https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

अनंत चतुर्दशी!

अनंत चतुर्दशी, आज गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देताना!

आज मंगळवार दिनांक १ सप्टेंबर, २०२० हा अनंत चतुर्दशीचा दिवस! कोरोनाची जागतिक साथ नसती तर लालबागच्या राजासह मुंबई, पुणे व इतर शहरांतील मोठे गणपती आज वाजत गाजत विसर्जनासाठी निघाले असते. रस्ते गणेश भक्तांनी ओसंडून वाहिले असते. मुंबईतील मोठ्या गणपतींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. केवढा मोठा जनसागर लोटतो तिथे! मी माझ्या शालेय व कॉलेज जीवनात बाप्पाची मोठी विसर्जन मिरवणूक लॕमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या गेटवर बसून बघायचो. कारण त्या पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस चाळीत आमच्या ओळखीचे पोलीस मित्र राहात होते. त्यामुळे तिथे त्यांच्या घरातील कुटुंब सदस्यांबरोबर त्या गेटवर बसून हळूहळू पुढे सरकणारे मोठे गणपती बघायचो. समोरच असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक जाडजूड मुलगा एकेक गणपती तिथे येऊन थांबला की मग मस्त नृत्य करायचा. त्याच्या नृत्याकडे बघत गणेशोत्सव मंडळाची माणसेही नाचायची. आता तो मुलगा माझ्या सारखाच  वृद्ध झालाय. दोन वर्षापूर्वी गणपती विसर्जन मिरवणूकीत तिकडे गेलो होतो तेंव्हा तो वृद्ध झालेला मुलगा आजारी असून अंथरूणावर खिळला असल्याचे कळले. त्यामुळे त्याची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही. पण मी त्यावेळी वयाची लाज न बाळगता लहान होऊन विसर्जन मिरवणूकीत नाचलो होतो. कोणी काही का म्हणेना पण गणपती बाप्पा जाताना मनाला वाईट वाटते हे मात्र नक्की! यामागे खूप मोठी आध्यात्मिक भावना आहे. दरवर्षी माणसे जन्म घेतात व मरतात. मरतात म्हणजे ती अनंतात विलीन होतात. ब्रम्हांड म्हणा नाहीतर अंतराळ म्हणा ते अनंत आहे. मेल्यावर त्या अनंतात विलीन व्हायचे. अनंत चतुर्दशी मधला अनंत शब्द हा त्या अनंताचेच प्रतीक असावा. गणेश मूर्तीचे विसर्जन म्हणजे या जगात जे जे नित्य नियमाने निर्माण होते त्याचा हळूहळू ऱ्हास होत नित्य नियमाने ते अनंतात विलीन होते असा अर्थ घेता येईल. त्याच निसर्ग नियमाने गणपती बाप्पा येतो, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याबरोबर राहतो व शेवटी आपला निरोप घेऊन अनंत चतुर्दशी दिवशी अनंतात विलीन होतो तो कायमचा नाही तर पुन्हा पुढील वर्षी परत येण्यासाठी! निसर्गाचे प्रतिनिधित्व करणारी किती छान आध्यात्मिक कल्पना व श्रद्धा! यातला अर्थ ज्यांना कळत नाही त्यांनी या श्रद्धेला अंधश्रध्दा म्हटले तरी त्याची लाखो गणेश भक्तांना पर्वा नसते. ही आध्यात्मिक देव श्रद्धा पिढ्यानपिढ्या अशीच चालू राहणार यात शंकाच नाही. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील गावी छोटे गणपती सुद्धा अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जित होतात. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला माझी एवढीच प्रार्थना आहे की बाबा रे, तू जाताना तुझ्याबरोबर त्या विषारी कोरोनाला घेऊन जा व त्याला अनंतातच गाडून टाक म्हणजे मग आम्हाला मोकळा श्वास घेता येईल. मग पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला तुझे मस्त स्वागत करू. तुझ्या पुढे नाचू, गाऊ! हे २०२० वर्ष या कोरोना विषाणूने पार विषारी करून टाकले रे! तू विघ्नहर्ता आहेस! तूच या विषाणूचा नाश करशील अशी आमची श्रद्धा आहे. तुला निरोप देताना वाईट वाटतेय. पण पुढच्या वर्षी मात्र तुझा उत्सव जंगी होणार हे नक्की!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

-ॲड.बी.एस.मोरे©१.९.२०२०

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

साथी!

