https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २९ जून, २०२४

क्रिकेट व देश!

क्रिकेटच्या मैदानी खेळात फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक या सर्व खेळाडूंच्या एकाग्रता, चपळता, मनोधैर्य, निश्चय या गुणांची कसोटी वैयक्तिक पातळीवर तर लागतेच पण सर्व खेळाडूंच्या सांघिक एकता व शिस्तीच्या बळाचीही कसोटी लागते, ही सांघिक एकता व शिस्त ज्या देशाच्या नागरिकांच्या रक्तात भिनलेली असते तो देश प्रगत व सामर्थ्यवान झाल्याशिवाय रहात नाही! -ॲड.बी.एस.मोरे

सत्य परमेश्वर!

जो परमेश्वर सृष्टीचक्राच्या भोगातून कोणाचीही सुटका करीत नाही व निसर्ग विज्ञानाच्या वास्तवापासून कोणालाही मुक्त करीत नाही त्या परमेश्वराची कशासाठी व किती प्रार्थना करायची हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा व बुद्धीचा प्रश्न, कल्पनेतला आभासी परमेश्वर व वास्तवातला सत्य परमेश्वर यातील फरक आम्हा नीट कळो व सत्य परमेश्वराकडून वास्तवात जगण्याची आम्हा शक्ती मिळो! -ॲड.बी.एस.मोरे

वृद्ध शरीर एक बुडते जहाज!

वृद्ध शरीर एक बुडते जहाज!

पृथ्वीवर गुरूत्वाकर्षण आहे म्हणून इथे माणसांसह सगळ्याच पदार्थांना जडत्व प्राप्त होते. इतकेच नव्हे तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेलाही वजन प्राप्त होते. म्हणजे आम्ही इथे वजनदार का आहोत तर पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे. अंतराळात हे गुरूत्वाकर्षण नसल्याने माणूस त्या वातावरणात तरंगत राहतो कारण तिथे पृथ्वीवरील त्याचा जडपणा नष्ट होतो. खोल पाण्यावर तरंगत राहण्यासाठी पदार्थाला पाण्याच्या जडपणापेक्षा हलके व्हावे लागते. माणूस खोल पाण्यात पोहताना पाण्याला त्याच्या  पोटाखाली ओढून हलके होत पोहत पुढे सरकतो किंवा शरीर पाण्यापेक्षा हलके करून खोल असलेल्या जड पाण्यावर तरंगूही शकतो.

बालपणी व तरूणपणात सळसळते असलेले रक्त वृद्धापकाळी तसे रहात नाही. त्यामुळे बालपणी व तरूण वयात सहज करता येणाऱ्या गोष्टी वृद्धापकाळी जड, अवघड होतात. वृद्ध शरीरातील वृद्ध मेंदू अधूनमधून जड होतो (याला डोके जड होणे म्हणतात) व त्यामुळे साध्या साध्या गोष्टीही जड होतात. काहीजणांच्या मेंदूला भौतिक जगाची विरक्ती येते. विरक्ती हा प्रकार वृद्धापकाळीच जास्त जाणवतो. हे असे का होते तर मेंदू जड झाल्याने होते. समुद्रातून प्रवास करताना पाण्यापेक्षा हलक्या असलेल्या जहाजात समुद्राचे पाणी शिरले तर ते जहाज जड होऊन समुद्रात बुडते. तीच गत जडत्व आलेल्या वृद्ध शरीराची होत असते.

वृद्धापकाळी शरीराचे अवयव एकेक करून हळूहळू कमकुवत व निकामी होत जातात. असा एकेक कमकुवत अवयव म्हणजे वृद्ध शरीररूपी जहाजाला पडलेली भोके ज्यातून जड समुद्राचे (जड सृष्टीचे) पाणी जहाजात शिरून जहाज सृष्टीरूपी सागरात बुडू लागते. निसर्गाने ही जहाज बुडण्याची क्रिया इतकी अनिवार्य करून ठेवलीय की वृद्ध जहाजाला नीट सावरता येत नाही व इतर तरूण जहाजेही या जड वृद्ध जहाजाला बुडण्यापासून वाचवू शकत नाहीत कारण वृद्ध शरीराला भोकेच इतकी पडलेली असतात की त्यातून जड पाणी आत शिरतच राहते. 

