https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १३ जुलै, २०२०

महाकाळ!

काळाचा काळ तो महाकाळ, ज्याच्या पुढे झुकतात सगळे सदा सर्वकाळ!

काळाचा काळ तो महाकाळ! कोण आहे तो? सर्व देव व दैत्य यांच्यापेक्षाही खूप मोठा म्हणजे महान ईश्वर अर्थात महेश्वर आहे का तो? पण हे कसे कळणार? फक्त निसर्गात जे घडत असते त्यावरून आपण फक्त अंदाज बांधणार. सत्य काय ते त्या महाकाळालाच माहित! निसर्गात काळानुसार निर्माण होणारी परिस्थिती ही या महाकाळाचीच निर्मिती असावी का? आपण सर्व वेळोवेळी म्हणजे काळानुसार बदलणाऱ्या परिस्थितीचे गुलाम असतो. ज्यांच्या आई व वडिलांनी एके काळी सत्ता, संपत्तीच्या जोरावर राज्य केलेले असते अशा राजांची मुले पुढील काळात रंक झालेली आपल्याला का दिसतात?चित्रपट सृष्टीतील घराणी घ्या किंवा राजकीय सृष्टीतील घराणी घ्या किंवा इतर कोणतीही नावाजलेली घराणी घ्या, या घराण्यांची पुढील काळात पूर्ण वाताहत झालेली दिसते. हा ऱ्हास पुढील काळात कधीतरी, कुठून तरी सुरू होतो आणि घराणेशाहीला घरातूनच कीड लागून एकेकाळी सर्वसत्ताधीश असलेली घराणी काळाच्या ओघात नामशेष होतात. घराण्यातील  पुढील पिढीला घराण्याचा मोठा वारसा पुढे जपता येत नाही. अशी घराणी इतिहासात जमा होतात. आईवडील मुलांसाठी खूप काबाडकष्ट घेऊन त्यांच्या यशाची काही गणिते मांडतात व तशा योजना आखतात. पण काही मुले नेमकी आईवडिलांच्या योजनांविरूद्ध वर्तन करून त्या योजना धुळीला मिळवतात. त्यामुळे किती योजनाबद्ध रहावे याला मर्यादा आहेत. कारण काळाचा व काळाचा काळ असलेल्या महाकाळाचा महिमा मोठा असतो. या महाकाळालाच कोण महेश्वर म्हणतो, कोण नियती म्हणतो तर कोण निसर्ग म्हणून मोकळा होतो. काळानुसार परिस्थिती बदलते व मग कालच्या परिस्थितीशी सुसंगत असलेले कायदे आजच्या परिस्थितीत असंगत होतात. म्हणून तर काळानुसार कालबाह्य झालेले कायदे नेहमी  बदलावे लागतात. त्यामुळे आज अस्तित्वात असलेले कायदे एकदम परफेक्ट (परिपूर्ण) व निश्चित मानण्याचे कारण नाही. म्हणून अशा कायद्यांच्या जोरावर केली जाणारी हुकूमशाही ही तात्पुरती असते. पण मनाची संभ्रमावस्था टाळण्यासाठी आजच्या परिस्थितीशी सुसंगत असणारे आजचे कायदे पाळणे हे नैसर्गिक आहे. कारण तो महाकाळाने निर्माण केलेल्या आजच्या परिस्थितीचा सर्वोच्च हुकूम असतो व अशा हुकूमाची हुकूमशाही ही नैसर्गिक असते. आपण निसर्गातील ज्या मुख्य शक्तींना अर्थात देवांना मानतो व भजतो त्या देव देवतांनाही महाकाळाने निर्माण केलेल्या परिस्थिती नुसार बदलावे लागते, वागावे लागते. मग आपले काय? म्हणून भूतकाळात रमणे आणि/किंवा  भविष्यकाळात गमणे चूक! त्याऐवजी वर्तमान काळातील परिस्थिती ओळखून त्यानुसार कायदे करणे व त्या वर्तमान कायद्यांनुसार वागणे हेच योग्य होय. म्हणूनच कालाय तस्मै नमः असे म्हणतात. काळाचा काळ महाकाळ!  त्या महाकाळाचा सर्वोच्च हुकूम मानण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. काळाचा काळ तो महाकाळ, ज्याच्या पुढे झुकतात सगळे सदा सर्वकाळ!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.७.२०२०

RETRO LAW

RETROSPECTIVE EFFECT OF NEW LAW!

