https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

माझ्या वंशाची पणती!

माझी वंशाची पणती!

मला मुलगी हेच प्रथम अपत्य असल्याने मुलगा का नाही म्हणून दुसऱ्या अपत्याचा आग्रह इतर अनेक जणांनी केला. इतकेच काय माझी आई मला म्हणायची की "अरे बाळू, वंशाला एक तरी दिवा असावा"! तेंव्हा माझे तिला एकच उत्तर असायचे की "माझी ही एकच वंशाची पणती असणार पण ती साऱ्या घराबाराला उजळून काढणार"! पुरूषप्रधान संस्कृतीच्या अशा शब्दांपासूनच माझ्या मुलीवर अप्रत्यक्षपणे नकारात्मक प्रवाहांचा (इंग्रजीत निगेटिव्ह वायब्रेशन्सचा) भडिमार सुरू झाला. क्षुल्लक कारणांवरून व काही गैरसमजांतून आम्हा पती पत्नीत वाद, भांडणे होत होती. त्या नकारात्मक वातावरणाचा माझ्या मुलीवर वाईट परिणाम होत होता. पण तरीही जिद्दीने अभ्यास करून तिच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने एम.बी.ए. चा फुल टाईम कोर्स एका नामांकित व्यवस्थापन संस्थेतून डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण करून स्वकर्तुत्वावर आज ती एका फार मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत सिनियर मार्केटिंग मॕनेजर पदावर आहे याचा मला खूप अभिमान आहे. हे सर्व यश मिळवत असताना ती स्वतःसाठी योग्य तो जोडीदार शोधत होती. बाप म्हणून मी मात्र मुलीच्या काळजीने लग्नासाठी तिच्या मागे लागून तिच्यावर रागाने ओरडत होतो. परंतु तरीही तिने मला कधीही उलट उत्तर दिले नाही. तिने आयुष्यात एवढे मोठे यश कमी वयातच प्राप्त केल्यावर शेवटी एका विवाह मंडळाच्या माध्यमातून तिला योग्य असलेला जोडीदार निवडून विवाह केला. माझा जावई एम.बी.ए. (लंडन) असून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डायरेक्टर आहे व शिवाय स्वतःच्या फॕक्टरीचा मालक आहे. इतकेच नव्हे तर माझी मुलगी मला पापा व जावई मला डॕडी म्हणून नुसते फोनच करीत नाहीत तर माझ्या डोंबिवलीच्या फ्लॅटवर दोघेही येतात व आम्हा पतीपत्नीलाही त्यांच्या अंधेरीच्या फ्लॅटवर घेऊन जातात. माझी मुलगी तर मला सारखी म्हणते की "पापा, आता नका कुठे कामासाठी जाऊ, घरी आराम करा, दोघे पर्यटन करा, मी तुम्हाला पैसे देईन, मी तुम्हाला सांभाळेन"! हे तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. पण तरीही मला मनात वाईट वाटतेच की, मी माझ्या सोन्यासारख्या मुलीला हवे तसे अनुकूल वातावरण दिले नाही. मी तुम्हाला आता तिच्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो. ती लहान असताना एकदा तिने एका कार्यक्रमात कठीण प्रश्नांची उत्तरे देऊन एक नंबरचे बक्षीस म्हणून टी शर्ट मिळवला तर मी तो तिच्या हातातून काढून घेऊन दुसऱ्या एका मुलास दिला कारण काय तर तो तिकडे हिरमुसला होऊन बसला होता म्हणून. माझी मुलगी मला नंतर म्हणाली की "पापा, प्रश्नांची उत्तरे मी दिली होती ना, मग मी मिळवलेल्या त्या बक्षीसावर हक्क माझा होता की त्या मुलाचा"? तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात अजूनही अश्रू येतात. नशीब काय असे हिसकावून थोडेच मिळते? नशीब हे स्वकर्तुत्वाने मिळवावे लागते. आजच्या काळात सुद्धा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा मनावर असलेले लोक मुलगा नसेल तर संसारात अर्थ नाही असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा मला त्यांची कीव येते. एकुलत्या एक मुलीलाच मी माझा मुलगा समजलो व माझी हीच एकुलती एक मुलगी एक दिवस माझे नाव मोठे करणार व माझ्या म्हातारपणीचा आधार होणार हे मी पाहिलेले स्वप्न माझ्या या एकुलत्या एक मुलीने पूर्ण केले आहे. एवढे मोठे सुख व समाधान मला निसर्गाने म्हणा की मनाला जाणीव करून देणाऱ्या निसर्गातील अलौकिक शक्तीने म्हणा  दिले त्या शक्तीचे मी कितीही आभार मानले तरी कमीच आहेत!

-बाळूमामा, २७.१२.२०२१

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाती!

बोला की बाळूमामा!