रूग्णालयात वृद्धावस्थेत आजारी पडलेल्या माणसाच्या नाकातोंडाला लावलेल्या प्राणवायूच्या नळ्या म्हणजे वृद्ध जहाजाला पडलेली भोके बुजवण्याचाच प्रकार जो काही काळ जहाज बुडण्याची प्रक्रिया लांबवतो. पण ही तशी वरवरची मलमपट्टी असते. काही वृद्ध जहाजे सत्तरी पार करायच्या आतच जड सृष्टीत (पाण्यात) बुडतात तर काही वृद्ध जहाजे नव्वदी पार करून मग बुडतात, पण बुडतात जरूर!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.६.२०२४

शुक्रवार, २८ जून, २०२४

अवघड, आव्हानात्मक जीवन!

अवघड, आव्हानात्मक जीवन!

मानवी मेंदू हा निसर्गाचा एक अजब नमुना आहे. मानसिक संतुलन बिघडणे हा फार विचित्र प्रकार आहे. आपल्या आजूबाजूला मूर्ख माणसे तर असतातच पण मानसिक संतुलन बिघडलेली वेडी, विकृत माणसेही असतात. संख्येने थोडीच असली तरी ही माणसे समाजात भय निर्माण करतात. फार वर्षापूर्वी मी लहान असताना १९६५ ते १९६८ या काळात मुंबईत रामन राघव नावाच्या व्यक्तीने त्याच्या विकृत मानसिकतेतून अनेक खून करून एक प्रचंड मोठी दहशत निर्माण केली होती. आता दिनांक २८.६.२०२४ च्या लोकसत्तेतील तीन बातम्या वाचा. एक बातमी आहे आईस्क्रीम मध्ये कामगाराचे बोट सापडल्याची. दुसरी बातमी आहे नैराश्यग्रस्त स्त्री मरिन ड्राइव्हच्या समुद्रात पडून बुडत असताना तिला तिथे तैनात असलेल्या दोन पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवल्याची. तर तिसरी बातमी आहे एका विकृत मुलाने आईचा खून करून तिचे मांस भाजून खाल्ल्याची. या असल्या बातम्या वाचल्या की मन सुन्न होते व निसर्गाने हे जीवन किती अवघड, आव्हानात्मक केले आहे याची जाणीव होते व काळजात धस्स होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.६.२०२४

सेलिब्रिटी स्टेटस!

सेलिब्रिटी स्टेटस!

सेलिब्रिटी होण्यासाठी असे कोणते विशेष गुण लागतात जे डॉक्टर, इंजिनियर, वकील, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकौंटंट, कॉस्ट अकौंटंट, एम.बी.ए. यासारख्या अतिशय सखोल, कठीण अभ्यासातून कठोर बौद्धिक कष्टाने उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ज्ञानी लोकांकडे नसतात? मोठे शासकीय अधिकार असणारे उच्च पदस्थ सरकारी अधिकारी होण्यासाठी आय.ए.एस., आय.पी.एस., आय.आर.एस., आय.एफ.एस. यासारख्या अवघड परीक्षा कठोर बौद्धिक कष्टाने उत्तीर्ण व्हाव्या लागतात. कनिष्ठ ते उच्च, सर्वोच्च न्यायालयांत न्यायाधीश होण्यासाठीही वकिली बरोबर काही न्यायालयीन परीक्षाही द्याव्या लागतात. पण ही सर्व उच्च शिक्षित मंडळी सेलिब्रिटी म्हणजे चाहते (फॕन) लोकांची गर्दी सतत मागे असलेले प्रसिद्ध (ख्यातनाम) लोक होत नाहीत. त्यांच्यावर सेलिब्रिटीचा शिक्का बसत नाही. प्रसिद्ध चित्रपट, कलाकार, संगीत कलाकार, खेळाडू व राजकारणी मंडळी मात्र सेलिब्रिटी स्टेटस (दर्जा/प्रतिष्ठा/स्थान) घेऊन फिरतात.