साथी चित्रपटाने करून दिली प्रेम धर्माची जाणीव!

(१) कालच्या मध्यरात्री (३० अॉगष्टची रात्र व ३१ अॉगष्टची पहाट, २०२०) राजेंद्रकुमार व वैजयंती माला यांचा १९६८ सालचा जुना चित्रपट टी.व्ही. वर पाहिला. मनाला खूपच भावला हा चित्रपट! गाणी तर सुंदर आहेतच, पण कथानक सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. या चित्रपटाचा शेवट सिमी गरेवाल हिने वैजयंती मालास म्हटलेल्या एका वाक्याने होतो. त्या अर्थपूर्ण वाक्यातूनच हा लेख बनला. "लो शांती, संभाल लो अपना पती, संभाल लो अपना धर्म" हेच ते वाक्य!

(२) प्रेमाला धर्म चिकटलेला असतो हेच या वाक्यातून कळते. तुम्ही जेंव्हा एखादी व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी वर मनापासून खरे प्रेम करता तेंव्हा त्या व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी विषयी प्रेमाचा धर्म निर्माण होतो. याच प्रेम धर्माला तुम्ही प्रेम कायदा असेही म्हणू शकाल. या प्रेम धर्मात तुम्ही ज्या व्यक्तीवर, भाषेवर किंवा राष्ट्रावर प्रेम करता त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राकडून तुम्हाला जसे काही प्रेमाचे हक्क प्राप्त होतात तशी तुमची त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राविषयी काही प्रेम कर्तव्येही निर्माण होतात ज्या कर्तव्यांत तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग असतो. उलट अशा प्रेम धर्मात हक्क कमी व त्यागाची कर्तव्येच जास्त असतात. थोडक्यात प्रेमात हक्क कमी व कर्तव्ये, त्याग, जबाबदाऱ्या जास्त असतात.

(३) तुम्ही जेंव्हा विवाह करता तेंव्हा तुम्हाला तुमच्या जीवनसाथी कडून काही हक्क प्राप्त होतात. पण या हक्कांबरोबरच त्या जीवनसाथी विषयी तुमची काही कर्तव्येही निर्माण होतात. अशा कर्तव्यांत तुम्हाला तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग करून जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. जीवनसाथी कडून मिळणाऱ्या नुसत्या सुखातच नाही तर तिच्या दुःखातही सहभागी होण्यालाच विवाह धर्म म्हणतात व हा विवाह धर्म हाच प्रेम धर्म असतो. काल साथी चित्रपट पाहताना या विवाह धर्माची, प्रेम धर्माची, प्रेम कायद्याची नैसर्गिक जाणीव झाली.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.८.२०२०

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

मोहरम (ताजिया)

मोहरम (ताजिया)!

आज रविवार दिनांक ३० अॉगष्ट २०२० मोहरम (ताजिया) निमित्त मुस्लिम बंधू भगिनींना इमाम हुसेन यांचा मानवतावादी शांती संदेश! मी बालपणात पंढरपूरला असताना आजच्या दिवशी मुस्लिम मित्रांबरोबर ताजिया बनवायचो व ताजिया (डोले) जुलूस मध्ये सामील व्हायचो. सलीम शेख हा माझा शाळेतला मुस्लिम मित्र होता. त्याच्या बरोबर मी सांगोला रोडवरील संतपेठ (पंढरपूर) येथील मशिदीत ताजिया बनवायला मदत करायचो. आम्ही दोघे पंढरपूर मधील सगळे ताजिये (डोले) चंद्रभागा नदीत विसर्जित होईपर्यंत नदीकाठी थांबायचो. खूप छान वाटत असे. ताजिया बनवणे हे खूप सुंदर कलाकृतीचे काम असते. पंढरपूरात हिंदू व मुस्लिम एकमेकांच्या सण व उत्सवात सहभागी होतात. दोन्ही समाजात तिथे खूप भाईचारा आहे. आज ती आठवण आली.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर!

निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर/देव!

(१) निसर्ग कशाला म्हणायचे? निसर्गाची संपूर्ण व्याख्या काय? पृथ्वीवरील सजीव निर्जीव सृष्टी व ग्रह, ताऱ्यांसह असलेल्या विश्वाच्या संपूर्ण  पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे का? विश्वाच्या पर्यावरणाचे मानवी मेंदूला आकलन होण्याच्या आतच माणूस मरतो. कारण मानवी आयुष्य खूप लहान आहे. नुसते लहानच नव्हे तर ते क्षणभंगुरही आहे. काही माणसांच्या वाट्याला ७० ते ८० वर्षांचे परिपक्व आयुष्यही येत नाही. आयुष्याचे पान ७० ते ८० वर्षांत पिकायच्या आतच काही माणसे विविध आजारांनी, खून किंवा आत्महत्येने किंवा अपघाताने मरतात. पण जी माणसे ७० ते ८० वयापर्यंत जगतात (अपवादात्मक बाब म्हणून काही थोडी माणसे आयुष्याची शंभरी सुद्धा गाठतात) त्यांना साधे पृथ्वीवरील पर्यावरण नीट लक्षात येत नाही मग त्यांना विश्वाचे पर्यावरण काय कळणार? याचा अर्थ हाच की पृथ्वीवर जन्मलेला कोणताही माणूस हा पूर्ण ज्ञानी होऊन मरत नाही. 

(२) जर विश्वाच्या संपूर्ण पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे तर मग या निसर्गाचे ज्ञान हे अगाध आहे. नुसते पृथ्वीवरील सजीव, निर्जीव सृष्टीचे पर्यावरणच समजणे कठीण आहे मग विश्वाच्या पर्यावरणाची तर गोष्टच वेगळी! म्हणजे निसर्ग हा मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर आहे. पण हा निसर्ग असा कसा तयार झाला? त्याच्या मागे ईश्वर/देव म्हणून कोणती तरी अद्भुत शक्ती आहे का या प्रश्नावर माणसाचा मेंदू ठाम होऊ शकत नाही. मग नास्तिक देव नाही म्हणोत की आस्तिक देव आहे म्हणोत. पण माणसांना जसे आईबाप असतात तसा निसर्गात ईश्वर/देव आहे असे मानून चालले तर मग हा ईश्वर/देव आपल्या पृथ्वीवरच किती विविध रूपात व गुणांत अवतीर्ण झालाय याची गोळाबेरीज केली तरी डोके गरगर फिरायला लागते.

(३) पृथ्वीला लाभलेला सूर्य हा तारा तर चंद्र हा उपग्रह, पृथ्वीवरील हवा, पाणी, जमीन व त्यात असलेले विविध निर्जीव पदार्थ, या सर्वांवर जगणाऱ्या पृथ्वीवरील विविध वनस्पती, विविध पक्षी, प्राणी व माणसे! केवढी ही विविधता या पृथ्वीवर! या विविधतेतच राहणारा निसर्गातील ईश्वर/देव! या सर्व विविध गोष्टी या जणू त्या ईश्वराचेच विविध अवतार ही सुद्धा एक वेगळी कल्पना! म्हणजे देव सूर्य, चंद्रात आहे, देव हवा, पाणी, जमीन यात आहे, देव झाडांत आहे, देव फुलाफळांत आहे, देव पक्षांत आहे, देव प्राण्यांत आहे व देव माणसांतही आहे. मग अशी जर कल्पना करून चालायचे तर मग कशा कशाच्या व कोणा कोणाच्या म्हणून पाया पडायचे?

