https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २९ मे, २०२४

माध्यमाचे विपणन महत्व!

माध्यमाचे विपणन महत्व!

ज्याप्रमाणे वस्तू उत्पादन केंद्र हे वस्तूंची सार्वजनिक विक्री करून त्यातून करोडो रूपयांचा नफा कमावण्याचे माध्यम असते तसे चित्रपट निर्मिती केंद्र हे चित्रपट कलाकारांच्या कलेची सार्वजनिक विक्री करून त्यातून करोडो रूपयांचा नफा कमावण्याचे व चित्रपट निर्मिती केंद्राच्या त्या नफ्यातून कलाकारांनी कोट्यवधी रूपयांची कला फी मिळविण्याचे माध्यम असते. तसेच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या बाजारात नेत्यांना उभे करून लाखो, करोडो लोकांची पसंती मिळवून राजकीय सत्ता प्राप्त करण्याचे माध्यम असते. अर्थात तुम्हाला जर भरपूर पैसा, सत्ता व मानसन्मान मिळवायचा असेल तर तुमच्याकडे विशिष्ट कामाचे नुसते ज्ञान, कौशल्य असून उपयोग नसतो तर तुमचे ते ज्ञान, कौशल्य असंख्य लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रबळ सार्वजनिक माध्यम तुमच्या सोबत असणे गरजेचे असते. फेसबुक, यु ट्युब सारख्या समाज माध्यमांचा उपयोग सुद्धा आता चाणाक्ष निर्मिती केंद्रे, व्यावसायिक लोक त्यांची उत्पादने, सेवा हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यातून आर्थिक नफा कमावण्यासाठी करतात ही गोष्ट आता लपून राहिली नाही. अशी सार्वजनिक माध्यमे तुमच्याकडे जेवढी जास्त तेवढी तुमची नफ्याची संधी मोठी आणि या संधीसाठी तुमच्याकडे एखाद्या कामाचे नुसते ज्ञान, कौशल्य असून उपयोग नसतो तर जवळ भरपूर पैशाचे भांडवल लागते. निस्वार्थी समाजसेवी भावनेने समाज माध्यमातून समाज प्रबोधक लेखन करून ज्ञान, विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणारी माणसे अशा बाजारात मूर्ख ठरतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.५.२०२४

मंगळवार, २८ मे, २०२४

सिलेक्टिव्ह व इलेक्टिव्ह मेरिट!

सिलेक्टिव्ह व इलेक्टिव्ह मेरिट!

शैक्षणिक ज्ञान संस्थांच्या परीक्षांचे निकाल म्हणजे ज्ञानसाधनेचे सिलेक्टिव्ह मेरिट तर लोकशाही राज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकप्रियतेचे इलेक्टिव्ह मेरिट, या दोन्ही मेरिटना एकत्र नांदवायचे म्हणजे कायद्याची तारेवरची कसरत! -ॲड.बी.एस.मोरे
२८.५.२०२४

शैक्षणिक ज्ञान संस्थांच्या परीक्षांचे निकाल म्हणजे ज्ञानसाधनेचे सिलेक्टिव्ह मेरिट आणि लोकशाही राज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकप्रियतेचे इलेक्टिव्ह मेरिट या विचारांवर आधारित ॲड. बी.एस. मोरे यांनी दिलेला हा विचार खूपच महत्त्वाचा आहे. यातून असे स्पष्ट होते की, शैक्षणिक प्रणालीमध्ये गुणवत्ता आणि ज्ञान यांना अधिक महत्त्व दिले जाते, ज्यामुळे निवडक विद्यार्थ्यांना संधी मिळते. तर, लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेच्या मताने निर्णय घेतला जातो, ज्यामध्ये लोकप्रियता महत्त्वाची ठरते.

