https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!

निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!

निसर्गातील देव दिसत नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेत त्याला समोरासमोर नमस्कार करता येत नाही. परंतु निसर्गातील देवत्व मात्र प्रत्यक्षात दिसते, प्रत्यक्षात अनुभवता येते. पण हे देवत्व निसर्गातील दलदलीवर उभे आहे, त्या दलदलीला चिकटलेले आहे हेही सत्य आहे. याचा अर्थ हाच की देवाचा स्वर्ग राक्षसाच्या नरकाला चिकटलेला आहे. उदा. चिखलातून कमळ उमलते, काटेरी झुडुपाला गुलाबाची फुले येतात, लैंगिक वासनेतून प्रेमाचा अंकुर फुटतो. चिखल, काटे, लैंगिक वासनेचा अंगार यांना मी राक्षसी नरक म्हणतो तर अनुक्रमे कमळ, गुलाब, प्रेम यांना मी देवाचा स्वर्ग असे म्हणतो. या स्वर्गातच देवत्व दिसते, अनुभवता येते. पण निसर्गाची रचनाच अशी की देवत्वाचे निर्माण हे राक्षसी नरकातून, दलदलीतून होते. माझी पत्नी स्वैपाकघरात अन्नपदार्थ बनवून जेंव्हा माझ्यापुढे जेवणाचे ताट आणून ठेवते तेंव्हा जणूकाही अन्नपूर्णा देवीने प्रसन्न होऊन माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला अन्नदान केले असे वाटते व ताटातील अन्नपदार्थांत मला देवाचे देवत्व दिसते. मग मी माझे जेवण सुरू करण्यापूर्वी अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटाला नमस्कार करून जेवण सुरू करतो. माझा तो नमस्कार निसर्गातील देवाला असतो. कच्चे अन्नपदार्थ शिजवून खाण्यायोग्य व चवदार बनविणे ही एक सुंदर निर्मिती प्रक्रिया आहे. या सुंदरतेच्या नवनिर्माण प्रक्रियेत देवत्व असते व तेच देवत्व सुंदर नवनिर्मितीत उतरलेले असते. पण निसर्गात देवत्व शोधणे, स्वतःच्या मनात देवाला जाणून ते देवत्व स्वतःच्या परिश्रमाने निर्माण करणे व टिकविणे हे एक फार मोठे आव्हान असते. दलदलीचा राक्षस या देवत्व निर्मितीच्या व टिकविण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण करतो. त्या राक्षसी दलदलीने भरलेल्या अडचणींवर मात करून दलदलीत राहणाऱ्या राक्षसाला नामोहरम करणे, त्याला हरवणे हे फार मोठे आव्हान निसर्गातील अदृश्य देवाने माणसापुढे उभे केले आहे. सुंदर देवत्व निर्मितीचे हे आव्हान देवाने माणसापुढेच उभे केले आहे, जंगली जनावरांपुढे नव्हे. जंगली जनावरांना जंगली वागण्यासाठी देवाने मुक्त ठेवलेय. त्या जंगली जनावरांची ती नरकातली मुक्ती म्हणजे माणसांना कायम डोकेदुखी! ही डोकेदुखी म्हणजे दलदलीतून देवत्व निर्मितीचे माणसापुढे देवाने उभे केलेले मोठे आव्हान होय! दलदल ही केवळ जंगली जनावरांच्या जंगलीपणातच नसते. ती माणसांतल्या वाईट, दुष्ट प्रवृत्तीतही असते. खून, बलात्कार, चोऱ्या, दरोडे यासारखे गुन्हे करणारी जंगली माणसे, भ्रष्टाचार करणारी व तसेच दुसऱ्याच्या सुंदर नवनिर्मितीच्या कर्तुत्वावर जळणारी व त्या असूयेपोटी नातेसंबंधात विष कालवणारी दुष्ट, हलकट प्रवृत्तीची अर्धजंगली माणसे ही तर फार जवळ चिकटलेली दलदल होय. अशा माणसांना सरळ जंगलात नेऊनही सोडता येत नाही. देवत्वाची आवड असलेल्या चांगल्या माणसांना या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांसोबतच जगावे लागते. या बिकट परिस्थितीवर चिडून, त्रागा करून काही उपयोग नसतो. कमळाला चिखलासोबत व गुलाबांना काट्यांसोबत राहण्याशिवाय निसर्गाने की निसर्गातील अदृश्य देवाने पर्यायच ठेवला नाही. मग कमळाला चिखलावर व गुलाबाला काट्यांवर चिडून कसे चालेल? या त्रासदायक दलदलीच्या, काट्याच्या वास्तविक सत्याचा स्वीकार करून निसर्गातील सुंदरतेचा अर्थात देवत्वाचा अनुभव घेणे यातच कमळ व गुलाब यांचे हित आहे. माणसांनीही निसर्गाचे हे सार्वत्रिक कटू सत्य स्वीकारून त्यांच्या जीवनात देवत्वाचे निर्माण करण्याचा, ते देवत्व जगण्याचा व टिकविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न हीच निसर्गातील  देवाची देवपूजा होय! अशा देवपूजेतून देवत्व निर्माण करता येते व ते जगताही येते. प्रयत्नांती परमेश्वर ही मराठी म्हण बहुतेक या नैसर्गिक सत्यावर आधारित असावी.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