काही नाती जन्माने चिकटली, काही लग्नाने बनली, काही अशीच योगायोगाने जमली, काही जुळली, काही परिस्थिती, प्रसंगाने डळमळीत होऊन तुटली. हवामान बदलते तशी माणसे बदलतात व मग नातीही बदलतात.

व्यावहारिक नाती ही व्यवहारापुरती मर्यादित राहतात. व्यवहार संपला की नाते संपले. जर व्यवहार दीर्घकाळ टिकले तर व्यावहारिक नाती सुद्धा दीर्घकाळ टिकतात. व्यवहार नाही पण भावनिक जवळीक आहे अशी नाती भावनिक आधारावर टिकतात. भावनिक जवळीकेला वैचारिक जवळीकेची जोड मिळाली म्हणजे विचार जुळले की नाती अधिक घट्ट होतात.

व्यवहार कशाला म्हणतात तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या देवाणघेवाणीला व्यवहार म्हणतात. व्यवहारात स्वार्थ असतो. स्वार्थाचे समाधान दोन्ही बाजूने झाले पाहिजे. पण स्वार्थाला महास्वार्थ चिकटला की मग तो व्यवहार राहत नाही. मीच एकटा सगळं खाईन तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल असा विचार जेंव्हा बुद्धी करते तेंव्हा ती महास्वार्थी झालेली असते. 

नाती जर नुसती व्यावहारिक असतील तर ती व्यवहारापुरती कोरडी असतात. अशा नात्यात भावनेचा ओलावा नसतो. बुद्धीची खरी कसोटी तेंव्हाच लागते जेंव्हा नात्यात भावनाही असते व स्वार्थी व्यवहारही असतो. पण काही नाती ही भावनिक जवळीक व वैचारिक सुसंवादावर आधारित असतात. अशा नात्यांत स्वार्थ नसतो व स्वार्थ नसल्याने व्यवहारही नसतो.

माझीही अशी काही भावनिक नाती आहेत की जिथे व्यवहार नसल्याने व विचार सरळस्पष्ट असल्याने वाद निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भामाताई ही तर माझी मावस मावस बहीण होती. पण तिच्याबरोबरचे माझे नाते हे मनमोकळे होते. कारण त्या नात्यात फक्त भावनिक जवळीक होती. व्यवहार बिलकुल नव्हता. हल्लीच ती बहीण हे जग सोडून गेली. त्यामुळे ते निर्मळ माया प्रेमाचे भावनिक नाते नैसर्गिक रीत्या संपले. पण तिचा मुलगा शिवा हा तिच्या स्वभावासारखाच आहे व त्यामुळे त्याच्याशी बोलताना भामाताईचा तो फिल येतो. परवा त्याला असाच फोन केला तर तिकडून त्याचा नेहमीचाच गोड आवाज आला "बोला की बाळूमामा"! आवाजात तोच गोडवा व तीच निर्मळ भावना जी भामाताईत होती. कसले व्यावहारिक देणे नाही की घेणे नाही. नुसती भावनिक जवळीक. अशी नाती दुर्मिळ असतात. 

-बाळू, २५.१२.२०२१

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

राम कृष्ण हरी!

देव प्रार्थना!

आपल्या जवळच्या माणसांशी जशी आपली नाळ जुळते तशी आपल्या जवळच्या धार्मिक  संस्कृतीशी व आपल्या जवळच्या देवदेवतांशी आपली नाळ जुळते. म्हणून आपल्या धर्मातील लोकांमध्ये विवाह केल्यास जवळच्या संस्कृती साधर्म्यामुळे संसारात अडचणी कमी होतात. बाकी हल्ली सुशिक्षित, अती सुशिक्षित लोक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करताना दिसून येतात. शिक्षण, विचार त्यांना संसारात एकत्र ठेवत असतील तर तेही योग्यच म्हणावे लागेल.