(४) पृथ्वीवर असलेल्या पर्यावरणात निर्जीव व सजीव पदार्थांची परिवर्तनशील चक्रे आहेत. उदाहरणार्थ, मानवी जीवनाचे जन्म, जीवन व मृत्यू हे चक्र! पृथ्वीवरील निसर्गाच्या विविधतेत माणसांची विविधता समाविष्ट आहे. सर्व माणसांसाठी माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीने बनविलेला कायदा जरी समान असला तरी माणसे पूर्णपणे समान नाहीत. त्यांच्यात कला व गुणांची, बौद्धिक सामर्थ्याची विविधता आहे. अशी ही विविध प्रकारची माणसे या पृथ्वीवर जन्मतात, जीवन जगतात, जगताना सृष्टीतील व त्यांच्याकडील विविधतेची खास देवाणघेवाण करतात व शेवटी मरतात. हे जीवन चक्र असेच पिढ्यानपिढ्या चालू आहे.

(५) मानवी मन फार वेगळे आहे. जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा असतो. हे आव्हान पेलताना मनातील सदसद्विवेकबुद्धी मनुष्याच्या मदतीला धावून येते. पण मानवी सदसद्विवेकबुद्धी सगळ्या माणसांत सारखी असत नाही. याला ज्ञान व बौद्धिक सामर्थ्यात असलेला फरक या कारणांबरोबर पृथ्वीवरील प्रादेशिक विविधतेतील विषमता वगैरे सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे सर्व माणसांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सामूहिक कायदा असणे आवश्यक ठरते. हा सामूहिक कायदा समाजाच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धी मधून निर्माण होतो. पण कायद्याची ही प्रक्रिया खूप कठीण आहे. 

(६) आता प्रश्न निर्माण होतो की जर निसर्गाच्या विविधतेत विविध रूप, गुणांत ईश्वर वावरतोय तर मग तो मानव समाजाच्या सदसद्विवेकबुद्धी मधून तयार झालेल्या कायद्यातही असलाच पाहिजे. पण या कायद्याचे ज्ञान व समज किती जणांना असते? मग वकील व न्यायाधीशांना कायदा जास्त समजतो म्हणून त्यांनाच देव मानायचे का? असे अनेक प्रश्न निसर्गातील देव निर्माण करतो.

(७) महत्त्वाची गोष्ट हीही आहे की, प्रादेशिक विविधतेत प्रादेशिक विषमताही आहे. त्यामुळे निरनिराळ्या राष्ट्रांची प्रादेशिक संस्कृती सारखी नाही. या संस्कृतीत धर्म संस्कृती, देव संस्कृती, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती इत्यादी गोष्टी येतात. या सगळीकडे सारख्या नाहीत. आपण भारतीय भारतात जन्मलो, इथेच वाढलो म्हणून  आपल्या मनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. पण समजा आपण इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, जपान, चीन या ठिकाणी जन्म घेऊन तिथेच वाढलो असतो तर आपले धर्म कोणते असते व आपले देव कोणते असते? आपण काय खाल्ले असते? चीनमध्ये जन्मलो असतो व तिथेच वाढलो असतो तर आपणही तिथल्या खाद्य संस्कृती प्रमाणे साप, पाली, उंदरे, झुरळे, कुत्री यासारखे प्राणी बिनधास्त खाल्ले असते का? हे प्रश्न आपल्या बुद्धीला पडले पाहिजेत. तरच आपल्याला निसर्ग, देव या संकल्पना नीट समजतील. एवढे मात्र खरे की निसर्गातील विविधतेमुळे (निसर्ग विविधा) निसर्गातील ईश्वर/देव मात्र अनाकलनीय झाला आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

टीपः 

माझे ज्ञान व माझा अनुभव यांच्याशी माझ्या मनातील सदसद्विवेकबुद्धीचा सतत चाललेला सुसंवाद म्हणजेच माझे सातत्यपूर्ण विचार! हा लेख या विचारांतूनच तयार झाला आहे. तो माझ्या वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीवर आधारित असल्याने तो सर्वांनाच पटेल असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की, त्यांना या लेखातील काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांचे योग्य ते परीक्षण करून योग्य कारणमीमांसेसह टीका करावी पण कुचेष्टेने हास्य किंवा रागाच्या तयार इमोजी वगैरे टाकून माझ्या लेखाची चेष्टा करू नये किंवा वाद घालू नयेत.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सगळेच ज्ञान व्यवहारात उपयोगी येत नाही!