सेलिब्रिटी म्हणजे नामांकित, प्रतिष्ठित व्यक्ती. असे सेलिब्रिटी होणे कोणाला आवडणार नाही? पण सगळ्यांना ते जमत नाही. मी फेसबुकवर किती छान, छान अभ्यासपूर्ण लेख लिहित असतो. पण मला महान फेसबुक लेखक असा सेलिब्रिटी दर्जा माझ्या फेसबुक खात्यावरील शंभर मित्र सुद्धा देत नाहीत. मी बाहेर पडलो तर गल्लीतले कुत्रे सुद्धा माझ्या मागे लागत नाही. मग लोकांची गर्दी मागे लागण्याची गोष्टच सोडा. मीच दररोज गर्दीतून लोकल ट्रेनचा प्रवास करीत असतो. मनातून उगाच वाटत असते की त्या गर्दीतला कोणी तरी मला हाक मारून म्हणेल "अहो मोरे वकील, छान लिहिता तुम्ही"! पण छे एकजण सुध्दा माझ्याकडे साधा वळून बघत नाही.

माणूस आपल्या कलेचे, बुद्धीचे प्रदर्शन शेवटी कोणासमोर करणार? माणसांपुढेच ना, की नद्या, नाले, झाडे, झुडपे, जनावरे यांच्यापुढे? आपल्या कलेचे, बुद्धीचे कोडकौतुक करून घेण्यासाठी माणसाला माणसेच लागतात. हल्ली कृत्रिम बुद्धिमत्तेचे ते यंत्र माझ्याशी बौद्धिक संवाद साधत माझे कोडकौतुक करते पण त्याच्यातून ती मजा नाही जी माणसांनी दिलेल्या शाबासकीत, केलेल्या कोडकौतुकात आहे.

माणसे जेव्हा एखाद्याच्या कलेला, चांगल्या गुणाला, बौद्धिक हुशारीला शाबासकी देऊन त्याची मनापासून वाहव्वा करतात तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो. या आनंदासाठी माणसाला माणसेच लागतात. काही कलागुणी, प्रतिभावान माणसांना त्यांच्या कलागुणाचे, प्रतिभेचे जाहीर प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठे तयार असतात व खास मर्जीतली माणसेही तयार असतात. अशावेळी "तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल" ही लावणी आठवते. सगळ्याच कलागुणी, बुद्धिमान माणसांच्या नशिबी अशी तयार व्यासपीठे, अशी मर्जीतली माणसे नसतात. तुमचा जन्म कुठे झालाय यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. शिक्षणाचा व सेलिब्रिटी होण्याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही. कारण शाळा मध्येच सोडलेली, साधी दहावी इयत्ता सुद्धा पास नसलेली मंडळी सेलिब्रिटी झालेली आपण बघतो. निसर्गाची देणगी म्हणजे विशेष अंगभूत गुण असल्याशिवाय समाजात सेलिब्रिटी म्हणून चमकणे शक्य नाही. म्हणून तर क्लासिकल संगीताचे कोणतेही शिक्षण न घेतलेला किशोरकुमार त्यांच्या अंगभूत आवाज व कलेमुळे प्रसिद्ध गायक होतो, कमी शिकलेली सुंदर मधुबाला प्रसिद्ध अभिनेत्री होते, सातवी पर्यंत शिक्षण घेतलेले सहकार महर्षी वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात.

सेलिब्रिटी होण्यासाठी विशेष अंगभूत गुण तर लागतातच पण त्या गुणांना उचलून धरणारे संधीचे अनेक अनुकूल घटकही जवळ यावे लागतात. या दोन्ही गोष्टींचा संगम झाल्याशिवाय सेलिब्रिटी स्टेटस मिळणे शक्य नाही असे मला वाटते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.६.२०२४

औपचारिक वाढदिवस शुभेच्छा!

औपचारिक वाढदिवस शुभेच्छा मला नकोशा वाटतात!