या दोन प्रणालींना एकत्र नांदवणे म्हणजेच, शैक्षणिक गुणवत्ता आणि लोकशाही प्रक्रियेतून मिळणाऱ्या लोकप्रियतेचा समन्वय साधणे हे कायद्याच्या चौकटीत राहून करणे खूपच कठीण आहे. याचा अर्थ असा की, दोन्ही प्रणालींचे गुणधर्म वेगवेगळे असताना त्यांना एकत्रितपणे व्यवस्थापित करणे हे एक आव्हान आहे. यासाठी संतुलित आणि न्याय्य दृष्टिकोनाची आवश्यकता असते ज्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास होऊ शकेल.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता), २८.५.२०२४

वेळेचे बंधन!

वेळेचे बंधन!

वेळेच्या बंधनाचे ओझे घेऊन आयुष्यभर धावल्यानंतर उतार वयात हे ओझे थोडे सुद्धा नकोसे होते! -ॲड.बी.एस.मोरे, २८.५.२०२४

या वाक्यातील संदेश अत्यंत सार्थक आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारचे बंधन, जबाबदाऱ्या आणि ओझे येतात. कामाच्या ठिकाणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि सामाजिक बांधिलकी यामुळे व्यक्तीला वेळेचा वापर फारच काटेकोरपणे करावा लागतो. पण, जेव्हा वय उताराला लागते, तेव्हा हे बंधन आणि ओझे टाकून, निवांत आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. हे वाक्य हेच सांगते की, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर व्यक्तीला मनःशांती, आराम आणि बंधनमुक्त जीवनाची गरज असते.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता),
२८.५.२०२४

एकटा राहणारा माणूस!

एकटा राहणारा माणूस!

एकटा राहणारा माणूस सगळ्यांना नीट ओळखून बसल्यावरच एकटे राहणे पसंत करतो, अनुभवातून शहाणा झालेला असा माणूस एकटे राहण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम असतो! -ॲड.बी.एस.मोरे, २८.५.२०२४

हे वाक्य एकटेपणाच्या निवडीबद्दल एक महत्वपूर्ण आणि विचारप्रवण दृष्टिकोन व्यक्त करते. एकटा राहणारा माणूस हा समाजातील विविध व्यक्ती आणि त्यांच्या वागणुकीचा अनुभव घेऊनच एकटे राहणे निवडतो. त्याच्या या निर्णयामागे अनुभवाने आलेले ज्ञान असते. अनेकदा समाजातील दांभिकता, खोटेपणा किंवा मतलबीपणा यामुळे असे निर्णय घेतले जातात. एकटेपणाच्या निवडीमागे आत्मनिर्भरता, स्वातंत्र्य आणि मानसिक शांततेची इच्छा असते. त्यामुळे, असा माणूस एकटेपणातही समाधानी आणि समाधानी राहू शकतो, आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता), २८.५.२०२४

सोमवार, २७ मे, २०२४

वाटणी!

हिस्स्याची वाटणी चोरीच्या मालाची असो, राजकीय सत्तेची असो, भांडवली संपत्तीची असो की आईबापाच्या इस्टेटीची असो, शेवटी वाटणी ही वादाला कारणीभूत होतेच, वाटणीचे वाद सुरूवातीला दिवाणी स्वरूपाचे असले तरी पुढे त्यांना हिंसक स्वरूप लागून त्यांचे रूपांतर फौजदारी गुन्ह्यांत होऊ शकते, इतकी ही वाटणी भयंकर असते. -ॲड.बी.एस.मोरे

व्यवस्था बदलता येत नाही, तिच्यात काही सुधारणा करता येतात!

व्यवस्था बदलता येत नाही, तिच्यात काही प्रमाणात सुधारणा करता येतात!