The laws made by government of people are man made and not God made or Nature made in perfect natural sense and therefore they cannot be absolute and therefore the retrospective implementation of new law is always challengeable. For example, the 2020 year's ban of Indian government against chinese apps such at Tiktok can only be prospective and not retrospective. Take the case of an artist whose self art videos made on Tiktok app prior to ban cannot be stopped by Indian government from getting published on you tube which is not banned by government of India. The artist removed Tiktop app and also removed all his art videos being his own intellectual property from his mobile phone after ban. But artist  uploaded said videos on you tube within check and control of Indian government so that government can check and remove said product automatically by automatic control system, if such videos are found to be against law. It is an humble trial of artist for saving his intellectual property on you tube if found alright by government. Actually, such art is
an Indian product made on chinese machine (Tiktop app) which was not banned in past at the time of its creation. Now that chinese machine is out by its ban but Indian product is uploaded on Indian machine viz. You Tube which is within control of government of India. Such Indian product may continue to show that past label of Tiktok but currently it is carried by India controlled and permitted platform or machine viz. You Tube. How can such upload be treated as against Tiktok Ban Law is question of law?

-Adv.B.S.More©14.7.2020

शुक्रवार, १० जुलै, २०२०

मला पुन्हा लवकर उठायचंय!

मला पुन्हा लवकर उठायचंय!

बाळू उठ, शाळेला उशीर होईल असे आईचे शब्द ऐकत व पाठीवर आईच्या हलक्या हाताचा स्पर्श अनुभवत डोळे चोळत चोळत मला हळूच लवकर उठायचंय आणि सकाळच्या शाळेत जायचंय!

रविवारी व सुट्टीच्या दिवशी चाळीतल्या मित्रांना जमवून मैदानावर क्रिकेट खेळायला जायचंय आणि त्यासाठी मला पुन्हा लवकर उठायचंय!

तरूण झाल्यावरही आईचे तेच मायेचे शब्द पहाटे ऐकत मला काळजीने लवकर उठायचंय आणि सकाळचे लॉ कॉलेज घाईघाईतच मला गाठायचंय!

मला पुन्हा लवकर उठायचंय आणि धावतच नोकरीचे ते ठिकाण गाठायचंय! तिथे लिफ्टने हळूहळू वर अॉफीसमध्ये जाताना लिफ्टमध्येच अॉफीसमधल्या मुलीला चिडवायचंय आणि त्या मुलीकडून बॉसला तक्रारच करते तुझी असे लाडीकपणे पुन्हा म्हणून घ्यायचंय!

अॉफीसमध्ये काम करीत असताना मला पुन्हा चुकायचंय आणि बॉसने फायरिंग केली की त्याच्याकडे बघत फिदीफिदी हसायचंय आणि ही मजा घेण्यासाठी म्हणून मला पुन्हा लवकर उठायचंय!

सकाळचे कोर्ट गाठण्यासाठी मला पुन्हा ट्रेनच्या गर्दीत घुसायचंय आणि कोर्टात पोहोचायला उशीर झाला म्हणून सिनियर कडून रागावून घ्यायचंय आणि त्यासाठी मला पुन्हा लवकर उठायचंय!

मुलीच्या शाळेत पॕरेन्टस मिटिंगला मला हजर रहायचंय आणि त्यासाठी मला पुन्हा लवकर उठायचंय!

माझ्या वर्तमानाला मला पुन्हा भूतकाळात घेऊन जायचंय नाहीतर त्या भूतकाळालाच वर्तमानात घेऊन यायचंय आणि काहीही करून मला पुन्हा लवकर उठायचंय!

