https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

मुगल बादशहा औरंगजेब १७०७ ते १६१८ असे एकूण ८८ वर्षे आयुष्य जगला तर छत्रपती  शिवाजी महाराज हे १६३० ते ते १६८० म्हणजे फक्त ५० वर्षे आयुष्य जगले. औरंगजेबाच्या आयुष्याची लांबी जास्त पण जगण्याची उंची खूप कमी. याउलट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याची लांबी खूपच कमी म्हणजे फक्त ५० वर्षे (१६३०-१६८०) पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानत! तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पण फक्त ६४ वर्षे जगले (१८९१-१९५६) म्हणजे त्यांच्या आयुष्याची लांबी तशी कमीच पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण डॉ.आंबेडकर यांना महामानव मानत! अर्थात माणूस किती वर्षे जगला याला महत्व नाही तर तो कसा जगला याला महत्व आहे. आनंद पिक्चर मध्ये राजेश खन्नाच्या तोंडून या संदर्भात एक अर्थपूर्ण वाक्य बाहेर पडलेय "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये"! मनुष्य जीवन खूप अनमोल आहे. त्या जीवनाचे मनुष्याने सार्थक केले पाहिजे.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

आत्म्याचे परमात्म्याशी मिलन!

निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची, पण तरीही आत्म्याचे परमात्म्याशी मिलन शक्य!

(१) निसर्ग म्हणजे तरी काय? विश्वातील ग्रह, ताऱ्यांचा समुच्चय (अवकाश) व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या विविध सजीव व निर्जीव पदार्थांचा समुच्चय (सृष्टी) यांची गोळाबेरीज अर्थात संपूर्ण अवकाश व संपूर्ण सृष्टी व या अवकाश व सृष्टीची रचना व व्यवस्था अर्थात संपूर्ण विश्व व सृष्टीचे पर्यावरण असा निसर्गाचा अर्थ घेता येईल.

(२) अशा या निसर्गाची रचना व व्यवस्था फार गुंतागुंतीची आहे. पण ती अनाकलनीय आहे असेही म्हणता येणार नाही. कारण विज्ञानाने अर्थात मानवी बुद्धीच्या संशोधनातून मानवाला प्राप्त झालेल्या ज्ञानाने निसर्ग रचनेचे व निसर्ग व्यवस्थेचे गूढ बऱ्याच अंशी उघड केले आहे. पण विज्ञानाने निसर्गातील सगळ्याच गोष्टी उघड केलेल्या नाहीत. निसर्गात अजून बरीच गुपिते दडली आहेत. ती गुपिते उलघडण्याच्या मार्गावर विज्ञानाचा खडतर व लांबचा प्रवास चालू आहे.

(३) हेही खरे आहे की, विज्ञानाला आतापर्यंत गवसलेले निसर्गाचे सत्य हे अचंबित करून टाकणारे आहे. निसर्गातील आश्चर्ये बघून नुसते कौतुकच वाटत नाही तर आश्चर्यचकित व्हायला होते. कौतुक व आश्चर्य यांचे मिश्र भाव निर्माण करणाऱ्या निसर्गाच्या या सत्यात स्वर्गसुखाचा आनंद आहे तशा नरकयातनांचे दुःखही आहे. स्वर्गसुखाचा आनंद देणाऱ्या सहज व सुंदर आर्थिक देवाणघेवाणीच्या कोमल बागा आहेत तशी नरकयातनांचे दुःख देणारी काटेरी जंगले सुद्धा आहेत.

(४) या काटेरी जंगलातूनच सहज, सुंदर अशा आर्थिक देवाणघेवाणीचा मार्ग जात असल्याने अर्थात नरकातून स्वर्गाचा मार्ग जात असल्याने सुख देणाऱ्या स्वर्गाच्या वाटेवरील जंगली काटे दूर करण्याचे आव्हान म्हणजे संकटातून सुटका करून घेण्याचे राजकीय आव्हान यशस्वीपणे  पेलल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. म्हणजेच खडतर राजकारणाशिवाय सहज आनंद देणारे अर्थकारण नाही असा याचा सरळसाधा अर्थ!

(५) मनुष्य जीवनाचे अर्थकारण हे गुलाबाच्या  फुलाप्रमाणे कोमल आहे तर मनुष्य जीवनाचे राजकारण हे त्या फुलाला चिकटलेल्या काट्यां प्रमाणे कठोर आहे. निसर्गाचे हे दुहेरी सत्य अनुभवताना मानवी मनाला निसर्गातील देव आठवला नाही तर नवलच! मग या अदृश्य देवाची आध्यात्मिक भक्ती करताना मानवी मन दोन गोष्टी करते. एक म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद दिल्याबद्दल देवाचे आर्थिक आभार मानणे व दोन म्हणजे नरकयातनांचे दुःख सहन होत नाही म्हणून या यातनांतून अर्थात स्वर्गाच्या आर्थिक मार्गावरील संकटांच्या आव्हानातून सुटका होण्यासाठी देवाची राजकीय प्रार्थना करणे.