सगळेच ज्ञान व्यावहारिक होत नाही!

आपला मोठा मेंदू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खूप काही ज्ञान साचवत जातो. या ज्ञानात माणसेही असतात. पण सगळ्याच ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येत नाही. व्यवहार म्हटले की पैसा आला. पैसा नसेल तिथे कसला व्यवहार? पण काही व्यवहार हे पैशाशिवाय असू शकतात. अशा व्यवहारात पैशाची नसली तरी प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होत असते. पण शेवटी असे संबंध भौतिक संपत्तीशी निगडीत असल्याने ते व्यावहारिकच असतात. पण आपण मिळविलेले सगळेच ज्ञान व्यावहारिक होऊ शकत नाही. माझी मूलभूत पदवी कॉमर्सची. पण सुरूवातीला अकाऊंटस क्लार्क म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी कंपनी सेक्रेटरी कोर्सचे इंटर पर्यंतचे शिक्षण घेतले. काही महिनेच कंपनी सेक्रेटरी सहाय्यक म्हणून काम केले व नंतर ते बंद झाले. त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी एलएल. बी. करून वकिली सुरू केली. मूलभूत बी.कॉम. पदवी नंतरच्या तीन वर्षाच्या कायद्याच्या मोठ्या  अभ्यासक्रमात अनेक कायद्यांचा अभ्यास केला पण वकिली सगळ्या कायद्यांत करता आली नाही. आता तर फक्त मालमत्ता कायद्यातच वकिली करतोय व तीही पार्ट टाईम. म्हणजे कायद्याच्या एकूण ज्ञानापैकी फक्त पाच ते दहा टक्के ज्ञानाचाच पैसे कमावण्यासाठी मला सद्या उपयोग होतोय. म्हणजे कायद्याचे बाकीचे ९० टक्के ज्ञान व्यवहारशून्य झाले. जी गोष्ट माझ्या शैक्षणिक ज्ञानाची तीच गोष्ट माणसांची. माझ्या आयुष्यात खूप माणसे आली. पण खूप मोठ्या कष्टाने मिळविलेल्या माझ्या शैक्षणिक ज्ञानाला आर्थिक किंमत देऊन मला पैसा कमवू देणारी माणसे किती मिळाली तर पाच टक्के सुद्धा नाहीत. या पाच टक्के माणसांचाच व्यावहारिक उपयोग झाला. बाकीची ९५ टक्के माणसे ही व्यावहारिक बनू शकली नाहीत. या माणसांत आईवडील, बहीणभाऊ, बायको व मुलगी व इतर नातेवाईक यांना वगळले आहे. कारण अशा जवळच्या नात्यांत व्यवहारापेक्षा माया, प्रेमाला जास्त महत्व असते. माझ्याशी मैत्री केलेले मित्र हळूहळू दूर झाले. म्हणजे दहा ते वीस मित्रांपैकी आता फक्त दोन ते पाचच मित्र शिल्लक राहिले. तेही आता माझ्या सारखे वृद्ध होऊन आपआपल्या संसारात, त्यांच्या मुला मुलींच्या संसारात, नातवंडात मग्न आहेत. मला अधूनमधून फोन करून तब्बेतीची चौकशी करतात एवढीच काय ती त्यांची आता मैत्री उरलीय. या सर्वाचा सार काय तर माणूस जे काही ज्ञान मिळवतो ज्यात माणसेही आली त्याचा व्यावहारिक उपयोग फार म्हणजे फारच कमी होत असतो. मग मोठ्या मेंदूत साचलेल्या इतर ९० ते ९५ टक्के ज्ञानाचे करायचे काय? तर त्या ज्ञानाचा आवडता छंद जपण्यासाठी उपयोग करून त्यातून स्वतःसाठी मानसिक समाधान, आनंद मिळवायचा. माझे फेसबुक लिखाण हे माझ्या त्या छंदाचा, आनंदाचा भाग आहे जिथे मी माझे ९५ टक्के ज्ञान फुकट शेअर  करीत आहे. फुकटच म्हणायचे कारण या मुक्त लिखाणातून मला पैसा मिळत नाही. अर्थात माझ्या लिखाणाचा व्यावहारिक उपयोग शून्य आहे. पण तरीही माझे हे लिखाण मला आनंद देत असल्याने ते व्यर्थ जात आहे असे सुद्धा  म्हणता येणार नाही. कारण मानसिक आनंद, समाधानाची पैशात किंमत करता येत नाही. तीच गोष्ट माणसांची! माझ्या ओळखीची जी काही माणसे आहेत त्यापैकी आता फार थोडी माणसे व्यावहारिक उपयोगासाठी शिल्लक राहिली आहेत. बाकीची फक्त अधूनमधून हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी शिल्लक आहेत. त्यातूनही काही माणसे गप्पा मारता मारता स्वतःचेच काहीतरी पुढे दामटतात. हे दामटणे अती झाले की मग त्या गप्पांचा उपद्रव होतो. मग अशा माणसांना मला हळूच बाजूला करावे लागते, नव्हे कायमचे ब्लॉकच करावे लागते. धड व्यवहार नाही, धड मानसिक आनंद नाही, उलट उपद्रवच! कशाला हवीत अशी उपद्रवी माणसे केवळ ओळख म्हणून जवळ? ज्ञानाचा वारंवार उपयोग झाला नाही तर मोठा मेंदू असे निरूपयोगी ज्ञान हळूहळू डिलीट करतो. तेच काम तो माणसांविषयीही करतो कारण माणसे ही सुद्धा ज्ञानाचाच एक भाग असतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.८.२०२० 