पण जवळीक ही महत्वाची. आपण हिंदू धर्मीय लोक मंदिरांसमोरून जातो तेंव्हा आपले हात आपोआप जोडले जातात. पण आपण जर इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांपुढून गेलो तर तसे होत नाही याचे कारण म्हणजे आपल्या धर्माशी व देवदेवतांशी लहानपणापासून जोडली गेलेली आपली नाळ. अशी जवळीक आपल्या कुळ देवतेशी व आपल्या ग्रामदेवतेशी असते. विशेष बाब ही की माझे वडील करमाळा तालुक्यात असलेल्या साडे गावचे व माझी आई माढा तालुक्यात असलेल्या ढवळस गावची. दोन्ही गावे सोलापूर जिल्ह्यातीलच. साडेगावचे ग्राम दैवत कोणते तर कोडलिंग (खरं तर कोटलिंग म्हणजे महादेव/शंकर) व ढवळसची ग्रामदेवता कोणती तर अंबाबाई ( म्हणजे शंकर पत्नी पार्वती). म्हणजे काय तर वडिलांचे ग्रामदैवत शंकर व आईची ग्रामदेवता पार्वती. या दोन्ही गोष्टी कशा जुळून आल्या बघा काका-आईच्या विवाहाने! मी ढवळस गावाला मावशी बरोबर (माझ्या आईची सख्खी बहीण ) जाऊन उंच टेकडीवर असलेल्या अंबाबाईचे एकदा दर्शन घेतलेय. पण मी अजूनही वडिलांच्या साडे गावातील कोडलिंगाचे दर्शन घेतलेले नाही. ही गोष्ट ग्रामदैवतांची. पण माझे कुळदैवत कोणते हे ६५ वय झाले तरी अजूनही मला माहित नाही हे विशेष! याचे कारण काय तर माझे वडील (काका) हेच मुळात तेवढे आध्यात्मिक नव्हते. त्यांनी कधीही घरात ग्रामदैवत, कुळदैवत यांचा आग्रह धरला नाही की साडे गावाला आम्हाला घेऊन गेले नाहीत. माझी आई मात्र घरातील देव्हाऱ्यात पितळेचे देव ठेवून तिला जमेल तशी पूजा करायची. पण ती निरक्षर असल्याने तिला त्या देव्हाऱ्यातील ग्रामदैवत कोण व कुळदैवत कोण हे आम्हाला सांगता येत नसे. त्यामुळे माझ्या मनावर आईच्या देवधर्मापेक्षा काकांच्या बिनधास्त राहण्याचाच जास्त पगडा पडला. या इथे जवळीक या शब्दाला अर्थ आहे. आपल्या मनावर पगडा ज्याच्याशी आपली जवळीक निर्माण होते त्याचाच पडतो.

गजू व बळी, तुम्हाला आठवत असेल की तुमची आई  ही परडी भरायची. तुमच्या आईची ती परडी मी लहानपणी बारकाईने न्याहाळत बसायचो. पण मला ते नीट कळत नसायचे. ती परडी अंबाबाई देवीची असते बहुतेक, नक्की माहित नाही व ठामपणे सांगताही येणार नाही. कारण परडीशी जवळीक निर्माण झाली नाही व त्यामुळे तिचा पगडा माझ्या मनावर पडला नाही. 

पुण्याच्या भाऊजीबरोबर मी दोन, तीन वेळा सोनारीला गेलोय. तिथली गाव जत्रा पाहिलीय व सोनारीचे ग्रामदैवत भैरवनाथ (शंकराचा अवतार) याचेही दर्शन घेतलेय. मागे बहिणीच्या  कुटुंबाबरोबर कोल्हापूरच्या जोतीबाला जाऊन (तोही शंकराचाच अवतार) त्याचेही दर्शन घेतलेय. मात्र अजून जेजुरीच्या खंडोबाचे (तोही शंकराचाच अवतार) दर्शन घेतलेले नाही.

हिंदू धर्मात शिव पंथी व वैष्णव पंथी असे दोन पंथ आहेत. शिवपंथीयांची जवळीक शंकराशी जास्त तर वैष्णवपंथीयांची जवळीक विष्णूशी जास्त. वर उल्लेखित भैरवनाथ, जोतिबा व खंडोबा हे शंकराचे अवतार आहेत तर राम, कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. पंढरपूरचा पांडुरंग (विठ्ठल) हा कृष्णच म्हणजे विष्णूचा अवतार. मोहोळची ताई व दादा हे पंढरपूरकरच व त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) जास्त संस्कार. त्यामुळे त्यांचा मुलगा नेहमी "राम कृष्ण हरी" असे म्हणून देव प्रार्थना करतो. राम काय किंवा कृष्ण काय दोघेही विष्णूचेच अवतार. मग आपल्या नातेवाईकांत भाऊजी  भैरवनाथी म्हणजे शिवपंथी व ताईचा मुलगा पांडुरंगी म्हणजे वैष्णवपंथी झाले काय?

माझी दोन बहिणी व माझी भावजय यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचे मोठे फोटो मला पहायला मिळतात. श्री स्वामी समर्थांशी त्यांची ही जी जवळीक निर्माण झालीय ती बहुतेक एखाद्या अनुभूतीमुळे झाली असावी. माझा मुंबईत एका श्री स्वामी समर्थ मठाशी योगायोगाने संबंध आला. पण मी त्यांचे आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करीत नाही. कारण एकंदरीतच सगळ्या देवाधर्माविषयीचा माझा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. पण मी सगळ्या देवांना नमस्कार करतो. कारण विश्वात, निसर्गात कोणती तरी अद्भुत, अनाकलनीय शक्ती आहे व ती शक्ती म्हणजेच परमेश्वर, परमात्मा असे मी मानतो. तो एकच आहे. फक्त त्याचे अवतार (इतर धर्मात देवाच्या अवतारांना देवदूत म्हणतात) निरनिराळे आहेत असे मी मानतो. त्यामुळे श्री भैरवनाथ काय, श्री स्वामी समर्थ काय किंवा राम कृष्ण हरी काय या सगळ्याच देव प्रार्थना एकाच परमेश्वराला, परमात्म्याला जाऊन मिळतात असे मी मानतो.