निसर्गाची मूळ व्यवस्था कायम तीच आहे व अनंत काळापासून ती आहे तशीच चालू आहे. मानव समाज हा निसर्गाचाच भाग असल्याने समाज व्यवस्था ही सुद्धा निसर्ग व्यवस्थेचा भाग आहे. याच तर्काने मूळ निसर्ग व्यवस्था जर बदलता येत नसेल तर मूळ समाज व्यवस्था कशी बदलता येईल? जर मूळ निसर्ग व समाज व्यवस्था बदलताच येत नसेल तर ती आहे तशी स्वीकारण्याशिवाय पर्याय रहात नाही. हे वास्तव स्वीकारताना मूळ व्यवस्थेतील आभासी बदलाचे जे माकड चाळे, ज्या माकड चेष्टा व ज्या मंत्रचळी कृती काही लोकांनी चालवल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सुज्ञपणा होय. या माकड चाळ्यांत, माकड चेष्टांत व मंत्रचळी कृतीत सुज्ञ माणसाने प्रत्यक्ष सोडा पण अप्रत्यक्ष सुद्धा भाग घेऊ नये. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना कौतुकाचा असो की टीकेचा कोणताच प्रतिसाद देऊ नये.

मूळ निसर्ग व समाज व्यवस्था जरी बदलता येत नसली तरी माणसाने त्याची बुद्धी नीट वापरली तर याच मूळ व्यवस्थेचा माणसाला त्याच्या सोयीनुसार वापर करता येतो किंवा तिचे नीट व्यवस्थापन करता येते. याला व्यवस्थेतील सुधारणा असे म्हणता येईल. या सुधारणा काही प्रमाणातच करता येतात. प्रत्येक माणूस आपआपल्या वैयक्तिक बुद्धी व परिस्थितीनुसार त्याच्या स्वतःच्या सोयीसाठी, फायद्यासाठी अशा मर्यादित सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतो. हा प्रयत्न स्वतःपुरता म्हणजे स्वार्थी असतो आणि म्हणून तर एक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतः विकसित केलेली बौद्धिक तंत्रे, क्लृप्त्या सांगत नाही. यालाच तर धंद्याची गुपिते (बिझिनेस सिक्रेट्स) असे म्हणतात.

स्वतःपुरता स्वार्थ याचा व्यापक अर्थ स्वतःचे कुटुंब, स्वतःचे नातेवाईक, स्वतःचा समाज, स्वतःचे राज्य व स्वतःचे राष्ट्र असा हळूहळू वाढत जातो. माणूस त्याच्या बुद्धीने मूळ निसर्ग व समाज व्यवस्थेत स्वतःच्या सोयीसाठी ज्या तांत्रिक, सामाजिक सुधारणा करतो त्या सुधारणा जर मूळ व्यवस्थेच्या मूलभूत ढाच्याला, रचनेला घातक असतील तर अशा सुधारणा सामाजिक कायद्याने रोखल्या पाहिजेत नाहीतर विनाश अटळ आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.५.२०२४

रविवार, २६ मे, २०२४

व्यवहारात चुकीला माफी नाही!

व्यवहारात चुकीला माफी नाही!

निसर्ग व्यावहारिक आहे तसा मानव समाजही व्यावहारिक आहे. निसर्ग व समाज व्यवहारांमध्ये नैतिकतेचे व आध्यात्मिकतेचे प्रमाण किती याचा बारीक शोध घेतल्यास ते अत्यल्प असल्याचे दिसून येईल. खरं तर, कायदा आध्यात्मिक किंवा नैतिक नसून व्यावहारिक आहे. नैसर्गिक व्यवहारांचे निसर्ग नियम जसे निसर्गाने घालून दिले आहेत तसे सामाजिक व्यवहारांचे समाज नियम समाजाने घालून दिले आहेत. निसर्ग व समाज नियमांचा एकत्रित संच म्हणजे कायदा. अर्थात कायद्यात निसर्ग कायदा व समाज कायदा अशा दोन्ही कायद्यांचा समावेश होतो.

एखादा माणूस आध्यात्मिक दृष्ट्या कितीही देवश्रद्ध व पापभिरू असेल व नैतिक दृष्ट्या कितीही नीतीमान व निष्पाप असेल पण तो जर निसर्ग व समाज व्यवहाराच्या दृष्टीने मूर्ख असेल तर त्याला निसर्ग व समाज माफ करीत नाही. निसर्ग व्यवहारात निसर्ग कल्याण व निसर्ग सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात तसे समाज व्यवहारात समाज कल्याण व समाज सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात. कायद्याच्या या उद्देशांना बाधा आणणारे कोणतेही कृत्य हे बेकायदेशीर असते म्हणजेच ते अव्यावहारिक असते. माणसाच्या आध्यात्मिकतेला व नैतिकतेला जर कायद्यात एवढे महत्व असते तर देवश्रद्ध व नीतीमान माणूस कितीही अव्यावहारिक वागला तरी निसर्ग व समाज दोघांनीही त्याला उदार मनाने माफ केले असते. पण तसे नाही. व्यावहारिक चुकीला कायद्यात माफी नाही अर्थात व्यवहारात चुकीला माफी नाही.

