https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

उतावीळपणा, चिंतातुरपणा!

उतावीळपणा व चिंतातुरपणा, कारणे व उपाय!

ज्या माणसाला तरूण, प्रौढ व वृद्ध वयातही लहान मुलासारखे जगता येते त्या माणसासारखे सुंदर जीवन नाही. लहानपणी भूक लागली तरी आईवडील भाकरी देणार याची खात्री असते. त्यामुळे काळजीचे कारण नसते. लहानपणात लैंगिक वासना नसते त्यामुळे वासनेने व्याकुळ, उतावीळ होण्याची गोष्ट नसते. शालेय शिक्षणातून काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद असतो. त्यामुळे त्याचा ताण जाणवत नाही. त्यामुळे लहानपणी आनंद, शांती, स्थिरता, एकाग्रता, निरागसता या सगळ्याच गोष्टी अत्युच्च शिखरावर असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतशा वासना वाढतात व त्याबरोबर जबाबदाऱ्याही. मग मन वासनेने उतावीळ व जबाबदारीच्या भितीने चिंतातुर होते. उतावीळपणा व चिंतातुरपणा ही दोन्ही मनाच्या भावनिक उद्रेकाची, मानसिक आजाराची लक्षणे आहेत. पण या दोन्ही मागची कारणे वेगळी आहेत. उतावीळपणा वासना काबूत ठेवता न आल्याने निर्माण होतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण यातूनच निर्माण झाली असावी. तर चिंतातुरपणा भितीवर मात करता न आल्याने निर्माण होतो. भावनिक उद्रेकाची ही दोन्ही लक्षणे फार त्रासदायक असतात. एकाग्रता कमी होणे, मन अस्थिर, अशांत राहणे हे मानसिक क्लेश, वेदना भावनिक उद्रेकाच्या या दोन लक्षणांमुळे मनाला होतात. या लक्षणांमुळे जीवनाचा आनंद कमी होतो. जो माणूस वासनेने उतावीळ व भितीने चिंतातुर होत नाही तो माणूस लहान मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

लोकांना ज्ञानामृत पाजणे किती धोकादायक?

लोकांना ज्ञानामृत पाजणे किती धोक्याचे?

काही निरर्थक गोष्टी केवळ लोक काय म्हणतील या लोकांच्या दबावामुळे आपण करीत असतो. निसर्ग विज्ञानाच्या दृष्टीने अवास्तव असणाऱ्या काही प्रथा, परंपरा केवळ पिढ्यानपिढ्या चालत आल्यात व लोकही आंधळेपणाने त्या पाळतात म्हणून त्या मनाला पटल्या नाहीत तरी पाळायच्या म्हणजे स्वतःच्या मनाने स्वतःलाच फसवणे होय. सखोल अभ्यासाच्या बौद्धिक कष्टातून मनाला कळलेली काही गुपीते सत्य असली तरी ती लोकांना सांगायची नसतात. लोक असे सत्य स्वीकारण्याची गोष्ट तर सोडाच पण ते सहन न झाल्याने लोकांना वास्तवाचे असे ज्ञानामृत पाजणाऱ्यालाच लोक जबरदस्तीने विष प्यायला भाग पाडतील. महान ग्रीक तत्वज्ञ साॕक्रेटिस हे याचे ठळक उदाहरण आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा नियम!

नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम!

निसर्गाने त्याच्या उत्क्रांतीतून काय पण नमुने बनवून ठेवलेत या जगात. या नमुन्यांची विविधता नुसती वरवर बघितली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. मग ती तपासायला गेल्यावर तर काय मेंदूचा पार भुगाच होऊन जातो.

या जगात निर्जीव पदार्थांचे नमुने किती, अर्धसजीव वनस्पतींचे नमुने किती, सजीव प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे मासे, हवेत उडणारे पक्षी, किटक, जमिनीवर सरपटणारे प्राणी, जमिनीवरील शाकाहारी, मांसाहारी चार पायांचे प्राणी, दोन पायांची व दोन हातांची माणसे यांचे नमुने किती, बापरे या सर्वांचा अभ्यास करून या सर्वांबरोबर राहणे म्हणजे केवढे कठीण काम.