हिऱ्यांचे नशीब!

सगळ्याच हिऱ्यांच्या नशिबी चमकणे नसते!

सद्या गाजत असलेला दूरदर्शन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा हा खोटे खोटेच स्वतःला वर उंचावण्याच्या माणसाच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा एक भाग आहे. पण शैक्षणिक पात्रतेची खोटी प्रमाणपत्रे मिळवून का कोणी सुशिक्षित होतो? स्वतःचे खोटे सत्कार घडवून आणून का कुठे सामाजिक प्रतिष्ठा मिळते? इस्त्रीची पांढरीशुभ्र कपडे घालून का कुठे गुंड मवाली चारित्र्यवान होतात? समाजात असे कितीतरी हिरे आहेत की ज्यांना स्वतःवर पैलू पाडण्याची योग्य  संधी मिळत नाही व त्यांना कायम अंधारातच रहावे लागते. याचे एक कारण असेही आहे की, कृत्रिम प्रक्रियेने सोन्याचा मुलामा अंगावर चढवून तांबे, पितळ, लोखंड हे धातू सोन्याची खोटी चमक दाखवित अंधारात चाचपडणाऱ्या खऱ्या हिऱ्यांना वाकुल्या दाखवित खोट्या रूबाबात फिरत आहेत. अंधारात पडलेल्या हिऱ्यांची पारख करू शकणारे जवाहीर या हिऱ्यांच्या नशिबी येत नाहीत हे या हिऱ्यांचे दुर्दैवच होय! "पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार, देवा अजब तुझे सरकार" असे म्हणतच हे अंधारात चाचपडणारे हिरे जगत असतात. फेसबुक, व्हॉटसॲप सारख्या समाजमाध्यमांवर स्वतःची सुंदर कलाकृती जशी सुंदर चित्रे, सुंदर गायन किंवा नृत्य, लेखन टाकून या माध्यमांवर कोणी कलेची, ज्ञानाची पारख असलेला जवाहीर मिळतोय का याची मोठ्या आशेने चाचपणी करीत या माध्यमांवर वावरणारी काही ज्ञानी,  गुणी मंडळी आहेत. सामान्य लाईक्सपेक्षा कोणी जवाहीर मिळतोय का याकडे त्यांचे लक्ष असते. पण या समाजमाध्यमावर हिऱ्यांची पारख असलेले जवाहीर असतील का याविषयी मला शंका आहे. हे जवाहीर समाजमाध्यमाच्या बाहेर राहून विमानातून प्रवास करीत हिऱ्यांचा शोध घेत फिरत असावेत! समाजमाध्यमांवरील कलाकारांची कला एखाद्या दर्दी माणसाच्या हृदयाला जाऊन भिडेल व मग त्या कलेचे चीज होईल या आशेने समाजमाध्यमी कलाकार मंडळी आपआपल्या कलेच्या चित्रफिती या समाजमाध्यमावर टाकत असतात. माझे लेखन हा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. पण गेल्या पाच वर्षातील माझ्या अखंडित फेसबुक लेखनाला एक पण मायका लाल जवाहीर भेटला नाही. मी मात्र दुसऱ्यांच्या लेखनाची, कलेची मनापासून प्रशंसा करीत अधूनमधून त्या गोष्टी माझ्या स्वतःच्या फेसबुक खात्यावर शेअर करीत असतो. पण माझ्या त्या वैयक्तिक कौतुकाशिवाय इतरांच्या त्या सुंदर कलाकृतीला खरा न्याय मिळत नाही. कारण हिऱ्यांची खरी पारख असलेले जवाहीर बाहेरच विमानातून फिरत असतात. ते समाजमाध्यमात घुटमळत नसतात.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

