https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

भावनांना आवर घातला पाहिजे. वास्तव स्वीकारले पाहिजे. जुन्या पिढीतील जी माणसे जिवंत आहेत व बदललेल्या परिस्थितीतही व नवीन काळातही शरीराने नसली तरी मनाने तरी पूर्वीसारखी आहेत त्यांनाच फोन व व्हॉटसॲप संपर्कात ठेवणे याला उतार वयात अर्थ आहे. बाकी आपुलकीने चांगल्या संपर्कात असलेल्या जुन्या पिढीने जन्माला घातलेल्या नव्या पिढीशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा होय. एकतर ही नवीन पिढी जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टींना व त्यांच्या अनुभव विचारांना कालबाह्य समजत असते व तरूण रक्तामुळे स्वतःच्याच मस्तीत जगत असते.

उतार वयात स्वतःच्या मुलांशीही जपून बोलावे, वागावे लागते मग इतरांच्या मुलांशी काय बोलणार? मला हे कळायला जरा उशीरच झाला म्हणायचे नाहीतर माझ्या विचार, लेखांतून विशेष संपर्कात नसलेल्या जुन्या पिढीशी व संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेल्या नवीन पिढीशी संपर्क साधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत राहिलो नसतो.

मला काळजी याच गोष्टीची वाटते की जिवंत असताना संपर्कक्षेत्राच्या बाहेर असलेली ही माणसे मी शरीर व मनाने मेल्यावर माझ्या मयताला केवळ औपचारिकता म्हणून येतील का? मी मेलेला असल्यामुळे त्यांना "कारे बाबांनो, जिवंतपणी कुठे गेला होता तुम्ही" असा जाबही विचारू शकणार नाही. तेंव्हा माझा हा लेख हेच माझे मृत्यूपत्र समजून माझ्या  जिवंतपणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या अशा लोकांनी माझ्या अंत्यविधीला उगाच हजेरी लावू नये हीच मृत्यूपूर्व माझ्या अंतरात्म्याची इच्छा. अच्छे थे वो दिन लेकिन अब नही रहे! संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.११.२०२३

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

गिरण्यानंतर आता बी.डी.डी. चाळीही इतिहासजमा!

आमचा इतिहास भूतकाळात जमा!

वरळी बी.डी.डी. चाळी हळूहळू इतिहासात जमा होऊ लागल्यात. जांबोरी मैदानाशेजारच्या ३० ते ३५, ८, ९ व ११, नालंदा बुद्ध विहारच्या शेजारील ३९ व ४० व तबेला म्युनि. शाळेजवळील १०८ व १०९ अशा एकूण १३ बी.डी.डी. चाळी तोडून पोलीस मैदानात व इतर परिसरात वरळीतील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाचे काम जोरात चालू आहे. गिरण्या संपल्या व आता त्या बी.डी.डी. चाळीही संपत चालल्या. जांबोरी मैदानातील ललित कला भवन व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळही ओस पडलेय. शेजारचे अंबादेवी मंदिर मात्र होते तसे होत्या त्या ठिकाणी आहे. वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ५३, ६८, ७८, २०, १३ या चाळींत जांबोरी मैदानासमोरील ४९ नंबर चाळीतील आमच्या मराठा मंदिर वरळी हायस्कूलमधील माझे काही मित्र रहायचे. आता ते लांब रहायला गेलेत. आज त्यापैकी एका मित्राच्या १३ नंबर चाळीत जाऊन आलो. २० नंबर चाळीतही गेलो. मी माझ्या आईवडील व भावंडांसह ८४ नंबर चाळीतील ६६ नंबर खोलीत रहायचो. शेजारचा तेलगु मित्र आता ११० नंबर चाळीत रहातोय. पण आज त्याच्याकडे गेलो नाही. कारण मला एकट्यानेच वरळी परिसरात भटकंती करायची होती. जांबोरी मैदानात उद्या रविवार दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ संविधान दिनी आयोजित केलेल्या ज्वाला रॕलीची तयारी चालू असलेली दिसली. मोठे व्यासपीठ, मोठा मंडप व बैठक व्यवस्था या सर्वांनी जांबोरी मैदानाचे रूपांतर ज्वाला नगरात केल्याचे दिसले. त्या ठिकाणी मला ज्वाला महारॕलीच्या कार्यकर्त्यांकडून कढी भात देण्यात आला. सोबत थंड पाण्याची मोठी बाटलीही देण्यात आली. तो कढी भात मी जांबोरी मैदानातच बसून खाल्ला. शरीराने मागे जाता येत नसले तरी मनाने मागे जाऊन माझा भूतकाळ, जुना इतिहास मी आज जागवला आणि वर्तमानकाळातील बदल देखील पाहिले.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.११.२०२३

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म!

विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म!

हायड्रोजनचे दोन अणू (ॲटम) व आॕक्सिजनचा एक अणू (ॲटम) रासायनिक प्रक्रियेतून एकत्र आले की त्यातून पाणी हे संयुग तयार होते. पाण्याच्या संयुगाचा सूक्ष्म कण म्हणजे पाण्याचा रेणू (माॕलिक्युल). मूलद्रव्यांच्या अतिसूक्ष्म कणांना अणू (ॲटम) असे म्हणतात तर संयुगांच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू (माॕलिक्युल) असे म्हणतात. रेणू हा अणू पेक्षा थोडा मोठा असतो. अणू व रेणूत हा असा फरक आहे. गणितात एक अधिक एक मिळून दोनच होतात. हे भौतिक व रसायन शास्त्रीय अचूक, स्पष्ट, निश्चित गणिती निसर्ग विज्ञान होय. वनस्पती शास्त्र व मानवेतर जीवशास्त्र हे अचूक गणिती विज्ञान नसले तरी जवळजवळ निश्चित, स्पष्ट असे विज्ञान होय. पण मानवी जीवन विज्ञान हे अचूक गणिती विज्ञान नाही की जवळजवळ स्पष्ट, निश्चित विज्ञान नाही. ते निसर्गाचे अंदाजे, अस्पष्ट, अनिश्चित विज्ञान होय. याचे कारण म्हणजे इतर प्राणी मात्रांना असलेल्या जैविक वासना मनुष्य प्राण्यालाही असल्या तरी मानवी भावना व मानवी बुद्धी या दोन गोष्टी इतर निर्जीव व सजीव पदार्थांपासून पूर्णतः नसल्या तरी बऱ्याच अंशी वेगळ्या आहेत. म्हणून मानवी जीवन विज्ञान हे इतर विज्ञानांशी जोडले गेलेले पण तरीही एक स्वतंत्र विज्ञान आहे.

अचूक गणिती व जवळजवळ स्पष्ट, निश्चित विज्ञान व मानवी भावना आणि तर्कबुद्धी यांची अर्थपूर्ण देवाणघेवाण होऊन त्यातून मानवी जीवनविषयक तत्वज्ञान तयार होते. हे तत्वज्ञान संपूर्ण मानव समाजाने मान्य केले की त्याचा सामाजिक कायदा बनतो. याउलट मानवी जीवनविषयक तत्वज्ञानाला परमेश्वर श्रद्धा व भक्तीची जोड दिली की त्या तत्वज्ञानाचा धर्म होतो. अध्यात्म हे फक्त परमेश्वर श्रद्धा व भक्तीशी निगडित आहे. त्याचा बौद्धिक तत्वज्ञानाशी संबंध नाही. पण हेच अध्यात्म जर तत्वज्ञानाशी जोडले तर त्याचा धर्म बनतो. या धर्मातून अध्यात्म म्हणजे परमेश्वर बाजूला केला की शिल्लक राहते ते तत्वज्ञान ज्याला कायदा म्हणून समाज मान्यता मिळते. कायदा समाजमान्य झाला म्हणून धर्म समाजमान्य होईल असे नसते. म्हणून तर जगातील धर्माधर्मांमध्ये वाद आहेत. विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म या गोष्टी एकमेकांशी संलग्न व एकमेकांत गुंतलेल्या आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.११.२०२३

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

बदलणाऱ्या भूमिका!

बदलणाऱ्या भूमिका!