वरील नमुनेदार पदार्थ, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार या जगात नमुनेदार हालचाल करीत असतात. या सर्वात माणूस हा खास नमुनेदार प्राणी. हा खास नमुना निसर्गाने काय विचार करून बनवला असेल (उत्क्रांत केला असेल) हे कळायला मार्ग नाही आणि निसर्गाला मन, बुद्धी आहे का व तो विचार करतो का हे कळायला पण मार्ग नाही.

निसर्गाचा खास नमुना असलेल्या बुद्धिमान माणसाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याचे जीवन खास नमुनेदार बनविलेले आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या जीवनाला वैज्ञानिक व तांत्रिक, कलात्मक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, शासकीय, कायदेशीर, सांस्कृतिक, आध्यात्मिक आकार दिला आहे जो आकार खास नमुनेदार आहे.

मनुष्याने त्याच्या जीवनाला विशेष आकार देताना निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम ओळखला. या नियमानुसार जो बलवान तोच श्रेष्ठ हे त्याला कळले. मग श्रेष्ठ नव्हे तर सर्वश्रेष्ठ होण्यासाठी त्याने इतर प्राण्यांपेक्षा अधिक बलवान व्हायचे ठरवले. त्यासाठी त्याने सामाजिक जीवन स्वीकारून समूहाने रहायचे ठरवले. त्यातून कुटुंबे, समाज गट, निरनिराळी राज्ये, राष्ट्रे निर्माण झाली. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये महाशक्ती (सुपर पाॕवर) बनण्याची स्पर्धा सुरू झाली आणि या सर्वांचा मूळ पाया काय तर बळी तो कानपिळी हा मूलभूत निसर्ग नियम.

गंमत ही की बळी तो कानपिळी या नियमाला बुद्धिमान माणसाने देव कल्पनेतून आध्यात्मिक रंग दिला. म्हणजे काय तर मनुष्य जीवनाला त्रासदायक असलेल्या नमुनेदार जगातील ज्या ज्या उपद्रवी गोष्टी असतील त्यांना मनुष्याने दुष्ट राक्षस अशी उपमा देऊन टाकली. त्यातून वाईट, विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांवरही राक्षस असा शिक्का बसला. मग या दुष्ट राक्षसांचा संपूर्ण विनाश करण्यासाठी किंवा त्यांचा विनाश होत नाही म्हणून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मानवी जीवन कल्याणकारी व संरक्षक शक्ती ज्या ज्या माणसांनी सिद्ध केल्या त्या त्या बलवान माणसांना देवत्व प्राप्त झाले. असे देवराज्य स्थापन करणारे महान राजे पूजनीय झाले. असे राजेच काय पण समाज कल्याणकारी काम करणारे महापुरूष सुद्धा वंदनीय झाले. लोक त्यांना वंदन करू लागले. मग पुढे लोकांनी त्यांचे पुतळे निर्माण केले. देव व राक्षस यांच्यातील युद्धाच्या मुळाशी शेवटी आहे काय तर निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम. असे आहे हे नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४

ईश्वरकण (गाॕड पार्टिकल)?

ईश्वरकण (गाॕड पार्टिकल)?

विश्वनिर्मितीचा वैज्ञानिक सिद्धांत किती जणांनी अभ्यासलाय व किती जणांना कळलाय? या सिद्धांताला इंग्रजीत बिग बँग थिअरी म्हणतात. अंतराळ पोकळीत कोणत्या तरी सूक्ष्म कणाचा महास्फोट झाला व मग त्या कणाचे अनेक कण बनून विश्वनिर्मितीला सुरूवात झाली व या कणांचे हळूहळू प्रसरण होत पदार्थ कणांचे विश्व निर्माण झाले जे आता अस्तित्वात आहे असा काहीसा हा ढोबळ सिद्धांत.