(६) म्हणजे देवाची मानवी भक्ती आध्यात्मिक असत नाही तर ती स्वार्थी, भौतिक, आर्थिक व राजकीय असते. सद्याच्या कोरोना विषाणूच्या संकटातून मुक्तता करून घेण्यासाठी जर मनुष्य   देव प्रार्थना करेल तर ती भौतिक-राजकीय प्रार्थना असेल. अशाप्रकारे निसर्गाची भौतिकता हीच मनुष्याला देवाची आध्यात्मिकता शिकवते असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत वैयक्तिक असल्याने त्यावर कृपया धार्मिक वादविवाद नकोत!

(७) आता पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मग निसर्गात देव आहे हे मान्य करायचे की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मी मनुष्याच्या शरीर रचनेचे उदाहरण समोर ठेवतो. आपले शरीर अनेक मांस पेशींचा समुच्चय असलेल्या अनेक मांसल अवयवांनी बनलेले आहे. या बहु अवयवी शरीराच्या इमारतीला हाडांचा आधार आहे. म्हणजे हाडांच्या सांगाड्यावर आपल्या शरीराची इमारत उभी आहे. आता या शरीर इमारतीचा राजा कोण तर आपला मेंदू! याच तर्काने गुंतागुंतीच्या मानवी शरीराला जर मेंदू नावाचा राजा आहे तर मग गुंतागुंतीच्या निसर्ग शरीराला देव नावाचा राजा का असू नये? हा देव राजाच निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा नियंत्रक किंवा व्यवस्थापक असे का मानू नये? केवळ हा निसर्गराजा (देव) दिसत नाही म्हणून?

(८) याच वैज्ञानिक तर्काने मी निसर्गात देवाचे अस्तित्व मानतो. पण शरीराच्या राजाचे अर्थात मेंदूचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येते तसे निसर्गाच्या राजाचे अर्थात देवाचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येत नाही हे खरे आहे. पण जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पुराव्याने सिद्ध करता येत नाहीत. पण त्या नसतातच असे नसते. केवळ पुरावा नाही म्हणून संशयाचा फायदा देऊन कोर्टातून निर्दोष सुटलेले आरोपी हे गुन्हेगार नसतातच असे ठामपणे म्हणता येईल का? मग नास्तिक लोक केवळ पुराव्याचे तुणतुणे वाजवीत निसर्गात देव नाहीच असे ठामपणे कसे म्हणू शकतात? माझी देवाविषयीची आस्तिकता ही अशी वैज्ञानिक तर्कावर आधारित आहे व हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही म्हणून त्याला कोणी कचराकुंडीत टाकून देईल तर तो त्याचा निर्णय असेल. माझ्या या वैज्ञानिक तर्काला कोणी कचराकुंडी दाखवली म्हणून मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मी वैज्ञानिक आस्तिक आहे.

(९) आपल्या शरीराची रचना व व्यवस्था जशी गुंतागुंतीची आहे तशीच निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीर व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना आपल्या मेंदूला किती त्रास होतो याचा अनुभव आपण प्रत्येकजण पदोपदी घेत असतो. मेंदू आपल्या शरीर अवयवांचे नियंत्रण करू शकतो कारण हे अवयव त्यांच्या ठिकाणी नीट कार्य करीत असतात म्हणून! पण शरीराचे बहुतेक अवयव नीट काम करेनासे झाले म्हणजे जर आपल्या शरीराला बहुअवयव बिघाडाचा मोठा आजार (मल्टिपल अॉर्गन डिसअॉर्डर) झाला तर आपल्या मेंदूची स्थिती काय होईल? याला शारीरिक आणीबाणी म्हणतात.

(१०) देशाच्या निरनिराळ्या राज्यांत व देशाच्या नागरिकांत योग्य समन्वय राहिला नाही की मग देशातही अराजक निर्माण होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा कस लागतो. याच न्यायाने निसर्गाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना निसर्गाच्या राजाचा म्हणजे देवाचा कस लागत असेल का? जर आपल्या शरीराच्या बहुतेक अवयवांचे नटबोल्टस सैल झाले तर ते घट्ट करायला आपला मेंदू कुठेकुठे म्हणून धावेल? तो एकाग्र मनाने, एकचित्ताने कार्य करू शकेल का? आपल्या मेंदूची ही एवढी अवघड स्थिती तर देवाची स्थिती काय असेल?