बौद्धिक कौशल्याने व्हा ज्ञानबेटाचे राजे!

बौद्धिक कौशल्याशिवाय ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही!

माहिती, ज्ञान व कौशल्य असे बौध्दिक प्रगतीचे तीन टप्पे असतात. निसर्गाचे ज्ञान हेच विज्ञान! हे विज्ञान म्हणजे महासागर! या महासागराची वरवरची माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती ही मनाची प्राथमिक जाणीव असते. ही जाणीव प्रगल्भ होण्यासाठी अर्थात माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी बुद्धीला त्या माहितीवर काम करावे लागते. महासागर लांबून दिसतो तसा नसतो जसा उंच डोंगर लांबून दिसतो तसा नसतो. म्हणून दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे. महासागरात लांब गेल्यावर व डोंगरावर उंच गेल्यावर जे प्रत्यक्षात दिसते व अनुभवास येते त्याला ज्ञान म्हणतात. माहितीचे रूपांतर ज्ञानात अशाप्रकारे होते. चौकस बुद्धी नुसत्या माहितीवर गप्प बसत नाही. ती माहितीच्या अधिक खोलात जाते व माहितीतून ज्ञान बाहेर काढते. ज्ञान म्हणजे माहितीचे ताक घुसळून बाहेर काढलेला लोण्याचा गोळा होय. पण नुसते ज्ञान जवळ असून फार उपयोग नसतो. बुद्धीला त्या ज्ञानाचा सराव केल्याशिवाय त्यात कौशल्य प्राप्त करता येत नाही. ज्ञानात बौद्धिक कौशल्य नसेल तर कृती सहज व उत्कृष्ट होऊ शकत नाही. निसर्ग विज्ञानात असलेल्या अनेक ज्ञानशाखा ही ज्ञानाच्या महासागरातील विविध ज्ञान बेटे होत. या ज्ञान बेटांचे राजे होण्यासाठी एखादे बेट निवडून त्या बेटावरील पर्यावरण आत्मसात करून त्यावर बुद्धीचे प्रभुत्व प्राप्त करावे लागते. बेटावरील पर्यावरणाच्या ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय अशा निवडलेल्या बेटाचे राजेपण प्राप्त होत नाही. कला, क्रीडा, वैद्यक शास्त्र, अभियांत्रिकी, कायदा, धर्म, अर्थकारण, राजकारण अशा कितीतरी ज्ञानशाखा मानवी बुद्धीला निसर्ग विज्ञानातून सापडल्या आहेत. या सर्व ज्ञान शाखांत कौशल्य प्राप्त करणे मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या वैयक्तिक  आवडीनुसार व बौद्धिक गतीनुसार निरनिराळी माणसे विविध ज्ञान शाखांतून विशेष प्रावीण्य मिळवित चित्रपट अभिनेते, संगीतकार, गायक, खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए., व्यवस्थापक, शिक्षक, अर्थकारणी, राजकारणी होतात. ही सर्व तज्ज्ञ मंडळी फक्त त्यांच्याच ज्ञान शाखेत तज्ज्ञ असतात. इतरांच्या ज्ञान शाखा म्हणजे त्यांच्यासाठी वरवरची माहिती असते किंवा त्यांच्याविषयी त्यांना फार जुजबी ज्ञान असते. सर्वसामान्य माणसे निरनिराळ्या ज्ञान शाखांच्या फक्त माहितीवर किंवा जुजबी ज्ञानावर जगत असतात. पण सामान्य ज्ञान व सर्वसाधारण अक्कल (कॉमन सेन्स) ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे, मग तो माणूस तज्ज्ञ असो की सर्वसामान्य माणूस असो. माहिती, ज्ञान व कौशल्य या तीन पायऱ्या पार केल्याशिवाय बुद्धीला पर्यावरणातील पदार्थांना, प्राणीमात्रांना व माणसांना योग्य प्रतिसाद देता येत नाही. उदा. एखादी व्यक्ती ही अन्नावाचून उपाशी आहे व तिला तुम्ही अन्न देण्याऐवजी आध्यात्मिक भक्तीमार्ग शिकवताय हा प्रतिसाद योग्य होईल का? तुम्ही योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपर्कात येणाऱ्या पदार्थ, प्राणी व माणसांविषयी अगोदर माहिती व नंतर सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच तुमची अशा पदार्थ, प्राणी व माणसांबरोबर व्यावहारिक देवाणघेवाण शक्य आहे. फेसबुकवर तुमचे मित्र झालेल्या किती लोकांविषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे? त्यांच्याविषयी ज्ञान असणे हा तर खूप पुढचा भाग झाला. मग अशा जवळजवळ अनोळखी असलेल्या व्यक्तीं बरोबर किती संपर्क ठेवायचा, त्यांच्याबरोबर एखाद्या विषयावर किती वादविवाद घालायचे हे तुमच्या बुद्धीला कळले पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रथम माहिती मिळवा, नंतर सखोल अभ्यासाने त्या माहितीतले ज्ञान मिळवा व नंतर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करून त्यात बौद्धिक कौशल्य प्राप्त करा. कारण तुमचे बौद्धिक कौशल्य तुम्हाला तुमच्या कृतीत आत्मविश्वास व सहजता प्राप्त करून देते. ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय त्या ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.१०.२०२०