विश्वाचा निर्माता व नियंता परमेश्वर आहे असे मानणारे लोक म्हणजे देवश्रद्ध आस्तिक लोक. ईश्वराचे अस्तित्व मानून आस्तिकांनी जगात अनेक देवधर्म निर्माण केले. पण परमेश्वर जर विश्व निर्माता व नियंता असे मानले तर मग देवधर्म व निसर्ग विज्ञान यांची सांगड घालावी लागते. अशी सांगड घालताना मनात विचार येतो की ज्या सूक्ष्म कणाने त्याच्या महास्फोटातून विश्व निर्माण केले तो कण म्हणजे रंग, रूप, गुण, आकार नसलेला ईश्वर कण (गाॕड पार्टिकल) तर नसेल? तो ईश्वर कण म्हणजेच निर्गुण निराकार परमेश्वर असे मानायचे का? कण कण में है भगवान म्हणजे कणा कणात ईश्वर आहे असे मानले जाते. पण मानणे व असणे यात फरक आहे हे सांगायला नको.

बरं तो निर्गुण निराकार ईश्वर कण अंतराळ पोकळीत असाच फिरत असेल का? फिरताना त्याला भान नसेल का? मग त्याला अचानक भान येऊन स्वतःचा महास्फोट करून विश्वाची निर्मिती करावे असे का वाटले असेल? भानात येणे याचा अर्थ अगोदर भानात नसणे असा होतो. मग त्या ईश्वर कणाला त्याच्या महास्फोटापूर्वी कसलेच भान नसेल का?

हे अनेक प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे जर त्या निर्गुण निराकार ईश्वर कणाने विश्वरूपी शरीर धारण केले असे मानले तर मग या शरीरात त्याने एकीकडून देवत्वाचे चांगले गुण तर दुसरीकडून राक्षसत्वाचे वाईट गुण घुसवून त्या दोन विरोधी गुणांत कायमचे युद्ध लावून का दिले असावे? बरं या युद्धात तो निर्गुण निराकार ईश्वर कण म्हणजे परमेश्वर कोणाची बाजू घेतो हेच खरं तर कळायला मार्ग नाही. कारण दुष्ट प्रवृत्ती जगातून संपता संपत नाहीत. खरं तर चांगल्या व वाईट या दोन्ही प्रवृत्ती त्या एकाच निर्गुण निराकार परमेश्वराच्या (ईश्वर कणाच्या) दोन विभिन्न आवृत्त्या असल्याने तो परमेश्वर त्यातील वाईट आवृत्तीचा संपूर्ण विनाश करेल अशी भाबडी आशा करण्यात काय अर्थ आहे? आणि शेवटचा प्रश्न हा की अशी भाबडी आशा मनात धरून त्या निर्गुण निराकार ईश्वर कणास (परमेश्वरास) प्रार्थना करून काय उपयोग आहे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

जास्त खोलात जाऊ नये!

जास्त खोलात जाऊ नये!

सागराची खोली व आकाशाची उंची मोजण्याचा प्रयत्न करू नये. अती खोलात जाऊन विचार करू नये. कारण जास्त खोलात गेल्यास हाती गाळच येतो. निसर्ग विज्ञानाच्या जास्त खोलात गेले तर अंतराळ पोकळीत चाचपडत बसावे लागते व ईश्वर अध्यात्माच्या जास्त खोलात गेले तर ईश्वर तर सापडतच नाही पण वेड लागण्याची पाळी येते. त्या अनाकलनीय ईश्वराचे ध्यान केल्यास मिथ्या कल्पना वाढतच जातात व आध्यात्मिक शांती मिळण्याऐवजी माणूस भ्रमिष्ट होण्याची शक्यता असते. मग काय करावे? तर भानात यावे व वास्तवाचे ध्यान करून त्यात रमावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

DO NOT TRY TO EXPLAIN OR CONVINCE!

DO NOT TRY TO EXPLAIN OR CONVINCE!

Do not try to explain or convince in general and/or in specific your thoughts on science and/or law with people who are not learned even in basic framework of science and/or law.