माझे बालपण पंढरपूरला श्रीविठ्ठल मंदिराच्या सान्निध्यात गेले असल्याने त्या देवाशी थोडीशी जास्तच जवळीक निर्माण झाली आहे व म्हणून "राम कृष्ण हरी" असे म्हणून या लेखाचा शेवट करतो.

राम कृष्ण हरी!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.१२.२०२१

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

वृद्धत्व विकास!

उतार वयातील कमकुवतपणा व विकास!

लहानपणातली व तारूण्यातील उत्साह, ताकद व चपळता उतार वयात कमी झालेली असते. अर्थशास्त्रात उतरत्या सीमांत उपयोगितेचा एक नियम आहे (इंग्रजीत लॉ अॉफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलिटी). त्याप्रमाणे मानवी शरीर व मनाची निसर्गाला असलेली उपयुक्तता वाढत्या वयानुसार कमी कमी होत गेल्याने तो निसर्ग मानवी शरीर व मनाला (शरीरातच मन असते, मनात शरीर नव्हे) भंगारात काढण्याची तयारी करीत असावा व त्यामुळेच उतार वयात मानवी शरीर व मन कमकुवत होत जात असावे. या उतार प्रक्रियेला मानवी शरीर व मनाचा घसारा (इंग्रजीत डिप्रिशियशन) असेही अर्थहिशोबी भाषेत म्हणता येईल. म्हातारपणीच्या या उतार प्रक्रियेला उतरत्या सीमांत क्षमतेचा नियम (इंग्रजीत लॉ अॉफ डिमिनिशिंग ॲबिलिटी) असेही म्हणता येईल. त्यामुळे होते काय की शरीरावरची घाण साफ करण्यासाठी लागणारी टूथब्रश, दाढीचे ब्लेड, मिशीचे केस कापण्याची कात्री यासारखी शस्त्रे हाताबोटांत नीट धरता  येत नाहीत. हातपाय कंप पावतात, थरथरतात. याचे कारण म्हणजे शरीराचे अवयव कमकुवत झालेले असतात. मेंदू (ज्यात मन असते) हाही शरीराचा अवयव (शरीराचा राजा का असेना) असल्याने तोही मेंदूपेशींसह कमकुवत झालेला असतो. त्यामुळे मन कमकुवत होऊन मनाचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. सगळ्याच सजीवांच्या शरीर व मनात होणारे हे परिवर्तन नैसर्गिक व अनिवार्य असते. त्यामुळे हा बदल स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसते. या नैसर्गिक परिवर्तनाशी सुसंगत वर्तन कसे करता येईल हे पहावे व तसे तंत्र विकसित करावे. यालाही आपण विकासाचा भाग म्हणूया व वृध्दावस्थेत तो भाग शिकूया!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१२.२०२१

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

नवसंजीवनी!

नवसंजीवनी!

(१) कालचा माझा दिवस माझे डोळे सताड उघडे करणारा, मला नवसंजीवनी देऊन मला मोठे करणारा ठरला. काल २ अॉक्टोबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे साधे पण महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा जन्मदिवस! या मंगल दिनी माझ्याही आयुष्यात मंगलमय गोष्ट घडली. मला आलेले नैराश्य दूर झाले, मरगळ झटकली केली, निसर्गातील देवाचा मला सर्वोच्च आदेश मिळाला "उठ, स्वतःला ओळख आणि पुन्हा कामाला लाग, आयुष्याचे नवनिर्माण कर"!

(२) याला पहिले कारण म्हणजे ॲड. विजय चौगुले यांनी माझ्या दोन नैराश्यजनक लेखांवर दिलेल्या त्यांच्या दोन प्रतिक्रिया. या दोन्ही प्रतिक्रियांनी माझे झाकलेले डोळे सताड उघडे झाले व मला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती मी ॲडव्होकेटस असोसिएशन अॉफ वेस्टर्न इंडिया या हायकोर्ट वकिलांच्या एका फेसबुक ग्रूपवर लिहिलेल्या एका नैराश्यजनक लेखावर. तिथून त्यांनी मला जागे केले. नंतर "माझ्या ज्ञानाची शोकांतिका" या माझ्या दुसऱ्या नैराश्यजनक पोस्टवर त्यांनी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आणि मला पूर्ण जागे केले.

