाहून मानवी मनाला निसर्गाचा व मानवी आयुष्याचा कंटाळा येऊ शकतो. कारण काही काळानंतर त्यातले नाविन्य संपल्याने त्यातील उत्सुकता, रस संपून जातो. काही माणसे तर असा रस संपल्याने नैराश्येत जाऊन आत्महत्या करतात तर काही माणसे विरक्ती येऊन संन्यास घेतात. पण शहाणा माणूस नैराश्य व संन्यास या दोन्ही गोष्टींना जवळ करणार नाही. त्यासाठी तो सुज्ञ विचार करेल की शेवटी निसर्ग तरी करून करून काय करील? त्याच्याकडील मूलभूत कच्चा माल जर कायम तोच राहणार असेल तर त्यातून तो किती नवीन नवीन पदार्थ बनवत राहणार? तसेच निसर्ग नियम व निसर्ग व्यवस्थेत तरी तो काय आणि किती बदल करणार? अर्थात निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत. मग त्याच्याकडून माणसाने जास्त अपेक्षा करणे चुकीचे नव्हे काय? तेव्हा निसर्गाकडून आपल्या अपेक्षा कमी करा, मागण्या कमी करा, निसर्गाचे पर्यावरण बिघडवू नका व नैसर्गिक दुःखातही नैसर्गिक आनंद शोधून आनंदात जीवन जगा. निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत हेच निसर्ग आपल्याला शिकवतोय.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.६.२०२४

शुक्रवार, ७ जून, २०२४

केमिकल लोचा २

आपल्या बुद्धीला निसर्गाच्या संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास करणे झेपत नसेल तर निदान आपण ज्या मानव समाजात राहतो त्या समाजातील माणसे खून, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यभिचार, आत्महत्या का करतात, विरक्त होऊन संन्यास का घेतात, देवभोळेपणात वैज्ञानिक चुका का करतात, त्यांच्या मेंदूत असे चुकीचे वर्तन करताना कोणते रासायनिक असंतुलन (केमिकल लोचा) होते, या कारणांची कारणमीमांसा करीत राहून समाजाला काही अभ्यासू मार्गदर्शन करता येईल का हे पाहिले पाहिजे! -ॲड.बी.एस.मोरे

केमिकल लोचा!

आपल्या बुद्धीला निसर्गाच्या संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास करणे झेपत नसेल तर निदान आपण ज्या मानव समाजात राहतो त्या समाजातील माणसे खून, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यभिचार, आत्महत्या का करतात, विरक्त होऊन संन्यास का घेतात, देवभोळेपणात वैज्ञानिक चुका का करतात, त्यांच्या मेंदूत असे चुकीचे वर्तन करताना कोणते रासायनिक असंतुलन (केमिकल लोचा) होते, या कारणांची कारणमीमांसा करीत राहून समाजाला काही अभ्यासू मार्गदर्शन करता येईल का हे पाहिले पाहिजे! -ॲड.बी.एस.मोरे

गुरुवार, ६ जून, २०२४

परिवर्तन!

परिवर्तन!

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जसजसे माणसाचे वय वाढत जाते तसतसा हा नियम पदोपदी अनुभव देत राहतो. या निसर्ग नियमानुसार सळसळत्या तारूण्याच्या घोड्यावर आरूढ झालेली तरूण पिढी प्रगल्भ ज्ञान व परिपक्व अनुभव गाठीशी असलेल्या जुन्या जाणत्या पिढीचा पाणउतारा करायला मागेपुढे पहात नाही. जोश आहे पण होश नाही या तारूण्यावस्थेचा हा परिणाम असतो. वय जसजसे वाढत जाते तसतशी कालची आपली माणसे आज आपली रहात नाहीत. अगदी सहज हालचाल करणारे आपले कालचे शरीर आज कुरकुर करायला लागते. थोडक्यात कालचा भूतकाळ आजचा वर्तमानकाळ रहात नाही. अशा बदललेल्या परिस्थितीत बदललेल्या लोकांच्या पाठीमागे लागणे आणि बदललेल्या शरीराला बळेच ओढून ताणून कठीण व्यायाम करायला भाग पाडणे म्हणजे निसर्ग नियमाच्या विरोधी वागणे व त्यातून स्वतःला स्वतःच्या हट्टाने त्रास करून घेणे होय. थोडक्यात काय तर ता म्हणता ताक ओळखावे आणि पळत्याच्या पाठीमागे धावणे सोडून द्यावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.६.२०२४