First of all such people will not understand what you say and even if they understand little bit of your saying they will trouble you by asking you hundreds of questions without any fee consideration in return or may even oppose you with their half knowledge.

So be professional and do not get emotional about peoples ignorance in what you have learned by your hard and smart intellectual exercise and efforts.

If you are truly learned in any branch of science and/or law then just practice that branch of knowledge by sharing said valuable knowledge with the people who really need your said knowledge and your said professional service in said branch of knowledge in return for your reasonable fee consideration and that is all!

-©Adv.B.S.More, 10.1.2024

तुलना नको!

तुलना नको!

प्रसिद्ध वकील श्री. राम जेठमलानी ९४ वयापर्यंत सुप्रीम कोर्टात वकिली करीत होते. आताही मुंबई हायकोर्ट व इतर कोर्टात नव्वदी पार केलेले वकील कोर्टाच्या केसेसमध्ये सक्रिय आहेत. पण वय लांबले व जीवन सक्रियता लांबली म्हणून निसर्ग कोणाला सोडत नाही. शेवटी निसर्ग त्याचा इंगा दाखवतोच. गानसम्राज्ञी लता मंगेशकर दीर्घकाळ जगल्या व दीर्घकाळ गात होत्या. पण एक काळ असा आला की त्यांना त्यांनी गायलेलेच एखादे गाणे थोडे गायला विनंती केली तरी त्या हात जोडून नम्रपणे नकार द्यायच्या. देवानंद खूप वर्षे जगला व चित्रपट क्षेत्रात सक्रिय राहिला पण शेवटी त्याला माघार घेऊन गप्प बसावेच लागले. प्रसिद्ध किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा तो आवाज किती गोड व खणखणीत होता. नुसते ऐकतच रहावे. पण तो आवाजही हळूहळू निसर्गाने क्षीण केला. निसर्ग हा असा वयानुसार प्रत्येकाला गप्प बसवतो. जास्त वय जगणे म्हणजे वय लांबणे व ऐंशी, नव्वदी नंतरही सक्रिय राहता येणे हे निसर्गाचे अपवाद आहेत. त्या अपवादांची तुलना सर्वसाधारण नियमांशी करू नये. अपवाद हे शेवटी अपवादच असतात. उगवता सूर्य निरागस बाळासारखा, दुपारचा तळपता सूर्य तरूणांच्या सळसळत्या रक्ताचा व त्यांच्या प्रचंड मोठ्या उत्साहाचा तर मावळतीचा सूर्य आता पूर्वीसारखी हालचाल जमत नाही म्हणून केवळ नाईलाजास्तव गप्प बसाव्या लागणाऱ्या वृद्धांचा. काही वृद्धांच्या मावळतीच्या कळा थोड्याफार लांबतात म्हणून त्यांनी सत्तरीतच गळाटलेल्या वृद्धांसमोर त्यांचे ते आभासी तरूणपण व त्यातला तो आभासी आनंद नाचवू नये. त्यांची पण ती गप्प बसण्याची वेळ येणार असते. एका तरूण फेसबुक मित्राने माझी थोडी मरगळ बघून मला एक सूचना केली की मी गाण्यावर नाच करून आपले तारूण्य दाखवित व्हिडिओ बनवणाऱ्या ग्रुपला जाॕईन व्हावे. माझ्या वैचारिक पोस्टस न वाचताच असले सल्ले देणाऱ्या फेसबुकी मित्रांना काय म्हणावे. मी ज्येष्ठ वकील आहे. माझा वकील मित्रांचा व मनसे पक्षातील महाराष्ट्र सैनिकांचा मोठा ग्रूप आहे. पण तिथे वयानुसार मी जमेल तेवढाच सक्रिय असतो. या समाज गटांना संलग्न असणे हे ज्ञानाचे व सन्मानाचे काम आहे. गाणी गाणे किंवा नाच करणे या गोष्टी माझ्यासाठी नाहीत हे यांना कळत कसे नाही? तात्पर्य काय की कोणीही कोणाशी तुलना करू नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४