(३) कोण आहेत हे ॲड. विजय चौगुले साहेब? माझ्या काही मित्रांना माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतोय. आज ७० वर्षाचे वय म्हणजे माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वयाने मोठे असलेले हे चौगुले वकील साहेब म्हणजे वरळी पोदार आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या पाठीमागील अभ्यास गल्लीत रस्त्यावरच पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणारा हा एक होतकरू धडपड्या मुलगा! हाच धडपड्या मुलगा पुढे वकील झाला व आयुष्यात मोठे यश मिळवून आता तो सुखासमाधानाने जगत आहे. मीही पोदारच्या त्याच अभ्यास गल्लीत रस्त्यावर अभ्यास करून वकील झालो.

(४) विजय चौगुले माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठे पण १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी जेंव्हा माटुंग्याच्या पोदार वाणिज्य कॉलेज मधून बी.कॉम. चे शिक्षण घेत होतो तेंव्हा याच पोदार अभ्यास गल्लीत मी रस्त्यावर अभ्यास  करीत असताना माझी विजय चौगुले बरोबर  दोस्ती झाली. चौगुले साहेब कधीकधी त्या गल्लीतच रात्री झोपायचे व सकाळी तिथेच उठून कामाला जायचे. नोकरी करून हिंमतीने उच्च शिक्षण घेणारा हा अत्यंत हुशार मुलगा. मी अभ्यास करता करता मध्येच विजय चौगुले यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो आणि विजय चौगुले त्या वयातही मला धीर देणाऱ्या गोष्टी समजावून सांगायचे.

(५) नंतर विजय चौगुले यांचे पोलीस इन्स्पेक्टर मुलीबरोबर लग्न झाले. त्यांच्या पत्नी डेप्युटी कमिशनर अॉफ पोलीस (डी.सी.पी.) या फार मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा, सून, मुलगी हे सर्वच जण आता वकील होऊन ॲड. विजय चौगुले यांच्या चौगुले ॲन्ड असोसिएटस या लॉ फर्ममध्ये एकत्र वकिली करीत आहेत. त्यांची मुंबईत दोन कार्यालये आहेत. हे सर्व कालच त्यांच्या बरोबर झालेल्या फोनवरील चर्चेतून कळले. खरंच फार मोठे यश मिळवले माझ्या या मित्राने! इतकेच नव्हे तर मुंबई काँग्रेसमध्ये एकेकाळी या माझ्या मित्राची खासदार गुरूदास कामत यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबर उठबस होती, मोठे नाव होते. पण त्या राजकारणाचे जाऊ द्या. त्यांचे वकिलीतले यश हे खूप मोठे यश आहे.

(६) मी जेंव्हा चौगुले साहेबांना त्यांच्या या यशाबद्दल बोललो तेंव्हा त्यांनी मी मिळवलेल्या यशाची आठवण करून दिली. "अरे, माणसा दुसऱ्याच्या यशाकडे बघून तू स्वतःचे यश का अंधारात लपवून ठेवत आहेस, कुठे होतास तू, किती कष्ट उपसलेस तेंव्हा कुठे स्वकष्टाने वकील झालास, स्वकर्तुत्वावर ज्ञानी झालास, किती छान लिहितोस तू, सर्वांकडे ज्ञानाची ही उंची नसते व लेखनाची कला नसते, देवाने तुला कितीतरी भरभरून दिले आहे, तळागाळातून हळूहळू पायऱ्या चढत तू केवढी मोठी उंची गाठली आहेस, अरे स्वतः हिंमतीने मिळवलेले तुझे हे मोठे यश ओळख आणि रूबाबात रहा"! ही चौगुले साहेबांची वाक्ये माझ्या काळजाला भिडली आणि मला नवसंजीवनी मिळाली.

(७) किती काळ लोटला मध्ये! जवळजवळ २५ ते ३० वर्षे झाली. चौगुले साहेब त्यांच्या मार्गावर  व मी माझ्या मार्गावर! मधल्या काळात दोघांची प्रत्यक्ष गाठभेटच नाही आणि मग इतक्या वर्षांनी मी वकिलांच्या ग्रूपवर ती नैराश्यजनक पोस्ट लिहितोय काय, तिथे हे चौगुले साहेब (माझा अभ्यास गल्ली मित्र) अचानक येतात काय, माझ्या यशाची आठवण करून देतात काय व मग आम्ही इतक्या वर्षांनी फेसबुक मित्र होतोय काय हे सगळेच अचंबित करून टाकणारे! माझ्याच यशाचा मी शत्रू का झालो, स्वतःच स्वतःला जिंकण्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो हे मी का विसरलो? मानवी यशाचे परिमाण काय? पैसा, छे पैसा तर कोणीही मिळवतो, वाटेल ते उलटसुलट धंदे करून! मोठमोठया गँगस्टर्स लोकांकडे का कमी पैसा आहे! यावरून हेच सिद्ध होते की मानवी जीवनात पैसा हे यशाचे परिमाण होऊ शकत नाही. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण पैसा म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व नव्हे! जगण्यासाठी पोटाला अन्न आवश्यक आहे पण  माणूस जगण्यासाठी अन्न खातो की ते अन्न खाण्यासाठी जगतो? पैशाचेही साधारण तसेच आहे. माणसाचे जगणे व जनावरांचे जगणे यात फरक आहे. मानवी जीवनाचा अर्थ मोठा, या जीवनाची ध्येये मोठी, जगणे मोठे! या सर्व गोष्टी शाळा, कॉलेजात शिकूनही हे ज्ञान मी नैराश्येच्या गर्तेत सापडून विसरलो होतो.