विविध गुणधर्माचे विविध निर्जीव व सजीव पदार्थ ही आहे आपल्या सृष्टीची रचना. या पदार्थांबरोबर विविध प्रकारचे अनेकविध व्यवहार करताना अनेकविध भूमिका पार पाडणे हे आहे मनुष्य जीवनाचे सार. माणसाला सतत एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत यावे लागते व हेच मोठे आव्हान असते. अशा अनेक आव्हानांशी माणसे दररोज सामना करीत असतात. हे इतके सहजपणे घडत असते की कित्येक वेळा एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत आपण कधी आलो हे आपल्याला कळतही नाही. भूमिकांची ही अशी सतत अदलाबदल होत असताना एखाद्या गोष्टीलाच बराच काळ धरून बसणे, तिला चिकटून राहणे, तिच्यात गुंतून राहणे म्हणजे वाट बघत असलेल्या दुसऱ्या अनेक भूमिकांना ताटकळत ठेवणे होय. एक भूमिका संपली की लगेच ती सोडून देऊन आवश्यक त्या दुसऱ्या भूमिकेत शिरता आले पाहिजे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.११.२०२३

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

स्थिर जीवन, शांत जीवन!

आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) होणे म्हणजे काय?

आयुष्य स्थिर नाही कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्य स्थिर नाही म्हणून मनही स्थिर नाही. तरीही माणूस स्थिर आयुष्याची व  स्थिर मनाची अपेक्षा करतो. त्यात त्याची चूक नसली तरी स्थिरता ही खूप कठीण गोष्ट आहे.

अज्ञानामुळे माणूस बौद्धिक दृष्ट्या अपंग होतो. बौद्धिक दृष्ट्या अपंग असलेला माणूस मानसिक दृष्ट्या अस्थिर होतो. म्हणून तो शाळा, काॕलेजातून शिक्षण घेऊन व पुढे  त्या ज्ञानाची अनुभव, सरावातून उजळणी करीत राहून आयुष्यात  शैक्षणिक स्थिरत्व आणण्याचा सतत प्रयत्न करतो. पण जगाचे ज्ञान भांडार एवढे मोठे आहे की मनुष्याने त्याच्या छोट्या आयुष्यात मिळवलेले तुटपुंजे ज्ञान आकाराने प्रचंड मोठ्या असलेल्या ज्ञानसागरात क्षुल्लकच राहते. त्यामुळे माणसाला शैक्षणिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही.

नुसते शैक्षणिक स्थिरत्व पुरेसे नसते. माणसाला आर्थिक स्थिरत्वही हवे असते. म्हणून माणूस नोकरी, उद्योग धंदा, व्यवसाय यात सातत्यपूर्ण स्थिरत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थिरत्व लाभावे. पण समाजात गरीब व श्रीमंत यातील आर्थिक दरी एवढी मोठी आहे की कितीही उच्च शिक्षण घेतले तरी गरिबांना पिढीजात श्रीमंतांएवढे आर्थिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही. काही माणसांना तर मरेपर्यंत कष्ट करीत रहावे लागते, मग ते कष्ट शारीरिक असो की बौद्धिक.

शैक्षणिक व आर्थिक स्थिरत्वानंतर माणूस कौटुंबिक स्थिरत्वासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी विवाह करून स्वतःचा जीवनसाथी, मुले यांचे छोटेसे कुटुंब बनवतो. पण काही जणांना हे कौटुंबिक स्थिरत्व लाभत नाही. काहींचे घटस्फोट होतात तर काहींची मुले वाया जातात.

सामान्य माणसाला सर्वसाधारणपणे आयुष्यात शैक्षणिक, आर्थिक व कौटुंबिक स्थिरत्व लाभले की तो खूश, सुखी समाधानी होतो. मोठ्या  भांडवलदार व राजकारणी मंडळींची गोष्टच निराळी. त्यांचे आर्थिक व राजकीय स्थैर्य वेगळे असते कारण त्यांची महत्वाकांक्षाही मोठी असते. पण भरपूर संपत्तीतून व राजकीय सत्तेतून त्यांना खरंच आयुष्यात स्थिरत्व व शांती लाभते का हा संशोधनाचा विषय आहे.

काही माणसे देवाधर्माच्या नादी लागून जीवनात आध्यात्मिक शांती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यातून खरंच परमेश्वर सापडतो का व आध्यात्मिक शांती लाभते का हाही संशोधनाचा विषय आहे.