(११) मला एवढे कळते की, मनुष्य जीवन अनमोल आहे. त्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर भौतिक वासना,आध्यात्मिक भावना व दोन्हीत संतुलन ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी या तिन्हीचे मिश्रण असलेला मानवी मेंदू जो मानवी शरीराचा राजा आहे तो म्हणजेच मानवी आत्मा व निसर्गाचा राजा म्हणजे देव तो म्हणजे  परमात्मा यांचे म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे मिलन हे मनुष्याच्या जिवंतपणीच शक्य आहे, मनुष्य मेल्यावर नाही. मनुष्य मरतो म्हणजेच त्याचा मेंदू मरतो. मनुष्य मेल्यावर जर त्याचा आत्माच शिल्लक रहात नाही तर त्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन कसे शक्य आहे? म्हणून जिवंतपणीच मनुष्याने त्याचे माणूसपण जपले पाहिजे. आत्मा (स्वतःचा मेंदू) व परमात्मा (निसर्गाचा मेंदू) यांच्यातील समन्वयाचा अर्थात  मिलनाचा अनुभव घेत हे माणूसपण जपणे सर्व माणसांना शक्य आहे असे मला वाटते.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

सापाची भीती!

सापाचा प्रत्यक्ष अनुभव!

साप म्हटला की भीती ही वाटतेच. १९७६-७७ सालची ही घटना आहे. मी पोदार कॉलेजच्या एन.एस.एस. कँप साठी ठाणे जिल्ह्यातील बऱ्हाणपूर गावातील आदिवासी पाड्यावर गेलो होतो तेंव्हा मला अचानक संडास लागली होती. तिथल्या आदिवासीने एक छोटे चिनपाट पाणी भरून दिले व लांब तिकडे जाऊन संडास करायला सांगितले. आजूबाजूला भातशेती होती. मी दोन मोठ्या दगडांवर माझे पाय ठेऊन संडासला बसलो. तर काही वेळाने एक भलामोठा साप (या पोस्टसोबत असलेल्या प्रतिमेत दिसतोय ना अगदी तसाच व तेवढा मोठा साप) बरोबर माझ्या खालून सरपटत आला आणि माझ्या समोरच्या भातशेतीच्या गवतात गुडूप झाला. तो साप खाली आणि मी बरोबर त्या सापाच्या वर दोन दगडांवर पाय ठेऊन बसलेलो. जरा जरी हललो असतो तर माझ्या ढुंगणालाच तो साप कडकडून चावला असता. तो प्रसंग, तो थरार मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

परमेश्वरा, सुख शांती!

परमेश्वरा, सुख शांती!

परमेश्वर = निसर्ग/विश्व शरीराचा मेंदू (राजा),

सुख = सहज, सुंदर आर्थिक देवाणघेवाण,

शांती = क्लेशकारक आव्हाने/संकटे यातून
राजकीय सुटका.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

मुंबई लोकलसाठी मनसे आंदोलन!

मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी मनसेचे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन!

आज सोमवार दिनांक २१ सप्टेंबर, २०२० च्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या मनातील खळबळ उघड करून मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी सविनय कायदेभंगाचे अनोखे आंदोलन केले. मनसे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच चालू ठेवलेल्या मुंबई लोकल ट्रेन्समधून विनापरवानगी प्रवास करून व काही ठिकाणी शांततामय मार्गाने तो प्रयत्न करून महात्मा गांधीच्या मार्गाने सत्याग्रह केला व अन्यायकारक कायद्याच्या विरोधी सविनय कायदेभंग करण्याच्या महात्मा गांधीनी आम्हा भारतीयांना शिकवलेल्या मार्गाचा छान अवलंब केला. खरं तर, मनसेच्या खास खळ्ळ खट्याक स्टाईल आंदोलन करण्याच्या पद्धतीला बाजूला करणारे मनसेचे हे आंदोलन खरंच कौतुकास्पद आहे. एक वकील म्हणून मी या प्रश्नावर माझे कायदेशीर मत यापूर्वीच्या माझ्या दोन फेसबुक पोस्टसने जाहीरपणे मांडले होते. तसेच मी मा. राजसाहेब ठाकरे यांचा मनसे चाहता असल्याने या दोन्ही पोस्टस मी मनसेच्या फेसबुक पेज/  ग्रूप्सवर टाकल्या होत्या. माझी ती हाक मनसे नेतृत्वापर्यंत कुठेतरी पोहोचली असावी. तसेच मनसेने या प्रश्नावर जो जाहीर सर्व्हे घेतला होता त्यातही मी माझे मत हेच मांडले होते की आता बस्स झाले, लोकल ट्रेन्स चालू करा. लोकांनीही या मनसे सर्व्हेला भरभरून प्रतिसाद देऊन माझ्या मताप्रमाणेच मते मांडली होती. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे मनसेचे आजचे हे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन! मी स्वतः वकील असल्याने या आंदोलनात सामील झालो नाही. परंतु या आंदोलनातील मनसे मागणी ही पूर्णपणे कायदेशीर असल्याने माझा तिला पूर्ण  म्हणजे १००% जाहीर पाठिंबा आहे. या मनसे मागणीत कोणता कायदा दडला आहे हे जर कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्यांनी  माझे याविषयी लिहिलेले पूर्वीचे दोन फेसबुक लेख जरूर वाचावेत जे मी याखाली पुनःप्रसिद्ध करीत आहे. मला आशा आहे की, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सरकार योग्य ती दखल घेईल व मुंबई लोकल प्रवास योग्य त्या नियमांनुसार सर्वसामान्यांसाठी लवकरच निदान या महिनाअखेर तरी खुला करील.