पण व्यवहार शिकवणारा व व्यवहार बंधनात ठेवणारा निसर्ग व समाज कायदा खरंच किती लोकांना आवडतो? मुळात जनावरे असोत की माणसे, त्यांना बंधनात राहणेच आवडत नाही. त्यांना मुक्त जीवन हवे असते. म्हणून तर संधी मिळाली की स्वार्थी माणूस त्याच्या क्षणिक स्वार्थासाठी कायदा तोडायला तयार असतो. सगळ्याच माणसांचा हा सर्वसाधारण कल असतो. पण सर्वसामान्य माणसे याबाबतीत घाबरून मागे राहतात व बेरकी माणसे याबाबतीत पुढे जातात एवढाच काय तो फरक. याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावहारिक चूक करणारा सर्वसामान्य माणूस नेहमी कायद्याच्या कचाट्यात अगदी सहज सापडतो व त्याची लवकर सुटका होत नाही. धनदांडग्या, बेरक्या लोकांचे तसे नसते. तरीही कायदा कोणालाच सोडत नाही. तो कोणी मोडला की मग कोणी कितीही मोठा असो कायदा त्याला त्रास देतोच.

असा हा जबरदस्त व्यावहारिक कायदा स्वैर स्वातंत्र्याचे मुक्त जीवन जगू इच्छिणाऱ्या व बेरक्या लोकांना नकोसा वाटतो. म्हणून तर कंपनी संचालकांना प्राॕडक्शन मॕनेजर, मार्केटिंग मॕनेजर, आर्थिक हिशोब सांभाळणारे चार्टर्ड अकौंटंट ही व्यवस्थापक मंडळी उत्पादक माणसे वाटतात तर कंपनी व इतर कायद्यांचे व्यवस्थापन करणारा कंपनी सेक्रेटरी व कंपनीला कायदेविषयक सल्ला देणारा वकील हे कायदा तज्ज्ञ या भांडवलदार लोकांना कामात उगाच अडथळा आणणारी अनुत्पादक माणसे वाटतात. या भांडवलदार मंडळींचे काय घेऊन बसलात पण सर्वसामान्य माणसे सुद्धा वकिलाला फी देऊन वकिलाच्या माध्यमातून व्यावहारिक करार, दस्तऐवज करण्याचे टाळतात व असले मसुदे संगणकात साठवून बसलेल्या कायद्याचे अर्धवट ज्ञान असलेल्या टपरीवरील एखाद्या टायपिस्ट कडून कायद्याचे करार, दस्तऐवज स्वस्तात करून घेतात आणि मग पुढे ही मंडळी कशात अडकली, फसली की वकिलाकडे रडत येतात. 

लक्षात ठेवा, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. व्यवहार ज्ञान म्हणजेच कायद्याचे ज्ञान. व्यवहारी बना याचा अर्थ कायदेशीर वागा. तुम्ही कितीही देवधर्म करा, कितीही मोठे समाजकार्य करा, हल्लीच्या समाज माध्यमावर कितीही मित्र संख्या वाढवा व समाज माध्यमावर कितीही समाजप्रबोधक लेखन करा जर तुमच्या मूर्खपणातून तुमच्या कडून एखादी जरी व्यावहारिक चूक झाली तर तुमची वाहवा करणारी मंडळी, मित्र इतकेच काय तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत. बाकी अशा प्रसंगात बाहेरचा समाज तर तुमच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवायला टपूनच बसलेला असतो. कारण व्यवहारात चुकीला माफी नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.५.२०२४