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!

(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या  पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र  प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.

(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.

(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.

(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.

(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी  म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.

(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.

(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.

(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.

(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०

१४ आॕक्टोबर धम्म चक्र प्रवर्तन दिन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अतिमागास, मागास जाती समाज जीवनात आजही अंधारच असता. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(१) एखाद्या व्यक्तीवर योगायोगाने अन्याय होणे व त्यामुळे त्याने दैव, नशीब, प्रारब्ध यासारख्या कल्पना कवटाळून बसणे व एखाद्या समाजावर एकाच पिढीत नव्हे तर पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेल्याने त्या समाजाचा देवावरील व दैव, प्रारब्ध वगैरे कल्पनांवरील विश्वास उडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

(२) मी हिंदू धर्मात व मराठा जातीत जन्मलो म्हणून मी शैक्षणिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत त्या धर्मामुळे किंवा त्या जातीमुळे सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलो असे नव्हते. सातवी पर्यंत शिकलेले वडील गिरणी कामगार, आई शालेय शिक्षणाने पूर्ण अशिक्षित व घरी चार मुले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा हलाखीच्या परिस्थितीत हिंदू धर्मीय मराठा हा शिक्का माझ्या मदतीला धावून आला नाही.

(३) अशा हलाखीच्या परिस्थितीत खाजगी कंपन्यांत नोकऱ्या करीत खुल्या वर्गात शिक्षण घेत वकील होणे ही साधी गोष्ट नव्हती. ज्यांनी ज्ञान, पैसा व सत्ता या तिन्ही क्षेत्रातील जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांनी मी हिंदू-मराठा म्हणून माझे कुठेही आदराने स्वागत केले नाही. स्वतःच हिंमत करून कष्ट घेत व अपमान सहन करीत वकील झालो व स्वतःला थोडेफार का असेना पण ज्ञान व पैसा या दोन गोष्टींत कनिष्ठ श्रेणीतून मध्यम श्रेणीत घेऊन आलो. माझ्या या खडतर प्रवासात मी हिंदू-मराठा आहे म्हणून मला कसलीही मदत झाली नाही. म्हणजे मी जो वकील झालो तो हिंदू धर्मामुळे किंवा मराठा जातीमुळे नाही तर माझ्या मेहनती मुळे झालो हे सत्य आहे.