जय महाराष्ट्र! जय मनसे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?

हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच  घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

टीपः

माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

एक राजकीय कालखंड संपला!

एक मोठा राजकीय कालखंड संपला!

(१) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (एस.ए.डांगे) व त्यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे हे दोघेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते! ही नावे आजच्या पिढीतील किती लोकांना माहित आहेत? कॉम्रेड एस.ए.डांगे हे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य. त्यांचे संबंध रशियाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत होते. कॉ. एस.ए.डांगे ९१ वर्षे जगले तर त्यांच्या कन्या कॉ. रोझा देशपांडे या ९२ वर्षे जगल्या. म्हणजे दोघांनीही आयुष्याची नव्वदी पार केली.

(२) ही दोन नावे माझ्या विशेष लक्षात राहिली कारण वरळी बी.डी.डी. चाळीत बालपण व तरूणपण जगत असताना मी गिरणगावातील कामगार चळवळीचा साक्षीदार आहे. खरं तर मुंबईतील गिरणी कामगारांची चळवळ म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची चळवळ. त्याकाळी वरळीतील जांबोरी मैदानात मी कॉम्रेड डांगे यांची भाषणे ऐकलीत. नंतर त्यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांनाही जवळून पाहिले आहे.

(३) तो काळच वेगळा होता. काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सलोखा हा भारत व रशिया यांच्या मैत्रीला कारणीभूत होता. याचे कारण म्हणजे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड एस.ए. डांगे यांची मैत्री! १९७६ मध्ये काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली घटना दुरूस्ती केली आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द घातला. यालाही काँग्रेसची कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली जवळीक  कारणीभूत होती. अर्थात त्यावेळी काँग्रेसचे राजकारण डावीकडे वळले होते.

(४) कॉम्रेड रोझा देशपांडे, मृणाल गोरे यांच्या एकत्रित चळवळी मी जवळून पाहिल्या आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेने कम्युनिस्ट पक्षाला गिरणगावातून संपवले. कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून झाला आणि गिरणी कामगार चळवळीतून कम्युनिस्ट पक्ष हद्दपार झाला.

(५) काल दिनांक १९.९.२०२० रोजी कॉम्रेड रोझा देशपांडे यांचे दुःखद निधन झाले आणि एक मोठा राजकीय कालखंड संपला. त्यांच्या निधनाने तो सर्व इतिहास पुन्हा डोळ्यासमोरून सरकला. तो इतिहास आजच्या पिढीतील लोकांना कळावा म्हणून हा लेख लिहिला आहे. कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.९.२०२०

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!

अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!

(१) कोरोना लॉकडाऊनचा मार्च २०२० पासून सुरू असलेला मोठा काळ हा माझ्या ज्ञानाच्या पुनर्विचाराचा, माझ्या मनात साचलेल्या खोट्या समजूती दूर करण्याचा, माझ्या पुनर्जन्माचा अर्थात मीच मला नव्याने भेटण्याचा, म्हणजेच  माझ्या आत्मपरीक्षणाचा, आत्मचिंतनाचा मोठा काळ!