कोरोना जोमात, आम्ही कोमात!

कोरोना जोरात, आम्ही कोमात!

कोरोना जोरात आहे. आमच्या सोसायटीतले दोघे कोरोनाने मेले. लोकल ट्रेन्स चालू होऊन मी पूर्ववत पार्ट टाईम वकिली कामानिमित्त मुंबईला जात नाही तोपर्यंत मी कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवले आहे. तसेच मी व्हॉटसअप बंद केले आहे. जाम टरकलोय मी! सद्या फेसबुकवर फुसफुस करणे एवढेच माझे काम! अजून तरी घरी बसून दोन वेळेला दोन घास गिळायला मिळत आहेत व कोणत्याही औषधाशिवाय तंदुरूस्त आहे हे नशीब! आज एका श्रीमंत क्लायंटने फोन करून सांगितले की त्यांच्या हायफाय सोसायटीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बहुतेक जण खाजगी लॕब्सकडून कोरोना चाचणी करून घेत आहेत. एका व्यक्ती साठी एका चाचणीचा दर सात हजार रूपये. म्हणजे घरात पाच माणसे असतील तर पाच जणांनी मिळून ७०००×५ = ३५,०००/- रूपये एका घरामागे द्यायचे. त्या सोसायटीत समजा एकूण घरे १०० असतील तर त्या खाजगी लॕबची कमाई १०० घरांच्या एका सोसायटीमागे पस्तीस लाख रूपये. श्रीमंतांच्या या हायफाय सोसायट्या त्या सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि सचिवाला गाठून खाजगी कोरोना टेस्टसाठी तयार करायच्या असा धंदा जर सुरू असेल तर मग कोरोनापेक्षा हा धंदाच जोरात असे म्हणावे लागेल. खरे खोटे तो निसर्गच जाणो! पण या श्रीमंत क्लायंटच्या फोनमुळे साधारण अंदाज आला. या श्रीमंत क्लायंटला माहित आहे की मी गेली सहा महिने वकिलीतून एकही पैसा मिळविला नाही. शेवटी वैतागून मी बायकोचे मंगळसूत्र मोडले. ते पैसे संपल्यावर गेल्या महिन्यापासून माझी विवाहित मुलगी आम्हा नवरा बायकोला पोटासाठी पैसा देत आहे. इथे माझी खाण्यापिण्याची पंचायत आहे आणि हा श्रीमंत क्लायंट मला घाबरवून मीही त्यांच्या हायफाय सोसायटी प्रमाणे सात हजार रूपये वाली खाजगी कोरोना टेस्ट करून घ्यावी व बायकोचीही तशी टेस्ट करून घ्यावी हा सल्ला मला देत आहे. मग हे लचांड एकदा का मागे लावून घेतले की मग ते खाजगी लॕबवाले पुन्हा हात धुवून मागे लागणार नाहीत याची काय शास्वती? मला त्या श्रीमंत क्लायंटच्या श्रीमंत सल्ल्याचा खूप राग आला. त्याला मग आडवे घ्यावेच लागले फोनवरून! त्याला मी सरळ सांगितले की मी मरण्याची जय्यत तयारी केली