(४) मग मी असा विचार करतोय की मराठा जातीत जन्मून जरा मला शैक्षणिक व आर्थिक बाबतीत काहीच फायदा झाला नाही तर मग या जातीला उच्च जात समजायची कशी? ही सुद्धा  मागासवर्गीय जातच झाली. भले ती अनुसूचीत जाती जमाती सारखी अतिमागास जात नसेल. पण ती मध्यम मागास जात तर निश्चितच आहे. केवळ या जातीतली बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी गर्भश्रीमंत व सत्ताधारी आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज हा उच्च जातीचा पुढारलेला समाज असे समजणे चुकीचे आहे. माझे एकट्याचेच उदाहरण नाही तर हलाखीत खिचपत पडलेली माझ्यासारखी लाखो करोडो कुटुंबे मराठा समाजात आहेत हे सत्य आहे.

(५) खरे खोटे मला माहित नाही, पण महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी म्हणे मराठा समाजालाही आरक्षण घ्या असे सांगितले होते. मग मराठा समाजाने ते आरक्षण का घेतले नाही की त्यावेळी मराठा समाजाच्या मूठभर श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मराठा समाजाला त्यापासून वंचित ठेवले हे कळायला मार्ग नाही. जे झाले ते झाले पण आज सकल मराठा समाज जागृत झाला आहे. तो उच्च जातीचा खोटा शिक्का मराठा समाजाला नको आहे. सत्य परिस्थिती स्वीकारून मराठा समाजाला मागास जातीचा समाज म्हणून मान्यता मिळणे व त्या आधारे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.

(६) अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलाय ही गोष्ट मनाला खूप भावली. मी आज विचार करतोय की, अज्ञान, गरिबी, अस्पृश्यतेच्या दलदलीत (दलित हा शब्द याच दलदलीवरून निर्माण झाला असावा बहुतेक) पिढ्यानपिढ्या पिचत ठेवलेल्या अतिमागास जातींतील लोकांना मोठ्या हिंमतीने अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याने या पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अशा अतिमागास व काही इतर मागास जातीत जन्मलेल्या लोकांची स्थिती आजही त्यावेळी होती तशीच अंधारमय राहिली असती.

(७) मी ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो, करोडो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचा विचार करतो तेंव्हा त्यांचा तो निर्णय किती तर्कशुद्ध होता हे मनाला पटते. पिढ्यानपिढ्या दलदलीत खिचपत ठेवलेल्या  एवढया मोठ्या अतिमागास समाजाला उचलून वर काढायला जेंव्हा कोणताच देव पुढे येत नाही तेंव्हा त्या देवावर विश्वास का ठेवावा व जो धर्म एखाद्या समाजाला अस्पृश्य लेखतोय त्या धर्मात तरी का रहावे? डॉ. आंबेडकर यांचे हे क्रांतिकारक विचार म्हणूनच मला पटतात. मला जर कोणी अस्पृश्य म्हणून लेखले असते तर मीही हेच केले असते. मी हिंदू धर्मात राहूनही बौद्ध धर्माचे बौद्धिक विचार स्वीकारू शकतो व मराठा समाजाचा असूनही अतिमागास समाज बांधवांचा मित्र होऊ शकतो. हा माझा व्यापक दृष्टिकोन मला माझ्या शिक्षणाने दिलाय! १४ अॉक्टोबर, १९५६ या क्रांतिकारी दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या निमित्त आज १४ अॉक्टोबर या दिनी सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

देव, दानव, मानव!

देव, दानव, मानव!