-ॲड.बी.एस.मोरे©११.७.२०२०

https://m.facebook.com/story.php?story_fbid=154291126259849&id=100050368867397&sfnsn=wiwspwa&extid=i2FTiRCtEtMTquzP&d=w&vh=i


देवाला माना, पण कर्मकांडे सोडा!

देवाला माना, पण देवाची कर्मकांडे सोडा?

(१) निरीक्षण, तर्क(गृहीत), परीक्षण व अनुमान या विज्ञानाच्या चार पायऱ्या पार पाडल्यानंतरच निसर्गाचे सत्य कळते. आपण जेंव्हा निसर्गाचे म्हणजे आपल्या आजूबाजूला पसरलेल्या सृष्टी किंवा विश्वाचे निरीक्षण करतो तेंव्हा त्या सृष्टीत आपल्याला पदार्थ व त्या पदार्थांची हालचाल जाणवते. मग या निरीक्षणातून त्या पदार्थांच्या  हालचालीमागे काय तथ्य किंवा सत्य असावे याविषयी कुतूहल निर्माण होते. ते तथ्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मग आपल्या तार्किक बुद्धीनुसार आपण त्या तथ्याविषयी अंदाजे एखादा तर्क काढतो. पण नुसत्या तर्कावर तथ्य कळत नाही म्हणून मग आपण त्या तर्कानुसार पदार्थांच्या हालचालीचे परीक्षण करतो. त्या परीक्षणातून आपल्याला काय कळते तर निसर्गाची प्रक्रिया व ही नैसर्गिक प्रक्रिया हेच सत्याचे अनुमान असते, तथ्याचा निष्कर्ष असतो. पण तरीही निसर्गाच्या मागे व निसर्गातील पदार्थांची हालचाल घडवणाऱ्या  नैसर्गिक प्रक्रियेमागे कोणते तरी खूप बुद्धीमान व खूप शक्तीमान केंद्र कार्यरत असावे हा तर्क राहतोच. हा तर्क निसर्गाची होणारी पद्धतशीर हालचाल व त्यामागील प्रमाणबद्ध नैसर्गिक प्रक्रिया किंवा पद्धत यांच्या निरीक्षणावरच आधारित असतो. पण निरीक्षण व या शक्ती केंद्राबाबतचा तर्क या दोन पायऱ्यांच्या पुढे वैज्ञानिक गाडी सरकत नाही. म्हणजे या तर्काचे परीक्षणच करता येत नाही, मग अनुमान किंवा निष्कर्ष कुठून काढणार? त्यामुळे निसर्गातील शक्ती केंद्राचे किंवा देवाचे अस्तित्व हे तर्काच्या पुढे जातच नाही.

(२) नंतर प्रश्न असा निर्माण होतो की देवाच्या तर्काला किंवा संकल्पनेला पुराव्याने सिद्ध केलेल्या अनुमानाशिवाय खरे कसे मानायचे? केवळ तार्किक अंदाजावर निसर्गात देव आहे असे मानून चालायचे तर मग देवाचे कोणते एक स्वरूप किंवा प्रारूप समोर ठेवायचे. निसर्गात दैवी शक्ती केंद्र किंवा देवांश (गॉड पार्टिकल) एकच आहे हा तर्क अंदाजाने खरा धरावा तर मग असा एकमेव देव समोर कुठून आणायचा? केवळ निसर्ग तुकड्या तुकड्यांत विखुरलाय म्हणून देवालाही तुकड्या तुकड्यांत बघत त्या तुकड्यांच्या पाया पडायचे का?

(३) म्हणून आस्तिक होऊन निसर्गातील देवाचे अस्तित्व तर्काने किंवा अंदाजाने मानायचे तर समोर देवाचे कोणतेही स्वरूप किंवा प्रारूप न ठेवता ते मानावे लागेल. मग देवाला होणारा आपला नमस्कार हा अधांतरी करावा लागेल व प्रार्थनाही हवेत करावी लागेल. या नमस्काराला व अशा प्रार्थनेला मग कसलीही व्रतवैकल्ये, कर्मकांंडे चिकटवणे चुकीचेच होणार. "जगात शांती नांदो ईश्वरा", या ईश्वर प्रार्थनेने जगात शांती नांदत नाही हे माहीत झाल्यावरही पुन्हा पुन्हा ती प्रार्थना म्हणणे हे निरर्थक कर्मकांडच होय! अशा कर्मकांडात गुंतून राहणे हे चुकीचे आहे.