आहे. कालच माझ्याच मरण तिरडीची पोस्ट मी फेसबुक वर टाकलीय. आमचीच टेस्ट काय तर संपूर्ण गरीब भारतीय जनतेच्या टेस्टस करणे व त्यांना सरकारी रूग्णालयात योग्य ती वैद्यकीय ट्रीटमेंट देणे ही भारतीय संविधानाने सरकारची जबाबदारी आहे. कारण भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क बहाल करते. तो अधिकार सरकारला देता येत नसेल तर आमचे नशीब! हे त्या क्लायंटला  सुनावल्यावर त्या श्रीमंत क्लायंटला माझा खूप रागआला. त्याचा अहंकार जागृत झाल्याचे फोनवरून कळले. म्हणजे यापुढे त्या श्रीमंत  क्लायंटकडून पुढची कामे मिळणे बंद! बंद तर बंद, पण फालतू श्रीमंती सल्ले ऐकून घेणार नाही. काय वैताग आणलाय या कोरोनाच्या अर्धवट ज्ञानाने! तो कोरोना प्रत्यक्षात तर दूरच राहिलाय अजून तरी माझ्यापासून, पण ही असली माणसे आजूबाजूला आहेत त्यांचे हे असले मोठे सल्ले ऐकून अंगात खरंच कोरोना घुसलाय की काय असे क्षणभर वाटले. अरे बाबांनो, तुम्ही श्रीमंत आहात आणि आम्ही गरीब! तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे? तुमची परिस्थिती काय आणि आमची परिस्थिती काय? आणि असले श्रीमंती सल्ले तुम्ही गरिबांना देता! यापूर्वीच मी व्हॉटसअप बंद करून टाकलेय. आता तर कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवलेय. नशिबाने जगलो, वाचलो व पुन्हा लोकल ट्रेनने मुंबईला पार्ट टाईम वकिलीसाठी जाऊ लागलो तर तोंडाला मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून भेटेनही. पण असले श्रीमंती सल्ले देणाऱ्या लोकांना बिलकुल भेटणार नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०

बुध्दंम् सरणम् गच्छामी!

 *!! भवतु सब्ब मंगलम् !!*
  (सगळ्यांचे कल्याण होवो)

       *" बुध्दं सरणं गच्छामि "*
(मी बुद्धास अर्थात माझ्या सदसद्विवेकबुद्धीस
  शरण जात आहे)

       *" धम्मं सरणं गच्छामि "*
(मी बुद्ध विचारांच्या तत्वज्ञानास शरण जात 
  आहे)

        *" संघं सरणं गच्छामि  "*
  (मी सदसद्विवेकबुद्धीला शरण जाऊन मनावर             
   विजय प्राप्त करीत जगाचे कल्याण व 
   जगात शांती प्रस्थापित करू शकणाऱ्या
   सबळ मनाच्या आदर्श लोकसमूहाला शरण
   जात आहे)

🌹🌹🌹सबका मंगल हो🌹🌹🌹

-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०