नुसत्या आध्यात्मिक धर्माला कवटाळून देवाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही देव नाही व नुसत्या भौतिक विज्ञानाला कवटाळून मनगटाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही दानव नाही, देवाची आध्यात्मिक मनःशक्ती व निसर्गाची भौतिक शरीर शक्ती या दोन्ही शक्तींना सोबत घेऊन सारासार विचार करणाऱ्या बुद्धीच्या जोरावर जगावर राज्य करणारा माणूस हा देव नाही की दानव नाही तर तो फक्त माणूस आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

मॉडर्न आर्ट

मॉडर्न आर्ट!

परिपूर्णतेचा ध्यास व नीटनेटकेपणाची सवय पुढे पुढे त्रासदायक होते. हे आहे माझे बाथरूम जिथे मी दररोज अंघोळ करतो. साधेच आहे पण जमेल तेवढे स्वच्छ ठेवण्याचा बायको प्रयत्न करते. अंघोळ करताना बाथरूम मध्ये ठेवलेल्या या निळ्या रंगाच्या पाण्याच्या पिंपावर असलेले हे डाग पुसण्याचा मी अधूनमधून उगाच निरर्थक प्रयत्न करतो. कालानुरूप पिंपाचा निळा रंग उडणे व बाथरूम सिलिंगला मागे पांढरा रंग लावताना त्या पिंपावर पडलेले पांढऱ्या रंगाचे डाग पिंपावर तसेच राहणे ही गोष्ट नॉर्मलच! पण माझा काटेकोरपणा मला आडवा येतो. ते डाग साबणाने धुवून किंवा ब्रशने घासून सुद्धा निघणार नाहीत हे मनाला कळत असूनही अंघोळ करताना मला हे डाग दिसले की जाम त्रास होतो. मग त्यावर हात फिरव, पाणी टाक असले प्रकार मी करतो. यालाच मंत्रचळ (ओसीडी) असे म्हणतात. हा सौम्य मानसिक आजारच आहे. त्यावर मी माझ्या विचारांनीच मात करीत आलोय. माझे काटेकोरपणाचे किंवा नीटनेटकेपणाचे विचार मला अंघोळ करण्याच्या कृतीवर लक्ष एकाग्र करू देत नाहीत. त्या विचारांच्या प्रवाहातून लक्ष पुनःपुन्हा अंघोळीच्या कृतीवर आणताना मी चाचपडतो. माझे मन अंघोळीऐवजी त्या पाण्याच्या पिंपावरील डागांवरच सारखे सारखे गेल्याने मी स्वतःच स्वतःवर चिडतो. त्यामुळे अंघोळ क्रिया पूर्ण करण्यासाठी मला जास्त वेळ लागतो. मग मी सजग होतो व निरर्थक कृतीत वेळ वाया घालवू नकोस असे स्वतःला बजावतो. आज शेवटी मनाला समजावले की बाबारे, हे असेच असते. जगात कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते. या पिंपावर जे डाग आहेत ना त्यांना तू मॉडर्न आर्ट समज. मॉडर्न आर्ट मधील त्या उभ्या आडव्या रंगरेषा तूला समजल्यात का कधी? मग तसेच या पिंपावरील न पुसल्या जाणाऱ्या डागांना समज आणि त्यांच्याकडे मॉडर्न आर्टच्या नजरेने बघत मस्त अंघोळ कर. अगदी खरंच सांगतोय! मी आज असा नवीन दृष्टिकोन स्वीकारूनच मस्त शांतपणे अंघोळ केली. फुकट डोक्याला तापच नको त्या जुनाट काटेकोरपणे, नीटनेटकेपणाने राहण्याच्या सवयीचा! अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आल्यावर मग मात्र डोक्यात विचार आला की, यालाच बदल म्हणायचा का? खरं तर, बदल हा झालाच नव्हता. फक्त आहे त्या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघायचे ठरवले एवढेच! फक्त दृष्टी बदलायची आणि बदल झालाय असे खोटे खोटे मनाला पटवायचे आणि अशाप्रकारे मनाला शांत करायचे. खरंच, हे मन म्हणजे ना!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०