(४) विज्ञानाच्या अभ्यासातून व प्रयोगांतून एक महत्त्वाची गोष्ट कळलीय आणि ती म्हणजे मनुष्याचा जन्म पृथ्वीच्या वातावरणात होतो, जन्मल्यावर मनुष्य त्याचे जीवन याच पृथ्वीच्या वातावरणात जगतो व शेवटी त्याच्या जीवनाचा शेवट याच पृथ्वीच्या वातावरणात मृत्यूने होतो. म्हणजे शेवटी जन्मणे, जगणे व मरणे हे सर्व काही इथेच पृथ्वीच्या वातावरणात होत असते. याचा अर्थ काय तर मनुष्य व ब्रम्हांडात अंदाजे असलेला सूक्ष्म आकारातील देव यांच्यातील संपर्काचे माध्यम कोणते तर पृथ्वीच! त्यानंतर दुसरे माध्यम कोणते तर मनुष्याचे शरीर व त्या शरीराच्या मेंदूत असलेले मन! याच मनातील नैसर्गिक वासना व भावना यांचे योग्य नियोजन व नियंत्रण करणाऱ्या बुद्धीला ईश्वर संपर्काचे माध्यम मानले की तीच बुद्धी म्हणते की तर्क आहे म्हणून अंदाजाने देवाला माना पण त्याची निरर्थक कर्मकांडे सोडा! बुद्धी पुढे असेही म्हणते की नुसते देवाचे नित्य स्मरण व प्रार्थना  करून काही जीवनात शांती मिळत नसते तर बुद्धीने नीट विचार करून बुद्धीच्या विवेकी कृतीनेच शांती मिळत असते. म्हणून बुद्धीचा विवेकी मार्ग हाच ईश्वरी शांतीचा मार्ग! बुद्धीच्या विवेकात ईश्वराचे दर्शन व अनुभूती घ्यायला हवी अशी बुद्धी सांगते. अंदाजाने देवाला माना पण देवाची कर्मकांडे सोडा, असेच आस्तिक पण वैज्ञानिक बुद्धी सांगते.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.७.२०२०

गुरुवार, ९ जुलै, २०२०

कायदा व सुव्यवस्था!

कायदा व सुव्यवस्था!

खतरनाक गुन्हेगारीवर पोलीस एन्काऊंटर हा इलाज नाही. पण एवढी मोठी पोलीस यंत्रणा असताना हे गँगस्टर्स तयार होतातच कसे? पालिकेची सुसज्ज यंत्रणा असताना अनधिकृत बांधकामे उभी रहातात तसाच काहीसा हा प्रकार नव्हे का?

-ॲड.बी.एस.मोरे©१०.७.२०२०

बुधवार, ८ जुलै, २०२०

नको ते मोठेपण!

नको ते मोठेपण!

(१) जगात एक तर सगळ्याच गोष्टी मोठ्या हव्या होत्या किंवा सगळ्याच गोष्टी छोट्या हव्या होत्या. म्हणजे सगळीकडे समानता निर्माण झाली असती व त्या समानतेतून जगात नेहमी  सुखशांती नांदली असती. जगात काही गोष्टी मोठ्या व काही गोष्टी छोट्या निर्माण करून निसर्गाने जगात असमानता व अशांतता निर्माण  केली असेच म्हणावे लागेल. जंगलामध्ये वाघ, सिंहासारखे प्रचंड ताकदीचे हिंस्त्र प्राणी निर्माण केले व त्यांचे खाद्य म्हणून ससे, हरणे, माकडे यासारखे अशक्त प्राणी निर्माण केले. निसर्गाने काय साधले असे करून? एकाला मोठे करून दुसऱ्याला छोटे करायचे. मग मोठा छोट्याला कसा आडवा पाडतोय ही गंमत लांबून बघत बसायची. काय म्हणावे या विचित्र खेळाला? कसा नमस्कार करायचा व कशी कृतज्ञता व्यक्त करायची अशा विचित्र निसर्गाविषयी?