(२) या काळात निसर्ग व देव, विज्ञान व धर्म, भौतिकता व आध्यात्मिकता या गहन विषयांवर सखोल आत्मचिंतन झाले. या आत्मचिंतनातून मला निसर्गातच देव गवसला व विज्ञानातच धर्म कळला. हेही कळले की, मी आतापर्यंतच्या आयुष्यात देवाला मंदिरात व देव प्रतिमांमध्ये बघत होतो व तिथे आध्यात्मिक भावनेने माझ्या हृदयाला झोकून देत होतो. पण प्रत्यक्षात मात्र  माझ्या जवळ असलेल्या देवाकडे दुर्लक्ष करीत होतो.

(३) या आत्मचिंतनातून हे कळले की, खरं तर मनुष्य जीवन हे इतर प्राणीमात्रांपासून वेगळ्या असलेल्या उच्च भौतिक कर्मांनीच बहुतांशी व्यापले आहे. या मानवी भौतिक कर्मांना उच्च शब्द चिकटल्याने ही कर्मे केवळ भौतिक न राहता भौतिक-आध्यात्मिक, वैज्ञानिक-धार्मिक अशी संमिश्र नैसर्गिक झाली आहेत. ही भौतिक कर्मे केवळ भौतिक वासनांच्या दबावाखाली व वासनांध घिसाडघाईने पार पाडावयाची नसून ती उच्च आध्यात्मिक दर्जाने पार पाडावयाची आहेत. विवाहसंस्था हा लैंगिकतेत आध्यात्मिक भावविश्वाचा अनुभव घेण्याचा एक उत्तम नमुना आहे.

(४) मनुष्याने त्याच्या जीवनात पार पाडावयाची उच्च दर्जेदार भौतिक कर्मे हा खरं तर निसर्गात असलेल्या देवाचाच आदेश आहे हे मला माझ्या आत्मचिंतनातून कळले. या भौतिक कर्मांनाच आध्यात्मिक दर्जा देऊन त्या कर्मांत मनुष्याने आपले हृदय झोकून दिले पाहिजे. हृदय झोकून देणे म्हणजे मनापासून, आंतरिक समाधानाने भौतिक कर्म पार पाडणे. अर्थात निसर्गाची भौतिक कर्मे आध्यात्मिक दर्जाने लक्षपूर्वक व हृदयापासून पार पाडली पाहिजेत.

(५) या आत्मचिंतनातून मानवी अर्थकारणात व राजकारणात सुद्धा अध्यात्म आहे हे मला छान कळले. उदाहरणार्थ, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी राज्यकारभार हा लोकांचे विश्वस्त म्हणूनच पार पाडला पाहिजे. कारण लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो व या विश्वासात उच्च दर्जाचा आध्यात्मिक भाव असतो.

(६) खरं तर, अध्यात्म हा मिथ्या कल्पनांच्या आभासात, स्वप्नवत जगात जगण्याचा, निव्वळ भावनिक श्रद्धेनेच देवाकडे बघण्याचा, किंवा मानवी बुद्धीने कल्पनेबरोबर मैत्री करून तिच्या भोवती रूंजी घालत तिच्या संगतीत स्वतःची बौद्धिक करमणूक, मनोरंजन करून घेण्याचा वरवरचा विषय नसून तो निसर्गाच्या सत्यात जगण्याचा व निसर्गातच देवाला बघण्याचा खोल विषय आहे. निसर्गाच्या विज्ञानाला देवाचा धर्म करून ते विज्ञान धर्माने जगत श्रेष्ठ मनुष्य जीवनाचे सार्थक करण्याचे मोठे आव्हान या अध्यात्मात आहे. माझे या गहन विषयावरील आत्मचिंतन पूर्ण झाले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o

टीपः

माझ्या वरील आत्मचिंतनाला समर्पक असे एक अत्यंत सुंदर असे मराठी गीत मला आठवले. या गीताचे बोल आहेत "शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी". हे गीत शब्दबद्ध केलेय गीतकार वंदना विटणकर यांनी व गायलेय महान गायक मोहम्मद रफी यांनी. विशेष म्हणजे या गीताला संगीत दिलेय ते मा. राजसाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी. अर्थात या गीताशी संबंधित तीनही व्यक्ती  या महान कलाकार. त्यांच्या नखाजवळही मी बसू शकत नाही. परंतु या कोरोना लॉकडाऊन काळात ईश्वरावर मी जे आत्मचिंतन केलेय व त्याच आत्मचिंतनावर आधारित वर जो काही लेख लिहिला आहे त्याचे व या अर्थपूर्ण गीताचे सूर जवळजवळ जुळत असल्याने मी हे गीत माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या गीतात माझ्या ईश्वरी आत्मचिंतनाचा आत्मा आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o