(८) मला दुसरी संजीवनी मिळाली एका छोट्या मुलीकडून. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे माझे तरूण वकील मित्र ॲड. रूपेश मांढरे यांची ही कन्या. नाव वैदेही! काल तिच्या आईने म्हणजे रूपेशच्या पत्नीने (जी माझीही फेसबुक मैत्रीण आहे रूपेश बरोबर) वैदेहीचे वकिलाच्या ड्रेसमधील फोटो व तिचा वकिली युक्तीवादाचा छोटा व्हिडिओ कालची फेसबुक स्टोरी म्हणून टाकला. ते फोटो आणि चिमुकल्या वैदेहीचा तो रूबाबदार वकिली अवतार बघून माझे डोळे सताड उघडले. सोनाराने कान टोचल्यासारखे झाले माझे! रूपेश हा स्वतः तर वकील आहेच. पण तो त्याच्या पत्नीलाही वकील बनवतोय. एलएल. बी. च्या शेवटच्या वर्षाला आहे त्याची पत्नी आणि हे दोघेही त्यांच्या गोड कन्येला लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू देत आहेत हे बघून मला खूप बरे वाटले. या तिघांनी मिळून विशेष करून वैदेहीने माझ्यातला वकील पुन्हा जागृत केला.

(९) अरे, मी हे काय करून बसलोय? काय लिहितोय मी हे! नवोदित वकिलांना नवीन उमेद द्यायची सोडून मी स्वतः उगाच निराश होऊन त्यांनाही निराश करतोय! छे, छे! हे फार चुकीचे आहे. वकिली व्यवसाय हा काय साधासुधा व्यवसाय नव्हे! वकील व्हायला फार मोठी तपश्चर्या लागते. राजकारणी असोत नाहीतर सेलिब्रिटी असोत कायद्याच्या कचाट्यात अडकून वकिलाच्या अॉफीसमध्ये आल्यानंतर त्यांची काय भंबेरी उडते, ते किती केविलवाणे होतात, या लफड्यातून वाचवा हो म्हणून वकिलापुढे किती गयावया करतात, हे मी प्रत्यक्षात बघितले आहे. कारण मीही मुंबई हायकोर्टाच्या मोठमोठया वकिलांसोबत बसून तिथे बिनधास्त वकिली केली आहे. गरिबीतून वकील झालो म्हणून काय झाले. स्वकर्तुत्वावर वकिलाचा काळा कोट अंगावर चढवलाय. त्या बार रूममध्ये मी गरीब म्हणून तिथे बसू नको असे म्हणण्याची कोणत्याही मोठ्या वकिलाने हिंमत केली नाही. तशी  हिंमत कोणी करूच शकणार नाही.

(१०) राजकारणात पदांसाठी नेत्यांची हाजी हाजी करायला लावणारा व सेलिब्रिटी आयुष्य  जगण्यासाठी उलटसुलट उड्या मारायला लावणारा हा वकिली व्यवसाय नव्हे! अशा या प्रतिष्ठित वकिली व्यवसायात गेली ३२ वर्षे पाय घट्ट रोवून मी हिंमतीने उभा आहे. हे माझे यश मी विसरतोय हे मला ॲड. रूपेश मांढरे याच्या चिमुकल्या कन्येने (वैदेहीने) प्रात्यक्षिक करून दाखवून समजावून सांगितले.

(११) अरे मोठ्यांनो, तुम्ही काहीही उपद्व्याप करा, कितीही कोलांटउड्या मारा, आम्ही सर्व वकील तुमच्याकडे कायद्याच्या नजरेतून नजर ठेऊन आहोत हे लक्षात ठेवा! सद्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना नावाच्या पिल्लावरही आम्हा वकिलांची सक्त कायदेशीर नजर आहे. सर्व डॉक्टर मंडळी व पोलीसही या लढाईत जीव धोक्यात घालून त्यांचे उदात्त कार्य करीत आहेत. पण तरीही कायद्याची नजर ही वेगळी असते. कायदा म्हणजे काय हे त्यासाठी नीट लक्षात घ्यायला हवे. माझ्या मते कायदा म्हणजे निसर्गातील देवाचा सर्वोच्च आदेश! तो आदेश वकिलांना लवकर व छान कळतो हेही माझे वैयक्तिक मत! ते कोणाला पटो अगर न पटो! कोरोनावरील निसर्गाच्या त्या सर्वोच्च आदेशाचे सखोल विचारमंथन वकिलांच्या ज्ञानसागरात सद्या चालू आहे हे ध्यानात ठेवा! सुटेल कसा हा कोरोना कायद्याच्या नजरेतून, कायद्याच्या मगरमिठीतून!