(२) रामायणातील रावण विरूद्ध राम युद्ध घ्या किंवा महाभारतातील कौरव विरूद्ध पांडव युद्ध  घ्या. त्यातील पात्रे ही बाहुबळाने व बुद्धीबळाने किती मोठी! ती मोठी म्हणून तर त्यांच्यातील काही मोठ्यांचा अहंभाव मोठा, लोभ मोठा आणि या मोठेपणातून तर ती महायुद्धे घडली ना! त्यांना महान धर्मयुद्धे म्हणतात. पण त्या काळातील सर्वसामान्य जनता या मोठ्यांच्या संघर्षात उगाच भरडली गेली त्याचे काय? आज सुद्धा, अमेरिका, रशिया, चीन सारख्या  देशांतील मोठ्या लोकांची मोठी महत्वाकांक्षा जगाला तिसऱ्या महायुद्धात ओढण्याची भीती   निर्माण झाली आहे. मोठ्यांची मोठी खलबते चालतात आणि आपण सर्वसामान्य माणसे मात्र अर्धवट ज्ञानाच्या जोरावर एकमेकांच्या अंगावर बोरे फेकत बसतो.

(३) नीट विचार करा, आपण जसजसे वयाने मोठे होत गेलो तसतसा आपल्या बालपणीचा तो निर्मळ आनंद हरवत गेलो. आपले मन आपल्या लहानपणी निरागस होते. त्यात हल्ली आपल्या मनात रूजलेल्या अहंभावाचा लवलेश नव्हता. तो नव्हता म्हणून आपले बालपण खूप आनंदी होते. अहंभावाचे विष हे मोठे होण्याने वाढते. मोठेपणाची महत्वाकांक्षा व तसेच त्या महत्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी चाललेली स्पर्धा ही खरं तर अहंभावाचे विष पिण्याची स्पर्धा असते.

(४) आता कोरोना संदर्भात विचार करू. जर आपण कोरोना विषाणू सारखे सूक्ष्म असतो तर आपल्याला या कोरोनाने एवढे सतावले असते का? आपणही त्याच्याएवढेच सूक्ष्म असतो तर त्याला पकडणे आपल्याला सोपे गेले असते. तो आपल्या डोळ्यांना सहज दिसला असता. पण सूक्ष्मदर्शक यंत्रे जवळ असूनही कोरोनाला पकडणे आपल्याला कठीण जातेय. कारण आपण कोरोनापेक्षा खूप पटीने मोठे आहोत. हे मोठेपण अशाप्रकारे महागात पडते.

(५) मला मोठेपण आवडत नाही की मोठेपणा आवडत नाही. छोटा राहण्यातच मला मोठा आनंद मिळतो. म्हणून मला छोटी मुले, पैसा व सत्ता यांनी माझ्यासारखीच छोटी असणारी माणसे यांच्यात मिसळून त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारायला आवडते. मोठे उद्योगपती व मोठे राज्यकर्ते यांच्यापासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. काय जाणो, माझ्या स्वच्छंदी वागण्याने त्यांच्यातील अहंभाव दुखावला गेला तर ते माझी चटणी करतील अशी मला मनातून भीती वाटत असते.