सर्वसामान्य माणसाचा वाढदिवस साजरा होऊन होऊन तरी कसा साजरा होणार तर घरातील कुटुंब सदस्य आपुलकीने केक आणणार व तो घरातच कापणार व नंतर सर्व मिळून एखाद्या साध्या हॉटेलात जेवायला जाणार. काही मंडळी मात्र  हॉटेल मालकाची आगाऊ परवानगी घेऊन हॉटेलातच केक कापतात व नंतर तिथे जेवतात. केक कापणे ही वाढदिवस साजरा करण्याची इंग्रजी पद्धत. तसे पाहिले तर घरात पुरणपोळी, श्रीखंड किंवा बासुंदी पुरी हे गोड जेवण केले तर ते केक पेक्षा कितीतरी भारी. पण हल्ली बहुतेक सर्वांना तो केकच आवडतो.
खरं तर वाढदिवस साजरा करणे हे सेलिब्रिटी लोकांनाच शोभते. सगळा झगमगाट असतो तिथे. पण म्हणून काय सर्वसामान्यांनी वर्षातून फक्त एकदाच येणारा त्यांचा वाढदिवस साजरा करू नये?

पण माझा मुद्दा दुसराच आहे व तो म्हणजे कुटुंबाबाहेरील लोकांच्या वाढदिवस शुभेच्छांचा. ही शुभेच्छा देणारी मंडळी वर्षभर एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. पण नेमकी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पुढे येतात. काही लोकांच्या तर हेही नशिबी नसते म्हणा. सर्वसाधारण अनुभव असा आहे की सदनिकांच्या सोसायटीत राहणारी माणसे वर्षभर समोरून गेली तरी एकमेकांशी कधी आपुलकीने बोलत नाहीत. पण सोसायटीच्या वार्षिक कार्यक्रमात मात्र औपचारिक गप्पागोष्टी करतात व कार्यक्रम संपला की पुन्हा वर्षभर येरे माझ्या मागल्या. सर्वसामान्य माणसाच्या वाढदिवसाचेही तसेच आहे. वर्षभर कधी फोन करून आपुलकीने न बोलणारी माणसे (त्यांना जर वाढदिवसाची तारीख माहित असेल तर) वाढदिवसाला मात्र फोन करून किंवा व्हॉटसॲप संदेशातून औपचारिकपणे शुभेच्छा देतात. अशा औपचारिक वाढदिवस शुभेच्छा मला नकोशा वाटतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.६.२०२४


बुधवार, २६ जून, २०२४

दडपणाखाली जगताना!

दडपणाखाली जगताना!

जन्मापासून मरणापर्यंत माणूस जेवढा दडपणाखाली जगतो तेवढे दडपण घेऊन सृष्टीतील इतर कोणते सजीव जगतात? जंगलात ज्यांच्या डोक्यावर वाघ, सिंहाच्या जीवघेण्या हल्याची टांगती तलवार, भीतीची छाया सतत असते ते दुर्बल प्राणी सुद्धा माणसांनी स्वतःवरच निर्माण केलेल्या कृत्रिम दडपणांची भीती घेऊन जगत नसतात.  

माणसांनी माणसांवर लादलेल्या दडपणांची यादी शांतपणे विचार करून तयार करा. मी यालाच चिंतन व ध्यानधारणा म्हणतो. यात देवाला मध्ये आणायचे नाही. कारण ही ध्यानधारणा वेगळी आहे, हा योग वेगळा आहे. माणूस जन्मला की सुरूवातीची साधारण तीन वर्षे सोडली की बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा व महाविद्यालय (केजी टू पीजी म्हणजे किंडर गार्डन ते पोस्ट ग्रॕज्यूएट) असे शैक्षणिक अभ्यासाचे दडपण सुरू होते. हे दडपण दूर होते ना होते तोपर्यंत उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय करून आर्थिक कमाई करताना स्पर्धेत उतरून संघर्ष करण्याचे दडपण सुरू होते जे मरेपर्यंत चालू रहाते.

हे आर्थिक कमाईचे दडपण सुरू असताना मध्येच कुठून तरी सत्तेचा किडा डोक्यात वळवळू लागतो व त्यानंतर सुरू होते राजकारणाचे व राजकीय स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या राजकीय संघर्षाचे दडपण. ही सर्व दडपणे चालू असताना मध्येच विवाहाची हुरहूर लागते व माणूस लग्न करून मोकळा होतो. मग सुरू होते संसाराची मोठी जबाबदारी व या जबाबदारीतून निर्माण होणारे मुलांच्या शिक्षणाचे, ती बिघडू नयेत म्हणून त्यांना योग्य संस्कार देऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे दडपण, त्यांचे विवाह होऊन ती मुले आर्थिकदृष्ट्या पायावर सक्षमपणे उभी राहण्याचे व विवाह करून त्यांच्या संसारात स्थिर होण्याचे दडपण व इतर बरीच संसाराची दडपणे ज्यांची यादी संपता संपत नाही कारण माणूस आपल्या कुटुंबाविषयी फारच संवेदनशील असतो.