(१२) हो, हे खरे आहे की कायद्याच्या राज्यात हाथसर सारखे बलात्कार सुरू आहेत. खून, बलात्कार करणारी ही नराधम मंडळी म्हणजे मनुष्याचे कातडे अंगावर पांघरून मोकाट सुटलेली हिंस्त्र जनावरेच! या नराधमांना वाटते की अजूनही जंगल राजच सुरू आहे. पण माणूस तो जंगलीपणा सोडून देऊन आता खूप पुढे येऊन पोहोचलाय. या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात तुमची आता डाळ शिजणार नाही. वैदेही सारख्या क्रांतीकन्या तयार होत आहेत, तयार झाल्या आहेत. नराधमांनो, या सुशिक्षित, सुसंस्कृत मुली व स्त्रिया या क्रांतीकन्या आहेत. त्या तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जंगलात नेऊन वाघ, सिंहापुढे आता टाकता येईल. पण वाघ, सिंह तुम्हाला पटकन खाऊन टाकतील. तुमचे एनकांऊटर हा त्यातलाच आधुनिक प्रकार! पण अशी झटपट शिक्षा देऊन तुम्ही पटकन मोकळे होणार हे कायद्याला माहित आहे. म्हणून तर तुम्हाला कायद्याच्या जाळ्यात ओढून खूप नाचवायचे व हालहाल करून शेवटी कायद्याची कठोर शिक्षा द्यायची हाच आधुनिक कायद्याच्या राज्याचा न्याय आहे.

(१३) म्हणून तुमचे बारावे नाही तर चांगले तेरावे  घालण्यासाठी हा १३ आकडा माझ्या लेखाच्या शेवटी आलाय. वैदेही ही सर्व क्रांतीकन्यांची प्रतिनिधी आहे. मी तिला आता तिच्या फोटो व वकिली युक्तिवादाच्या व्हिडिओसह वकिलांच्या सर्व ग्रूप्सवर फिरवणार. उठा, मरगळ टाकून द्या असे वैदेही सगळ्या वकिलांना विशेष करून माझ्यासारख्या निराश झालेल्या वकिलांना सांगत फिरणार. वैदेहीवर पोस्ट बनवून तिला फेसबुकवर आणखी प्रसिद्ध करण्याची रितसर परवानगी मी तिच्या आईकडून व्हॉटसअप संवादातून घेतली आहे. विजय चौगुले वकील व कु. वैदेही मांढरे यांच्या वयात केवढे मोठे अंतर पण दोघांनीही माझे कान टोचले, माझे डोळे सताड उघडले व मला काल नवसंजीवनी दिली म्हणून तमाम वकील मंडळींच्या ज्ञान दरबारात माझी ही खास पोस्ट विनम्रपणे सादर करतोय. तिचा स्वीकार होईल अशी आशा बाळगतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१०.२०२०

सोपान मोरे, माझा डॕशिंग बाप!

सोपान मोरे या डॕशिंग बापाचा मुलगा आहेस तू!