(६) एकदा माझ्या मनात सहज आले की चला मोठ्या लोकांची खुर्ची कशी असते हे त्यात एकदा बसून बघावे. म्हणून एकदा मी ज्या एका सॉलिसिटर फर्ममध्ये सहाय्यक वकील म्हणून काम करीत होतो त्या फर्मचे भागीदार (मोठे  सॉलिसिटर) बाहेर गेले असताना हळूच त्यांच्या  आलिशान खुर्चीवर जाऊन बसलो. माझे दुर्दैव हे की ते सॉलिसिटर बाहेरून पटकन आले. मी त्यांच्या खुर्चीवर बसलोय हे त्यांनी बघितले आणि ते माझ्यावर असे भडकले की सांगायची सोय नाही. "इस खुर्ची पर बैठने की तुम्हारी हिंमतही कैसी हुई, इतना आसान है क्या ऐसी खुर्ची मिलना"? त्यांचे ते शब्द माझ्या कानात इतके टोचले की माणसाला इतकी अहंभावी, गर्विष्ठ बनविणारी असली खुर्चीच आयुष्यात मला नको, असे मी मनात ठरवले आणि त्या क्षणापासून मोठी खुर्ची मिळविण्याचा नाद व समाजात मोठेपणा मिरविण्याचे खूळ मी माझ्या  मनातून काढून टाकले.

-ॲड.बी.एस.मोरे©९.७.२०२०

मंगळवार, ७ जुलै, २०२०

आभासाकडून सत्याकडे!

आभासाकडून सत्याकडे!

आजच "आभासी दर्शन" ही फेसबुक पोस्ट लिहिलीय. समाज माध्यम हे एक आभासी जग आहे वगैरे वगैरे खूप काही लिहिले जातेय. मी सुध्दा या आभासी जगातून खूप शिकलो व मग सावरलोही! पण याच समाज माध्यमावर मी सत्य लिहून लिहून या आभासी जगाला सत्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला काही अंशी यशही आले. आभासी जगात उमटणारे माझे सत्य हा माझा प्रत्यक्ष जीवन अनुभव आहे. त्यात जिवंतपणा आहे. नाहीतरी मी आभासी जगात मिसळूच शकत नाही. माझ्याकडून म्हणून तर काल्पनिक कथा, कादंबऱ्यांचे जास्त वाचन झाले नाही व आता तर त्यापासून दूरच आहे.

मी परवा अशी पोस्ट लिहिली होती की "माझ्या पोस्टस या नैराश्यजनक असतात काय?" त्या माझ्या पोस्टला व्हॉटसअप वर माझ्या एका फेसबुक मित्राने पाठविलेले हे उत्तर वाचा आणि मग तुम्हीच ठरवा की समाज माध्यम हे १००% आभासी जग आहे का ते!

"साहेब, आपल्या पोस्ट्स आमच्या मनात कधीच नैराश्य निर्माण करत नाहीत तर उलट तुमच्या लिखाणात जगण्याची उमेद तयार होते. मी माझा स्वभाव आपणांस सांगितलाच आहे. पण आपणंच मला लढण्याची व जगण्याची उमेद दिलीत. त्या उमेदीच्या जोरावर आज माझं कुटुंब छोटा व्यवसाय करत आहे. एक आठवडा झाला आम्ही कांदा पोहे, इडली, मेंदूवडा, शिरा असा छोटासा व्यवसाय सुरु केला आहे. आज कमाईचे कोणतेही साधन नसल्याने तो व्यवसाय सुरु केला आहे. फक्त महापालिकेचा थोडा त्रास होतो ह्या व्यवसायात  माझी पत्नी व मुलांचा ही सहभाग आहे. पत्नीची इच्छा शक्ती व आपण मला दिलेली हिंमत यामुळे हे शक्य होत आहे. आज तुम्ही वकील असताना देखील स्वाभिमानाने जगत आहात. कोणताही आपला बडेजाव नसतो. साहेब, आपले मार्गदर्शन असेच होत रहावे. मी आपला खूप आभारी आहे. जर लॉक डाऊन संपला व माझा हा व्यवसाय चालू राहिला तर साहेब आपण अवश्य तिथे भेट द्या मी स्वतःला फार नशीबवान समजेन....."

आता वरील उत्तर वाचून मला सांगा की, मी अल्प प्रमाणात का होईना पण याच आभासी समाज माध्यमाला सत्यात उतरवलेय की नाही?

-ॲड.बी.एस.मोरे©८.७.२०२०