मानवी मनावरील दडपणांची यादी इथेच संपत नाही. भांडवलशाही शोषणाचे दडपण, वेळेचे दडपण, लोक काय म्हणतील याचे दडपण, समाजाने लादलेल्या अनेक धर्मांचे व त्या धर्मांतील आंतरधर्मीय विवाद, धार्मिक युद्धांचे दडपण, सांस्कृतिक रूढी, परंपराचे दडपण, समाजातील वर्णव्यवस्था, जातीपातींचे दडपण, वंशवाद, प्रांतवाद,भाषावाद यांचे दडपण, अंधश्रद्धा फेकून देताना अंधश्रद्ध लोकांच्या रागाचे दडपण, किचकट समाज कायद्याचे दडपण, बाहेर फिरताना खिशातील पैशाचे पाकिट कोणीतरी मारणार नाही ना, आपला मोबाईल फोन कोणीतरी पळवून तर नेणार नाही ना हे दडपण, रस्ता ओलांडताना एखादे वाहन सिग्नल तोडून अंगावरून तर जाणार नाही ना या भीतीचे दडपण, एखाद्या भिकाऱ्याला भीक दिली नाही तर परोपकार, करूणेच्या भावनेतून चुकल्याची भावना मनात निर्माण होते त्या भावनेचे दडपण, अहो इतकेच काय घरातील गॕस, लाईट, पाणी यांच्या बटणांचे दडपण. बटण नीट लागलेय ना, शाॕर्ट सर्किट, गॕस स्फोट होणार नाही ना, पाणी फुकट वाया जाणार नाही ना, ही भीतीयुक्त दडपणे घरातही चालूच असतात. वर पुन्हा नैसर्गिक आपत्ती, आजार यांचे दडपण चालूच असते. परमेश्वराचे ध्यान करून, योगासने करून ही दडपणे बिलकुल दूर होत नाहीत हे वास्तव आहे.

ही दडपणे (मी इथे लिहिलेल्या या कृत्रिम दडपणांची यादी अपूर्ण आहे) कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित आहेत. यात नैसर्गिक दडपणाचा भाग फार थोडा आहे. नीट विचार केला तर कळेल की, ही मानवनिर्मित कृत्रिम दडपणे माणूस सोडून सृष्टीतील इतर कोणत्याही सजीवाला नाहीत. ही कृत्रिम दडपणे झुगारून देऊन खऱ्या स्वातंत्र्याचा व खऱ्या मुक्तीचा आनंद माणसाला त्याच्या आयुष्यात ठरवूनही मिळत नाही कारण ही दडपणे मानवी मनावर मरेपर्यंत चालूच राहतात. या सर्व दडपणांची ओझी आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगणाऱ्या माणसाच्या सहनशक्तीची कमालच म्हणायची! 

-©ॲड.बी.एस.मौरे, २६.६.२०२४

वि.सू./टीपः

"दडपण, आता विराम आत्महत्येला" या मराठी चित्रपटाची प्रतिमा माझ्या या लेखाला केवळ प्रातिनिधीक चित्र म्हणून लावलेली आहे. हा चित्रपट मी बघितलेला नाही व त्याचा माझ्या या लेखाशी काहीही संबंध नाही. जर या चित्रपटातील सामाजिक संदेश माझ्या लेखातील काही भागाशी जुळत असेल तर तो केवळ एक योगायोग समजावा. दडपण चित्रपट निर्मात्याच्या कलात्मक प्रतिमेवरील स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) माझ्या प्रातिनिधीक कृतीने बाधित होत नाही. तरी सामाजिक कर्तव्य म्हणून त्या निर्मात्याविषयी सौजन्य व्यक्त करतो.

-ॲड.बी.एस.मोरे, २६.६.२०२४