शिक्षण सातवी, बलभीम नागटिळक या मामाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील  साडे खेडेगावातून मुंबईत आणलेला मुलगा, मग व्हिक्टोरिया मिलमध्ये बदली कामगार म्हणून नोकरी, चौकस बुद्धीमत्ता, वृत्तपत्रीय वाचनातून परिसर अभ्यास, स्वतःच विकसित केलेली वक्तृत्व कला, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगार पुढारी म्हणून नाव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर जवळून उठबस आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही पाठबळाशिवाय फक्त आणि फक्त स्वतःच्या हिंमतीवर, कर्तुत्वावर मिळवून एक आदरयुक्त दरारा निर्माण केलेला डॕशिंग माणूस म्हणजे माझा बाप सोपान मारूती मोरे! त्याच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस रे तू. या माझ्या बापाने कोणाची पर्वा केली नाही. जे स्वतःला पटले तेच करीत पुढे गेला. ज्यांना हे जमले नाही ते मागे राहिले, माझ्या बापाला वचकून राहिले. बाहेरच्या माणसांना ओळखून त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेऊन थोडे लांबच राहिलेल्या माझ्या बापाने नातेवाईकांना सुद्धा हातभर लांब ठेवले व एकटा स्वतःच्या रूबाबात राहून स्वतःचा आब राखून जगला माझा बाप! मग भले त्याला नातेवाईक काहीही म्हणोत. कारण कामगार पुढारी म्हणून मिळविलेले स्थान हे बापाने स्वकर्तुत्वावर मिळविले होते. कोणा नेत्यांची हाजी हाजी केली नाही की कोणा नातेवाईकाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून चिडचिड केली नाही, मग का करावी कोणाची पर्वा! संसार केला आणि जमेल तेवढे माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, पण घरात कोणाचेच अतिरेकी लाड केले नाहीत. माझी आई (चंद्रभागा सोपान मोरे) ही ढवळस गावची पूर्ण अशिक्षित, अंगठे बहाद्दर स्त्री असल्याने माझ्या बापाला कामगारांचे पुढारीपण करताना बायकोकडून जो काही थोडाफार मानसिक आधार लागतो तो पण मिळाला नाही. पण ती बिच्चारी घरात तिच्या थोरल्या बहिणी बरोबर खाणावळ घालून संसारात कष्ट उपसत होती. माझ्या बापाला कौटुंबिक जिव्हाळा होता पण त्यात अतिरेकी भावनाप्रधानता नव्हती. स्वतःच्या कुटुंबाविषयी माझ्या बापाचे हे कडक धोरण, मग दुसऱ्या  नातेवाईकांचे तर विचारूच नका. माझ्या डॕशिंग बापाच्या ओळखी मोठ्या, मग त्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी गुळाला मुंगळे जसे चिकटतात तसे हळूच चिकटलेले काही मुंगळे त्यांचा फायदा झाला की माझ्या बापाला टाटा करून गेले व विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरे काय! माझ्या बापाच्या याच खंबीला पावलावर पाऊल टाकून मी जगत आलोय. बापाचे क्षेत्र राजकीय तर कायद्याच्या उच्च शिक्षणामुळे माझे क्षेत्र वकिली! पण दोन्हीही क्षेत्रे ही सामाजिकच! माझ्या बापासारखाच माझा स्वभाव! मग कोणाची बॉसिंग मी काय सहन करून घेणार! डझनभर नोकऱ्या मी मिळविल्या पण बॉस लोकांची दादागिरी सहन झाली नाही की त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून देऊन त्यांना रामराम करीत सोडल्या.  घरात कोणीही वकील, न्यायाधीश नसताना किंवा इतर कोणत्याही मित्राचा, नातेवाईकांचा पाठिंबा नसताना हिंमतीने वकिलीत पडलो. बायको गावची बारावी शिकलेली मुलगी व गृहिणी. त्यात मुलगी झालेली. बायकोच्या नातेवाईकांनीही माझ्या या भलत्या धाडसामुळे (काहींनी याला खाता पंढरी अशी नावे ठेवली) मला त्यांच्यापासून हातभर लांब ठेवले. या  वकिलीत सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती, सगळा अंधार! त्यातून हळूहळू शिकत गेलो व गेली ३२ वर्षे वकिलीत पाय घट्ट रोवून उभा आहे. खडतर परिश्रम घेतले पण अशिलांकडून फी कशी वसूल करायची याची अक्कल नाही. मग या कोर्टातून त्या कोर्टात वणवण व सतत पैशाची चणचण! पण तरीही कसाबसा संसार केला. एकुलत्या एक मुलीला एम.बी.ए. चे उच्च शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन दिले. तिनेही स्वकर्तुत्वावर ते उच्च शिक्षण घेऊन मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदाची नोकरी मिळवली. सांगायचे तात्पर्य काय, तर माझा फक्त सातवी शिकलेला डॕशिंग बाप, हिंमत करून वकील झालेला मी स्वतः व एम.बी.ए. चे शिक्षण घेऊन व्यवस्थापक झालेली माझी मुलगी ही प्रगतीची चढती कमान आहे. हे यश कोणतेही माध्यम छापून आणणार नाही कारण तिथे माझी जरा सुद्धा पोहोच नाही. पण गरजच काय मोठ्या माध्यमात जायची. समाज माध्यम आहे ना माझ्या जवळ माझे हे सत्य सांगण्यासाठी! अरे रूबाबात जग रे, भरपूर यश मिळवलेस तू आयुष्यात!

(माझ्या हयात नसलेल्या डॕशिंग बापाचा व माझ्या हयात नसलेल्या अशिक्षित पण अत्यंत प्रेमळ असलेल्या आईचा फोटो समोर ठेऊन स्वतःच स्वतःशी केलेले हे स्वगत आहे. माझ्या बापाला वडील म्हणण्याऐवजी मी या लेखात बाप म्हटलेय कारण तो बाप माणूस होता. एका फोटोत माझा बाप राष्ट्रीय नेते श्री. पी.ए. संगमा यांच्याबरोबर खळखळून हसताना जेंव्हा मी बघतो तेंव्हा उतार वयातही (६४) मला शक्ती मिळते).

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०