घरातील वस्तू जिथल्या तिथे, नीट नेटक्या ठेवण्याचीही सवय काहींना असते. मी माझी कायद्याची व इतर पुस्तके, तसेच मला विशेष वाटलेली वृत्तपत्रांतील कात्रणे घरात ठराविक जागेवर नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे माझ्या मृत्यूनंतर काय होणार? ती बहुतेक रद्दीत जातील. कारण माझी बौद्धिक आवड व घरातील मंडळीची बौद्धिक आवड एकसारखी नाही. अर्थात माझ्या या संकलनाला स्थिरता नाही. जगाच्या प्रचंड मोठ्या ज्ञानभांडारात माझे हे ज्ञानभांडार फारच किरकोळ आहे.

तात्पर्य काय, तर माणूस त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) व्हायला बघतो, पण तो खरंच सेटल होतो का?

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.११.२०२३, कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

FROM HELL TO HEAVEN!

JOURNEY FROM HELL TO HEAVEN ON EARTH!

The Law for human beings is very big challenge from Nature for creating heaven on earth in the midst of hell all around on earth as evolved by Nature and also created by man on earth planet.

The forest life based on rule of survival of fittest is Nature oriented primary hell.

The black economy based on uncivilized and immoral way of human living such as prostitution, gambling etc. & underworld violence arising out of competition to control black economy is man oriented secondary hell.

The heaven is civilized & moral way of human living such as matrimonial sex & family life, lawful industry, trade and commerce etc. and lawful government for regulating such civilized way of human living. This heaven is all time challenge before human mind. The journey from hell to heaven on earth via man is very challenging journey and it still continues as journey because man has not fully succeeded in establishing heaven on earth out of hell on earth.

-©Adv.B.S.More,22.11.2023

दया कर, मदत कर!

दया कर, मदत कर?

निसर्ग हा पालनपोषणाचा पाळणा आहे तसा तो खडतर आव्हानांचा डोंगर आहे. हा पाळणा व डोंगर ही निसर्गातील सर्वोच्च शक्तीची अर्थात परमात्म्याची/परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून निसर्गालाच परमेश्वर मानणे चुकीचे!

इतर सजीव, निर्जीव पदार्थांप्रमाणे माणसे हीही परमेश्वराची लेकरे आहेत. या लेकरांना त्यांच्या माता पित्यांच्या माध्यमातून परमेश्वर काही काळ चमच्याने दूध भरवून आयते जगवतो. पण नंतर मात्र या लेकरांनी आईवडिलांवर कायम अवलंबून राहणे किंवा आयते खात बसणे हे परमेश्वराला बिलकुल मंजूर नाही.

आईवडिलांचा आयता घास खाऊन मोठ्या झालेल्या लेकरांनी स्वतःच्या ताकदीवर आव्हानांचा डोंगर पार करायला किंवा आकाशात उंच भरारी घ्यायला शिकावे लागते. ही नैसर्गिक ताकद परमेश्वराने प्रत्येक लेकराला दिली आहे. त्यात निसर्ग रचनेप्रमाणे कमीजास्त प्रमाण असू शकते. पण जगण्याची व लढण्याची ताकद परमेश्वराने प्रत्येकाला दिली आहे हे मात्र खरे!

सगळ्याचा आईवडिलांना आपली मुले स्वबळावर आव्हानांंचा डोंगर पार करताना किंवा आकाशात उंच भरारी घेताना आवडतात. त्यांना आपली लेकरे पुन्हा पुन्हा रडत घरी परत आलेली व घरात रडत बसलेली आवडत नाहीत. आदर म्हणून त्यांनी आईवडिलांच्या पाया पडून बाहेर पडणे वेगळे व सारखे सारखे त्यांचे रडगाणे आईवडिलांपुढे गात बसणे वेगळे. परमेश्वर तर नश्वर देहाच्या आईवडिलांचाही अनंत काळचा सर्वोच्च आईबाप. त्याला त्याच्या लेकरांनी सारखे त्याच्यापुढे येऊन "दया कर, मदत कर" अशी प्रार्थना करणे कसे बरे आवडेल? त्याला आदरयुक्त नमस्कार करणे वेगळे व त्याच्यापुढे प्रार्थनेतून रडगाणे गाणे वेगळे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.११.२०२३